तुमचं आयुष्य नि माझं आयुष्य समांतर रेषांसारखं सुरू आहे. जे तिथे घडतं तेच थोड्याफार फरकानी इथे घडतं. जे इथे घडतं तेच थोड्याफार फरकानी तिथेही घडतं. तरीही आपण पोहोचतो निरनिराळ्या दिशांना, निरनिराळ्या ठिकाणांना .. याच प्रवासाच्या गंमतीजमती, अडीअडचणी वाचा माझ्या या ब्लॉगवर .. जिथे कधी तुम्ही सांगा मी ऐकेन, कधी मी सांगेन तुम्ही ऐका.. मोकळे व्हा, मनसोक्त जगा .. मग जाणवेल .. वेगळं वेगळं असलं तरीही, तुमचं आमचं सेम असतं !
मंगळवार, ६ डिसेंबर, २०२२
कोरा कागझ
पूर्वी कधीतरी हा चित्रपट पाहिला होता पण यातलं ते गाणं ऐकलं की तेव्हापासून नको बाई असले रडके पिक्चर असं मनात वाटून जायचं.
जीवनकथा सांगणारे चित्रपट मला स्वतःला फार आवडतात. त्यामुळे पुन्हा एकदा अशा रडक्या चित्रपटांच्या नादी लागायचं काम कितीही वेळा नाही ठरवूनही मी करत असतेच, कहर म्हणजे पूर्वी असे चित्रपट पहाताना अक्षरशः घळाघळा रडायला यायचं मला, आता जरा निवलंय ते प्रकरण .. (हुश्श .. वाचले )
तर ... कोरा कागझ
एक छान सुरस कथा. साधी सोपी गोष्ट, चारचौघांच्या घरात सहज घडेल अशी मांडणी, पण आशय किती खोल.
श्रीमंत घरची मुलगी एका सामान्य परिस्थिती असलेल्या पण बुद्धिमान, देखण्या आणि कष्टाळू मुलाच्या प्रेमात पडते. लग्न करून संसार थाटते. मुलीच्या आईची सतत हिच्या संसारात लुडबुड. तिच्या सुमार परिस्थितीवरून सतत टोमणे आणि तीचा संसार चालवायला आपण स्वतःच पुढाकार घेण्याचा कहर वेडेपणा करणारी ती माऊली. तिच्या त्या मूर्खपणात इकडे लेकीचं आणि जावयाचं बिनसतं. नवरा रागीट आणि बायको सगळ्यांचं मन जपायला जाणारी... पण तरीही झुकतं माप आईकडे... अखेर मुलाच्या आत्मसन्मालाला अनेक प्रसंगांतून ठेच लागत जाते आणि एक दिवशी संसार मोडतो. जावई लेकीला माहेरी पाठवून देतो ते कायमचंच...
इतके दिवस संसार सावरून घेत काहीसे गप्प झालेले लेकीचे वडील अखेर एक दिवशी आपला संताप, दुःख व्यक्त करतात. लेकीच्या आईला तिच्यामुळेच लेकीचा संसार उध्वस्त झाला ही जाणीव करून देतात आणि लेकीलाही तिच्या चुकीची जाणीव करून देत चांगलीच कानउघडणी करतात, पण ... तोवर वेळ निघून गेलेली असते.
इकडे तो ... मनाने उध्वस्त झालेला...शहर सोडून, नोकरी सोडून कायमचं कुठेतरी निघून जातो.
मध्ये बराच काळ लोटतो. आता ती एकाकी पडलेली आणि तोही दुसऱ्याच कोणत्यातरी शहरात तिच्याचसारखा एकाकी पडलेला...
रोज संध्याकाळच्या विशिष्ट वेळेला ती वाट बघते, तो परतून येण्याची ... पण तो कधीच येत नाही
कोऱ्या कागदासारखं आयुष्य .. कोरंच रहात
अखेरीस,
एका क्षणी दोघे चुकून भेटतात ... कैक वर्षांनी ... आणि मधल्या काळाचं अंतर मिटतं. क्षणाच्या रागाने, थोड्याशा गैरसमजांनी तुटलेलं नातं पुन्हा जुळतं ते दैवी कृपेनेच असंच म्हणायला हवं...
पण
प्रत्यक्ष आयुष्यात असं फार फार क्वचितच घडत असावं.
एकदा गैरसमज झाले की माणसं ते दूर करण्याची संधीच देत नाहीत कोणालाच आणि रागाच्या भरात केलेली एक चूकही माणसाचं जीवन उध्वस्त करून जाते ते कदाचित कायमचंच !
हेच शिकवणारा हा चित्रपट
जया बच्चन, विजयानंद, सुलोचना, ए.के.हंगल ... सगळ्यांचीच कामं अप्रतिम झालेली आहेत. गाणी तर एक से एकच ...
पण आपण कलाकृतीचा आनंद घेताना मनोरंजन तर करून घ्यावंच पण अशा चित्रपटातून जगण्याप्रती दिलेली शिकवणूकही आत्मसात करत करत पुढे जावं असं मला वाटतं.
वाईट घटना घडल्या की नेहमी चित्रपटांना दोष दिला जातो, कदाचित काही लोकांच्या, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांच्या डोक्यावर, मनावर चटकन ते तसे चित्रपट बिंबतही असतील, ना नाहीच... पण याच न्यायाने, जेव्हा असे चांगले, दर्जेदार चित्रपट पडद्यावर येतात तेव्हा त्यांचाही परिणाम माणसांवर खरंतर व्हायला पाहिजे. चित्रपट हे जीवनाचंच प्रतिबिंब आहे, त्यामुळे कोणताही चित्रपट बघताना त्यातला आशय आणि जीवनामृत रसरसून प्यायला पाहिजे असं मला आवर्जून सांगावसं वाटतं.
धन्यवाद
- मोहिनी घारपुरे - देशमुख
सोमवार, १० ऑक्टोबर, २०२२
Corn Spinach Sandwitch
This is a simple and easy to make recipe. I recently tried this recipe and thouroughly enjoyed making and eating it as well !
Here is a stepwise recipe of corn spinach sandwitch. Do try and let me know your valuable reply !!!
STEP 1
Boil the spinach and corn in a douuble boiler.
शुक्रवार, ८ जुलै, २०२२
घरातल्या गोष्टी
सारखं काहीतरी होतंय
धुमसतंय, शिजतंय, कुजतंय, बरसतंय
घराच्या चार भिंतींच्या आत
सारखं काहीतरी घडतंय
ही अशी रेघोट्यांसारखी घर दिसत रहातात एका रेषेत नजरेसमोर. प्रत्येक घराचा आकार वेगळा, श्वास वेगळा, वळण वेगळं आणि आयुष्य वेगळं
माणसं वेगळी .. पात्र वेगळी
घटना त्याच ... प्रसंग तेच
नाट्यही तेच तेच
घर नावाच्या संस्थेच्या आत अडकलेत श्वास, गुदमरलेत श्वास
घर जपावं, घर टिकावं .. नाती जपावी .. नाती टिकावी
आपल्यातलं आपलेपण मागे टाकावं, ते विझवून नात्यांना आपल्या रक्ताचं तेल अर्पण करत जावं. सदोदित .. हेच हेच करत रहावं.
कोणी उपाशी राहिलं तर घर मुक्याने रडतं.
घराच्या चार भिंतींना उपाशी माणसाचं मन कळतं
घरातल्या नात्यांना ते दिसतं .. कधीकधी कळतं .. एरवी कळत नाही
भुकेलेल्या माणसाच्या घरातले लोक त्याच्या भुकेची पर्वाही करत नाहीत... अशीही घरं असतात !
घर म्हणजे नाती जपणं, घर म्हणजे प्रेम देणं वगैरे वगैरे गुलाबी गोष्टी
आपल्या जागी बरोबर असतात.
तरीही धुमसत असतात काही घरं सतत
मग पोर बिचारी निघते मरायला...
अब बस ... बोहोत हो गया ... अब नहीं झेल सकते हम
असं म्हणत एखादी मुलगी गोड गोड हसत, आपले अश्रू लपवत नदीमायेच्या मीठीत विसावून जाते.. जाता जाता आईबापाला नमस्कार करायला व्हिडीओ कॉल लावते ..
आठवली असेल ना ती .. तीच ती
तिचा नवरा म्हणाला जा .. मर .. मरता मरता व्हिडीओ मात्र नक्की बनवून पाठव
तिनं ते ही केलं .. आपल्या मरणाचा व्हिडीओ बनवला ... बिचारी म्हणून गेली, माझ्या मरणासाठी मीच जबाबदार ... इतके तिचे श्वास गुंतले होते तिच्या घरात
पण कोणालाच नाही कळलं ... अखेरपर्यंत !
अशीही असतात काही घरं !!
मन जपणाऱ्या घरातली आई सतत दुर्मुखलेली का असते ?
नाती जपणाऱ्या घरातला बाबा सतत चिंतातूर का असतो ?
अशा घरातली मुलं बिचारी सतत भुकेलेली का दिसतात ?
आपल्या घासातला घास दुसऱ्याला देणारी ही कुटुंब सतत नात्यांमध्ये घुसमटलेली का दिसतात ?
- मोहिनी
मंगळवार, ५ एप्रिल, २०२२
व्यसनांच्या विळख्यातून सुटायचंय ? मग मी घेतलेल्या या मुलाखती एकदा गंभीरपणे ऐकाच !
मंगळवार, १ मार्च, २०२२
FameGame Webseries
माधुरी दीक्षित ताईचा फेमगेम पाहिला.. जबरदस्त आहे.
क्षणाक्षणाला उत्कंठा वाढत नेणारा ही वेबसिरीज..
अनामिका आनंदच्या आयुष्याबद्दल जास्त काही लिहीण्यापेक्षा ते स्क्रीनवर पहाणंच बरं.
मी ते सगळं लिहून भांडाफोड करणाऱ्यातली प्रेक्षक नाही.
मला जे लिहायचंय ते अर्थातच माधुरी बद्दल .. मी तिची फॅन आहे म्हणून तर लिहीतेच आहे, पण मी लिहीलेलं तिच्यापर्यंत कधी ना कधी नक्की पोचेल आणि मला तिच्याकडून शाबासकी मिळेल म्हणून मी हे लिहीतेय.. (हा प्रामाणिकपणा कोणाला आवडेलही कदाचित, कोणाला आवडणार नाही.. त्यांनी माफ करा.)
माधुरी ताईनी वेबसिरीज या नव्या माध्यमातून काम करण्याचा निर्णय घेतला ते एक बेस्ट काम झालं. कारण आता तिचं वय स्पष्ट दिसू लागलंय, तरीही तिची क्रेझ कमी झालेली नाही. त्यातून तिनी मागे जो बकेटलिस्ट नावाचा मराठी चित्रपट केला त्यानंतर तिच्यावर जी टीका झाली, त्या सगळ्यांचं तोंड बंद झालं असावं ही वेबसिरीज पाहून हे नक्की.. माझंही झालं असं मी म्हणेन. कारण, बकेटलिस्ट हा एक पाचकळ विषय घेऊन त्यावर काहीतरी अतिरंजीत कॉमेडी वास्तव घेऊन माधुरीने लीड रोल करावा हे मला आवडलं नव्हतं. अर्थात इथे मी जितके कठोर शब्द वापरतीये, तितका मला त्या बकेटलिस्टसाठी तिचा राग नाही.. ती माधुरीच आहे म्हणून आणि ती लाडकी आहे, चुकला एखादा निर्णय तिचा तर मी समजू शकते तिला.. सो .. ते सगळं जाऊदे..
आता ही वेबसिरीज .. यात माधुरीने आपला जलवा दाखवण्यात जराशीही कमी केलेली नाही. शिवाय अनामिका आनंदच्या पात्राला तिने चांगला न्याय दिला आहे. तिची मुलगी म्हणून निवडली गेलेली अभिनेत्री सुरुवातीला तिच्या लुक्समुळे खटकते पण त्या पात्रासाठी तीच योग्य आहे असं शेवटपर्यंत वाटत रहातं.. तिचा मुलगा म्हणून जो निवडलाय तो तर अगदीच परफेक्ट आहे त्या कॅरेक्टरसाठी हे निश्चित..
मग काय आवडलं नाही, तर माधुरीचा म्हणजे अनामिका आनंदचा कोस्टार, मनीष खन्ना जरा आणखी बरा निवडला असता तर .. म्हणजे माधुरीबरोबर खुद्द अक्षय खन्नालाही घेता आलं असतं. संजीव कपूर तिच्या नवऱ्याच्या भूमिकेत योग्य वाटतो आणि सगळ्यात तिची आई सुहासिनी मुळेही चांगलीच लक्षात रहाते. मकरंद शेवटी एका सरप्राईज भूमिकेत समोर येतो, फारसे संवाद नसूनही अभिनयाच्या बाबतीत तो ग्रेटच माणूस निवडलेला असल्याने ती भूमिकाही सहीच वाटते.
बाकी वेबसिरीजची स्टोरी नावाशी साधर्म्य राखून आहे आणि तिची मांडणीही अप्रतिमच झालेली आहे. तो अनाथ मुलगा माधव, त्याच्या पात्राशी त्या कलाकाराने पूर्ण न्याय दिलेला आहे.. शेवटी जेव्हा माधव आणि अनामिकाची मुलगी अमू प्रेमात पडलेलं दाखवलंय ते बघणं जरा असह्यच झालं मला.. पण ठीक .. कथानकाचा फ्लो परफेक्ट राखला जातो.
सगळ्यात महत्वाचं म्हणजे, फ कारी भाषा या वेबसिरीजमध्ये तरी अतिजास्त वापरलेली नसल्याने कानांना जरा सुसह्य झालं.
माधुरीने वेबसिरीज या नव्या माध्यमातून काम करतानाही आणि काळाची कितीही गरज असली तरीही आपली डिग्नीटी सोडली नाही.. साधा एक किसींग सीन वगैरेही तिने दिलेला नाही याचं फार फार समाधान वाटलं.
बाकी फेम गेम मात्र एकदा पहायलाच हवा.
अनामिका आनंदही लक्षात रहातेच आपल्या अखेर हीच या फिल्मी दुनियेची खरी कथा आहे.. पण हल्ली माधुरीताईच्या पिढीपासून बऱ्याच मुलींनी ती बदलली आहे. यात विद्या बालन, परिणिती चोप्रा यांची नावं विशेषत्वाने समोर येतात, कारण या मुलींनी स्वतःची पॅशन म्हणून हे क्षेत्र निवडलं आणि आपल्या कामाची गरज म्हणून अनेक तडजोडी या अभिनयापुरत्या मर्यादीत ठेवत, पुढे आपली पावलं वहावत जाऊ दिली नाहीत. तसंच, यांचे कुटुंबीयही कधीच यांच्याविरोधात आलेल्या कोणत्याही पापाराझींच्या फालतू वावड्यांमुळे हादरून गेले नाहीत ना त्यांनी आपल्या मुलींना लोक काय म्हणतील या सबबीखाली त्यांच्यातली गुणवत्ता मारून टाकली नाही हे मला फार फार विशेष वाटतं.
अनामिका आनंद ही जरी या दुनियेची एक बाजू असली तरीही माधुरी दीक्षित ही सुद्धा याच दुनियेची दुसरी सोनेरी बाजू आहे एवढंच मला अधोरेखित करावसं वाटतं, आणि येणारा काळ हा अशा असंख्या माधुरींचा असावा एवढीच मनोमनी प्रार्थना करावीशी वाटते..
- मोहिनी घारपुरे - देशमुख