
सई परांजपेंसारख्या श्रेष्ठतम दिग्दर्शिका व्यक्ती म्हणून जितक्या मला भावतात तितक्याच त्यांच्या कलाकृतीतूनही त्या मनाला भिडतात. बटबटीतपणा, ओंगळपणा, अश्लीलता यांच्या माऱ्याचा ज्यांच्या कलाकृतींना स्पर्शही नाही, आणि हे वजा असूनही ज्यांच्या कलाकृती प्रेक्षकांना संमोहित करतात किंबहुना थेट ह्रदयाला साद घालतात ही किमया सईंना कशी जमली असावी असा प्रश्न नेहमीच मला पडतो.. आणि कदाचित त्याचं उत्तर सई यांच्या व्यक्तिमत्त्वातंच आपल्याला सापडतं.
स्पर्श, कथा, चूड़ीयाँ अशा एक से एक हिट्सनंतर 1998 मध्ये सई यांचा एक नवाकोरा आणि वेगळीच कथा असलेला चित्रपट सिनेमागृहांमध्ये झळकला होता, त्याचं नाव होतं 'साज़'. पार्श्वगायनाच्या क्षेत्रातील दोघी सख्ख्या बहिणींची कथा असल्याने या चित्रपटाचं कथानक थेट लता मंगेशकर व आशा भोसले यांच्याविषयीच असल्याच्या वदंता तेव्हा कानी येऊ लागल्या होत्या. मी तेव्हा शाळेत होते, त्यामुळे अशा गोष्टी कानावर पडल्या की अशा चित्रपटांबद्दल मनात एक तीव्र उत्सुकता निर्माण होई. पण असे चित्रपट म्हणजे आर्ट मूव्हीज कधी यायच्या आणि कधी जायच्या ते कळायचं सुद्धा नाही. त्यातून या चित्रपटाबद्दल कमालीचं औत्सुक्य वाटायचं महत्त्वाचं कारण म्हणजे जाकीर हुसैन यांचा अभिनय.. तोवर ते केवळ ' अरे हुजूर, वाह ताज बोलीये ' असं म्हणताना जाहीरातीतून दिसायचे. त्यांचं तबला वादन आणि त्यांचं मोहक रूप टीव्हीवर पाहताना त्या वयात अक्षरशः मनात फुलपाखरं उडायला लागायची. सोनेरी छटा असलेले त्यांचे कुरळे केस जेव्हा ते तबला वाजवत असायचे तेव्हा त्यांच्या मानेसह तालावर थिरकायचे आणि त्यांचं अफाट मोहक हास्य यांनी हजारो युवती घायाळ झाल्या नसतील तरच नवल... मीही त्यातलीच एक.. त्यामुळेच साज चित्रपटाबद्दल फार फार कुतूहल निर्माण झालं होतं.. पण छे.. हा चित्रपट कधी आला नि कधी गेला कळलंही नाही. असंही, उठसूट चित्रपटाला जाणं कधी आमच्या घरात रूजलेलं नव्हतंच म्हणा हे ही एक कारण असावं. फार सिलेक्टेड चित्रपटांची घरात चर्चा वगैरे व्हायची, फार बोलबाला झालेला चित्रपट, तोही आईवडीलांना त्यांच्या नोकरीच्या वेळातून वेळ मिळालाच तर आम्ही सहकुटुंब पहायला जायचो. मुलींनी एकट्या वा ग्रुपने चित्रपटाला जाणं तोवर फारसं मान्यच नसायचं त्यामुळे आमच्यात ती धीटाई फार उशीरा आली.
तर ... साज़ हा चित्रपट मध्यंतरी यूट्यूबकृपेने पहाण्यात आला आणि मी शब्दशः भारावून गेले. शबाना आजमी, अरूणा इराणी, परिक्षित सहानी, अदिती देशपांडे, रघुवीर यादव आणि खुद्द जाकीर हुसैन ... हे कसलेले कलाकार, जावेद अख्तर यांचे अप्रतिम शब्द असलेली गीतं आणि प्रत्येक गाण्याला वेगळा साज देणारे चार संगीतकार.. त्यातील मुख्य संगीतकार जाकीरजी पण अतिथी संगीतकार भूपेन हजारिका, यशवंत देव आणि राजकमलजी यांनी दिलेलं संगीत अफाट .. निव्वळ अप्रतिम. सई यांची कथा, पटकथा आणि संवाद तर कळसाध्यायच म्हणायला हवा.
ही कथा सुरू होते तो काळ साधारण संगीत नाटकांचा. रघुवीर यादव (वृंदावन) आणि आदिती देशपांडे (रेवती) हे जोडपं आणि त्यांच्या दोन कन्या.. मोठी मानसी उर्फ मान दिदी (अरूणा इराणी) आणि धाकटी बन्सीधर उर्फ बन्सी (शबाना आझमी).. वृंदावन नाटकात काम करणारा, संगीताची उत्तम जाण असणारा असा अगदी हाडाचा कलाकार असतो. मोठ्या मुलीनंतर मुलगा हवा म्हणून वृंदावन आणि रेवती फार उत्सुक असतात, त्यांनी आपल्या मुलाचं नावही ठरवून ठेवलेलं असतं, बन्सीधर .. पण होते मुलगीच म्हणून काहीशा खट्टू मनाने ते या मुलीचंच नाव बन्सीधर ठेऊन देतात आणि अगदी तिथपासूनच या धाकटीवर जणू अन्यायाची मालिकाच सुरू होते.. तिचं जीवन हळूहळू कोमेजत जातं आणि त्याला कारणीभूत काही प्रमाणात परिस्थिती तर असतेच पण तितकंच कारण असतं ते म्हणजे मोठ्या बहिणीच्या मनातील मत्सराची, ईर्ष्येची भावना ..
वृंदावनचं तसं बरं चाललेलं असतं. दोघी मुलींना गाणं शिकवणं, नाटकात काम करून थोडेफार पैसे कमावणं.. पण मुलासाठी तिसऱ्यांदा प्रयत्न करतात आणि मुलगा जन्माला येतो पण मेलेला .. या धक्क्याने रेवती अंथरूणाला खिळते. आता तिला जाणवलेलं असतं की तिचा काळ जवळ आला आहे. एके दिवशी लहानग्या मानसीवर बन्सीची जबाबदारी हक्काने सुपूर्द करून आणि शेवंता नावाच्या अगदी घरच्यासारख्या असलेल्या छोट्या कामवाल्या मुलीला मुलींच्या सोबत मागे ठेऊन रेवती अनंताच्या प्रवासाला निघून जाते.. त्या धक्क्यांनी वृंदावन मनाने उद्ध्वस्त होतो आणि त्याला दारूचं व्यसन लागतं. अगदी दोन चार वर्षातच तोही मरतो. इकडे मुली मोठ्या होत असतात, मान दिदी बन्सीची आणि शेवंताची जबाबदारी घेते. एका ठिकाणी छोटी नोकरी करून थोडेफार पैसे कमवायला लागते. काही नातेवाईक त्यांना आपल्यासोबत मुंबईला घेऊन येतात आणि मग रोज भरपूर काम करवून घेत आश्रय देतात. गाण्याची स्कॉलरशिप दोघी मुलींना मिळत असल्याने अल्पावधीतच त्या मुंबईत स्वतंत्रपणे राहू लागतात. मानसी तिथल्या महिलांना भजनं शिकवू लागते आणि संगीतातच पुढच्या वाटा तिच्यासाठी एकापाठोपाठ एक उघडत जातात. इंद्रनील यादव नावाच्या बड्या संगीतकाराकडून तिला पहिली वहिली ऑफर मिळते आणि मानसीचं जीवन बदलून जातं. ती स्टार होते.. पार्श्वगायनाच्या क्षेत्रात तिचं खूप नाव होतं.

कुहूचा जन्म आणि त्यानंतर बन्सीची भरभराट.. बन्सीला त्या वर्षी पंधरा ऑगस्टला गौरव गीत गाण्याचं निमंत्रण खुद्द सरकारकडून बन्सीला मिळतं. ती पुढल्या सूचनांची वाट पहात रेंगाळते आणि अगदी पुढल्याच आठवड्यात टीव्हीवर तेच गौरव गीत गाणारी मान दिदी पाहून बन्सीला आपली संधी हुकल्याचं, आपला विश्वासघात झाल्याचं लक्षात येतं. त्यानंतर ती मान दिदीशी सगळे संबंध तोडून टाकते .. कायमचे ..
विलक्षण गुंतागुंत आणि मानवी जीवनाचे निरनिराळे पैलू उलगडणारी ही कथा पुढे इतक्या सुंदर पद्धतीने उलगडत जाते की आपण त्यात हरवून जातो. बन्सीचं पार्श्वसंगीताच्या शिखरावर पोहोचणं, मानसीची हार आणि नंतर आलेलं प्रचंड एकाकीपण, तिकडे कुहूचं वेगळं आयुष्य.. पण तीही याच गाण्याच्या क्षेत्रातली, त्यामुळे तिचं संगीताचं वेगळं विश्व.. या विश्वात तिला आवडणारा, तिच्यापेक्षा वयाने मोठा असलेला संगीतकार, गायक आणि एक अत्यंत चैतन्यदायी व्यक्तिमत्वाचा धनी असलेला हिमान देसाई (ज़ाकीर हुसैन) .. ज्याच्यावर कुहू भाळलेली असते तो हिमान .. पण तो .. तो बन्सीच्या प्रेमात पडतो.. बन्सीला मागणी घालतो आणि बन्सीही त्याच्या भावनिक गुंत्यात अडकत जाते. कुहूला जेव्हा हे कळतं तेव्हा तिचा राग.. अस्वीकार आणि विश्वासघाताची भावना .. हे सगळं सगळं पडद्यावर पहाणं, अनुभवणं एक निराळाच अनुभव देणारं आहे.
असं संपूर्ण जीवन एका नौकेसारखं, जिच्या स्वतःच्या हातात काहीच नसतं, नावाडी वल्हवेल त्या दिशेनं जात रहायचं.. असं अर्धअधिक जगलेली बन्सी .. आणि पुढे जीवनात आलेल्या आडव्यातिडव्या वाटा नि वळणं.. त्या वाटांवर कधी इंद्रनील तिचा बनून आला तर कधी मान दिदी .. कधी हिमान तिचा बनून आला तर कधी कुहूने तिची साथ दिली .. पण हिमानचा मृत्यू .. त्या क्षणाची साक्षीदार फक्त बन्सी .. ती ते सगळं आठवते आणि मनाने खचत जाते. आपल्या जीवनाची नौका अशी वहावत वहावत आता कुठे नेणार आपल्याला या विचारांच्या गर्तेत ती इतकी हरवते की तिचं गाणं बंद होतं. आपण गाऊ शकतो हा आत्मविश्वासच ती हरवते .. आणि अशातच तिची भेट होते ती तिच्या मानसोपचारतज्ज्ञांशी .. जे तिचं ऐकत जातात. आपली प्रोफेशनल मर्यादा कधीही ते ओलांडत नाहीत. बन्सीला बरं करताना काही काही प्रसंगात ते विचलीत होतात खरे .. पण तरीही त्यांच्या उपचारांचा परिणाम म्हणा किंवा कुहूला सर्वोत्कृष्ट गायिका म्हणून पुरस्कार जाहीर झाल्याने बन्सीच्या जीवनात पुन्हा झालेली आनंदाची पखरण यामुळे म्हणा बन्सीचे हरवलेले सूर पुन्हा तिचे तिला सापडतात .. आणि बन्सीचं आयुष्य पुन्हा सुरांचा साज़ लेवून झळाळून उठतं..

हा चित्रपट पहाणं म्हणजे सुरांची मेजवानीही आहेच एकप्रकारे कारण यातली एक से एक गाणी .. 'बादल चांदी बरसाए' हे गाणं भूपेन हजारिकाजींनी ज्या अवीट माधुर्याने संगीतबद्ध केलंय ते म्हणजे निव्वळ श्रवणीय .. सुखद .. तसंच माझं आवडीचं गाणं, 'क्या तुमने है केहे दिया ..' यात ज़ाकीरजींना पहाणंही तितकंच आनंददायी आहे. फिर भोर भई जागा मधुबन, बादल घुमड बढ़ आए ही गाणीही विशेष आवडून जातात.
शबाना आज़मी आणि अरूणा इराणी यांच्या अभिनयाला तर तोड नाही. तितकाच संयत अभिनय परिक्षित सहानी आणि ज़ाकीरजींचा झालाय. कुहूचं काम करणारी अभिनेत्री आयेशा धारकरही छानच आहे. शेवंताचं काम करणारी अभिनेत्री माधवी शेट्ये, जोशी गुरूजी जे मुलींचे शाळेतले शिक्षक असतात त्यांचं पात्र रंगवणारे हेमचंद्र अधिकारी, मानसी आणि बन्सीच्या भूमिका करणाऱ्या दोघीही बालकलाकार यांचेही अभिनय तोडीस तोड झालेले आहेत. मुख्य म्हणजे संपूर्ण चित्रपटात बन्सीचं जे ट्रान्स्फॉर्मेशन आहे ते शबानाजींनी काय अफाट दाखवलंय.. अरूणा इराणींच्या वाट्याला अशी भूमिका कदाचित पूर्वी कधीच आली नव्हती .. त्यांनी त्यांच्या भूमिकेला चारचाँद लावले आहेत. प्रेमळ, जबाबदार, मोठी बहीण आणि तितकंच तिच्या देहबोलीत अधेमधे डोकावणारी असूया, आपलं स्थान डळमळीत होईल अशी भीती वाटून वागण्याबोलण्यात येणारा थोडीशीच मत्सराची छटा .. हे सगळं सगळं अरूणाजींनी अगदी सुंदररित्या दाखवलं आहे.
आणि अर्थातच, कळसाध्याय म्हणजे सई परांजपे.. स्वतः इतक्या साध्या, करारी आणि थेट .. त्यांच्या कलाकृतींमधूनही त्या तशाच थेट पोचतात. अलिकडच्या काळात सईंसारख्या धाटणीच्या दिग्दर्शिका म्हणून सुमित्रा भावेंकडे पाहीलं जाऊ शकतं. मध्यंतरी स्मिता तळवलकरही मला याच वाटेवरच्या दिग्दर्शिका असल्यासारखं वाटायचं.. पण तरीही या सम हा म्हणतात ना .. तसं सईंचं आहे. त्यांची मांडणी, त्यांची कलाकारांची निवड, त्यांचा अनुभव, मानवी नात्यांची आणि त्यातील गुंतागुंतीची त्यांची जाण, मुळात चित्रपट या माध्यमाची त्यांची समज, त्यांचा अनुभव आणि त्यांची विचारपद्धती याला तोड नाही हे हा चित्रपट पाहिल्यानंतर पुन्हा पुन्हा जाणवत रहातं.
लक्षात रहाण्याजोगी दोन पात्र म्हणजे बन्सी आणि हिमान .. ते आपल्या सौंदर्याची छाप पाडून जातात.. तसंच जावेद अख्तर यांचे शब्दही .. या चित्रपटासाठी जावेदजींना नॅशनल अवॉर्ड फॉर बेस्ट लिरिक्सही मिळालं होतं.
नातं, बहिणी बहिणींचं .. या नात्याचे कित्तीतरी पदर .. तसंच एक नातं आई मुलीचं .. तसंच एक नातं प्रियकर प्रेयसीचं .. त्या नात्याच्या कित्तीतरी छटा आणि एक नातं डॉक्टर आणि पेशंटचं ..एक नातं घरकाम करणारी पोरसवदा मुलगी आणि तिच्यापेक्षा काहीच वर्षांनी लहान असलेल्या दोघी मुलींचं, एक नातं आईवडीलांचं .. ज्यात एक कोलमडला तर दुसराही उन्मळून पडला.. एकाचं जाणं दुसऱ्याला बेचिराख करून गेलं.. जबाबदारी निभावणं किती कठीण पण मोठ्या बहिणीनं लहान वयात तीही उत्तम पेलली.. मत्सर, ईर्ष्या टळली नाही तिलाही पण म्हणून बहिणीवरचं प्रेम कमी नव्हतं. तीच निष्ठा धाकट्या बहिणीचीही .. दिदीच्या शब्दाबाहेर न जाण्याचं जणू स्वतःलाच दिलेलं वचन ... पण हे सगळं छान शहाणं असलं तरीही आयुष्याची वाट नेहमीच वेड्यावाकड्या वळणांनी पुढे जात असते. माणसाच्या हातात काहीच नसतं.. जे जसं येईल ते तसं निभावत पुढे पुढे जात रहायचं इतकंच काय ते माणूस करू शकतो.. सुखाच्या मृगजळामागे माणूस आयुष्यभर धावत असतो .. ते हाती लागतं तो दिवस सोन्याचा .. बाकी तर जीवनचक्र अव्याहत सुरू ठेवायचं इतकंच ...
सुरोंका साज़ चढने दो .. जीवन आगे बेहेने दो .. जीवन बेहता है .. बेहेने दो ...
- मोहिनी घारपुरे - देशमुख
copyright@mohineeg
शबाना आज़मी आणि अरूणा इराणी यांच्या अभिनयाला तर तोड नाही. तितकाच संयत अभिनय परिक्षित सहानी आणि ज़ाकीरजींचा झालाय. कुहूचं काम करणारी अभिनेत्री आयेशा धारकरही छानच आहे. शेवंताचं काम करणारी अभिनेत्री माधवी शेट्ये, जोशी गुरूजी जे मुलींचे शाळेतले शिक्षक असतात त्यांचं पात्र रंगवणारे हेमचंद्र अधिकारी, मानसी आणि बन्सीच्या भूमिका करणाऱ्या दोघीही बालकलाकार यांचेही अभिनय तोडीस तोड झालेले आहेत. मुख्य म्हणजे संपूर्ण चित्रपटात बन्सीचं जे ट्रान्स्फॉर्मेशन आहे ते शबानाजींनी काय अफाट दाखवलंय.. अरूणा इराणींच्या वाट्याला अशी भूमिका कदाचित पूर्वी कधीच आली नव्हती .. त्यांनी त्यांच्या भूमिकेला चारचाँद लावले आहेत. प्रेमळ, जबाबदार, मोठी बहीण आणि तितकंच तिच्या देहबोलीत अधेमधे डोकावणारी असूया, आपलं स्थान डळमळीत होईल अशी भीती वाटून वागण्याबोलण्यात येणारा थोडीशीच मत्सराची छटा .. हे सगळं सगळं अरूणाजींनी अगदी सुंदररित्या दाखवलं आहे.
आणि अर्थातच, कळसाध्याय म्हणजे सई परांजपे.. स्वतः इतक्या साध्या, करारी आणि थेट .. त्यांच्या कलाकृतींमधूनही त्या तशाच थेट पोचतात. अलिकडच्या काळात सईंसारख्या धाटणीच्या दिग्दर्शिका म्हणून सुमित्रा भावेंकडे पाहीलं जाऊ शकतं. मध्यंतरी स्मिता तळवलकरही मला याच वाटेवरच्या दिग्दर्शिका असल्यासारखं वाटायचं.. पण तरीही या सम हा म्हणतात ना .. तसं सईंचं आहे. त्यांची मांडणी, त्यांची कलाकारांची निवड, त्यांचा अनुभव, मानवी नात्यांची आणि त्यातील गुंतागुंतीची त्यांची जाण, मुळात चित्रपट या माध्यमाची त्यांची समज, त्यांचा अनुभव आणि त्यांची विचारपद्धती याला तोड नाही हे हा चित्रपट पाहिल्यानंतर पुन्हा पुन्हा जाणवत रहातं.
लक्षात रहाण्याजोगी दोन पात्र म्हणजे बन्सी आणि हिमान .. ते आपल्या सौंदर्याची छाप पाडून जातात.. तसंच जावेद अख्तर यांचे शब्दही .. या चित्रपटासाठी जावेदजींना नॅशनल अवॉर्ड फॉर बेस्ट लिरिक्सही मिळालं होतं.
नातं, बहिणी बहिणींचं .. या नात्याचे कित्तीतरी पदर .. तसंच एक नातं आई मुलीचं .. तसंच एक नातं प्रियकर प्रेयसीचं .. त्या नात्याच्या कित्तीतरी छटा आणि एक नातं डॉक्टर आणि पेशंटचं ..एक नातं घरकाम करणारी पोरसवदा मुलगी आणि तिच्यापेक्षा काहीच वर्षांनी लहान असलेल्या दोघी मुलींचं, एक नातं आईवडीलांचं .. ज्यात एक कोलमडला तर दुसराही उन्मळून पडला.. एकाचं जाणं दुसऱ्याला बेचिराख करून गेलं.. जबाबदारी निभावणं किती कठीण पण मोठ्या बहिणीनं लहान वयात तीही उत्तम पेलली.. मत्सर, ईर्ष्या टळली नाही तिलाही पण म्हणून बहिणीवरचं प्रेम कमी नव्हतं. तीच निष्ठा धाकट्या बहिणीचीही .. दिदीच्या शब्दाबाहेर न जाण्याचं जणू स्वतःलाच दिलेलं वचन ... पण हे सगळं छान शहाणं असलं तरीही आयुष्याची वाट नेहमीच वेड्यावाकड्या वळणांनी पुढे जात असते. माणसाच्या हातात काहीच नसतं.. जे जसं येईल ते तसं निभावत पुढे पुढे जात रहायचं इतकंच काय ते माणूस करू शकतो.. सुखाच्या मृगजळामागे माणूस आयुष्यभर धावत असतो .. ते हाती लागतं तो दिवस सोन्याचा .. बाकी तर जीवनचक्र अव्याहत सुरू ठेवायचं इतकंच ...
सुरोंका साज़ चढने दो .. जीवन आगे बेहेने दो .. जीवन बेहता है .. बेहेने दो ...
- मोहिनी घारपुरे - देशमुख
copyright@mohineeg
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा