गुरुवार, १५ ऑगस्ट, २०२४

कुछ याद उन्हे भी करलो, जो लौटके घर ना आए ...

सीमेवर उभे असलेले आपले जवान...

थंडी, ऊन, पाऊस, वारा ... कशाचीच पर्वा न करता ते अविरत तिथे पहारा देत असतात. 

कोणासाठी तर आपल्यासाठी ... 

आपण सुरक्षित रहावं म्हणून त्यांचं जीवन त्यांनी पणाला लावलेलं असतं.

आणि आपण ...

साधं देशात सुख, शांती, समाधान, एकोपा आणि प्रेमाचं वातावरणही ठेऊ शकत नाही ! 

सतत जातीय द्वेष पसरवतो, सणावाराच्या निमित्तानं ( हल्ली तर वाढदिवसाच्या निमित्तानंही ) डीजे वर जोरदार गाणी लावून परिसरात ध्वनिप्रदूषण पसरवतो. साधं आपली गाडी नीट चालवत नाही, जेणेकरून सतत ट्राफीक जाम आणि अपघातांना निमंत्रण देत रहातो. कचरा आणि ई-कचऱ्याचा प्रश्न आपण सोडवू शकलेलो नाही. रस्त्यांवरच्या खड्ड्यांबाबत आपण दरवर्षी ओरडत रहातो पण प्रशासन कमी च पडतं. एक ना अनेक ... हजारो समस्या आपल्यापुढे ... आणि त्यातल्या अनेक समस्या या केवळ मानवनिर्मित ... म्हणजे आपणच निर्माण केलेल्या ! 

या समस्यांचं समाधान शोधायला आपण एकटे अपुरे आहोत. पण सगळे एकत्र एकजुटीने राहिलो तर निश्चितच आपण आपल्या समस्यांचं समाधान शोधू शकतो आणि देशात ठोस बदल घडवू शकतो. 

पण इथे बदल हवेत कुणाला नै ?

जो बदल घडवायला जातो तो वेडा ठरतो. जो सिस्टीम बदलायचा प्रयत्न करतो त्याला सिस्टीम बाजूला काढून टाकते. 

ना माणसं बदलतात, ना सिस्टीम बदलते.

इंग्रजीत एक म्हण आहे, If you do same things as you did yesterday ...you will get same results as you got yesterday ! अर्थात् ... तुम्ही जर काल जे केलंत तेच आज करत असाल तर तुम्हाला काल जे हाताशी लागलं तेच आज लागेल... याचा अर्थ परिणाम तोच राहील. बदल कधीच घडणार नाही. 

म्हणूनच, बदल घडवायचा असेल तर आधी बदलायला हवं.

आधी स्वतःला आणि त्यासोबतच वर्षानुवर्ष आपण फॉलो करत असलेल्या या देशातील कार्यपद्धतीला ! 

जोवर हे बदलणार नाही तोवर कोणा व्यक्तीला, कोणा नेत्याला दोष देत बसून काही उपयोग नाही. 


आपला देश बदलायचा तर तरूणांना हाताशी घ्यायला हवं. त्यांना त्यांच्यातील ऊर्जा आणि मुख्य म्हणजे कल्पकता, आऊट ऑफ बॉक्स विचार पद्धती वापरून नवं काहीतरी घडवू द्यायला हवं. 

तेच ते आणि तेच ते च्या रटमधून त्यांची सुटका करायला हवी. 

नवे रोजगार निर्माण करायला हवेत. नव्या संधी निर्माण करायला हव्यात. 

देश तेव्हा स्वतंत्र होईल जेव्हा इथल्या तरूणाईला सकारात्मकतेने देशात बदल घडवण्याचं स्वातंत्र्य मिळेल. 

जोवर हा देश बडेबुढे नेता आणि घराघरातील बडेबुढे ज्येष्ठ नागरिक चालवत आहेत तोवर बदल घडणं निव्वळ अशक्य आहे असं मला वाटतं ! 

देशातील तरूणांना नुसतं सैनिकांची आठवण करून देत बसणं पुरेसं नाही, तरूणांना त्यांच्या अंगातील सळसळता उत्साह या देशासाठी वापरू देणं गरजेचं आहे. पण दुर्दैवानं या देशात तरूणांंबरोबर इतकं राजकारण खेळलं जातं की ही मुलं त्या राजकारणाचे बळी ठरतात. नोकरीच्या ठिकाणी क्षुल्लक कारणावरून काढून टाकण्यापासून ते कामावर बॉसच्या तोंडातून सतत लहानसहान कारणावरून मिळणाऱ्या शिव्यांनी हे तरूण निराश होत जातात. 

स्लो पॉयझनिंगसारखं हे सगळं त्यांच्यावर काम करत रहातं. त्यांच्या मनावर घाव घालत रहातं. आपण काहीतरी करून दाखवू या विचाराने प्रेरीत झालेली हीच तरूण मंडळी मग दिवसागणिक हताश होत जातात ... कारण काम मिळत नाही, मिळालेल्या कामात कोणी ना कोणी वरिष्ठ घाणेरडं राजकारण खेळत यांना मानसिक त्रास देत रहातो, घरीदारी अपमान होतो, अतीश्रम वाट्याला येतात. मुलगी असेल तर शरीरसुखाची अपेक्षा, तशा पद्धतीने तिला मानसिक त्रास, शारिरीक त्रास दिला जातो. ती बरेचदा मुक्याने तो सहन करते नाहीतर त्या सिस्टीममधून बाहेर पडते आणि आपल्या कोशात स्वतःला बंद करून घेते.

प्रत्येक इंडस्ट्रीच्या निराळ्या व्यथा आहेत. 

मुद्दा हा आहे की तुम्ही देशातील तरूणांना कधी संधी देणार आहात ? 

त्यांचे उमेदीचे दिवस संपल्यावर मग मिळालेल्या संधीचं ते काय करू शकतील सांगा बरं ? 

हल्ली तर मानसिक त्रासाचेच इतके प्रकार झालेले आहेत की कोणावर विश्वास ठेवणं हीच चूक झालेली आहे. मन मोकळं बोललं म्हणजे लगेच लोकांच्या त्रासाला आमंत्रण असं समीकरण झालेलं आहे.

हा देश ... हा आपला देश असा कसा झाला ? 

जिथे वारं नेहमी प्रेमाचं एकोप्याचं वहायचं तिथे आता फक्त स्पर्धा आणि विखाराचं वारं वाहतंय ...

साधं परजातीत लग्न केलं म्हणून जीव घेतला जातोय ... अरेरे ...

आपली खोलवर असलेली, रूजलेली सुसंस्कृतता, सभ्यता आपण अशी कशी वाऱ्यावर सोडून दिलीये ?

आपली संवेदनशीलता... माणूस म्हणून असलेली प्रगल्भता आपणच उधळून लावलीये.

पूर्वीची माणसं शहाणी होती ... आताची माणसं 'शहाणी' झाली आहेत. 

सीमेवरचा जवान ... ज्याच्याबद्दल स्व.लतादीदींनी गायलंय... कुछ याद उन्हे भी करलो ... जो लौटके घर ना आए ... आणि देशातला तरूण ... त्याचीही एका अर्थाने हीच हालत आहे, पण तो दिशाहीन भटकतोय.. व्यसनांच्या आहारी जातोय.. का, कारण त्याला जो विश्वास हवाय, त्याला ज्या आणि जशा संधी हव्या आहेत त्या देण्यासाठी आपण असमर्थ आहोत.

बदलायलाच हवंय हे चित्र ... आणि आपला देश ...

जय हिंद 

- मोहिनी घारपुरे देशमुख 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Translate

Featured Post

अमलताश