राजा आणि सोनम हे नवदांपत्य लग्नानंतर हनीमूनसाठी शिलॉंगला फिरायला गेले असता राजाचा मृतदेहच पोलिसांच्या हाती लागलाय आणि त्याचा मृत्यू होऊन दोन दिवस उलटून गेल्यानंतर त्याची ओळख मृतदेहावर गोंदवलेल्या राजा या त्याच्या नावामुळे पोलीसांना पटली आहे. त्याची पत्नी सोनम अजूनही सापडलेली नाही. तिचं काय झालं कोणालाच ठाऊक नाहीये. किंबहुना एकंदरीत हे सगळं प्रकरण काय आहे याचा अजून पोलीस तपास करत आहेत. या घटनेच्या निमित्ताने मात्र मला खरंच हा आणखी एक प्रश्न उपस्थित करावासा वाटतोय की हनीमून कपल्सच्या सुरक्षिततेची जबाबदारी नेमकी कोणी घ्यायला हवी ?
नुकतंच कुठे दुर्दैवी वैष्णवी हगवणे या मुलीच्या बाबतीत घडलेल्या घटनेच्या धक्क्यातून आपण सावरत असताना ही दुसरी बातमी येऊन धडकली आहे आणि ती देखील तितकीच अस्वस्थ करणारी आहे.
एम.ए.इन मासकॉम अँड जर्नॅलिझम करताना माझा दुसऱ्या वर्षीचा रिसर्चचा विषय भारतातील लग्नसंस्था आणि कुटुंबव्यवस्था हाच होता. त्यामुळे या दोन्हीही बातम्यांच्या निमित्ताने माझं या अनुषंगाने सतत लक्षं जातंय आणि मन हादरतंय. या विषयाची अभ्यासक म्हणून मला माझे विचार इथे मांडावेसे वाटतात.
आजवर भारतातील लग्नव्यवस्था आणि कुटुंबसंस्था या दोन्हीचंही आपण अगदी अंधानुकरण करत आलेलो आहोत. किंबहुना या दोन्हीही व्यवस्थांनी खरंतर आपली संस्कृती सुसह्य करण्याऐवजी त्यातील रिती प्रथा आणि परंपरांनी अनेकांचा जीवच घेतलाय. अरेंज मॅरेज असो की लव्ह मॅरेज, कोणीही सुखी नाही. शिवाय या दोन मोठ्या संस्कारांना जे इव्हेंटचं स्वरूप आलंय ते तर अगदी ओंगळवाणं आहे. वरवर चमकधमक दाखवताना आतमध्ये इतकी षडयंत्र, इतकी नाट्य घडत असतात जी खरंतर सगळ्यांना दिसतात पण कोणीही कोणाच्याही भानगडीत पडत नाही. वैष्णवी हगवणेचे लग्नाचे रील्स पहाताना अगदी पोटातून तुटायला होत होतं मला आणि कित्येकांना... आठवतंय ना ...?
तर, अलिकडे हनीमूनचंही तितकंच फ्यॅड झालंय. अगदी हिरोहिरोईन असल्यागत विवाहसोहळे रंजक होत चाललेत आणि लग्न झाल्याबरोबर जो नवरा मुलगा हनीमूनसाठी नववधूला दूर कुठेतरी, विशेषतः परदेशात किंवा निसर्गाच्या रम्यतेचा जिथे भरपूर अनुभव घेता येईल आणि एकांत मिळेल अशी ठिकाणं शोधणारा वर हा सर्वोत्कृष्ट अशीच मानसिकता आपल्या समाजाची तयार झालेली आहे. या सगळ्यात आपण एक महत्त्वाची गोष्ट विसरतो ती म्हणजे सुरक्षितता.
हनीमूनला जाणारं कपल हे कुठेही जात असलं तरीही ते त्या भागात नवखे असतात, तिथली भाषा माहीत नसते, कोणतीही अडचण आली तरीही वाचवायला कोणीही येणार नसतं, हे सगळं आपल्या गावीही नसतं. अशीच गत एखाद्या मुलीचं दुसऱ्या शहरात लग्न करून देताना त्या मुलीचीही केलेली असते. ती मुलगी नव्या अनोळखी शहरात, अनोळखी माणसांमध्ये कुठे राहील, तिचं स्वतःचं हक्काचं छप्पर तिला आधी घेऊन देण्याऐवजी बावळटासारखे पैसे लग्नसोहळ्यात आणि रिसेप्शन समारंभात उधळले जातात. गावजेवण घातलं जातं. अरे हेच पैसे आधी त्या नवराबायकोच्या डोक्यावर छप्पर खरेदी करून घेण्यात लावा ना, मग त्यांना घेऊन सगळे सणसमारंभ करत बसा, कोण नको म्हणतंय... पण नाही, आपल्याकडे सगळं उलटंय.
तसंच हनीमून कपलला मुळात हनीमूनसाठी कुठेतरी भयंकर दूर, आडवळणाच्या ठिकाणी का जावसं वाटतं यातलं लॉजिक मला कळलेलंच नाहीये. चार भिंतीत करण्याची गोष्ट... सुखाचा सुरक्षित शरीरसंबंध... मग तो करण्यासाठी जागा, ठिकाण हे परिचित असेल तर जास्त बरं नाही का ? पण नाही, आम्हाला मग आम्ही फिल्ममधल्या हिरोहिरोईनसारखे वाटणार नाही. म्हणून आम्ही मोठमोठाल्ले समारंभ करतो. फिरायला समुद्रकिनारी, धबधब्याखाली, बर्फात लोळायला जातो... अरे ठीक आहे, ज्यांचं सगळं टूर प्लॅन व्यवस्थित आखलेलं आहे, नीट काळजी घेतलीये आणि खिशात खुळखुळ आहे त्यांनी जायलाही माझी हरकत नाही. पण जाताना खरंच ठिकाण निवडताना आधी स्वतःच्या सुरक्षिततेचा विचार प्राधान्याने करा. कोणत्या ठिकाणी जाणार, कुठे रहाणार हे आधी नीट कसून तपासा. चौकशी करा. जिथे रहाणार ती रिसॉर्ट्स सुरक्षित आहेत ना हे तपासा, सगळीकडे उतावळेपणा बरा नाही. तसंच, सतत फिल्मी दुनियेची कॉपी करून आपलं सगळं तसं व्हायला पाहिजे हा देखील विचार फार डेंजर पद्धतीने बळावतोय जो वेळीच आवरायला हवा.
त्या त्या ठिकाणच्या पोलीसांना सुद्धा हनीमून कपलच्या सुरक्षिततेमध्ये आधीच सामील करून घेता येईल. परंतु ते सगळं शासनाकडून व्हायला हवं तर खरं. म्हणजे कोणत्या शहरात, प्रदेशात कोणतं कपल किती ते किती काळ येणार आहे, त्यांची नाव, ते कुठे फिरणार आहेत, कुठे रहाणार आहेत याबाबत स्थानिक पोलिसांना आधीच इन्फॉर्म करून ठेवता येईल अशी काहीतरी ठोस प्रणाली आपल्याकडे लागू करायला पाहिजे आहे.
आता मध्ये लग्नसोहळ्यातले काही रील्स बघायला मिळाले. सगळ्यात ऑलमोस्ट ती नववधू लग्नमंडपातून स्टेजवर जाईपर्यंत, थोडक्यात बोहल्यावर उभी राहीपर्यंत नाच करताना दिसते. नाही, नृत्य कलेबद्दल माझा काहीही आक्षेप नाहीये पण अरे इतकं सगळं हिरोईनसारखं कॉपी करायचं त्याला माझा खरंच आक्षेप आहे.
एका रीलमध्ये तर वधूच्या नाचण्यात मुहूर्त टळून जायला लागला म्हणून ते गुरूजी शेवटी स्टेजवरून खाली आले आणि त्यांनी तिला लवकर बोहोल्यावर चढ अशी खूण केली वैतागून... हे बघताना हसावं की रडावं असं वाटलं.
एकीकडे विधी आणि मुहूर्तही पाहिजे आणि दुसरीकडे चित्रपटातील विवाहसोहळ्याप्रमाणे भडक दिखाऊ थाटमाटही पाहिजे, इकडे पैशांचा अपव्यय होतोय ते वेगळंच, चला एक मात्र चांगली बाजू आहे की यामध्ये भरपूर रोजगार निर्मिती होते. अनेक लोकांना काम मिळतं. पण या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं जीवन ... तुमचं खाजगीपण... तुमची सुरक्षितता, या सर्वात महत्त्वाच्या बाबी तुम्ही स्वतःच पणाला लावताय हे कसं कळत नाही तुम्हाला ?
वधू नाचतानाचे व्हिडीओ विचित्र पद्धतीने सोशल मीडियावर व्हायरल होतात, त्याखाली विचित्र घाणेरड्या कमेंट्सचा पाऊस पडतो, हनिमूनला दूर कुठेतरी जंगलझाडीत गेलेल्या किंवा अनोळखी रेस्तरॉं वगैरेंच्या खोल्यांमध्ये घडणारे विश्वासाने केलेले व्यवहार केव्हाच कुठूनतरी लपलेले कॅमेरे टिपत असतात आणि ते फूटेज यथावकाश प्रचंड व्हायरलही केलं जातं.
इतकंच नाही तर इकडे थाटात लग्न लावून घेणाऱ्या वधू म्हणा किंवा वर म्हणा नंतर हनीमूनच्या निमित्ताने कुटुंबापासून दूर जाऊन प्रियकराच्या मदतीने आपल्या जोडीदाराचाच गळा कापल्याच्या ह्रदयद्रावक घटना कानावर येतात तेव्हा अक्षरशः थरकाप उडतो. ज्याच्या खांद्यावर विश्वासाने मान ठेवली तोच जोडीदार काळ बनून येतो तेव्हा त्या दुसऱ्या निष्पाप जीवाचं काय होत असेल त्या शेवटच्या क्षणी ... विचार करूनही मेंदू सुन्न होतो.
हे विवाहसोहळे आणि हनीमूनसाठी परदेशी फिरायला जाण्याची सक्ती ( जिथे स्वेच्छा आहे तिथे प्रश्न नाही ) पण जिथे समाजाचा दबाव, स्टेटस जपण्यासाठी म्हणून केलेली कृती अशा कॅटेगरीत या बाबी केल्या जात आहेत त्या त्या लोकांनी एक लक्षात घ्यावं की हे सगळं म्हणजे तुमच्या लोभीपणालाच एकप्रकारे खतपाणी घातल्यासारखं आहे. माणसाचं आयुष्य म्हणजे असंय ...हजारो ख्वाहीशे ऐसी की हर ख्वाहीश पे दम निकले... आणि आताच्या काळातील माणसांनी स्वतःच्या लोभीपणापायी या ओळींतला अर्थ ... खऱ्या अर्थाने ... हर ख्वाहीशपे दम निकले असा करून आपलंच आयुष्य पणाला लावून ठेवलं आहे.
सो... विचार करा, आपण कुठे चाललोय आणि आपल्याला नेमकं कुठे जायचंय याचा... प्रत्येकानेच विचार करा...
- मोहिनी घारपुरे देशमुख
#विवाहसंस्था