सोमवार, ११ फेब्रुवारी, २०१९

बेवफा


जुन्या चित्रपटांचं माधुर्य कशात असेल तर ते त्याच्या आशयपूर्ण कथेत असं मी म्हणेन. मुळात कथाच फार छान, आणि मग ती कथा चित्रपटांच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडणारे कलाकार, दिग्दर्शक, संगीतकार, गायक, गायिका आदींचा ताफाही इतकं काही सुंदर काम करून गेलेला दिसतो की हे सौंदर्य चित्रपट क्रुष्णधवल असो वा रंगीत असो, आपण अवाक् होऊन बघतच रहातो. राजकपूर, नर्गिस दत्त आणि अशोक कुमार यांच्या अभिनयाने सजलेला चित्रपट हा अशा सुंदर चित्रपटांपैकीच एक...

1952 साली रूपेरी पडद्यावर आलेला हा चित्रपट जेव्हा मी पाहिला तेव्हा खरोखरच एका पहाण्यात समाधानच झालं नाही. एका दिवसाच्या अंतराने तब्बल दोन वेळा मी हा चित्रपट पाहिला याचं कारण इतकी साधी कथा, पण अर्थपूर्ण संवाद आणि आपल्याला जगणं शिकवणारा हा चित्रपट.. यातली गाणी, लता दिदी, गीता दत्त, शमशाद बेगम आणि तलत मेहमूद यांनी गायलेली .. जी कानाला जितकी गोड, श्रवणीय लागतात तितकीच ती थेट मनाला भिडतात. 
रूपा (नर्गिस ) एका चाळीत रहात असते. तिचा व्यसनी काका तिला पैसे कमावून आणण्यासाठी आणि त्यावर आपली व्यसनांची गरज भागवण्यासाठी अपरिमित छळत असतो. जवळपास रोजच बिचारी त्याचा मार खात असते. राज (राज कपूर) तिचा शेजारी पण तो काहीसा आवाराच. रूपाच्या स्थितीवर दया दाखवून तिला कधीमधी पैशाची मदत करत असतो आणि बदल्यात तिच्याशी थोडंफार फ्लर्ट करून वेळ घालवत असतो. तिला बिचारीला, भाबडीला तेही कळत नसतं पण ती अंतर ठेऊन रहात असते. एकदा तो तिला पैसे देतो आणि बदल्यात कधीमधी माझी खोली साफ करून देशील असं सांगतो आणि ती खरच दुसऱ्या दिवशी त्याची खोली साफ करायला जाते. तो तिला थांबवतो आणि आपल्या बोलण्यात रमवतो .. वेळ घालवतो इतकंच .. बुडत्याला काठीचा आधार तसं तिला बिचारीला तो राज कसाही असला तरीही त्याचा आधारच वाटत असतो. 
असेच दिवस चाललेले असतात पण देवाला काही रूपाची दया येत नसते.
आणि अशातच एकदा  व्यसनी काकाचं टाळकं सरकतं आणि तो रूपाला घराबाहेर हाकलून देतो. बिचारी रूपा, आता पुढे फक्त अंधारच .. कच खाते नि जीव द्यायला समुद्रावर जाते खरी पण का कोण जाणे तिची पावलं अडतात .. तिला मागे परत घेऊन जातात. ती तिथून निघते आणि एका दिव्याखाली बसते. प्रचंड थकलेली असल्याने तिला काही क्षणातच तिथेच त्याच अवस्थेत झोप लागते. 
जेव्हा तिला जाग येते तेव्हा अशोक ( अशोक कुमार ) तिचं चित्र काढत असतो. ती चमकते, त्याला जाब विचारते .. तो सांगतो, अगं मी एक चित्रकार आहे, आजवर खूप चित्र काढलीत पण हे तुझं चित्र म्हणजे माझी आजवरची सर्वोत्कृष्ट कलाकृती ठरेल बघ .. तो तिची चौकशी करतो आणि  तिची कथा ऐकून तो तिला आपल्या बरोबर चल, मॉडेल म्हणून काम कर असं सांगतो आणि त्याचा व्यवस्थित आर्थिक मोबदलाही देण्याचं कबूल करतो. तिला त्याच्यासोबत पुढे जाण्यावाचून काही मार्ग नसतो. ती जाते .. तो तिची एक से एक चित्र काढतो आणि खरोखरीच अल्पावधीतच त्याच आणि तिचं नशीब उजळतं.. ती दोघंही यशोशिखरावर पोहोचतात. प्रचंड श्रीमंत होतात. नावलौकीक मिळवतात. तिला कधी वाटलंही नसेल एवढ्या उंचीवर ती जाऊन पोहोचते. अशोक आणि तिच्यात एक चांगलं नातं निर्माण होत असतं, एव्हाना अशोक तिच्या प्रेमात पडलेला असतो आणि तिला लग्न करण्याविषयी एकदा आडून विचारतोही पण ती .. ती तिच्याच दुनियेत मश्गूल असते. 
कसा कोण जाणे, तिचा माग काढत त्याच दरम्यान राजही येतो.. राज, ज्याने एकेकाळी तिला मदत केलेली असते.. तिला ज्याच्या नुसत्या असण्यानेही एकेकाळी मानसिक आधार मिळालेला असतो .. तोच राज ..
तिला अचानक राज भेटायला आल्याने कोण आनंद होतो. ती त्याची अन् अशोकची भेट घालून देते. वयाने मोठा असलेला अशोक अवघ्या काही मिनीटातच राजची पारख करतो. त्याचे कपटी हेतू ओळखतो पण रूपा, तिला ते कसे कळणार .. हळूहळू राज तिला भेटायला वरचेवर येऊ लागतो , तिच्याशी प्रेमाचं नाटक करायला लागतो. त्याने आपलं रहाणीमानही एव्हाना पूर्ण बदलून टाकलेलं असतं. आपण व्यवसाय करतो असं तिला भासवलेलं असतं. आणि ती एखाद्या कोकरासारखी त्याच्या जाळ्यात अडकत जाते. अशोक तिला वेळोवेळी समजावतो. थांबवतो. ज्या कष्टाने तू यश मिळवलं आहेस, ज्या उंचीवर गेली आहेस तिथून एका छोट्याशा चुकीमुळेही तू खोल दरीत फेकली जाशील .. हे वारंवार सांगून सावध करत असतो. राजला तुझ्यावर नव्हे तर तुझ्या संपत्तीवर प्रेम आहे, त्याचा डोळा तुझ्या पैशांवर आहे असं सांगूनही ती आता ऐकण्याच्या मनस्थितीत नसते. तिला वाटतं, अशोकलाच आपण पुढे जाऊ नये, जन्मभर त्याची मॉडेल बनून रहावं असं वाटतंय म्हणूनच तो अडवतोय .. आणि एक दिवस अद्वातद्वा बोलून ती आपल्या जडजवाहिरासकट घरातून जाते.. 
आदल्याच दिवशी तिनं डोळ्यात पाणी आणून राजला विचारून घेतलेलं असतंं, राज मी अशोकने मला दिलेली सगळी संपत्ती त्याला परत करून जर तुझ्याबरोबर आले तरीही तू मला नेशील ना तुझ्या बरोबर .. करशील ना मला आपलीशी ... आणि राज , जणू एक सावज हेरण्यासाठी आलेला लांडगाच, तो सज्जनतेच्या बुरख्याखाली आपलं कपट झाकून तिला ठामपणे रूकार भरतो .. हो, मी तुझा तरीही स्वीकारच करेन गं  असं म्हणतो. अन् दुसऱ्याच दिवशी घरातून निघून रात्रीच्या विशिष्ट वेळी पूर्वनियोजित ठिकाणी भेटण्याचं ती दोघं ठरवतात.. आणि म्हणूनच आज ती घरातून तिच्या दागदागिन्यासकट निघते .. अशोक थांबवतो, अजूनही वेळ गेलेली नाही म्हणत तिला अडवतो .. पण ती प्रेमात वेडी झालेली मुलगी .. ती चक्क कोणालाही न जुमानता, आपल्या वाटेचे दागिने वगैरे महागाच्या वस्तू, पैसे घेऊन घरातून उर्मटपणे उत्तरं देत निघून जाते.
ठरलेल्या ठिकाणी पोचते आणि वाट पहाते .. थोडा वेळ जातो .. आणखी वेळ जातो .. आणि वेळच जातो फक्त पण राज .. तो येतच नाही.. 
हाय रे कर्मा .. तिच्या पायाखालची जमीन हादरते. काळोख्या पावसाळी रात्री ती एकटी आणि तिचा प्रियकर येतच नाही.. 
जड अंतःकरणाने ती माघारी फिरते.. अशोकच्या घराचं दार तिच्यासाठी उघडच असतं .. ती परत येते आणि सुन्न बसून रहाते. 
इकडे राजला त्याचे वाईट मित्र पैशांसाठी धोशा लावून असतात, ते भेटतात अन् त्याला सांगतात, तू जायला हवं होतं रे .. ती आज तिच्या सगळ्या पैशांसकट तुझ्याकडे आली होती .. तू मूर्खपणा केलास आणि दोन्हीही गमावलंस .. त्याला उकसवतात.. अजूनही वेळ गेलेली नाही, आता पुन्हा काहीतरी बहाणा करून तिच्याकडे जा.. बघ ती तुझ्यावर विश्वास ठेवेल पुन्हा.. आणि याखेपेला तिचा जीव घे आणि सगळं हडप कर आमचे पैसे आम्हाला परत कर..
दोन दिवस जातात. इकडे अशोक आणि रूपा दोन दिवस सुन्न बसून असतात .. उपाशी , विचारमग्न .. आणि तो आता परत येणार नाही असं रूपाला वाटत असतानाच राज पुन्हा येतो .. तिला भूलथापा देऊन पुन्हा आपलीशी करतो आणि पुन्हा आपल्यासोबत चल असा आग्रह करतो. ती भुलते खरी, पण यावेळेला ती सावधही असते. कदाचित तिला आता खरंखोटं करून पहायचंच असतं. आपल्या मनाच्या खात्रीसाठी म्हणून का होईना, ती त्याच्याबरोबर निघते. आपल्या सामानात सगळे पैसे, दागदागिने आहेत, नीट लक्ष ठेव असं खोटंच त्याला सांगते.  ती दोघं एका हॉटेलात वेगवेगळ्या खोलींमध्ये मुक्काम करतात .. तो सज्जन आहे हे त्याला तिला भासवायचं असतं ना .. त्याचे मित्रही त्या दोघांवर लक्ष ठेऊन असतात, ते त्याला लवकर काम आटप म्हणून धोशा लावतात. 
आणि रात्री तो तिच्या खोलीतून तिची बॅग लंपास करतो, ती झोपेचं नाटक करत असते. तो पळतो, कुणीतरी चोर चोर अशी आरोळी ठोकतो .. आता पोलीस त्याचा पाठलाग करतात .. गोळी झाडली जाते आणि तो मरतो .. बॅग उघडी पडते तशी त्याचे ते टोळभैरव येतात आणि हात चोळत तेथून पोबारा करतात.. तिच्यासमोर आता सगळं चित्र साफ झालेलं असतं. शेवटी तिला कोणीतरी विचारतं, तू त्याला ओळखतेस का .. तेव्हा ती निग्रहानं नकार देते आणि तिथून निघून थेट अशोकचं घर गाठते. 
अशोक एका कॅनव्हास समोर बसलेला असतो. ती येते आणि घडाघडा बोलते, त्याची माफी मागते.. आपण चुकलो हे कबूल करते .. पण अशोक ढिम्म असतो.. शेवटी ती जाते आणि त्याला हात लावून हलवणार तोच अशोक मान टाकतो .. ती किंचाळते .. ढसाढसा रडते.. कॅनव्हास उघडून पहाते तो त्याने त्याच्या मरणाचंच आज चित्र रेखाटलेलं असतं... आता तिच्या दुःखाला पारावार रहात नाही... ती घरभर फिरते .. तिचं मन तिला खायला लागतं. आता घरात वेगवेगळ्या पोझमधली भिंतीवर लटकणारी चित्र जिवंत होतात.. अन् तिचीच चित्र तिला खूनी , पापी, डायन, नीच, बेवफा म्हणायला लागतात .. तू अशोकला मारून टाकलंस, तू मरून का नाही जात असं म्हणू लागतात.. ती बिथरते, आतून तुटते कारण आता तिचंच मन तिला खात असतं ना .. अंगावर येणारी चित्र, मृतावस्थेतला अशोक पाहून अखेरीस ती कोसळते आणि प्राण सोडते ..
चित्रपट संपतो..
आणि आपल्या पुढ्यात आयुष्याचं गांभीर्य ठेऊन जातो. विशेषतः भावनेच्या भरात होणाऱ्या चुका आणि त्यामुळे भरकटलेली आयुष्य पुढे कशी रसातळासा जातात याची कथा सांगणारा हा चित्रपट पहाताना आपण व्याकूळ होऊन जातो. माणसाचं पाऊल कायम पुढे पडत असतं, आणि काळही कायम पुढेच जात असतो, एकदा टाकलेलं पाऊल पुन्हा मागे घेतलं तरी ते पुन्हा त्याच मागच्या मुक्कामाला आपल्याला नेईलच असं काही नाही .. म्हणूनच माणसाने प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकलं पाहिजे आणि भावनेच्या भरात कोणताही निर्णय कधीही घेऊच नये हाच काय तो बोध या चित्रपटातून घ्यायला हवा इतकंच मी सांगेन ..

- मोहिनी घारपुरे - देशमुख 



(Photo credit - youtube)

मंगळवार, ५ फेब्रुवारी, २०१९

कॅलेंडर गर्ल्स

2014 साली दिग्दर्शक मधुर भांडारकर यांचा कॅलेंडर गर्ल्स हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यापूर्वी पेज थ्री आणि हिरॉईन हे दोन्हीही वेगळ्या धाटणीचे चित्रपट म्हणून लोकप्रिय झाले होते. साधारणतः त्याच थीमवर पण वेगळा विषय घेऊन आलेला कॅलेंडर गर्ल्स हा त्यांचा चित्रपट आज पाहिला आणि मन विषण्ण झाले. ग्लॅमर जगतात सौंदर्य आहेच पण या जगाची काळी बाजूही आहे. ही दुसरी बाजू या चित्रपटांच्या माध्यमातून मधुर भांडारकर रेखाटतात.. आणि तेच वास्तवही आहे. एकदा का चकचकीत काचेच्या आतल्या झळाळत्या मोहमायी दुनियेत तुमचा प्रवेश झाला की तुम्हाला परतीचे मार्ग फार अपवादानेच उघडतात. त्यामुळेच इथे येण्यापूर्वीच पुढे काय हा विचार करून मगच आलं पाहिजे हे नक्की ..

कॅलेंडरवर वेगवेगळ्या, चित्रविचित्र वेशभूषेत झळकणाऱ्या मुलींबद्दल सामान्य वर्गाला मोठं आकर्षण असतं. सामान्यातल्याच काही नशीबवान मुली एवढ्या उंचावर जाऊ शकतात हा एक दृढ समज. या मुली कोण, कुठून येतात, कुठे जातात याबद्दल फारशी चर्चा होत नाही. केवळ भिंतीवर एक नवीन कॅलेंडर दरवर्षी सजतं आणि त्यातले चेहरे वर्षागणिक बदललेले असतात. या चेहऱ्यामागच्या व्यक्तिंना केवळ तेवढ्यापुरतीच लोकप्रियता, प्रसिद्धी मिळते आणि नंतर एखाद्या तुटलेल्या ताऱ्याप्रमाणे हे चेहरे कुठेतरी अंधारात गुडूप होऊन जातात. ते लोकांना कधीच दिसत नाहीत.. आणि दिसतात तेव्हाही ते पुन्हा त्यांच्या झळाळीसह असतीलच याची काहीच शाश्वती देता येत नाही.. 
कॅलेंडर गर्ल्स ही कथा आहे अशाच पाच मॉडेल्सची. या पाचही मुलींचा तोवर आपसात काहीच संबंध नसतो. एका मोठ्या ब्रँडच्या कॅलेंडरसाठी त्यांची निवड होते. महाराष्ट्र, कोलकाता, हैदराबाद, पाकिस्तान आणि गोवा अशा पाच ठिकाणाहून या मुली मुंबईत येतात. प्रत्येकीचं साध्य एकच, पण दिशा .. ती मात्र वेगवेगळी. आपल्या नात्यांवर ताण देऊन कुणी या असाईनमेंटसाठी येतात आणि कुणी घरच्यांचं उत्तम पाठबळ घेऊन येतात.. असाईनमेंट होते, कॅलेंडर झळकतं.. भरपूर प्रसिद्धी, पैसा या मुलींना मिळतो आणि पुढे .. पुढचे मार्ग प्रत्येकीच्या आयुष्याची रेष वेड्यावाकड्या वळणांनी घेऊन पुढे जात रहाते .. 
आपली हुशारी आणि कधी, कुठे, काय बोलायचं, स्वतःला प्रेझेंट कसं करायचं हे चोख कळलेली मयुरीला या क्षेत्रात येण्यासाठी घरच्यांचा पाठींबा. त्याबळावरच ती येते आणि नंतर तिचा पीए तिवारी (अतुल परचुरे) याच्या साथीने हळूहळू बॉलीवूडमधली अभिनेत्री म्हणून प्रवास करते.
कोलकत्याची पारोमा हट्टाला पेटते .. घरच्यांचा विरोध असतो. गेलीस तर पुन्हा परतून येऊ नकोस असं सांगणाऱ्या वडीलांना आणि भावाला पारोमा म्हणते, मी मुंबईत जाईन.. पुन्हा परतून येणार नाहीच पण तुम्हाला मात्र घेऊन जाईन .. आणि तुम्हाला त्यादिवशी माझा अभिमान वाटेल.
हैद्राबादची नंदिता एका उच्चशिक्षित कुटुंबातली मुलगी.. आईवडील उच्चपदाधिकारी, बहीणही एकदम करिअरिस्ट .. अशा पार्श्वभूमीवर नंदिताला जेव्हा भारतातल्या टॉप, हॉटेस्ट कॅलेंडरची मॉडेल म्हणून निवडलं जातं तेव्हा आनंदीआनंदच असतो.
नाझनीन आपल्या बॉयफ्रेंडच्या साथीने लाहोरहून लंडनला येते पण ही टॉप मॉडेल बनण्याची संधी मिळाल्यावर तिला ती घ्यावीशी वाटतेच.. बॉयफ्रेंडचा कडाडून विरोध असतो पण तरीही त्याला न जुमानता ती पुढचं पाऊल टाकते आणि मुंबईत येते.
शॅरेन गोव्याची असते.. तिची जेव्हा निवड होते तेव्हा तिला स्वतःवर विश्वास असतो. या इंडस्ट्रीत काहीही चालू दे पण कदाचित तिला माहिती असतं की तिला कुठवर जायचंय त्यामुळे त्या विश्वासावर ती मुंबईत येते. 

अशा या पाच जणी.. मुंबई शहरात येतात काय .. कॅलेंडरवर झळकतात काय आणि रातोरात प्रसिद्ध होतात काय  .. त्यांचा स्वतःचाच विश्वास बसत नसतो त्यांच्या नशीबावर .. पुढे दोन तीन महिने या यशाच्या आनंदात जातात आणि आता .. आता खरे कसोटीचे क्षण त्यांच्यासमोर येणार असतात. कारण, आता त्या एकेकट्या असतात, स्वतंत्रपणे जगणार असतात आणि त्यांच्याभोवतीचं वलय त्यांना आयुष्याची बरीवाईट वळणं दाखवणार असतं.
पारोमा कुठे कुठे प्रमुख अतिथी म्हणून मिरवत असतानाच तिचा जुना बॉयफ्रेंड तिला गाठतो.. प्रेम तर असतंच त्यांच्यात कधीतरी पूर्वीच त्यामुळे हाच धागा पकडून ती त्याच्या हातात आपला हात देते..
नंदिताची ओळख एका धनाढ्य कुटुंबातील एकुलत्या एका मुलाशी होते आणि ती मॉडेलिंग करियर सोडून त्याच्याशी विवाहबद्ध होते.
मयुरी अनेक खटपटी लटपटी करत बॉलीवूडपर्यंत पोहोचते.. पैसे कमावत जाते.
शॅरेनची ओळख आणि मैत्री एका माणसाशी होते तो तिच्याकडे तिचं पिआरचं काम मिळवायला येतो, तीही त्याला काम देते, मग जरा बरी ओळख, मैत्री होते म्हणून त्याच्यासोबत फिरायला जाते आणि तो तिच्या नुसत्या सहवासाच्याच रंगेल अफवा बनवून इकडेतिकडे पसरवतो.. इंडस्ट्रीत तिची बदनामी करतो. एका पार्टीत तिला जेव्हा एक फाल्तू मुलगा काहीबाही बोलतो तेव्हा हा सगळा प्रकार तिला कळतो आणि ती त्या पीआरला त्याच्या ऑफीसात जाऊन कानशिलात भडकावते.. आणि या प्रकारानंतर मॉडेलिंगची दारं तिच्यासाठी बंद होऊन जातात.
नाझनीनला एक ब़ड्या बॅनरची फिल्म मिळते खरी पण त्याचदरम्यान भारतात एकदम पाकिस्तानी कलाकारांना काम देऊ नका म्हणून गदारोळ माजतो.. नाजनीनची संधी हुकते आणि भारतात जगणंही तिच्यासाठी फार कठीण होऊन बसतं. थोडे दिवस ती शेरॉन बरोबर रूम शेअर करते पण नंतर पैशाची चणचण भासू लागते. 
आता पुढे कसं म्हणून काळजीत पडलेल्या नाझनीनला एक बाई हेरते आणि मॉडेल म्हणून ओळख मिळवू इच्छिणाऱ्या नाझनीनला पुढे एस्कॉर्ट म्हणून जगावं लागतं ..
नंदीतालाही एव्हाना तिच्या नवऱ्यावर संशय आलेलाच असतो. ती त्याच्यासोबत मुद्दामच मुंबईला जाण्याचा आग्रह करते .. तो तिला आढेवेढे न घेता नेतोही आणि तिच्या नकळत आपल्या रूमवर एस्कॉर्टला बोलावतो .. ती अन्य कुणी नसून, नाझनीनच असते.. नाझनीन त्याला पाहून घाबरते पण तो तिला सोडणार थोडीस असतो.. नाझनीन त्या दिवशी हतबल होते. नंदीता तिलाच त्याच हॉटेलमध्ये भेटायला आलेली असते आणि भेटतेही, तेव्हा ती तिच्या नवऱ्याबद्दलचा संशय नंदिताजवळ व्यक्त करते .. इतक्यात तोही येतो.. आता नंदिताला खूप अनकंफर्टेबल होतं आणि स्वतःच्या चुकाही दिसायला लागतात.. ती तिथून कारण सांगून पळ काढते आणि त्या बाईला भेटून आता यापुढे आपण हे काम करणार नाही असं सांगते.. ती बाई एकदा, अखेरचंच तू हे कर असं म्हणून नंदिताला भऱीस घालते. ती तयार होते .. शेवटची वेळ म्हणून .. आणि ही शेवटची वेळ तिची काळरात्रच ठरते. हा सगळा प्रसंग खरंच पहाण्यासारखा आहे ..
इकडे पारोमाचीही तिच्या बॉयफ्रेंडने वाट लावलेली असते. इमोशनल पारोमाला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचा बॉयफ्रेंड क्रिकेटच्या मॅच फिक्सिंगसाठी पारोमाचा वापर करतो. तीही त्याच्या बोलण्याला भुलते आणि शेवटी जेव्हा पोलीस पकडायला येतात तोवर तो पैशांसकट फरार झालेला असतो. पारोमा पकडली जाते आणि तिला अटक होते. यावेळी तिची जमानत करायला का होईना तिचा भाऊ आणि वडील येतात पण कुटुंबाची इज्जत गेली म्हणून तिला सोबत न घेताच ते तिला एकटं सोडून निघून जातात. पारोमा एकटी पडते .. कायमचीच.
शॅरेनला दरम्यानच्या काळात एका टीव्ही वाहिनीची एँकर म्हणून संधी मिळते आणि तीही त्या संधीचं सोनं करते. त्या वाहिनीच्या प्रमुखाशी नंतर लग्न करून सेटल होते.
मयुरीला मधुर भांडारकरच्या सिनेमात कास्ट केलं जातं.
अशा या पाच जणी नंतर नाझनीनच्या अंत्यदर्शनालाच एकदम एकत्र भेटतात .. तोवर या चांदण्यांचा झगमगाट मावळून गेलेला असतो. वास्तवाचा चटका त्यांना चांगलाच बसलेला असतो.. 
या वळणावर चित्रपट संपतो आणि शेवटाकडे जाता जाता भिंतीवरच टांगलेलं हे जुनं कॅलेंडर बदलून एक नवं कॅलेंडर कोणीतरी चढवत असतो.. आणि आता नवे चेहरे या कॅलेंडरवर झळकत असतात.. 
असा हा चित्रपट आपल्याला फारच हळवं करून जातो.. एका क्षणात आपले पाय जमिनीवर आणून ठेवतो. माणसाला शेवटी नशीबाच्या पुढे जाता येत नाही हेच खरं ं.. आणि कदाचित, आपल्याला कुठवर धावायचंय आणि काय गमावून काय मिळवणार आहोत हे हिशेब माणसाने पुढचं पाऊल टाकण्याआधीच करून ठेवायला हवेत हेच कदाचित चित्रपट सांगून जातो. 
चकाकतं ते सोनं असतंच असं नाही हे देखील या मोहमायी दुनियेत येणाऱ्या प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे अन्यथा कोणाची नौका त्याला कुठे भरकटवेल हे सांगू शकतच नाही, कोणीच हेच खरं ..
सर्वार्थाने चपखल असा हा चित्रपट म्हणूनच माझ्यासारख्या, एकेकाळी मॉडेलिंगच्या जगताची दारं ठोठवणाऱ्या आणि इथला खोटारडेपणा अनुभवल्यानंतर वेळीच पाठीमागे फिरलेल्या , एका संवेदनशील लेखिकेला आवडला नाही तरच नवल .. नाही का .. ?
कदाचित तुमच्यापैकीही काहीजणांना तो आवडू शकेल असं मला वाटतं.
थांबते ..!

-  मोहिनी घारपुरे - देशमुख 

(photo credit - www.imdb.com)

शुक्रवार, १ फेब्रुवारी, २०१९

मौसम

कथानक मजबूत असेल तर केवळ दोन तीन मुख्य पात्रांच्या आधारेही सिनेमा किती उंची गाठू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे 1975 साली प्रदर्शित झालेला मौसम हा चित्रपट .. 
आयुष्याची उमज नेमकी कळलेले दिग्दर्शक गुलझार यांच्या कथेतून आणि दिग्दर्शनातून बनलेला हा चित्रपट आपल्याला रडवल्याशिवाय रहात नाही. वाईटातून नेहमी चांगलं होतं हा विश्वास आपल्या मनात जागं करणारा हा चित्रपट म्हणूनच मनोरंजनाबरोबरच आयुष्याची अनिश्चितता आणि वास्तवता दोन्हीही आपल्याला शिकवून जातो. 
माणूस ठरवतो एक नि होतं दुसरंच .. किंबहुना ज्याचं त्याचं प्राक्तन ज्याला त्याला आपापल्या मार्गाने पुढे नेत असतं आणि एकाचं नशीब दुसरा बदलू शकत नाही तसंच जे घडायचं असतं तेच घडतं अशा आजवर ऐकलेल्या अनेक गोष्टी शब्दशः खऱ्या असाव्यात असं चित्रपटाच्या शेवटी आपल्याला वाटून जातं. 
तर कथा अशी की, दार्जिलिंगमध्ये आपल्या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या अखेरच्या वर्षाची तयारी करणारा विद्यार्थी अमरनाथ गिल (संजीव कपूर), एकदा घरी परतताना धडपडतो आणि त्याचवेळी तेथून जात असलेल्या चंदाच्या (शर्मिला टागोर) नजरेस पडतो. तिचे वडील गावातले वैद्य त्यामुळे ती त्याला उपचारासाठी घरी यायला सांगते. पाय चांगलाच मुरगळला असल्याने तो घरी जातो .. उपचार घेऊ लागतो आणि दरम्यान दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडतात. काही महिन्यानंतर अमरनाथला शहरात परीक्षेकरता परतावे लागणार असते तेव्हा तो चंदाच्या वडीलांना आपल्या आणि चंदाच्या प्रेमाबद्दल सांगतो आणि परीक्षेनंतर परत येऊन तिच्याशी लग्न करून तिला घेऊन जाईन असं आश्वासन देतो. वैद्यबुवाही संमती दर्शवतात. अमरनाथ जातो .. आणि हाय रे कर्मा .. तो पुन्हा कधीच परतून येत नाही. अक्षरशः पंचवीस एक वर्षानंतर तो दार्जिलिंगला परततो तोवर त्याचं तारूण्य ओसरून गेलेलं असतं. सहज म्हणून तो तिथल्या गावकऱ्यांपैकी कोणाकोणाकडे चंदाची आणि वैद्यबुवांची चौकशी करतो आणि जे काही समोर येतं ते फार फार ह्रदयद्रावक असतं. त्याला कळतं, वैद्यबुवा तर केव्हाच वारले. त्यांची मुलगी चंदा कोणा डॉक्टरची वाट पहात होती बरीच वर्ष .. तो येईल आणि मला नेईल पण तो कधी आलाच नाही. दरम्यान तिचं लग्न वैद्यबुवांनी गावातल्याच एका लंगड्या, बिजवराशी करून दिलं. तोही फार काही जगला नाही. हिला मात्र दिवस राहिले आणि मुलगी झाली. पण चंदाला केव्हाचच वेड लागलं होतं.. ती सतत मुलीला डॉक्टर बनवायची स्वप्न पहायची आणि तिच्या डॉक्टर प्रियकराची वाट पहायची. नंतर तिची मुलगी डॉक्टर होण्यासाठी शहरात गेली तेव्हा म्हातारी चंदा एका माळी काकाजवळ रहायची .. मुलीने थोडे दिवस पैसे पाठवले आणि चंदा गेल्यावर ते बंद झाले.. तेव्हापासून कोणीही त्या मुलीचा शोध घेतला नाही आणि ती कुठेय, तिचा ठिकाणाही कोणालाच माहीत नाही...
हे सगळं ऐकून अमरनाथ, जो आता उतारवयाकडे झुकलेला असतो त्याचं ह्रदय पिळवटून निघतं. कारण त्याला वाटलेलं असतं, की आपण परतलो नाही तरी चंदाचं आयुष्यात काहीतरी चांगलंच झालेलं असेल .. माणूस कधीच एवढ्या टोकाचं वाईट चिंतत नाही किंबहुना काळावर विश्वास ठेऊनच आयुष्य जगायचं असतं हेच खरं.. त्यामुळेच अमरनाथला जेव्हा ही शोकांतिका कळते तेव्हा त्याचं मन त्याला खायला लागतं. तो शोध घेऊ लागतो, त्या सगळ्या जुन्या खाणाखुणांचा .. त्या खुणांनी तो चंदाचं आयुष्य तर उलगडत जातोच पण आता त्याला मागे हटायचं नसतं .. किमान जे त्याच्या हातात उरलेलं असतं त्याप्रती तरी त्याला जबाबदारी पेलायची असते.. अर्थात, चंदाची मुलगी कजली .. तो तिचा शोध घेऊ लागतो. त्याला कुणीतरी सांगत की ती डॉक्टर झालीये आणि शहरातून पैसे पाठवायची चंदासाठी .. तेव्हा त्याला काहीसं हायसं वाटतं खरं .. पण छे .. खरं आयुष्य एवढं सोपं कोणासाठीच नसतं हेच खरं.. आणि कजली सारख्या मुलीसाठी .. जिचा वडील म्हातारा, लंगडा आणि हिच्या लहानपणीच जो मेला .. जिची आई आयुष्याचे चटके खाता खाता वेडीच झालेली .. तिच्या पाठीशी कोण उभं रहाणार .. कोण तिला डॉक्टर बिक्टर बनवणार नाही का .. अशा दुर्दैवी मुलींना आपल्या समाजातल्या लांडग्यांनी खाल्ल नाही तरच नवल ..
अगदी तशीच करूण कहाणी या कजलीची झालेली असते. अचानक एका वेश्याग्रृहातून समोर आलेली मुलगी जी हुबहू चंदासारखी .. तिच्यावर अमरनाथची योगायोगाने नजर पडते आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकते. आता तो तिचं जीवन सुधरवण्यासाठी प्रयत्न करतो.. सारखा तिच्यासाठी तेथे येणारा हा म्हातारा माणूस कोणी तसला असेल असं वाटून ती त्याच्याशी बोलते आणि बेटी बिटी म्हणायला लागल्यावर सुरूवातीला चक्क त्याला तेथून हाकलून देते. पण तो माघार घेत नाही.. शेवटी एकदिवस तो तिला वाट्टेल तितके पैसे देतो पण मी म्हणेन तेवढे दिवस माझ्यासोबत माझ्याघरी रहायला चल म्हणतो आणि तिला तिथून काढतो. घरी एका बाईला घेऊन आलेलं पाहून नोकरचाकर ओळखीचे पाळखीचे यांच्या नजरा बदलतात.. पण तो .. त्याला तिचं जीवन सुधारायचं असतं .. ती जणू त्याचीच मुलगी असते .. त्याची जबाबदारी असते ना .. तो तिला घरी नेतो आणि तिचं रहाणीमान वागणं बदलवतो. ओघातच तिची करूण कहाणीही जाणून घेतो. हा गृहस्थ म्हणजे आपलं एक सोफेस्टीकेटेड गिऱ्हाईक असच तिला वाटत असतं .. त्यामुळे तिचं वागणंही थोडंफार तसंलच असतं. पण हळूहळू गोष्ट पुढे सरकते. ती तिची कथा ऐकवते. आई वेडी झाली तेव्हा वडीलांचा एक भाऊ सतत यायचा, त्याची माझ्यावर वाईट नजर होतीच आणि एक दिवस त्यानं डाव साधला. मला नासवून नंतर त्याने इथे आणून बसवली .. आणि मग हेच माझं जीवन झालं .. तिचे ते शब्द ऐकताना अमरनाथला स्वतःबद्दल, आयुष्याबद्दल फार फार चीड येते. आपण तेव्हा या मुलीची काळजी घ्यायला का नव्हतो हा प्रश्न त्याला टोचतो.. तिचं कोणा कुंदनवर प्रेम होतं हे जेव्हा ती सांगते तेव्हा पुन्हा अमरनाथच्या आशा पल्लवीत होतात. कदाचित, जशी चंदा, आपली प्रेयसी, हिची आई जशी आपल्या वाटेकडे तब्बल वीस वर्ष डोळे लावून राहिली होती तसाच जर  तोही  हिच्यासाठी आजही थांबला असेल तर आपण आपल्या हातानी या पोरीचं त्याच्याशी लग्न लावून देऊ अशा विचाराने तो एकदा तिला त्याच्या घरी नेतो, तिलाही थोडीशी आशा वाटू लागलेली असते .. पण इथेही नशीब काही वेगळंच दान टाकतं कारण ती कुंदनची चौकशी करते आणि त्याच्या घरातली तिला उत्तर देणारी स्त्री म्हणजे दुसरी कुणी नसून त्याची बायकोच असल्याचं कळतं आणि हे दोघेही पुन्हा एकदा निराश होऊन माघारी येतात. अर्थात तोवर कजलीला हा अमरनाथच आपल्या आईचा प्रियकर आहे हे माहीत नसतंच. 
अमरनाथही एवढी वर्ष अविवाहीतच राहिलेला असतो. त्याला चंदाशीच लग्न करायचं असतं. पण परीक्षेनंतर पुढे तो सर्जन म्हणून काम सुरू करतो तेव्हा त्याच्या हातून शस्त्रक्रीयेदरम्यान एका रूग्णाचा मृत्यू होतो आणि त्याला पुढे तीन वर्ष तुरूंगवास होतो. त्यामुळेच तो चंदाशी काहीच संपर्क करू शकत नाही. शिवाय कैदेतून परत सुटल्यावर त्याला वाटतं, की आता आपण चंदाच्या लायक नाही आणि या मधल्या काळात तर तिचं लग्नही झालं असेल असं वाटून तो पुन्हा कधीच माघारी फिरत नाही. अमरनाथ आपली कथा कजलीला सांगतो पण ती मुलगी म्हणजेच तुझी आई ही ओळख देण्याचं टाळतो.. कारण कजलीने तोवर तिच्या मनात त्या डॉक्टरविषयी किती राग आहे ते सांगितलेलं असतं.
शेवटी अशी मुलगी आपल्या साहेबांबरोबर कशाला रहातेय यावरून एक दिवस घरातला एक नोकर तिला साहेबांच्या परोक्ष जाब विचारतो आणि तिलाही मनातून वाटू लागतं की खरंच आपण या भल्या गिऱ्हाईकाला ज्याने आपल्याला अद्याप स्पर्शही केला नाही त्याच्या चांगुलपणाची कदर ठेऊन आता त्याच्या आयुष्यातून परत गेलं पाहिजे. दरम्यान हा अमरनाथ त्या वेश्यागृहाची मालकीण असलेली बाई (दीना पाठक) हिच्याकडे जाऊन कजलीला परत इथे न आणण्याची किंमत म्हणजे ब्लँक चेक देऊन येतो. पण इकडे कजली पुन्हा जुन्या अवतारात याच्या घरात फिरत असते.. शिवाय त्याच्या मनातून उतरण्यासाठी ती खोटं कारणही देते. तो चिडतो आणि तिला हाकलून देतो. ती पुन्हा वेश्यागृहात जाते.. पण आता तिला लक्षात आलेलं असतं, की आपल्याही मनात एक स्त्री आहे आणि तिला, तिच्या मनाला त्या म्हाताऱ्या ग्राहकानी स्पर्श केलाय.. ती तसं सांगते आणि वेश्यागृहाची मालकीणही कजलीला त्या देवमाणसाजवळ रहा आणि तुझं आयुष्य पुन्हा उभ कर असं सांगते.. ही जाते, पुन्हा त्या म्हाताऱ्या गिऱ्हाईकाजवळ .. पण एक वेगळीच आशा आता तिच्या मनात असते कारण तिला तो कोण आहे हे तोवर माहीतच नसतं.. 
ती त्याला जवळ घेते आणि तो तिच्या कानशिलात भडकावतो.. 
काय हे सगळं करायला तुला तुझ्या आईने मोठं केलं का .. असं खडसावतो आणि रागाच्या भरात त्याच्या तोंडून चंदा नाव निघतं .. तेव्हा कजलीला कळतं, की आपली आई चंदा ज्याची एवढी वर्ष वाट पहात होती तो डॉक्टर अन्य कुणी नसून हाच आहे .. तिला राग येतो, स्वतःचा, त्याचा आणि स्वतःच्या फुटक्या नशीबाचाही ... ती धावत सुटते.. तेथून दूर निघून जाते ..
तो तिला थांबवत नाही .. 
दुसरा दिवस उजाडतो.. तो पुन्हा शहरात जायला निघतो .. अर्ध्या वाटेवर एका झाडामागे कजली दिसते. डोळ्यात संपलेली स्वप्न असतात आणि चेहऱ्यावर राग, निराशा दाटून आलेली असते तिच्या .. या क्षणी त्याच्यातला बाप पुन्हा जागा होतो.. तो थांबतो.. तिच्या हातात तिने लपवून ठेवलेला कागद पहातो .. तो त्याचा तरूणपणीचा फोटो असतो .. तिने जपून ठेवलेला, तिच्या आईने जपून ठेवलेला .. 
त्याला गहीवरून येतं .. तो कजलीला म्हणतो, चल बेटी, आता आपल्याजवळ मागे वळून पहाण्यासाठी काहीच उरलेलं नाही .. आता आपण पुढे निघून जाऊया .. एकमेकांच्या सोबतीनं .. आणि दोघांच्याही आयुष्यात एक नवा मौसम, एक नवा ऋतू पुन्हा बहरतो .. वडील मुलीच्या नात्याने त्याचं आयुष्य आता पुन्हा बहरून जाणार असतं ..

तर असा हा मौसम चित्रपट .
शर्मिला आणि संजीव दोघांच्या अभिनयाने एका उंचीवर पोहोचलेला.. तितकीच व्याकूळता आपल्या मनात उतरवतात ती या चित्रपटातील एक से एक गाणी .. 
दिल ढुंढता है फिर वही फुरसत के रात दिन, रूके रूके से कदम रूक के बार बार चले, छडी रे छडी कैसी गले में पडी .. ही गाणी फार फार ओघवती वाटतात.. अर्थात ती तितकीच सुंदर आहेत म्हणूनही आजही लोकप्रिय आहेतच यात शंका नाही .. 
जीवनाचे ऋतू कधीच एकसारखे नसतात आणि कोणता ऋतू कोणासाठी काय घेऊन येईल हे तर कुणीच सांगू शकत नाही .. माणसाने फक्त पुढे जात रहावं आणि आपली जबाबदारी घेत आणि चांगूलपणा देत जावं हेच गुलझार या चित्रपटातून आपल्यापर्यंत पोहोचवतात.. 
जीवनाचं गूढ अगदी साधेसहजपणाने आपल्यासमोर उलगडणारे गुलझार म्हणूनच फार फार आवडून जातात ..

- मोहिनी घारपुरे - देशमुख 

(photo credit - www.alchetron.com)

Translate

Featured Post

अमलताश