
हा मनुष्य फिल्म इंडस्ट्रीत कसा आला याबद्दलची मला फारशी माहिती सापडली नाही पण तो आला , त्यानं पाहिलं आणि तो जिंकला ही ओळ लक्ष्याच्या बाबतीत खरी ठरते.
एक होता विदूषक या चित्रपटातील त्यांचा अभिनय बघताना तर कित्तीतरी दृष्यात आपल्या अंगावर काटा येतो.. आणि कित्तीतरी वेळेला डोळे पाणावतात.
लहानगा आबुराव (लक्ष्या).. त्याचा बा कोण ते माहीत नाही पण आई तमाशा कलावंत. आबुराव लहान असताना त्याची आई (मधू कांबीकर) एका नेत्याची ठेवलेली बाई म्हणून जगत असते. हा नेता म्हणजे (मोहन आगाशे) .. आबुरावचं लहानपण यात घुसमटत असतं. नेत्याची मुजोरी बिनबापाच्या आबुराववर .. तो म्हणेल तसं यानं अन् याच्या आईनं रहायचं. मग एकदा काय होतं, आबुराव छान नकला करतो हे माहीत असल्यानं हा नेता त्याला सांगतो, आबुराव, मला हाशीव .. लहानगा आबुराव नेत्यासमोर त्याच्या प्रतिस्पर्ध्याची नक्कल अशी काही बेफाम करतो की या नेत्याला हसता हसता हार्टअटॅक येतो आणि त्याचे प्राणच जातात. ही बातमी आईला कळते आणि आबुराववर येऊ घातलेलं संकट ओळखून ती रातोरात गाव सोडते. दुसऱ्या गावी बहिणीचा तमाशाचा फड असतो तिथे जाते नि आसऱ्याला रहाते. बहिण तोऱ्यात आणि आबुराव अन् त्याच्या आईचे मात्र कष्टाचे दिवस येतात. तमाशाच्या फडाचं नाव मात्र दिवसेंदिवस मोठं होतं.
आबुरावही आता लहानाचा मोठा झालेला असतो. एक दिवस त्याचा तमाशा पहायला एक नटी येते. ही नटी म्हणजे वर्षा उसगावकर .. खरंतर प्रेमात धोका खाल्याने ती आत्महत्या करण्याच्या निर्णयापर्यंत आलेली असते पण आबुरावचा खेळ पाहून ती एवढी हसते की तिच्या मनातलं सार मळभ दूर होऊन जातं. आता तिला जगायचं असतं. ती आबुरावला भेटते आणि फिल्म ऑफर करते. आयुष्यात आलेली ही संधी आबुरावला घ्यावीशी वाटते आणि तेव्हाच ती नटी आपल्या प्रियकराला (तुषार दळवी) जळवण्यासाठी आबुरावबरोबर प्रेमाचं नाटक करते. पहिल्या चित्रपटानंतर ती आबुरावशी लग्नही करते. आबुराव खूष असतो .. आयुष्यातली त्याची स्वप्न एक एक करून पूर्ण होण्याच्या मार्गावर असतात पण अशातच त्याला तिचं खरं रूप कळतं. तो कोलमडतो. इकडे तमाशात पूर्वी तो जिच्यावर प्रेम करत असतो ती मुलगी मरते आणि मरताना आबुरावच्या आणि तिच्या प्रेमाची खूण असलेली मुलगी जन्म घेते. या मुलीचा सांभाळ आबूरावचे आजोबा (निळू फुले) आणि त्याची आई करतात पण एक दिवशी आईदेखील मरते. हा आईच्या मृत्यूचा निरोप द्यायला आजोबा आबूरावला भेटायला शहरात येतात आणि येताना त्या चिमुकलीला सोबत आणतात. ही मुलगी .. कधी हसलेलीच नसते.. जेव्हा आबुरावला कळतं ही आपलीच मुलगी आहे आणि आपली आई आता कायमची गेली या दोन्हीही धक्यानी तो अक्षरशः मनातून हलतो. पण तरीही त्या चिमुकल्या मुलीला तो सांभाळण्याचं ठरवतो. तिला काही दिवस बोर्डींगच्या शाळेत ठेवतो आणि त्याचदरम्यान त्याला लक्षात येतं की आपण जिच्याशी लग्न केलंय तिला आता आपल्यात रस उरलेला नाही. आपण तिच्यासाठी फक्त एक खेळणंच बनून राहिलोय. तिला वाटेल तेव्हा तिच्या चेहऱ्यावर हसू आणणारा तिचा विदूषक .. तो खंतावतो .. फार फार दुःखी होतो. मग मनातून पक्का निश्चय करतो आणि आपल्या मुलीला बोर्डींग स्कूलमधून घेऊन कायमचं घरी आणतो. त्याच दिवशी त्याच्या बायकोचा निर्धार पक्का झालेला असतो, ती ते घर सोडून निघालेली असते कायमची, तिच्या पूर्वीच्या प्रियकराबरोबर रहायला..
जेव्हा ती त्या छोट्या मुलीला बघते आणि तिला कळतं की ही आबुरावची मुलगी आहे तेव्हा तिला खोटंच वाटतं ..तिला वाटतं हा चेष्टाच करतोय.. पण नंतर तीही अतीव दुःखाने आबुरावचा निरोप घेते नि आपल्या वाटेला लागते.
आता उरतो आबुराव आणि ती न हसलेली छोटी मुलगी. आयुष्य पुढे सरकत रहातं. अशातंच एकदा आबुरावचा बालमित्र (दिलीप प्रभावळकर), जो आता राजकारणात उतरलेला असतो, तो त्याला भेटायला येतो. मग हळूहळू ओळख वाढवत स्वतःच्या फायद्यासाठी आबुरावचा वापर करून थेट मुख्यमंत्रीपदापर्यंत स्वतः पोहोचतो आणि आबुराव मात्र त्याच्या हातचं बाहुलं होत जातो. विधानसभेवर उमेदवार म्हणून हा राजकारणी आपल्या मित्रालाच, आबुरावलाच उभं रहाण्याची गळ घालतो आणि तिथून या विदूषकाचं आयुष्य पलटतं. पण त्याला याची जाणीवच नसते. तो फक्त मैत्रीपोटी एकेक गोष्ट करत चाललेला असतो. अशातच एकदा आबुरावचे आजोबा, गुरू (निळू फुले) विधानसभेचं कामकाज कसं चालतं हे पहाण्यासाठी त्याच्याबरोबर जातात तेव्हा आबुरावचं भाषण असतं. तळागाळातल्या लोकांचा आवाज मांडण्याऐवजी आबुराव त्या भाषणात त्याच्या मित्राच्या सांगण्यावरून या लोकांची खिल्ली उडवतो. आजोबा ते ऐकून रागात निघून जातात आणि घरी आल्यावर आबुरावला त्याच्या बोलण्याची जाणीव करून देतात. तमाशाच्या फडात आपल्या अभिनयानं राजकारण्यांचं धाबं दणाणून सोडणारा एकेकाळचा वाघ्या असलेला आबूरावचा आज राजकारण्यांनी कसा विदूषक करून ठेवलाय याची खंत व्यक्त करतात आणि त्या क्षणी आबूरावला आपलं भरकटलेलं आयुष्य जाणवतं.. ज्यानी त्यानी आबूरावचा घेतलेला फायदा त्याला आयुष्याच्या या वळणावर बोचायला लागतो.. लहानपणीचे दिवस आठवतात .. तमाशाच्या फडावर नाचणारी आई, त्या फडावर नाचणारी आपली प्रेयसी आणि आपण .. आणि आजचे आपण यातला जमीन अस्मानचा फरक लक्षात येतो. आता त्याला यातून बाहेर पडायचं असतं.
एक होता विदूषक नावाच्या शेवटच्या चित्रपटाचं आबुरावचं शूटींग आणि त्यातला शेवटचा सीन करताना आबूरावला हार्टअटॅक येतो .. लोक टाळ्या वाजवतात आणि मग लक्षात येतं की हा उठत नाहीये .. मुख्यमंत्री मित्र हजर असतोच तो त्याच्यावर उपचाराची सोय करतो. तातडीने उपचार मिळतात.. पण का .. तर मुख्यमंत्र्यानं त्याच्या वाढदिवसाच्या सभेत आबुरावचं भाषण ठेवलेलं असतं.. हॉस्पिटलमध्ये डॉक्टर सांगतात की ते येऊ शकणार नाहीत सभेला तर तेव्हा हा मुख्यमंत्री चक्क म्हणतो, आबूरावनं आलं पाहिजे, सभेत भाषण दिलं पाहिजे आणि तिथं कोसळलं पाहिजे.. तुमच्या प्रमोशनच बघू आपण ... अरेरे ..
आबूराव भाषण द्यायला उभा होतो सभेच्या दिवशी .. एका क्षणी वाटतं हा आता कोसळणार .. लोकांना वाटणार की केवढं ते प्रेम मुख्यमंत्र्यावर या त्याच्या मित्राचं .. पण पुढल्याच क्षणी आबूराव पुन्हा नॉर्मल होतो .. प्रेक्षकात बसलेली जाई, त्याची लेक, जी कधीच हसलेली नसते तीच त्याला दिसायला लागते फक्त .. तो गोष्ट सांगतो आणि शेवटी जाईच्या चेहऱ्यावर हसू उमलतं. सभागृहात गोंधळ होतो.. लहान मुलांची गोष्ट नको म्हणून लोक ओरडाआरडी करतात आणि राजकारणी निघून जातात.. शेवटी एकटा पडलेला आबूराव आणि त्याच्या कुशीत त्याची लेक ..
पुन्हा एक नवा प्रवास सुरू होतो आबूरावच्या आयुष्याचा .. आणि या प्रवासात त्याची लेक जिनं त्याला आता पप्पा म्हणून स्वीकारलेलं असतं ती त्याच्याबरोबर असते ..
असा हा विदूषक .. आणि असं त्याचं आयुष्य ...
चित्रपट पहाताना विदूषकाची व्यथा मन हेलावून टाकते. प्रेयसी आणि नंतर बायको झालेली मेनका काय, नि राजकारणी मित्र काय, तो लहानपणी आईला छळणारा राजकारणी माणूस काय .. साऱ्यांनी फक्त या आबूरावला खेळणं म्हणून वापरलं आणि पोटभर खेळून झाल्यावर फेकून दिलं .. असं या आबूरावचं, विदूषकाचं जीवन ..
खरंतर हा चित्रपट लक्ष्याच्या आयुष्याचा शेवटचा चित्रपट ठरावा हा निव्वळ योगायोग आणि तोही किती दुर्दैवी .. लक्ष्मीकांत बेर्डे फार मोठे अभिनेते होते.. त्यांनीही जन्मभर लोकांना हसवण्याचं काम केलं. आणि ते या चित्रपटानंतर वारले ... हा चित्रपट म्हणजे त्यांच्याच आयुष्याचं निराळ्या प्रकारे केलेलं कथन तर नसेल ना हा प्रश्न जाता जाता माझ्या मनात उपस्थित होऊन जातो.. कदाचित खरं उत्तर वेगळं काही असू शकेल .. किंबहुना वेगळंच असावं अशी प्रार्थना ..
चित्रपट लोकांना किती आवडला ते मला माहीत नाही पण हा चित्रपट फारच वास्तववादी आणि अत्यंत तरल आहे. चित्रपटातली गाणी, ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांचं नृत्य, हावभाव आणि आशा ताईंचा काळीज चिरत जाणारा आवाज हे सगळे या चित्रपटाचे प्लस पॉईंट्स ..
लाल पैठणी रंग माझ्या साडीला तुम्ही यावं सजण रंग होळीला,
गडद जांबळं भरलं आभाळं,
श्रावणाचं ऊन मला झेपेना
ही गाणी तर अक्षरशः वेड लावतात .. कित्ती वेळा ऐकली तरीही मन भरत नाही असं होतं या गाण्यांनी ..
आणि असं सगळं असलं तरीही लक्ष्मीकांत बेर्डे या माणसासाठी हा चित्रपट नक्कीच पहायला पाहिजे एकदा तरी आयुष्यात ...
ज्यानं तुम्हाला हसवलं तो तुम्हाला हसवता हसवता केव्हा रडवून गेला तुम्हाला कळलंही नाही असं काहीसं आपलं होतं..
दिग्दर्शक जब्बार पटेल यांना तर या चित्रपटासाठी त्रिवार नमन... एक आगळा विषय, उत्कृष्ट पात्र निवड, उत्कृष्ट मांडणी ... या साऱ्यासाऱ्यातून जब्बारजींचं मोठेपण आणि वेगळेपण दिसतं.
मला आयुष्यात कधीतरी लक्ष्मीकांतजींना भेटायचं होतं.. कधीतरी त्यांच्याशी बोलायचं होतं.. हा चित्रपट पाहिल्यावर अजून विश्वासच बसत नाही की ते या जगात नाहीत ... कदाचित ते इथेच आहेत .. मराठी चित्रपटसृष्टीत .. त्यांच्या अभिनयाने, त्यांच्या हसवण्याने आणि त्यांच्या या अशा एक से एक चित्रपटांमधून ते आपल्याला हवे तेव्हा आपल्यासमोर त्यांची कला सादर करायला उभे रहात आहेत .. कायमचं...
असा हा 'एक होता विदूषक ....चित्रपट'
- मोहिनी घारपुरे - देशमुख
(photo credit - loksatta)