शुक्रवार, १३ डिसेंबर, २०२४

मला उद्ध्वस्त व्हायचंय - मलिका अमर शेख #पुस्तकातून भेटलेली माणसं


'मलिका अमर शेख' यांचं 'उद्ध्वस्त व्हायचंय मला' हे आत्मचरित्रात्मक पुस्तक मी पूर्ण वाचलं. पुस्तक लहान आहे पण जीवनाचं विद्रुप रूप दर्शवणारं आहे. मलिका शेख या शाहीर अमर शेख यांच्या कन्या आणि ललित पॅंथर संघटनेचे सर्वेसर्वा तथा कवी नामदेव ढसाळ यांची बायको...
पण ही त्यांची ओळख नाही... किंबहुना मलिका यांनी स्वतःला लवकर ओळखलं असतं तर कदाचित त्यांना या अन्य ओळखीची गरजच पडली नसती. पण माणसाचं आयुष्य त्याच्या स्वतःच्या हातात नाही त्यामुळे बुद्धीला कितीही गोष्टी कळल्या किंवा कळल्या नाहीत तरीही घडतं तेच जे घडणार असतं ! मी हे पुस्तक वाचताना त्या त्या टप्प्यावर मला जे जे वाटलं ते लिहितेय पण यात कोणावरही टीकाटिप्पणी नाही, गेलेल्या माणसावर तर अजिबातच नाही... फक्त एक त्रयस्थ वाचक, संवेदनशील व्यक्ती म्हणून मला हे प्रश्न पडले आणि अर्थातच त्याची उत्तरंही मला ठाऊक आहेतच ...
मलिका यांनी नामदेव यांच्याशी मुळात लग्न करताना काहीच कसा विचार केला नाही याचंंच मला आश्चर्य वाटलं. नामदेव ढसाळ यांची वर्तणूक किती जास्त ' ढिसाळ ' होती ..एक नेता म्हणून मिरवणाऱ्या माणसानं वैयक्तिक आयुष्य इतकं किळसवाणं, अविचारी आणि बेधुंदपणे जगावं ही विसंगती खरोखरच अशक्य आहे. या माणसांनी मुळात लग्नच करू नये, यांना बायका पोरांची गरज नसते मग कशाला ही लोढणी ते गळ्यात बांधून घेतात कोणास ठाऊक?
पुस्तक वाचताना क्षणाक्षणाला मलिका यांच्या कोमल भावनांचा एका वळूने कसा चक्काचूर केला याची प्रचिती येते. एका टप्प्यावर तर मलिकाने लिहीलंय की 'नामदेवसाठी माझ्या मनातून तळतळाट निघत' ते वाक्य वाचताना स्त्री म्हणून मी तिच्या सगळ्या भावना समजू शकले.
कधी कधी वाटतं, हे असे पुरूष स्वतःला काय समजतात? ही अशी कुटुंब ज्यांच्या घरात हे असे दिवटे जन्माला येतात त्या कुटुंबाच्या संस्कारातच गडबड असते आणि ते खरंही आहे. मलिका यांनी पुस्तकात आपल्या सासू सासऱ्यांचं जे वर्णन केलंय ते वाचताना अंगावर काटा येतो अक्षरशः!!
किती एखाद्या बाईच्या स्वप्नांची, भावभावनांची होळी ... अरेरे... आणि तरी ही बाई त्याला शेवटी दवाखान्यात घेऊन जाते, त्याच्या शेवटच्या काळात त्याचं सगळं करते. शिकून सवरूनही माणुसकीच्या नात्याने आणि स्वतःवर झालेल्या संस्काराने आपल्या बाजूने पत्नी धर्म निभावते... हे सगळं थोर आहे. कदाचित कोणत्याही भारतीय नारीचा हाच चॉईस असतो.
'पावसाने झोडपलं आणि नवऱ्याने मारलं तर दाद कोणाकडे मागायची?' या उक्तीप्रमाणे अजूनही भारतीय संस्कृती ही अशीच 'चालते'. बायकोने नवऱ्याचा आधार होत कुटुंब सांभाळायची ...मुलं वाढवायची आणि कुटुंब आणि मुलं नवरा यातच इतिकर्तव्यता मानायची हे असले विचार.
नाही, पण मग बाईनं जन्माला येताना जो मेंदू दिलाय देवानं तो कधी वापरायचा? जे मन दिलंय ज्या जाणीवा दिल्या आहेत त्यांचं काय करायचं?

मुळात आपण मशीन नाही माणसं आहोत ...हा फरक ' जबाबदारी चा ' जो इथे खेळ रंगतो, त्या खेळाला मान्य नाही, इथेच सगळा घोळ आहे असं कधीतरी मला वाटतं.

मलिका आपण खूप भोगलंत ...
पण खरंच ..‌. मला प्रश्न पडला की हे सगळं सोडून मोकळ्या का नाही झालात?
पण तसं मोकळं होण्याचं ठरवूनही त्यात किती अडचणी तुम्हाला आल्या तेही कथन केलंय तुम्ही...
आपली जीवन कहाणी वाचून खूप खूप 'मळमळलं' ... हो नुसतं भरून नाही आलं तर सगळं अंतरंग ढवळून निघालं माझं !

तुमच्या जीवन जगण्याच्या ऊर्मीला मात्र मनोमनी सलाम....

थांबते
- मोहिनी घारपुरे देशमुख

( हे पुस्तक माझे लेख वाचून केवळ एक छान भेट म्हणून मला ज्यांनी पाठवलं त्या मुंबईच्या स्पर्श बुक शॉपचे विजय यांचेही आभार... मला आत्मचरित्र वाचायला आवडतात हे सांगितल्यावर त्यांनी स्वतः निवडून हे छोटंसं पुस्तक मला भेट म्हणून पाठवलं होतं. )

Translate

Featured Post

अमलताश