बुधवार, १० फेब्रुवारी, २०२१

सदमा - 1983


सच्चा कोई सपना दे जा
मुझको कोई अपना दे जा
अंजानासा मगर कुछ पेहेचानासा
हलका फुलका शबनमी ..
रेशम से भी रेशमी

एक साधा नोकरदार माणूस सोमू (कमल हसन) .. त्याच्या आयुष्यात खरंतर चुकूनच आलेली एक मुलगी रेश्मी तिचं नाव.. जे त्यानीच तिला दिलंय (श्रीदेवी) , जिला एका अपघातानंतर आयुष्यानी पुन्हा अवघ्या सहा सात वर्षांचं करून ठेवलंय.. अशा मुलीला जपता जपता तो तिच्यावर निःस्सीम प्रेम करायला लागतो.. आणि अक्षरशः तिची आई बाप बनून काळजी घेतो, आपल्या आयुष्यातले कितीतरी दिवस फक्त तिच्यासाठी तिच्यावर खर्ची घालतो आणि अखेर जेव्हा रेश्मीची याददाश्त परत येते तेव्हा तिला त्यातलं काहीच आठवत नाही.. आपल्या सोमूला रेश्मी ओळखतही नाही .. अशी एक शोकांतिका ... सदमा या चित्रपटाची.

हा चित्रपट पहिल्यांदा पाहिला तेव्हा इतकी लहान होते मी .. अगदी कसंनुसंच झालं होतं.. नंतर पुन्हा पाहिला जेव्हा प्रेमाचा अर्थ कळायला लागला होता.

खऱ्या प्रेमाची उंची आणि खोली दोन्हीही मोजायला जाणं म्हणजे मूर्खपणाच .. ते निःस्सीम असतं, अमर्याद असतं आणि मुख्य म्हणजे ये ह्रदयीचे ते ह्रदयी थेट पोहोचणारं असतं. पैसा, जात, धर्म, लिंग, वय ही कोणतीच बंधनं जिथे उरत नाहीत आणि इथे तर रूढार्थाने दोन समंजस व्यक्ती असाव्यात हे देखील बंधन उरलं नाही. 'एका उच्च पातळीच्या प्रेमाची गोष्ट' असं एका वाक्यात या चित्रपटाचं वर्णन करता येईल.

या सोमूला खरंतर मुली वगैरे प्रकरणात त्याचा मित्र ओढतो आणि घेऊन जातो एकदा वेश्यागृहात.. हा जरा संकोचलेला कारण याची ही पहिलीच वेळ. तशातच तिथे नव्यानेच आलेली रेश्मी नावाची मुलगी याच्यापुढे उभी करतात. एका मोठ्या कार अपघातानंतर रेश्मीला स्मृतिभ्रंश झाल्याचं निदान होतं आणि डॉक्टर सांगतात, की ती आता मेंदूनी तिच्या वयाच्या सहाव्या वर्षात जाऊन पोहोचली आहे. ती पुन्हा पूर्ववत होईल की नाही याची खात्री नाही तसंच ती पूर्ववत केव्हा होईल हे देखील आता आपण सांगू शकत नाही.. डॉक्टरांशी आईवडीलांचा हा संवाद चाललेला असतो तेवढ्यात रेश्मीची ही अवस्था पाहून कोणीतरी तिला खोटंच सांगतं, चल तुला आईवडीलांकडे नेतो आणि ही बिचारी त्याच्यामागे निघते ती थेट पोहोचते त्या वेश्यागृहात. सोमूची तिची पहिली भेट होते आणि त्याच्या लक्षात येतं की हिला इथे असं फसवून आणलं गेलंय. त्याच्या डोळ्यात पाणी तरळतं. नंतर मागेल तितके पैसे पुढे करत तो रेश्मीला तिथून सोडवतो आणि आपल्या घरी आणतो. तिच्याशी एका क्षणात त्याचं जे नातं जुळतं ते थेट मनाचं असतं. तीही सोमूजवळे रूळते आणि दिवसागणिक खुलतेही. अगदी लहान निरागस पोरगीच असते ती मनानी, त्यामुळेच तर तिचं वागणं बोलणं उठणं बसणं सगळं सगळं अगदी अल्लड.. एखाद्या अविवाहीत पुरूषाला अशा सुंदर स्त्रीचं आकर्षण वाटून त्याच्या हातून एखाद्या चुकार क्षणी अवचित काही घडण्याची दाट शक्यता .. पण सोमू .. हा मात्र त्यातला नसतोच. हा फक्त पुरूष नसतो तर हा माणूस असतो. याला त्याच्या मर्यादा माहिती असतात आणि तो चुकूनही त्या मर्यादांचा भंग करत नाही. ती त्याची मालमत्ता असल्यागत तो तिच्यावर अधिकारही गाजवत नाही. तो तिच्यावर केवळ आणि केवळ खूप खूप प्रेम करायला लागलेला असतो. त्याच्या एकाकी जीवनात त्याच्याखेरीज आता कोणी त्याचा आधार बनून आलेलं असतं तर ती व्यक्ती म्हणजे रेश्मी.. जसा रेश्मीचा सवंगडी हरीप्रसाद .. तसं सोमूची सवंगडी रेश्मी. मग ती कशी का असेना आणि तिच्यापायी सोमूला कितीका त्रास होईना.. तो सगळं हसत हसत सहन करतो. तिचे रूसवे काढतो, तिच्यासाठी खायला बनवतो, तिला आपल्या हातांनी भरवतो आणि अगदी वेळ आलीच तर अंगाई म्हणून झोपवतोही. तिचे बालीश हट्टही पुरवतो... हे सारं सारं किती श्रेयस्कर.. कल्पनातीत परंतु तरीही वास्तव.. !

स्वत्व विसरून केवळ तिचा आणि तिचा होणारा सोमू ..

सोमूला भुलवणारी एक मॅडम (सिल्कस्मिथा) असते पण क्षणीक तिच्याकडे आकर्षिला गेला तरीही सोमू तिच्यापाठी वहावत नाही. प्रेमाची उच्च अनुभूती त्याच व्यक्तीकडून माणसाला हवी असते ज्यावर त्याचं खरंच प्रेम असतं हा आणखी एक संदेश..

आणि तिकडे रेश्मीच्या अर्धवटपणाचा फायदा घेऊन तिच्याशी लगट करण्याची संधी शोधत असलेला बलवा (गुलशन ग्रोवर) एक दिवशी तशी संधी साधतोच.. पण रेश्मी स्वतःचा जीव वाचवून तिथून पळ काढण्यात यशस्वी होते.. ती थेट सोमूला रडत हमसत कहाणी सांगते. त्यानंतर मात्र सोमूतला संरक्षक पुरूष जागा होतो नि बलवाला मारमार मारतो.. कित्तीतरी वेळ या घटनेनंतर स्वतः आक्रंदत रहातो. एका निरागस मुलीचा कोणीतरी असा फायदा घेणार होतं ही कल्पनाही सोमूसारख्या खऱ्या पुरूषाला असह्य असते.

बलवा रेश्मीबरोबर जे करणार असतो ते प्रेम नाही हा दुसरा महत्त्वाचा संदेश.. प्रेम असं ओरबाडून मिळत नाही .. शरीराची वासना शमवण्यासाठी केलेले स्पर्श म्हणजे प्रेम नाही हे इथे थेट पोहोचतं.

मग पुन्हा सोमूचं आणि रेश्मीचं आयुष्य सुरू होतं.. आता मनामनाचे बंध अधिक घट्टमुट्ट झालेले असतात. रेश्मीला बरं करण्यासाठी एका वैदूची मदत घेण्याचा सल्ला सोमूला शेजारणीकडून मिळतो, आणि एक प्रयत्न करून पहावा म्हणून शेजारची आजी आग्रह करते. तिकडे रेश्मी या गावात असल्याची माहिती जशी तिच्या आईबाबांना कळते तशी ते तिला शोधत शोधत त्या वैदूच्या घरी जाऊन पोचतात, सोबत पोलीस घेऊनच .. सोमूला जशी ही बातमी कळते तो बिचारा तिथे जातच नाही आणि तितक्यात वैदजींची दवा काम करते. रेश्मी चार तासांनी शुद्धीवर येते तो समोर आईवडील .. रेश्मीही त्यांना सहज ओळखते आणि पुढच्या काही तासातच सोमूचं जीवन उध्वस्त होऊन जातं..

रेश्मीची शेवटची भेट तरी नीट व्हावी नं .. पण छे .. तेही त्याच्या नशीबात नसतं. मुंबईच्या ट्रेननी ती आईवडीलांबरोबर परत जाणार हे कळताच सोमू जीवाचं रान करत पळत सुटतो. प्लॅटफॉर्मवर वेळेत पोचण्यासाठी त्याचं पळत सुटणं, त्यात अॅक्सिडेंट, पायाला दुखापत .. पण तसाच पाय ओढत तो तिथे पोचतो तर प्लॅटफॉर्मवर गर्दी. अशा गर्दीत रेश्माला आपल्या दुखऱा पाय फरपटत ओढत शोधता शोधता अखेर ती दिसते.. पण आज ती ती रेश्मी नसते. तिच्या डोळ्यात सोमूसाठी साध्या ओळखीच्या खुणाही शिल्लक राहिलेल्या नसतात. ती त्याच्याकडे विचित्र नजरेनी बघते नि आपलं काळीज चिरतं. पलीकडे तो प्लॅटफॉर्मवर गर्दीची तमा न बाळगता, आपल्या वेदनांची पर्वा न करता, रेश्मीला त्यांच्या दोघांचे क्षण आठवून देण्याचा केविलवाणा प्रयत्न करत रहातो.. खांबावर आदळला तरीही .. डोकं फुटायची वेळ आली तरीही .. अगदी तिच्यापुढे पुन्हा तो पूर्वी घरी तिच्याबरोबर खेळलेला मदारी आणि माकडाचा खेळ, त्यातील काही प्रसंग जिवंत करतो .. तिला हाका मारतो.. तिला त्याची ओळख पटवून देण्याचा प्रयत्न करतो पण ती .. तिला आता काही म्हणजे काही आठवत नसतं. ती आता पूर्ववत एक स्मार्ट तरूणी झालेली असते. त्याच्या त्या कृती म्हणजे तिला मर्कटलीला वाटतात, एका क्षणी तर ती पैसे काढून त्याला खिडकीतून देऊ करते .. हा क्षण सगळ्यात क्रूर ..

नियती .. नशीब त्याचं चाक फिरवत माणसांची आयुष्य पुढे नेत रहातं पण याच जीवनात मिळालेल्या खऱ्या प्रेमासाठी माणसं जीवनभर तरसत रहातात. हे क्षण परत आपल्या ओंजळीत यावेत यासाठी असे केवीलवाणे प्रयत्न करत रहातात. पण छे.. जे एकदा निसटलं ते निसटलंच.. या जीवनाचं असं काही आहे ! अखेर ज्या सदम्यात रेश्मी स्वतःची वाट विसरलेली असते काही काळ, तो सदमा आज ती जाताजाता सोमूला देऊन जाते..

कथा संपते .. चित्रपट संपतो .. पण तरीही प्रेम मात्र पुरून उरतं.

आपल्या डोळ्यात पाणी तरळत रहातं.

एका उच्च दर्जाच्या प्रेमाची ही शोकांतिका .. मात्र खऱ्या जीवनात हे असं प्रेम मिळून सुखांतिकेने जीवन फुलावे हीच प्रार्थना !

Happy Valentine's Day all

- मोहिनी घारपुरे - देशमुख


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Translate

Featured Post

अमलताश