आज गुढीपाडवा. सकाळपासूनच घरोघरी सगळ्या गृहिणींची लगबग सुरू झाली. दाराबाहेर अंगणात सुंदर आकर्षक रांगोळी रेखताना मनातली प्रसन्नता, आनंद उजळून आला. सणाचा थाटच काही निराळा.. अशा सणाला सृष्टीसौंदर्यही काही निराळंच असतं.. आणि त्याचंच वर्णनआपल्याला सापडतं ते साक्षात इंदिरा संतांच्या शब्दाशब्दातून आणि पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर यांच्या स्वरांतून...
दारा बांधता तोरण, घर नाचले नाचले
आज येणार अंगणी सोनचाफ्याची पाऊले
सणावाराचा दिवस असला की प्रत्येक गृहिणीच्या मनात एक निराळाच आनंद, उत्साह असतो. घराच्या दाराला झेंडूच्या पिवळ्याधम्मक फुलांचं नि आंब्याच्या हिरव्यागार पानांचं तोरण बांधल्या क्षणापासूनच त्या सणाचा आनंद मनामनात पसरतो. अंगणात डुलणाऱ्या सोनचाफ्याचं फुलणं, बहरणं देखील कवयित्रीने इतकं सुरेख टिपलं आहे, की निसर्गाशी त्यांची नाळ किती घट्ट जुळलेली आहे याचा अंदाज आपल्याला यावा. एरवी एखादी सुखद घटना, जसं बाळाचा जन्म, महालक्ष्मी मातेचं आगमन वगैरे घरी झालं की सहज आपण म्हणतो, सोनपावलं आली घरी .. ती सोनपावलं जणू बहरलेल्या सोनचाफ्याच्या झाडाने फुलांचा सडा अंगणात घालून आपल्या घरी आणली आहेत असा कल्पनाविष्कार .. ही संपूर्ण कविता म्हणजेच कल्पनांच्या सुखसरी. निसर्गातील एक एक साध्या साध्या अगदी रोज आपल्या डोळ्यांपुढे घडणाऱ्या गोष्टी.. पण एखाद्या कवी मनाच्या व्यक्तिलाच त्या इतक्या सुंदर रितीने आकळतात आणि शब्दांच्या व सुरांच्या सामर्थ्याने त्या आपल्यापर्यंत पोहोचतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे गाणं. इंदिराबाई, पद्मजाताई आणि संगीतकार गिरीश जोशी व संपूर्ण वाद्यवृंद यांचा सुमधूर मिलाप म्हणजे हे गाणं असं मला वाटतं.
भिंती रंगल्या स्वप्नांनी झाल्या गजांच्या कर्दळी
दार नटून उभेच नाही मिटायाची बोली
चाकोरीबद्ध आयुष्य जगून मनावर आलेली मळभ क्षणात दूर होते. दारावर तोरण चढलं की अर्थातच मनामनात स्वप्न पालवतात ती सुखाची, आनंदाची. अशावेळी दारं सताड उघडी ठेऊन माणसं मनातला आनंद इतरांसमवेत वाटून घेत असतात. घराच्या भिंती जणू स्वप्नांनी रंगून गेलेल्या असतात आणि खिडकीच्या गजांऐवजी कर्दळीचे खांबच उभे असतात..
किती सुरेख शब्द .. किती सुंदर वर्णन..
आता पुढलं सुखाचं स्थान म्हणजे दाराबाहेर रांगोळी रेखणं. मनोभावे रांगोळी रेखताना प्रत्येक स्त्रीच्या मनात आपल्या कुटुंबासाठी, आपल्या कुटुंबीयांसाठी प्रेम, ममत्व दाटून आल्यावाचून रहात नाही. एरवी नोकरीनिमित्ताने म्हणा वा अन्य कारणाने म्हणा अगदी नेमाने रांगोळी काढण्याइतका वेळ देणं शक्य नसलं तरीही अशा सणावाराला तरी शक्यतो स्त्रिया दारापुढे छोटीशी का होईना पण मनोभावे रांगोळी आजही रेखतातच..
सूर्यकिरण म्हणाले घालू दारात रांगोळी
शिंपू पायांवरी दव म्हणे वरून पागोळी
पण गंमत म्हणजे अगदी भल्या पहाटेच साक्षात सूर्यनारायणांनी घराघरांच्या अंगणात केव्हाच आपली सूर्यकिरणं पसरून जणू रांगोळीच रेखलेली असते.. तर पावसानंतर दारांवरून गळणाऱ्या पागोळ्या म्हणतात की चला,चला, या शुभदिनी आपण पुढे होऊन या सोनपावलांवर दव शिंपूया.
भरू ओंजळ फुलांनी बाग म्हणे बहरून
देईन मी आशीर्वाद केळ म्हणाली हासून
निसर्गाच्या लीलांची किती सुरेख शब्दकल्पनांत मांडणी म्हणायची ही .. अंगणात आलेल्या प्रत्येक व्यक्तीची ओंजळ आजच्या शुभदिनी मी फुलांनी भरून देईन असं कोण म्हणतंय .. तर खुद्द बहरलेली बागच म्हणतेय आणि काहीसं खाली झुकलेलं केळ्याचं झाड हासत म्हणतंय, की त्या सोनपावलांनी दारी आलेल्या प्रत्येकाला मी छान आशीर्वाद देईन.. आहा .. काय सुरेख कल्पना..
पण अशी सगळी जय्यत तयारी झाली असूनही अजून ती सोनचाफ्याची पावलं का बरं आली नाहीत म्हणून जेव्हा वाट पहाणं सुरू होतं तेव्हा अगदी आपल्याप्रमाणे वाराच दारापाशी येरझारा घालायला लागतो.. अस्वस्थ होतो..पण हा वारा मोतिया गंधानी भरलेला आहे आणि तो या सोनचाफ्याच्या पावलांची वाट पहातो आहे.. अस्वस्थपणे येरझारा घालतो आहे..
येरझारा घाली वारा गंध मोतिया घेऊनी
सोनचाफ्याची पाऊले आज येतील अंगणी
सोनचाफ्याची पाऊले आज येतील अंगणी
गाणं इथे संपतं खरं पण जाताजाता आपली ओंजळ भरून जातं, शब्दांनी, सुरांनी ..
या गाण्याची विशेषता म्हणजे कवयित्रींचे शब्द आणि गायिकेचे सूर आहेतच.. पण या प्रत्येक सुरांना भावनांचा आणि वाद्यमेळाचा साज जो काही अप्रतिमरित्या चढवण्यात आलेला आहे त्याला तोड नाही. मुख्य म्हणजे पद्मजाताईंचं गायन इतकं भावपूर्ण आहे की हे प्रत्येक वर्णन, त्यासाठी वापरलेल्या विशिष्ट सुरावटी या सगळ्यांमधूनही पद्मजाताईंच्या गायकीतलं सौंदर्य थेट आपल्यापर्यंत पोहोचतं. त्यांचा उत्फुल्ल आवाज, त्यांचा तिन्ही सप्तकातला सहज वावर, मध्येच आवाजातून ओथंबून आलेला आनंद, त्यांच्या गळ्यातून आलेल्या हरकती, मुरक्या यांचा आस्वाद तर शेकडोवेळा हे गाणं ऐकून घ्यावा. या गाण्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे वाद्यांचा केलेला वापर. सतार, तबला आणि जागोजागी पेरलेले बासरीचे सूर ऐकणं म्हणजे कर्णतृप्तता अनुभवणं.
तर .. ही अशी सुरेख कल्पना असलेलं कल्पनातीत सुंदर, मधुर गाणं.
सणावाराला घरात आवर्जून भल्या पहाटे हे गाणं घरात लावावं आणि मग आपल्या कामाला लागावं. एखाद्या गाण्यांतून प्रकट होणारे भाव आपल्या मनाचा ठाव घेतात, किंबहुना त्या गाण्यातून प्रकट होणाऱ्या भावना अगदी त्याचवेळी आपल्याही मनात ते गाणं ऐकताना उमलत असतील तर हेच त्या गाण्याचं मोठं यश म्हणायला हवं.
या गाण्यात वर्णन केलेल्या सुंदर कल्पनांची अनुभूती तर शेकडोवेळा घ्यावी अशी.. म्हणजे रोजचाच सूर्य .. आणि रोजचीच सूर्यकिरणं जेव्हा आपण पहातो तेव्हा कदाचित आपल्याला त्याबद्दल काही विशेष वेगळं वाटत नसावं.. पण या गाण्यात आलेली कल्पना, सूर्यकिरणं म्हणाले .. घालू दारात रांगोळी .. ही कल्पना जेव्हा आपण ऐकतो त्यानंतर जणू रोजचीच सूर्यकिरणं आपल्या दाराबाहेर पसरलेली बघताना असं वाटतं की आज आपल्याही दारापुढे यांनी जणू रांगोळीच रेखली आहे. अगदी अशीच दुसरी सुंदर कल्पना म्हणजे, पागोळी म्हणते की पायांवर दव शिंपूया .. आहाहा.. एरवी अळवाच्या पानावर मोत्यासारखं स्वतःला सावरून बसलेलं दव कुणी पाहिलं नसेल.. पण पावसानंतर झाडातून, छपरांवरून गळणाऱ्या पागोळ्यांचे थेंब जणू स्वतःला दवबिंदू म्हणवून घेत आपल्या पायावर दवांचा सडा घालत आहेत ही कल्पनाच किती सुरेख आहे नै.. या कल्पनेनंतर जीवनातला प्रत्येक पाऊस आणि त्या पावसानंतर गळणाऱ्या पागोळ्या पहाताना माझ्यासारख्या एखाद्या संवेदनशील मनाचा त्यांच्याकडे पहाण्याचा दृष्टीकोनच बदलून जातो.
एरवी वाऱ्याच्या झुळूकीने अंगणातली सगळी झाडं डुलतात, मागेपुढे खालीवर होत सारा दिवस त्यांची सळसळ सुरू असते. आपल्या कानांना ती जाणवते, आपल्या डोळ्यांनी आपण अगदी रोजच ती पहातही असतो पण कल्पना सुचण्याचा आशीर्वाद जणू कविंनाच मिळालेला असल्याने, इंदिराबाईंसारख्या एखाद्या अत्यंत संवेदनशील कवयित्रीलाच अंगणात वाऱ्याने काहीशी झुकलेली केळ जणू आल्यागेल्यांना आशीर्वाद देते आहे ही सुरेख कल्पना सुचते आणि गाण्याला अक्षरशः चार चाँद लागतात.
दिवस येतात, दिवस जातात.. कालचक्र अव्याहतपणे सुरू असतं, निसर्गचक्रही सतत न थांबता सुरूच असतं.. पण काळाच्या पटलावरील निसर्गाच्या या सौंदर्यस्थळांकडे मुळात अलवारपणे पहाणं आणि तरलतेने शब्दयोजना करून त्या कवितेच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणं ही ईश्वरी देणगीच म्हणावी लागेल. कवितेनं तिचं काम केलं .. शब्दाशब्दातून ती प्रकट झाली.. पण जेव्हा तीच कविता सुरांसुरांतून बोलायला लागते तेव्हा जणू ती आपलंच मन आपल्यासमोर प्रकट करत असते. हे कवितेचं मन जाणून, त्यानुसार संगीताची सुरेख, अमोघ रचना करून कवितेला सुरांचा साज चढवण्याचं काम संगीतकार करतो आणि कवितेचं गाणं होतं. आता खरी कसोटी असते ती गायकाची .. गायक आपल्या सुरेल मधाळ सुरांतून जेव्हा तेच गाणं जीव ओतून सादर करतात तेव्हा ते गाणं अक्षरशः सोनपावलांनी आपल्या मनात उतरतं. अशी गाणी मग आजन्म आपली साथ करतात. सुखदुःखाच्या प्रसंगी आपल्याला ही गाणी सोबत करतात.
जीवनातील प्रत्येक प्रसंगावर, प्रत्येक घटनेवर आजवर कविता नि गाणी जन्माला आलेली आहेत. बाळाचा जन्म असो, मुलीचं सासरी जाणं असो, विरह असो, ईश्वरभक्ती असो, एखाद्या प्रिय व्यक्तिचं आपल्याला कायमस्वरूपी सोडून जाणं असो.. एकूणएका प्रसंगाविषयी गाणी आहेत.. त्या त्या गाण्यांच्या सुरांची विलक्षण ताकद आहे. आपल्या मनात त्यावेळी तोच भाव उमटवून जाण्याइतकी दमदार अशी त्यांची रचना संगीतकारांनी केलेली असते.
दारा बांधता तोरण घर नाचले नाचले हे गाणं ऐकताना तर कित्तीतरी वेळेला माझ्या डोळ्यांपुढे यातली एकूण एक कल्पना उभी रहाते. जणू एक छान जरीकाठाची साडी नेसून, केसांचा आंबाडा माळून त्यावर मोगऱ्याच्या टप्पोऱ्या फुलांचा गजरा लेवून एक सुंदर स्त्री घरादाराला सजवण्याकामी एखाद्या मंगलप्रसंगी साऱ्या सकाळपासून सज्ज झालेली आहे आणि तीच हे गाणं म्हणत मनोभावे आपली कर्तव्य पार पाडत आहे. तिच्या डोळ्यातली स्वप्न तिच्या घरातल्या भिंतींवर रेखली आहेत, तिच्या अंगणातला सोनचाफा आता क्षणात टपटप फुलांचा अंगणभर सडा घालणार आहे आणि त्या सोनपावलांच्या आगमनाच्या क्षणापूर्वी तिनं आपलं घर इंदिराबाई म्हणतात त्याप्रमाणे सजवून ठेवलं आहे ..
कदाचित आज गुढीपाडव्यानिमित्त घरोघरी अशीच लगबग सुरू असेल.. दारी तोरणं, रांगोळ्या नि घराघरात गुढी उभारण्याची घाई .. म्हणूनच आजच्या या मंगलप्रसंगी हे गाणं तुम्हीही ऐकायलाच हवं असं जाता जाता सांगावसं वाटतं !
- मोहिनी घारपुरे - देशमुख (mohineeg@gmail.com)
(अल्बमचे नाव - घर नाचले नाचले, कवयित्री - इंदिरा संत, गायिका - पद्मजा फेणाणी जोगळेकर, संगीत - गिरीश जोशी)
सणावाराचा दिवस असला की प्रत्येक गृहिणीच्या मनात एक निराळाच आनंद, उत्साह असतो. घराच्या दाराला झेंडूच्या पिवळ्याधम्मक फुलांचं नि आंब्याच्या हिरव्यागार पानांचं तोरण बांधल्या क्षणापासूनच त्या सणाचा आनंद मनामनात पसरतो. अंगणात डुलणाऱ्या सोनचाफ्याचं फुलणं, बहरणं देखील कवयित्रीने इतकं सुरेख टिपलं आहे, की निसर्गाशी त्यांची नाळ किती घट्ट जुळलेली आहे याचा अंदाज आपल्याला यावा. एरवी एखादी सुखद घटना, जसं बाळाचा जन्म, महालक्ष्मी मातेचं आगमन वगैरे घरी झालं की सहज आपण म्हणतो, सोनपावलं आली घरी .. ती सोनपावलं जणू बहरलेल्या सोनचाफ्याच्या झाडाने फुलांचा सडा अंगणात घालून आपल्या घरी आणली आहेत असा कल्पनाविष्कार .. ही संपूर्ण कविता म्हणजेच कल्पनांच्या सुखसरी. निसर्गातील एक एक साध्या साध्या अगदी रोज आपल्या डोळ्यांपुढे घडणाऱ्या गोष्टी.. पण एखाद्या कवी मनाच्या व्यक्तिलाच त्या इतक्या सुंदर रितीने आकळतात आणि शब्दांच्या व सुरांच्या सामर्थ्याने त्या आपल्यापर्यंत पोहोचतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे गाणं. इंदिराबाई, पद्मजाताई आणि संगीतकार गिरीश जोशी व संपूर्ण वाद्यवृंद यांचा सुमधूर मिलाप म्हणजे हे गाणं असं मला वाटतं.
![]() |
(पद्मश्री पद्मजाताई फेणाणी .. फोटो गुगलवरून साभार) |
दार नटून उभेच नाही मिटायाची बोली
चाकोरीबद्ध आयुष्य जगून मनावर आलेली मळभ क्षणात दूर होते. दारावर तोरण चढलं की अर्थातच मनामनात स्वप्न पालवतात ती सुखाची, आनंदाची. अशावेळी दारं सताड उघडी ठेऊन माणसं मनातला आनंद इतरांसमवेत वाटून घेत असतात. घराच्या भिंती जणू स्वप्नांनी रंगून गेलेल्या असतात आणि खिडकीच्या गजांऐवजी कर्दळीचे खांबच उभे असतात..
किती सुरेख शब्द .. किती सुंदर वर्णन..
आता पुढलं सुखाचं स्थान म्हणजे दाराबाहेर रांगोळी रेखणं. मनोभावे रांगोळी रेखताना प्रत्येक स्त्रीच्या मनात आपल्या कुटुंबासाठी, आपल्या कुटुंबीयांसाठी प्रेम, ममत्व दाटून आल्यावाचून रहात नाही. एरवी नोकरीनिमित्ताने म्हणा वा अन्य कारणाने म्हणा अगदी नेमाने रांगोळी काढण्याइतका वेळ देणं शक्य नसलं तरीही अशा सणावाराला तरी शक्यतो स्त्रिया दारापुढे छोटीशी का होईना पण मनोभावे रांगोळी आजही रेखतातच..
सूर्यकिरण म्हणाले घालू दारात रांगोळी
शिंपू पायांवरी दव म्हणे वरून पागोळी
पण गंमत म्हणजे अगदी भल्या पहाटेच साक्षात सूर्यनारायणांनी घराघरांच्या अंगणात केव्हाच आपली सूर्यकिरणं पसरून जणू रांगोळीच रेखलेली असते.. तर पावसानंतर दारांवरून गळणाऱ्या पागोळ्या म्हणतात की चला,चला, या शुभदिनी आपण पुढे होऊन या सोनपावलांवर दव शिंपूया.
भरू ओंजळ फुलांनी बाग म्हणे बहरून
देईन मी आशीर्वाद केळ म्हणाली हासून
निसर्गाच्या लीलांची किती सुरेख शब्दकल्पनांत मांडणी म्हणायची ही .. अंगणात आलेल्या प्रत्येक व्यक्तीची ओंजळ आजच्या शुभदिनी मी फुलांनी भरून देईन असं कोण म्हणतंय .. तर खुद्द बहरलेली बागच म्हणतेय आणि काहीसं खाली झुकलेलं केळ्याचं झाड हासत म्हणतंय, की त्या सोनपावलांनी दारी आलेल्या प्रत्येकाला मी छान आशीर्वाद देईन.. आहा .. काय सुरेख कल्पना..
पण अशी सगळी जय्यत तयारी झाली असूनही अजून ती सोनचाफ्याची पावलं का बरं आली नाहीत म्हणून जेव्हा वाट पहाणं सुरू होतं तेव्हा अगदी आपल्याप्रमाणे वाराच दारापाशी येरझारा घालायला लागतो.. अस्वस्थ होतो..पण हा वारा मोतिया गंधानी भरलेला आहे आणि तो या सोनचाफ्याच्या पावलांची वाट पहातो आहे.. अस्वस्थपणे येरझारा घालतो आहे..
येरझारा घाली वारा गंध मोतिया घेऊनी
सोनचाफ्याची पाऊले आज येतील अंगणी
सोनचाफ्याची पाऊले आज येतील अंगणी
गाणं इथे संपतं खरं पण जाताजाता आपली ओंजळ भरून जातं, शब्दांनी, सुरांनी ..
या गाण्याची विशेषता म्हणजे कवयित्रींचे शब्द आणि गायिकेचे सूर आहेतच.. पण या प्रत्येक सुरांना भावनांचा आणि वाद्यमेळाचा साज जो काही अप्रतिमरित्या चढवण्यात आलेला आहे त्याला तोड नाही. मुख्य म्हणजे पद्मजाताईंचं गायन इतकं भावपूर्ण आहे की हे प्रत्येक वर्णन, त्यासाठी वापरलेल्या विशिष्ट सुरावटी या सगळ्यांमधूनही पद्मजाताईंच्या गायकीतलं सौंदर्य थेट आपल्यापर्यंत पोहोचतं. त्यांचा उत्फुल्ल आवाज, त्यांचा तिन्ही सप्तकातला सहज वावर, मध्येच आवाजातून ओथंबून आलेला आनंद, त्यांच्या गळ्यातून आलेल्या हरकती, मुरक्या यांचा आस्वाद तर शेकडोवेळा हे गाणं ऐकून घ्यावा. या गाण्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे वाद्यांचा केलेला वापर. सतार, तबला आणि जागोजागी पेरलेले बासरीचे सूर ऐकणं म्हणजे कर्णतृप्तता अनुभवणं.
तर .. ही अशी सुरेख कल्पना असलेलं कल्पनातीत सुंदर, मधुर गाणं.
सणावाराला घरात आवर्जून भल्या पहाटे हे गाणं घरात लावावं आणि मग आपल्या कामाला लागावं. एखाद्या गाण्यांतून प्रकट होणारे भाव आपल्या मनाचा ठाव घेतात, किंबहुना त्या गाण्यातून प्रकट होणाऱ्या भावना अगदी त्याचवेळी आपल्याही मनात ते गाणं ऐकताना उमलत असतील तर हेच त्या गाण्याचं मोठं यश म्हणायला हवं.
या गाण्यात वर्णन केलेल्या सुंदर कल्पनांची अनुभूती तर शेकडोवेळा घ्यावी अशी.. म्हणजे रोजचाच सूर्य .. आणि रोजचीच सूर्यकिरणं जेव्हा आपण पहातो तेव्हा कदाचित आपल्याला त्याबद्दल काही विशेष वेगळं वाटत नसावं.. पण या गाण्यात आलेली कल्पना, सूर्यकिरणं म्हणाले .. घालू दारात रांगोळी .. ही कल्पना जेव्हा आपण ऐकतो त्यानंतर जणू रोजचीच सूर्यकिरणं आपल्या दाराबाहेर पसरलेली बघताना असं वाटतं की आज आपल्याही दारापुढे यांनी जणू रांगोळीच रेखली आहे. अगदी अशीच दुसरी सुंदर कल्पना म्हणजे, पागोळी म्हणते की पायांवर दव शिंपूया .. आहाहा.. एरवी अळवाच्या पानावर मोत्यासारखं स्वतःला सावरून बसलेलं दव कुणी पाहिलं नसेल.. पण पावसानंतर झाडातून, छपरांवरून गळणाऱ्या पागोळ्यांचे थेंब जणू स्वतःला दवबिंदू म्हणवून घेत आपल्या पायावर दवांचा सडा घालत आहेत ही कल्पनाच किती सुरेख आहे नै.. या कल्पनेनंतर जीवनातला प्रत्येक पाऊस आणि त्या पावसानंतर गळणाऱ्या पागोळ्या पहाताना माझ्यासारख्या एखाद्या संवेदनशील मनाचा त्यांच्याकडे पहाण्याचा दृष्टीकोनच बदलून जातो.
एरवी वाऱ्याच्या झुळूकीने अंगणातली सगळी झाडं डुलतात, मागेपुढे खालीवर होत सारा दिवस त्यांची सळसळ सुरू असते. आपल्या कानांना ती जाणवते, आपल्या डोळ्यांनी आपण अगदी रोजच ती पहातही असतो पण कल्पना सुचण्याचा आशीर्वाद जणू कविंनाच मिळालेला असल्याने, इंदिराबाईंसारख्या एखाद्या अत्यंत संवेदनशील कवयित्रीलाच अंगणात वाऱ्याने काहीशी झुकलेली केळ जणू आल्यागेल्यांना आशीर्वाद देते आहे ही सुरेख कल्पना सुचते आणि गाण्याला अक्षरशः चार चाँद लागतात.
दिवस येतात, दिवस जातात.. कालचक्र अव्याहतपणे सुरू असतं, निसर्गचक्रही सतत न थांबता सुरूच असतं.. पण काळाच्या पटलावरील निसर्गाच्या या सौंदर्यस्थळांकडे मुळात अलवारपणे पहाणं आणि तरलतेने शब्दयोजना करून त्या कवितेच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणं ही ईश्वरी देणगीच म्हणावी लागेल. कवितेनं तिचं काम केलं .. शब्दाशब्दातून ती प्रकट झाली.. पण जेव्हा तीच कविता सुरांसुरांतून बोलायला लागते तेव्हा जणू ती आपलंच मन आपल्यासमोर प्रकट करत असते. हे कवितेचं मन जाणून, त्यानुसार संगीताची सुरेख, अमोघ रचना करून कवितेला सुरांचा साज चढवण्याचं काम संगीतकार करतो आणि कवितेचं गाणं होतं. आता खरी कसोटी असते ती गायकाची .. गायक आपल्या सुरेल मधाळ सुरांतून जेव्हा तेच गाणं जीव ओतून सादर करतात तेव्हा ते गाणं अक्षरशः सोनपावलांनी आपल्या मनात उतरतं. अशी गाणी मग आजन्म आपली साथ करतात. सुखदुःखाच्या प्रसंगी आपल्याला ही गाणी सोबत करतात.
जीवनातील प्रत्येक प्रसंगावर, प्रत्येक घटनेवर आजवर कविता नि गाणी जन्माला आलेली आहेत. बाळाचा जन्म असो, मुलीचं सासरी जाणं असो, विरह असो, ईश्वरभक्ती असो, एखाद्या प्रिय व्यक्तिचं आपल्याला कायमस्वरूपी सोडून जाणं असो.. एकूणएका प्रसंगाविषयी गाणी आहेत.. त्या त्या गाण्यांच्या सुरांची विलक्षण ताकद आहे. आपल्या मनात त्यावेळी तोच भाव उमटवून जाण्याइतकी दमदार अशी त्यांची रचना संगीतकारांनी केलेली असते.
दारा बांधता तोरण घर नाचले नाचले हे गाणं ऐकताना तर कित्तीतरी वेळेला माझ्या डोळ्यांपुढे यातली एकूण एक कल्पना उभी रहाते. जणू एक छान जरीकाठाची साडी नेसून, केसांचा आंबाडा माळून त्यावर मोगऱ्याच्या टप्पोऱ्या फुलांचा गजरा लेवून एक सुंदर स्त्री घरादाराला सजवण्याकामी एखाद्या मंगलप्रसंगी साऱ्या सकाळपासून सज्ज झालेली आहे आणि तीच हे गाणं म्हणत मनोभावे आपली कर्तव्य पार पाडत आहे. तिच्या डोळ्यातली स्वप्न तिच्या घरातल्या भिंतींवर रेखली आहेत, तिच्या अंगणातला सोनचाफा आता क्षणात टपटप फुलांचा अंगणभर सडा घालणार आहे आणि त्या सोनपावलांच्या आगमनाच्या क्षणापूर्वी तिनं आपलं घर इंदिराबाई म्हणतात त्याप्रमाणे सजवून ठेवलं आहे ..
कदाचित आज गुढीपाडव्यानिमित्त घरोघरी अशीच लगबग सुरू असेल.. दारी तोरणं, रांगोळ्या नि घराघरात गुढी उभारण्याची घाई .. म्हणूनच आजच्या या मंगलप्रसंगी हे गाणं तुम्हीही ऐकायलाच हवं असं जाता जाता सांगावसं वाटतं !
- मोहिनी घारपुरे - देशमुख (mohineeg@gmail.com)
(अल्बमचे नाव - घर नाचले नाचले, कवयित्री - इंदिरा संत, गायिका - पद्मजा फेणाणी जोगळेकर, संगीत - गिरीश जोशी)
![]() |
फोटो - गुगलवरून साभार |