गुरुवार, २३ जुलै, २०२०

सुशीला

'स्त्री जन्मा ही तुझी कहाणी ..' असा उद्गार सहज तोंडातून निघेल,अशी एक व्याकूळ करून टाकणारी कथा असलेला चित्रपट ... सुशीला .. !!
'शब्दरूप शक्ती दे भावरूप भक्ती दे' इथपासून सुरू झालेली सुशीलाची कथा अखेरीस 'जीवन इसका नाम है प्यारे .. तुझे है आगे चलना रे' हा संदेश देऊन जाते आणि आपण प्रेक्षक अक्षरशः मनातून हालतो.


जीवनाचे रंग कुणाला कळले आहेत .. ? इतके अशाश्वत असलेले हे जीवन ..! कधी क्षणात आनंद देते तर कधी पुढल्याच क्षणी माणसावर दुःखाचे पहाड कोसळवून सगळा तमाशा आनंदाने पहात रहाते. एका क्षणी देवत्व जिथे गवसतं तिथेच पुढल्या क्षणी या जीवनाचं एक नरभक्षक रूप माणसाला हादरवून सोडतं... पण तरीही माणूस जगण्याची जिद्द सोडत नाही हेच माणसाचं श्रेष्ठत्व .. एकवेळ सुख नाही मिळालं तरी चालेल .. पण आपण जगण्याच्या संघर्षात कमी पडणार नाही यासाठी माणूस आला दिवस काढत जातो.. कधी सुख, कधी दुःख .. कधी पोटभर अन्न .. कधी कणभर अन्नालाही पारखा होतो पण एक ना एक दिवस आपला येईल ही आशा मनात सतत बाळगत जीवनाचं चाक पळवत रहातो.
अशीच एक असते सुशीला .. 
एका गावातल्या शाळेत शिक्षिकेच्या नोकरीवर रूजू झालेली .. विद्यादानाचं श्रेष्ठ कार्य हाती घेऊन उज्ज्वल भविष्य, स्वतःचं आणि आपल्या विद्यार्थ्यांचंही घडवायला निघालेली .. पण तिचं नशीब काहीतरी वेगळाच खेळ तिच्याशी खेळतं.
वर्गातल्या एका मुलाला नटनट्यांचे फोटो पहाताना सुशीला (रंजना) पहाते आणि चांगलीच समज देऊन त्याला वर्गाबाहेर काढते. काहीशी करारी, तडफदार आणि देखणी सुशीला .. तिच्या बोलण्यात चांगलीच जरब. मुलगा वर्गातून निघून घरी जातो नि लगेचच मोठ्या भावाला (अविनाश मसुरेकर) घेऊन शाळेत येतो. हा मोठा भाऊ पेशाने वकील.. तो सुशीलाला जाब विचारतो तशी सुशीला त्याचीही चांगलीच कानउघडणी करते. वकीलसाहेब आपल्या भावाची चूक कळल्यावर तिथून निघून जातात खरे पण झाल्या प्रकाराने काहीसे दुखावलेलेच असतात... तरीही त्यांच्या मनात तिच्याबद्दल आकस वगैरे खरंतर राहिलेला नसतो, ना त्यांच्या मनात तिच्यासारख्या देखण्या स्त्रीबद्दल काही निराळे विचार असतात. पण नंतर त्यांच्यात आणि सुशीलामध्ये योगायोगानेच ज्या काही विचित्र घटना घडतात, त्या घटनांचा एकच थेट अर्थ जो एरवीही कोण्याही स्त्रीने लावला असता तोच सुशीलाही लावते.. तिला वाटायला लागतं, हे वकीलसाहेब आता या ना त्या कारणाने आपल्याला त्रास द्यायला लागले आहेत .. आपल्या मागे लागले आहेत.. आणि या समजामुळेच खरंतर, आधीच प्रचंड करारी, धीट नि तडफदार, सडेतोड स्वभावाची असलेली सुशीला प्रत्येकवेळी वकीलसाहेबांचा अपमान करत सुटते.. दोन चार प्रसंगानंतर शेवटी वकीलसाहेबांचा आत्मसन्मान दुखावला जातोच पण ते इतके चिडतात की रागाच्या भरात सुशीलाच्या घराचं दार तोडून तिच्यावर अतिप्रसंग करतात. सुशीलाचं आयुष्य एका क्षणात उद्ध्वस्त होतं ते कायमचंच .. 
सुशीलाच्या आयुष्याची वाताहत होते.. 
एका गावातून दुसऱ्या गावी भणंग भिकाऱ्यासारखी फिरण्याची वेळ तिच्यावर येते..एका चांगल्या सन्मानानं जगणाऱ्या सुशीलासारख्या एका शिक्षकी पेशा असलेल्या स्त्रीचं जीणंही शेवटी तिच्या अब्रुपाशीच ठेचकाळतं.. अरेरे ..
दुसऱ्या गावी विषण्ण मनोवस्थेत पोहोचत नाही तोच तिला कुणीतरी अनोळखी स्त्री मदत करण्याच्या बहाण्याने थेट धंद्याला लावायला निघते तो बिचारी सुशीला तिथून पळ काढते. तिचा पाठलाग करत ती कुंटणखाना चालवणारी माणसं निघतात .. तर सुशीला एका रस्त्यालगतच्या खोपटात शिरते आणि तिथे तिला भेटतो एक भणंग माणूस, ज्याचा एक हात तुटलेला आणि जो त्या खोपटात हातबट्टीच्या दारूचा व्यवसाय करत जीवन जगत असतो. काळोख्या रात्रीला आपल्या दारात आलेल्या बेसहारा बाईला संरक्षण देण्याइतका पुरूषार्थ या अपंग, भणंग माणसात ठासून भरलेला असतो आणि म्हणूनच तो त्या माणसांशी अक्षरशः जीवावर उदार होत हातापायी करून अखेरीस सुशीलाला वाचवतो.
आता खोपटात ती दोघंच उरतात .. दारूचा ग्लास तिच्या हाती देणारा तो (अशोक सराफ) क्षणात तिच्याशी भावाचं नातं जोडतो आणि त्याची कर्मकहाणी ऐकवतो.. आणि सुशीलाची कहाणी ऐकताना त्याचे डोळे भरून येतात. आता सुशीला त्याच खोपटात आपल्या मानलेल्या भावाबरोबर राहू लागते.. अशातच एके दिवशी सुशीलाला कळतं, की तिच्यावर झालेल्या अतिप्रसंगामुळे निसर्गानं आपला धर्म चोख बजावला आहे, ती आई होणार आहे .. हे कळताच तिच्या पायाखालची जमीन सरकते पण तरीही हा मानलेला भाऊ तिला आधार द्यायला भक्कम असतो. बाळाचा जन्म होतो आणि अगदी नेमकी त्याच दिवसांत पोलीसांची धाड या खोपटावर पडते. भाऊ ओल्या बाळंतिणीला विनवतो आणि घाईघाई सांगतो, की काहीही झालं तरी बाळाच्या रडण्याचा आवाज येऊ देऊ नकोस .. आणि स्वतः पोलीसांपासून लपण्यासाठी थोडावेळ घरातून निघून जातो. इकडे पोलीस येण्याची चाहूल लागते तशी सुशील बाळाच्या तोंडावर घट्ट हात ठेवते.. पोलीस खोपटाची झडती घेतात आणि आल्यापावली निघून जातात पण तेवढ्या वेळात इकडे बाळाची प्राणज्योत खुद्द आईच्याच हातानी मालवली जाते.. या बाळाच्या रूपानी कदाचित सुशीलाच्या जीवनाला नवी दिशा मिळणार असते .. पण हाय रे कर्मा .. पुन्हा एकदा सुख सुशीलाला हुलकावणी देऊन जातं.. 

कुण्या गावाचं आलं पाखरू गाण्यात रंजनाजींची एक भावपूर्ण अदा

अखेरीस नशीबापुढे हात टेकून पुन्हा जगण्याचं चाक फिरवण्यासाठी सज्ज झालेल्या सुशीलावर आता जगण्यासाठी अक्षरशः ब्लॅकने तिकीटविक्रीचा धंदा करायची वेळ येते.. पाकीटमारी, उचलेगिरी करणंही त्याला जोडून येतंच.. ती अक्षरशः रस्त्याच्या कडेला संसार मांडते.  
अशातच, एका संध्याकाळी त्याच थिएटरमध्ये चित्रपट पहायला ते वकीलसाहेब ( ज्यांनी सुशीलावर ही वेळ आणली ) त्यांच्या पत्नीला घेऊन येतात आणि बाहेर सुशीलाला या भणंग अवस्थेत हे असलं काम करताना पाहून अक्षरशः त्यांच्या पायाखालची जमीन सरकते. आपल्या भूतकाळातील चूक एक जीवन उद्ध्वस्त करून जाईल याची सुतराम कल्पनाही त्यांना त्यांच्या तारूण्याच्या भरात आलेली नसते .. आणि म्हणूनच त्यांना सुशीलाचा विचारही तोवर कधी आलेला नसतो. आज जेव्हा स्वतःचा भूतकाळ असा क्रूरपणे वाकुल्या दाखवत त्यांच्यासमोर त्यांना दिसतो तेव्हा त्यांना जाणवतं की त्यांनी रागाच्या भरात किती मोठा अपराध केला आहे ते.. मग काय, त्या क्षणापासून वकीलसाहेबांचं चित्त थाऱ्यावर रहात नाही. आपल्या चुकीचं प्रायश्चित्तं घ्यायला हवं हे जितक्या तीव्रतेनं त्यांचं मन त्यांना सांगायला लागतं, तितकंच, सुशीलाची अशी अवस्था कशी झाली हे देखील आता त्यांना जाणून घेण्यासाठी चुटपूट लागून रहाते. मग ते वेळीअवेळी तिचा पाठलाग करत, तिचा शोध घेत रहातात.. आणि अर्थातच ती त्यांना टाळत रहाते. पाकीटमारी, ब्लॅकचा धंदा सोडून आपल्या भावासह दुसऱ्या गावी जाते. तिथं एका तमाशाच्या कंपनी लावणीनृत्य शिकते आणि फडावर नाचायला लागते.. पण वकीलसाहेब तिथवरही तिचा पाठलाग करत येतात.. कारण त्यांचं मन त्यांना दिवसरात्र खात असतं. 
अखेरीस एक दिवस, ते तिला गाठतात नि आपल्याला प्रायश्चित्त म्हणून तुझ्याशी लग्न करायचंय, तुझं जीवन मार्गावर आणायचंय असं तिच्यापुढे कबूल करतात. तिची मनधरणी करून तिला घरी आणतात.. पण दारात त्यांची पत्नी (उषा नाईक) तिला अडवते.. आणि जे सहाजिकच असतं. खरंतर, त्याचदरम्यान सुशीलावर पाकीटमारीबद्दल कोर्टात केस सुरू असते पण ती एकाही तारखेला कोर्टात हजर राहीली नसल्याने नेमकं त्याचवेळी वकीलसाहेबांना तिच्यावतीने कोर्टात हजर रहायला लागणार असतं. ते आपल्या पत्नीला लग्नात दिलेल्या वचनाची आठवण करून तिला सुशीलाला घरात थांबू देण्याची गळ घालतात आणि स्वतः कोर्टात निघून जातात. इकडे सुशीलाच्या मानलेल्या भैय्याने या वकीलाबद्दल जेव्हापासून कळलेलं असतं, तेव्हापासून सूडाच्या भावनेपोटी, वकीलाच्या पत्नीचीही सुशीलासारखी, आपल्या बहीणीसारखी अवस्था एक ना एक दिवस करू अशी शप्पथ घेतलेली असते.. आणि आता ती शप्पथ जणू पूर्ण करण्याची ही आयती संधी आहे असं वाटून तो सुशीलाचा माग काढत वकीलसाहेबांच्या घरी जातो. घरात वकीलसाहेब नाहीत हे पाहून तो आता इरेला पेटतो आणि त्यांच्या बायकोवर अतिप्रसंग करून आपल्या बहीणीचा सूड घ्यायला सरसावतो. सुशीला त्याला हात जोडून विनवत असते नि थांबवत असते पण तो .. तो आता मागे हटणं शक्यच नसतं.. अखेर जवळच पडलेल्या फळांच्या टोपलीतला धारदार सुरा दिसताच, सुशीला त्या क्षणी त्या पतिव्रतेला वाचवण्यासाठी आपल्या मानलेल्या भावावर सुऱ्याने वार करते नि तो जागीच कोसळतो... 
हाय रे .. ज्या माणसाने सुशीलाला संकटातून वाचवले .. आज त्याच माणसाचा खून करण्याची वेळ तिच्यावर आली ... किती ते दुर्दैव ..!!
अर्थातच पुढे या खुनामुळे कोर्टात खटला चालतो. सरकारी वकील निरनिराळ्या प्रकारे कोर्टापुढे, सुशीला ही किती चवचाल आणि बनेल बाई आहे हे सिद्ध करत जातात आणि सुशीलाची बाजू घेऊन तिची कर्मकहाणी, तिच्यावर ही वेळ ज्यांच्यामुळे आली ते वकीलसाहेब कोर्टाला कथन करतात.. आपल्या पापाची कबूली देतात.
कोर्टाचा निकाल येतो.. सुशीलाला फाशीऐवजी जन्मठेपेची शिक्षा मिळते आणि जाताजाता ती पुन्हा आपल्या गळ्यात वकीलसाहेबांनी घातलेलं मंगळसुत्र त्यांच्या पत्नीच्या गळ्यात बांधून निघून जाते... 
पुढे तिच्या चांगल्या वागणुकीमुळे तिची शिक्षा कमी होते पण एक उद्ध्वस्त जीवन पुन्हा फुलणार का ..? बहरणार का ..? ही सगळी प्रश्नचिन्ह मागे ठेऊन .. ' जीवन इसका नाम है प्यारे .. तुझे है आगे चलना रे ' हा संदेश देत चित्रपट संपतो.
सुशीलाची कहाणी पाहिल्यानंतर अक्षरशः कापरं भरतं.. मन विषण्णं होतं. एकीकडे वाटतं, कदाचित हेच तिचं नशीब असावं, तर दुसरीकडे वाटतं, कदाचित तिच्या स्वभावामुळे तर तिच्यावर ही वेळ आली असावी का .. 
तिला माणसं ओळखता आली नाहीत हे तर सुरूवातीच्या काही प्रसंगातूनच कळतं .. पण खरंच, ज्या माणसाने तिच्यावर अतिप्रसंग केला, तो तर मुळात सज्जन होता नं.. मग त्यानेही एवढ्या टोकाचा राग आणि तोही अशा पद्धतीने का म्हणून प्रदर्शित करावा.. ? म्हणजे कितीही पदव्या घेतल्या तरीही सभ्यता, स्त्रीयांचा सन्मान हे पुन्हा वेगळं शिकवायलाच लागतं का ? आणि त्याहीपेक्षा, 'पौरूषार्थ' म्हणजे काय हे जर एखाद्या मुलाला त्याच्या उमलत्या वयातच कुणी नीट समजावून सांगितलं नसेल तर तो अशाप्रकारे वर्तन करून कोणत्याही स्त्रीचं आयुष्य क्षणात उद्ध्वस्त करूनच स्वतःचं पौरूषत्व, स्वतःचा अहंकार कुरवाळत, त्याचा अभिमान बाळगत राहील असं जाणवलं. आज समाजात ज्या अशा घटना घडतात, त्यामागे महत्त्वाचं कारणंच हे आहे, की अनेक घरांमध्ये कुणी मुलांना उमलत्या वयात 'पौरूषार्थाचा' नेमका आणि योग्य अर्थ समजावून देणारंच नाही, त्यांच्या दुर्दैवानेच कदाचित ..!! 
असो, तर असा हा सुशीला चित्रपट.. 1978 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते अनंत माने तर जगदीश खेबुडकर यांची गीते आणि राम कदम यांचं संगीत .. ज्येष्ठ नृत्यांगना लीला गांधी या पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत .. 
चित्रपट कित्तीतरी वेळा पाहिला आणि कित्तीतरी वेळा लेख लिहायला घेतला पण ही ह्रदयद्रावक कथा शब्दात उतरवताना मन कितीतरी वेळा थरथरलं... हात अडखळले .. आणि डोळ्यात पाणी दाटलं.. 
एका सुंदर स्त्रीची ही करूण कहाणी.. तिच्या या प्रवासात तिला ज्यांनी साथ दिली त्या भैय्याइतकंच आणखी एक पात्र फार भाव खाऊन जातं, ते म्हणजे मजनूचं पात्र आणि ते साकारणारे कलाकार म्हणजे ज्येष्ठ अभिनेते सुहास भालेकर .. 
हा मजनू म्हणजे सुशीलाचा आशीकच .. पण त्या सुशीलाचा जी आता ब्लॅकनं तिकीटं विकायला लागलेली असते.. थिएटरच्या बाहेरच या मजनूचा टीस्टॉल असतो. चहा विकता विकता तो सुशीलावर भाळतो.. पण त्याचं तिच्याप्रती वाटलेलं प्रेम किती खरं असतं हे चित्रपटाच्या शेवटच्या प्रसंगात आपल्याला कळतं. जेव्हा सुशीलाला शिक्षा ठोठावली जाते तेव्हा पोलीस तिला घेऊन जायला लागतात, तो कोर्टाच्या दारापाशी हा मजनू , नेहमीप्रमाणे त्याही दिवशी सुशीलासाठी कपभर चहा घेऊन , आपल्या डोळ्यातलं पाणी लपवत उभा असतो... सुशीला त्याला तिथे तसा पहाते आणि तिला गदगदून येतं.. अखेरीस .. ज्याचा त्याचा मार्ग ठरलेला असतो आणि जो तो माणूस, मग तो आपल्याला कितीही प्यारा असो वा नसो .. तो त्याच्या मार्गाने पुढे जाणार असतो हेच खरं.. 
रंजनाजी, अशोक सराफजी आणि अन्य सगळेच कसलेले कलाकार .. या सगळ्यांनी मिळून एक अत्यंत उच्च दर्जाची शोकांतिका सुशीला या चित्रपटाच्या निमित्ताने आपल्यापुढे मांडली आहे.. हा चित्रपट आता तसा कालौघात मागे पडला असणं स्वाभाविक .. पण तरीही यातून दिला गेलेला खरा संदेश पुढे पोहोचणं हे महत्त्वाचं .. सहज म्हणून या चित्रपटाखाली यूट्यूबवर आलेल्या प्रतिक्रिया वाचल्या तर त्या वाचताना मी स्वतःही क्षणभर संदीग्ध झाले होते... कारण, अनेकांनी सुशीलाच कशी वाईट ..तिला कशी माणसं ओळखता आली नाहीत वगैरे वगैरे टिप्पणी केल्याचं वाचलं .. म्हणजे काळ बदलला तरीही नव्या पिढीतली माणसंही अजून स्त्रीयांनाच बोल लावायला टपलेली .. पण कुणीही चित्रपटातील वकीलसाहेब ज्याने रागाच्या भरात एक भडक कृती केली .. ज्याने सुशीलाचे शीलहरण केवळ, स्वतःच्या अहंकारापोटी केले त्याला दूषण देताना दिसले नाहीत... हाच तो आपला समाज, हेच ते आजही जुनंच, कीडलेलं आणि विषमतापूर्ण समाजमन .. जे कितीही आधुनिक म्हणून मिरवलं तरीही मनातून कायम स्त्रीयांना दुय्यमच समजणार आणि जमेल तेव्हा, जिथे जमेल तिथे स्त्रियांना भेदभावाने वागवणार .. !!
असो, तर असा हा रंजनाजींनी आपल्या अत्युच्च अभिनयाने आणि अत्यंत ताकदीने साकार केलेला चित्रपट.. 
आज त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बरेच दिवसापासून मनात असलेले या चित्रपटाविषयीचे माझे रसग्रहण, आणि ते लिहीताना अडखळलेले माझे हात, आज जणू झपाटल्यागत लिहीते झाले..

माझ्याकडून रंजनाजींना हीच श्रद्धांजली ...


- मोहिनी घारपुरे - देशमुख
 
(सर्व फोटो गुगल साभार)



सोमवार, १३ जुलै, २०२०

पिंजरा

सौजन्य ः गुगल , साभार

तुम्ही जेव्हा एखाद्या गोष्टीची पूर्ण अनुभूती घेता त्यानंतर एकतर तुम्हाला त्या गोष्टीविषयी नीट, नेमकं लिहीता येतं किंवा, याउलट, जेव्हा एखाद्या गोष्टीची तुम्ही पूर्ण अनुभूती घेतलेली असते त्यानंतर तुम्ही त्या अनुभवातच राहू इच्छिता म्हणून कधीच त्या गोष्टीला शब्दात मांडण्याचा वृथा प्रयत्न तुम्ही करतही नाही. पिंजरा या चित्रपटाबद्दल मी या दोन्ही भावनांच्या मधोमध आखलेल्या रेषेवर उभी आहे.. म्हणजे मला खूप लिहायचं आहे, आणि त्याउलट, मला जे त्या चित्रपटाने दिलंय त्यानंतर मला त्याविषयी काहीच न लिहीताही ते अनुभवत रहायचं आहे, स्मरणात ठेवायचं आहे... पण तरीही, केवळ, लेखन करताना अधिकही काही गवसेल या आशेने मी पिंजरा हा माझा अनुभव लेखात मांडणार आहे.. 
तर .. ही एक अत्यंत श्रेष्ठ दर्जाची कथा. या कथेत कसलेले कलाकार, आणि अत्यंत उच्च दर्जाचे दिग्दर्शक, संगीत दिग्दर्शक आणि अन्य संपूर्ण टीम .. यामुळे ही कथा आपल्याला मानवी जीवनाचं मूल्य देऊन जाते. जगणाऱ्या माणसाची नैतिक अनैतिकता हे तर येथे आहेच, त्याचबरोबर माणसामाणसांची कित्तीतरी दर्जात्मक, गुणात्मक आणि परिस्थितीजन्य रूपं हा चित्रपट दाखवतो. 

गं ... साजणी ....
कुण्या गावाची कंच्या नावाची
कुण्या राजाची तू गं राणी ...
गं .... आली ठुमकत नार लचकत
मान मुरडत हिरव्या रानी 

अशा ठसकेबाज गाण्यानं चित्रपट सुरू होतो. बैलगाड्यांचा एक छोटा ताफा एका दुतर्फा हिरव्यागार वनराजीनं नटलेल्या रस्त्यानं खुळूखुळू घुंगरांचा नाद करत पुढे पुढे जाताना स्क्रीनवर दिसत रहातो. एका सुंदर, सुखसंपन्न आणि मुख्य म्हणजे नीतीमान म्हणून गौरवलेल्या गावात या बैलगाड्या येऊन थांबतात नि आतून उतरते ती एक तमाशामध्ये नाचणारी सुंदर स्त्री .. जिला पहाताच गावातल्या माणसांना, अगदी थेट वृद्ध माणसांनाही तिची भुरळ पडावी अशी अदाकारा .. गावात तमाशाचा खेळ करून पुन्हा पुढल्या गावी निघून जावं आणि असं करत गावोगावी फिरावं हाच काय तो या मंडळींचा पोटापाण्याचा उद्योग... म्हणून तर ही मंडळी या गावात उतरण्याचं ठरवतात पण छे .. हे गावच मुळी निराळं असतं. इथे तमाशा वगैरेला मान्यता नसते.. इथे नैतिकता, शिक्षण, सद्वर्तन यांचे धडे गावाला गावच्या शाळेच्या गुरूजींनी आधीच दिलेले असतात. गुरूजींची नीतीमत्ता इतकी की सारा गाव त्यांना आदर्श मानत असतो.. आणि गुरूजींच्या अथक प्रयत्नांनी गावालाही 'आदर्श गाव' म्हणून पंचक्रोशीत नाव आणि पुरस्कारही मिळालेला असतो. अशा या गावात तमासगिरीणीचा खेळ तो कसा चालवून घेतला जाणार ..? आणि अर्थातच तिला विरोध करणारे जनतेचे पुढारी म्हणजे हे आदर्शवादी गुरूजी हे ओघाने आलंच. गावात तमाशाचा ठोकलेला तळ गुरूजींच्या पुढाकाराने गावकरी उलथून लावतात.  विरोध करणाऱ्या मास्तरांवर संतापून ती अदाकारा जणू शपथच घेते, ' नाही या 'मास्तरड्या'ला एक दिवस तमाशाच्या फडावर तुणतुणं हातात घेऊन उभं केलं तर शप्पथ ...!' आणि पुढे खरोखरीच त्या सद्गुणी, सद्वर्तनी गुरूजींच्या नशीबाचे फासे असे काही पलटतात की खुद्द त्यांच्यासारख्या भल्या माणसालाही दुर्दैवाचे दशावतार पहायला लागतात. 
नियतीचा खेळ असा अजब असतो.. किंवा, कदाचित असं असेल का, की गुरूजींचं गर्वहरण करण्यासाठीच जणू  दैव असे फिरते ... ? कुणास ठाऊक .. पण घडतं खरं असं..!
शेवटी गावातल्या नदीच्या पलीकडच्या तीरावर तमाशाचा तळ टाकला जातो. आता रोज संध्याकाळनंतर तिथं तमाशाचा खेळही रंगायला लागतो.
गावची रोजची संध्याकाळची शाळा .. पण नदीच्या पल्याड जशी तमाशाच्या फडावर लावणीची धून अन् ढोलकीची थाप कानी पडते तशी एकेक करून एके दिवशी सारेच गावकरी काही ना काही बहाण्याने शाळेतून गुरूजींना शेंडी लावून बाहेर पडतात.. आणि मग हे रोजचच व्हायला लागतं. गावकरी शाळा सोडून तमाशाला जाऊन बसायला लागतात. अखेरीस एकदा गुरूजी स्वतः गावकऱ्यांना पुन्हा शाळेत आणण्यासाठी त्या रात्री नदी पोहून पार करत पलिकडच्या तटावर चंद्रकलेच्या फडावर जाऊन पोचतात.. गुरूजींचा धाक तर इतका, की ते नुसते तिथे आलेत ही वार्ता कानावर येताच एकेक करत तिथून गावकरी पोबारा करतात.. आणि ही आयतीच संधी चंद्रकलेला मिळते. गुरूजींना जाळ्यात ओढण्यासाठी ती पाय मुडपल्याचा बहाणा करते आणि आपल्या सौंदर्याचा गळ फेकते. बिचारे गुरूजी, एवढी वर्ष ब्रह्मचर्याचं पालन करून सत्शील, सद्वर्तन यांचा आदर्श निर्माण करणारे, ते एका क्षणात त्या मेनकेच्या (चंद्रकला तिचं नाव) सौंदर्याला भुलणार नाहीत तर काय.. आणि तसंच होतं.. मग औषधाचं निमित्त पुरतं आणि गुरूजी तिच्याकडे आकर्षित होऊन पुन्हा पुन्हा तिला भेटायला, गावकऱ्यांचा डोळा चुकवून, नदी पार करून जात रहातात. अशातच गुरूजींच्या मुळावरच जणू उठलेला गावच्या सरपंचाचा वाया गेलेला मुलगा एक दिवशी गुरूजींना तिच्याकडे जाताना पहातो... आणि गावकऱ्यांना, सरपंचांना जाऊन सांगतो. एकच गदारोळ माजतो. सारीजण गुरूजींना शोधत तमाशाच्या त्या फडावर पोचतात. गावकरी गुरूजींना शोधत येत आहेत ही खबर वाऱ्यासारखी पसरते आणि गुरूजींच्या पायाखालची जमीन सरकते. लोकांना आता जर आपण इथे सापडलो तर आपल्यावरचा त्यांचा विश्वास कायमचा उडेल, आपण आजवर जे कष्टानं कमावलं ते सारं क्षणार्धात मातीमोल होईल याची कल्पना येतात आणि  तत्क्षणी, गुरूजींचे डोळे खाडकन् उघडतात. आपण या मेनकेच्या मोहपाशात किती नि कसे गुरफटलो याबद्दल त्यांना स्वतःचीच लाज वाटते. खरंतर चंद्रकलाही गुरूजींकडे आकर्षित झालेली असतेच ( त्यांचं व्यक्तिमत्त्वच तसं असतं की कुणीही त्यांच्या प्रेमात पडावं ) ..  म्हणून त्या वेळी ती लोकांपासून गुरूजींना वाचवते, ती त्यांना आपल्या खोलीत, जिथं कोणी गावकरी आत शिरण्याची हिंमतही करणार नाही, तिथे लपून बसायला सांगते आणि खुद्द स्वतः लोकांना सामोरी जाऊन वेळ निभावून नेते. फडावर गुरूजी न सापडल्याने पाटलाच्या पोरालाच शाब्दीक चोप देत सारे गावकरी परतात... आता शरमेनं मेलेले गुरूजी सगळ्यांच्या नजरा चुकवत आपल्या घरी काळोख्या रात्री परतात पण ते या संपूर्ण प्रकाराने फार फार अस्वस्थ झालेले असतात. त्यांचं मन थाऱ्यावर नसतं. अशा अवस्थेतले गुरूजी पाहून गावकऱ्यांना वाटतं, की आपण आपल्या गुरूजींवर शंका घेतली म्हणूनच आता त्यांना ही अस्वस्थता आली असावी.. गावकरी ठरवतात आपण त्यांची दुसऱ्या दिवशी सकाळीच क्षमा याचना करूया.
इकडे चंद्रकला रात्रीच्या अंधारात नदी पार करत, पोहत एकटीच गुरूजींच्या घरी पोहोचते. तिला तशा अवस्थेत तिथे आलेलं पाहून गुरूजींना आश्चर्याचा धक्का बसतो. तिला आपलं प्रेम गुरूजींसमोर व्यक्त करायचं असतं म्हणून हे अचाट अफाट साहस करत ती तेथे येते .. तिचं ते आपल्यावरील प्रेम पाहून गुरूजींचं ब्रह्मचर्य क्षणात गळून पडतं आणि तेही तिचा स्वीकार काहीशा द्वीधा मनःस्थितीत करतात.. पण एव्हाना त्यांचा सूड घ्यायला त्यांच्या दाराशी आलेला पाटलाचा गुंड पोरगा सगळा कानोसा घेत तिथे असतो आणि आतला प्रकार ओझरता कानावर आल्याने चांगलाच चवताळतो. बाहेरून ओरडत तो गुरूजींना धमकावून दार उघडायला लावतो. अशातच गावातली एक बाई, जिच्यावर थोड्या वेळापूर्वीच त्याने हात टाकायचा प्रयत्न करून तिथून पळ काढलेला असतो, तिचा नवरा ..तो या गुंडाला ठार करण्यासाठी त्याचा माग घेत तेथे येतो. पाठमोऱ्या गुंडावर चाकूने वार करत आणि दगडाने त्याचं तोंड ठेचत तो त्याला ठार करतो... बाहेरच्या सगळ्या झटापटीचे आवाज आत ऐकून चंद्रकला नि गुरूजी दोघेही जीव मुठीत घेऊन आता पुढे काय होणार अशा विचारात असतानाच एक दीर्घ किंकाळी ऐकू येते आणि पहातात तो दारात हे संकट .. आता कोणत्याही क्षणी गावकरी जमणार, आणि घरात आपल्याबरोबर ही चंद्रकला.. दारात हे पाटलाच्या पोराचं प्रेत .. आता हा सगळा आळ आपल्यावर येणार ... गुरूजी सैरभैर होतात .. तशी चंद्रकला आता तिचं जाळं आणखी घट्ट करण्याची ही संधीही सोडत नाहीच.. ती म्हणते, गावकरी यायच्या आत तुमचे कपडे या प्रेतावर घाला नि तुम्ही माझ्याबरोबर चला.. हे संकट तर टळेल मग पुढचं पुढं पाहू.. विनाशकाले विपरीत बुद्धी या न्यायानं जणू गुरूजीही त्या क्षणी तिचं ऐकतात नि तिथून निसटतात. 
गावकरी तिथे पोचतात, तो प्रेताला पाहून लोकांना वाटतं हे तर गुरूजीच .. म्हणजे पाटलाच्या पोरानं सूडापायी गुरूजींची निर्घृण हत्या केली... गावकरी शोकाकूल होतात. आता पाटलाच्या पोराला पोलीस शोधू लागतात.. 
इकडे चंद्रकला गुरूजींना सोबत घेऊन येते नि लगोलग दुसऱ्या गावी तळ हलवते.. आणि  इथून पुढे गुरूजींच्या नशीबाचं चाक आणखी रसातळाला जातं. गुरूजी म्हणून सारा गाव ज्यांच्या शब्दात त्या गुरूजींना ही चंद्रकला अखेर तमाशाच्या फडाचा मास्तर बनवून टाकते. स्वतःची शपथ पूर्ण झाल्याचा विजयी आनंद तिच्या सवंगड्यांबरोबर साजरा करते जणू .. 
गुरूजींसारख्या भल्या माणसावर, केवळ क्षणीक मोहापायी जी वेळ येते ती पाहताना आपण मनातूनच अक्षरशः धाय मोकलून जणू रडतो. 
या जीवनाचं चाक कधीही मागच्या दिशेनं वळत नाही कायम पुढेच पळत असतं.. म्हणूनच माणसाने प्रत्येक कृती विचारपूर्वक करायला पाहिजे असं थोरमोठे म्हणतात ते काही खोटं नाही.  
दुसऱ्या गावी या तमाशाच्या फडाबरोबर आता गुरूजींसारख्या भल्या माणसाचीही जणू वरातच निघते.  दुर्दैव म्हणजे, या प्रवासात त्यांची सारी खरी आभूषणं .. म्हणजे त्यांचा विवेक, सद्वर्तन, ब्रह्मचर्य पालन, शिस्तबद्ध आणि नैतिक जीवनाचरण ही सारी सारी केव्हाच गळून पडतात. माणसाची खरी कमाई हीच तर असते.. बाकी सगळ्या भौतिक गोष्टी तर जात येत रहातात पण जी व्यक्ती जीवन एक आदर्श म्हणून जगते अशा व्यक्तीचं जेव्हा नैतिक अधःपतन होतं तेव्हा त्या व्यक्तीचं जगणं तिला स्वतःलाही सहन होत नाही. 
दुसऱ्या गावी तमाशाचा खेळ झाल्यावर तिथल्या पाटलाशी (केवळ कामाचा भाग म्हणून आणि पोटाची गरज म्हणून) त्या कलावंतिणीला लगट करावी लागते ते पहाताना मास्तरांना ची़ड न येईल तरच नवल. मग तिथं सगळ्यांबरोबर जेवायच्या पंक्तीत अक्षरशः कुत्र्याच्या ताटाशेजारी मांडलेल्या ताटावर मास्तरांना जेवायला बसवतात तेव्हा तर अरेरे .. अशी एक आर्त भावना खुद्द आपल्याही मनातून उफाळून येते. पंक्तीतली स्वतःचीच झालेली ही अशी विटंबना सहन न होऊन मास्तर तेथून उठून जातात तशी फडातला सरकार नामक एक कलाकार (निळू फुले) त्यांच्यावर नेहमीप्रमाणं हसतो.. आज गुरूजी शेवटी त्याला श्रीमुखात भडकवतात आणि त्याच्या हसण्याचं कारण विचारतात .. तेव्हा तो सांगतो, माझ्याही संसाराची मी अशीच दशा करून यांच्या जाळ्यात अडकलो त्याची कर्मकहाणी .. आणि आता कशाचच काही वाटत नाही हे म्हणताना त्याच्याही डोळ्यात पाणी दाटतं. 
आयुष्याची माती झालेले  गुरूजी तमाशाच्या फडावर तुणतुणं हातात घेऊन अखेर उभं रहातात आणि आज आपली कर्मकहाणी गातात ...

माझ्या काळजाची तार आज छेडली .. कशी नशीबानं थट्टा आज मांडली

गंगेवानी निर्मळ होतं, असं एक गाव .. असं एक गाव
सुखी समाधानी होतं रंक आणि राव .. रंक आणि राव
त्याची गुणगौरवानं कीर्ती वाढली .. ।।

अशा गावी होता एक भोळा भाग्यवंत ... भोळा भाग्यवंत
पुण्यवान म्हणती त्याला कुणी म्हणे संत .. कुणी म्हणे संत 
त्याला .. एका मेनकेची दृष्ट लागली .. ।।
.
.
.

खुळ्या जीवा कळला नाही .. खोटा तिचा खेळ .. खोटा तिचा खेळ 
तपोभंग झाला त्याचा .. पुरा जाई तोल .. पुरा जाई तोल
त्याला कुत्र्यामांजराची दशा आणली .. ।।
.
.
.

जन्मभरी फसगत झाली .. तिचा हा तमाशा .. तिचा हा तमाशा 
जळूनिया गेली सारी जगायची आशा .. जगायची आशा
आज हुंदक्यानं भैरवी मी गायली.. ।।
.
.

याची देही याची डोळा पाहिले मरण .. पाहिले मरण
मीच माझ्या हाती देवा रचिले सरण .. रचिले सरण
माझ्या कर्मसोहळ्याची यात्रा चालली .. ।।

कशी नशीबानं थट्टा आज मांडली ....

अरेरे ... एका सज्जन माणसाची किती ही वाताहत ... 
कशी नशीबानं थट्टा आज मांडली हे गाणं म्हणजे या चित्रपटाचा 'मास्तर'पीसच (मास्टरपीसच) ! 
चित्रपट इथे संपायला हवा असं जरी वाटत असलं तरीही कथा पूर्ण इथे होतच नाही कारण मास्तरांचीच नव्हे तर चंद्रकलेच्या कर्माचीही गत आता खरी फळत आलेली असते. देवाचा न्याय हा नेहमी सर्वांना समान असतो हेच खरं.  
शेवटी तमाशा आणि त्यातल्या संपत्तीवर लाथ मारून केवळ आपल्या प्रेमापायी आणि गुरूजींच्या आयुष्याची माती केल्याच्या अपराधी भावनेपायी चंद्रकला गुरूजींबरोबर संसार थाटायचं स्वप्न मनात घेऊन निघते पण तिचे सवंगडी .. ते तिला असंच थोडी जाऊ देणार.. ते गुरूजींना चांगलंच झोडपतात. इतकं की त्यात त्यांच्या डोळ्याला मार लागतो नि त्यासाठी शेवटी अर्ध्यापेक्षा जास्त चेहरा गुरूजींना फडक्यानं बांधून एकप्रकारे लपवावा लागतो. दोघे तिथून पुढे जात नाहीत तो पोलीस त्यांना गाठतात. गुरूजींच्या मारेकऱ्याच्या शोधात पोलीस खुद्द गुरूजींनाच पकडतात. मनाशी प्रामाणिक असलेल्या गुरूजींना दैवाचा खेळ कळतो आणि देवाचा न्यायही ओळखता येतो म्हणूनच ते कोणताही विरोध न करता पोलीसांबरोबर निघून जातात. चंद्रकला त्यांच्या मागे पोलीस स्टेशनात येऊन त्यांना पोलीसांना सगळं खरं खरं सांगण्याची विनंती करते .. माझं तुमच्याबिगर कसं व्हनार .. मी आता कुठं जाऊ .. या विचाराने ती वारंवार विनंती करते.. पण मास्तर आता पोलीसांना स्वतःची खरी ओळख न सांगण्याविषयी ठाम असतात. कारण, हाच दैवाचा योग्य न्याय आहे .. मी लोकांचा विश्वास तोडला त्यामुळे आता मला हीच शिक्षा झाली पाहिजे असा विचार ते करतात. शेवटी चंद्रकला म्हणते, तुम्ही नका सांगू हवंतर .. पण मी स्वतः न्यायालयात खरं काय ते सांगेन ..
प्रत्यक्ष खटला भरतो.. एक अजब खटलाच असतो हा .. गुरूजींना स्वतःच्याच खुनासाठी शिक्षा होणार असते.. गावातल्या सर्व लोकांना या मारेकऱ्याबद्दल ( म्हणजे खरंतर खुद्द गुरूजींबद्दलच ) प्रचंड चीड आलेली असते.. कारण, ते कोणीही ओळखू शकलेले नसतात की हेच तर खरे गुरूजी आहेत. अखेरीस न्यायाधीश शिक्षा सुनावणार तोच चंद्रकला तिथे येते आणि घाईघाईन सत्य सांगायला सुरूवात करणार तोच तिची वाचाच जाते... अरेरे ... खाणाखुणांनी ती सांगायचा प्रयत्न करते की तुम्ही जो खूनी समजताय तो तर केव्हाच मेला .. आणि हेच खरे गुरूजी आहेत .. पण छे ... कोणालाच तिचं सांगणं कळत नाही.. हाय रे कर्मा ..  अखेरीस गुरूजींना स्वतःच्याच खुनासाठी फाशीची शिक्षा होते आणि त्यांची शिक्षा अंमलात येण्यापूर्वी त्याच धक्क्याने चंद्रकलाही मरते...
गावात आदर्श गुरूजी म्हणून लोकांनी मोठ्या आनंदाने गुरूजींचा पुतळा उभारलेला असतो त्याकडे पहात पहातच खरे गुरूजी जिवंत असूनही स्वतःच्या कर्मांची फळं भोगायला आनंदाने फाशीची शिक्षा पत्करतात.
किती ही करूण कथा ... अरेरे ..
चित्रपट पुनःपुन्हा पहावासा वाटतो कारण तो आपल्याला मानवी जीवनाची मूल्य शिकवून जातो. एकदा लोकांच्या नजरेत आदर्श या पातळीपर्यंत गेल्यावर माणसाने जर चुकूनही कोणतेही कुकर्म कळत नकळत केले तर लोक त्या माणसाला जगूच देत नाही .. कारण, लोक अशा व्यक्तीला इतकं जवळचं मानतात, इतका आदर, इतकं प्रेम आपुलकी अशा माणसाला दिल्यानंतर त्याचं झालेलं नैतिक अधःपतन पचवणं लोकांसाठी निव्वळ अशक्य असतं. 
पण म्हणूनच कधीकधी वाटतं, की जो माणूस जन्मभर एवढा चांगला, एवढा आदर्श वागला असेल त्याच्याबाबतीत त्याला केवळ माणूस म्हणून चूक करण्याची मुभा लोकांनी द्यायला काय हरकत आहे..?
काळ बदलला तशी माणसंही बदलली .. म्हणूनच आता माणसांनी स्वतःत, स्वतःच्या मनोवृत्तीत एक महत्त्वाचा बदल करायला पाहिजे तो म्हणजे कोणत्याही माणसाला देवत्व देऊ नये.. माणसांकडे माणूस म्हणून पहावं.. म्हणजे कदाचित लोकांच्या भावना दुखावल्या गेल्यानेच केवळ एखाद्या गुरूजींसारख्या आदर्श आणि खरोखरीच चांगल्या माणसाची अशी दैना होणार नाही .. प्रत्येकाला माणूस म्हणून आपले जीवन आनंदाने जगता येईल आणि हातून झालेल्या क्षुल्लक चुकीसाठी कोणी इतकी गंभीर शिक्षा भोगणार नाही .. त्याला माफी मिळेल.. कदाचित चंद्रकलेची वाचा गेली नसती तर गुरूजींचीही शिक्षा कमी झाली असती .. कदाचित, त्यांनाही माफी मिळाली असती ..पण एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे,  गुरूजींच्या मनाने केव्हाच त्यांना गुन्हेगार ठरवलं होतं. गुरूजींचं मनच त्यांना खात होतं.. आणि म्हणूनच कर्माचं चक्र जेव्हा पूर्ण झालं तेव्हा न्यायदानाचे वेळी गुरूजींनी सुखाने मरणाची शिक्षा स्वीकारली. 
शेवटी म्हणतात ना, ' जगसे चाहे भाग ले कोई .. मन से भाग न पाए .. तोरा मन दर्पण केहेलाये ..'
तर असा हा 'पिंजरा' चित्रपट .. 
कित्तीतरी गोष्टी आपल्या नकळत आपल्याला शिकवून जातो. 
डॉ. श्रीराम लागू, संध्या, निळू फुले आणि अन्य कलाकारांच्या अभिनयाबद्दल तर बोलण्याचीही गरज नाही. 'श्रेष्ठतम' आणि 'दर्जेदार' या दोन्हीही उपाधी या कसलेल्या कलाकारांना, गीतकार, संगीतकारांना आणि दिग्दर्शकासाठी चोख बसतात. 
या चित्रपटाचे दिग्दर्शक व्ही. शांताराम, गीतकार जगदीश खेबुडकर आणि संगीतकार राम कदम, आणि कलाकार व संपूर्ण टीम यांना तर शतशः नमन.. 

- मोहिनी घारपुरे - देशमुख
 
(copyright@mohineeg)


 

शुक्रवार, १० जुलै, २०२०

दाम करी काम ..


व्यक्त होण्यासाठी आधी अनुभूती महत्त्वाची.. असं मला वाटतं.. म्हणजे पूर्णपणे आणि योग्य पद्धतीने व्यक्त होता येतं असा माझा अनुभव आहे.
तर आज पाहिला एक असा झक्कास मराठी चित्रपट की जो पहाणं म्हणजे जीवनाचं सार शिकणं असंच म्हणता येईल एकप्रकारे ..
चित्रपटाचं नाव, दाम करी काम ..

बरोबर .. ते गाणं नाही का ..

वासुदेवाची ऐक वाणी..
जगात नाही राम रं ..
दाम करी काम येड्या दाम करी काम ..

ते याच चित्रपटातलं... !!

हे गाणं मला खूप आवडायचं म्हणूनच हा चित्रपट पाहिला असं म्हणा ना हवंतर ..


तर, ही कथा आहे एका कुटुंबाची .. ज्यातला कर्ता पुरूष केवळ पैसा कमावणारं मशीन .. आणि त्याचे कुटुंबीय .. म्हणजे पत्नी आणि मुलं निव्वळ पैशासाठी जगणारी आणि माणुसकी, प्रेम वगैरे विसरून गेलेली .. बहकलेली माणसं..
या पतीदेवांची भूमिका केलेली आहे ज्येष्ठ अभिनेते शरद तळवलकर यांनी.. आणि तीही अशा सुरेख प्रकारे की चित्रपटभर एक हतबल बाप, जो त्याच्या विनोदबुद्धीने आपल्या बहकलेल्या कुटुंबामुळे स्वतःला होणाऱ्या त्रासाची झळ क्षण दोन क्षण विसरून जगण्याचा प्रयत्न करत रहातो ..
त्यांच्या पत्नीची भूमिका करणारी अभिनेत्रीही फारच सुंदर अभिनय साकरणारी.. ही एक अशी पत्नी जिला केवळ पैसा प्रिय .. बाकी कुटुंबाप्रती आपली कोणतीही जबाबदारी तिला नको.. तिच्या अशा बेताल वागण्याने घरातली दोन्ही मुलं आणि मुलगी अक्षरशः वाया गेलेली. मोठा मुलगा मटका, जुगार खेळणारा, दोन नंबरची बहीण ऑफीसात बॉसबरोबर आईच्या संमतीनेच गुलूगुलू करत वाया गेलेली आणि धाकट्या मुलाचंही अभ्यासातलं लक्ष केव्हाच उडाल्याने तोही समोरच्या घरात रहाणाऱ्या मुलीशी प्रेमप्रकरण करण्यात दंग..
अशा तोल सुटलेल्या कुटुंबाचा एकमेव खमका आधार म्हणजे बाप.. पण त्याला घरात काडीचाही मान नाही. तिकडे गावाकडे या गृहस्थांची विधवा, म्हातारी आणि परिस्थितीने दरिद्री झालेली बहीण एकाकी पडलेली .. तिला इकडे आपल्या घरी बोलावून घ्यावे म्हणून या गृहस्थांनी विषय काढला रे काढला की कुटुंबीयांनी नकारघंटा वाजवलीच पाहिजे. मग बिचारा बाप गपगुमान आला दिवस काढत असतो.. घरासाठी झिजत असतो.
अशातच एकदा एक बातमी वर्तमानपत्रात झळकते, त्याच्या गावाकडल्या बहिणीला अडीच लाखांची लॉटरी लागली म्हणून .. ही बातमी तिकडे गावातही वाऱ्यासारखी पसरते आणि जिला विधवा, दरिद्री म्हणून हिणावले तेच गावकरी या माऊलीच्या वाड्यात (जो आता केवळ भिंतींपुरता उरलेला असतो) तोबा गर्दी करतात.. तिचा जयजयकार करतात, तिला पोतीच्या पोती धान्य, भरपूर साड्या वगैरे देऊ करतात. बिचाऱ्या म्हातारीला लोकांचं हे असं एकदम बदललेलं वागणं काही कळत नाही.. ती भाबडी, तिला वाटतं, गाववाल्यांना खरंच आपल्याप्रती खूप प्रेम वाटायला लागलं असावं म्हणूनच ती सारी जमली असावीत.. पण इतक्यात एक गावकरी बोंबलत येतो आणि सगळ्यांना सांगतो, अहो ज्या म्हातारीला लॉटरी लागली ती ही न्हवं... ती तर दुसऱ्या गावातली याच नावाची बाई हाय.. क्षणार्धात सगळं चित्र पालटतं. अक्षरशः सगळं आणलेलं सामान घेऊन लोकं या म्हातारीला झिडकारून निघून जातात.. आणि इकडे हिच्या डोळ्यात पाणी दाटतं.
आता तिकडे शहरातही ही बातमी, म्हणजे आपल्या आत्याला लॉटरी लागल्याची बातमी त्या कुटुंबाला पेपरमधून समजलेलीच असते तशी सगळे पटापट पलटतात. बायको आणि धाकला मुलगा नि मुलगी म्हातारीला चक्क तार धाडून आग्रहाने बोलवतात. तिघेही जणं तीन वेगळ्या तार करतात नि प्रत्यक्ष म्हातारीला संदेश मिळतो तेव्हा तिला बिचारीला वाटतं, एवढ्या तातडीनं सांगावा आला म्हणजे आपल्या भावाला तर काही कमी जास्त झालं नसेल नं म्हणून ती लगेच जायला निघते. ती येणार त्या दिवशी तिला न्यायलाही हे तिघं तीन सेपरेट टॅक्सीने स्टेशनवर जातात.. त्यांना हवा असतो तो म्हाताऱ्या आत्याचा पैसा. आत्याला लॉटरी लागली आता ती फर्स्ट क्लासनेच येईल म्हणून ही तिघं तिला फर्स्ट क्लासवर शोधतात आणि तिकडे आत्या बिचारी नेहमीप्रमाणे कशीबशी जनरल बोगीतून प्रवास करून आपल्या भावाच्या घरी पोहोचते.
आता घरी आपली बहीण येताच गृहस्थाला बरं वाटतं आणि मुख्य म्हणजे आपलं असं कोणीतरी आल्याने मानसिक आधार या बिचाऱ्याला मिळतो. घरातली मंडळी घरी येईपर्यंत म्हातारे बहीण भावंड एकमेकांपाशी मन मोकळं करतात. म्हातारी सांगते, लॉटरीचा झालेला गोंधळ आणि भावाच्या घरी सगळे आपल्याला खोटारडी म्हणतील म्हणून तेथून निघून जायचा विचार करते तोच भाऊ सगळं ऐकल्यावर म्हणतो, आक्का, तुला इथे आणायची कायमची माझी फार इच्छा होती पण माझे कुटुंबीय नाही म्हणत असल्याने ते शक्य होत नव्हतं. माझ्या कुटुंबाची पार अवस्था केलीये गं बायकोनं .. आता तुला यानिमित्तानी का होईना इथे तिनं बोलावलंय तर तू आता थांब. तुझ्याकडे घबाड आहे म्हणून का होईना हे सगळे जण तुझ्यावर प्रेमाचा वर्षाव करतील बघ .. आणि आता हीच वेळ आहे की कदाचित तू तरी त्यांना वठणीवर आणू शकशील. आपल्या भावाची ही गळ ऐकून शेवटी आक्का तिथे रहाते. चतुर अक्काला भावाच्या संसाराचं खरं चित्र कळायला फारसा वेळ लागत नाहीच. ती सगळ्या घरादारावर वडीलकीचा अधिकार दाखवत सगळ्यांची भरकटलेली आयुष्य पुन्हा वळणावर आणण्याकामी लागते आणि अर्थातच शेवटी तिला यश येतं. भावाचा भरकटलेला संसार पुन्हा योग्य मार्गावर येतो तशी तिला मनाने वाटायला लागतं की आता आपण इथून निघून गेलेलंच बरं.. नाहीतर उगाच ही सारीजण आपल्याला खोटारडं ठरवतील आणि हा बट्टा आपण कधीच सहन करू शकणार नाही. या विचाराने ती घरातून जायला निघते तो भाऊ देखील त्या क्षणी तिच्याबरोबर घर सोडून बहिणीबरोबर सुखाने म्हातारपण घालवू या विचाराने निघतो.. पण तितक्यात सगळे कुटुंबीय त्यांचं बोलणं ऐकतात आणि सगळ्यांचं मन परिवर्तन झाल्याने अखेरीस सारी जण त्यांना थांबवतात आणि अखेरीस सुखाने एकत्र नांदू लागतात.
एका सुंदर वळणावर चित्रपट संपतो ..
वासुदेवाची ऐका वाणी .. जगात आहे राम रं .. घाम करी काम येड्या .. घाम करी काम
असं बदललेलं सुयोग्य संदेश देणारं गाणं शेवटी ऐकताना एक समाधान आपल्याला मनोमनी मिळतं.
खरंच, पूर्वीच्या चित्रपटांची ताकद कशात असेल तर ती अशा साध्या पण आशयसंपन्न कथानकात .. कलाकारांच्या सहजसोप्या आणि तरीही अत्यंत सुरेख अभिनयात .. चित्रपटाच्या अर्थपूर्ण गाण्यात .. दिग्दर्शकाच्या साधेपणात ... कारण, या अशा जुन्या चित्रपटात भपकेबाज असं काहीही नाही तसंच उथळपणाही पूर्णपणे वर्ज्य..
चित्रपटगृहातून बाहेर पडताना एकूण एक सानथोर प्रेक्षक नक्कीच या जीवनाप्रती समृद्ध होऊन जात असणार यात शंका नाही.


- मोहिनी घारपुरे - देशमुख


(copyright@mohinee gharpure deshmukh)

एक सुरेख आठवण ..

मनात आजन्म जपून ठेवलेली अशी एक सुरेख आठवण मी आज तुम्हा वाचकांशी शेअर करणार आहे. निमित्त आहे, ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायिका परवीन सुल्ताना यांच्या जन्मदिनाचं.. एरवी मी कोणाचे जन्मदिन वगैरे लक्षात ठेवण्यात फारशी तरबेज नसले तरीही सोशल मीडियानी हे एक उत्तम काम केलेलं आहे की आपल्याला सगळ्यांचे जन्मदिन न चुकता दररोज कळतात. त्यातूनही, माझा अंताक्षरीचा व्हॉट्सअॅप ग्रुप सुरू केल्यापासून तर मी संगीत क्षेत्रातील मान्यवरांच्या जन्मदिन व पुण्यतिथी याविषयी बरीचशी अलर्ट असते. म्हणूनच आज परवीनजींच्या जन्मदिनाच्या निमित्तानी ही आठवण शेअर करते आहे.
तेव्हा मी दिव्य मराठीसाठी रिपोर्टींग करायचे. माझ्याकडे प्रामुख्याने युवा व महिला हे मुख्य बीट देण्यात आले असले तरी मी जॅक ऑफ ऑल असल्याने अन्य अनेक बीटच्या बातम्या आणि सांस्कृतिक कार्यक्रम (विशेषतः गाण्यांचे कार्यक्रम तर हमखास ) अटेंड करून त्याविषयीचे वार्तांकन, मुलाखती घेणे वगैरे काम आनंदाने करायचे.
तर तेव्हा असं झालं, की नाशिकमध्ये गुणिजन महोत्सवाच्या निमित्ताने त्या आल्या होत्या. तेव्हा पसा नाट्यगृहाच्या आतील बाजूस असलेल्या एका खोलीत कार्यक्रमापूर्वीचा त्यांचा थोडाफार रियाझ सुरू होता आणि तेव्हाच त्यांना भेटायला म्हणून काही ज्येष्ठ पत्रकार आणि व्यक्तींची तेथे सतत ये जा सुरू होती. कार्यक्रम संध्याकाळचा होता आणि मला त्यांना भेटायचंच होतं .. शक्य झाल्यास त्यांची मुलाखतही घ्यायचीच होती. मग काय, दिवसभराचं रिपोर्टींगचं काम भराभर आटपून मी या कार्यक्रमाच्या स्थळी पोहोचले. दिव्य मराठीने आम्हा रिपोर्टर्सना मिनी लॅपटॉप आणि सायबर शॉट कॅमेरेही दिलेले असल्याने आम्हाला अशा कार्यक्रमाचं थेट वार्तांकन लॅपटॉपवरून करता येई त्यामुळे संध्याकाळच्या कार्यक्रमाला उशीर झाला तरीही ऑनलाईन बातमी सहज कार्यक्रमाचा आनंद घेत घेत टाईप करता येई (अर्थात, मी एरवीही कॉलेजेसच्या कार्यक्रमांच्या वगैरे बहुतेक बातम्या ऑनलाईनच टाईप करून फील्डवरूनच पाठवायचे, अनेकांनी मला माझे असे काम करताना पाहिलेले असेलच .. )
तर, मी पोहोचले तर त्या खोलीच्या बाहेर अनेक जण खोळंबलेले होते .. वाढती गर्दी पाहून एक ज्येष्ठ पत्रकार, कॉलम्नीस्ट खोलीच्या दारापाशी येऊन सगळ्यांना अडवायला लागले. परवीनजींनी भेटायला नकार दिलाय असं परस्पर सांगू लागले. त्यांच्या सांगण्यामुळे बरेचजण तेथून निघून गेले... पण मी ... मला तर त्यांना भेटण्याची ही संधी अजिबात सोडायची नव्हती. मग धिटाईने मी त्या ज्येष्ठ पत्रकार काकांना म्हटलं, मला त्यांची मुलाखत घ्यायची आहे .. तरीही ते मागे हटेनातच उलट मला तेथून निघून जायला काहीशा जरबेनेच सांगायला लागले. ( थोडक्यात वाटेला लावण्याच्या प्रयत्नात होते, म्हणजे, दुसऱ्या दिवशी त्यांची लिहीलेली मुलाखत एक्स्लूझिव्ह झाली असती नं .. हा हा ) .. पण छे .. मी गेलेच नाही. इतक्यात दारापाशी आमची चाललेली हुज्जत पाहून खुद्द परवीनजींनी आतून बाहेर एक कटाक्ष टाकला आणि मला पाहून त्यांनी स्वतःच, आने दीजीये उनको असं म्हणत मला आत बोलावलं. आता, माझ्या ह्रदयाची धडधड प्रचंड वाढली होती. मी आत शिरले आणि खाली अंथरलेल्या गालिचावर नोटपॅड आणि पेन घेऊन गपगुमान बसले. त्या गात होत्या, मध्येमध्ये थांबत होत्या आणि त्या थांबल्या की ज्येष्ठ पत्रकार त्यांच्याशी गप्पा मारत होते. मग नेहमीप्रमाणे माझ्याकडे कटाक्ष टाकून, ये नयी पीढी के पत्रकार .. इनको क्या पता होगा आपके बारेमें .. असा कुत्सित सूर लावत होते. मी माझ्या नवख्या बुद्धीने आणि जेमतेम अनुभवाने मला जे जे सुचले ते प्रश्न परवीनजींना विचारत होते आणि त्याही समोर नवखी पत्रकार बसली आहे हे जाणूनच ( माझ्या वयावरून ते सहज कोणाही ज्येष्ठ व्यक्तीला ताडता आलंच असतं ) मला समजतील असे संदर्भ देत माझ्या प्रश्नांना अवघ्या पाच सात मिनीटात उत्तरं देऊन कार्यक्रम सुरू करण्यासाठी रंगमंचावर गेल्या. आमच्या जवळ तेवढाच वेळ होता त्याला त्याही काय करणार म्हणा .. तरीही त्या पाच सात मिनीटात जे जे मुद्दे मिळाले त्यावर मी एक छानशी छोटीशी मुलाखत लिहीली आणि ऑफीसमध्ये पाठवून दिली. कार्यक्रमाची बातमी केल्यावर पुन्हा पंच करण्यासाठी ऑफीसमध्ये डोकावले तो तिथे पुन्हा माझ्या मुलाखतीवरून गहजब माजलेला .. मला कळेचना, की माझं नेमकं काय चुकलंय .. डेस्कवरच्या उपसंपादकांनी नाराजीचा सूर लावलेला .. त्यांनी ही मुलाखत किती वाईट आहे हे त्यांच्यापेक्षा सिनीयर व्यक्तींना पूर्णतः पटवून दिलंच होतं आणि तितक्यात मी तिथे पोहोचले. हे सगळं वातावरण पाहून मी काहीशी खट्टू झालेच .. कारण, इतक्या मेहनतीनी .. पाच मिनीटांचं का होईना .. पण फूटेज ( हो एकप्रकारचं फूटेजच नं ) गोळा केलं तर त्याचं पुढे हे असं होणार आणि मुलाखत छापून येणारच नाही अशी चिन्ह दिसत होती. खरंतर, रिपोर्टरला फील्डवरून मिळालेल्या माहितीला तो कमीतकमी वेळात आणि शक्य तितका फटाफट आपापल्या दैनिकाकडे पाठवत असतो आणि त्याने लिहीलेल्या बातमीला अधिक सुंदर व वाचनीय करण्याचं काम , त्यातील चुका काढून टाकण्याचं काम हे उपसंपादकाचं असतं पण बरेचदा असं होताना दिसत नाही (आणि त्यामागची कारणंही अनेक असू शकतात) . अखेरीस, जेव्हा माझ्या लक्षात आलं की ही मुलाखत आता काटकूट करून उरलेल्या जागेतही बसवली जाणार नाही तेव्हा पुन्हा त्यासाठी स्टँड घ्यावाच लागला. ही मुलाखत कशी कशी मिळवली आणि ती फक्त आपल्याच दैनिकाकडे असेल उद्या (कारण, ज्येष्ठ पत्रकार बातमी नव्हे तर कॉलम लिहीणार हे नक्की माहीती होतं) असं सगळं समजावल्यावर अखेरीस ती मुलाखत प्रसिद्ध झाली.. आणि अर्थातच जेवढाही मजकूर लिहीला तेवढाही वाचकांनी कौतुक केल्याने मला समाधान मिळाले.
खरा आनंद तर तेव्हा झाला, जेव्हा परवीनजी नंतर पुन्हा एकदा नाशिकला दादासाहेब गायकवाड सभागृहात कार्यक्रमासाठी आल्या होत्या (आणि बहुधा, तो कार्यक्रम दिव्य मराठीतर्फेच आयोजित केलेला होता ) तेव्हा त्या कार्यक्रमाचं रिपोर्टींगही मलाच करण्याची संधी मिळाली. त्यामुळे मी पुन्हा बॅकस्टेजला अन्य पत्रकारांसमवेत पोहोचले तेव्हा परवीनजींनी मला सगळ्यांसमोर चक्क ओळखले आणि अगदी छान प्रसन्न हासत प्रश्न केला, "नमश्कार कैसी है आप .. कैसी चल रही है आपकी कलम .. ?" त्याक्षणी पहिल्यांदा चार लोकात आपली कॉलर ताठ होणे याचा अनुभव मिळणारा पहिलावहिला क्षण जगले ..
बस .. इसी का नाम है जिंदगी ..
बरोबर नं दोस्तांनो ..?
जन्मदिनकी बहुत सारी शुभकामनाएँ परवीनजी .. और प्रणाम ..

- मोहिनी घारपुरे - देशमुख

(मुलाखतीच्या प्रिंटचा फोटो सोबत जोडते आहे.. कृपया लिंक मागू नये, कारण आता तो ऑनलाईन उपलब्ध असणे केवळ अशक्य आहे. )



गुरुवार, ९ जुलै, २०२०

A folded wish ...

अ फोल्डेड विश 

'ओरिगामी' म्हणजे कागदाच्या नुसत्या घड्या घालून निरनिराळ्या वस्तू तयार करणे.. जपानमध्ये 'ओरिगामी' हा त्यांच्या संस्कृतीचाच एक भाग आहे. असं म्हटलं जातं, की तेथील लोकांचा एक समज आहे की 'ओरिगामीचे हजार क्रौंच पक्षी जर तुम्ही बनवलेत तर देव तुमची एक इच्छा पूर्ण करतो ' .. मग भले ती इच्छा एखाद्या दुर्धर आजारातून बरं होण्याचीच का असेना .. पण ती पूर्ण होते असं मानलं जातं. 
दुसऱ्या महायुद्धानंतर जेव्हा जपानमधील हिरोशिमावर अमेरिकेने अणुबाँब हल्ला केला तेव्हा 'सादाको सासाकी' ही मुलगी अवघी दोन वर्षांची होती. या हल्ल्यामुळे तिला ल्युकेमियासारखा दुर्धर आजार झाला. या आजारातून बरं होण्याची मनीषा धरत चिमुकल्या 'सादाको'नी मिळतील त्या कागदांचे ओरिगामीचे क्रौंच पक्षी बनवायला सुरूवात केली होती. पण दुर्दैवाने ती केवळ 644 च क्रौंच बनवू शकली आणि तिचा मृत्यू झाला. पुढे तिच्या एका मैत्रिणीने तिच्यावतीने ते हजार पक्षी बनवले आणि एका लेखिकेनं सादाकोवर आधारित एक कादंबरीही लिहीली. 
नुकतीच, आर्टअमीबा प्रॉडक्शन्सतर्फे तयार करण्यात आलेली एक कार्टून शॉर्टफिल्म, ' अ फोल्डेड विश ' पाहिली तेव्हा त्यामागची पार्श्वभूमी जाणून घेण्याच्या प्रयत्नात असताना हा सगळा करूण इतिहास समजला. 
दोन छोट्या जुळ्या बहिणी आणि त्यांची आजी असं त्रिकोणी कुटुंब. या कुटुंबातल्या या दोघी बहिणी ओरिगामीचे क्रौंच पक्षी रोज बनवत असतात. हजार पक्षी प्रत्येकी बनवायचे हे जणू मिशनच त्यांनी मनातून ठरवलेलं असतं. अशातच, एकेक करून दोघींनाही एकेक करून कोरोनासदृश आजार होतो. पिंक आणि ब्लू अशी तूर्तास या मुलींची नावं म्हणूयात. त्या दोघींपैकी ब्लू गर्ल  दिवसेंदिवस आजारामुळे खरंतर अधिक खंगत चाललेली असते.. आणि अशातच आता पिंक गर्लमध्ये त्या आजाराची लक्षणं दिसायला सुरूवात झालेली असते. 
एका रात्री जेव्हा पिंक गर्लला जाग येते आणि तिला दिसतं की तिची बहीण चमकत्या चंद्रप्रकाशात पक्षी बनवत बसलीये, तेव्हा तीही तिच्या बरोबर पक्षी बनवायला सरसावते.. त्या रात्री दोघी मोठ्या खूश असतात .. कदाचित त्यांचे हजार पक्षी आता पूर्ण होण्याच्या बेतातच असतात आणि त्यानिमित्ताने देव त्यांची एक इच्छा पूर्ण करणार असतो हा विश्वास त्यांना आनंद देत असतो.
जसजसे दिवस सरत असतात, आजार बळावतच असतो.. ब्लू गर्लचा आजार वाढतोय असं वाटत असतानाच इकडे पिंक गर्ल आजारी पडले आणि दुर्दैवाने एका सुंदर सकाळी जेव्हा ब्लू गर्ल डोळे उघडते तेव्हा आपली जुळी बहीण, पिंक गर्ल हे जग आपल्याआधी सोडून गेल्याचं तिला समजतं. ब्लू गर्लला रडू फुटतं .. आपल्या बहिणीचे किती पक्षी पूर्ण झाले हे पहाण्यासाठी ती तिची लाकडी पेटी उघडून बघते तो तिला त्यात हजारावा पक्षी दिसतो. त्या पक्ष्यावर तिने लिहून ठेवलेलं असतं, ' thousand crane = always together ' ( थाऊसंड क्रेन इझ इक्वल टू ऑल्वेज टुगेदर ) ... हा संदेश वाचून ब्लू गर्ल ओक्साबोक्शी रडते.. कारण, पिंक गर्ल हे जग सोडून गेलेली असते नं .. !
मग थोड्याच दिवसात ब्लू गर्लचेही हजार पक्षी पूर्ण होतात पण तिला देखील तो दुर्धर आजार गिळून टाकतो आणि ती देखील हे सुंदर जग सोडून जाते .. पण तरीही आता पिंक आणि ब्लू गर्ल, ज्यांनी प्रत्येकी हजार क्रौंच पक्षी पूर्ण केलेले असतात, त्यांची एक एक अंतिम इच्छा देवाने एकप्रकारे पूर्ण केल्यातच असते .. कारण आता त्या स्वर्गात तरी कायम सोबत असतील याची काळजी खुद्द विधात्याने घेतलेली असते..
एक छोटीशी, आशयसंपन्न, ट्रॅजिक पण तरीही एकप्रकारे सुखांत असलेली ही शॉर्टफिल्म पहाताना डोळ्यात पाणी आलं.. एकदा, दोनदा नव्हे तब्बल चार पाच वेळा ही फिल्म मी पाहिली पण दरवेळेला दुःखाचा कढ मनात आल्यावाचून राहिला नाही. 
सध्या जगात कोरोनामुळे जी काही भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यात कित्तीतरी निष्पाप जीव असेच भरडले गेले आहेत. कुटुंबच्या कुटुंब उध्वस्त झाली आहेत. कुणाच्या तरी फार फार जवळची कुणीतरी माणसं अचानक दिसेनाशी झाली आहेत आणि मुख्य म्हणजे ही परिस्थिती नियंत्रणात येण्याचंही चिन्ह दूरदूर पर्यंत दिसत नाहीये. या अशा प्रचंड कठीण काळात जेव्हा ही अशी फिल्म समोर येते तेव्हा ती निश्चितच मनात एक धुगधुगता प्रकाश निर्माण करून जाते. 
आपल्या माणसांचा सहवास आणि प्रेम भरभरून मिळणे, त्यांच्यासोबत सुखाचे चार क्षण आनंदाने घालवता येणे यासारखं अन्य दुसरं सुख नाही. पण म्हणूनच, कोरोनासारख्या आजारापासून आपला बचाव देवानं करावा ही इच्छा मनात ठेऊन कुणी ओरिगामीचे हजार क्रौंच पक्षी बनवेल तर खरंच होईल का ही इच्छा पूर्ण ..? असा विचार मनात उगाचच येत राहिला...
खरंच,
कुणी करतंय का असे हजार क्रौंच पक्षी तयार .. ??

जे करत असतील त्यांची एक सदीच्छा देवा तू जरूर पूर्ण करशील हा मला मनोमन विश्वास आहे.. !!

- मोहिनी घारपुरे - देशमुख 



(शॉर्टफिल्म यूट्यूबवर या लिंकवर पहाता येईल - https://www.youtube.com/watch?v=9HEkdFzHLHs&t=3s )

Translate

Featured Post

अमलताश