रविवार, ३१ जानेवारी, २०२१

स्पर्श

( नुक्कडकथाविश्व अंतर्गत पर्व १ साठी पाठवलेली माझी कथा )

दाराबाहेर एक गरीब बाई, सुलभा तिचं नाव .. ती कडेवर आपल्या पोराला घेऊन आली तशी त्या घरच्या गृहिणीनं झटकन स्वयंपाकघरातून सगळं शिळंपाकं आणलं. दाराच्यापल्याड समोर जमिनीवर ठेऊन दिलं नि झटक्यात घरात शिरून दार बंद करून घेतलं. सुलभाच्या मनाला असंख्य यातना झाल्या पण समोर दिसत असलेले चार घास आता तिला हवेच होते.. साऱ्या सकाळपासून तिला खायला काहीच मिळालं नव्हतं. चार घरची धुणीभांडी करत आपल्या तान्ह्याला वाढवणं तिच्यासाठी हल्ली फार अवघड झालं होतं. तिला कुणीच नव्हतं या पोराशिवाय.. म्हणून बिचारी पोराला कडेवर घेऊन झेपेल तितक्या घरची कामं करत दिवस काढत होती.. पण अचानक कोरोनाचं संकट आलं आणि बिचारीच्या चालत्या गाड्याला खीळच पडली. कामं बंद झाली.. लॉकडाऊननी तर तिची अवस्था आणखी बिकट झाली. आता या क्षणी पुढ्यात पडलेलं अन्न तिला खुणावत होतं ते तिनं झट्दिशी उचललं पुढं जाऊन एका झाडाखाली बसून चार घास जेवली. एका झाडाच्या कुशीत निजली. तान्ह्याला छातीशी घेतलं तशी ते मुटूमुटू दूध प्यालं आणि आईच्या ऊबेत निवांत झोपी गेलं.  

....

रजनी ऑफीसातून घरी आली. आज घरात कोणीच नव्हतं. तिनं बिछान्यावर अंग टाकलं नि निवांत विसावली. एरवी घरात येताच छकुलींनं घातलेली लडीवाळ मिठी तिला तेव्हा आठवली. तिचा हा काही वेळेचा दुरावाही तिला त्याक्षणी असह्य झाला पण पुढच्याच क्षणी तिला जरा बरंही वाटलं. सतत लडीवाळपणाने जवळ जवळ करणारी मुलगी, येताजाता प्रेमानेच का होईना पण अंगाशी झोंबणारा नवरा .. या कोणत्याच स्पर्शाशिवाय त्याक्षणी शरीराला मिळालेला असा निवांतपणा तिला फार फार सुखावून गेला. स्पर्शांनी गजबजलेलं 'घरपण' एरवी हवंच पण कधीतरी असा मोकळेपणाही हवाच त्याचीच जणू तिला त्याक्षणी ओढ लागली होती. स्वतःच्या शरीराची आणि मनाची अशी निवांत अनुभूती घेताना ती आज एक वेगळीच शांतता अनुभवत होती. तब्बल अर्धा तास ती तशीच निवांतपणे बिछान्यावर पहुडली होती. 

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून तिच्या ऑफीसच्या कामाचे तास कमी झाले होते पण तिला अधेमधे ऑफीसात चक्कर टाकावीच लागत असे.. आणि खरं पाहिलं तर कामाचे तास कमी केवळ म्हणायलाच झाले होते कारण, घरातील कामाची जबाबदारी आता संपूर्णपणे तिच्या एकटीवर येऊन पडली होती. घरचं झालं थोडं .. तशी अवस्था या कोरोनानं तिची, आणि तिच्यासारख्या अनेकींची करून टाकली होती. म्हणूनच .. आज घरात कोणी नसल्यानं हा आराम आणि मुख्य म्हणजे स्वतःच्या शरीराचं अस्तित्व, 'स्वतःचं' अस्तित्व ती अनुभवत होती.

 समोर स्वयंपाकघरात भांड्यांचा डोंगर खुणावत होता पण तरीही तिनं त्याकडे ढुंकूनही पाहिलं नव्हतं.. तिला मोकळेपणा हवा होता.. निवांतपणा हवा होता.. 

.......

टीव्हीवर सुरू असलेल्या आपल्या मालिकेतील एक अभिनेत्री अकारणच फार त्रास देऊ लागल्यानं तिला सिरीयलमधून काढून टाकलं आणि एकेकाळच्या फार मोठ्या अभिनेत्री असलेल्या आणि आता त्या सिरीयलच्या निर्मात्या म्हणून जबाबदारी पहाणाऱ्या मालतीबाई फार अडचणीत सापडल्या. शेवटी त्यांनी त्या नव्या अभिनेत्रीची आणि तिच्या कुटुंबियांची अरेरावी बंद व्हावी म्हणून स्थानिक नेत्याला भेटायचं ठरवलं. भेटीच्या दिवशी मालतीबाई त्याच्या ऑफीसात गेल्या तेव्हा नेत्यानं आधी सोशल मीडियासाठी व्हिडीओचं फूटेज घेण्यासाठी कॅमेरा ऑन केला. मालतीबाईंना जरा बिचकल्यासारखंच झालं पण लोकांसमोर आपली बाजू पोचावी म्हणून त्या काही न बोलता उगी जे जे होईल ते ते पाहू अशा आविर्भावात तिथं रेंगाळल्या. नेतेसाहेबांनी आपल्या बाजूच्या खुर्चीत मालतीबाईंना बसवलं अन् थाटात भाषण सुरू केलं .. "आज या 'ताई' मला अमुक एक कारणासाठी भेटायला आल्या आहेत" अशी सुरूवात करत चक्क त्यांनी मालतीबाईंच्या खांद्यावरच हात टाकला. मालतीबाईंना एक क्षण शिसारीच आली पण अडला हरी .. या नात्याने त्यांना त्या सगळ्या राजकीय नाट्यात गप्प बसण्याखेरीज व आपला हेतू साध्य करून घेण्याखेरीज पर्यायच उरला नव्हता. नेते महाशयांनी मात्र पाच दहा मिनीटं ताईंची भूमिका कशी योग्य.. नवोदित अभिनेत्रीचं कसं चुकतंय वगैरे भाषणबाजी करताना या देखण्या, आणि पूर्वाश्रमीच्या सुप्रसिद्ध अभिनेत्रीला अकारणच चार पाच वेळेला स्पर्श करून घेतला.. 

...........

दारावरची बेल वाजली तशी रजनीनं दार उघडलं. 

दारात मालतीबाई .. 

मालतीबाई म्हणजे रजनीच्या सासूबाई. त्यांना एकाएकी तिथं आलेलं पाहून रजनीला जरा आश्चर्यच वाटलं. 

"आई .. या ना .. बसा.. आज अत्ता तेही न कळवता .. का हो काही झालं का..?" रजनीने प्रश्नमालिका सुरू केली.. अन् मालतीबाईंच्या डोळ्यात हलके अश्रू दाटून आले. एकाएकी त्यांच्या डोळ्यात दाटून आलेलं पाणी पाहून त्यांच्या निम्म्या वयाच्या रजनीला काही कळेचना.. तिनं चटकन त्यांना घट्ट मीठी मारली.. त्यांना थोपटलं आणि पाच मिनीटं मोकळं होऊ दिलं. त्याही तिच्या कुशीत पाच मिनीटं ढसाढसा रडल्या.. थोडा वेळ तसाच गेला.. निःशब्द .. अन् मग मालतीबाई बोलू लागल्या, " रजनी, आज मी त्या अशोकरावाकडे गेले होते गं मदत मागायला, तर मेल्यानं वयाचा मानबिन न ठेवता मला असे सहेतूक स्पर्श केले. शिसारी आली मला पण सांगणार कोणाला नं.. तिथून निघाले तशी सारखे डोळे भरून यायला लागले माझे.. अगं, 'बाई' ..आणि त्यातून ती अभिनयाच्या क्षेत्रात काम करणारी असली की काय वाटतं गं या अशा विकृत लोकांना..? माझं वय काय, मी या इंडस्ट्रीत किती वर्ष काम करतीये पण आजवर हे असले स्पर्श करण्याची कोणाची हिंमत झाली नाही मला आणि आज या वयाला हा असा अनुभव यावा. गाडीत बसले नि वाटलं, आपल्याला समजून घेणारी लेक नसली तरी तुझ्यासारखी सून आहे नं.. ती नक्कीच समजून घेईल आपल्याला. म्हणून थेट इथेच आले बघ तुझ्याशी मन मोकळं करायला.." असं म्हणत मालतीबाईंनी पुन्हा एकदा डोळ्याला पदर लावला.

रजनीला हे सगळं ऐकून फार बरं वाटलं होतं त्याक्षणी. आपल्या सासुबाईंना व्यक्त होण्यासाठी आपल्याजवळ यावसं वाटलं हेच लाख मोलाचं होतं तिच्यासाठी. ती तशीच उठली नि आतून कॉफी घेऊन आली. तिनं पुन्हा एकदा मालतीबाईंना जवळ घेतलं. त्यांना थोपटलं. तशी मालतीबाईंना बरं वाटलं. खरंतर रजनीलाही अचानक मालतीबाईंचा सहवास मिळणं तेव्हा सुखावहच झालं होतं. कारण आता तिलाही घरात कोणाचंतरी अस्तित्व असावं असं अर्ध्या पाऊण तासानंतर वाटायला लागलं होतंच.. आणि अशातच मालतीबाई तिथे अवतरल्या होत्या.. सुखावहच होतं हे रजनीसाठी.शिवाय आज रजनीची भूमिका मालतीबाईंपेक्षा क्षणभर मोठी झाली होती याचा आनंद तर आणखीनच निराळा ..

मग दोघींनी कॉफी घेत घेत त्या अशोकरावासारख्या विकृत पुरूषांना दूषणं देत मनं मोकळी केली. संध्याकाळ कलली तशी मालतीबाई त्यांच्या घरी जायला निघाल्या.

"रजनी .. बेटा.. फार बरं वाटलं बघ तुझ्याशी तासभर गप्पा मारून.. आणि मुख्य म्हणजे इतकी डिस्टर्ब झाले होते नं मी या विचित्र अनुभवानी पण आता या वयात हे असले अनुभव कोणाशी व्यक्तसुद्धा करता येत नाहीत गं आपल्याला.. पण आज जशी तूच माझी 'औटघटकेची आई' झालीस बघ.. मी अगदी तुझ्या कुशीत शिरून रडले आणि मन मोकळं झालं. आता मात्र निघते. तिकडे बंगल्यावर तुझ्या सासरेबुवांचा खोळंबा झाला असेल जेवायचा.. "

असं म्हणताना त्यांचं लक्ष रजनीच्या स्वयंपाकघराकडे गेलं. भांड्यांचा डोंगर पहाताच त्यांना ओशाळल्यागत झालं. "ओह अगबाई आज तुझ्यापुढ्यात एवढं काम होतं आणि मी तुझा वेळ घेतला बघ. आता काय करशील ? नाहीतर अविनाश घरी आला की मस्त बाहेर जा कुठेतरी आज जेवायला.." त्यांच्या या सल्ल्यावर रजनी छानसं हसली नि म्हणाली.. " अहो आई, आजचा प्रसंग वेगळा. आज तुम्ही माझ्यावर एवढा विश्वास दाखवलात तीच तर माझी कमाई. बाकी कामं काय ती तर रोजचीच आहेत हो.. मी आवरायला लागेनच आता.. तुम्ही मात्र आता कोणतेही विचार करू नका. झालं गेलं गंगेला मिळालं म्हणा आणि अशाच हसत्या रहा. तुमचा आशीर्वाद आम्हाला असाच सदैव मिळो " असं म्हणत ती नमस्कार करायला वाकली तशी पुन्हा एकदा मालतीबाईंनी तिची पाठ थोपटली. 

ड्रायव्हरला हाक मारीत त्या गाडीत बसल्या.. गाडी पुढे निघाली.. मात्र, रजनीला केवढंतरी आवरायचं आहे अजून हे सारखं मनात राहिलंच होतं त्यांच्या.. तितक्यात पुढच्या वळणावर झाडाखाली बसलेली सुलभा त्यांना दिसली. 

"ड्रायव्हर गाडी बाजूला घ्या.." असा आदेश सोडताच गाडी थांबली. मालतीबाईंनी काच खाली करून सुलभाला हाक मारली. अशा अंधाऱ्या वेळी आपल्याला कोण हाक मारतंय .. तेही नावानिशी.. म्हणून सुलभानं त्या दिशेनं पाहिलं.. मालतीबाईंना तिनं क्षणात ओळखलं. 

"ताई .. तुम्ही ..इथे..?"

"हो .. पण तू इथे काय करतीयेस ..? तेही एवढ्या उशीरा..?"

"ताई.. तुमच्याकडचं काम सुटलं तेव्हापासून माझी ही अशीच अवस्था आहे पहा. हाताला काम नाही आणि पोटाला भूक .. मग काय दारोदारी दिवसभर फिरते जे मिळेल ते खाते आणि मग पाय फरपटत कशीबशी रोज रात्री घरी पोचते. कधी लांबवर आली असेल तर घर गाठायला माघारी जाणंही अशक्य होतं बघा.. मग अशी एखाद्या आडोशाला थांबते नि रात्र सरली की मग घरी जाते. लई भ्या वाटतो अंधाराचा पण काय करू ..!" असं म्हणत सुलभाच्या डोळ्यातून गंगायमुना वहायला लागल्या. 

मालतीबाईंच्या पोटात कालवाकालव झाली.. मनात अपार माया दाटून आली. 

मालतीबाईंनी पुढच्याच क्षणी सुलभाला तिच्या पोरासह गाडीत बसायला सांगितलं. तिला थोपटून शांत केलं. तिच्या अवघड परिस्थितीत माया देणारं तर सोडाच पण कुणी तिच्याकडे पहाणारंही नव्हतं. गेला महिना दोन महिने तिच्या तान्हुल्याखेरीज तिला कोणी स्पर्शही केला नव्हता.. मालतीबाईंच्या स्पर्शातलं प्रेम, माया आणि सहवेदना सुलभाला मिळताच तिला आईची, आपल्या माहेराची आठवण झाली. 

पण आता सुलभाचं काय करायचं हा प्रश्न मालतीबाईंपुढे होताच. त्यांनी दोन क्षण विचार केला नि पुन्हा रजनीला फोन लावला. 

"हॅलो रजनी, तुझं काम आटपलं का..?"

पलिकडून रजनी उत्तरली, "आई .. अहो इतकी भांडी आहेत .. आज तर माझी पाठ भरून आलीये बघा.. पण करणार काय..!"

मालतीबाई झटकन म्हणाल्या.. "थांब.. मी पुन्हा येते तुझ्याकडे बेटा..!" आणि गाडी माघारी फिरवत त्यांनी रजनीचं घर गाठलं.

बेल वाजवली.

आता दारात आईंबरोबर आणखी कुणीतरी आलेलं पाहून रजनीच्या चेहऱ्यावर भलंमोठं प्रश्नचिन्ह दिसलं.

" रजनी, ही सुलभा.. पूर्वी बंगल्यावर कामाला होती. मधल्या काळात तिनं काम सोडलं होतं आणि त्यातचं आता कोरोना .. तिच्या हाताला आता काही काम नाही बघ.. आणि पदरात हे तान्हुलं देखील आहे. सुलभाला आता इथे आणलं ते तुझ्या मदतीला.. तिला आधी काहीतरी खायला दे नि मग ती तुला मदत करेल." 

रजनीला बरं वाटलं. तिनं गरमागरम पोह्यांची प्लेट सुलभाला देऊ केली. सुलभानीही अधाशासारखे ते खाल्ले कारण बरेच दिवसात तिला असं अन्न मिळालंच नव्हतं खायला. मुख्य म्हणजे कोणीतरी प्रेमाने दिलेलं अन्न .. आज रजनी आणि मालतीबाईंकडून सुलभाला ते प्रेम मिळालं होतं. सुलभाचं तान्हं रडू लागलं तशी रजनीनं त्यालाही दूध दिलं आणि दोघीही त्याच्याशी दोन घटीका खेळल्या, तितक्यात सुलभानं रजनीची भांडी, गॅस, ओटा स्वच्छ आवरून दिलं. 

तासाभरातच सगळं आवरून मालतीबाई पुन्हा घरी जायला निघाल्या.. सुलभालाही आता त्या पुन्हा आपल्यासोबत बंगल्यावर कामासाठी घेऊन जाणार होत्या. तिची पुढची सगळी सोय आता त्याच बघणार होत्या.. तिची माय बनून.. आणि त्या लेकराची आजी बनून .. 

रजनीनं गॅलरीतून त्यांना बाय केलं आणि मालतीबाईंची गाडी पुढच्या वळणांनी भरधाव निघाली.. 

प्रेमाच्या स्पर्शासाठी आसुसलेल्या त्या तिघीजणींच्या चेहऱ्यावर आता एक निराळीच तृप्तता झळकत होती.

- मोहिनी घारपुरे - देशमुख

©मोहिनी घारपुरे देशमुख

मंगळवार, २६ जानेवारी, २०२१

चित्रपट - गुलाम (1998)

लेहेरोंके साथ तो कोई भी तैर लेता है
मगर असली इन्सान वो है 
जो लेहेरोंको चीरकर आगे बढता है

अक्षरशः रक्त उसळवून टाकणारी ही कॅचलाईन आणि त्याभोवती फिरणारा संपूर्ण चित्रपट.. आजही पाहिला तरीही रक्त उफाळून येतं. आपल्यावर होणारे अन्याय, अत्याचार याविरूद्ध आवाज उठवण्याची शारिरीक शक्ती आपल्यासारख्या सामान्य माणसात नाही म्हणून कित्तीतरी वेळा आपण गपगुमान निमुट राहून अन्याय सहन करून घेतला आजवर ते सारे सारे प्रसंग क्षणात डोळ्यासमोर दिसून जातात.. आणि जाणवतं, आपणही अप्रत्यक्षपणे गुलामच आहोत .. या बलशाली सिस्टीमचे, या जगातील आपल्याहून प्रत्येक अधिक बलवान माणसाचे.. आपल्या मनातला माणूस वेगळा आणि प्रत्यक्षात आपण कुणीतरी वेगळेच .. या सिस्टीमनी आपल्याला जे बनवलं .. आपण फक्त तेवढेच .. तेवढ्यापुरतेच.. तेच तेच करत जगणार आणि एक दिवशी कुठेतरी मरणाला सामोरे जाणार.. माणूसपण हे एवढं छोटं आहे का .. ? नाही .. पण तरीही आपण घाबरतो, विरोध करायला, अन्यायाविरूद्ध आवाज उठवायला, आपण घाबरतो एकटे पडायला, आपण घाबरतो आपल्या कळपाविरूद्ध आपलं मत मांडायला..
प्रत्येक माणसाचा एक एक कळप .. एक एक गट .. त्या गटाचा एक एक 'दादा' किंवा 'भाई' किंवा कोणीही व्यक्ती जो त्या कळपावर राज्य करतो. त्याच्या विरूद्ध जाण्याची आपल्यात हिंमत नाही.. आपण साले त्या 'जय'सारखे (रजत कपूर) .. स्वार्थी.. सुखलोलूप .. पण आपल्याला माहितीये की आपल्या प्रत्येकात एक सिद्धार्थ मराठे (आमीर खान) आहे.. आपल्याला माहितीये.. आपल्याला ती सिद्धार्थची वकीलीणबाई (मीता वसिष्ठ) .. म्हणजे आपलं मन वेळोवेळी योग्य वाट दाखवत असतं.. पण तरीही आपण घाबरतो. शरीराला जरासं खरचटलं तरीही व्याकूळ होणारे आपण .. अन्यायाविरूद्धच्या लढाईत मृत्यूला कवटाळण्यापर्यंत स्वतःचं अपरिमीत नुकसान तर सहनच करू शकत नाही.
' कशाला ते नसतं झेंगाट .. अन्यायाला वाचा फोडायची वगैरे काही नसतं.. सब बक्वास है बक्वास ..' असं कधीतरी आपल्यातल्या सिद्धार्थला वाटतं आणि आपण गप्प बसतो. दिवसागणिक कोणावरी तरी अन्याय होतो .. कोणालातरी लुबाडलं जातं, चोरी डाका बलात्कार दिवसागणिक होतात पण आपण स्वतःला त्या सगळ्यातून लांब ठेवतो. सकाळी उठल्यावर पेपर चाळताना या सगळ्या घटनांच्या बातम्या चहासोबत गिळून टाकतो. अन्यायाविरूद्ध आवाज कोण उठवणार आपल्यात तेवढी हिंमत नाही हेसुद्धा आपण केव्हाच मान्य करून टाकलेलं असतं.. मग जेव्हा एखादा दिवस आपला येतो ना .. त्या सिद्धार्थवर येतो तसा .. सख्खा भाऊ त्याला बॉक्सिंगच्या मॅचमध्ये जिंकण्याऐवजी हरायचा 'आदेश' देतो .. कारण त्या मॅचवर त्याच्या मालकाचे .. रॉनीचे पैसे लागलेले असतात, त्यावेळी सिद्धार्थला हतबल व्हायला होतं.. मार खाऊन खाऊन तरी मरून जाऊ असा स्वतःच्या हतबलतेवर राग काढत काढत तो मरेस्तोवर मार खाऊन घेतो पण अन्यायाविरूद्ध ओरडत नाही.. कदाचित आपण विरोध केला तर आपल्या भावाचं कसं होईल या प्रेमापोटी .. हे प्रेमाचे पाश .. हे स्वार्थाचे पाश .. आणि जीवनाची आस .. या साऱ्या गुंतागुंतीचाच फायदा घेत बलवान माणूस दुर्बलाचं शोषण करत रहातो आणि दुर्बल माणूस 'आपलं जीवन महत्त्वाचं' या विचाराने शोषण होऊ देत रहातो.. इथेच तर खरी मेख आहे ...
लेहेरोंके साथ तो कोई भी तैर लेता है .. मगर असली इन्सान वो है जो लेहेरोंको चीर कर आगे बढता है ..
मग एखाद्याच माणसातला हरी.. तोच हरी (अक्षय आनंद) .. ज्याला रौनक सिंगविरूद्ध आवाज उठवण्यासाठी रौनक पूलावरून खाली ढकलून देतो.. मारून टाकतो.. असा हरी .. जो कायदेशीर मार्गाने अन्यायाविरूद्ध आवाज उठवण्याचा प्रयत्न करत असतो, ज्याचं जगण्याचं एकच साधंसरळ तत्वज्ञान असतं, 'जब भी आईने के सामने खुद को देखूँ ना तो मुझे अपने आप पे शरम ना आए .. बस' ... हा हरी .. कधीतरी तुमच्याआमच्यातच भेटतो .. एखादाच हरी .. त्याला पाहिलं की स्वतःच्या बुजदिल असल्याची लाज मनात दाटते .. क्षणभर का होईना .. आपण आपली नजर त्याच्या ठाम नजरेपासून चोरतो.... आणि अशा हरीपासून आपण सोयीस्करपणे आणि जाणीवपूर्वक लांब रहातो.. तुम्ही आम्ही .. आपल्यासारखी सामान्य माणसं.. मग पुन्हा आपल्या मनात .. आपल्या कानात जणू ती वकीलीण बाई बोलते.. पुन्हा पुन्हा सांगत रहाते, ' जो सिद्धार्थसे हुआ उसकी वजह उसके हालात है .. भूख, गरीबी जैसे हालातसे वो बचपन से लढ रहा है .. इन हालातोंकी वजहसे न उसे कही प्यार मिला होगा ना ही कभी सम्मान.. फिर वो बेचारा क्या करेगा ...?' स्वतःच्या कानात ही वाक्य स्वतःच मन बोलतं आणि तितक्यात याच सगळ्यावर आपलंच दुसरं मन .. जणू सिद्धार्थचा तो कोर्टात आलेला मित्र बनून या सगळ्या तत्वज्ञानाची खिल्ली उडवत पुन्हा एकदा आपल्या स्वार्थी वृत्तीला खतपाणी घालतं. मनातल्या वादळाचे तरंग मनातच रहातात आणि पुन्हा आपण स्वार्थापोटी आपल्यापुरतं जगायला लागतो... कोर्टात वकीलीणबाईच्या पर्समधून चारशे रूपये चोरणारा सिद्धार्थ आपल्यातचं आपण पहातो .. पण वकीलीणबाईला म्हणजे आपल्या मनाने आपल्याला केव्हाच पकडलेलं असतं नि आपल्याला जणू त्याचा पत्ताही नसतो.
मग जेव्हा अन्यायाचा राक्षस वाढत जातो नि एके दिवशी आपल्याच घराकडे त्याची नजर वळते तेव्हा हतबलतेनी, घाबरटपणे लपून बसणारी ती सगळी जनता ... ते सगळे मोहोल्लेवाले .. आपण त्यांच्यातलेच एक बनून जातो. जीवन लाख मोलाचं हे आपल्या मनावर इतकं बिंबवलेलं असतं की त्यापुढे जीवन किती जगलात यापेक्षा कसं जगलात हे जास्त महत्त्वाचं हा उदात्त विचार केव्हाच आपण मागे टाकलेला असतो. मग रौनक सिंग येतो.. आपलं रक्त पीतो.. आपल्यावर जुलूम अत्याचार करत रहातो पण आपण स्वतःतली शक्ती ओळखूच शकत नाही. "वो जुल्म करता है .. क्योंकी तुम सब जुल्म सेहेते हो ..." हरी आपल्या कानात सांगतो.. पण आपण तरीही वाट बघत रहातो.. कधीतरी कोणीतरी येईल आणि आपल्याला या संकटातून वाचवेल या आशेवर जगतो... हीच ती खोटी आशा .. कारण असं कधी कोणीच येणार नसतं.. आपल्याला आपल्यातल्या सिद्धार्थलाच जागवायला लागतं.. आणि तो जोपर्यंत पेटून उठत नाही तोपर्यंत आपण जणू 'जिंदा लाशे ..' आजवर पिढ्यान्पिढ्या हेच होत आलेलं आपणही पाहिलंय..
सिद्धार्थच्या वडीलांनीही (दलिप ताहील) स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतल्याच्या आपल्या कहाण्या आपल्या मुलांना जय आणि सिद्धार्थला कित्तीतरी वेळा ऐकवलेल्या असतात .. पण त्यांनी हे कधीच सांगितलेलं नसतं, की ते स्वतः इंग्रजांच्या अत्याचाराला बळी पडले आणि त्यांनीच त्यांच्या मित्रांची, जे स्वातंत्र्यचळवळीत सहभागी होते त्यांची नाव इंग्रजांना सांगितली. या एका चुकीपायी ते सगळे पकडले गेले आणि वडील सुटले.. ते सर्वांपासून दूर अनोळखी ठिकाणी जाऊन वसले खरे पण त्यांना माहित होतं त्यांनी काय केलंय ते .. आणि म्हणूनच त्यांना त्यांच्या मुलांना शूर बनवायचं होतं. शेवटी जेव्हा वडीलांचे ते मित्र, श्यामसुंदर अगरवाल (आशुतोष राणा) त्याचा शोध घेत घरी पोचतात, तेव्हा लहानग्या सिद्धार्थला खूप आनंद होतो.. आजवर वडीलांकडून यांचं नाव त्यानं कित्तीतरी वेळा ऐकलेलं असतं.. पण आज श्यामसुंदर तिथे वडीलांना शिक्षा द्यायला आलेले असतात हे त्या लहानग्या जीवाला कसं कळणार .. ? त्याच्या कानांनी तो ते सगळे आरोप ऐकतो जे श्यामसुंदर त्याच्या वडीलांवर करत जातात आणि त्यांचा आत्मसन्मान क्षणात दुभंगून जातो.. श्यामसुंदर निघून गेल्यावर आपल्या मनाशी हरलेले सिद्धार्थचे वडील स्वतःला पेटवून घेतात आणि जीवन संपवून टाकतात.. सिद्धार्थच्या आणि जयच्या जीवनाची आणि कोवळ्या मनांची त्या आगीत जणू राखरांगोळी होते.

पुढे जयला हेच लक्षात रहातं की आपले वडील कायर होते.. वडीलांची हीच डागाळलेली प्रतिमा मनात घेऊन जय स्वतःही चुकीच्या वाटेवर चालत निघतो.. आणि त्याचा लहान भाऊ त्याचा हात धरून त्याच वाटेने पुढे पुढे जातो. पण सिद्धार्थचा आतला आवाज त्याला प्रसंगानुरूप जागं करत असतो. एके दिवशी त्याला ते कळतं जे वडील जन्मभर सांगण्याचा प्रयत्न करत होते.. समजावत होते.. असली इन्सान वो है जो लेहेरोंको चीरकर आगे बढता है .. आपले बाबा चांगली व्यक्ती होते फक्त ते कमजोर होते .. आपल्या सगळ्यांप्रमाणे आणि म्हणूनच ते आपल्याला जसा माणूस घडवू इच्छीत होते .. मी तसा माणूस होणार .. हे एक दिवशी सिद्धार्थ ठरवतो आणि त्याच्या जीवनात नवी पहाट उगवते.
जय मात्र हरतो.. खुद्द रौनकच त्याला एके दिवशी ठार करतो. बळी तो कान पिळी या न्यायाने जयचं जीवन रौनक सिंग एक ना एक दिवस संपवू शकणार हे तर सगळ्यांना माहिती असतंच.. पण सिद्धार्थ जेव्हा जयचं न ऐकता रौनक सिंगविरूद्ध आवाज उठवतो तेव्हा जयसारख्या स्वार्थी माणसाला हरावं लागणार हे तर नक्कीच असतं ना.. तरीही जय सिद्धार्थला अडवतो.. पाऊल मागे घे म्हणून हरप्रकारे समजावतो.. पण आज सिद्धार्थला जाणवलेलं असतं की तो जे करणार आहे तेच योग्य आहे .. तो आज आयुष्यात पहिल्यांदा आपल्या भावाला जाब विचारतो .. "तुम तो मेरे बडे भाई थे ना .. तो तुमने मुझे गलत रास्तेपे चलनेसे क्यो नहीं रोका .. रौनक सिंगने जब मुझे बॉक्सिंगमें हारने को कहा तब तुमने उसे क्यों नही रोका.. क्यों नहीं कहा के मै तुम्हारा भाई हूँ .. मै उसे हारने को नही कहूँगा .. अब भी वक्त है दादा.. तुम भी मेरे साथ कोर्टमें रौनक सिंग के खिलाफ गवाही दो" अशा शब्दात त्याला विनवतो .. पण जयला माहीत असतं, की तो या वाटेवर फार पुढे निघून आला आहे.. आता त्याच्यासाठी परतीचे दोर नाहीत.. आता केवळ समोर मृत्यूच आहे.. आणि तस्सच होतं..
स्वतःच्या भावाला मेलेलं पहाताना सिद्धार्थचं रक्त आता दुपटीनं उसळून येतं. आपल्या गर्लफ्रेंडच्या, आलीशाच्या (राणी मुखर्जी) भावाला, हरीला आपल्या माध्यमातून रौनकनी ठार केल्याचं जेव्हा त्याला कळलेलं असतं त्या क्षणी त्याला राग, संताप, विश्वासघात, हतबलता या सगळ्या भावनांनी घेरलेलं असतं .. आणि आज जेव्हा जयलाही त्यानी संपवलं हे स्वतःच्या डोळ्यांनी तो बघतो तेव्हा तर त्याची तळपायाची आग मस्तकात जाते. हे सगळं कधी आणि कसं थांबेल याची वाट बघणाऱ्या स्वतःतल्या भ्याड निष्काळजी सिद्धार्थमधला माणूस आज खऱ्या अर्थाने जागा होतो...
हा असतो तो 'असली इन्सान ...' जो अखेरीस सगळ्या मोहोल्ल्यासमोर रौनक सिंगला हरवतो.. त्याच्याशी लढतो.. स्वतःच्या जीवावर उदार होऊन .. पण आज त्याची लंका जाळूनच मग मोकळा श्वास घेतो..
फोटो - गुगल साभार


... आणि आपल्या बाबतीत बोलायचं तर हा सिद्धार्थ म्हणजेच ते आपलं जागं झालेलं अंतर्मन.. ते अन्यायाविरूद्ध पेटून उठेल तेव्हा भल्याभल्यांची लंका जाळून टाकेल.. दिवसागणिक आयाबहीणींवर होणाऱ्या अत्याचाराला सुरूंग लावेल .. शोषणकर्त्यांना ठार करून पोषणकर्ता होईल .. पण हे सगळं कधी होईल .. त्यासाठी आपला आतला आवाज सदैव जागा ठेवला पाहिजे.. आपल्या सच्चेपणाला साथ पाहिजे.. आपल्यात एकोपा पाहिजे.. आणि जेव्हा हे सगळं जमून येईल तेव्हा आपली मातृभूमी खऱ्या अर्थाने शोषणमुक्त होईल..

जय हिंद ..
सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा


- मोहिनी घारपुरे - देशमुख 

(सर्व फोटो गुगलवरून .. साभार)

चित्रपटाचं नाव - लक्ष्य (2004)

p.c.bollywoodhungama.com

लडाखच्या उंच उंच हिमाच्छादीत पर्वतराजीमधून धावणारी एक लष्कराची जीप.. या जीपमध्ये बसलेला
एक उमदा सैनिक .. त्याच्या चेहऱ्यावर नवखेपण आहे पण देशासाठी आपले प्राणही पणाला लावण्याची जिद्दही त्याच्या देहबोलीतून थेट पोहोचतेय.. आपल्यातल्या गोंधळलेल्या, बावळट व्यक्तीमत्वाला कायमची तिलांजली देऊन आपल्यातूनच एक नवा पोलादी पुरूष जन्माला घालण्याची किमया त्याला अखेरीस जमली आहे याचा अभिमान त्याच्या चेहऱ्यावर, देहबोलीतून स्पष्टपणे झळकतोय. हिमाच्छादीत परिसरातील दऱ्याखोऱ्यातून मार्ग काढत सोसाट्याने पुढे पुढे चाललेली ती लष्करी जीप, त्यात बसलेला हा सैनिक .. भूतकाळाची संदीग्धता मागे मागे टाकत आपला भविष्यकाळ उजळायला निघालेला असताना त्या प्रत्येक दृश्यासह वाजत रहाणारं एक बॅकग्राऊंड म्यूझिक ..

एव्हाना तुम्ही हा चित्रपट कोणता ते ओळखलही असेल .. बरोबर नं..?

लक्ष्य .. माझा अत्यंत आवडता चित्रपट. 

तसं म्हणाल तर देशभक्तीपर चित्रपटांमध्ये फार फार आवडणारे माझे दोनचार चित्रपट आहेत त्यापैकी या चित्रपटाने मनावर अक्षरशः गारूड केलंय.
आजपासून तब्बल सतरा वर्षांपूर्वी सिनेमागृहांमध्ये झळकलेला हा चित्रपट.. तेव्हा सिनेमागृहात जाऊन पहाताना जेवढा रोमांचकारी वाटला तेवढाच तो त्यानंतरही कित्ती कित्ती वेळा पाहिला आणि पुन्हा पुन्हा देहात, मनात तेच ते 'भारतीयत्वाचं', 'देशप्रेमाचं' स्फुरण चढलं. अक्षरशः शरीरातील प्रत्येक धमन्यांमध्ये, प्रत्येक नसांमध्ये कोणीतरी देशभक्तीचं इंजेक्शन टोचून द्यावं आणि त्यानंतर जीवनाचा प्रत्येक क्षण आपण केवळ आपल्या या मायभूमीसाठीच देत जगावं असं वाटणं हे या चित्रपटाचं घवघवीत यश. लक्ष्य नावाच्या या चित्रपटाचं अजब आणि अत्यंत उच्चदर्जाचं रसायन बनवणारा दिग्दर्शक फरहान अख्तर. या चित्रपटातील करन शेरगिलची भूमिका अप्रतिमरित्या सादर करणारा हँडसम हंक ह्रत्तिक रोशन, रोमिला दत्ताची भूमिका जिवंत करणारी गोड गोड अभिनेत्री प्रीती झिंटा आणि त्यांच्याबरोबर एकूण एक भूमिकेत दिसलेले सगळेच्या सगळे कलाकार केवळ कसदार ..
देशभक्तीपर चित्रपटाला एका वेगळ्या दृष्टीकोनातून पोहोचवण्याचा विचारच मुळात त्याकाळी नवीन. करन शेरगिल .. एक असा नायक जो त्याकाळाच्या तरूणाचं प्रतिनिधित्त्व करतो. असा तरूण ज्याच्या पायाशी आईवडीलांनी सगळी सुखं आणून ठेवली आहेत. त्यामुळे सुखलोलूप झालेल्या नायकाकडे ' जीवन हे स्वतः जगायचं असतं आणि त्यासाठी स्वतःच्या निर्णयांची जबाबदारी स्वतः पेलायची असते ' हा विचारच नाही. आजचा दिवस उपभोगला की झालं .. भविष्याचं ओझं कशाला ? ही याची वृत्ती. मग जेव्हा खरी वेळ येते स्वतःचं जीवन उभारण्याची तेव्हा याला लक्षात येतं की अरे आपल्याला तर साधे स्वतःसाठी निर्णयही घेता येत नाहीयेत, किंबहुना, आपण इतके चंचल की आपलं अजूनही काहीच ठरलेलं नाहीये आणि तो स्वतःलाच प्रश्न विचारतो,
" मै ऐसा क्यूँ हूँ ..? मै ऐसा क्यूँ हूँ ...? करना है क्या मुझको ये मैने कब है जाना ..? लगता है गाऊंगा जिंदगीभर बस ये गाना ? "
याच वैचारिक गोंधळात असताना अखेर एकदा मित्राचं पाहून म्हणा करन शेरगिल धाडकन आर्मी जॉईन करायचा निर्णय घेतो. ज्या मित्राच्या भरोसे तो हा निर्णय घेतो त्या मित्राने पुढच्याच भेटीत आपण आपला निर्णय मागे घेतल्याचं जाहीर केलेलं असतं.. आता करनला प्रश्न पडतो .. " मै अकेला आर्मीमें जाके क्या करूंगा यार ..मै वहाँ बोअर हो जाऊंगा !" घरी कळल्यावर अर्थातच आईवडील चिंतातूर होतात आणि त्याची चांगली खरडपट्टी काढतात.. आणि यामुळेच तर तो आता इरेलाच पेटतो .. आपल्या गर्लफ्रेंडला, रोमिलाला भेटून चक्क उसनं अवसान आणत सांगतो .. "मै बस आर्मी ज़ॉईन करूंगा .. मुझे तो बस अब यही करना है.." तिला मनातून अभिमान वाटतो पण तरीही ती त्याला समजावते.. "हे बघ .. तू उगाचच इरेला पेटून निर्णय घेत असलास तर पुन्हा विचार कर एकदा..!" पण छे.. आता त्याचा अहंकारही जागा झालेला असतो. तो पुढे पाऊल टाकतो. आर्मीची प्रवेश परिक्षा देतो आणि नशीबानेच म्हणा चक्क पास होतो. आईवडीलांना आश्चर्य वाटतं पण ते गप्प बसतात..
आता करन सैनिकी प्रशिक्षणासाठी जातो पण तो करन असतो नं .. आळशी, कामचुकार आणि मुख्य म्हणजे कोणत्याही गोष्टीत जो अजिबात सिरीयस नाही असा मुलगा.. अर्थातच अशा व्यक्तीमत्वाला ते सैनिकी प्रशिक्षण कसं झेपणार ? आणि आठवडाभरातच एकापाठोपाठ एक चुका करत शिक्षा घेत आणि अपमानित झाल्याचं वृथा दुःख मनाशी बाळगून अखेर करन तिथून एका रात्री पळच काढतो. घरी परतल्यावर वडील आणि आई काहीसं चुचकारतात पण त्याची पाठ वळताच म्हणतात, "मै जानता था .. ये वापस जरूर आएगा .." वडीलांचे हे शब्द कानावर पडतात तेव्हा करनला स्वतःविषयी लाज वाटते पण खरी खरडपट्टी तर रोमिला .. करनची गर्लफ्रेंड काढते जेव्हा तिला तो सांगतो की मी ते सगळं सोडून कायमचा परत आलो. रोमिला हे ऐकताच हादरते.. तिच्या नजरेतून तो उतरतो.. 'आयुष्यात खूप मेहनतीनी एक निर्णय घेतलास आणि त्यावरही ठाम राहता आलं नाही तुला ..? आज तू ते सोडून पळून आलास.. उद्या मलाही असाच सोडून देशील..' असं सडेतोड सुनावते आणि अखेरीस जो स्वतःच्या निर्णयावर ठाम नाही अशा मुलाचं तोंडही पहाणार नाही असं म्हणून निघून जाते. एवढा वेळ स्वतःच्या कृतीची लाज वाटूनही त्याकडे दुर्लक्ष करणारा करन त्याक्षणी खरा अपमानित होतो. अपमान म्हणजे काय हेही ज्याच्या तोवर गावी नसतं त्याला अपमान, अपयश, अवहेलना सारं सारं एका क्षणात ती जाणवून देते आणि तो खऱ्या अर्थाने आता जागा होतो.. त्याच्या मनातल्या लाजेचं रूपांतर आता पश्चात्तापात झालेलं असतं.. तो थेट पुन्हा लष्करी प्रशिक्षण संस्थेत जातो नि आपल्या कृत्याची माफी मागतो. लष्करही त्याला त्यांच्या अटींवर व त्याने केलेल्या चुकांची शिक्षा देऊनच परत सामावून घेतं.. आणि आता त्याला त्याच्या जीवनाचं 'लक्ष्य' सापडलेलं असतं.
' हा यही रस्ता है तेरा तूने अब जाना है .. हा यही सपना है तेरा तूने पहचाना है .. रोके तुझको आँधिया या जमीं और आसमाँ पाएगा जो लक्ष्य है तेरा .... लक्ष्य तो हर हाल मैं पाना है ..'
एकेका क्षणाला करन बदलत जातो.. आणि आता त्यातून एक खराखुरा धैर्यशाली, बलशाली आणि जीवनाला गंभीरपणे घेणारा सैनिक जन्माला येतो. 'करन शेरगिल' ते 'लेफ्टनंट करन शेरगिल' हा प्रवास पूर्ण होतो.. पण खरी कसोटी असते ती युद्धभूमीवर आणि अर्थातच एलओसीवरून घुसखोरी करून जेव्हा शत्रू आत शिरल्याची बातमी येते तेव्हा लेफ्टनंट कर्नल शेरगिल प्राणांची बाजी लावून खिंड लढवतात. सुरूवातीच्या दोन चकमकींमध्ये सैनिकांचे मृत्यू प्रत्यक्ष पाहून काहीसा व्याकूळ होणारा हा नवा गडी तिसऱ्या पण अंतिम आणि अत्यंत अवघड अशा युद्धाच्या वेळी स्वतःहूनच आपल्या बटालियनच्या अधिकाऱ्याला, 'टायगरला' शब्द देतो .. 'सर.. मी हे मिशन यशस्वी करीन अन्यथा मी जीवंत माघारी परतणार नाही ' आज या शब्दाला धार आलेली असते.. यात स्वाभिमान, देशप्रेम नि जिद्द रसरसून भरलेली असते. त्याच्याकडे पहाताच त्याच्यातील सच्चेपणा टायगरला (अमिताभ बच्चन) जाणवतो आणि मग सुरू होते अंतिम लढाई.. लढाईवर निघता निघता बटालियनचे जुने अनुभवी सरदार प्रीतम (ओम पुरी) लेफ्टनंट करनला आपल्या अनुभवाचे बोल सांगतात, 'सर .. जीत जाओ तो एकदम खुश मत हो जाना .. ये दुश्मन एक बार फिर पलटके वार करता है .. मेरी बात ध्यान में रखना..' आणि 'याद रखूंगा' म्हणत ते आपल्या छोट्या बारा जणांच्या तुकडीसह आगेकूच करतात. ही अंतिम लढाई .. मोठ्या पडद्यावर पहाताना तेव्हाही पोटात गोळा आला होता. अंगावर शहारे आले होते.. आणि हे सगळं मी हा चित्रपट पहाताना दरवेळी तसंच्या तसं अनुभवते.. अगदी आजही..! ती अंतिम लढाई .. जेव्हा लेफ्टनंट करन शेरगिल त्या उंचउंच पहाडाच्या भिंतीवर चढाई करायला सुरूवात करतात .. त्या एका छोट्याशा आडव्या दगडावर पोहोचेपर्यंत आणि तिथे पोहोचलेले ते सहा जण रात्र होईपर्यंत त्या उंचीवर बसलेले पाहून आजही अंगावर काटा येतो.. स्टूडीओतली दृश्य असली तरीही किती जिवंत केलंय ते सगळं नै .. ? आणि मग रात्रीच्या काळोखात त्या सुळक्यावर क्लाईंबिंग करत चढाई करून अखेर शत्रूशी लढाई करणारे आपले सैनिक .. गोळीबार, बाँबहल्ला.. कानावर पडणारे सुईंसुईं.. धाडधाड धाडधाड असले आवाज आणि अखेर अंतिम निर्णायक क्षण.. दुश्मन पळून जातात. शेवटी भारतीय सैनिकांपैकी दोघंच उरतात.. आणि आता पहाट होणार .. तिरंगा मोक्याच्या जागी लहरवण्याची वेळ जशीजशी जवळ येते तसतसे ते दोघे मनात आनंदून पण तरीही अत्यंत सावधपणे लपून बसलेले.. कारण, सरदार प्रीतमचा सल्ला ..आणि त्यांचे शब्द खरे ठरतात .. शत्रू पुन्हा तिथे येऊन पोचतो पण लेफ्टनंट करन यावेळेचीच जणू वाट पहात असतात आणि एका क्षणात सगळ्यांवर गोळ्यांचा वर्षाव करत ते शत्रूला ठार करतात.. आता आपल्या जखमांचा, वेदनेचा सारा भार त्यांना कस्पटासमान वाटायला लागतो आणि खिशातून तिरंगा उलगडत आपल्या जखमी पायाला फरपटत पुढे ओढत ओढत ते ठरल्या जागी तिरंगा लेहरवतात आणि पलिकडे दूरवर असलेल्या आपल्या तुकडीला फायरिंग करून त्याद्वारे विजयश्रीची गर्जना करतात..
'लक्ष्य तो हर हाल मैं पाना है ..' आणि जीवनाचं एक महत्त्वाचं लक्ष्यं त्याक्षणी करननी प्राप्त केलेलं असतं. अर्थातच पुढचं लक्ष्य म्हणजे रोमिलाशी लग्न .. आणि ती या संपूर्ण युद्धाची साक्षीदार असतेच.. एक वार्ताहर म्हणून तीही तिथेच असते.. आणि याच क्षणाची तीही आतुरतेने वाट पहात असते. लेफ्टनंट करन शेरगिल रोमिलाला लग्नाची मागणी घालतात आणि एकेकाळी जिच्यामुळे आपल्या जीवनाला ध्येय मिळालं त्या मुलीशीच लग्न करण्याचा सुवर्णक्षण त्यांच्या आयुष्यात येतो. एकेकाळी ज्या मुलाला आपण नाकारलं तो केवळ आपल्या एका झिडकारण्याने एवढा पेटून उठेल याची सुतरामही कल्पना नसलेल्या त्या मुलीला अशा जिद्दी आणि आपल्यावर निरातिशय प्रेम करणाऱ्या नवऱ्याची बायको होण्याचा मान मिळणं हेच तर तिचंही भाग्य नाही का..?
या अशा सुवर्णक्षणावर चित्रपट संपतो आणि तुमच्या माझ्यासारख्या हज्जारो तरूणांच्या तरूणींच्या मनात देशप्रेम, जिद्द, चिकाटी अशा मूल्यांची रूजवात करून जातो.
' कितनी बाते याद आती है .. तसवीरेसी बन जाती है .. मै कैसे इन्हे भूलूँ ..?' असं म्हणत म्हणत हज्जारो तरूण व्याकूळतेने आपापल्या भूतकाळात शिरतात... तर हज्जारो तरूणींच्या मनात .. ' कितनी बाते केहेनेकी है .. होठोंपर जो सेहमीसी है .. एक रोज इन्हे सुनलो!' अशा भावना अखेरीस उमटत रहातात.. कारण, कदाचित असे कित्तीतरी 'करन शेरगिल' या चित्रपटानंतर जीवनाकडे गंभीरतेने पहायला लागले असावेत आणि कित्तीतरी तरूणींनी पुढे त्यांची वाट पाहिली असावी.. पण आज ते पुन्हा माघारी परतून आले शकलेही नसतील.. कदाचित .. ! प्रेमाच्या गोष्टीत अडखळले असले तरीही असे अनेक 'करन' मात्र या चित्रपटानंतर जीवनाच्या लढाईत अग्रणी राहिले असतील आणि त्यांच्या प्रेयसी आता कदाचित मनात त्यांची आठवण अभिमानानेच जपून असतील .. कदाचित ..!
या देशाने .. या मातृभूमीने हे असं उच्च प्रेम करायला आम्हाला शिकवलंय.. आणि सर्वात श्रेष्ठ तर आमचं देशप्रेमच आहे आणि त्यासाठी आम्ही हे असे स्वतःला झोकून देऊ, त्यासाठी आमची जिद्द तसुभरही कमी पडणार नाही हाच संस्कार जाता जाता हा चित्रपट मनावर कोरून जातो... तो कायमचाच !!
' लक्ष्य तो हर हाल मै पाना है ' हा एकट्या एकट्याचा प्रवासच पुढे आम्हाला ' कंधो से मिलते है कंधे कदमोंसे कदम मिलते है .. हम चलते है जब ऐसे तो दिल दुश्मन के जलते है ..' या वाटेवर घेऊन जातो .. आणि जात राहील यात शंका नाही.

p.c.bollywoodhungama.com


- मोहिनी घारपुरे - देशमुख

सोमवार, २५ जानेवारी, २०२१

चीझ पनीर कोफ्ता करी आणि तवा नान

घरात दोनचार दिवसाचं दूध उरलं की घरीच त्याचं पनीर करायचं हा उद्योग मी बरेचदा वेळ मिळेल तसा करत असते. घरी बनवलेलं पनीर हे बाजारातल्यासारखं होत नाही तर ते जरासं वेगळं असतं म्हणजे त्याचे छान असे क्यूब्स करता येत नाहीत तर त्याऐवजी ते चटकन कुस्करता येतं हे मला जेव्हा लक्षात आलं तेव्हा या कुस्करलेल्या पनीरपासून काय काय करता येईल याचा विचार मी करत गेले. तेव्हा घरातल्या घरात सहज उपलब्ध सामानापासून चमचमीत असे चीझ पनीर कोफ्ते बनवण्याची आयडीया सुचली. चीझ पनीर कोफ्ते हे नाव ऐकल्यापासूनच तोंडाला पाणी न सुटेल तरच नवल नाही का..? शिवाय घरी कोणीही पाहुणे येणार असले की तुलनेने झटपट करता येण्याजोगी ही माझी पाककृती. यात फार काही वेगळं केलंय असं नाही, किंबहुना बऱ्याच हॉटेलमध्येही ही डिश सहज मिळते पण हीच पाककृती घरच्या घरी आपण स्वतः बनवण्यात खरोखरीच खूप आनंद आहे. मनापासून पनीर बनवायचं, मनापासून कोफ्ते बनवायचे, त्यासोबत मनापासून बनवलेले नान किंवा पराठे बनवायचे .. वाह .. खूप खूप आनंद आहे हा सगळा.. 
तर, आज खास ही पाककृती तुमच्यासाठी येथे देत आहे. जरूर ट्राय करा आणि मला कमेंटबॉक्समध्ये कळवा. 
  
(दोन ते तीन माणसांसाठीचे प्रमाण येथे नमूद करत आहे)

कोफ्त्यासाठी साहित्य -

1. उकडलेले बटाटे ( 3 ते 4, मध्यम आकाराचे )

2. मैदा ( 2 ते 3 टेबलस्पून )

3. कॉर्नफ्लोअर ( 2 ते 3 टेबलस्पून )

4. मीठ (चवीनुसार)

5. चीझ ( 2 क्यूब्स )

6. पनीर ( 125 ग्रॅम्स अंदाजे ) (किंवा घरी बनवलेले पनीर कुस्करून ) 

7. किसमिस ( आठ ते दहा )

8. तळण्यासाठी तेल चार सहा मोठे चमचे

9. जिरेपूड (पाव चमचा)

कृती -

1. उकडलेले बटाटे एका किसणीने किसून घ्या.
2. चीझ व ( विकतचे पनीर असल्यास तेही ) चीझ किसणीवर बारीक किसून एका बाऊलमध्ये एकत्र करून घ्या त्यात चवीनुसार मीठ घाला.  
2.  उकडलेल्या बटाट्याच्या किसामध्ये चवीनुसार मीठ, थोडीशी जिरेपूड आणि दोन ते तीन चमचे मैदा व दोन ते तीन चमचे कॉर्नफ्लोअर घालून गोळा एकजीव मळून घ्या. 
4. आता बटाट्याच्या किसाच्या गोळ्याचे लहान लहान गोळे करून त्यांची तुमच्या आवडीनुसार लहान वा मोठ्या आकाराची पारी बनवा.
5. यामध्ये चीझ व पनीरचा कीस भरा आणि मधे एक किसमिस ठेवा. ( तुम्हाला आवडत असल्यास यात ओल्या नारळाचा चवही घालू शकता, त्यामुळे कोफ्त्याची चव अधिक रूचकर होईल हे नक्की .. )
6. आता ही स्टफ केलेली पारी नीट हलक्या हाताने गोल गोल वळत कोफ्ता तयार करा.
7. साधारण सात ते आठ कोफ्ते तयार झाले की एकीकडे तेल तापत ठेवा.
8. आता हे कोफ्ते कॉर्नफ्लोअरमध्ये घोळून मध्यम आचेवर तळा. कोफ्ते छान सोनेरी रंगावर तळून एका बाऊलमध्ये ठेऊन द्या. 






करीची रेसिपी -

साहित्य -

1. कांदे ( 2 मध्यम आकाराचे, किंवा 1 मोठा )

2. टोमॅटो ( 4 ते 5 मध्यम आकाराचे )

3. आलं ( लहान तुकडा )

4. लसूण ( 4 ते 5 कळ्या )

5. हिरवी मिरची ( 1 लहान )

6. साखर ( 1 टेबलस्पून ) (किंवा चवीनुसार)

7. हळद (पाव ते अर्धा टेबलस्पून)

8. तिखट (अर्धा ते एक टेबलस्पून)

9. धणे व जीरे पूड आणि गरम मसाला ( प्रत्येकी अर्धा ते एक चमचा )

10. दूध आणि दूधाची साय (अर्धा ते एक कप)

11. आवडत असल्यास खडा मसाला

12. मीठ चवीनुसार

13. तेल ( दोन ते तीन टेबलस्पून )

14. हिंग चिमूटभर

15. पाणी एक ग्लासहून थोडंस जास्त

कृती

1. कांदा, टोमॅटो, आलं, लसूण, हिरवी मिरची या सगळ्याचे लहान तुकडे करून ते मिक्सरमधून फिरवून त्याची पेस्ट तयार करून घ्या.

2. आता गॅस ऑन करून आता त्यावर एक पॅन ठेवा.

3. या पॅनमध्ये तेल घ्या व त्यात मोहोरी, जिरं घालून फोडणी करा. मोहोरी तडतडली की त्यात हिंग व हळद घाला.

4. आता मिक्सरमधली पेस्ट या फोडणीत घालून ती छान भाजून घ्या.

6. पेस्ट जेव्हा तेल सोडायला लागेल तेव्हा त्यात थोडं थोडं करत पाणी घाला.

7. आता ही करी छान उकळू द्या. ती उकळत असतानाच त्यात मीठ, तिखट, साखर, धणे जिरे पूड व गरम मसाला घाला. आवडत असल्यास खडा मसालाही घालू शकता.

8. सर्वात शेवटी करीला रिचनेस येण्यासाठी त्यात दूध व फेटलेली दुधावरची सायही घाला.

9. आता एक उकळी आली की गॅस बंद करून करी झाकून ठेवा.

10. गार्निशिंगसाठी त्यात थोडेसे किसमीस घाला व वरून कोथिंबीर भुरभुरवा. तसंच, थोडीशी सायही फेटून वरून क्रीमप्रमाणे लेयर करू शकता. 

तवा नानसाठी साहित्य -

1. मैदा दोन ते तीन वाट्या ( किंवा व्हीट तवा नान आवडत असल्यास तुम्ही मैद्याऐवजी कणीकही घेऊ शकता)

2. मीठ अर्धा चमचा

3. बेकींग सोडा पाव चमचा

4. दही दोन ते तीन टेबलस्पून

5. तेल दोन ते तीन टेबलस्पून

6. तीळ, कलौंजी प्रत्येकी एक ते दोन चमचे

7. कोथिंबीर

8. पाणी

कृती -

1. मैदा, मीठ, दही व बेकींग सोडा एकत्र करून त्यात थोडं थोडं करत पाणी मिसळून छान गोळा मळून घ्या.

2. या गोळ्याला तेलाचा हात लावून गोळा दहा ते पंधरा मिनीटं झाकून ठेवून द्या.

3. पंधरा मिनीटानंतर गोळा पुन्हा एकदा मळून घ्या आणि मग त्याच्या लाट्या करा.

4. आता एकेक लाटी घेऊन ती नान च्या आकारात लाटा.

5. लाटलेल्या नानच्या वरच्या बाजूला पाणी लावून ती बाजू ओली करून घ्या.

6. दुसरीकडे तवा गरम करायला ठेवा, आणि मग तवा गरम झाल्यावर नानची ही ओली केलेली बाजू तव्यावर खाली चिकटेल अशा पद्धतीने नान तव्यावर भाजायला ठेवा.

7. आता नानची जी बाजू वरती असेल त्या बाजूला थोडेसे तीळ, कलौंजी आणि कोथिंबीर पाण्याचा हात लावून चिकटवून द्या.

8. आता मध्यम आचेवर दोन ते तीन मिनीटं नान एका बाजूने भाजला गेला की तव्याचं हँडल धरून तवा नानसह उलटा करून फ्लेमवर दुसऱ्या बाजूने भाजा.

9. तवा फ्लेमवर सतत फिरवत ठेवत नान सर्व बाजूनी छान भाजून घ्या.

10. तयार झालेल्या नानवर बटर किंवा आवडत असल्यास गार्लिक बटरही लावू शकता. 

मी बनवलेले गव्हाच्या पीठाचे (कणकेचे) तवा नान

सर्व्हींगसाठी सूचना -

1. आता एका डीशमध्ये हे बटर नान ठेवा.

2. तर सोबत एका बाऊलमध्ये वा प्लेटमध्ये तयार केलेले दोन कोफ्ते ठेवा.

3. या कोफ्त्यांवर तयार केलेली ग्रेव्ही घाला आणि वरून मलाई व कोथिंबीरीने गार्निश करून मस्त सर्व्ह करा किंवा किसलेले चीझ पनीर घालूनही गार्निश करू शकता. 

फोटो जुना आहे .. यात कोफ्त्याबरोबर पराठे आहेत.


- मोहिनी घारपुरे - देशमुख

(सर्व फोटो मी स्वतः काढलेले आहेत. ते अन्यत्र कोठेही माझ्या परवानगीशिवाय वापरण्यास माझी मनाई आहे. तसे आढळून आल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल. )

बुधवार, २० जानेवारी, २०२१

बाजरीचा घाटा आणि पापडाची भाजी

हिवाळ्यात जर तुम्ही एखादा छानसा पौष्टीक आणि फटाफट तयार होणारा पदार्थ शोधत असाल तर बाजरीचा घाटा एकदा नक्की करून पहा. करायला फार सोपा, अतिशय कमी साहित्यात होणारा असा हा पदार्थ चवीला तर चांगला लागतोच तसंच फार पौष्टीकही आहे. विशेषतः बाळंतीणीसाठी हा बाजरीचा घाटा एक उत्तम पौष्टीक पदार्थ आहे. माझ्या आईने ही रेसिपी मला शिकवली आणि आज ही खास रेसिपी माझ्या वाचकांसाठी मी ब्लॉगवर देते आहे. नक्की करून पहा आणि मला जरूर कळवा.

बाजरीचा घाटा

साहित्य - बाजरीचं पीठ, गूळ, तूप, दूध आणि ड्रायफ्रूट्स
कृती - 
1. एका भांड्यात चमचाभर तुपावर दोन तीन टेबल स्पून बाजरीचं पीठ जरासं भाजून घ्या.
2.आता त्यात साधारण एक ते दोन कप दूध घाला व गुठळ्या न होऊ देता सतत ढवळत रहा.
3. तुम्हाला जितकं गोड आवडतं त्याप्रमाणात या दूधात गूळ घाला व छान लापशीसारखं घट्ट होईपर्यंत सतत ढवळत रहा.
4. आता गॅस बंद करून हा घाटा एका बाऊलमध्ये काढून घ्या व वरून तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स घाला. ड्रायफ्रूट्स नाही घातलेत तरीही चालतील. 
5. आता हा बाजरीचा घाटा थोटासा कोमट होऊ द्या आणि मग लगेचच त्याचा आस्वाद घ्यायला सज्ज व्हा. 

मी केलेला बाजरीचा घाटा

...................

पापडाची भाजी 

घरात जेव्हा कोणतीही भाजी नसेल तेव्हा चक्क पापडाची भाजी करून वेळ मारून नेता येते हे ग्यान मला जेव्हा फेसबुकवरून मिळालं तेव्हा मी हा पदार्थ करून पाहिला आणि खरोखरच, हा एवढा चविष्ट पदार्थ माझ्या पसंतीस उतरला. अगदी टेन ऑन टेन मार्क्स देता येतील असा हा मस्त चमचमीत आणि झटपट पदार्थ आहे.

साहित्य
घरातले मूग किंवा उडदाचे पापड, तेल, जिरं मोहोरी, कांदा, टोमॅटो, आलं लसूण पेस्ट, तिखट, हळद, मीठ, मेथीदाणे, हिंग आणि कोथिंबीर 

कृती
1.
 कांदा टोमॅटोची मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्या किंवा बारीक चिरून घेतलात तरीही चालेल.
2. आता एका कढईत तेल, जिरं, मोहोरी, हिंग, हळद आणि मेथीदाणा घालून फोडणी करायला ठेवा. आवडत असल्यास कढीपत्ताही घालू शकता. (फोडणीची बेसिक कृती सगळ्यांनाच माहिती असते त्यामुळे ती पुन्हा देण्याची गरज नाही असे वाटते.)
3. आता यात कांदा टोमॅटोची पेस्ट किंवा बारीक चिरलेला कांदा टोमॅटो छान परतून घ्या.
4. तुमच्या अंदाजाने गरम पाणी घालून छान ग्रेव्ही बनवून घ्या. 
5. एक उकळी आली की यात पापडाचे तुकडे घाला व शिजू द्या.
6. वरून मस्त कोथिंबीर भुरभुरवा आणि पोळी, पराठे वा नानसोबत मस्तपैकी खा. 

टीप - या ग्रेव्हीत घरातल्याच आंब्याच्या लोणच्याचा खार व एखाद दोन फोडी घातल्या तर आणखी चमचमीत चव होते. किंवा कसूरी मेथी आणि गरम मसालाही घातला तरीही चव आणखी छान येते. 

पापडाची भाजी करून पहा आणि मला नक्की कळवा. 

मी केलेली पापडाची भाजी





- मोहिनी घारपुरे - देशमुख 





मंगळवार, ५ जानेवारी, २०२१

बाजरीचा खिचडा ..


ही एक अत्यंत चविष्ट आणि पौष्टिक पाककृती !

हिवाळ्यात अनेक घरांत हमखास हा पदार्थ बनवला जातो आणि आवडीने खाल्ला जातो.

याची पाककृती इतकी सोपी आहे.

बरेचदा बाजरी आधी भिजत घालावी असा आग्रह असतो पण मी अगदी ऐनवेळेला सुद्धा बाजरी आणि तांदूळ प्रेशर कुकरमध्ये मस्त शिजवून हा खिचडा केलेला आहे. 

याची ऑथेंटीक रेसिपी अशी की यात बाजरी आधी दोन चार तास भिजवायची व मग ती खलबत्त्यात कुटून तिची वरची फोलपटं काढून टाकायची आणि मग तांदूळाबरोबर ती एरवी जशी मुगाची खिचडी करतो त्या प्रकारे शिजवायची.



पण माझी झटपट पद्धत अशी आहे की 😊 -

1. एक वाटी बाजरी असेल तर अर्धा ते पाऊण वाटी तांदूळ आधी स्वच्छ धुऊन घ्यायचे. ( दोन्ही एकत्र धुतले तरीही चालतात.)

2. मग प्रेशर कुकरमध्ये थोडं तेल, मोहोरी, जिरं, कढीपत्ता, एक बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो, लसूण आणि खोब्र्याचं वाटण आणि मूठभर शेंगदाणे घालून परतून घ्यायचे.

3. आता त्यात धुतलेली बाजरी व तांदूळ घालून पुन्हा छान परतायचे. 

4. आता यात तीन चार वाट्या ( थोडं जास्तही चालेल .. ) गरम पाणी घालायचं आणि प्रेशर कुकरला मस्त सात आठ शिट्ट्या करून हा खिचडा शिजवायचा.

5. कुकर थंड झाल्यावर उघडून पहावा आणि वरून जर हवं असेल तर आणखी पाणी घालून खिचडा जरा सरसरीत करून घ्यावा. तसेच जर बाजरी कच्ची वाटत असेल तर आणखी दोन तीन शिट्ट्या करायला हरकत नाही. मात्र बाजरी अगदी छान पूर्ण शिजवण्यापेक्षा थोडी कमी शिजलेली असेल तर खिचडा खाण्यात खरी मजा येते हं.. 

6. या खिचडावर नंतर पुन्हा वरून लसणीचा जिवंत तडका चर्र आवाज करत द्यायचा की असला खमंग दरवळ घरात भरून रहातो .. आहाहा .. 

ऐन थंडीत गरमागरम बाजरीचा खिचडा आणि त्यावर मस्तपैकी भरपूर साजूक तूप .. सोबत दही किंवा ताक, पापड आणि आवडत असल्यास लोणचं ..

आहाहाहा .. जन्नत यार जन्नत ..

करणार ना मग हा पदार्थ ट्राय ??



- मोहिनी

#गुलाबी_थंडीच्या_गोष्टी

#Myकिचनkey


(All pics by myself clicked last year while making this recipe )

Translate

Featured Post

अमलताश