गुरुवार, २५ फेब्रुवारी, २०२१

नेमकी चूक कोणाची ?


अंकीता आज खूश होती. ती सनीच्या प्रेमात पडली होती त्याला एक वर्ष आज पूर्ण झालं होतं. लपूनछपून भेटीगाठी गेलं वर्षभर होत होत्या आणि कुणालाही अजून त्यांचं प्रेमप्रकरण माहित झालं नव्हतं. त्यामुळेच तर तिला आणखी आनंद झाला होता. सनीनं तिला गेल्या महिन्यात लॅपटॉपही गिफ्ट केला होता तिच्या वाढदिवसानिमित्त ..
ती दोघंही कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असल्याने, आता लवकरच आपल्या या प्रेमप्रकरणाबद्दल आईबाबांना सांगू आणि मग आपण सनीशी लग्न करून सुखाचा संसार करू अशा मनोराज्यात अंकीता रोज बुडालेली असायची.
रोजच कॉलेजमधून घरी परतल्यावर सनी आणि अंकीता हळूहळू आवाजात एकमेकांशी फोनवर तासन्तास बोलत बसत. आई घरी असेल त्यावेळात हळूहळू असलेल्या गप्पा, आई ऑफीसला गेल्यावर सगळं घर मोकळं मिळाल्याने थेट व्हीडीओ चॅटींगपर्यंत येत.
सनी तसा बरा मुलगा होता. म्हणजे अभ्यासात बरा, दिसायला स्मार्ट आणि वागायला बोलायलाही एकंदरीत चांगला. त्यामुळेच अंकीताला तो आवडायला लागला होता.
त्या दिवशी अंकीता जेव्हा खुशीखुशीत आनंदाने कॉलेजमधून घरी आली तेव्हा तिच्या मोबाईलवर सनीने एक मेसेज केला होता. "आज व्हीडीओ चॅटींगवर मला तुला पहायचंय .. माझ्यावर प्रेम करायला आज मी तुला शिकवणार आहे.."
त्याचा तो मेसेज पाहून अंकीता क्षणभर बावरली, लाजली आणि मनात धडधड वाढत असतानाच दुसरीकडे ती आई ऑफीसला जाण्याची वाट बघत राहिली. आईनं नेहमीप्रमाणे आवरासावर करून बारा वाजताचं ऑफीस गाठण्यासाठी साडेअकराला घर सोडलं. अंकीतानं दार लावलं आणि ती सनीच्या फोनची वाट पाहू लागली. सनीलाही तिचं सगळं रूटीन माहित होतंच, तिच्या घरच्यांच्याही वेळा, कामाची व्यस्तता याविषयी तो जाणून होता. त्यामुळे साधारण साडेबाराच्या सुमारास सनीने अंकीता आता घरात एकटी असणार हे जाणून व्हिडीओ कॉल केला.
अंकीताच्या मनात धाकधुक होतीच आणि सनीने थेट मुद्द्यालाच हात घातला. तो तिला व्हिडीओ कॉलवर तिचं सौंदर्य दाखवण्यासाठी मिनतवाऱ्या करू लागला. "तुझं निर्वस्त्र रूप मला पाहू दे अंकीता .. एकदाच .. बघ मी तुला किती सुखी ठेवेन .. आपण लग्न करणारच आहोत ना .. प्लीज एकदाच .." 
त्याच्या अशा आचरट मागण्यांनी ती एकदम घाबरलीच. तिला काही कळेचना की काय करावं..आणि अर्थातच तिने त्याला नकार दिला. पण तरीही पलीकडून सनी तिला अत्यंत भावूक होत गळ घालतच राहिला. 

आणि अखेर एका चुकार क्षणी अंकीताचा संयम सुटला आणि ती त्याला बधली. तो सांगत गेला ती तसंतसं करत गेली .. आणि अखेर केव्हातरी ती दोघं भानावर आली. व्हीडीओ कॉल संपला. अंकीताला तिची चूक लक्षातच आली नाही. पुढे काही दिवस दोघांनीही एकमेकांना टाळलं. आई वडीलांपासून अंकीता नजर चोरत होती तशी सनीपासूनही थोडीशी जाणीवपूर्वक लांब रहात होती. कदाचित आपण काय करून बसलो याचा पश्चात्ताप तिला मनोमन छळत होता. आपलं काहीतरी चुकलंय हे तिला सतत बोचणी देत होतं तसंच सनीने आपल्याला आता काही निराळाच त्रास दिला तर .. काय करायचं आपण ? अशा शेकडो विचारांनी तिच्या मनात थैमान घातलं होतं..  आणि हाय रे .. सनी नालायक निघालाच. त्याने अंकीताच्या त्या व्हीडीओ फूटेजमधून काही क्लिप्स आणि फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आणि तिला आणि तिच्या कुटुंबियांना धमकावायला सुरूवात केली. भलीमोठी रक्कम अंकीताच्या आईवडीलांकडून लुबाडण्यासाठी आता तो सरसावला होता. त्याने अंकीताला आता फोनवर धमकी देण्यास सुरूवात केली. "तुझे हे फोटोज आणि व्हीडीओ फूटेज मी आता सोशल मीडियावर टाकणार .. आणि जर तुला ते थांबवायचं असेल तर मला पुन्हा एकट्यात भेट अशी धमकी देऊ लागला."
अखेरीस अंकीताने आईवडीलांना विश्वासात घेऊन आपल्या हातून झालेल्या घोर अपराधाची कबूली रडत रडत दिली.. आणि मग कुटुंबीयांनी सायबर पोलीसांना तातडीने या भयंकर घटनेबद्दल माहिती दिली. सायबर पोलिसांनी सापळा रचून अखेरीस त्या सनीला अटक केली आणि एका अत्यंत हुशार वकील ताईची मदत घेऊन सनीला या संपूर्ण अपराधाबद्दल चांगलीच शिक्षा देण्यात अंकीताच्या आईवडीलांना यश आले.कायद्यान्वये सनीला तुरूंगवास ठोठावण्यात आला. त्याला शिक्षा झाल्यानंतर कुठे अंकीताची मनःस्थिती रूळावर आली. तोवर या प्रचंड संकटामुळे तिच्यावर जणू आभाळच कोसळलं होतं. गेले कित्तीतरी दिवस ती प्रचंड मानसिक त्रासातून गेली होती. आता जेव्हा अपराध्याला कायद्याच्या कचाट्यात अडकलेलं पाहिलं त्यानंतरच तिने सुटकेचा निःश्वास सोडला. यापुढे आपण असं वर्तन कधीही करायचं नाही असा विश्वास तिने मनोमनी जागवला व आपल्या आईवडीलांना तशी खात्री दिली. अंकीताच्या जीवनात आता नवा सूर्य उगवला होता.. अंकीताचं आयुष्य पुन्हा सुरळीत मार्गाला लागलं. 

- मोहिनी घारपुरे-देशमुख 



( सायबर क्राईम व सोशल मीडिया अवेअरनेसबद्दल माहिती हवी असल्यास माझं पेज जरूर फॉलो करा - https://www.facebook.com/casualwriter )

(ही कथा सत्यघटनेवर आधारीत परंतु संपूर्णतः काल्पनिक आहे हे वाचकांनी लक्षात घ्यावे. सायबर अपराधांविषयी वाचकांना माहिती कळावी, सायबर गुन्हे कसे व कोणत्या पद्धतीने घडू शकतात, आपण त्यात कसे अडकले जातो, किंवा आपल्या हातून झालेले एखादे कृत्य हा गंभीर सायबर अपराधही कसा ठरू शकतो याविषयी प्रबोधन होण्याकरीता मी या कथा आपल्या कल्पनेने रचून लिहीत आहे. मात्र, या अशा स्वरूपाच्या घटना भवताली थोड्याफार फरकाने घडत आहेत व म्हणूनच याविषयीचे प्रबोधन निरनिराळ्या पद्धतीने करण्याचा माझा हा निखळ प्रयत्न आहे याची वाचकांनी नोंद घ्यावी. तसेच या कथा कोठेही प्रसिद्ध करायच्या असतील तर माझी लेखी परवानगी घेणे अत्यावश्यक आहे. )



रविवार, २१ फेब्रुवारी, २०२१

'स्पर्श' - शॉर्टफिल्म



संपूर्ण जगभरातली एक ज्वलंत समस्या म्हणजे 'बाल लैंगिक शोषण'. या समस्येबद्दल विविध माध्यमातून प्रभावीपणे काम आजवर अनेकांनी केलं आहे. माझ्या लहानपणी 'वाटेवरती काचा गं' या शीर्षकाची एक सुंदर टेलिफिल्म मीना नाईक यांनी दिग्दर्शित केलेली आणि ज्यात आजची चला हवा येऊ द्या फेम श्रेया बुगडे हिने प्रमुख भूमिकेत ( बालकलाकार ) म्हणून काम केलं होतं.
त्यानंतर याच विषयावर आधारित नुकतीच एक अशीच सुंदर शॉर्टफिल्म यूट्यूबवर पहाण्यात आली आणि त्याविषयी आवर्जून लिहावसं वाटलं.
'स्पर्श' असं या शॉर्टफिल्मचं बोलकं नाव !
ज्येष्ठ लेखिका व दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांची ही फिल्म आहे. फिल्मचा मुख्य विषय बाललैंगिकशोषण असला तरीही त्यासह या फिल्ममध्ये वयात येणाऱ्या मुलांच्या लैंगिक जाणीवा विकसित होत असल्याने त्यांच्याशीही घरातल्या मोठ्या माणसांनी किती छान संवाद साधायला हवा याचं एक उत्तम उदाहरण दाखविण्यात आलं आहे.
मला कथानक सांगण्याऐवजी कथानकाविषयी इथे लिहायचं आहे, कारण, एरवी असा विषय पडद्यावर मांडतांनासुद्धा बालकलाकारांना उगाचच विचित्र , अवघड प्रसंग दिग्दर्शकाबरहुकूम वा कथानकाची गरज म्हणून रंगवावे लागतात. परंतु, या फिल्मचं हेच वैशिष्ट्य आहे की यातील बालकलाकार मुलीकडून अजिबात असे कोणतेही 'अवघड' प्रसंग करवून घेतलेले नाहीत.. आणि याबद्दल किंवा याचसाठी सुमित्रा भावे यांचे मनोभावे ( प्रेक्षक या नात्यानेच केवळ ) खूप खूप कौतुक आणि आभार. एखादी व्यक्ती ज्येष्ठ का होते ते अशा कसोटीच्या कलाकृती सांगून जातात व त्या व्यक्तीच्या मोठेपणावर शिक्कामोर्तब करतात.
दुसरी महत्त्वाची उल्लेखनीय बाब म्हणजे या फिल्ममध्ये शोषणकर्ता असलेला मुलगा आणि त्याच्याशी जाणीवपूर्वक साधलेला संवाद. तो संवाद साधण्याची जबाबदारी घेणारे डॉक्टर दांपत्य आणि मुळात तो संवाद घडवून आणण्यासाठी शोषित चिमुरडीच्या आईनेच खुद्द घेतलेला पुढाकार ! हे सगळं फार छान पद्धतीने मांडलेलं आहे. म्हणजे आपल्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्याला मारझोड नाही की आईचं हतबल होणं वगैरे नाही, किंवा घाबरून रडून गोंधळ घालणं नाही .. तर ही आई योग्य दिशेनी विचार करते आणि मुलीला तर मायेच्या पंखाखाली घेतेच पण शोषणकर्त्या मुलाचं वय, त्याची मानसिक स्थिती , त्याच्यात होणारे शारीरिक बदल या सगळ्याबद्दल संवेदनशील राहून त्याला योग्य ती शिकवण योग्य त्या व्यक्तीच्या माध्यमातून देते ही या कथानकाची आणखी एक उजवी बाजू !
प्रत्यक्षात असे शोषणकर्ते नेहमीच इतके 'कोवळे' असतातच असे मात्र नाही परंतु या फिल्म बद्दल बोलायचं झालं तर हे दोन महत्त्वाचे मुद्दे ज्यामुळे ही फिल्म अतिशय परिणामकारक ठरते.
स्पर्श .. हवेसे आणि नकोसे ..
मोठ्या माणसांनाही बरेचदा हे नकोसे स्पर्श टाळता येत नाहीत तिथे चिमुकल्यांची काय कथा !
नुकतंच याच विषयावर आधारित मीना कर्णिक यांनी अनुवाद केलेलं 'बिटर चॉकलेट' हे पुस्तक देखील वाचलं. त्यातील सत्यघटना हादरवून टाकणाऱ्या आहेत.
बाल लैंगिक शोषण या विषयाची निराळ्या व प्रभावी पद्धतीने मांडणी करणारी ही फिल्म म्हणूनच आवर्जून पहायला हवी व या विषयाबद्दल 'भान' व 'जाणीव' जागृती विस्तृत पातळीवर व्हायलाच हवी .. ही काळाची गरज आहे.

- मोहिनी घारपुरे-देशमुख

(https://youtu.be/ti87QIoa40E)

गुरुवार, १८ फेब्रुवारी, २०२१

उपवास स्पेशल रेसिपी

दही पापड चाट

तर मंडळी, उपवासाच्या दिवशी काहीतरी चटपटीत खाण्याचा मोह झाला तर हे दही पापड चाट ट्राय करा ..

उपवासाचे पापड तळून घ्या.

त्यावर मस्त चमचा चमचा दही घाला.

या दह्यावर आता तिखट, मीठ, पिठीसाखर आणि थोडीशी कोथिंबीर भुरभुरवा..

तुम्ही जर उपवासाला कोथिंबीर खात नसाल तर नका घालू .. 😂

आता मस्त आरामात बसा आणि झटपट खाऊन टाका ..


टीप

१. तुम्ही सगळे पापड क्रश करून मग दही, तिखट मीठ पिठीसाखर घालूनही खाऊ शकता .. भेळेसारखं 😇

२. खूप पापड दही घालून एकदम तयार करू नका .. ते मऊ पडतील


आणि आता हे सगळं वाचून म्हणू नका," अगं .. मीही अगदी हे अस्सेच पापड करून दह्याबरोबर खाते"

😏😏

😊😃😊😊😊😊😊

- मोहिनी

#रेसिपी_में_ट्विस्ट

बुधवार, १० फेब्रुवारी, २०२१

सदमा - 1983


सच्चा कोई सपना दे जा
मुझको कोई अपना दे जा
अंजानासा मगर कुछ पेहेचानासा
हलका फुलका शबनमी ..
रेशम से भी रेशमी

एक साधा नोकरदार माणूस सोमू (कमल हसन) .. त्याच्या आयुष्यात खरंतर चुकूनच आलेली एक मुलगी रेश्मी तिचं नाव.. जे त्यानीच तिला दिलंय (श्रीदेवी) , जिला एका अपघातानंतर आयुष्यानी पुन्हा अवघ्या सहा सात वर्षांचं करून ठेवलंय.. अशा मुलीला जपता जपता तो तिच्यावर निःस्सीम प्रेम करायला लागतो.. आणि अक्षरशः तिची आई बाप बनून काळजी घेतो, आपल्या आयुष्यातले कितीतरी दिवस फक्त तिच्यासाठी तिच्यावर खर्ची घालतो आणि अखेर जेव्हा रेश्मीची याददाश्त परत येते तेव्हा तिला त्यातलं काहीच आठवत नाही.. आपल्या सोमूला रेश्मी ओळखतही नाही .. अशी एक शोकांतिका ... सदमा या चित्रपटाची.

हा चित्रपट पहिल्यांदा पाहिला तेव्हा इतकी लहान होते मी .. अगदी कसंनुसंच झालं होतं.. नंतर पुन्हा पाहिला जेव्हा प्रेमाचा अर्थ कळायला लागला होता.

खऱ्या प्रेमाची उंची आणि खोली दोन्हीही मोजायला जाणं म्हणजे मूर्खपणाच .. ते निःस्सीम असतं, अमर्याद असतं आणि मुख्य म्हणजे ये ह्रदयीचे ते ह्रदयी थेट पोहोचणारं असतं. पैसा, जात, धर्म, लिंग, वय ही कोणतीच बंधनं जिथे उरत नाहीत आणि इथे तर रूढार्थाने दोन समंजस व्यक्ती असाव्यात हे देखील बंधन उरलं नाही. 'एका उच्च पातळीच्या प्रेमाची गोष्ट' असं एका वाक्यात या चित्रपटाचं वर्णन करता येईल.

या सोमूला खरंतर मुली वगैरे प्रकरणात त्याचा मित्र ओढतो आणि घेऊन जातो एकदा वेश्यागृहात.. हा जरा संकोचलेला कारण याची ही पहिलीच वेळ. तशातच तिथे नव्यानेच आलेली रेश्मी नावाची मुलगी याच्यापुढे उभी करतात. एका मोठ्या कार अपघातानंतर रेश्मीला स्मृतिभ्रंश झाल्याचं निदान होतं आणि डॉक्टर सांगतात, की ती आता मेंदूनी तिच्या वयाच्या सहाव्या वर्षात जाऊन पोहोचली आहे. ती पुन्हा पूर्ववत होईल की नाही याची खात्री नाही तसंच ती पूर्ववत केव्हा होईल हे देखील आता आपण सांगू शकत नाही.. डॉक्टरांशी आईवडीलांचा हा संवाद चाललेला असतो तेवढ्यात रेश्मीची ही अवस्था पाहून कोणीतरी तिला खोटंच सांगतं, चल तुला आईवडीलांकडे नेतो आणि ही बिचारी त्याच्यामागे निघते ती थेट पोहोचते त्या वेश्यागृहात. सोमूची तिची पहिली भेट होते आणि त्याच्या लक्षात येतं की हिला इथे असं फसवून आणलं गेलंय. त्याच्या डोळ्यात पाणी तरळतं. नंतर मागेल तितके पैसे पुढे करत तो रेश्मीला तिथून सोडवतो आणि आपल्या घरी आणतो. तिच्याशी एका क्षणात त्याचं जे नातं जुळतं ते थेट मनाचं असतं. तीही सोमूजवळे रूळते आणि दिवसागणिक खुलतेही. अगदी लहान निरागस पोरगीच असते ती मनानी, त्यामुळेच तर तिचं वागणं बोलणं उठणं बसणं सगळं सगळं अगदी अल्लड.. एखाद्या अविवाहीत पुरूषाला अशा सुंदर स्त्रीचं आकर्षण वाटून त्याच्या हातून एखाद्या चुकार क्षणी अवचित काही घडण्याची दाट शक्यता .. पण सोमू .. हा मात्र त्यातला नसतोच. हा फक्त पुरूष नसतो तर हा माणूस असतो. याला त्याच्या मर्यादा माहिती असतात आणि तो चुकूनही त्या मर्यादांचा भंग करत नाही. ती त्याची मालमत्ता असल्यागत तो तिच्यावर अधिकारही गाजवत नाही. तो तिच्यावर केवळ आणि केवळ खूप खूप प्रेम करायला लागलेला असतो. त्याच्या एकाकी जीवनात त्याच्याखेरीज आता कोणी त्याचा आधार बनून आलेलं असतं तर ती व्यक्ती म्हणजे रेश्मी.. जसा रेश्मीचा सवंगडी हरीप्रसाद .. तसं सोमूची सवंगडी रेश्मी. मग ती कशी का असेना आणि तिच्यापायी सोमूला कितीका त्रास होईना.. तो सगळं हसत हसत सहन करतो. तिचे रूसवे काढतो, तिच्यासाठी खायला बनवतो, तिला आपल्या हातांनी भरवतो आणि अगदी वेळ आलीच तर अंगाई म्हणून झोपवतोही. तिचे बालीश हट्टही पुरवतो... हे सारं सारं किती श्रेयस्कर.. कल्पनातीत परंतु तरीही वास्तव.. !

स्वत्व विसरून केवळ तिचा आणि तिचा होणारा सोमू ..

सोमूला भुलवणारी एक मॅडम (सिल्कस्मिथा) असते पण क्षणीक तिच्याकडे आकर्षिला गेला तरीही सोमू तिच्यापाठी वहावत नाही. प्रेमाची उच्च अनुभूती त्याच व्यक्तीकडून माणसाला हवी असते ज्यावर त्याचं खरंच प्रेम असतं हा आणखी एक संदेश..

आणि तिकडे रेश्मीच्या अर्धवटपणाचा फायदा घेऊन तिच्याशी लगट करण्याची संधी शोधत असलेला बलवा (गुलशन ग्रोवर) एक दिवशी तशी संधी साधतोच.. पण रेश्मी स्वतःचा जीव वाचवून तिथून पळ काढण्यात यशस्वी होते.. ती थेट सोमूला रडत हमसत कहाणी सांगते. त्यानंतर मात्र सोमूतला संरक्षक पुरूष जागा होतो नि बलवाला मारमार मारतो.. कित्तीतरी वेळ या घटनेनंतर स्वतः आक्रंदत रहातो. एका निरागस मुलीचा कोणीतरी असा फायदा घेणार होतं ही कल्पनाही सोमूसारख्या खऱ्या पुरूषाला असह्य असते.

बलवा रेश्मीबरोबर जे करणार असतो ते प्रेम नाही हा दुसरा महत्त्वाचा संदेश.. प्रेम असं ओरबाडून मिळत नाही .. शरीराची वासना शमवण्यासाठी केलेले स्पर्श म्हणजे प्रेम नाही हे इथे थेट पोहोचतं.

मग पुन्हा सोमूचं आणि रेश्मीचं आयुष्य सुरू होतं.. आता मनामनाचे बंध अधिक घट्टमुट्ट झालेले असतात. रेश्मीला बरं करण्यासाठी एका वैदूची मदत घेण्याचा सल्ला सोमूला शेजारणीकडून मिळतो, आणि एक प्रयत्न करून पहावा म्हणून शेजारची आजी आग्रह करते. तिकडे रेश्मी या गावात असल्याची माहिती जशी तिच्या आईबाबांना कळते तशी ते तिला शोधत शोधत त्या वैदूच्या घरी जाऊन पोचतात, सोबत पोलीस घेऊनच .. सोमूला जशी ही बातमी कळते तो बिचारा तिथे जातच नाही आणि तितक्यात वैदजींची दवा काम करते. रेश्मी चार तासांनी शुद्धीवर येते तो समोर आईवडील .. रेश्मीही त्यांना सहज ओळखते आणि पुढच्या काही तासातच सोमूचं जीवन उध्वस्त होऊन जातं..

रेश्मीची शेवटची भेट तरी नीट व्हावी नं .. पण छे .. तेही त्याच्या नशीबात नसतं. मुंबईच्या ट्रेननी ती आईवडीलांबरोबर परत जाणार हे कळताच सोमू जीवाचं रान करत पळत सुटतो. प्लॅटफॉर्मवर वेळेत पोचण्यासाठी त्याचं पळत सुटणं, त्यात अॅक्सिडेंट, पायाला दुखापत .. पण तसाच पाय ओढत तो तिथे पोचतो तर प्लॅटफॉर्मवर गर्दी. अशा गर्दीत रेश्माला आपल्या दुखऱा पाय फरपटत ओढत शोधता शोधता अखेर ती दिसते.. पण आज ती ती रेश्मी नसते. तिच्या डोळ्यात सोमूसाठी साध्या ओळखीच्या खुणाही शिल्लक राहिलेल्या नसतात. ती त्याच्याकडे विचित्र नजरेनी बघते नि आपलं काळीज चिरतं. पलीकडे तो प्लॅटफॉर्मवर गर्दीची तमा न बाळगता, आपल्या वेदनांची पर्वा न करता, रेश्मीला त्यांच्या दोघांचे क्षण आठवून देण्याचा केविलवाणा प्रयत्न करत रहातो.. खांबावर आदळला तरीही .. डोकं फुटायची वेळ आली तरीही .. अगदी तिच्यापुढे पुन्हा तो पूर्वी घरी तिच्याबरोबर खेळलेला मदारी आणि माकडाचा खेळ, त्यातील काही प्रसंग जिवंत करतो .. तिला हाका मारतो.. तिला त्याची ओळख पटवून देण्याचा प्रयत्न करतो पण ती .. तिला आता काही म्हणजे काही आठवत नसतं. ती आता पूर्ववत एक स्मार्ट तरूणी झालेली असते. त्याच्या त्या कृती म्हणजे तिला मर्कटलीला वाटतात, एका क्षणी तर ती पैसे काढून त्याला खिडकीतून देऊ करते .. हा क्षण सगळ्यात क्रूर ..

नियती .. नशीब त्याचं चाक फिरवत माणसांची आयुष्य पुढे नेत रहातं पण याच जीवनात मिळालेल्या खऱ्या प्रेमासाठी माणसं जीवनभर तरसत रहातात. हे क्षण परत आपल्या ओंजळीत यावेत यासाठी असे केवीलवाणे प्रयत्न करत रहातात. पण छे.. जे एकदा निसटलं ते निसटलंच.. या जीवनाचं असं काही आहे ! अखेर ज्या सदम्यात रेश्मी स्वतःची वाट विसरलेली असते काही काळ, तो सदमा आज ती जाताजाता सोमूला देऊन जाते..

कथा संपते .. चित्रपट संपतो .. पण तरीही प्रेम मात्र पुरून उरतं.

आपल्या डोळ्यात पाणी तरळत रहातं.

एका उच्च दर्जाच्या प्रेमाची ही शोकांतिका .. मात्र खऱ्या जीवनात हे असं प्रेम मिळून सुखांतिकेने जीवन फुलावे हीच प्रार्थना !

Happy Valentine's Day all

- मोहिनी घारपुरे - देशमुख


बुधवार, ३ फेब्रुवारी, २०२१

घर परतीच्या वाटेवरती ...

एक गाण आवडलं की ते मन भरेस्तोवर ऐकत बसायचं या कॅटेगरीतली काही ठार वेडी माणसं या जगात आहेत आणि मी त्यांपैकीच एक आहे याचा मला अभिमान आहे. गाण्याचे शब्द, त्या गाण्याचं संगीत .. या धुंदीतच रहायचं मग .. दुसरे कुठलेही आवाज नकोत.. कोणाशी काही संभाषण नको.. मस्त एक आपली अशी जागा.. कम्फर्टेबल पोझिशन घ्यायची, जमल्यास चहा किंवा कॉफीचा मग उगाच आपला .. विशेषतः बाहेर पाऊस पडत असताना किंवा कडाक्याची थंडी असताना घरात आपण आपला असा षड्ज आळवत नि मनात घोळवत रहायचा.
मला कमाल वाटते या संगीतकार मंडळींची की त्यांना कसं समजतं नं की कोणत्या गाण्याला कशी चाल लावली .. कोणत्या कवितेतले शब्द कशापद्धतीने गायले तर ते काळजाला भिडतील .. तसंच कोणत्या गीताला कसे संगीत द्यायला हवे .. आणि नेमकी कोणती वाद्य समाविष्ट करायची.. आणि हा सगळा मेळ पुन्हा त्या कवितेच्या मीटरला साजेसा .. खरंच कमाल वाटते. मराठी मातीशी ईमान राखणारे सुप्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार यांनी संगीतबद्ध केलेलं एक गाणं जे शांताबाई शेळके यांनी लिहीलेलं आहे ते जेव्हा मी ऐकलं तेव्हा त्या गाण्याने मला अक्षरशः मुग्ध करून टाकलं. ते गाणं म्हणजे, 

घर परतीच्या वाटेवरती धूसर धूसर धूळ उडे
अंधूक होते नजर आणखी थकलेले पाऊल अडे
घर परतीच्या वाटेवरती पडल्या-झडल्या शीर्ण खुणा
मावळतीच्या किरणांमधुनी क्षण झळझळुनि उठती पुन्हा
घर परतीच्या वाटेवरती पायांवाचून पाय-ठसें
अश्रुत चाहूल येते कानीं.. एक हुंदका, एक हसे
घर परतीच्या वाटेवरती आभासांचे दाट धुके
सावलीत सावली मिसळते अन्‌ पुटपुटती ओठ मुके
घर परतीच्या वाटेवरती मलूल, वत्सल, सांज उन्हें
कुरवाळिती मज स्‍नेहभरानें विसरून माझे लाख गुन्हें...

- शांता शेळके.
संगीत - कौशल इनामदार
स्वर - साधना सरगम 
अल्बम - शुभ्र कळ्या मूठभर

बाहेरच्या उन्हाने पोळलेल्या आपल्याला संधीकाली सुखद गारवा कितीही आनंद देत असला तरीही जेव्हा कानावर अशी तरल कविता पडते तेव्हा माझ्यासारख्या एखाद्या सासुरवाशिणीला माहेराची आठवण आल्यावाचून रहात नाही आणि मग हे शब्द जणू आपल्याच आयुष्याला भूतकाळाच्या वाटेवर खेचून नेत आहेत असं वाटत रहातं. 
आपण माहेरी जातो नि तिथून परत सासरी यायला निघतो.. तेव्हा हे गाणं जणू कानात रेंगाळतं नि आपल्या मनाचे शब्दच आपल्याला या गीतातून पुन्हा ऐकू येत जातात.
 
घर परतीच्या वाटेवरती धूसर धूसर धूळ उडे
अंधूक होते नजर आणखी थकलेले पाऊल अडे

जणू माहेराहून सासरी जाणारी मुलगी .. तिला माहेरच्या असंख्य आठवणी हव्याहव्याशा वाटतात पण एक मन आता सासरी खेचत असतानाच या आठवणींची धूळ मात्र सतत मनाभोवती फेर धरते.. 

घर परतीच्या वाटेवरती पडल्या-झडल्या शीर्ण खुणा
मावळतीच्या किरणांमधुनी क्षण झळझळुनि उठती पुन्हा
घर परतीच्या वाटेवरती पायांवाचून पाय-ठसें
अश्रुत चाहूल येते कानीं.. एक हुंदका, एक हसे

तिला तिचं बालपण आठवतं, ते सगळे दिवस .. जिथे ती खेळली, बागडली, रूसली, हसली .. ते सारं आठवून गहीवरायला होतं.. आणि आज ते सगळं भवताली नाही पण तरीही मनाला मात्र त्या साऱ्याची आठवण येऊन डोळे पाणावतात. 
वाटतं पुन्हा धावत माघारी जावं, आपल्या घरी निवांत रमावं, आईबाबांनी लाड करावेत, शाळेच्या रस्त्याने वाट तुडवत मैत्रिणींसंगे पुन्हा एकदा रमत गमत घराकडे यावे, पुन्हा त्या ओळखीच्या रस्त्यांवरच्या ओळखीच्या खाणाखुणा डोळ्यांत साठवून घ्याव्या .. आणि या आठवांनी एकाच क्षणी ओठावर हसू येते आणि डोळ्यांतून पाणी ओझरायला लागते. 
त्या ओळी आहेत नं, बीती ना बिताई रैना गाण्यातल्या ... 
बीती हुई बतिया कोई दोहोराए .. भुले हुए नामोंसे कोई तो बुलाए 
अगदी तसंच काहीसं वाटायला लागतं. लाख आठवणींचा कोलाज डोळ्यापुढे फेर धरतो आणि त्यातच रमून जावसं वाटतं. 

घर परतीच्या वाटेवरती आभासांचे दाट धुके
सावलीत सावली मिसळते अन्‌ पुटपुटती ओठ मुके

मग कधीतरी ती सासुरवाशीण मुलगी स्वतःच स्वतःला आपल्याच बालपणीच्या नावांनी हाक मारून बघते. ती विशिष्ट हाक कोणी तिला मारायचं .. मग ती व्यक्ती कोणीही असू देत .. तिचे आईवडील तिला लाडाने जी हाक मारायचे ती किंवा एखाद्या खट्याळ मैत्रिणीने तिला दिलेलं नाव.. किंवा एखाद्या प्रीय व्यक्तीने तिला एखाद्या चुकार क्षणी मनापासून मारलेली हाक .. हे सारं त्या सासुरवाशिणीला आठवतं. आज जरी ती कोणाची प्रिय पत्नी असली तरीही भूतकाळात तिने ही सगळी नाती जगलेली असतातच .. त्या नात्यांच्या आठवणी कुठं पुरायच्या तिनं .. मग त्या अशा मनाच्या खोलखोल कप्प्यात तिनं कुलुपबंद ठेऊन दिलेल्या असतात.. एखादी अशी पद्यरचना, एखादं असं गीत मग थेट मनाचा तो खोल कप्पा उघडतं आणि असं हळवं करून जातं. 
असं ते माहेर .. सुखाचं .. प्रेमाचं आणि नात्यांच्या सुंदर रेशमी धाग्यांचं.. 
पण ते माहेर सोडून ती आता सासरी नांदते आणि मनोमनी माहेर जपते. या माहेराने तिला काय दिलं नाही .. सगळं दिलं.. सासरीही सगळंच तर मिळतंय .. पण जीवनाची जी वाट ती जगली ती वाट तिला पुन्हा परतून कधीच भेटणार नसते हे जेव्हा जेव्हा तिला जाणवतं अशा वेळी तिला फक्त आणि फक्त कृतज्ञताच वाटते.. तेव्हा तिला जणू वाटतं, 

घर परतीच्या वाटेवरती मलूल, वत्सल, सांज उन्हें
कुरवाळिती मज स्‍नेहभरानें विसरून माझे लाख गुन्हें...

आता जरी मी सासरी असले तरीही माहेराची ही आठवण म्हणजे फार फार व्याकूळ करणारी .. आणि त्या व्याकूळ होण्याने माझ्या मनात या मलूल पण प्रेमळ भावनांची आता गर्दी झाली आहे.. माझे लाखो गुन्हे म्हणजे लहानसहान चुकाही जिथे सहजी माफ झाल्या अशा माहेराची मला आता ओढ लागली आहे.. 
खरंतर .. ही कविता, एखाद्या अशा व्यक्तीलाही चोख लागू (रिलेट) होईल जो कोणत्यातरी चुकीच्या मार्गाला भरकटून आता पुन्हा योग्य मार्गाने जगायला लागला आहे.. पण मला मात्र या कवितेचा अर्थ हा असा वाटला. 
एकच गाणं पण ते कित्तीप्रकारे मनाला भिडतं. मनाच्या आत तरंग उमटवत जातं.. एखादा दिवस एखाद्या गाण्याचा असतो हेच खरं.. 
घर परतीच्या वाटेवरती ... धूसर धूसर धूळ उडे ... 
अशी भावपूर्ण गाणी ऐकायची आणि अक्षरशः ढसाढसा रडून घ्यायचं .. अगदी मनभर रडून घ्यायचं हे देखील एक वरदानच आहे देवानं दिलेलं.. ! (की कवी आणि संगीतकारांनी आपल्याला मुक्तहस्ते दिलेलं देणं ? जे आपण त्यांना कधीही परत देऊ शकणार नाही .. कदाचित ..)


- मोहिनी घारपुरे - देशमुख



Translate

Featured Post

अमलताश