शनिवार, १९ जानेवारी, २०१९

नमकीन

स्वप्न, नाती आणि वास्तव, व्यवहार यांच्यातलं अंतर जर कधी कोणाला कायमचं पुसून टाकता आलं ना .. तर त्याने ते नक्की करावं , कारण, या भूतलावर सगळ्यात जास्त आवाज असेल ना तो या मोडलेल्या स्वप्नांचा आणि तुटलेल्या नात्यांचा ..
एक अशीच चटका लावून जाणारी कथा आहे नमकीन या चित्रपटाची.. खुद्द गुलझार साहेबांच्या लेखणीतून उतरलेली कथा आणि त्यांच्या दिग्दर्शनांतर्गत बनलेला हा चित्रपट आयुष्याच्या खाणाखुणा आपल्या आत खोलखोल उमटवून गेल्याशिवाय रहात नाही. एक नाही, दोन नाही तर तब्बल चार पाच पात्रांच्या आयुष्याची गोष्ट ही कथा मांडते .. सगळे एकाच नावेचे प्रवासी तरीही प्रत्येकाच्या जीवनाची वाट वेगवेगळ्या वळणांवर वळते, बघता बघता जो तो आपापल्या वाटेने पुढे निघून जातो .. आणि आपण प्रेक्षक जागीच खिळतो .. आपले पाय जड पडतात .. ही कथा सुखाची की दुःखाची हेच मुळी आपल्याला कळेनासं होतं .. आणि शेवटी डोळ्यावरून गालावर आपल्याही नकळत ओघळलेल्या खाऱ्या पाण्याची चव नकळत आपण चाखतो तेव्हा कळतं हा चित्रपट खऱ्या अर्थाने 'नमकीन' आहे ..
गेरूलाल (संजीव कुमार) ट्रकचालक असतो. ठेकेदाराकडे कामाला असतो. एका गावात कामानिमित्ताने येतो. तो काही दिवस रहाण्यासाठी घर शोधत असतो. धनीराम एक साधारण होटलवाला गेरूलालला, जुगनी तथा अम्मा (वहीदा रेहमान) हिच्याकडे भाडेकरू म्हणून घेऊन जातो. जुगनी आणि तिच्या तिघी मुली, निमकी (शर्मिला टागोर), मिठू (शबाना आझमी) आणि चिंकी (किरण वैराले) या एका पडक्या घरात रहात असतात. घरात पुरूषमाणूस नाही.. त्यामुळे धनीरामच्या होटेलकरिता मसाले विकून आणि शेणाच्या गोवऱ्या बाजारात विकून आपला उदरनिर्वाह करत असतात. वरच्या बाजूची खोली भाड्याने देत असत पण बरेचदा भाडेकरू भाडंबिडं न देताच पसार होई असा अनुभव.. अशातच गेरूलालला धनीराम घेऊन येतो.. नुसता ओळखीवर व्यवहार ठरतो आणि गेरूलाल तिथे राहू लागतो. आपल्या तरण्याताठ्या मुलींकडे पहायचं नाही आणि वेळेवर भाडं द्यायचं या दोन अटींवर अम्मा गेरूलालला ठेऊन घेते. घरात आलेला हा अनोळखी पुरूष आणि या तिघी मुली .. त्यांना हा ' नवा प्राणी ' म्हणजे येता जाता टपली मारायला गिऱ्हाईकच (चांगल्या अर्थाने) मिळतं जणू .. सुरूवातीला खोडसाळपणे वागणाऱ्या या मुली, कटकट करणारी अम्मा आणि तरशींगरावाप्रमाणे वागणारा गेरूलाल यांचं हळूहळू एकमेकांशी नातंच तयार होतं. तो अगदी त्या कुटुंबातला होऊन जातो. गावात वेगळीच चर्चा सुरू झालेली असते, कोणी म्हणतं, हा नवा भाडेकरू तिघींपैकी एकीला जरी लग्न करून नेईल तरी अम्माचं ओझं कमी होईल.. कोणी म्हणतं, ती म्हातारी कसली नेऊ देईल एका तरी मुलीला या भाडेकरूला .. एखाद्या पक्षिणीप्रमाणे बसलीये आपल्या अंड्यांवर ..
असेच दिवस जात असतात .. मग हळूच एकेका पात्राची कथा जन्म घेत जाते.. बडबडी चिंकी, घराच्या जबाबदारीपोटी पोक्तपणा आलेली निमकी आणि अबोल असलेली मिठू यांच्या आयुष्याची रेष गेरूलालबरोबरच पुढे पुढे सरकत जाते..
इथवरचा सगळा चित्रपट अगदीच साधा पण गोड ..
मग एकदा गेरूलालची चिठ्ठी येते, ती कोणीतरी वाचल्याची शंका येऊन तो मिठ्ठूला त्याविषयी विचारणा करतो. मिठ्ठू बोलत नाही .. तेव्हा तो जोरात ओरडून विचारतो, बोलती क्यू नही.. मूँहमें जुबान नहीं है क्या आणि मिठ्ठू पळत जाते ... हमसून रडते .. नंतर निमकी गेरूलालला या वर्तनाविषयी जबाब विचारायला येते .. आणि ओघात कळतं, की मिठ्ठू मुकीच असते .. तिला लहानपणी कोणीतरी उचलून नेलेलं असतं आणि ती परत येते तेव्हा तिची वाचाच गेलेली असते... इथे आपल्याला पहिला धक्का बसतो.. आणि इथून चित्रपट एका वेगळ्याच वळणावर .. एका वेगळ्याच उंचीवर जातो. मग गेरूलालला फार वाईट वाटतं, आता तो तिचा राग काढायचा प्रयत्न करतो .. ती कविताही करते हे कळल्यावर तो त्या माध्यमातून तिचा राग काढायचा प्रयत्न करतो आणि मग पुन्हा गट्टी होते.
तोवर चिंकी, निमकी यांची गेरूशी दोस्ती झालेली असते. निमकी सगळ्यात मोठी .. तिला वाटत असतं, गेरूने मिठ्ठूशी लग्न करून टाकावं .. तर चिंकीला आणि अम्मालाही वाटत असतं गेरूने निमकीशी लग्न करावं आणि आपल्या कुटुंबाशी कायमचं जोडलं जावं.. सगळ्याच जणी आपापल्या मनातली इच्छा संधीसाधून त्याला बोलूनही दाखवतात .. वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या प्रसंगात .. खरंतर त्यालाही निमकी आवडत असते पण त्याची नोकरी फिरतीची .. त्यामुळे तो काहीसा विचारात पडलेला असतो.. तरीही एकदा तो निमकीला लग्नाचं विचारतोच .. तेव्हा ती जबाबदाऱ्यांच्या ओझ्यात आपण अडकलेलो असल्याने लग्नाचा विचारच करू शकत नाही असं सांगते आणि त्याला मिठ्ठूशी लग्न कर अस सुचवते .. पण त्याच्या मनात असं काही नसतंच मिठ्ठूविषयी .. त्यामुळे तो थांबतो..
आता पुढे काय .. हा कोणाशीतरी लग्न करतो की नाही करत या प्रश्नावर आपण प्रेक्षक रेंगाळत असतानाच पुन्हा एक महत्त्वाचं वळण कथानक घेतं. गेरूलालला नव्या ठिकाणी काँट्रॅक्टवर जायचंय असं त्याचा मालक सांगतो. क्षणभर गेरूही मनातून हलतो, त्याला तिथून जावसं वाटतचं नसतं ना मुळी .. पण शेवटी काम महत्त्वाचं .. त्यामुळे तो सामान बांधायला घेतो .. सगळ्यांनाच वाईट वाटतं. निघण्यापूर्वी गेरू चौंघींनाही काही ना काही भेट देतो .. निमकीला सांगून जातो, की मिठ्ठूला मी जी कविता करण्यासाठी वही दिलीये त्यात पत्ता दिलाय माझा नवा .. तुला वाटेल तेव्हा, गरज लागेल तेव्हा मला या पत्त्यावर संपर्क कर .. आणि तो निघतो .. पुढच्या मुक्कामाला निघून जातो ..
इकडे जुगनीच्या परिवाराला गेरूच्या निमित्ताने लागलेला आशेचा अंकूर त्या क्षणी मरून गेलेला असतो आणि होतंही तसंच ..
जुगनी म्हणजे अम्मा पूर्वी एका नौटंकीत नाचत असते . अशात तिचं नौटकीतला सारंगीवाला किशनलाल याच्यावर प्रेम जडतं आणि ते लग्न करतात. जुगनीला घर संसार मुलं हवी असतात आणि किशनलाल तिला ते सगळं देतोही पण तो स्वतः एक अय्याश माणूस असल्याने केव्हाच कुटूंबाला, घरादाराला तिलांजली देऊन नाटकाच्या दुनियेत बुडून जातो. जुगूनी म्हातारी होत जाते आणि तिघी मुली वयात येत जातात तेव्हा अधूनमधून किशनलालची पावलं घराकडे घुटमळत जातात, आता त्याला मुलींना नौटंकीत नाचवायचं असतं ना .. एकदिवशी लहानग्या मिठ्ठूला तोच तर उचलून नेतो .. तिच्यावर अत्याचार करतो आणि परत आणून सोडतो .. याच धक्क्याने खरंतर तिची वाचा जाते, कायमची ..
मग एकदा गेरूच्या तिथल्या वास्तव्याच्या काळात रात्री धारदार सुरा घेऊन हा म्हाताऱ्या किशनलाल जुगनी आहे का अशी विचारणा करत घरात घुसण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा गेरू त्याला अडवतो, इथे कोणी जुगूनी बिगनी रहात नाही चल निघ असं म्हणून हाकलून देतो .. कारण गेरूला स्वतःलाच जुगनीची म्हणजे अम्माची ही पार्श्वभूमी माहीत नसते.
मग एकदा कधीतरी गावात नौटंकीवाले येतात तेव्हा अम्मा पिसाटल्यासारखी धावत घरी येते .. तिघी मुलींना खोलीत डांबते आणि स्वतः पहारा देत रात्रभर बाहेर बसून रहाते .. तेव्हा गेरूलाल तिला याबद्दल विचारतो आणि तिची ही कहाणी ऐकून सुन्न होतो..
अशा या एकाकी पडलेल्या कुटुंबाचा आधार झालेला गेरू सोडून गेल्यावर काय होणार ना .. जे व्हायचं तेच होतं..
तीन वर्षांनंतर गेरू जेव्हा नौटंकी पहायला जातो तेव्हा समोर नाचणारी मुलगी म्हणजे अम्माची चिंकी आहे हे पाहतो आणि त्याची पायाखालची जमीन हादरते.. तो ताबडतोब तिची भेट घेतो. तिला खडसावतो, अम्मानी नौटंकीत यायचं नाही बजावलं होतं ना तरीही तू का आलीस ... आणि ती आता एक अवखळ मुलगी राहिलेली नसते.. तिने विचारपूर्वक हा निर्णय घेतलेला असतो .. कारण तिला जगायचं असतं.. मनासारखं .. ती म्हणते, आईनी आम्हाला जगूच दिलं नाही, ना ती स्वतः जगली, ना आम्हाला जगू दिलं.. जेव्हापासून समजायला लागलं तेव्हापासून लोकांची खोटी सहानुभूतीच तर मिळतेय फक्त .. आम्ही सगळ्याजणी एकमेकींसाठी कुर्बानीच तर देत बसलो जन्मभर .. जगलो कोणीच नाही .. मला मरायचं नव्हतं निमकीसारखं म्हणून मी तिथून पळून आले.. आणि तू, तू तरी काय केलंस आमच्यासाठी .. मी धीटाईने तुला तेव्हा म्हटलं होतं निमकीशी लग्न कर पण तू तूही खोटी सहानुभूती दाखवून निघून गेलास आमच्या आयुष्यातून .. तेवढ्यात तिचा बाप किशनलालला तिथे पाहून गेरूला फार राग येतो, वाईट वाटतं पण त्याच्या हातात काहीच उरलेलं नसतं. किशनलाल विचारतो, तूच होतास ना त्या रात्री .. आता जुगुनीला भेटशील का पुन्हा .. भेटलास तर सांग, आयुष्यात सुखी तीही नाही झाली, मीही नाही झालो .. पण काय करणार आयुष्य ज्या वाटेनं नेतं त्या वाटेनंच पुढे जगत जावं लागतं ..
आता गेरूच्या डोळ्यासमोर सगळा भूतकाळ झरझर निघून जातो. तो तत्क्षणी जुगूनीच्या गावाला जातो. तिच्या घरी जातो आणि बघतो तर काय त्या पडक्या घरात एकाकी उरलेली निमकी .. ती त्याला बघताच तिचा बांध फुटतो .. ती ढसाढसा रडते .. गेरूलाल तुला मी आज जाऊ देणार नाही असं हक्कानी सांगते आणि सतत तिचे डोळे भरून येतात.
तीन वर्षात तिची रयाच गेलेली असते .. कारण घडलंही तसंच असतं सगळं.. ती सांगते, तुझ्या जाण्यानंतर चार पाच महिन्यातच मिठ्ठू वेडी झाली.. त्या वेडातच उंच कड्यावरून कोसळून मरण पावली. कळलंच नाही ..हे सगळं कसं झालं .. तिच्या जाण्यानंतर अम्मानही अंथरूण धरलं .. बघता बघता कधीतरी तिचीही प्राणज्योत विझली .. चिंकीही घरातून पळून गेली ..जाता जाता चिठ्ठी लिहून गेली, मी तुम्हा तिघींसारखी वेडी होऊन मरू इच्छीत नाही .. माझा शोध घेऊ नका .. मी शेवटपर्यंत अम्माला सांगूच शकले नाही की चिंकी निघून गेली..
आता गेरूला भरून येतं.. तो म्हणतो, निमकी त्या दिवशी तू म्हणाली होतीस मी या सगळ्यांना सोडून येऊ शकत नाही आणि बघता बघता सगळ्याजणी तुला सोडून गेल्या.. आता तू एकटीच उरलीस .. आता तू माझ्याबरोबर चल ..
तरीही, तिला भाबडी आशा वाटते, की मी येते पण चिंकी परत आली तर .. तेव्हा गेरू सांगतो, मी तिला भेटलोय आणि ती जिथेकुठे आहे तिथे आनंदात आहे .. ती आता कधीच परत येणार नाही ..
आणि अखेरीस गेरूलाल आणि निमकी त्यांच्या जीवनाच्या पुढल्या वळणावर निघतात ..
चित्रपट संपतो .. आणि आपण नमकीन चित्रपटाने पाणावलेल्या आपल्या डोळ्यातून गालावर ओघळलेल्या खाऱ्या पाण्याची चव जीभेवर चाखूनच निघतो..
आयुष्याचं गणित गुलझार नावाच्या या माणसाला जे कळलंय ना ते केवळ आहाहा ..
इतकी साधी सुंदर कथा, किती साधी सुंदर मांडणी .. आणि तरीही किती आशयपूर्ण ..
या चित्रपटातलं सर्वात सुंदर गाणं म्हणजे .. फिरसे आईयो बदरा बिदेसी तेरे पंखोंपे मोती जडूंगी .. पहाडी धुक्यातून शबानाच्या मिठास अभिनयाचा आस्वाद घेत आपण गाणं पहात रमतो आणि अशा पहाडातून आशाताईंचा एक निर्व्याज स्वच्छ सूर त्या पहाडीतून घुमत घोंगावर आपल्या कानातून मनात पोचतो तेव्हा अत्यानंदाची लकेर शरीरातून घुमत जाते.
तसंच दुसरं गाणं राहपे रेहते है, यादोंपे बसर करते है, खुश रहो एहेदे वतन हम तो सफर करते है ऐकताना आपल्याही जीवनातील अशी अवघड एकाकी वळणं क्षणभर आपल्या डोळ्यासमोर तरळून जातात.
आंकी चली बाकी चली गाणं होईपर्यंतही आपल्याला कळत नाही की ती मिठ्ठू मुकी आहे .. आणि नंतर ज्या क्षणी कळतं तेव्हा आपल्याला चित्रपट मागे फिरून पहावासा वाटतो .. पुन्हा एकदा .. आणि वाटतं, अरे खरंच आपल्याला कसं लक्षात आलं नाही एवढा वेळ की ती मिठ्ठू (शबाना आझमी) मुकी आहे म्हणून ..
संजीव कुमारनं रंगवलेला गेरूलाल, किरण वैरालेनी रंगवलेली रंगवलेली चिंकी आणि वहीदा रेहमान यांनी रंगवलेली जुगनी तर अप्रतिमच .. अगदी तस्सच शबाना आणि शर्मिला यांचेही अभिनय तोडीसतोड ..
आपल्याला आयुष्यात भेटलेली ही सगळी पात्र आणि हा चित्रपट या सगळ्या बारकाव्यांमुळे आपल्या लक्षात राहून जातो तो कायमचाच ..
आणि गुलझार साहेब ..
त्यांच्या लेखणीला, प्रतिभेला आपण प्रेक्षक शतशः प्रणाम करून निघतो पुन्हा .. आपल्या नमकीन आयुष्याची कथा आपली आपण पुढे लिहायला .. पूर्ण करायला ..


- मोहिनी घारपुरे देशमुख



 

(Photo credit - youtube)

२ टिप्पण्या:

  1. मी व विनायकने हा चित्रपट पूर्वी पाहिला होता. आणि खूप आवडलाही होता. या चित्रपटाची कथा पूर्णपणे विसरायला झाले होते.
    कथा छान शब्दबद्द केली आहेस. आता युट्युबवर शोधते हा चित्रपट मिळाला तर नक्कीच पाहीन. अपने पराये हा चित्रपटही खूप छान आहे.
    अमोल पालेकरचे सर्वच चित्रपट चांगले असतात. धन्यवाद मोहिनि या चित्रपटाबद्दल लिहिल्याबद्दल !

    उत्तर द्याहटवा

Translate

Featured Post

अमलताश