सोमवार, २५ डिसेंबर, २०१७

बाकी शून्य (कविता)

काहीही होत नाही, फक्त आपलीच तडफड होत रहाते..
काहीही बदलत नाही, फक्त आपणच बदलत जातो..
तरीही काही हाती लागत नाही,
नेमकं काय हवय तेच शेवटपर्यंत कळत नाही..
मन - आत्मा जागा झाला की सतत छळत रहातो..
फार खरं असू नये, फार बरं असू नये
जीव तळमळत रहातो उगा, इतकं सोपं असू नये..
साधंसोपं असणं खरंतर असतं फार सुंदर
पण, समजण्यासाठी मात्र कृत्रिमताच होते नेहेमी वरचढ
म्हणूनच वाटतं, कृत्रिमताच खरी,
मनाच्या सच्चेपणापेक्षा रंगरंगोटीच खरी..
पण पुन्हा प्रश्न उरतोच, नेमकं आपल्याला हवंय काय,
कशासाठी सतत चालत रहातात आपले पाय
दोन वेळचं पोट भरलं, सुखासुखी निवांत निजलं..
तरीही आपण रहातो आनंदी, सुखी आणि समाधानी
उभा जन्म जळत जातानाही मात्र जेव्हा
गवसत नाही हाती काही
बाकी शून्य म्हणता म्हणता कळतं,
आपल्या हाती काही नाही
- मोहिनी घारपुरे - देशमुख

माझी मॉडेलिंगची सत्यकथा नी व्यथा


साधारणतः दहाएक वर्षांपुर्वीची मी..
छानच दिसायचे .. शिवाय दहाएक वर्षांपूर्वीची, म्हणजे अत्ता आहे त्यापेक्षा अधिक तरूण, सळसळत्या उत्साहाची ..आपल्या सुंदर रूपाला पाहून करिअरच्या वाटेतलं मॉडेलिंगचं ग्लॅमरस जग मलाही अन्य चारचौघा उमद्या, सुंदर मुलींसारखं खुणावल्यावाचून राहिलं नाही. पण तरीही या वाटेतले खाचखळगे ऐकून चांगलेच माहीत होते म्हणून मी काहीशी बावरलेली होते, नेमकी सुरूवात कशी कुठून करावी हे लक्षात येत नव्हतं.

मग माझ्या लहान भावाच्या एका फोटोग्राफर मित्राशी एकदा गप्पांच्या ओघात मी माझी मॉडेलिंगची प्रचंड इच्छा असल्याचं बोलून दाखवलं. त्याने त्याच्या ओळखीच्या एका फोटोग्राफरकडे मला नेलं आणि त्यांच्याशी या क्षेत्राविषयी आम्ही बोललो. मला या क्षेत्रात काम करायला आवडेल, किंबहुना यातच मी करिअर करू इच्छिते वगैरे सांगितल्यावर फोटोग्राफर काकांनी चेहऱ्यावर पूर्ण प्रोफेशनॅलिझम आणून मला जुजबी मार्गदर्शन केलं, शिवाय काही असाईनमेंट्स असतील तर संधी देईन असंही म्हणाले. मीही आनंदाने त्यांचा निरोप घेतला.
त्या काळात मी एका वाचनालयात पार्टटाईम, म्हणजे संध्याकाळी 5 ते 9 या वेळेत जॉब करत होते. फोटोग्राफर काकांना भेटल्यानंतर अगदी आठवडाभरानंतरच ते संध्याकाळच्या वेळी योगायोगाने याच लायब्ररीचे सदस्य असल्याने तेथे आले. पुस्तक बदलून परत निघताना त्यांचे माझ्याकडे लक्ष गेले, त्यांनी मला त्यांच्याकडे एक असाईनमेंट असल्याचे सांगितले.
ही असाईनमेंट एका सुप्रसिद्ध चित्रकार काकांची होती. त्यांना पोर्ट्रेट मॉडेल हवी होती. त्या मॉडेलचे फोटो काढून नंतर त्या फोटोंवरून ते पोर्ट्रेट  काढणार होते. फोटोग्राफर काकांनी मला त्याची माहिती दिली आणि तुला इंटरेस्ट असेल तर स्टुडीयोत येऊन भेट असंही सांगितलं. या असाईनमेंटचं मानधन चित्रकार काका देतील ते पैसे आणि शिवाय मी माझ्याकडून तुला एक फुल मेकअप वगैरे करून तुझा पोर्टफोलिओ देईन असं फोटोग्राफर काकांनी कबूल केलं. मला या क्षेत्रातलं काहीही ज्ञान नसल्याने पहिली संधी, ती देखिल इतकी चांगली चालून आली आहे या संधीचं आपण सोनं करायचं या विचारानी मी सहज तयार झाले.
मग, भावाच्या त्या मित्राला, ज्यानी फोटोग्राफर काकांची आणि माझी ओळख करून दिली होती त्याला भेटून ही असाईनमेंट मिळाल्याचे सांगितले व त्याचे आभार मानले. नंतर आम्ही दोघंही त्या असाईनमेंट करीता आवश्यक ते कपडे जमवण्यासाठी काही आणखी मैत्रिणींना भेटलो आणि कपड्याची जमवाजमव करून ठरल्या दिवशी मी स्टुडीयोत हजर झाले.
............

पहिलीच असाईनमेंट असल्याने मी काहीशी घाबरलेली होते. पण सेटवर कॅमेरा ऑन झाला आणि मी एक से एक पोझेस देऊ लागले. चित्रकार भावंड तर माझ्यावर बेहद खूश होते. ते सांगतिल तशा पोझेस  मी आत्मविश्वासाने देत होते. सकाळी 10  ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ही असाईनमेंट सुरू होती. या वेळात माझे तब्बल 850 फोटोज क्लिक करण्यात आले पण मला आपले एवढे फोटो काढले गेले आहेत याची सुतराम कल्पना नव्हती. असाईनमेंट संपली. प्रत्येकजण माझ्या कामाचं भरभरून कौतुक करत होता. मीही आपलं काम लोकांना आवडलं म्हणून हुरळून गेले होते. त्यामुळेच की काय अनेक गोष्टी माझ्या त्या क्षणी लक्षातच आल्या नाहीत.
निघताना चित्रकार काकांनी माझ्या हातावर 1000 रुपयांचा चेक ठेवला, तेव्हाही मला त्या कमाईचं मोल खूप वाटलं होतं इतकी मी निरागस होते. 850 क्लिक्सच्या बदली केवळ 1000 रूपये ... पण मला वाटलं, की चित्रकार काका पुढे चित्रावर मॉडेल म्हणून आपल्या नावाचा उल्लेख करतीलच .. म्हणून मी वाद घातला नाही आणि मिळालेलं मानधन स्वीकारलं.. फोटोग्राफर काकांना नमस्कार करून मी निघाले..  आनंदाच्या भरात, करिअरची नवी सुरूवात चांगली झाली, अशा विचारात घरी आले.
.............

त्यानंतर अधेमधे मी फोटोग्राफर काकांना फोन करून असाईनमेंट आहे का, काही काम मिळेल का विचारत राही पण ते मला टाळून देत. चार पाच महिन्यांनी मला जाणवलं, की यांनी आपल्याला आपली फुल मेकअप वाली असाईनमेंट त्यांच्याकडून देणार होते ती तर अजून दिलीच नाही, म्हणून मी त्याबाबत त्यांना विचारणा करू लागले. मध्यंतरीच्या काळात जवळपास पोर्ट्रेट म़ॉडेलिंगला वर्ष होत आलं होतं. मग असंच एकदा मी फोटोग्राफर काकांना फोन केला, तेव्हा त्यांनी अचानक मला मेकअपवाली असाईनमेंट करूया म्हणून संमती दर्शवून अमक्या तारखेला स्टुडीयोत ये असं सांगितलं. पिंक आणि ब्ल्यू थीम ठरली. त्यानुरूप मी पुन्हा कपड्यांची जमवाजमव करून स्टुडीयोत हजर झाले. पहाते तर तिथे एक मेकअप आर्टीस्ट हजर होता. त्याला मुंबई सोडून नाशिकला जम बसवायचा होता. म्हणजे हा मेकअपवाला फोटोग्राफर काकांना माझ्या असाईनमेंटसाठी आयताच मिळाला होता तर .. मग त्याने ट्रायल मेकअप करून दाखवा अशा बरहुकूम माझ्या चेहऱ्यावर मेकअप केला, पिंक आणि ब्लू थीमच्यानुसारे.. फोटोग्राफर काकांनी माझे बरेच फोटो काढले.. ही माझी दुसरी असाईनमेंट होती, यावेळी मी माझ्या आजीला सोबत घेऊन आले होते. आपल्याला काम मिळतेय, पुढे मागे चांगली कामं मिळतील या विश्वासावर मी याही वेळेला फोटोग्राफर काकांवर पूर्ण विश्वास ठेवला.
या असाईनमेंटमधले माझे सगळेच फोटो फारच छान आले होते. त्यानंतर एक दिवस फोटोग्राफर काकांनी मला बोलावून माझा एक फोटो स्टुडीयोच्या होर्डींगवर वापरण्याकरीता विचारणा केली.. मीही मानधनाची अपेक्षा न करता त्यांना संमती दिली आणि आनंदाने घरी गेले. होर्डींग किती दिवसांकरीता लावणार, त्याबदली मला काय मिळणार, मानधन कोणत्या स्वरूपात देणार हे प्रश्नही मला भाबडीला तेव्हा पडले नाही, याची आजही खंत वाटते.
..............

स्टुडीयोचं होर्डींग माझ्या फोटोसकट मोठ्या दिमाखात रस्त्याच्या एका कडेला लागलं. ते पाहून मलाही फारच आनंद झाला.. आता हे होर्डींग पाहून आपल्याला आणखी काम नक्कीच मिळेल असा विश्वासही वाटायला लागला होता... पण हाय रे .. ना काम मिळालं, ना पैसे .. नुसतीच वाट पहात राहीले...  चित्रकार काकांना तर माझ्या फोटोवरून काढलेल्या पोर्ट्रेटवर आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळालं.... नंतरही अनेक ठिकाणी त्यांनी प्रदर्शनं भरवली, स्पर्धेत ती चित्र पाठवली ...
पण मी.... मला या असाईनमेंट्सच्या मोबदल्यात माझ्या मेहेनतीच्या मोबदल्यात काहीही मिळालं नाही. ना माझं कुठे नाव आलं, ना माझ्या फोटोंचा मी कुठे वापर करू शकले.. कधीही.
........................

त्यानंतर पाच एक वर्षांचा काळ गेला असेल. मी एकदा अशीच अचानक त्या फोटोग्राफर काकांच्या स्टुडीयोत धडकले तेव्हा मला जे दिसलं त्यानी माझ्या पायाखालची जमीनच सरकली. काकांनी पर्सनलाईज्ड वस्तूंचा व्यवसाय सुरू केला होता. म्हणजे उशा, कीचेन, कॉफीमग, फोटोफ्रेम वगैरे वस्तुंवर तुमचे फोटो .. आणि या सर्व वस्तुंच्या सँपलवर ठिकठिकाणी माझे फोटोज वापरलेले होते. हे पाहून मी चिडले... काकांनी परस्परच माझ्या फोटोंचा वापर व्यावसायिक हेतूने सुरू केला होता. आता मी त्यांना मला काही काम तरी द्यावे अशी विनंती केली किंवा मला या सर्व फोटोजच्या तुम्ही करत असलेल्या वापराच्या बदल्यात एक ठोक रक्कम देऊन टाकावी अशी मागणी केली ... आता काकांनी आपल्या वयाचा फायदा घेत माझ्या घरीच येऊन माझ्या आईवडीलांना मध्ये घेतलं, संपूर्ण चित्र असं की, तुमची मुलगी आमच्या प्रगतीमुळे जळून आता आमच्याकडे पैसे मागायला लागली आहे ... यावर मी माझ्याशी व्यवहार झाला आहे, आईबाबांना मध्ये घेऊ नका असं म्हटलं तर फोटोग्राफर काकांनी सर्व सँपलच्या वस्तू माझ्या हवाली करून टाकल्या... अगदी कॅलेंडरमधलं माझा फोटो वापरलेलं एक पान फाडून मला दिलं... पण पैसे मात्र दिले नाहीत.. खरंतर पाच वर्षांचा कालावधी, माझ्या फोटोजचा तेवढ्या मोठ्या काळपर्यंत केलेला बिनधास्त वापर या सगळ्याच्या बदल्यात मला फोटोंची ओरीजीनल प्रिंट,  आणि योग्य तो मोबदला देणं अपेक्षित होतं पण तसं झालं नाही ...
.......

त्या  दिवशी मला या मोहमायी दुनियेचं खरं रूप कळलं... केवळ आणि केवळ कॉंट्रॅक्ट करण्याचं शहाणपण न दाखवल्याने आणि स्वतःच्या अज्ञानामुळे म्हणा किंवा वय लहान असल्याने म्हणा, या सगळ्यात माझ्या पदरी केवळ मनस्तापच आला... मी असाईनमेंटच्या वेळी नुसतीच झिजत गेले, काम मिळेल या आशेवर आयुष्याची महत्त्वाची वर्ष सरून गेली,  पण माझ्या हाती काहीही लागलं नाही.. ना पैसे, ना नाव , ना यश, ना भविष्याची सुंदर स्वप्न ..
इतकेच काय तर चित्रकार काकांनी कुठेही माझं नाव येऊ दिलं नाही, शिवाय, त्यांच्या असाईनमेंटमधल्या 850 फोटोजपैकी एकही फोटो मी कुठेही वापरू शकत नाही अशी त्यांची अट आजही आहे.. कारण, त्या असाईनमेंटमधल्या फोटोजवरून अन्य चित्रकार सहज चित्र काढू शकेल व काकांची मोनोपोली जाईल, स्पर्धा निर्माण होईल वगैरे म्हणून ... सोशल मीडियावरही मी त्या असाईनमेंटमधला फोटो एडीट वगैरे करून वापरला तर त्यांचा मला लगेचच फोन येतो आणि ते फोटो काढून टाकावेत अशी सौजन्यपूर्वक धमकीच मिळते. खरंतर काकांची अडचण होईल म्हणून मला माझे फोटोज वापरू न देणे चुकीचेच आहे ... जर मी ते फोटो वापरू नयेत असं वाटत असेल तर काकांनी मला 850 फोटोजचा आर्थिक स्वरूपात योग्य मोबदला दिला पाहिजे आणि ठिकठिकाणी जेव्हा, जिथेही ते माझ्या पोर्ट्रेटवरून चित्र काढत असतील तिथे माझा नामोल्लेखही
मॉडेल - मोहिनी घारपुरे असा करायलाच पाहिजे .. तरच तो माझ्याशी न्याय असेल असं मला वाटतं. गंमत म्हणजे, काकांनी मला त्यांनी माझं काढलेलं चित्र माझ्या बेडरूममध्ये एनलार्ज करून वापरण्याची अनुमती दिली आहे बरं का .. (तसं मी वापरलेलं नाही कारण मला त्यात काहीही इंटरेस्ट नाही, मला माझे फोटोज वापरता यायला हवेत कारण मुळात ते माझे आहेत आणि त्यांनीच माझी संमती घेऊन वेळोवेळी माझे चित्र प्रदर्शनात मांडायला हवे .. पण दुनिया बघा कशी आहे .. मलाच माझे फोटो वापरण्याला बंदी करताएत हे तिऱ्हाईत व्यक्ती .. )
पण तरीही माझ्यातल्या चांगुलपणाखातरच केवळ मी काकांच्या सांगण्याला मान देऊन माझे हे फोटो कुठेही वापरत नाहीये..

फोटोग्राफर काकांशी तर त्यानंतर मी कोणताही कॉंटॅक्ट ठेवलेला नाही, त्यामुळे त्यांनी माझ्या एवढ्या फोटोजचं नेमकं काय केलं हे मला आजपर्यंत माहीती नाही ...

माझे एवढे सुंदर फोटोज मीच कुठेही वापरू शकत नाही असं माझं या क्षेत्रातलं दुर्दैव ..
.................

तुम्हीही मॉडेलिंगच्या क्षेत्रात चमकू इच्छित असाल तर माझ्याकडून झालेल्या या चुका तुम्ही मात्र नक्कीच, जाणीवपूर्वक टाळा -




  1.  कोणावरही विश्वास ठेऊ नका. 
  2. काहीही गृहीत धरू नका. 
  3. कॉंट्रॅक्ट केल्याशिवाय कोणतीही असाईनमेंट, मग वरवर ती कितीही साधी वाटत असली तरीही अजिबात करू नका. 
  4. किती क्लिक्स करणार, किती फोटोज वापरणार हे लेखी ठरवून घ्या. 
  5. कामाच्या मोबदल्यात किती पैसे मिळतील ते आधीच ठरवून घ्या. 
  6. भविष्यात तुमच्या असाईनमेंटचे फोटोज कुठे कुठे, किती वेळा आणि कोण कोण वापरू शकेल हे आधीच लिखित स्वरूपात ठरवून घ्या. तसेच दरवेळी तुमचे फोटो वापरले गेले की त्याबदल्यात तुम्हाला किती मानधन वापरकर्त्याने दिले पाहिजे हे कॉंट्रॅक्टमध्ये ठरवलेले असलेच पाहिजे. 
  7. शिवाय कोणत्या असाईनमेंटमधले तुमचे कोणते फोटो भविष्यात किती वर्षांपर्यंत वापरले जातील याचीही लेखी नोंद सर्वांसमक्ष करून घ्या. 
  8. तुमच्या फोटोजचा सोशल मीडियावर वापर होणार असेल तर तो कोण, कधी व किती साईझच्या फोटोजचा वापर करेल हे कॉंट्रॅक्टमध्ये ठरवून घेतलेले असलेच पाहिजे. 
  9. तुमच्या फोटोजचा अधिकार तुमच्याजवळ हवा, फोटोग्राफरकडे किंवा अन्य ग्राहकाकडे नाही, अन्यथा, तुम्हीही माझ्यासारखेच अडकू शकाल व स्वतःच स्वतःचे नुकसान करून घ्याल. 
  10. कितीही ओळखीचा छायाचित्रकार असो, कितीही जवळचा, परिचित ग्राहक असो, आणि कितीही कंटाळा येत असला तरीही कॉंट्रॅक्ट करूनच कामाला सुरूवात करा. 
  11. अगदी शॉर्ट नोटीसवर, अगदी घाईघाईत कोणीही कोणतीही असाईनमेंट देत असेल तर सावधपणेच व्यवहार करा. 
  12. मॉडेलिंग, लेखन, नोकरी, अगदी कोणतंही काम, जे व्यावसायिक पातळीवर केलं जाणार असेल तिथे पारदर्शकता फार फार महत्त्वाची असते हे लक्षात ठेवा व त्यामुळेच काम करायला सुरूवात करण्यापूर्वी वरील सर्व मुद्द्यांनी काळजी घ्या. 
- मोहिनी घारपुरे - देशमुख 

गुरुवार, १४ डिसेंबर, २०१७

तुम्हारा कुछ सामान ... तुरंत लेके जाओ

मेरा कुछ सामान, तुम्हारे पास पडा है ..

असं आळवत, प्रेमभंग झालेली प्रेयसी रडते आणि प्रियकराला आपल्या प्रेमाच्या आठवणींची साक्ष देते.. सावन के कुछ भीगे भीगे दिन परत मागते, कधी शृंगाराच्या आठवणी परत मागते .. आणि अगदी शेवटी, या आठवणी मी मिटवून टाकणार आहे, आणि त्या आठवणींबरोबर मी देखील मरून जाणार आहे, आणि ते करण्याची तू मला परवानगी दे ...
आशाजींच्या आवाजातलं हे गाणं अजरामर आहे..
प्रेमबिम करायच्या वयात असताना हे गाणं मी कित्तीतरी वेळा ऐकलं असेल, हे गाणं ऐकून व्याकूळ व्हायला न झालं तरच आश्चर्य ..
पण नव्या काळात दिवसागणिक पेपरांतून येणाऱ्या बातम्या वाचून हादरायला होतं.  प्रेमप्रकरणांमुळे होणारा मनस्ताप आणि त्याची परिणीती थेट हत्या, आत्महत्या अशा टोकापर्यंत झालेली पाहून असं वाटतं, प्रेम बिम करा पण त्यात अडकू नका.
थोडासा रूक्ष, काहीसा उथळ असा हा विचार वाटत असला तरीही आपल्याकडील दिवसागणिक वाढते क्रौर्य, वाढता द्वेष पाहता तोच जास्त बरा आहे असं वाटतं.
तुम्हारा कुछ सामान पडा होगा तो वो तुरंत लेके जाओ ...
असंच  काहीसं हल्लीच्या काळात प्रेमप्रकरण वगैरे करणाऱ्या जोडप्यांनी म्हणायला हवं. थोडक्यात काय तर प्रेम यशस्वी होणार नाही असं लक्षात आलं तर त्या गुंत्यात फार काळ अडकून पडू नका.. त्यातून बाहेर पडा आणि आयुष्य आनंदाने जगायला लागा .. जुनं काही उगाळायचं नाही, जुन्या कटू आठवणींनी उरलेलं आयुष्य विस्कटून टाकायचं नाही .. कदाचित नवं काहीतरी चांगलं आपल्या समोर येणार असेल हा विचार गाठीशी बांधायचा आणि पुढे चालत रहायचं. प्रेम वगैरे सगळं ठीक आहे पण जीवन त्याहीपेक्षा फार फार अमूल्य आहे, ते तुम्हाला एकदाच मिळतं आणि ते नासाडायचा तुम्हाला काहीही हक्क नाहीये हेच खरं.. असं मला सुचवायचं आहे.
प्रेमाचे गुंते करायचे नाहीत अशा विचारांची तरूण तरूणी आमच्या पिढीत दिसायला लागली याचं कारणंच मुळी आपल्याकडील चारित्र्य आणि नीतीमत्तेबाबत होत असलेले भंपक, वरवरचे विचार ...

प्रेम करणाऱ्या जोडप्यांना ठार मारायला धावणारे लोक स्वतःतर त्याहूनही भयंकर क्रोर्य उरात बाळगून असतात ना .. प्रेमात पडलेल्यांच्या मनात प्रेम असतं आणि मारणाऱ्यांच्या मनात क्रौर्य .. पण लोकांना क्रौर्य, संताप कळतो पण प्रेम कळत नाही हे समीकरणच आमच्या पचनी पडत नाही. तुमचं प्रेम वेगवेगळ्या पातळीवर खुलतं, फुलतं... पण तरीही लोकांच्या ते डोळ्यात येतं.
आपल्याकडे एखाद्याशी खोटं बोलणं, फसवणूक करणं, कुणाचा जीव घेणं, एखाद्याची हत्या करणं, लांड्यालबाड्या करणं यासारख्या भयंकर गुन्हेही बिनबोभाट केले जातात, विशेष म्हणजे या गुन्ह्यांना माफीही आहे पण प्रेमासारख्या सुंदर भावनेचा परीघ मात्र लोकांना लक्षात येत नाही हेच खरंतर  दुर्दैव आहे.
प्रेम करणं, सेक्स करणं, एखाद्याकडून त्याच्या इच्छेविरूद्ध शरीरसूख मिळवणं यातलं अंतर, यातला फरक आजही लोकांना कळत नाही, किंबहुना एवढा खोल विचार प्रेमप्रकरणांच्या बाबतीत करायलाच कुणी तयार नाही.
प्रेमासारख्या सुंदर भावनेचे विकृतीकरण करून एखाद्याच्या जीवावर उठणाऱ्या क्रूरकर्म्यांना माफी मिळते पण काहीही गुन्हा न केलेल्या, संवेदनशील, हळुवार मनाच्या प्रेमीयुगुलाला मात्र क्षणाचाही विलंब न करता जीवे मारलं जातं.
खरंतर, शरीरसंबंधाशिवायही प्रेम करता येऊ शकतं का .. असा प्रश्न जर मनाला विचारला तर त्याचं उत्तर होकारार्थीच येईल. प्रेम ही एक खूप मोठी, उदात्त संकल्पना आहे. प्रेम कुणावरही करावं असं म्हणूनच म्हटलं आहे. प्रेमाचा अर्थ केवळ शरीरसूख असा नाही. आपण आपल्या कुटुंबियांवर प्रेम करतो, आपल्या हातून घडलेल्या कलाकृतीवर प्रेम करतो, एखाद्या क्षणावर प्रेम करतो, एखाद्या वस्तूवर प्रेम करतो.. कारण प्रेम एक उत्कट भावना आहे .. सगळ्या जगावर प्रेम करणारी माणसंही होऊन गेलेली आहेतच की ..
मग जेव्हा एखादा मुलगा आणि मुलगी प्रेमात पडतात, तेव्हा ही संकल्पना केवळ शरीरापुरतीच मर्यादीत नसते हे मात्र लोकांना समजत नाही. मुलगा आणि मुलगी प्रेमात पडतात तेव्हा त्यांना एकमेकांपासून शरीरसुख हवं असतं हे खरं, त्या संबंधातून जन्माला येणारं अपत्य, मग आपलं कुटुंब अशी स्वप्नही त्यांनी रंगवलेली असतात पण समजा, हे काहीच मिळालं नाही तरीही एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्याला वाटलेली प्रेमभावना कायम आपल्या मनात तरळत रहातेच की ...
मनाचा गुंता फार मोठा असतो.. म्हणूनच तर प्रेमात पडलेली तरूणी प्रेमभंगाचं दुःख हाती आलं तर मेरा कुछ सामान लौटा दो म्हणत विव्हळते, व्याकूळ होत रहाते.. कदाचित जन्मभर अविवाहीतही रहाते..
पण, एरवी प्रेमीयुगुलांच्या उरावर चढणारे क्रूरकर्मे पहाता असं वाटतं, की प्रेम करा पण प्रेमाच्या गुंत्यात अडकू नका. अर्थात, ठरवून कोणाच्या प्रेमात पडताही येत नाही आणि त्यातून ठरवून बाहेरही पडता येत नाही.. पण म्हणूनच प्रेम असफल झालं तर त्यात गुंतू नका.
तुम्हाला माहितीये का, तुम्ही असं करू शकता... नक्कीच ..
एखाद्याविषयी वाटलेली प्रेमभावना आजन्म मनाच्या कप्प्यात सारून तुम्ही पुन्हा तुमचा दिवस आनंदाने जगू शकता, तुमच्या जीवनाला आकार देऊ शकता.. पण तसं तुम्हाला प्रयत्नपूर्वक करायला हवं.
आणि लोकांनीही प्रेमी जीवांविषयी थोडंस संवेदनशील असायला हवं. मुलामुलींवर बंधनं टाकून, किंवा त्यांना जीवे मारून आपल्या हातात दुःखाशिवाय आणि क्रौर्याशिवाय काय लागतं हा विचार व्हायला हवा.
त्यापेक्षा संवाद साधणं, एकमेकांच्या गरजा ओळखणं, ज्याला जे हवं त्याला ते मिळू देणं, प्रेमी जिवांकडे तुमच्या मनातल्या विकृत नजरेने न पहाणं आणि अकारण (जात, पैसा, प्रतिष्ठा या गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व न देणं) विरोध करणं आदी बाबत अधिक प्रगल्भतेने विचार समाज म्हणून आपण केला पाहिजे.
शेवटी सर्वांनी सुखात असणं, सर्वांनी सुखात रहाणं आणि सुखी होणं हा आपला अधिकार आहे हे विसरून चालणार नाही.. आणि त्यासाठी एकमेकांच्या भावनांचा आदर राखणंच जास्त महत्त्वाचं आहे..

- मोहिनी घारपुरे -देशमुख


सोमवार, ११ डिसेंबर, २०१७

अनुभवांती शहाणपण

अनुभव हा गुरू असतो. अनुभवानी माणसं समृद्ध होतात. काही अनुभव स्वतःहून घेतलेले, काही अनुभव वाटेला आलेले.. काही अनुभव इतरांच्या झोळीतून सांडलेले.. 
लहान असताना काळजी घेणारी आपली आई आपण मोठे होता होता आपल्याला बोलायचं थांबवते आणि अनुभवांच्या कडेवर आपल्याला देऊन टाकते. आपलं पोर, तान्ह, शेंबडं, रडकं .. अगदी कसंही असलं ना तरीही ते अनुभवाच्या कडेवर बसलं की आपोआपच शहाणं होत जाणार याची जणू तिला खात्री असते. 
थांबा, होऊ द्या तिच्या मनासारखं, तिला अनुभव घेऊ देत.. मगच कळेल तिला आपोआप खरं आयुष्य किती अवघड आहे ते .. 
माझ्याही आईच्या तोंडी हेच वाक्य असायचं, आणि मी क्षणाक्षणाला आसुसून जगण्यासाठी सतत सज्ज झालेली असायचे.. विशेष म्हणजे हे अनुभव नेहेमीच नातेसंबंधांमधलेच जास्तकरून माझ्यागाठीशी आहेत. 
एखाद्या सकाळी उठलं आणि दिवसभरात काहीतरी फार रोमांचक करायला सज्ज झालं असलं कधीही मला वाटलं नाही, वाटत नाही. 
त्यापेक्षा, छान छान माणसं जोडावीत, माणसांशी गप्पागोष्टी, हितगुज करत ज्ञान वाढवावं, अनुभवांची देणी घेणी करावीत आणि मस्त आरामशीर एखाद्या घरात किंवा कॅफेमध्ये कॉफी घेत गप्पाष्टकं रंगवावीत असंच वाटायचं. 
वयात यायला लागले आणि आपोआपच जगाचं लक्ष माझ्याकडे आहे हे पावलागणिक जाणवायला लागलं... तासन्तास फोनवर बोलण्याचा छंदही तेव्हाच लागला, तो आजही आहे... 
खूप खूप शेअरींग करण्यात जितका आनंद आहे तितका आनंद अाणखी कशात नाही असंही मधेच वाटून जातं. 
खरंतर माणसाला आजही एक गोष्ट लक्षात आलेली नाही की, तुमच्या आयुष्यात जो आनंद माणसं देऊ शकतात तो आनंद अन्य कशानेही तुम्हाला मिळू शकत नाही. माझ्या कृतीला प्रतिक्रीया देण्यासाठी माणसंच हवीत ना .. पण हेच न कळल्यामुळे माणसं माणसाला दुरावली आहेत. त्यांना निर्जीव वस्तूंमध्ये आनंद शोधावा लागतो किंवा आनंद विकत घ्यावा लागतो हे काहीसं दुर्दैवीच.. 
माणसांच्या गर्दीत राहूनही एकाकी पडलेली माणसं हे आजच्या घडीचं विदारक सत्य आहे. 
रामराज्यातली माणसं म्हणे खूप सुखी होती... का .. कारण त्यांच्याजवळ माणसं होती, माणसांपासून मिळणारं सुख त्यांना मुबलक प्रमाणात मिळत होतं.. 
आणि आजच्या काळातल्या माणसांजवळ सुख मिळवण्याची शेकडो साधनं असूनही माणसं खूप खूप दुःखी आहेत, त्यांच्या पोटातली माया दाखवायला त्यांना कुणी नाही, त्यांच्यावर जीव लावणारी माणसंही त्यांना मिळालेली नाहीत. 
गणित वगैरे कधीही फारसं न आवडलेल्या मला म्हणूनच, माणसं आवडतात. पण तरीही माणसांच्या निवडी करण्यात मी आजवर शेकडो चुका केल्या आहेत. चुकीच्या माणसांवर विश्वासाने विश्वास ठेऊन गाठीशी फक्त निखारेच घेऊन परतले आहे. अपमान, अवहेलना, राग, मत्सर, द्वेष अशा सगळ्या विखारी भावना माझ्यावर निघाल्यात असे अनेक प्रसंग मी सहन केलेले आहेत पण तरीही तत्कालीन राग शांत झाला की पुन्हा मी त्या माणसांना तितक्याच प्रेमाने आणि मनात काहीही न ठेवता संधी देते .. हे कसं जमतं हे कोडं माझं मलाही सुटलेलं नाहीच आजवर, पण असं आहे .. 
शब्दाशब्दाने दुखावलो गेलो तरीही मनामनाने तेव्हाच जवळ येत असतो आपण हे मनाचं गणित मला कळतं. मी संवेदनशील आहे तशीच सहवेदना जाणणारीही आहे.. दुःखाची अनुभूती मला चटकन होते, आणि दुःखाच्या भावनेत रहायला मला आवडतं. मग वरवर जाणणाऱ्या माझ्या परिचितांना मी कायम रडत असते असं वाटतं खरं, पण ते तसं नसतं, कारण मी आलेला क्षण तितक्याच आनंदाने जगत असते. इतरांसाठी सुखाच्या आठवणी निर्माण करते, आणि इतरांच्या सुखदुःखात सहभागी होते, समरसूनही जाते .. 
हे सारं जमतं कसं ... तर याचं उत्तर आहे, अनुभवांती आलेलं शहाणपण .. 
वेगवेगळे बरेवाईट अनुभव घेताना मी आसुसून जगले आहे हेच खरं.. 
आता जगायचं म्हटलं तर बरेवाईट अनुभव येणारच.. कोणाचंही आयुष्य एका सरळ रेषेत गेलेलं नाही, जाऊ शकत नाही, किंबहुना जाऊ नये.. 
आयुष्याची रेष वळणावळणाची असते अन् त्या रेषेवरून माणसाला इच्छा असो, वा नसो, चालावच लागतं.. 
म्हणूनच जे आलं ते भरभरून जगायला शिकलं पाहिजे. वाईट अनुभव आले तरीही चालणं थांबवायचं नाही, चांगले अनुभव आले तर उड्या मारत सुटायचं नाही.. 
शहाणपण गाठीशी तेव्हाच येतं जेव्हा तुम्ही जगता, आणि जगता जगता शिकता .. 

- मोहिनी घारपुरे - देशमुख 

Translate

Featured Post

अमलताश