मंगळवार, २० ऑक्टोबर, २०२०

आभास

ती उठली. तो अजूनही अंथरूणातच होता. शांत झोपलेला. तिने एकवार त्याच्याकडे पाहिलं. तिला आठवलं, रात्री तो तिला हळूच स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होता. हलकेच तिच्या छातीवर तो हात फिरवणार इतक्यात तिने त्याचा हात दूर सारला होता. पुन्हा काहीवेळानं तो तिच्या जवळ सरकायला लागला तेव्हा पुन्हा तिनं झटकन त्याला अडवलं होतं.
आताशा, दोघांच्या रात्री विझल्या होत्या कारण तीच आता विझली होती. खरंच, कसं ना, जेव्हा स्पर्शातला रोमांच कळू लागतो त्या वयात आपण स्वतःला अडवत रहातो. आणि नंतर ती उत्सुकता कमीकमी होत जाते ..
अलिकडे तिचंही हेच झालं होतं. कारण हल्ली तो पूर्वीसारखा राहिलाच नव्हता. दारूच्या विळख्यात अडकलेल्या त्याला फक्त त्याच्या जाणीवा आणि त्याच्या वासना कळायच्या. चांगला सुशिक्षित असूनही, बायकोच्या कामवासनेविषयी त्याला काहीच देणंघेणं नव्हतं.
एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये झपाट्याने प्रगती करत त्याने भरपूर ऐशोआराम, सुखं कमावली नि दारूही सोबत आलीच. आणि इकडे ही त्याच्यासाठी झुरत राहिली.. आपलाच नवरा आणि आपल्यासाठीच त्याला वेळ नाही या गोष्टीनं खंतावून जाई. पण त्याची त्याला फिकीर नव्हती. तिची शरीरसुखाची गरज त्याच्यादृष्टीने बिनमहत्त्वाची होती.
लग्नानंतरच्या सुरूवातीच्या दिवसातही तिला जेव्हा इच्छा होई तेव्हा हा सतत बिझी .. आज काय नाईट शिफ्ट .. उद्या काय अमक्या उद्योगपतीची हॉटेलमध्ये खासगी पार्टी म्हणून सगळी व्यवस्था चोख लागणार .. अशी एक ना अनेक कारण .. काहीतरी मोठं, स्टेटस को फंक्शन रोजचंच आणि मग याला जातीने हजर रहाणं आलंच ! म्हणूनच याला मिळेल त्या आणि तेवढ्याशा वेळात हा तिच्याबरोबर सगळं घाईघाईने उरकून घेई आणि पुन्हा कामावर हजर होई.
अशातच एकदा तिचं कोडं सुटल्यागत झालं. त्याची वाट पहाता पहाता एकदा तिनं स्वतःच स्वतःला सुखी केलं.. आणि मग हे कायम घडू लागलं.. कारण असंही तो घरी येईपर्यंत तिच्या सगळ्या इच्छा मरून गेलेल्या असत. किंबहुना, तो जर नशेतच घरी आला तर हिचा संताप संताप होई, पण सांगायचं कोणाला आणि कशाला .. म्हणून ती सगळं सहन करत राहिली.
तोडण्यापेक्षा जोडणं महत्त्वाचं अशा संस्कारी घरातून आलेली ती, लग्न मोडताना लाख वेळा विचार करणारंच .. नाही का ? शिवाय घरातल्यांना सांगून मार्ग निघेलच याची खात्री नाही पण बदनामी तर होईलच हे तिला पक्क ठाऊक होतं.
तसं पाहिलं तर लौकीकार्थानं त्यांचं सगळं छानच सुरू होतं. फक्त अलिकडे त्याची तब्ब्येत खराब झालीये एवढच सगळ्यांना दिसे. हा असा सगळा चांगला माणूस आयुष्याच्या एका टप्प्यावर एवढं मातेरं करून ठेवेल यावर कोण विश्वास ठेवणार ? आणि मुळात तिलासुद्धा त्याचे तसे धिंडवडे काढायचे नव्हतेच .. कारण, कसा का असेना .. तो तिचा नवरा होता .. इथे पुन्हा तिच्यावर केलेले संस्कारच डोकं उफाळून वर येत आणि ती अगतिक होऊन जाई.
मुळात या लग्नातून आताशा तिच्या वाट्याला तिच्या हक्काचं शरीरसुख काही येत नव्हतं. ती घुसमटून जात होती आणि वाट शोधत होती. तिला हाक मारायची होती, आपल्या जवळच्या कुणाला .. तिला हा कोंडमारा सांगायचा होता.. पण एकदिवशी तिचीच तिला आत्मतृप्तीची वाट सापडली आणि सुखाचं दार उघडलं गेलं. त्यामुळेच मग, आता कशाला कोणासमोर रडायचं नि आपलं गाऱ्हाणं सांगायचं .. लोक काय रडून ऐकतील नि हसून सांगतील. त्यापेक्षा नकोच ते .. आपण आपल्या वाटेनं जाऊ .. जात राहू .. हेच तिनं एका निसटत्या क्षणी मनात पक्क करून टाकलं.
पहिल्या एकदोन आत्मतृप्तीच्या क्षणानंतर तिनं स्वतःला थांबवलं खरं पण तिला काय माहीत .. की ही वाटही निसरडीच होती .. आणि हल्ली, हल्ली तर तिला झपाटल्यागत झालं होतं. कारण, त्याच्या बेताल वागण्याने तिच्या हातून निसटून गेलेल्या अनेक अतृप्त रात्री ! आणि आता जणू या साऱ्या रात्रींचं कर्ज तिच्या डोक्यावर असल्यागत, अलिकडे सतत तिची अर्धवट शमलेली भूक उफाळून वर येई ... मग कसंही करून ती आतल्याआत हे वादळ शमवण्याचा प्रयत्न करीत राही. मग तिचंच तिला आश्चर्य वाटे. आपल्यातून वर डोकावणारी ती खरी की तिला विझवण्याचा खटाटोप करणारी मी खरी या अशा अनेक भासआभासांच्या गुंत्यात ती अडकत चालली होती. सतत डोक्यात अशीच द्वंद्व सुरू त्यामुळेच खरंखोटं कळेनासंच झालं होतं हल्ली तिला.
तो आपल्या बाजूला आहे आणि आपल्याला स्पर्श करू इच्छित आहे ही जाणीव झाली की तिचा गोंधळ उडायला लागे. हा खरंच आहे ना शेजारी .. की हे सगळं आपल्या कल्पनेतच घडतंय, आजवर त्याच्या अनुपस्थितीत आपण घडवत होतो तसं.. ? खरंच त्याला हवंय का आपलं मीलन .. ? की फक्त त्याला हवेत ते आपल्या देहाला चिकटलेले आपले अवयव ? की त्याला काही क्षण जी मजा येते .. तेवढीच हवीये फक्त.. ?
हल्ली, ती अशा आभासातच हरवत चालली होती आणि तो व्यसनात आकंठ बुडालेला..
दोघंही आपापल्या आभासी लाटांवर झुलत होते. आयुष्याची नौका आता कोणत्याही क्षणी पूर्ण बुडणार होती .. पण त्याची चिंता करायला मुळात वास्तवात यायला हवं ना .. तेच तर जमत नव्हतं.
ना तिला, ना त्याला ..
आणि हे सगळं कशामुळे ?
तर दारूच्या विळख्यात अडकलेल्या त्याने तिच्या भावनांचा, वासनेचा आणि त्यांच्या वैवाहिक जीवनाचा जो काही कोंडमारा करून ठेवला होता, केवळ त्यामुळेच !
तिला कालची रात्र आठवली ! तिला जाणवलं, आपली उमेदीची वर्ष सगळी निघून गेलीत.. आता वासनेचा तो थरारच संपत चाललाय आणि आता हवे आहोत आपण त्याला..? आता स्पर्शातून फक्त वेदनाच होतात जेव्हा आपल्या मनाला, अशा टप्प्यावर ..?
तिच्या मनात चीड, घृणा, तिरस्कार आणि संताप सारं काही उफाळून आलं आणि पुन्हा काही क्षणातच तिला बेचैनी आली.
अंथरूणावर त्याचं शरीर निजलं होतं.. आता सतत त्याच्या अंगाला येणार उग्र दर्प तिला किळसवाणा वाटू लागला होता .. या दारूपायी त्यानं स्वतःच्या सुंदर शरीराचं जे काही मातेरं केलं होतं ते तिला बघवत नव्हतं. त्याचं घटलेलं वजन, खप्पड झालेले गाल, डोळ्याभोवती आलेली काळी वर्तुळ, बलहीन शरीर आणि विझलेली गात्र .. त्याचं ते ओंगळवाणं रूप पाहून तिला शिसारी आली.. या अशा माणसाने आपल्याला स्पर्श करावा .. ई .. तिला स्वतःचंच शरीर नकोस वाटलं क्षणभर ..
तिला आठवलं, तिच्या लहानपणी दारूडा माणूस नुसता शेजारून जरी गेला तरी आई हात धरत असे तिचा चटकन् आणि आता आपलाच नवरा दारूडा होऊन आपल्या बिछान्यात झोपतोय .. कारण त्याचं प्रसन्न व्यक्तिमत्त्व पाहून आपण त्याला निवडलं म्हणून ..?
पण मग याला उपाय काय .. सोडून द्यायचं त्याला ? पण असं केलं तर आपण आपल्याच नजरेतून उतरू हे तिला माहित होतं.
आणि म्हणूनच आताशा ती आभासच खरा मानत होती.. तो आता माघारी येणार नव्हता हे तिला ठाऊक होतं. तो असूनही नसल्यासारखाच, त्यामुळेच तीही तिच्या वेळेला तिच्यासाठी कधीच अव्हेलेबल नसलेल्या नवऱ्याला, तो सोबत आहेच हे मानून स्वतःला तृप्त करत निघाली होती .. तिच्या रस्त्यानी .. कारण शेवटी, हे आयुष्य जितकं त्याचं होतं, तितकंच तिचंही होतंच ना ..आणि तिला जगायचं होतं.. घुसमटायचं नव्हतं .. कधीच .. म्हणूनच ती जगायला लागली होती... आणि आयुष्य ? ते आपल्या निश्चित गतीने पुढे सरकत होतं. पुढे सरकत रहाणार होतं..
अहोरात्र ..

- मोहिनी घारपुरे - देशमुख

सोमवार, १९ ऑक्टोबर, २०२०

कथा

हिरवा चाफा 
मोहिनी घारपुरे - देशमुख 

लपवलेल्या हिरव्या चाफ्याचा गंध खोलीभर दरवळला होता. ती खोलीत शिरली आणि तिनं तो गंध श्वासात भरून घेतला. हा दरवळ नेमका कुठून येतोय हे तिला आता शोधायचं होतं. त्या दोघांचा तो आवडीचा आणि नेहमीचाच खेळ..हिरव्या चाफ्याचं एखादं फुल त्यानं संध्याकाळी फिरून परतताना खिशात आणायचं नि कोणाच्याही नकळत बेडरूममध्ये लपवून ठेवायचं.
घरात नकळतपणे हा चाफा शिरला की त्याच्या सुगंधाने ती फुलून जायची. घरातल्या इतर मंडळींना चाफ्याचं तेवढंस वेड नव्हतं त्यामुळे त्यांना या दरवळीने अस्वस्थ व्हायचं नाही. ते फक्त तिलाच व्हायचं आणि तिचं असं अस्वस्थ होणं त्याला फारच गोड, मादक वाटायचं. म्हणून हा सारा खट्याळपणा तोही आवर्जून करायचा. लग्नाला सात आठ वर्ष झाली असली तरीही..!
हिरवा चाफ्याचा सुगंध गोड आणि मादक..अगदी तिच्यासारखा..
" ए मला ना या चाफ्याने नुसतं वेडं व्हायला होतं...असं वाटतं, आपल्या प्रत्येक तशा क्षणांपूर्वी खोलीभर चाफ्याची फुलं अंथरलेली असावीत...हिरव्या चाफ्याची फुलं आणि आपल्या निर्मळ, निर्वस्त्र देहाला या फुलांनी स्पर्श करावा. या फुलांचा गंध आपल्या शरीरावर अलगद भरून रहावा. आपल्या त्या धुंद क्षणांना या अलवार गंधानी सुंगंधित करावं आणि तो दरवळ घेऊनच नंतर कितीतरी वेळ आपल्या शरीरांनी या जगात वावरावं. मग तू कितीही दूर गेलास तरीही नंतर तुझा हा गंध आठवून मी स्वतःला तुझ्यात मिसळून घेईन. एकेका फुलाने तू माझा देह सजवत जा आणि मी तुझा..अशा क्षणांना खोलीत ते गाणं, जयतीर्थ मेऊंडींच्या आवाजातलं, 'तुझा गंध येता मनी छंद वाजे मला वेधणारा पुन्हा पुन्हा ...' , तेही सुरू असावं म्यूझिक सिस्टीमवर .. काय रोमँटीक वाटेल नै ..?"
लग्नानंतर एकमेकांच्या मिठीत निवांत पहुडलेले असताना तिनं एकदा त्याला मोठ्या अधीरतेने तिची फँटसी सांगितली होती. तिची फँटसी ऐकल्यावर त्यालाही खुदकन् हसू आलं होतं त्या क्षणी. किती गोड, किती साधं आणि किती सुंदर बोलली होती ती! या अलवार क्षणांना बंद कुपीतल्या अत्तरासारखं चिरकाल दरवळत ठेवण्यासाठी इतका विचार? आणि तोही हिच्यासारख्या एका साध्या गोड मुलीने केलेला असावा...त्याला आश्चर्य वाटलं आणि कौतुकही वाटलं तिचं.
"पण हिरवा चाफाच का? कोणतंही फुल चालेल की..त्यात काय .. !"
त्यानं तिला घट्ट मिठीत ओढत विचारलं. तिचे टप्पोरे बोलके डोळे आणि रसरसलेले ओठ पाहून तो पुन्हा धुंद झाला आणि त्यानं तिच्यावर स्वतःला स्वार केलं. तिही त्याच्या अशा उन्मादक स्पर्शाने रसरसून बहरली. हे क्षण आता दीर्घ झाले होते. शरीराच्या धुंदीला चाफ्याच्या गंधाची आठवण येऊन दोघांच्याही संवेदना फुलून आल्या होत्या. खोलीत चाफा कुठेच नव्हता पण चाफ्याचा दरवळ त्याक्षणी त्या दोघांनाही अनुभवला होता. तो तिच्या फँटसीत तनामनाने फुलून आला होता. ती रात्र सुकुमार झाली होती..आणि चांदण्यांच्या मंतरलेल्या पांघरूणाखाली ते दोघं एकमेकांच्या कुशीत निवांतपणे झोपली होती.
रात्र सरली आणि दुसऱ्याच दिवशी त्याला संध्याकाळी घरी परतताना हिरव्या चाफ्याने खुणावलं. त्यानं गाडी झट्दिशी थांबवली. काल रात्रीच्या आठवणीनं तो तहानला झाला. तो सरसावला आणि त्यानं भराभर हिरव्या चाफ्याची दोन टप्पोरी फुलं तोडली आणि खिशात ठेऊन थेट घर गाठलं.
तिनं दार उघडलं आणि त्या मदमस्त सुगंधानी ती क्षणभर गोंधळली ..
" चाफा .. ? हिरवा चाफा आणलाएस का तू ..? खरंच ..?" आश्चर्याने त्याच्याकडे बघता बघताच तिच्या चेहऱ्यावर गोड हसू पसरलं. तिच्या डोळ्यात कालची रात्र तरळली. तिचे गाल लाजेनं लाल लाल झाले..आणि तो खुदकन् हसत बेडरूममध्ये जाऊन झट्दिशी ते फूल लपवून आला..
ती खोलीत शिरली.. आणि वेड्यासारखं ते फूल शोधू लागली.
"आहा..सापडलं ..!" असं म्हणून ती वळते तोच त्यानं तिला बिछान्यावर लोटली आणि दोघांच्या मर्जीने हा चाफ्याचा क्षण पुन्हा साजरा झाला.
या गोडगोड दिवसापासूनच तर हा लपवाछपवीचा खेळ त्या दोघात सुरू झाला होता. नवथर प्रणयाचा उन्माद आणि त्यातलं ते अवर्णनीय सुख आज लग्नाला एवढी वर्ष झाली तरीही त्या दोघांनी टिकवून ठेवलं होतं.
खोलीभर चाफ्याचा दरवळ हा असा रेंगाळत राहिला होता .. आजतागायत.. !

copyright @ mohinee_gharpure

(नुक्कड साहित्य संमेलनाच्या फेसबुक पेजवर दिनांक 14 जून 2019 रोजी प्रकाशित)

गुरुवार, १ ऑक्टोबर, २०२०

'स्पार्कल' शाळा - उपक्रमशील शाळा

'सृजनत्व' अन् 'कल्पकतेचा' रंगतो इथे सोहळा

नाशिकमधील 'म्हसरूळ' भागात नव्यानेच सुरू झालेल्या 'स्पार्कल प्रायमरी अँड प्री-प्रायमरी' शाळेचे वैशिष्ट्य म्हणजे ही द्विभाषिक शाळा आहेच मात्र या शाळेत उपक्रमशीलतेला अतिशय महत्त्व दिले जाते. शिक्षण देणे हे एखादे कार्य उरकण्याप्रमाणे न करता विद्यार्थ्यांना कृतिशील, उपक्रमशील पद्धतीने शिक्षण देण्यावर या शाळेतील शिक्षकांचा भर असतो. यापूर्वीच्या अनेक उपक्रमांचा दाखला त्याकरीता येथे आवर्जून देता येईल.. जसं, भाज्यांची ओळख हा विषय जेव्हा शाळेने घेतला तेव्हा नुसती भाज्यांची चित्र दाखवून नावं सांगणं एवढ्यावर हा विषय संपवला नाही तर मुलांना भाज्यांचं महत्त्व कळावं यासाठी पालकांना मुलांच्या डब्यातून भाज्यांचे निरनिराळे पदार्थ द्यायला सांगितले, शाळेने मुलांना चक्क शेतात तर फिरवून आणलंच तसंच बाजारातही भाजी दाखवायला नेलं. भाजीचं शेतात उत्पादन कसं होतं इथपासून ते बाजारात भाजी कशी विकली जाते, विक्रीची परिमाणं, वजन कसं करतात, भाजी विकत आणण्याकरीता पैसे कसे आणि किती मोजावे लागतात या साऱ्यासाऱ्याची तोंडओळख विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात करून दिली होती. इतकंच नव्हे तर विद्यार्थ्यांसाठी भाज्यांची एक नाटुकलीही शाळेने बसवली होती.. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर एक विषय घेतला की त्याचा पाठपुरावा करायचा आणि त्या विषयाशी गुंफत इतर विषय विद्यार्थ्यांना शिकवायचे आणि ते देखील वर्गात बसून नव्हे तर प्रत्यक्ष कृती करायला उद्युक्त करून हेच तर स्पार्कल शाळेचं वैशिष्ट्य .. !
लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून विद्यार्थी जरी घरी असले तरी शाळेने विद्यार्थ्यांनी घरातही टीव्ही व मोबाईलपासून जास्तीत जास्त वेळ लांब रहावे याकरिताही शाळेने सतत विद्यार्थ्यांना निरनिराळ्या उपक्रमांमध्ये व्यस्त ठेवलेले आहे. जसं, शेंगदाण्यांचा एक निराळाच उपक्रम या विद्यार्थ्यांना घरातच राहून शिक्षकांनी करायला सांगितला होता आणि ज्याबद्दल मी गेल्यावेळी लिहीलंही होतं ते वाचकांना आठवत असेलच.. !
कोरोनाच्या वाढत्या कहरामुळे शाळा सुरू होण्याची चिन्ह काही दिसेनात, अशावेळी शिक्षकांनाही आता विद्यार्थ्यांना सतत काय उपक्रम द्यावेत हे आव्हानच झालेले आहे. मात्र, असे असले तरीही, हे आव्हानही स्पार्कलच्या शिक्षकांनी लीलया पेललेले आहे. नुकतंच या शाळेतील शिक्षिका मृणाल जोशी यांनी आपल्या सिनीयर केजीच्या विद्यार्थ्यांना गणित विषयातील एकक - दशक ही संकल्पना शिकवण्यासाठी एक छान कल्पक उपक्रम घेतला आणि तो देखील विद्यार्थी घरी असतानाच .. त्या उपक्रमाविषयी खुद्द मृणाल ताईंनीच त्यांचा अनुभव लिहून पाठवला आहे, त्यांच्याच शब्दात तो इथे देते आहे -
" उपक्रमशील शिक्षण पद्धती असं म्हटलं की पालकांना हमखास प्रश्न पडतो, "म्हणजे नेमकं कसं शिकवतात तुमच्या शाळेत ?" तर याचंच एक उदाहरण मी आज तुम्हाला सांगणार आहे.
सध्या लॉकडाऊनमुळे आपण सगळेच घरात बसलोय. त्यामुळे मुलांना शिकवायचं कसं आणि उपक्रम कसे व कोणते द्यायचे हा मोठा प्रश्न पालकांना जसा पडला आहे तसाच आम्हा शिक्षकांनाही पडला आहेच. पालकांचा विचार केला तर सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे मुलांचा वेळ कुठे सत्कारणी लावायचा ? नाहीतर उरलेल्या वेळेत ते फक्त मोबाईल किंवा टीव्ही बघत बसतात ! पण आपण घरातल्या घरातही नानाविध कल्पक उपक्रम मुलांना करायला देऊ शकतो. विशेषतः असे उपक्रम ज्यातून विद्यार्थ्यांचं अध्ययन सोपं जाईल.
मला सिनियर केजीच्या वर्गात 'एकक आणि दशक' ही संकल्पना शिकवायची होती. मग त्यासाठी मला एक छान कल्पना सुचली. अनायसे पावसाळा आहे. बाहेर झाडं छान बहरली आहेत आणि अनेक फुलझाडांवर भरपूर फुलं बहरलेली दिसू लागली आहेत. मग प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या वा तिच्या घराजवळील फुलझाडांची फुलं गोळा करून आणायला सांगितली आणि मग एकक आणि दशक ही संकल्पना लक्षात यावी म्हणून मी दहा फुलांचा हार करायला सांगितलं. दहा फुलांना एकत्र केलं म्हणजे एक दशकाचा हार तयार झाला आणि वर जितकी फुलं राहिली ते झाले एकक ही संकल्पना विद्यार्थ्यांना छान लक्षात आली. प्रत्येक विद्यार्थ्याने दशकाचा हार तयार केला आणि तो करताना पालकांनी विद्यार्थ्यांना फुलं मोजायला शिकवलं. यामुळे मोजणी (काऊंटींग) अन् एकक- दशक विभागणी शिकवणं सोपं झालं आणि मुलांच्या ते कायमस्वरूपी लक्षात राहीलं. माझ्या वर्गातला एक उत्साही विद्यार्थी त्रिशील, त्याने तर स्वतः दोऱ्यात सुई ओवली आणि मला दाखवलं.. 'किती छान, किती एकाग्रतेने त्याने ती सुई धाग्यात ओवली..!' ते बघताना मला खूप आनंद झाला तसंच लॉकडाऊनपूर्वी शाळेत केलेल्या अनेक उपक्रमांचीही फार तीव्रतेने आठवण झाली.निसर्ग नावाच्या विद्यार्थ्याने तर घराजवळ खूप फुलं नाही मिळाली तर चक्क एका फुलाच्या दहा पाकळ्या करून त्याचा हार ओवला.
एकूणच काय आपण छोट्या छोट्या वस्तू वापरून नवीन सृजनशील उपक्रम मुलांना देऊ शकतो आणि अध्ययन व अध्यापन सुखकर करु शकतो."
तर अशी ही उपक्रमशील शाळा... स्पार्कल शाळेचे वैशिष्ट्य म्हणजे या शाळेत विद्यार्थ्यांना मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेत प्रत्येक विषय शिकवला जातो. सध्या लॉकडाऊन सुरू असलं तरीही शिक्षिका एवढ्या उत्साहाने, तळमळीने विद्यार्थ्यांना शिकवत आहेत आणि भविष्यातही त्यांची शिकवण्याची आस्था अशीच कायम राहील यात मला शंका नाही.

- मोहिनी घारपुरे - देशमुख



 

Translate

Featured Post

अमलताश