भूगोलाच्या पुस्तकातलं कर्कवृत्त, मकरवृत्त आणि विषुववृत्त आपण कधी प्रत्यक्षात पाहू हा विचारही जिथे माझ्यासारख्या कोणाही सामान्य माणसाच्या मनाला शिवणार नाही तिथे माझे बॅकपॅकर मित्र प्रवीण आणि उल्का मानकर थेट याची देही याची डोळा पृथ्वीचं विषुववृत्त पाहून आले, त्यावर चालून आले, तिथे फोटो काढून आले आणि धम्माल करून आले. मी या जोडप्याची अधिकृत पीआर नाही, पण माझा जनसंपर्कच नसेल तर मी हे काम करूच शकत नाही. म्हणूनच, माझ्या जीवनात देवाने मला कदाचित असे एक से एक मित्रमंडळी दिले आहेत ज्यांच्याशी माझे सूर आपसूकच जुळतात, आपोआपच ही माणसं माझ्या आयुष्यात येतात आणि मी त्यांच्या सहवासातून मला जे वेचायचंय ते सहज वेचत रहाते. इट इझ ऑल अबाऊट हार्ट टू हार्ट ... इथे पैसा नाही लागत, मन कळावं लागतं, माणूस समजावं लागतं ... हा आहे माझा गाभा.
जेव्हा प्रवीण काकांची ही व्हॉट्सअप पोस्ट मला आली, तेव्हा मी ती खरोखरच आधी
इग्नोर केली होती. इग्नोर यासाठी की मला हे माहीत आहे की ते सध्या युगांडात फिरत
आहेत आणि तिथून ते आपल्याला तिथलं जनजीवन त्यांच्या शैलीत दाखवत आहेत त्यामुळे बघू
सगळं निवांत असा विचार करत दैनंदिन कामाला रहाटगाडग्याला जुंपलेली मी ... दर दोन
तीन दिवसांनी दोन तीन आधीच्या पोस्ट वाचत होते, वाचते आहे आणि थक्क व्हायला होतंय.
या दंपतीच्या अमेझिंग प्रवासाच्या खऱ्याखुऱ्या अनुभवाची साक्ष होताना अंगावर
रोमांच उठल्याशिवाय रहात नाहीत.
मी हे लिहीते कारण मला ह्युमन इंटरेस्ट स्टोरीजमध्ये रस आहे आणि माझ्यासारखाच
तो अनेकांना असतो. प्रवीण काका माझी ही भूक भागवत आहेत. घरबसल्या, ऑनलाईन
माध्यमातून गुगल सर्च करताना युगांडाचं जे थ्रिल तुम्हाला मिळणार नाही ते थ्रिल
... तो अनुभव देण्याचं महत्कार्य प्रवीण आणि उल्का दांपत्य तिथून करत आहेत.
आपल्याला आपल्या माणसांची काहीच किंमत नसते, पण माझं तसं नाहीये. मेरे लिये
... हर एक फ्रेंड जरूरी होता है हे सत्य आहे.
तर चक्क विषुववृत्त कसं आहे कुठे आहे हे युगांडाच्या या व्हिडीओत तुम्हालाही
बघायला मिळेल. त्यावरून चालताना काय रोमांच उठले असतील या दोघांच्या शरीरावर याची
मी इथे बसून कल्पना करू शकते.
बॅकपॅकींग करणाऱ्या माणसाला कसली भीती नसते. ते कोणातही मिसळू शकतात, कुठेही
भटकू शकतात, काहीही खाऊ शकतात... पण हेच तर माणूस म्हणून अपेक्षीत आहे ना... माणूस
म्हणून आपण भेदाभेद विसरून एकमेकांबरोबर असलं पाहिजे. रंग, भाषा, धर्म, जात, पंथ
याचा अभिमान आपल्या मनाच्या मर्यादेत ठेवता आला पाहिजे आणि त्यापलीकडे जाऊन
दुसऱ्याचाही याच मुद्द्यांनी आदर ठेवता आला पाहिजे हे खरे जीवनमूल्य असे मला
वाटते. अनेक माणसं हेच विसरतात, ते सतत मनामनात निरनिराळ्या मुद्द्यांना घेऊन
द्वेष, विखार पसरवत जातात. एकमेकांच्या प्रती मनात आकस वाढवत जातात. हे करून आपण
आपलीच कक्षा किती छोटी करत जातोय हे त्यांच्या लक्षात येत नाही. जीवन यापेक्षा खूप
अर्थपूर्ण आहे, हे जग आपल्या कल्पनेपेक्षा खूप मोठं आहे आणि ही पृथ्वी आपल्यावर
सगळ्यांना समानतेने वाढवण्यास किती अर्थाने सक्षम आहे हे आपापल्या कल्पनेच्या आणि
विचारांच्या खुराड्यात रहाणाऱ्या लोकांना कधीच कळणार नाही.
चला, आपण या चौकटींच्या पलीकडे जाऊया. एक नवं आकाश शोधत आणि त्यातल्या
माणसांना सहजतेने आपलंस करत पुढे चालत राहूया. जीवनाला नवा अर्थ देऊया.
*धन्यवाद प्रवीण आणि
उल्का.*
*- मोहिनी घारपुरे
देशमुख*
सोबत दिलेली व्हिडीओची लिंक नक्की नक्की पहा...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा