गुरुवार, २९ ऑगस्ट, २०२४

हा माझा मार्ग एकला ...

 

तसं पहायला गेलं तर 'हा माझा मार्ग एकला' हे तर प्रत्येकाच्याच जीवनाचं सत्य आहे. कदाचित म्हणूनच इथे जन्माला आलेल्या नवजात अर्भकापासून ते अगदी जर्जर झालेल्या वृद्ध व्यक्तीपर्यंत कोणावरही कधीही वाईट दिवसांना सामोरे जाण्याची वेळ येऊ शकते, आणि येतेही!

ज्येष्ठ सुप्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगावकर यांनी बालकलाकार म्हणून काम केलेला आणि तुफान गाजलेला हा पहिला चित्रपट, आणि म्हणूनच 'हा माझा मार्ग एकला' पहाण्याची मला खूप उत्सुकता होती ती अलीकडेच यूट्यूब कृपेने पूर्ण झाली. काहीही म्हणा हे जुने श्वेतश्यामल चित्रपट फार खोल असा काहीतरी जीवनाचा आशय आपल्यापुढे सुंदर आणि सहजतेने उलगडून ठेवतात यात दुमत नाही. 

लहानगा मुलगा ... अतुल त्याचं नाव. त्याची आई त्याला जन्म देताच देवाघरी जाते. अतुलला आई मिळावी म्हणून अतुलचे वडील लवकरच दुसरं लग्न करतात. सावत्र आई घरी येते आणि नात्याप्रमाणेच या छोट्याशा बालकाशी मनातून आकस ठेवते. याच्या जबाबदारीचं लोढणं आपल्या गळ्यात नको, मग यापासून सुटका कशी करून घेता येईल या हेतूने निरनिराळे कट रचून सावत्र आई अतुलला खूप त्रास देते. वर घरात कांगावा की हा वाया जाईल, मोठा झाला की चोऱ्या करील म्हणून आपण याला शिस्त लावण्यासाठी अशा वागतो. 

एक दिवशी सावत्र आई लहानग्या अतुलला काहीतरी क्षुल्लक कारणावरून उपाशीच ठेवते. वडील तिला समजावयला जातात तर ती लगेच त्यांना माहेरी जाण्याची धमकी देते. वडील गरीब बिचारे गप्प बसतात, वर म्हणतात, 'तुम्हा माय लेकरांच्यात मी इथून पुढे कधीच पडणार नाही'. मग काय, आईला आणखीनच बरं होतं. रात्री वडील आपल्या पोराला लपून छपून दोन पेढे आणि पाणी आणून देतात, बाळ खाऊन घे म्हणतात, पण मुलगाही स्वाभिमानी... तो ठामपणे नकार देतो. 

दुसऱ्या दिवशी त्याची वरच्या खोलीत रहाणारी चिमुकली मैत्रीण त्याला बोलवायला येते. ती म्हणते, "अतुल चल ना, माझ्या बाबांनी मला नवी झुकझुकगाडी आणलीये, ती कशी चालते मी तुला दाखवते." अतुल म्हणतो, "नको, आईला आवडणार नाही मी आलेलं..." तशी अलका म्हणते... "हे काय रे अतुल ... तुला नै दाखवली तर मला पण मजा नै येणार... चल की ..." इवलुसा अतुल तिच्या या गोड बोलण्याचा मान ठेऊन भरकन तिचा हात धरून तिच्या घरी जातो. अलका आईला सांगते, "आई अतुलला दाखव ना माझी नवी आगगाडी, आई म्हणते आणते हं, तुम्ही बसा इथे खेळत... "आई स्वयंपाकघरात जाते मुलांसाठी खायला आणायला आणि आगगाडी आणायला तर इकडे अतुलचं लक्ष फोनकडे जाते. तो अलकाला विचारतो, "अलका हे काय आहे गं ?" अलका सांगते "अरे यावरून माझे बाबा लांब लांब कोणाशी तरी बोलत असतात. हा फोन आहे." अतुल म्हणतो, "अलका, यावरून माझ्या देवाघरी गेलेल्या आईशीपण बोलता येईल का गं ?" अलका म्हणते ..." हो ... येईल की ...!"

दोघं झटक्यात पुढे होऊन फोनवरून काहीतरी नंबर डायल करतात. जुन्या काळी दोन नंबर जोडून देण्याचं काम फोन ऑपरेटर्स करत असत. तसा हा फोन एका ऑपरेटरला येते. पलीकडून अतुल बोलतो, "मला की नै माझ्या देवाघरी गेलेल्या आईशी बोलायचंय..." ऑपरेटर आपल्या सहकारी मैत्रीणीला कुजबुजत सांगते... "बघ ना.. दोन छोट्या मुलांनी खेळाखेळात फोन लावलाय आणि मुलगा म्हणतोय त्याला त्याच्या आईशी बोलायचंय .. ती देवाघरी गेलीये..." ही मैत्रीण गमतीत लगेच म्हणते, "हो .. आण मी बोलते त्याच्याशी ..." आणि मग ती चिमुकल्या अतुलशी त्याची देवाघरी गेलेली आई बनून बोलते. तो सांगतो, "आई तू का गेलीस देवाघरी...? नवी आई मला खूप त्रास देते, उपाशीच ठेवते, मारते. ती वाईट आहे... मला तू हवीयेस आई ... परत ये ना...!" त्याच्या व्याकूळ आर्त सादेला उत्तरं देताना ही टेलीफोन ऑपरेटरही द्रवते. तिला जणू मायेचा पाझर फुटतो, फोन ठेवताक्षणी तिच्या डोळ्यातून आसवं ओघळू लागतात. 

इकडे सावत्र आई अतुलला शोधत कानोसा घेत वरती आलेली असते. लहानगा अतुल अलकाच्या आईनं आग्रहाने दिलेला खाऊ खात आईविषयी काहीतरी सांगायला लागतो तोच सावत्र आई आत शिरते आणि अतुलला, "इथे येऊन माझ्या काड्या करतोस काय रे ?" म्हणत पुन्हा चांगला चोप द्यायला लागते. अतुल बिचारा भुकेला, मार खाल्लेला घरी येतो. संध्याकाळी वडील येतात, त्यांच्यापुढे पुन्हा ही आई त्याच्याशी गोड वागते पण खायला देत नाही, त्याला घराबाहेर उंबरठ्यावर झोपायला लावते. वडील आपले बायकोवेडे... मधे पडत नाहीत. 

दुसरा दिवस उजाडतो. आता अंतिम डाव. आई अतुलला गोड बोलून किराणा आणायला लावते. लहानगा अतुल ओझं कसंबसं उचलून पायऱ्या चढत वर येत असतो तर सावत्र आई समोर येते आणि त्याच्या हातातलं ओझं घेऊन त्याच्याशी गोड बोलू लागते. आता लवकर हातपाय तोंड धुवून घे म्हणजे छान गरम जेवायला वाढते असं बोलून त्याला आत पाठवते. तो इवलुसा पोर मातेच्या त्या शब्दांनी हुरळून जातो. आतमध्ये जाऊन आवरायला लागतो, तो इकडे कारस्थानी आई काय करते माहितीये ... दोरीवर लहानग्या अतुलची चड्डी वाळत असते त्याच्या खिशात दहा रूपयाची नोट ठेऊन देते आणि अतुलला कपडे बदलायला देताना जाणीवपूर्वक ही चड्डी घालायला देते. वडील घरी येतात तो ही कांगावा करू लागते, "सकाळी तुम्ही मला दिलेली दहा रूपयाची नोट हरवली, कुठे सापडत नाही." वडील चटकन अतुलला विचारू लागतात, "तू तर नाही ना घेतलीस... ?" आई मुद्दाम नाटक करते म्हणते ... "काय आता याची झडती घ्याल का तुम्ही ...?" तर वडील तिच्या बोलण्यात अडकतात आणि रागात अतुलची झडती घेण्याच्या उद्देशाने त्याच्या खिशात हात घालतात, तो त्याच्या खिशातून ती नोट बाहेर येते. आईचा कट चांगलाच यशस्वी होतो. अतुलला बिचाऱ्याला त्याने न केलेल्या चुकीची शिक्षा म्हणून रात्रभर घराबाहेर झोपावं लागतं. रात्री आईवडील आपापसात बोलत असतात तेव्हा आई म्हणते असते, "उद्या की नै पोलीस बोलवा आणि त्याला पोलीसांच्याच ताब्यात द्या, म्हणजे तो सुधारेल, बघा.. नाहीतर मोठा होऊन अट्टल गुन्हेगार होईल तो... " अतुलच्या कानावर हे शब्द पडतात आणि त्या रात्री तो चिमुकला रडत रडत घरातून पळून जातो. 

आता पुढे काय ...?

म्हणतात ना, देवासारखं कोणीतरी पाठीशी उभं रहातंच लेकरांच्या...अगदी त्याच न्यायाने अतुलला एक घर दिसतं. तो त्या घराच्या अंगणात झोपलेल्या माणसाला पाहतो. ही व्यक्तीरेखा साकारलीये, ज्येष्ठ अभिनेते राजा परांजपे यांनी...

नशेत धुंद असलेल्या त्या माणसाच्या खाटेखाली आपल्या अंगाची मुटकुळी करून अतुल बिचारा झोपतो. सकाळ होताच माणूस उठतो, खाट उचलून ठेवायला जातो तो खाली हा दिसतो. हा कोण छोटा आला म्हणून त्याची चौकशी करतो. दोन दिवस पोटात अन्नाचा कणही नसलेल्या अतुलला चहा आणि पाव खायला देतो. हळुहळू अतुलची गोष्ट त्याला कळते. त्याच्याही मनात या चिमुकल्यासाठी मायेचा पाझर फुटतो. पुढे एका प्रसंगात उलगडा होतो की हा माणूस अतुलच्या खऱ्या आईचा लग्नापूर्वीचा प्रियकर असतो. अतुल आपल्या प्रेयसीचा मुलगा आहे हे कळताच आता या माणसालाही जीवनाची दिशा सापडते. या मुलाचा नीट सांभाळ करायचा, त्याला शाळेत घालायचं या विचारात हा माणूस स्वतःचं जीवनही मार्गी लावतो. त्यात राजा परांजपेंचा एक जवळचा मित्र म्हणून ज्येष्ठ अभिनेते शरद तळवलकरांचीही भूमिका आहे. मग एकदा ते या मुलाचं दैव आझमावून पाहू म्हणून मुलाच्या हातानी लॉटरीचं तिकीट काढतात. 

उत्तरार्धात चित्रपटाचं कथानक ज्या काही बऱ्या वाईट वळणांनी पुढे नेलं आहे ते शब्दात मांडणे खरंतर सोपे आहे, पण त्यातील माधुर्य अनुभवण्यासाठी, बालकलाकार सचिनचा गोंडस अभिनय पहाण्यासाठी हा चित्रपट पहायलाच हवा.

अखेर चिमुकल्या जिवाला उदंड प्रेम लाभतं आणि सगळं नीट होतं असा सुखांत असलेला हा चित्रपट मराठीतला मैलाचा दगड न ठरला असता तरच नवल.

या चित्रपटाचा उल्लेख जर बाबुजींचं स्मरण न करता झाला तर ते फारच अयोग्य ठरेल. चित्रपटाचे शीर्षक गीत, हा माझा मार्ग एकला ऐकताना आणि जर अलीकडेच तुम्ही स्वरगंधर्व हा बाबुजींच्या जीवनावर आधारित चित्रपट पाहिला असेल तर त्यातील आर्तता, बाबुजींच्या स्वरात किती आणि कशी उमटली आहे याची जाणीव होईल आणि तुमचेही डोळे भरून आल्यावाचून रहाणार नाहीत. तुमचंही मन क्षणात द्रवेल हे निश्चित.

जीवनाचं चाक कोणाचं कोणत्या दिशेनं जाईल हे सांगू शकत नाही, म्हणूनच, हा माझा मार्ग एकला हे त्रिकालाबाधीत सत्य आहे !

मित्रांनो, 

आपल्या प्रतिक्रिया माझ्यासाठी अनमोल आहेत. माझा ब्लॉग अनेक लोकं वाचतात, पण आपण जर कमेंट करून खाली आपल्या प्रतिक्रिया दिल्यात, आपली ओळख मला कळवलीत तर ब्लॉगच्या माध्यमातून माझ्या प्रामाणिक वाचकांपर्यंत पोचण्याचा माझाही एकला मार्ग एक नवी दिशा आणि ओळख माझ्या आयुष्याला देण्यात यशस्वी ठरेल. 

म्हणूनच, ब्लॉग वाचलात आणि आपल्याला तो आवडला किंवा आवडला नाही तरीही मला कमेंट करून जरूर कळवत रहा. तसंच इतरांनाही ब्लॉगची लिंक शेअर करा जेणेकरून ब्लॉगमधील विचार इतरांपर्यंत पोचतील.

धन्यवाद

- मोहिनी घारपुरे देशमुख

mohineeg40@gmail.com

( Photo Credit - Google and Times of India )


गुरुवार, १५ ऑगस्ट, २०२४

कुछ याद उन्हे भी करलो, जो लौटके घर ना आए ...

सीमेवर उभे असलेले आपले जवान...

थंडी, ऊन, पाऊस, वारा ... कशाचीच पर्वा न करता ते अविरत तिथे पहारा देत असतात. 

कोणासाठी तर आपल्यासाठी ... 

आपण सुरक्षित रहावं म्हणून त्यांचं जीवन त्यांनी पणाला लावलेलं असतं.

आणि आपण ...

साधं देशात सुख, शांती, समाधान, एकोपा आणि प्रेमाचं वातावरणही ठेऊ शकत नाही ! 

सतत जातीय द्वेष पसरवतो, सणावाराच्या निमित्तानं ( हल्ली तर वाढदिवसाच्या निमित्तानंही ) डीजे वर जोरदार गाणी लावून परिसरात ध्वनिप्रदूषण पसरवतो. साधं आपली गाडी नीट चालवत नाही, जेणेकरून सतत ट्राफीक जाम आणि अपघातांना निमंत्रण देत रहातो. कचरा आणि ई-कचऱ्याचा प्रश्न आपण सोडवू शकलेलो नाही. रस्त्यांवरच्या खड्ड्यांबाबत आपण दरवर्षी ओरडत रहातो पण प्रशासन कमी च पडतं. एक ना अनेक ... हजारो समस्या आपल्यापुढे ... आणि त्यातल्या अनेक समस्या या केवळ मानवनिर्मित ... म्हणजे आपणच निर्माण केलेल्या ! 

या समस्यांचं समाधान शोधायला आपण एकटे अपुरे आहोत. पण सगळे एकत्र एकजुटीने राहिलो तर निश्चितच आपण आपल्या समस्यांचं समाधान शोधू शकतो आणि देशात ठोस बदल घडवू शकतो. 

पण इथे बदल हवेत कुणाला नै ?

जो बदल घडवायला जातो तो वेडा ठरतो. जो सिस्टीम बदलायचा प्रयत्न करतो त्याला सिस्टीम बाजूला काढून टाकते. 

ना माणसं बदलतात, ना सिस्टीम बदलते.

इंग्रजीत एक म्हण आहे, If you do same things as you did yesterday ...you will get same results as you got yesterday ! अर्थात् ... तुम्ही जर काल जे केलंत तेच आज करत असाल तर तुम्हाला काल जे हाताशी लागलं तेच आज लागेल... याचा अर्थ परिणाम तोच राहील. बदल कधीच घडणार नाही. 

म्हणूनच, बदल घडवायचा असेल तर आधी बदलायला हवं.

आधी स्वतःला आणि त्यासोबतच वर्षानुवर्ष आपण फॉलो करत असलेल्या या देशातील कार्यपद्धतीला ! 

जोवर हे बदलणार नाही तोवर कोणा व्यक्तीला, कोणा नेत्याला दोष देत बसून काही उपयोग नाही. 


आपला देश बदलायचा तर तरूणांना हाताशी घ्यायला हवं. त्यांना त्यांच्यातील ऊर्जा आणि मुख्य म्हणजे कल्पकता, आऊट ऑफ बॉक्स विचार पद्धती वापरून नवं काहीतरी घडवू द्यायला हवं. 

तेच ते आणि तेच ते च्या रटमधून त्यांची सुटका करायला हवी. 

नवे रोजगार निर्माण करायला हवेत. नव्या संधी निर्माण करायला हव्यात. 

देश तेव्हा स्वतंत्र होईल जेव्हा इथल्या तरूणाईला सकारात्मकतेने देशात बदल घडवण्याचं स्वातंत्र्य मिळेल. 

जोवर हा देश बडेबुढे नेता आणि घराघरातील बडेबुढे ज्येष्ठ नागरिक चालवत आहेत तोवर बदल घडणं निव्वळ अशक्य आहे असं मला वाटतं ! 

देशातील तरूणांना नुसतं सैनिकांची आठवण करून देत बसणं पुरेसं नाही, तरूणांना त्यांच्या अंगातील सळसळता उत्साह या देशासाठी वापरू देणं गरजेचं आहे. पण दुर्दैवानं या देशात तरूणांंबरोबर इतकं राजकारण खेळलं जातं की ही मुलं त्या राजकारणाचे बळी ठरतात. नोकरीच्या ठिकाणी क्षुल्लक कारणावरून काढून टाकण्यापासून ते कामावर बॉसच्या तोंडातून सतत लहानसहान कारणावरून मिळणाऱ्या शिव्यांनी हे तरूण निराश होत जातात. 

स्लो पॉयझनिंगसारखं हे सगळं त्यांच्यावर काम करत रहातं. त्यांच्या मनावर घाव घालत रहातं. आपण काहीतरी करून दाखवू या विचाराने प्रेरीत झालेली हीच तरूण मंडळी मग दिवसागणिक हताश होत जातात ... कारण काम मिळत नाही, मिळालेल्या कामात कोणी ना कोणी वरिष्ठ घाणेरडं राजकारण खेळत यांना मानसिक त्रास देत रहातो, घरीदारी अपमान होतो, अतीश्रम वाट्याला येतात. मुलगी असेल तर शरीरसुखाची अपेक्षा, तशा पद्धतीने तिला मानसिक त्रास, शारिरीक त्रास दिला जातो. ती बरेचदा मुक्याने तो सहन करते नाहीतर त्या सिस्टीममधून बाहेर पडते आणि आपल्या कोशात स्वतःला बंद करून घेते.

प्रत्येक इंडस्ट्रीच्या निराळ्या व्यथा आहेत. 

मुद्दा हा आहे की तुम्ही देशातील तरूणांना कधी संधी देणार आहात ? 

त्यांचे उमेदीचे दिवस संपल्यावर मग मिळालेल्या संधीचं ते काय करू शकतील सांगा बरं ? 

हल्ली तर मानसिक त्रासाचेच इतके प्रकार झालेले आहेत की कोणावर विश्वास ठेवणं हीच चूक झालेली आहे. मन मोकळं बोललं म्हणजे लगेच लोकांच्या त्रासाला आमंत्रण असं समीकरण झालेलं आहे.

हा देश ... हा आपला देश असा कसा झाला ? 

जिथे वारं नेहमी प्रेमाचं एकोप्याचं वहायचं तिथे आता फक्त स्पर्धा आणि विखाराचं वारं वाहतंय ...

साधं परजातीत लग्न केलं म्हणून जीव घेतला जातोय ... अरेरे ...

आपली खोलवर असलेली, रूजलेली सुसंस्कृतता, सभ्यता आपण अशी कशी वाऱ्यावर सोडून दिलीये ?

आपली संवेदनशीलता... माणूस म्हणून असलेली प्रगल्भता आपणच उधळून लावलीये.

पूर्वीची माणसं शहाणी होती ... आताची माणसं 'शहाणी' झाली आहेत. 

सीमेवरचा जवान ... ज्याच्याबद्दल स्व.लतादीदींनी गायलंय... कुछ याद उन्हे भी करलो ... जो लौटके घर ना आए ... आणि देशातला तरूण ... त्याचीही एका अर्थाने हीच हालत आहे, पण तो दिशाहीन भटकतोय.. व्यसनांच्या आहारी जातोय.. का, कारण त्याला जो विश्वास हवाय, त्याला ज्या आणि जशा संधी हव्या आहेत त्या देण्यासाठी आपण असमर्थ आहोत.

बदलायलाच हवंय हे चित्र ... आणि आपला देश ...

जय हिंद 

- मोहिनी घारपुरे देशमुख 



सोमवार, ५ ऑगस्ट, २०२४

Do you Want to learn Mandolin?


मेंडोलिन वादनात विशारद ही पदवी घेतलेले जगभरातील एकमेव कोण तर ते म्हणजे माझे मित्र शरद जोशी काका ! 

मेंडोलिन सारखे अत्यंत गोड वाद्य ते मोठ्या तळमळीने आणि मनापासून शिकले. त्याकरता त्यांनी मेंडोलिन शिकवणारे कित्तीतरी गुरू केले, मनापासून या वाद्यांची साधना केली आणि त्यानंतरच ते मेंडोलिन वादनात उच्च पदवी मिळवू शकले.
 
सिव्हिल इंजिनिअर ते कॉन्ट्रॅक्टर ते बिझनेसमन आणि आता पूर्ण वेळ मेंडोलिन आर्टिस्ट आणि शिक्षक हा त्यांचा जीवनप्रवास अचंबित करणारा आहे. 
अनेक अडथळे पार करत शरद काकांनी आजचे हे यश मिळवले आहे.
मेंडोलिनवर केवळ हिंदी मराठी गाणी वाजवण्यापलिकडे काका शास्त्रीय संगीत सुद्धा लीलया वाजवतात हे त्यांचे आणखी एक विशेष! 
तर मंडळी,
तुम्हाला जर शरद काकांच्या मेंडोलिन वादनाचा कार्यक्रम तुमच्या सामाजिक/सांस्कृतिक परिघात आयोजित करायचा असेल तर आजच आम्हाला संपर्क करा. तसंच फिल्म आणि संगीत क्षेत्रातील मंडळींनाही जर आपल्या कलाकृतीत या वाद्यांचे सुमधुर सूर शरद काकांनी वाजवावेत असे मनात आले तर वेळ न दवडता मला किंवा शरद काकांना संपर्क करा.
आणि हो ... जर ही माझी पोस्ट वाचल्यानंतर हे (तसं) युनिक वाद्य शिकायची तुमची इच्छा झाली तर तुम्हाला म्हणून सांगते ... काका पुण्यात कोथरूड भागात मेंडोलिनचे क्लासही घेतात. त्यामुळे मेंडोलिनच्या क्लाससाठीही तुम्ही शरद काकांना माझी ओळख देऊन संपर्क करू शकता... अगदी आज आत्ता ताबडतोब ☺️ आणि आजपासून केव्हाही ☺️☺️👍👍

धन्यवाद 
मोहिनी घारपुरे देशमुख 

संपर्क क्रमांक - 
मोहिनी घारपुरे देशमुख - +91 86682 89992
शरद जोशी - +91 94227 69492



Translate

Featured Post

अमलताश