गोरी गोरी पान फुलासारखी छान आणि एका तळ्यात होती बदके पिले सुरेख यासारखी एक से एक अजरामर गाणी संगीतबद्ध करणाऱ्या श्रीनिवास खळे काकांच्या स्मृतिदिनानिमित्त (2 सप्टेंबर 2018) ..
असंच एकदा काही दिवसांपूर्वी मी खळे काकांवर झी मराठीने केलेल्या नक्षत्रांचे देणे या कार्यक्रमाच्या पुनःप्रत्ययाचा आनंद यूट्यूबद्वारे घेत होते. माझ्या मनात चलबिचल झाल्यावाचून राहीले नाही.
म्हणतात ना, मोठं होण्यासाठी संघर्ष कुणालाही चुकलेला नाही, आणि ध्येयाच्या उंचीवर पोचण्याकरिता अनेक मानअपमान, हालअपेष्टांचा सामना करावा लागतोच.. याची तंतोतंत प्रचिती खळे काकांची जीवनी ऐकताना येते.
अत्यंत हळव्या मनाचे, संवेदनशील, कृतज्ञ आणि निगर्वी असे खळे काका आजन्म संगीत कलेत रमले. आपला मुलगा छंद म्हणून गाणं जपतोय हे एकवेळ ठीक पण मुलाला नाटक्या करायचं नाही यावर त्यांचे वडील आग्रही होते..एकदा तर खुद्द बालगंधर्वांनी, हा मुलगा मला द्या.. हा पुढे मोठा गायक होईल असे उद्गार काढले पण तरीही खळे काकांच्या वडीलांनी त्यांस चक्क नकार दिला.
पुढे खळे काकांनी एका बँकेत नोकरी केली पण अवघ्या काही तासात सोडली. मग रेल्वे स्टेशन मास्तर म्हणून अजमेरला नोकरी लागली पण काकांच्या मनातल्या गायकाला, संगीत सुरांच्या सान्निध्यातून जगरहाटीत अडकवणे कदाचित खुद्द देवालाही मंजूर नसावे.. म्हणूनच की काय, शांताराम रांगणेकर यांच्यासारखे बालमित्र खळेकाकांच्या मदतीला धावून आले आणि खळे काका त्याच्यासह, त्याच्या शब्दावर आणि आपल्या गुणवत्तेवर विश्वास ठेऊन मुंबईला पळून आले.. शांताराम यांनी आपल्या घरी त्यांची सोय केली. रांगणेकरांचं घर अवघं दोन खोल्यांचं आणि त्यात रहाणारे एक दोघे नव्हे तर तब्बल 17 कुटुंबीय.. अशातही या मोठ्या मनाच्या, दिलदार मित्राने खळे काकांना आपल्या घरात प्रेमभरे आश्रय दिला. व्हरांड्यात झोपायची सोय केली.. संगीताचंच जगणं असणाऱ्या खळे काकांनी तशा अवस्थेतही आनंदाने निभावलं. व्हरांड्यात झोपलं की रात्रीच्या वेळी उंदीर, घुशी अंगावर येत.. पाऊस वारा झोडपून काढत असे पण खळे काकांनी कधीही तक्रार केली नाही आणि आपल्या ध्येयापासून विचलीत झाले नाहीत.
मुंबईत डीपी कोरगांवकर यांचेकडे संगीत सहाय्यक म्हणून काम मिळालं त्यातूनच शिकणं सुरू झालं. तिथेच पहिली स्वतंत्र रचना करण्याची संधी मिळाली.. ते गाणं गुजराथी होतं आणि तलत मेहमूद यांनी ते गायलं. म्हणतात ना, एका कामातून दुसरं काम मिळतं .. एका कामातून पुढील संधी आपोआप मिळत जाते. अगदी याच न्यायाने, नंतर एकदा एक गृहस्थ खळे काकांना भेटायला आले. आपण स्वतः लक्ष्मीपूजन नावाचा चित्रपट काढणार असून त्याची कथा, पटकथा, संवाद, गाणी गदीमा करणारेत आणि आपण त्यातील गाण्यांना संगीतबद्ध कराल का असा प्रस्ताव घेऊन आले. अर्थातच, खळेंनी अत्यानंदाने लगेचच रूकार भरला. पण आठच दिवसात ते गृहस्थ पुन्हा येऊन म्हणाले, खळे आपल्या नावाला गदीमांनी नकार दिलाय पण तरीही मी त्यांना तुम्हीच ही गाणी करणार असे ठामपणे सांगितले आहे. मग राम गबालेंना घेऊन ते गृहस्थ खळे काकांकडे गेले, सगळी गाणी एक से एक झाली पण दुर्दैवाने चित्रपट प्रदर्शित झालाच नाही.
सुरूवातीला गदीमांनी नाकारलेलं असलं तरीही खळे काकांच्या या सर्व गाण्यांना त्यांनी भरभरून दाद दिली. गदीमांनीच या सर्व गीतांची तू स्वतंत्र रेकॉर्ड का करत नाहीस असं सुचवलं आणि एचएमव्हीकडे पाठवलं. ही सर्व गाणी पुढे भावगीते म्हणून आशाबाईंच्या आवाजात पाच सहा वर्षांनी रेकॉर्डच्या स्वरूपात बाजारात आली आणि गोरी गोरी पान, आणि एका तळ्यात होती या दोन गाण्यांनी रसिकांच्या मनावर मोहिनी घातली .. ती अगदी आजही तश्शीच आहे. हेच काकांचं श्रेय ..
खळे काकांनी आजवर एक से एक गाणी केलेली आहेत..
- सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
- निळा सावळा नाथ
- कळीदार कपूरी पान
- कुणी कुणाचे नाही
- वेगवेगळी फुले उमलली
ही यादी प्रचंड मोठी आहे.
पंडीत भीमसेन जोशी म्हणतात, एखादं गाणं वाईट झालं तर खळे बोलत नाहीत, पण त्यांचा चेहरा बोलून जातो आणि तेच गाणं नंतर चांगलं झालं की खळे भरभरून दाद दिल्याशिवाय रहात नाहीत.
तर राम गबाले सांगतात, खळे काका इतके हळवे आहेत की आपण त्यांना भेटलो तर सर्वप्रथम त्यांच्या डोळ्यात पाणी तरळते ..
असे आपले खळे काका ..
खळे काकांच्या गाण्यात रंगून जात नाही असा माणूस विरळाच. खळे काका, बाबुजी आणि गदीमा या त्रयींनी आपल्यासारख्या गानरसिकांपुढे जी सांगितिक मेजवानी वाढून ठेवली आहे त्याच्या रसास्वादात पुढील कित्येक पिढ्या न्हाऊन निघतील यात शंका नाही..
त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन ..
- मोहिनी घारपुरे -देशमुख
असंच एकदा काही दिवसांपूर्वी मी खळे काकांवर झी मराठीने केलेल्या नक्षत्रांचे देणे या कार्यक्रमाच्या पुनःप्रत्ययाचा आनंद यूट्यूबद्वारे घेत होते. माझ्या मनात चलबिचल झाल्यावाचून राहीले नाही.
म्हणतात ना, मोठं होण्यासाठी संघर्ष कुणालाही चुकलेला नाही, आणि ध्येयाच्या उंचीवर पोचण्याकरिता अनेक मानअपमान, हालअपेष्टांचा सामना करावा लागतोच.. याची तंतोतंत प्रचिती खळे काकांची जीवनी ऐकताना येते.
अत्यंत हळव्या मनाचे, संवेदनशील, कृतज्ञ आणि निगर्वी असे खळे काका आजन्म संगीत कलेत रमले. आपला मुलगा छंद म्हणून गाणं जपतोय हे एकवेळ ठीक पण मुलाला नाटक्या करायचं नाही यावर त्यांचे वडील आग्रही होते..एकदा तर खुद्द बालगंधर्वांनी, हा मुलगा मला द्या.. हा पुढे मोठा गायक होईल असे उद्गार काढले पण तरीही खळे काकांच्या वडीलांनी त्यांस चक्क नकार दिला.
पुढे खळे काकांनी एका बँकेत नोकरी केली पण अवघ्या काही तासात सोडली. मग रेल्वे स्टेशन मास्तर म्हणून अजमेरला नोकरी लागली पण काकांच्या मनातल्या गायकाला, संगीत सुरांच्या सान्निध्यातून जगरहाटीत अडकवणे कदाचित खुद्द देवालाही मंजूर नसावे.. म्हणूनच की काय, शांताराम रांगणेकर यांच्यासारखे बालमित्र खळेकाकांच्या मदतीला धावून आले आणि खळे काका त्याच्यासह, त्याच्या शब्दावर आणि आपल्या गुणवत्तेवर विश्वास ठेऊन मुंबईला पळून आले.. शांताराम यांनी आपल्या घरी त्यांची सोय केली. रांगणेकरांचं घर अवघं दोन खोल्यांचं आणि त्यात रहाणारे एक दोघे नव्हे तर तब्बल 17 कुटुंबीय.. अशातही या मोठ्या मनाच्या, दिलदार मित्राने खळे काकांना आपल्या घरात प्रेमभरे आश्रय दिला. व्हरांड्यात झोपायची सोय केली.. संगीताचंच जगणं असणाऱ्या खळे काकांनी तशा अवस्थेतही आनंदाने निभावलं. व्हरांड्यात झोपलं की रात्रीच्या वेळी उंदीर, घुशी अंगावर येत.. पाऊस वारा झोडपून काढत असे पण खळे काकांनी कधीही तक्रार केली नाही आणि आपल्या ध्येयापासून विचलीत झाले नाहीत.
मुंबईत डीपी कोरगांवकर यांचेकडे संगीत सहाय्यक म्हणून काम मिळालं त्यातूनच शिकणं सुरू झालं. तिथेच पहिली स्वतंत्र रचना करण्याची संधी मिळाली.. ते गाणं गुजराथी होतं आणि तलत मेहमूद यांनी ते गायलं. म्हणतात ना, एका कामातून दुसरं काम मिळतं .. एका कामातून पुढील संधी आपोआप मिळत जाते. अगदी याच न्यायाने, नंतर एकदा एक गृहस्थ खळे काकांना भेटायला आले. आपण स्वतः लक्ष्मीपूजन नावाचा चित्रपट काढणार असून त्याची कथा, पटकथा, संवाद, गाणी गदीमा करणारेत आणि आपण त्यातील गाण्यांना संगीतबद्ध कराल का असा प्रस्ताव घेऊन आले. अर्थातच, खळेंनी अत्यानंदाने लगेचच रूकार भरला. पण आठच दिवसात ते गृहस्थ पुन्हा येऊन म्हणाले, खळे आपल्या नावाला गदीमांनी नकार दिलाय पण तरीही मी त्यांना तुम्हीच ही गाणी करणार असे ठामपणे सांगितले आहे. मग राम गबालेंना घेऊन ते गृहस्थ खळे काकांकडे गेले, सगळी गाणी एक से एक झाली पण दुर्दैवाने चित्रपट प्रदर्शित झालाच नाही.
सुरूवातीला गदीमांनी नाकारलेलं असलं तरीही खळे काकांच्या या सर्व गाण्यांना त्यांनी भरभरून दाद दिली. गदीमांनीच या सर्व गीतांची तू स्वतंत्र रेकॉर्ड का करत नाहीस असं सुचवलं आणि एचएमव्हीकडे पाठवलं. ही सर्व गाणी पुढे भावगीते म्हणून आशाबाईंच्या आवाजात पाच सहा वर्षांनी रेकॉर्डच्या स्वरूपात बाजारात आली आणि गोरी गोरी पान, आणि एका तळ्यात होती या दोन गाण्यांनी रसिकांच्या मनावर मोहिनी घातली .. ती अगदी आजही तश्शीच आहे. हेच काकांचं श्रेय ..
खळे काकांनी आजवर एक से एक गाणी केलेली आहेत..
- सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
- निळा सावळा नाथ
- कळीदार कपूरी पान
- कुणी कुणाचे नाही
- वेगवेगळी फुले उमलली
ही यादी प्रचंड मोठी आहे.
पंडीत भीमसेन जोशी म्हणतात, एखादं गाणं वाईट झालं तर खळे बोलत नाहीत, पण त्यांचा चेहरा बोलून जातो आणि तेच गाणं नंतर चांगलं झालं की खळे भरभरून दाद दिल्याशिवाय रहात नाहीत.
तर राम गबाले सांगतात, खळे काका इतके हळवे आहेत की आपण त्यांना भेटलो तर सर्वप्रथम त्यांच्या डोळ्यात पाणी तरळते ..
असे आपले खळे काका ..
खळे काकांच्या गाण्यात रंगून जात नाही असा माणूस विरळाच. खळे काका, बाबुजी आणि गदीमा या त्रयींनी आपल्यासारख्या गानरसिकांपुढे जी सांगितिक मेजवानी वाढून ठेवली आहे त्याच्या रसास्वादात पुढील कित्येक पिढ्या न्हाऊन निघतील यात शंका नाही..
त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन ..
- मोहिनी घारपुरे -देशमुख
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा