मंगळवार, २८ मे, २०१९

एक होता विदूषक


माझे अत्यंत लाडके अभिनेते स्व. लक्ष्मीकांत बेरडे जेव्हा वारले तेव्हा मला अतोनात दुःख झालं होतं. करियरच्या ऐन भरात त्यांनी जो आनंद दिला तो अतुलनीय .. मी तर त्यांची फार चाहती होते. त्यांनी केलेल्या सर्व  चित्रपटांपेक्षा खूप निराळा असल्याने हा चित्रपट मला पहयाचा होता. पूर्वी टीव्हीवर मी हा चित्रपट पाहिला होता पण तेव्हा मी तो समजण्याइतकी मोठी नव्हते. गेल्या आठवड्यात मात्र यूट्यूबकृपेने हा चित्रपट पुन्हा पाहिला आणि थक्क झाले. लक्ष्मीकांतजींच्या आठवणीने पुन्हा एकदा ह्रद्य व्हायला झाले. खरंच, लक्ष्मीकांतजी .. म्हणजे तुमचा आमचा लक्ष्या ..


हा मनुष्य फिल्म इंडस्ट्रीत कसा आला याबद्दलची मला फारशी माहिती सापडली नाही पण तो आला , त्यानं पाहिलं आणि तो जिंकला ही ओळ लक्ष्याच्या बाबतीत खरी ठरते. 
एक होता विदूषक या चित्रपटातील त्यांचा अभिनय बघताना तर कित्तीतरी दृष्यात आपल्या अंगावर काटा येतो.. आणि कित्तीतरी वेळेला डोळे पाणावतात. 
लहानगा आबुराव (लक्ष्या).. त्याचा बा कोण ते माहीत नाही पण आई तमाशा कलावंत. आबुराव लहान असताना त्याची आई (मधू कांबीकर) एका नेत्याची ठेवलेली बाई म्हणून जगत असते. हा नेता म्हणजे (मोहन आगाशे) .. आबुरावचं लहानपण यात घुसमटत असतं. नेत्याची मुजोरी  बिनबापाच्या आबुराववर .. तो म्हणेल तसं यानं अन् याच्या आईनं रहायचं. मग एकदा काय होतं, आबुराव छान नकला करतो हे माहीत असल्यानं हा नेता त्याला सांगतो, आबुराव, मला हाशीव .. लहानगा आबुराव नेत्यासमोर त्याच्या प्रतिस्पर्ध्याची नक्कल अशी काही बेफाम करतो की या नेत्याला हसता हसता हार्टअटॅक येतो आणि त्याचे प्राणच जातात. ही बातमी आईला कळते आणि आबुराववर येऊ घातलेलं संकट ओळखून ती रातोरात गाव सोडते. दुसऱ्या गावी बहिणीचा तमाशाचा फड असतो तिथे जाते नि आसऱ्याला रहाते. बहिण तोऱ्यात आणि आबुराव अन् त्याच्या आईचे मात्र कष्टाचे दिवस येतात. तमाशाच्या फडाचं नाव मात्र दिवसेंदिवस मोठं होतं. 
आबुरावही आता लहानाचा मोठा झालेला असतो. एक दिवस त्याचा तमाशा पहायला एक नटी येते. ही नटी म्हणजे वर्षा उसगावकर .. खरंतर प्रेमात धोका खाल्याने ती आत्महत्या करण्याच्या निर्णयापर्यंत आलेली असते पण आबुरावचा खेळ पाहून ती एवढी हसते की तिच्या मनातलं सार मळभ दूर होऊन जातं. आता तिला जगायचं असतं. ती आबुरावला भेटते आणि फिल्म ऑफर करते. आयुष्यात आलेली ही संधी आबुरावला घ्यावीशी वाटते आणि तेव्हाच ती नटी आपल्या प्रियकराला (तुषार दळवी) जळवण्यासाठी आबुरावबरोबर प्रेमाचं नाटक करते. पहिल्या चित्रपटानंतर ती आबुरावशी लग्नही करते. आबुराव खूष असतो .. आयुष्यातली त्याची स्वप्न एक एक करून पूर्ण होण्याच्या मार्गावर असतात पण अशातच त्याला तिचं खरं रूप कळतं. तो कोलमडतो. इकडे तमाशात पूर्वी तो जिच्यावर प्रेम करत असतो ती मुलगी मरते आणि मरताना आबुरावच्या आणि तिच्या प्रेमाची खूण असलेली मुलगी जन्म घेते. या मुलीचा सांभाळ आबूरावचे आजोबा (निळू फुले) आणि त्याची आई करतात पण एक दिवशी आईदेखील मरते. हा आईच्या मृत्यूचा निरोप द्यायला आजोबा आबूरावला भेटायला शहरात येतात आणि येताना त्या चिमुकलीला सोबत आणतात. ही मुलगी .. कधी हसलेलीच नसते.. जेव्हा आबुरावला कळतं ही आपलीच मुलगी आहे आणि आपली आई आता कायमची गेली या दोन्हीही धक्यानी तो अक्षरशः मनातून हलतो. पण तरीही त्या चिमुकल्या मुलीला तो सांभाळण्याचं ठरवतो. तिला काही दिवस बोर्डींगच्या शाळेत ठेवतो आणि त्याचदरम्यान त्याला लक्षात येतं की आपण जिच्याशी लग्न केलंय तिला आता आपल्यात रस उरलेला नाही. आपण तिच्यासाठी फक्त एक खेळणंच बनून राहिलोय. तिला वाटेल तेव्हा तिच्या चेहऱ्यावर हसू आणणारा तिचा विदूषक .. तो खंतावतो .. फार फार दुःखी होतो. मग मनातून पक्का निश्चय करतो आणि आपल्या मुलीला बोर्डींग स्कूलमधून घेऊन कायमचं घरी आणतो. त्याच दिवशी त्याच्या बायकोचा निर्धार पक्का झालेला असतो, ती ते घर सोडून निघालेली असते कायमची, तिच्या पूर्वीच्या प्रियकराबरोबर रहायला.. 
जेव्हा ती त्या छोट्या मुलीला बघते आणि तिला कळतं की ही आबुरावची मुलगी आहे तेव्हा तिला खोटंच वाटतं ..तिला वाटतं हा चेष्टाच करतोय.. पण नंतर तीही अतीव दुःखाने आबुरावचा निरोप घेते नि आपल्या वाटेला लागते. 
आता उरतो आबुराव आणि ती न हसलेली छोटी मुलगी. आयुष्य पुढे सरकत रहातं. अशातंच एकदा आबुरावचा बालमित्र (दिलीप प्रभावळकर), जो आता राजकारणात उतरलेला असतो, तो त्याला भेटायला येतो. मग हळूहळू ओळख वाढवत स्वतःच्या फायद्यासाठी आबुरावचा वापर करून थेट मुख्यमंत्रीपदापर्यंत स्वतः पोहोचतो आणि आबुराव मात्र त्याच्या हातचं बाहुलं होत जातो. विधानसभेवर उमेदवार म्हणून हा राजकारणी आपल्या मित्रालाच, आबुरावलाच उभं रहाण्याची गळ घालतो आणि तिथून या विदूषकाचं आयुष्य पलटतं. पण त्याला याची जाणीवच नसते. तो फक्त मैत्रीपोटी एकेक गोष्ट करत चाललेला असतो. अशातच एकदा आबुरावचे आजोबा, गुरू (निळू फुले) विधानसभेचं कामकाज कसं चालतं हे पहाण्यासाठी त्याच्याबरोबर जातात तेव्हा आबुरावचं भाषण असतं. तळागाळातल्या लोकांचा आवाज मांडण्याऐवजी आबुराव त्या भाषणात त्याच्या मित्राच्या सांगण्यावरून या लोकांची खिल्ली उडवतो. आजोबा ते ऐकून रागात निघून जातात आणि घरी आल्यावर आबुरावला त्याच्या बोलण्याची जाणीव करून देतात. तमाशाच्या फडात आपल्या अभिनयानं राजकारण्यांचं धाबं दणाणून सोडणारा एकेकाळचा वाघ्या असलेला आबूरावचा आज राजकारण्यांनी कसा विदूषक करून ठेवलाय याची खंत व्यक्त करतात आणि त्या क्षणी आबूरावला आपलं भरकटलेलं आयुष्य जाणवतं.. ज्यानी त्यानी आबूरावचा घेतलेला फायदा त्याला आयुष्याच्या या वळणावर बोचायला लागतो.. लहानपणीचे  दिवस आठवतात .. तमाशाच्या फडावर नाचणारी आई, त्या फडावर नाचणारी आपली प्रेयसी आणि आपण .. आणि आजचे आपण यातला जमीन अस्मानचा फरक लक्षात येतो. आता त्याला यातून बाहेर पडायचं असतं. 
एक होता विदूषक नावाच्या शेवटच्या चित्रपटाचं आबुरावचं शूटींग आणि त्यातला शेवटचा सीन करताना आबूरावला हार्टअटॅक येतो .. लोक टाळ्या वाजवतात आणि मग लक्षात येतं की हा उठत नाहीये .. मुख्यमंत्री मित्र हजर असतोच तो त्याच्यावर उपचाराची सोय करतो. तातडीने उपचार  मिळतात.. पण का .. तर मुख्यमंत्र्यानं त्याच्या वाढदिवसाच्या सभेत आबुरावचं भाषण ठेवलेलं असतं.. हॉस्पिटलमध्ये डॉक्टर सांगतात की ते येऊ शकणार नाहीत सभेला तर तेव्हा हा मुख्यमंत्री चक्क म्हणतो, आबूरावनं आलं पाहिजे, सभेत भाषण दिलं पाहिजे आणि तिथं कोसळलं पाहिजे.. तुमच्या प्रमोशनच बघू आपण ... अरेरे .. 
आबूराव भाषण द्यायला उभा होतो सभेच्या दिवशी .. एका क्षणी वाटतं हा आता कोसळणार .. लोकांना वाटणार की केवढं ते प्रेम मुख्यमंत्र्यावर या त्याच्या मित्राचं .. पण पुढल्याच क्षणी आबूराव पुन्हा नॉर्मल होतो .. प्रेक्षकात बसलेली जाई, त्याची लेक, जी कधीच हसलेली नसते तीच त्याला दिसायला लागते फक्त .. तो गोष्ट सांगतो आणि शेवटी जाईच्या चेहऱ्यावर हसू उमलतं. सभागृहात गोंधळ होतो.. लहान मुलांची गोष्ट नको म्हणून लोक ओरडाआरडी करतात आणि राजकारणी निघून जातात.. शेवटी एकटा पडलेला आबूराव आणि त्याच्या कुशीत त्याची लेक .. 
पुन्हा एक नवा प्रवास सुरू होतो आबूरावच्या आयुष्याचा .. आणि या प्रवासात त्याची लेक जिनं त्याला आता पप्पा म्हणून स्वीकारलेलं असतं ती त्याच्याबरोबर असते .. 
असा हा विदूषक .. आणि असं त्याचं आयुष्य ...

चित्रपट पहाताना विदूषकाची व्यथा मन हेलावून टाकते. प्रेयसी आणि नंतर बायको झालेली मेनका काय, नि राजकारणी मित्र काय, तो लहानपणी आईला छळणारा राजकारणी माणूस काय .. साऱ्यांनी फक्त या आबूरावला खेळणं म्हणून वापरलं आणि पोटभर खेळून झाल्यावर फेकून दिलं .. असं या आबूरावचं, विदूषकाचं जीवन .. 
खरंतर हा चित्रपट लक्ष्याच्या आयुष्याचा शेवटचा चित्रपट ठरावा हा निव्वळ योगायोग आणि तोही किती दुर्दैवी .. लक्ष्मीकांत बेर्डे फार मोठे अभिनेते होते.. त्यांनीही जन्मभर लोकांना हसवण्याचं काम केलं. आणि ते या चित्रपटानंतर वारले ... हा चित्रपट म्हणजे त्यांच्याच आयुष्याचं निराळ्या प्रकारे केलेलं कथन तर नसेल ना हा प्रश्न जाता जाता माझ्या मनात उपस्थित होऊन जातो.. कदाचित खरं उत्तर वेगळं काही असू शकेल .. किंबहुना वेगळंच असावं अशी प्रार्थना ..
चित्रपट लोकांना किती आवडला ते मला माहीत नाही पण हा चित्रपट फारच वास्तववादी आणि अत्यंत तरल आहे. चित्रपटातली गाणी, ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांचं नृत्य, हावभाव आणि आशा ताईंचा काळीज चिरत जाणारा आवाज हे सगळे या चित्रपटाचे प्लस पॉईंट्स ..
लाल पैठणी रंग माझ्या साडीला तुम्ही यावं सजण रंग होळीला,
गडद जांबळं भरलं आभाळं, 
श्रावणाचं ऊन मला झेपेना
ही गाणी तर अक्षरशः वेड लावतात .. कित्ती वेळा ऐकली तरीही मन भरत नाही असं होतं या गाण्यांनी ..
आणि असं सगळं असलं तरीही लक्ष्मीकांत बेर्डे या माणसासाठी हा चित्रपट नक्कीच पहायला पाहिजे एकदा तरी आयुष्यात ... 
ज्यानं तुम्हाला हसवलं तो तुम्हाला हसवता हसवता केव्हा रडवून गेला तुम्हाला कळलंही नाही असं काहीसं आपलं होतं.. 
दिग्दर्शक जब्बार पटेल यांना तर या चित्रपटासाठी त्रिवार नमन... एक आगळा विषय, उत्कृष्ट पात्र निवड, उत्कृष्ट मांडणी ... या साऱ्यासाऱ्यातून जब्बारजींचं मोठेपण आणि वेगळेपण दिसतं.

मला आयुष्यात कधीतरी लक्ष्मीकांतजींना भेटायचं होतं.. कधीतरी त्यांच्याशी बोलायचं होतं.. हा चित्रपट पाहिल्यावर अजून विश्वासच बसत नाही की ते या जगात नाहीत ... कदाचित ते इथेच आहेत .. मराठी चित्रपटसृष्टीत .. त्यांच्या अभिनयाने, त्यांच्या हसवण्याने आणि त्यांच्या या अशा एक से एक चित्रपटांमधून ते आपल्याला हवे तेव्हा आपल्यासमोर त्यांची कला सादर करायला उभे रहात आहेत .. कायमचं...
असा हा 'एक होता विदूषक ....चित्रपट'


- मोहिनी घारपुरे - देशमुख 

(photo credit - loksatta)

मंगळवार, ७ मे, २०१९

पाठलाग



एक जबरदस्त, गूढ कथानक घेऊन मराठीत दिग्दर्शक राजा परांजपे यांनी बनवलेला पाठलाग हा चित्रपट पाहिला आणि अक्षरशः जागीच खिळले. खरंतर याच चित्रपटावरून नंतर हिंदीत मेरा साया हा चित्रपट बनवण्यात आला होता, तो मी कित्तीतरीवेळा पाहिला असेल पण पाठलाग पहाताना मला तरीही घाबरायला झालं, भावविवश व्हायला झालं .. हेच या मराठी संहितेचं यश ..

या चित्रपटाची कथा त्याकाळी नवीनच .. एका आईच्या पोटी जन्मलेल्या जुळ्या बहिणी, दोघीतली एक उनाड, तिचा पाय ऐन तारूण्याच्या उंबरठ्यावर पदार्पण करतानाच घसरतो, आई तिला हाकलून देते.. आणि नंतर त्या मुलीची वाताहत लागते ती थेट दरोडेखोरांच्या टोळीत सामील होण्यापर्यंत ... इकडे दुसरी जुळी बहिण मोठ्या वकीलाची लाडकी पत्नी म्हणून भरल्या घरात सुखाने नांदते. दोघींची आयुष्य निराळी होतात.. पण नियतीला हे मान्य नसते म्हणा किंवा गेल्या जन्मीचं काही उरलेलं देणं घेण्यासाठीच म्हणा जणू, एका भयंकर रात्री दरोडेखोर टोळीतली ती बहीण नांदत्या घरातील बहिणीच्या घरी संकटात आश्रय मागायला जाऊन पोचते. हिचा नवरा वकील नेमकाच तेव्हा परदेशी शिक्षणासाठी गेलेला असतो आणि शिवाय हिने आईची शप्पथ असल्याने आपल्या या जुळ्या बहिणीबद्दल घरात कधीही वाच्यताही केलेली नसते. पण अशा भयंकर रात्री, आजारी, थकली भागलेली आणि संकटात सापडलेली आणि मुख्य म्हणजे कित्येक वर्षांनी समोर आलेली बहीण ... तिला आश्रय कसा नाकारायचा .. म्हणून ही तिला एक रात्र आणि एक दिवसापुरता आश्रय देते खरी .. पण बहीण खूपच आजारी असल्याने रात्रीतून कोणाला न सांगता डॉक्टरला आणायला म्हणून गुपचूप घराबाहेर पडते.. आणि हाय रे .. दरोडेखोर हिलाच ती समजून पऴवून नेतात. इकडे हिच्या जागी घरी आजारी निजलेली ती मरते आणि तिकडे ती पोलिस आणि दरोडेखोरांच्या चकमकीत पोलिसांच्या हाती लागते. आता सुरू होतो हिचा झगडा .. स्वतःला आपण ती नव्हेच हे सिद्ध करण्यासाठीचा ... मग अनेक संदर्भ, भूतकाळातल्या अनेक गोष्टी, अनेक आठवणी ती सांगत जाते.. कोर्टात .. पण कोणीही विश्वास ठेवत नाही.. खुद्द नवऱ्यालाही कळत नाही की आपणच आपल्या पत्नीला अग्नी देऊन समाधी बांधली आणि आता ही कोण बाई पुन्हा आपली पत्नी असल्याचा दावा करतीये ... एकेक घटना उलगडत उलगडत शेवटी कथानकातला हा खरा ट्विस्ट जेव्हा ती पतीला सांगते तेव्हा सारं नाट्य उघडकीस येतं आणि तो तीच आपली पत्नी असण्याविषयी ठाम होतो. 

.. आणि डॉ. काशिनाथ घाणेकर चित्रपट पाहिल्यापासून डॉ.चा अभिनय कसा होता हे पाहण्याकरिता हा चित्रपट पाहिला आणि त्यानिमित्ताने एका सुंदर मराठी चित्रपटाची अनुभूती घेतली. डॉक्टरांच्या अभिनयाला तसा या चित्रपटात फार स्कोप नव्हता हे खरं असलं तरीही हा चित्रपट तेव्हा नक्कीच गाजला असणार यात शंका नाही. याचं कारण म्हणजे, या चित्रपटाचं कथानक.
जयंत देवकुळे यांच्या आशा परत येते या कथेवरून पाठलाग हा चित्रपट ज्येष्ठ दिग्दर्शक राजा परांजपे यांनी बनवला. पटकथा, संवाद, गीते गदिमांची तर प्रमुख कलाकार म्हणून भावना आणि डॉ. घाणेकर .. कदाचित डॉ. घाणेकरांचा हा दुसरा तिसराच चित्रपट असावा. पण तरीही त्यांचा अभिनय भूमिकेला साजेसा साधासुधा सरळ झाला आहे. शिवाय त्यांचं देखणं रूप चित्रपटाचा प्लस पॉईंट ठरला असणार हे नक्की. त्यांची सहअभिनेत्री भावना या देखील कसलेल्या अभिनेत्री असाव्यात असे वाटले. संवाद फेक आणि सुंदर अभिनय या तिच्या जमेच्या बाजू ..
तुम्ही जर मेरा साया हा सुनील दत्त आणि साधना यांचा चित्रपट पाहिला असेल तर तुम्हाला जाणवेल की त्यातील अनेक फ्रेम्स या तंतोतंत पाठलाग चित्रपटासारख्याच वापरलेल्या आहेत. मला खूप मजा आली जेव्हा मी झुमका गिरा रे या गाण्याच्या ऐवजी पाठलागमध्ये असलेलं, नको मारूस हाक मला घरच्यांचा धाक हे गाणं पाहिलं तेव्हा .. कारण, यातल्या नटीच्या अनेक स्टेप्स्ही जशाच्या तशा हिंदीतल्या झुमका गिरा रे गाण्यात साधना यांनी कॉपी केल्या आहेत. अर्थात तसं करण्यामागे काही कायदेशीर गोष्टीही असाव्यात. कारण मुख्य चित्रपट पाठलाग आणि त्यावरून हिंदीत मेरा साया हा चित्रपट बनवला गेला आहे हे येथे पुन्हा अधोरेखित करायला हवे.
तर मंडळी, राजा परांजपे आणि गदिमा यांचा हा उत्कृष्ट चित्रपट ..
तेव्हाच्या चित्रपटांची सगळी जादू म्हणजे संवाद, अभिनय, दिग्दर्शन आणि गाणी यावरच बेतलेली.. मोठे मोठे सेट्स नाहीत, भयंकर ड्रेपरी नाही, उग्र मेकअप नाहीत, लाऊड म्यूझिक नाही आणि तरीही साधेपणातही सुंदर कथानक हाताळणी हेच या जुन्या चित्रपटांचं वैशिष्ट्य ..
मला तर म्हणूनच हे श्वेतश्याम चित्रपट पहाताना मजा येते..
पाठलाग हा चित्रपट या सगळ्या कलाकारांच्या आणि दिग्गजांच्या कामासाठी पहायलाच हवा .. एकदातरी ..असं मी आवर्जून सांगेन ..

- मोहिनी

(photo credit - youtube )



सोमवार, ११ फेब्रुवारी, २०१९

बेवफा


जुन्या चित्रपटांचं माधुर्य कशात असेल तर ते त्याच्या आशयपूर्ण कथेत असं मी म्हणेन. मुळात कथाच फार छान, आणि मग ती कथा चित्रपटांच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडणारे कलाकार, दिग्दर्शक, संगीतकार, गायक, गायिका आदींचा ताफाही इतकं काही सुंदर काम करून गेलेला दिसतो की हे सौंदर्य चित्रपट क्रुष्णधवल असो वा रंगीत असो, आपण अवाक् होऊन बघतच रहातो. राजकपूर, नर्गिस दत्त आणि अशोक कुमार यांच्या अभिनयाने सजलेला चित्रपट हा अशा सुंदर चित्रपटांपैकीच एक...

1952 साली रूपेरी पडद्यावर आलेला हा चित्रपट जेव्हा मी पाहिला तेव्हा खरोखरच एका पहाण्यात समाधानच झालं नाही. एका दिवसाच्या अंतराने तब्बल दोन वेळा मी हा चित्रपट पाहिला याचं कारण इतकी साधी कथा, पण अर्थपूर्ण संवाद आणि आपल्याला जगणं शिकवणारा हा चित्रपट.. यातली गाणी, लता दिदी, गीता दत्त, शमशाद बेगम आणि तलत मेहमूद यांनी गायलेली .. जी कानाला जितकी गोड, श्रवणीय लागतात तितकीच ती थेट मनाला भिडतात. 
रूपा (नर्गिस ) एका चाळीत रहात असते. तिचा व्यसनी काका तिला पैसे कमावून आणण्यासाठी आणि त्यावर आपली व्यसनांची गरज भागवण्यासाठी अपरिमित छळत असतो. जवळपास रोजच बिचारी त्याचा मार खात असते. राज (राज कपूर) तिचा शेजारी पण तो काहीसा आवाराच. रूपाच्या स्थितीवर दया दाखवून तिला कधीमधी पैशाची मदत करत असतो आणि बदल्यात तिच्याशी थोडंफार फ्लर्ट करून वेळ घालवत असतो. तिला बिचारीला, भाबडीला तेही कळत नसतं पण ती अंतर ठेऊन रहात असते. एकदा तो तिला पैसे देतो आणि बदल्यात कधीमधी माझी खोली साफ करून देशील असं सांगतो आणि ती खरच दुसऱ्या दिवशी त्याची खोली साफ करायला जाते. तो तिला थांबवतो आणि आपल्या बोलण्यात रमवतो .. वेळ घालवतो इतकंच .. बुडत्याला काठीचा आधार तसं तिला बिचारीला तो राज कसाही असला तरीही त्याचा आधारच वाटत असतो. 
असेच दिवस चाललेले असतात पण देवाला काही रूपाची दया येत नसते.
आणि अशातच एकदा  व्यसनी काकाचं टाळकं सरकतं आणि तो रूपाला घराबाहेर हाकलून देतो. बिचारी रूपा, आता पुढे फक्त अंधारच .. कच खाते नि जीव द्यायला समुद्रावर जाते खरी पण का कोण जाणे तिची पावलं अडतात .. तिला मागे परत घेऊन जातात. ती तिथून निघते आणि एका दिव्याखाली बसते. प्रचंड थकलेली असल्याने तिला काही क्षणातच तिथेच त्याच अवस्थेत झोप लागते. 
जेव्हा तिला जाग येते तेव्हा अशोक ( अशोक कुमार ) तिचं चित्र काढत असतो. ती चमकते, त्याला जाब विचारते .. तो सांगतो, अगं मी एक चित्रकार आहे, आजवर खूप चित्र काढलीत पण हे तुझं चित्र म्हणजे माझी आजवरची सर्वोत्कृष्ट कलाकृती ठरेल बघ .. तो तिची चौकशी करतो आणि  तिची कथा ऐकून तो तिला आपल्या बरोबर चल, मॉडेल म्हणून काम कर असं सांगतो आणि त्याचा व्यवस्थित आर्थिक मोबदलाही देण्याचं कबूल करतो. तिला त्याच्यासोबत पुढे जाण्यावाचून काही मार्ग नसतो. ती जाते .. तो तिची एक से एक चित्र काढतो आणि खरोखरीच अल्पावधीतच त्याच आणि तिचं नशीब उजळतं.. ती दोघंही यशोशिखरावर पोहोचतात. प्रचंड श्रीमंत होतात. नावलौकीक मिळवतात. तिला कधी वाटलंही नसेल एवढ्या उंचीवर ती जाऊन पोहोचते. अशोक आणि तिच्यात एक चांगलं नातं निर्माण होत असतं, एव्हाना अशोक तिच्या प्रेमात पडलेला असतो आणि तिला लग्न करण्याविषयी एकदा आडून विचारतोही पण ती .. ती तिच्याच दुनियेत मश्गूल असते. 
कसा कोण जाणे, तिचा माग काढत त्याच दरम्यान राजही येतो.. राज, ज्याने एकेकाळी तिला मदत केलेली असते.. तिला ज्याच्या नुसत्या असण्यानेही एकेकाळी मानसिक आधार मिळालेला असतो .. तोच राज ..
तिला अचानक राज भेटायला आल्याने कोण आनंद होतो. ती त्याची अन् अशोकची भेट घालून देते. वयाने मोठा असलेला अशोक अवघ्या काही मिनीटातच राजची पारख करतो. त्याचे कपटी हेतू ओळखतो पण रूपा, तिला ते कसे कळणार .. हळूहळू राज तिला भेटायला वरचेवर येऊ लागतो , तिच्याशी प्रेमाचं नाटक करायला लागतो. त्याने आपलं रहाणीमानही एव्हाना पूर्ण बदलून टाकलेलं असतं. आपण व्यवसाय करतो असं तिला भासवलेलं असतं. आणि ती एखाद्या कोकरासारखी त्याच्या जाळ्यात अडकत जाते. अशोक तिला वेळोवेळी समजावतो. थांबवतो. ज्या कष्टाने तू यश मिळवलं आहेस, ज्या उंचीवर गेली आहेस तिथून एका छोट्याशा चुकीमुळेही तू खोल दरीत फेकली जाशील .. हे वारंवार सांगून सावध करत असतो. राजला तुझ्यावर नव्हे तर तुझ्या संपत्तीवर प्रेम आहे, त्याचा डोळा तुझ्या पैशांवर आहे असं सांगूनही ती आता ऐकण्याच्या मनस्थितीत नसते. तिला वाटतं, अशोकलाच आपण पुढे जाऊ नये, जन्मभर त्याची मॉडेल बनून रहावं असं वाटतंय म्हणूनच तो अडवतोय .. आणि एक दिवस अद्वातद्वा बोलून ती आपल्या जडजवाहिरासकट घरातून जाते.. 
आदल्याच दिवशी तिनं डोळ्यात पाणी आणून राजला विचारून घेतलेलं असतंं, राज मी अशोकने मला दिलेली सगळी संपत्ती त्याला परत करून जर तुझ्याबरोबर आले तरीही तू मला नेशील ना तुझ्या बरोबर .. करशील ना मला आपलीशी ... आणि राज , जणू एक सावज हेरण्यासाठी आलेला लांडगाच, तो सज्जनतेच्या बुरख्याखाली आपलं कपट झाकून तिला ठामपणे रूकार भरतो .. हो, मी तुझा तरीही स्वीकारच करेन गं  असं म्हणतो. अन् दुसऱ्याच दिवशी घरातून निघून रात्रीच्या विशिष्ट वेळी पूर्वनियोजित ठिकाणी भेटण्याचं ती दोघं ठरवतात.. आणि म्हणूनच आज ती घरातून तिच्या दागदागिन्यासकट निघते .. अशोक थांबवतो, अजूनही वेळ गेलेली नाही म्हणत तिला अडवतो .. पण ती प्रेमात वेडी झालेली मुलगी .. ती चक्क कोणालाही न जुमानता, आपल्या वाटेचे दागिने वगैरे महागाच्या वस्तू, पैसे घेऊन घरातून उर्मटपणे उत्तरं देत निघून जाते.
ठरलेल्या ठिकाणी पोचते आणि वाट पहाते .. थोडा वेळ जातो .. आणखी वेळ जातो .. आणि वेळच जातो फक्त पण राज .. तो येतच नाही.. 
हाय रे कर्मा .. तिच्या पायाखालची जमीन हादरते. काळोख्या पावसाळी रात्री ती एकटी आणि तिचा प्रियकर येतच नाही.. 
जड अंतःकरणाने ती माघारी फिरते.. अशोकच्या घराचं दार तिच्यासाठी उघडच असतं .. ती परत येते आणि सुन्न बसून रहाते. 
इकडे राजला त्याचे वाईट मित्र पैशांसाठी धोशा लावून असतात, ते भेटतात अन् त्याला सांगतात, तू जायला हवं होतं रे .. ती आज तिच्या सगळ्या पैशांसकट तुझ्याकडे आली होती .. तू मूर्खपणा केलास आणि दोन्हीही गमावलंस .. त्याला उकसवतात.. अजूनही वेळ गेलेली नाही, आता पुन्हा काहीतरी बहाणा करून तिच्याकडे जा.. बघ ती तुझ्यावर विश्वास ठेवेल पुन्हा.. आणि याखेपेला तिचा जीव घे आणि सगळं हडप कर आमचे पैसे आम्हाला परत कर..
दोन दिवस जातात. इकडे अशोक आणि रूपा दोन दिवस सुन्न बसून असतात .. उपाशी , विचारमग्न .. आणि तो आता परत येणार नाही असं रूपाला वाटत असतानाच राज पुन्हा येतो .. तिला भूलथापा देऊन पुन्हा आपलीशी करतो आणि पुन्हा आपल्यासोबत चल असा आग्रह करतो. ती भुलते खरी, पण यावेळेला ती सावधही असते. कदाचित तिला आता खरंखोटं करून पहायचंच असतं. आपल्या मनाच्या खात्रीसाठी म्हणून का होईना, ती त्याच्याबरोबर निघते. आपल्या सामानात सगळे पैसे, दागदागिने आहेत, नीट लक्ष ठेव असं खोटंच त्याला सांगते.  ती दोघं एका हॉटेलात वेगवेगळ्या खोलींमध्ये मुक्काम करतात .. तो सज्जन आहे हे त्याला तिला भासवायचं असतं ना .. त्याचे मित्रही त्या दोघांवर लक्ष ठेऊन असतात, ते त्याला लवकर काम आटप म्हणून धोशा लावतात. 
आणि रात्री तो तिच्या खोलीतून तिची बॅग लंपास करतो, ती झोपेचं नाटक करत असते. तो पळतो, कुणीतरी चोर चोर अशी आरोळी ठोकतो .. आता पोलीस त्याचा पाठलाग करतात .. गोळी झाडली जाते आणि तो मरतो .. बॅग उघडी पडते तशी त्याचे ते टोळभैरव येतात आणि हात चोळत तेथून पोबारा करतात.. तिच्यासमोर आता सगळं चित्र साफ झालेलं असतं. शेवटी तिला कोणीतरी विचारतं, तू त्याला ओळखतेस का .. तेव्हा ती निग्रहानं नकार देते आणि तिथून निघून थेट अशोकचं घर गाठते. 
अशोक एका कॅनव्हास समोर बसलेला असतो. ती येते आणि घडाघडा बोलते, त्याची माफी मागते.. आपण चुकलो हे कबूल करते .. पण अशोक ढिम्म असतो.. शेवटी ती जाते आणि त्याला हात लावून हलवणार तोच अशोक मान टाकतो .. ती किंचाळते .. ढसाढसा रडते.. कॅनव्हास उघडून पहाते तो त्याने त्याच्या मरणाचंच आज चित्र रेखाटलेलं असतं... आता तिच्या दुःखाला पारावार रहात नाही... ती घरभर फिरते .. तिचं मन तिला खायला लागतं. आता घरात वेगवेगळ्या पोझमधली भिंतीवर लटकणारी चित्र जिवंत होतात.. अन् तिचीच चित्र तिला खूनी , पापी, डायन, नीच, बेवफा म्हणायला लागतात .. तू अशोकला मारून टाकलंस, तू मरून का नाही जात असं म्हणू लागतात.. ती बिथरते, आतून तुटते कारण आता तिचंच मन तिला खात असतं ना .. अंगावर येणारी चित्र, मृतावस्थेतला अशोक पाहून अखेरीस ती कोसळते आणि प्राण सोडते ..
चित्रपट संपतो..
आणि आपल्या पुढ्यात आयुष्याचं गांभीर्य ठेऊन जातो. विशेषतः भावनेच्या भरात होणाऱ्या चुका आणि त्यामुळे भरकटलेली आयुष्य पुढे कशी रसातळासा जातात याची कथा सांगणारा हा चित्रपट पहाताना आपण व्याकूळ होऊन जातो. माणसाचं पाऊल कायम पुढे पडत असतं, आणि काळही कायम पुढेच जात असतो, एकदा टाकलेलं पाऊल पुन्हा मागे घेतलं तरी ते पुन्हा त्याच मागच्या मुक्कामाला आपल्याला नेईलच असं काही नाही .. म्हणूनच माणसाने प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकलं पाहिजे आणि भावनेच्या भरात कोणताही निर्णय कधीही घेऊच नये हाच काय तो बोध या चित्रपटातून घ्यायला हवा इतकंच मी सांगेन ..

- मोहिनी घारपुरे - देशमुख 



(Photo credit - youtube)

मंगळवार, ५ फेब्रुवारी, २०१९

कॅलेंडर गर्ल्स

2014 साली दिग्दर्शक मधुर भांडारकर यांचा कॅलेंडर गर्ल्स हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यापूर्वी पेज थ्री आणि हिरॉईन हे दोन्हीही वेगळ्या धाटणीचे चित्रपट म्हणून लोकप्रिय झाले होते. साधारणतः त्याच थीमवर पण वेगळा विषय घेऊन आलेला कॅलेंडर गर्ल्स हा त्यांचा चित्रपट आज पाहिला आणि मन विषण्ण झाले. ग्लॅमर जगतात सौंदर्य आहेच पण या जगाची काळी बाजूही आहे. ही दुसरी बाजू या चित्रपटांच्या माध्यमातून मधुर भांडारकर रेखाटतात.. आणि तेच वास्तवही आहे. एकदा का चकचकीत काचेच्या आतल्या झळाळत्या मोहमायी दुनियेत तुमचा प्रवेश झाला की तुम्हाला परतीचे मार्ग फार अपवादानेच उघडतात. त्यामुळेच इथे येण्यापूर्वीच पुढे काय हा विचार करून मगच आलं पाहिजे हे नक्की ..

कॅलेंडरवर वेगवेगळ्या, चित्रविचित्र वेशभूषेत झळकणाऱ्या मुलींबद्दल सामान्य वर्गाला मोठं आकर्षण असतं. सामान्यातल्याच काही नशीबवान मुली एवढ्या उंचावर जाऊ शकतात हा एक दृढ समज. या मुली कोण, कुठून येतात, कुठे जातात याबद्दल फारशी चर्चा होत नाही. केवळ भिंतीवर एक नवीन कॅलेंडर दरवर्षी सजतं आणि त्यातले चेहरे वर्षागणिक बदललेले असतात. या चेहऱ्यामागच्या व्यक्तिंना केवळ तेवढ्यापुरतीच लोकप्रियता, प्रसिद्धी मिळते आणि नंतर एखाद्या तुटलेल्या ताऱ्याप्रमाणे हे चेहरे कुठेतरी अंधारात गुडूप होऊन जातात. ते लोकांना कधीच दिसत नाहीत.. आणि दिसतात तेव्हाही ते पुन्हा त्यांच्या झळाळीसह असतीलच याची काहीच शाश्वती देता येत नाही.. 
कॅलेंडर गर्ल्स ही कथा आहे अशाच पाच मॉडेल्सची. या पाचही मुलींचा तोवर आपसात काहीच संबंध नसतो. एका मोठ्या ब्रँडच्या कॅलेंडरसाठी त्यांची निवड होते. महाराष्ट्र, कोलकाता, हैदराबाद, पाकिस्तान आणि गोवा अशा पाच ठिकाणाहून या मुली मुंबईत येतात. प्रत्येकीचं साध्य एकच, पण दिशा .. ती मात्र वेगवेगळी. आपल्या नात्यांवर ताण देऊन कुणी या असाईनमेंटसाठी येतात आणि कुणी घरच्यांचं उत्तम पाठबळ घेऊन येतात.. असाईनमेंट होते, कॅलेंडर झळकतं.. भरपूर प्रसिद्धी, पैसा या मुलींना मिळतो आणि पुढे .. पुढचे मार्ग प्रत्येकीच्या आयुष्याची रेष वेड्यावाकड्या वळणांनी घेऊन पुढे जात रहाते .. 
आपली हुशारी आणि कधी, कुठे, काय बोलायचं, स्वतःला प्रेझेंट कसं करायचं हे चोख कळलेली मयुरीला या क्षेत्रात येण्यासाठी घरच्यांचा पाठींबा. त्याबळावरच ती येते आणि नंतर तिचा पीए तिवारी (अतुल परचुरे) याच्या साथीने हळूहळू बॉलीवूडमधली अभिनेत्री म्हणून प्रवास करते.
कोलकत्याची पारोमा हट्टाला पेटते .. घरच्यांचा विरोध असतो. गेलीस तर पुन्हा परतून येऊ नकोस असं सांगणाऱ्या वडीलांना आणि भावाला पारोमा म्हणते, मी मुंबईत जाईन.. पुन्हा परतून येणार नाहीच पण तुम्हाला मात्र घेऊन जाईन .. आणि तुम्हाला त्यादिवशी माझा अभिमान वाटेल.
हैद्राबादची नंदिता एका उच्चशिक्षित कुटुंबातली मुलगी.. आईवडील उच्चपदाधिकारी, बहीणही एकदम करिअरिस्ट .. अशा पार्श्वभूमीवर नंदिताला जेव्हा भारतातल्या टॉप, हॉटेस्ट कॅलेंडरची मॉडेल म्हणून निवडलं जातं तेव्हा आनंदीआनंदच असतो.
नाझनीन आपल्या बॉयफ्रेंडच्या साथीने लाहोरहून लंडनला येते पण ही टॉप मॉडेल बनण्याची संधी मिळाल्यावर तिला ती घ्यावीशी वाटतेच.. बॉयफ्रेंडचा कडाडून विरोध असतो पण तरीही त्याला न जुमानता ती पुढचं पाऊल टाकते आणि मुंबईत येते.
शॅरेन गोव्याची असते.. तिची जेव्हा निवड होते तेव्हा तिला स्वतःवर विश्वास असतो. या इंडस्ट्रीत काहीही चालू दे पण कदाचित तिला माहिती असतं की तिला कुठवर जायचंय त्यामुळे त्या विश्वासावर ती मुंबईत येते. 

अशा या पाच जणी.. मुंबई शहरात येतात काय .. कॅलेंडरवर झळकतात काय आणि रातोरात प्रसिद्ध होतात काय  .. त्यांचा स्वतःचाच विश्वास बसत नसतो त्यांच्या नशीबावर .. पुढे दोन तीन महिने या यशाच्या आनंदात जातात आणि आता .. आता खरे कसोटीचे क्षण त्यांच्यासमोर येणार असतात. कारण, आता त्या एकेकट्या असतात, स्वतंत्रपणे जगणार असतात आणि त्यांच्याभोवतीचं वलय त्यांना आयुष्याची बरीवाईट वळणं दाखवणार असतं.
पारोमा कुठे कुठे प्रमुख अतिथी म्हणून मिरवत असतानाच तिचा जुना बॉयफ्रेंड तिला गाठतो.. प्रेम तर असतंच त्यांच्यात कधीतरी पूर्वीच त्यामुळे हाच धागा पकडून ती त्याच्या हातात आपला हात देते..
नंदिताची ओळख एका धनाढ्य कुटुंबातील एकुलत्या एका मुलाशी होते आणि ती मॉडेलिंग करियर सोडून त्याच्याशी विवाहबद्ध होते.
मयुरी अनेक खटपटी लटपटी करत बॉलीवूडपर्यंत पोहोचते.. पैसे कमावत जाते.
शॅरेनची ओळख आणि मैत्री एका माणसाशी होते तो तिच्याकडे तिचं पिआरचं काम मिळवायला येतो, तीही त्याला काम देते, मग जरा बरी ओळख, मैत्री होते म्हणून त्याच्यासोबत फिरायला जाते आणि तो तिच्या नुसत्या सहवासाच्याच रंगेल अफवा बनवून इकडेतिकडे पसरवतो.. इंडस्ट्रीत तिची बदनामी करतो. एका पार्टीत तिला जेव्हा एक फाल्तू मुलगा काहीबाही बोलतो तेव्हा हा सगळा प्रकार तिला कळतो आणि ती त्या पीआरला त्याच्या ऑफीसात जाऊन कानशिलात भडकावते.. आणि या प्रकारानंतर मॉडेलिंगची दारं तिच्यासाठी बंद होऊन जातात.
नाझनीनला एक ब़ड्या बॅनरची फिल्म मिळते खरी पण त्याचदरम्यान भारतात एकदम पाकिस्तानी कलाकारांना काम देऊ नका म्हणून गदारोळ माजतो.. नाजनीनची संधी हुकते आणि भारतात जगणंही तिच्यासाठी फार कठीण होऊन बसतं. थोडे दिवस ती शेरॉन बरोबर रूम शेअर करते पण नंतर पैशाची चणचण भासू लागते. 
आता पुढे कसं म्हणून काळजीत पडलेल्या नाझनीनला एक बाई हेरते आणि मॉडेल म्हणून ओळख मिळवू इच्छिणाऱ्या नाझनीनला पुढे एस्कॉर्ट म्हणून जगावं लागतं ..
नंदीतालाही एव्हाना तिच्या नवऱ्यावर संशय आलेलाच असतो. ती त्याच्यासोबत मुद्दामच मुंबईला जाण्याचा आग्रह करते .. तो तिला आढेवेढे न घेता नेतोही आणि तिच्या नकळत आपल्या रूमवर एस्कॉर्टला बोलावतो .. ती अन्य कुणी नसून, नाझनीनच असते.. नाझनीन त्याला पाहून घाबरते पण तो तिला सोडणार थोडीस असतो.. नाझनीन त्या दिवशी हतबल होते. नंदीता तिलाच त्याच हॉटेलमध्ये भेटायला आलेली असते आणि भेटतेही, तेव्हा ती तिच्या नवऱ्याबद्दलचा संशय नंदिताजवळ व्यक्त करते .. इतक्यात तोही येतो.. आता नंदिताला खूप अनकंफर्टेबल होतं आणि स्वतःच्या चुकाही दिसायला लागतात.. ती तिथून कारण सांगून पळ काढते आणि त्या बाईला भेटून आता यापुढे आपण हे काम करणार नाही असं सांगते.. ती बाई एकदा, अखेरचंच तू हे कर असं म्हणून नंदिताला भऱीस घालते. ती तयार होते .. शेवटची वेळ म्हणून .. आणि ही शेवटची वेळ तिची काळरात्रच ठरते. हा सगळा प्रसंग खरंच पहाण्यासारखा आहे ..
इकडे पारोमाचीही तिच्या बॉयफ्रेंडने वाट लावलेली असते. इमोशनल पारोमाला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचा बॉयफ्रेंड क्रिकेटच्या मॅच फिक्सिंगसाठी पारोमाचा वापर करतो. तीही त्याच्या बोलण्याला भुलते आणि शेवटी जेव्हा पोलीस पकडायला येतात तोवर तो पैशांसकट फरार झालेला असतो. पारोमा पकडली जाते आणि तिला अटक होते. यावेळी तिची जमानत करायला का होईना तिचा भाऊ आणि वडील येतात पण कुटुंबाची इज्जत गेली म्हणून तिला सोबत न घेताच ते तिला एकटं सोडून निघून जातात. पारोमा एकटी पडते .. कायमचीच.
शॅरेनला दरम्यानच्या काळात एका टीव्ही वाहिनीची एँकर म्हणून संधी मिळते आणि तीही त्या संधीचं सोनं करते. त्या वाहिनीच्या प्रमुखाशी नंतर लग्न करून सेटल होते.
मयुरीला मधुर भांडारकरच्या सिनेमात कास्ट केलं जातं.
अशा या पाच जणी नंतर नाझनीनच्या अंत्यदर्शनालाच एकदम एकत्र भेटतात .. तोवर या चांदण्यांचा झगमगाट मावळून गेलेला असतो. वास्तवाचा चटका त्यांना चांगलाच बसलेला असतो.. 
या वळणावर चित्रपट संपतो आणि शेवटाकडे जाता जाता भिंतीवरच टांगलेलं हे जुनं कॅलेंडर बदलून एक नवं कॅलेंडर कोणीतरी चढवत असतो.. आणि आता नवे चेहरे या कॅलेंडरवर झळकत असतात.. 
असा हा चित्रपट आपल्याला फारच हळवं करून जातो.. एका क्षणात आपले पाय जमिनीवर आणून ठेवतो. माणसाला शेवटी नशीबाच्या पुढे जाता येत नाही हेच खरं ं.. आणि कदाचित, आपल्याला कुठवर धावायचंय आणि काय गमावून काय मिळवणार आहोत हे हिशेब माणसाने पुढचं पाऊल टाकण्याआधीच करून ठेवायला हवेत हेच कदाचित चित्रपट सांगून जातो. 
चकाकतं ते सोनं असतंच असं नाही हे देखील या मोहमायी दुनियेत येणाऱ्या प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे अन्यथा कोणाची नौका त्याला कुठे भरकटवेल हे सांगू शकतच नाही, कोणीच हेच खरं ..
सर्वार्थाने चपखल असा हा चित्रपट म्हणूनच माझ्यासारख्या, एकेकाळी मॉडेलिंगच्या जगताची दारं ठोठवणाऱ्या आणि इथला खोटारडेपणा अनुभवल्यानंतर वेळीच पाठीमागे फिरलेल्या , एका संवेदनशील लेखिकेला आवडला नाही तरच नवल .. नाही का .. ?
कदाचित तुमच्यापैकीही काहीजणांना तो आवडू शकेल असं मला वाटतं.
थांबते ..!

-  मोहिनी घारपुरे - देशमुख 

(photo credit - www.imdb.com)

शुक्रवार, १ फेब्रुवारी, २०१९

मौसम

कथानक मजबूत असेल तर केवळ दोन तीन मुख्य पात्रांच्या आधारेही सिनेमा किती उंची गाठू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे 1975 साली प्रदर्शित झालेला मौसम हा चित्रपट .. 
आयुष्याची उमज नेमकी कळलेले दिग्दर्शक गुलझार यांच्या कथेतून आणि दिग्दर्शनातून बनलेला हा चित्रपट आपल्याला रडवल्याशिवाय रहात नाही. वाईटातून नेहमी चांगलं होतं हा विश्वास आपल्या मनात जागं करणारा हा चित्रपट म्हणूनच मनोरंजनाबरोबरच आयुष्याची अनिश्चितता आणि वास्तवता दोन्हीही आपल्याला शिकवून जातो. 
माणूस ठरवतो एक नि होतं दुसरंच .. किंबहुना ज्याचं त्याचं प्राक्तन ज्याला त्याला आपापल्या मार्गाने पुढे नेत असतं आणि एकाचं नशीब दुसरा बदलू शकत नाही तसंच जे घडायचं असतं तेच घडतं अशा आजवर ऐकलेल्या अनेक गोष्टी शब्दशः खऱ्या असाव्यात असं चित्रपटाच्या शेवटी आपल्याला वाटून जातं. 
तर कथा अशी की, दार्जिलिंगमध्ये आपल्या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या अखेरच्या वर्षाची तयारी करणारा विद्यार्थी अमरनाथ गिल (संजीव कपूर), एकदा घरी परतताना धडपडतो आणि त्याचवेळी तेथून जात असलेल्या चंदाच्या (शर्मिला टागोर) नजरेस पडतो. तिचे वडील गावातले वैद्य त्यामुळे ती त्याला उपचारासाठी घरी यायला सांगते. पाय चांगलाच मुरगळला असल्याने तो घरी जातो .. उपचार घेऊ लागतो आणि दरम्यान दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडतात. काही महिन्यानंतर अमरनाथला शहरात परीक्षेकरता परतावे लागणार असते तेव्हा तो चंदाच्या वडीलांना आपल्या आणि चंदाच्या प्रेमाबद्दल सांगतो आणि परीक्षेनंतर परत येऊन तिच्याशी लग्न करून तिला घेऊन जाईन असं आश्वासन देतो. वैद्यबुवाही संमती दर्शवतात. अमरनाथ जातो .. आणि हाय रे कर्मा .. तो पुन्हा कधीच परतून येत नाही. अक्षरशः पंचवीस एक वर्षानंतर तो दार्जिलिंगला परततो तोवर त्याचं तारूण्य ओसरून गेलेलं असतं. सहज म्हणून तो तिथल्या गावकऱ्यांपैकी कोणाकोणाकडे चंदाची आणि वैद्यबुवांची चौकशी करतो आणि जे काही समोर येतं ते फार फार ह्रदयद्रावक असतं. त्याला कळतं, वैद्यबुवा तर केव्हाच वारले. त्यांची मुलगी चंदा कोणा डॉक्टरची वाट पहात होती बरीच वर्ष .. तो येईल आणि मला नेईल पण तो कधी आलाच नाही. दरम्यान तिचं लग्न वैद्यबुवांनी गावातल्याच एका लंगड्या, बिजवराशी करून दिलं. तोही फार काही जगला नाही. हिला मात्र दिवस राहिले आणि मुलगी झाली. पण चंदाला केव्हाचच वेड लागलं होतं.. ती सतत मुलीला डॉक्टर बनवायची स्वप्न पहायची आणि तिच्या डॉक्टर प्रियकराची वाट पहायची. नंतर तिची मुलगी डॉक्टर होण्यासाठी शहरात गेली तेव्हा म्हातारी चंदा एका माळी काकाजवळ रहायची .. मुलीने थोडे दिवस पैसे पाठवले आणि चंदा गेल्यावर ते बंद झाले.. तेव्हापासून कोणीही त्या मुलीचा शोध घेतला नाही आणि ती कुठेय, तिचा ठिकाणाही कोणालाच माहीत नाही...
हे सगळं ऐकून अमरनाथ, जो आता उतारवयाकडे झुकलेला असतो त्याचं ह्रदय पिळवटून निघतं. कारण त्याला वाटलेलं असतं, की आपण परतलो नाही तरी चंदाचं आयुष्यात काहीतरी चांगलंच झालेलं असेल .. माणूस कधीच एवढ्या टोकाचं वाईट चिंतत नाही किंबहुना काळावर विश्वास ठेऊनच आयुष्य जगायचं असतं हेच खरं.. त्यामुळेच अमरनाथला जेव्हा ही शोकांतिका कळते तेव्हा त्याचं मन त्याला खायला लागतं. तो शोध घेऊ लागतो, त्या सगळ्या जुन्या खाणाखुणांचा .. त्या खुणांनी तो चंदाचं आयुष्य तर उलगडत जातोच पण आता त्याला मागे हटायचं नसतं .. किमान जे त्याच्या हातात उरलेलं असतं त्याप्रती तरी त्याला जबाबदारी पेलायची असते.. अर्थात, चंदाची मुलगी कजली .. तो तिचा शोध घेऊ लागतो. त्याला कुणीतरी सांगत की ती डॉक्टर झालीये आणि शहरातून पैसे पाठवायची चंदासाठी .. तेव्हा त्याला काहीसं हायसं वाटतं खरं .. पण छे .. खरं आयुष्य एवढं सोपं कोणासाठीच नसतं हेच खरं.. आणि कजली सारख्या मुलीसाठी .. जिचा वडील म्हातारा, लंगडा आणि हिच्या लहानपणीच जो मेला .. जिची आई आयुष्याचे चटके खाता खाता वेडीच झालेली .. तिच्या पाठीशी कोण उभं रहाणार .. कोण तिला डॉक्टर बिक्टर बनवणार नाही का .. अशा दुर्दैवी मुलींना आपल्या समाजातल्या लांडग्यांनी खाल्ल नाही तरच नवल ..
अगदी तशीच करूण कहाणी या कजलीची झालेली असते. अचानक एका वेश्याग्रृहातून समोर आलेली मुलगी जी हुबहू चंदासारखी .. तिच्यावर अमरनाथची योगायोगाने नजर पडते आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकते. आता तो तिचं जीवन सुधरवण्यासाठी प्रयत्न करतो.. सारखा तिच्यासाठी तेथे येणारा हा म्हातारा माणूस कोणी तसला असेल असं वाटून ती त्याच्याशी बोलते आणि बेटी बिटी म्हणायला लागल्यावर सुरूवातीला चक्क त्याला तेथून हाकलून देते. पण तो माघार घेत नाही.. शेवटी एकदिवस तो तिला वाट्टेल तितके पैसे देतो पण मी म्हणेन तेवढे दिवस माझ्यासोबत माझ्याघरी रहायला चल म्हणतो आणि तिला तिथून काढतो. घरी एका बाईला घेऊन आलेलं पाहून नोकरचाकर ओळखीचे पाळखीचे यांच्या नजरा बदलतात.. पण तो .. त्याला तिचं जीवन सुधारायचं असतं .. ती जणू त्याचीच मुलगी असते .. त्याची जबाबदारी असते ना .. तो तिला घरी नेतो आणि तिचं रहाणीमान वागणं बदलवतो. ओघातच तिची करूण कहाणीही जाणून घेतो. हा गृहस्थ म्हणजे आपलं एक सोफेस्टीकेटेड गिऱ्हाईक असच तिला वाटत असतं .. त्यामुळे तिचं वागणंही थोडंफार तसंलच असतं. पण हळूहळू गोष्ट पुढे सरकते. ती तिची कथा ऐकवते. आई वेडी झाली तेव्हा वडीलांचा एक भाऊ सतत यायचा, त्याची माझ्यावर वाईट नजर होतीच आणि एक दिवस त्यानं डाव साधला. मला नासवून नंतर त्याने इथे आणून बसवली .. आणि मग हेच माझं जीवन झालं .. तिचे ते शब्द ऐकताना अमरनाथला स्वतःबद्दल, आयुष्याबद्दल फार फार चीड येते. आपण तेव्हा या मुलीची काळजी घ्यायला का नव्हतो हा प्रश्न त्याला टोचतो.. तिचं कोणा कुंदनवर प्रेम होतं हे जेव्हा ती सांगते तेव्हा पुन्हा अमरनाथच्या आशा पल्लवीत होतात. कदाचित, जशी चंदा, आपली प्रेयसी, हिची आई जशी आपल्या वाटेकडे तब्बल वीस वर्ष डोळे लावून राहिली होती तसाच जर  तोही  हिच्यासाठी आजही थांबला असेल तर आपण आपल्या हातानी या पोरीचं त्याच्याशी लग्न लावून देऊ अशा विचाराने तो एकदा तिला त्याच्या घरी नेतो, तिलाही थोडीशी आशा वाटू लागलेली असते .. पण इथेही नशीब काही वेगळंच दान टाकतं कारण ती कुंदनची चौकशी करते आणि त्याच्या घरातली तिला उत्तर देणारी स्त्री म्हणजे दुसरी कुणी नसून त्याची बायकोच असल्याचं कळतं आणि हे दोघेही पुन्हा एकदा निराश होऊन माघारी येतात. अर्थात तोवर कजलीला हा अमरनाथच आपल्या आईचा प्रियकर आहे हे माहीत नसतंच. 
अमरनाथही एवढी वर्ष अविवाहीतच राहिलेला असतो. त्याला चंदाशीच लग्न करायचं असतं. पण परीक्षेनंतर पुढे तो सर्जन म्हणून काम सुरू करतो तेव्हा त्याच्या हातून शस्त्रक्रीयेदरम्यान एका रूग्णाचा मृत्यू होतो आणि त्याला पुढे तीन वर्ष तुरूंगवास होतो. त्यामुळेच तो चंदाशी काहीच संपर्क करू शकत नाही. शिवाय कैदेतून परत सुटल्यावर त्याला वाटतं, की आता आपण चंदाच्या लायक नाही आणि या मधल्या काळात तर तिचं लग्नही झालं असेल असं वाटून तो पुन्हा कधीच माघारी फिरत नाही. अमरनाथ आपली कथा कजलीला सांगतो पण ती मुलगी म्हणजेच तुझी आई ही ओळख देण्याचं टाळतो.. कारण कजलीने तोवर तिच्या मनात त्या डॉक्टरविषयी किती राग आहे ते सांगितलेलं असतं.
शेवटी अशी मुलगी आपल्या साहेबांबरोबर कशाला रहातेय यावरून एक दिवस घरातला एक नोकर तिला साहेबांच्या परोक्ष जाब विचारतो आणि तिलाही मनातून वाटू लागतं की खरंच आपण या भल्या गिऱ्हाईकाला ज्याने आपल्याला अद्याप स्पर्शही केला नाही त्याच्या चांगुलपणाची कदर ठेऊन आता त्याच्या आयुष्यातून परत गेलं पाहिजे. दरम्यान हा अमरनाथ त्या वेश्यागृहाची मालकीण असलेली बाई (दीना पाठक) हिच्याकडे जाऊन कजलीला परत इथे न आणण्याची किंमत म्हणजे ब्लँक चेक देऊन येतो. पण इकडे कजली पुन्हा जुन्या अवतारात याच्या घरात फिरत असते.. शिवाय त्याच्या मनातून उतरण्यासाठी ती खोटं कारणही देते. तो चिडतो आणि तिला हाकलून देतो. ती पुन्हा वेश्यागृहात जाते.. पण आता तिला लक्षात आलेलं असतं, की आपल्याही मनात एक स्त्री आहे आणि तिला, तिच्या मनाला त्या म्हाताऱ्या ग्राहकानी स्पर्श केलाय.. ती तसं सांगते आणि वेश्यागृहाची मालकीणही कजलीला त्या देवमाणसाजवळ रहा आणि तुझं आयुष्य पुन्हा उभ कर असं सांगते.. ही जाते, पुन्हा त्या म्हाताऱ्या गिऱ्हाईकाजवळ .. पण एक वेगळीच आशा आता तिच्या मनात असते कारण तिला तो कोण आहे हे तोवर माहीतच नसतं.. 
ती त्याला जवळ घेते आणि तो तिच्या कानशिलात भडकावतो.. 
काय हे सगळं करायला तुला तुझ्या आईने मोठं केलं का .. असं खडसावतो आणि रागाच्या भरात त्याच्या तोंडून चंदा नाव निघतं .. तेव्हा कजलीला कळतं, की आपली आई चंदा ज्याची एवढी वर्ष वाट पहात होती तो डॉक्टर अन्य कुणी नसून हाच आहे .. तिला राग येतो, स्वतःचा, त्याचा आणि स्वतःच्या फुटक्या नशीबाचाही ... ती धावत सुटते.. तेथून दूर निघून जाते ..
तो तिला थांबवत नाही .. 
दुसरा दिवस उजाडतो.. तो पुन्हा शहरात जायला निघतो .. अर्ध्या वाटेवर एका झाडामागे कजली दिसते. डोळ्यात संपलेली स्वप्न असतात आणि चेहऱ्यावर राग, निराशा दाटून आलेली असते तिच्या .. या क्षणी त्याच्यातला बाप पुन्हा जागा होतो.. तो थांबतो.. तिच्या हातात तिने लपवून ठेवलेला कागद पहातो .. तो त्याचा तरूणपणीचा फोटो असतो .. तिने जपून ठेवलेला, तिच्या आईने जपून ठेवलेला .. 
त्याला गहीवरून येतं .. तो कजलीला म्हणतो, चल बेटी, आता आपल्याजवळ मागे वळून पहाण्यासाठी काहीच उरलेलं नाही .. आता आपण पुढे निघून जाऊया .. एकमेकांच्या सोबतीनं .. आणि दोघांच्याही आयुष्यात एक नवा मौसम, एक नवा ऋतू पुन्हा बहरतो .. वडील मुलीच्या नात्याने त्याचं आयुष्य आता पुन्हा बहरून जाणार असतं ..

तर असा हा मौसम चित्रपट .
शर्मिला आणि संजीव दोघांच्या अभिनयाने एका उंचीवर पोहोचलेला.. तितकीच व्याकूळता आपल्या मनात उतरवतात ती या चित्रपटातील एक से एक गाणी .. 
दिल ढुंढता है फिर वही फुरसत के रात दिन, रूके रूके से कदम रूक के बार बार चले, छडी रे छडी कैसी गले में पडी .. ही गाणी फार फार ओघवती वाटतात.. अर्थात ती तितकीच सुंदर आहेत म्हणूनही आजही लोकप्रिय आहेतच यात शंका नाही .. 
जीवनाचे ऋतू कधीच एकसारखे नसतात आणि कोणता ऋतू कोणासाठी काय घेऊन येईल हे तर कुणीच सांगू शकत नाही .. माणसाने फक्त पुढे जात रहावं आणि आपली जबाबदारी घेत आणि चांगूलपणा देत जावं हेच गुलझार या चित्रपटातून आपल्यापर्यंत पोहोचवतात.. 
जीवनाचं गूढ अगदी साधेसहजपणाने आपल्यासमोर उलगडणारे गुलझार म्हणूनच फार फार आवडून जातात ..

- मोहिनी घारपुरे - देशमुख 

(photo credit - www.alchetron.com)

गुरुवार, ३१ जानेवारी, २०१९

अपने पराए


साधारण नावावरूनच कथानक लक्षात आलं तरीही कथेची मांडणी आणि प्रत्येक पात्राचा अभिनय पहाण्यासाठी तरी हा चित्रपट नक्की पहायला हवा असं मी सांगेन. शरत् चंद्र चॅटर्जी यांच्या निष्कृती कथेवर आधारित 1980 साली आलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शक बासू चॅटर्जी तर प्रमुख कलाकार आशालता वाबगावकर, शबाना आझमी, भारती आचरेकर आणि गिरीश कर्नाड, अमोल पालेकर आणि उत्पल दत्त .. 
गंमत म्हणजे, चित्रपटाच्या शीर्षक गीतात "नई तारकाएँ" म्हणून आशालता वाबगावकर आणि भारती आचरेकर यांचा नामोल्लेख आहे.. अर्थात शबाना आझमी वयाने (कदाचित) या दोघींपेक्षा लहान असूनही चित्रपटसृष्टीत ती या दोघींना सिनीअर कलाकार म्हणून तोवर नावाजली होती. 
कथेत कोणतीही भव्यता नाही, त्यामुळेच अगदी आपल्याच घरातली ही गोष्ट आहे की काय असं चित्रपट पहाताना वाटून जातं. त्यातून एक से एक कसलेले कलाकार चित्रपटाला इतक्या उंचीवर नेऊन ठेवतात की चित्रपट पुन्हा एकदा पहाण्याची इच्छा नकळत होऊन जाते. 
तर होतं असं की उत्पल दत्त (बडे भैय्या) आणि आशालता(बडी माँ / सिद्धेश्वरी) , आणि अमोल पालेकर (चंंदर) आणि शबाना आझमी (शीला) हे आपल्या मुलाबाळांसमवेत एकत्र कुटुंबपद्धतीत सुखाने नांदत असतात. तसं तर बडे भैय्या आणि चंदर एकमेकांचे चुलत भाऊ .. पण घरात सख्ख-चुलत वगैरे विचारही कधी कोणाच्या गावी नसतो. बडे भैय्या आणि त्यांचा सख्खा लहान भाऊ (गिरीश कर्नाड (हरीश)) दोघंही व्यवसायाने वकील असतात आणि चंदर तसा काहीच कामधंदा करत नसतो. त्याचा रस गाण्यात वगैरे असतो त्यामुळे फार काळ कोणताही व्यवसाय वा नोकरी करण्याचा त्याचा पिंडच नसतो. हरीश आणि त्याची बायको नयनतारा तोवर दुसऱ्या शहरात रहात असतात पण कथेची सुरूवातच अशी होते की आता हरीश, त्याची बायको आणि मुलगा पुन्हा घरी सगळ्यांसोबत एकत्र रहायला येणार असतात. हे कुटुंब येतं तोवर शीलाने सगळ्या घरावर आपला प्रेमाचा, संस्कारांचा हक्क गाजवत आपलं वर्चस्व निर्माण केलेलं असतं. मोठी असूनही सिद्धेश्वरीला शीलाच्या गुणांचं कौतुक असतंच शिवाय तिच्या अधिपत्याखाली घर सुरळीत चाललंय हे पाहून ती त्यात समाधानी असते. शीलाही एकदम रोखठोक स्वभावाची .. जे योग्य ते योग्य आणि जे अयोग्य ते अयोग्य अशा सडेतोड स्वभावाची.. त्यामुळे घरातील लहानग्यांवर तिचा प्रभाव जास्तच असतो. घराच्या किल्ल्याही शीलाकडेच कारण ती व्यवहारात चोख असते. मोठ्यांना मान देत, सगळ्यांचा सन्मान ठेवत शीला घर उत्तम चालवत असते. एकीकडे तिच्या मनात हे देखील शल्य असतंच की आपला नवरा काहीच करत नाही त्यामुळे आपण या घरात शक्य तितकं काम करावं म्हणजे आपल्याला कोणी बोल लावणार नाही.. 
अशातच हरीश (गिरीश कर्नाड) आणि नयनतारा (भारती आचरेकर) परत येतात आणि मग सगळं चित्र पाहून  आपोआपच मनात असूया निर्माण होते. मग लहान मुलांची भांडणं, त्यावरून मोठ्या माणसांची भांडणं .. चुगल्या, रूसवे फुगवे टोकाचे वाद .. सतत सुरू होतं. इतकं टोकाला जातं की शेवटी शीला आणि चंदर गावच्या घरात रहायला निघून जातात. पण हरीश आणि नयनताराला तेही बघवत नाही .. शेवटी बायकोच्या बोलण्यात येऊन हरीश  आपल्या मोठ्या भावाला साथीला घेत चंदरवर पैसे खाल्याची केसच ठोकतो .. खरंतर मोठे भाऊ आणि सिद्धेश्वरी फार प्रेमळ असतात, चांगले असतात, नाती जपणारे असतात.. पण या दोघांच्या बोलण्यात येतात आणि एक एक करत घराचं घरपण जातं.. शेवटी सिद्धेश्वरीला शिलाच्या मुलांची आठवण यायला लागते .. स्वप्न पडायला लागतात आणि ती तिच्या नवऱ्याला एकदा गावी जाऊन चंदरची चौकशी करून यायला सांगते. तोही जातो .. आणि पहातो तर शीलाची रयाच गेलेली असते.. चंदरही कोर्टात केसच्या सुनावणीसाठी निघालेला असतो .. मुलं तापाने फणफणलेली असतात. हे सगळं पाहून काहीसा वेंधळा असलेला बडा भैय्या शीलालाच रागवायला लागतो, चंदर किती नाकारा आहे हे बोलायला लागतो .. तेव्हा शीलाच्या डोळ्यात पाणी तरळत .. प्रत्येकजण आपल्या भोळ्या नवऱ्याला बोलतात पण दुसरीकडे आमच्यावर ही वेळ कशाने आली ते कोणीच बघत नाही असं बोलून जाते ..आणि मोठ्या भावाला काय वाटतं कुणास ठाऊक तो सरळ आपली सगळी संपत्ती शीलाच्या नावावर करून मोकळा होतो.. इकडे घरी तोवर हरीश आणि नयनतारा सगळं काही गिळण्याच्या बेतात असतात आणि जेव्हा मोठ्या भावाचं हे कृत्य कळतं तेव्हा दोघंही हातावर हात चोळत रहातात. हरीश लगेचच परत दुसऱ्या शहरात जायला कुटुंबाबरोबर निघतो आणि इकडे मोठा भाऊ चंदर आणि शीलाला आपल्या घरी पुन्हा घेऊन येतो .. सगळा आनंदीआनंद होतो .. सिनेमा संपतो. 
खरंच, ज्यांना आपलं मानतो ते आपले असतात का .. आणि ज्यांना परकं समजतो ते परके असतात का .. जगाचे नियम काही वेगळेच आहेत. केवळ पैशापोटी नाती जोडणारी मंडळी ही आपल्या जवळच्या नात्यातलीही असू शकतात हे आपल्याला जाणवून देणारा हा सिनेमा, आणि परके किंवा दूरचे नातेवाईक म्हणवणारेही कधीकधी एवढं प्रेम, आत्मीयता देऊन जातात की तेच खरे जवळचे वाटतात असंच हा सिनेमा दाखवत जातो. 
हा चित्रपट एवढा सहजसाधा आहे की पहाताना आपणही त्या काळात हरवून जातो. कदाचित हे घर आपलंच तर नाही ना असा भासही क्षणभर आपल्याला झाल्याशिवाय रहात नाही. विशेष म्हणजे प्रत्येक कलाकाराचा अभिनय इतका सुंदर झालाय की त्यामुळे ती पात्र अगदी जिवंत झाल्यासारखी वाटतात. प्रेमळ सिद्धेश्वरी, भांडखोर आणि लावालाव्या करणारी नयनतारा आणि न्यायनिष्ठुर कर्तव्यदक्ष शीला या तिघी जावांनी जे काय काम केलंय ना त्यास तोड नाही. आणि तसंच काहीसे वेंधळे पण जबाबदार बडे भैय्या, काहीसा लालची हरीश आणि बेकार परंतु मनाने सच्चा चंदर हे तिघे भाऊही अतिशय हुबहू वठवले आहेत. 
एकंदरीत, गाणी वगैरे फारशी नसूनही मूळ कथाच अगदी सहजसुंदर असल्याने हा चित्रपट आपल्याला आवडल्यावाचून रहात नाही हे नक्की... 

- मोहिनी घारपुरे- देशमुख 

#मला_भावलेला_चित्रपट

(Photo credit - youtube)


शनिवार, १९ जानेवारी, २०१९

नमकीन

स्वप्न, नाती आणि वास्तव, व्यवहार यांच्यातलं अंतर जर कधी कोणाला कायमचं पुसून टाकता आलं ना .. तर त्याने ते नक्की करावं , कारण, या भूतलावर सगळ्यात जास्त आवाज असेल ना तो या मोडलेल्या स्वप्नांचा आणि तुटलेल्या नात्यांचा ..
एक अशीच चटका लावून जाणारी कथा आहे नमकीन या चित्रपटाची.. खुद्द गुलझार साहेबांच्या लेखणीतून उतरलेली कथा आणि त्यांच्या दिग्दर्शनांतर्गत बनलेला हा चित्रपट आयुष्याच्या खाणाखुणा आपल्या आत खोलखोल उमटवून गेल्याशिवाय रहात नाही. एक नाही, दोन नाही तर तब्बल चार पाच पात्रांच्या आयुष्याची गोष्ट ही कथा मांडते .. सगळे एकाच नावेचे प्रवासी तरीही प्रत्येकाच्या जीवनाची वाट वेगवेगळ्या वळणांवर वळते, बघता बघता जो तो आपापल्या वाटेने पुढे निघून जातो .. आणि आपण प्रेक्षक जागीच खिळतो .. आपले पाय जड पडतात .. ही कथा सुखाची की दुःखाची हेच मुळी आपल्याला कळेनासं होतं .. आणि शेवटी डोळ्यावरून गालावर आपल्याही नकळत ओघळलेल्या खाऱ्या पाण्याची चव नकळत आपण चाखतो तेव्हा कळतं हा चित्रपट खऱ्या अर्थाने 'नमकीन' आहे ..
गेरूलाल (संजीव कुमार) ट्रकचालक असतो. ठेकेदाराकडे कामाला असतो. एका गावात कामानिमित्ताने येतो. तो काही दिवस रहाण्यासाठी घर शोधत असतो. धनीराम एक साधारण होटलवाला गेरूलालला, जुगनी तथा अम्मा (वहीदा रेहमान) हिच्याकडे भाडेकरू म्हणून घेऊन जातो. जुगनी आणि तिच्या तिघी मुली, निमकी (शर्मिला टागोर), मिठू (शबाना आझमी) आणि चिंकी (किरण वैराले) या एका पडक्या घरात रहात असतात. घरात पुरूषमाणूस नाही.. त्यामुळे धनीरामच्या होटेलकरिता मसाले विकून आणि शेणाच्या गोवऱ्या बाजारात विकून आपला उदरनिर्वाह करत असतात. वरच्या बाजूची खोली भाड्याने देत असत पण बरेचदा भाडेकरू भाडंबिडं न देताच पसार होई असा अनुभव.. अशातच गेरूलालला धनीराम घेऊन येतो.. नुसता ओळखीवर व्यवहार ठरतो आणि गेरूलाल तिथे राहू लागतो. आपल्या तरण्याताठ्या मुलींकडे पहायचं नाही आणि वेळेवर भाडं द्यायचं या दोन अटींवर अम्मा गेरूलालला ठेऊन घेते. घरात आलेला हा अनोळखी पुरूष आणि या तिघी मुली .. त्यांना हा ' नवा प्राणी ' म्हणजे येता जाता टपली मारायला गिऱ्हाईकच (चांगल्या अर्थाने) मिळतं जणू .. सुरूवातीला खोडसाळपणे वागणाऱ्या या मुली, कटकट करणारी अम्मा आणि तरशींगरावाप्रमाणे वागणारा गेरूलाल यांचं हळूहळू एकमेकांशी नातंच तयार होतं. तो अगदी त्या कुटुंबातला होऊन जातो. गावात वेगळीच चर्चा सुरू झालेली असते, कोणी म्हणतं, हा नवा भाडेकरू तिघींपैकी एकीला जरी लग्न करून नेईल तरी अम्माचं ओझं कमी होईल.. कोणी म्हणतं, ती म्हातारी कसली नेऊ देईल एका तरी मुलीला या भाडेकरूला .. एखाद्या पक्षिणीप्रमाणे बसलीये आपल्या अंड्यांवर ..
असेच दिवस जात असतात .. मग हळूच एकेका पात्राची कथा जन्म घेत जाते.. बडबडी चिंकी, घराच्या जबाबदारीपोटी पोक्तपणा आलेली निमकी आणि अबोल असलेली मिठू यांच्या आयुष्याची रेष गेरूलालबरोबरच पुढे पुढे सरकत जाते..
इथवरचा सगळा चित्रपट अगदीच साधा पण गोड ..
मग एकदा गेरूलालची चिठ्ठी येते, ती कोणीतरी वाचल्याची शंका येऊन तो मिठ्ठूला त्याविषयी विचारणा करतो. मिठ्ठू बोलत नाही .. तेव्हा तो जोरात ओरडून विचारतो, बोलती क्यू नही.. मूँहमें जुबान नहीं है क्या आणि मिठ्ठू पळत जाते ... हमसून रडते .. नंतर निमकी गेरूलालला या वर्तनाविषयी जबाब विचारायला येते .. आणि ओघात कळतं, की मिठ्ठू मुकीच असते .. तिला लहानपणी कोणीतरी उचलून नेलेलं असतं आणि ती परत येते तेव्हा तिची वाचाच गेलेली असते... इथे आपल्याला पहिला धक्का बसतो.. आणि इथून चित्रपट एका वेगळ्याच वळणावर .. एका वेगळ्याच उंचीवर जातो. मग गेरूलालला फार वाईट वाटतं, आता तो तिचा राग काढायचा प्रयत्न करतो .. ती कविताही करते हे कळल्यावर तो त्या माध्यमातून तिचा राग काढायचा प्रयत्न करतो आणि मग पुन्हा गट्टी होते.
तोवर चिंकी, निमकी यांची गेरूशी दोस्ती झालेली असते. निमकी सगळ्यात मोठी .. तिला वाटत असतं, गेरूने मिठ्ठूशी लग्न करून टाकावं .. तर चिंकीला आणि अम्मालाही वाटत असतं गेरूने निमकीशी लग्न करावं आणि आपल्या कुटुंबाशी कायमचं जोडलं जावं.. सगळ्याच जणी आपापल्या मनातली इच्छा संधीसाधून त्याला बोलूनही दाखवतात .. वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या प्रसंगात .. खरंतर त्यालाही निमकी आवडत असते पण त्याची नोकरी फिरतीची .. त्यामुळे तो काहीसा विचारात पडलेला असतो.. तरीही एकदा तो निमकीला लग्नाचं विचारतोच .. तेव्हा ती जबाबदाऱ्यांच्या ओझ्यात आपण अडकलेलो असल्याने लग्नाचा विचारच करू शकत नाही असं सांगते आणि त्याला मिठ्ठूशी लग्न कर अस सुचवते .. पण त्याच्या मनात असं काही नसतंच मिठ्ठूविषयी .. त्यामुळे तो थांबतो..
आता पुढे काय .. हा कोणाशीतरी लग्न करतो की नाही करत या प्रश्नावर आपण प्रेक्षक रेंगाळत असतानाच पुन्हा एक महत्त्वाचं वळण कथानक घेतं. गेरूलालला नव्या ठिकाणी काँट्रॅक्टवर जायचंय असं त्याचा मालक सांगतो. क्षणभर गेरूही मनातून हलतो, त्याला तिथून जावसं वाटतचं नसतं ना मुळी .. पण शेवटी काम महत्त्वाचं .. त्यामुळे तो सामान बांधायला घेतो .. सगळ्यांनाच वाईट वाटतं. निघण्यापूर्वी गेरू चौंघींनाही काही ना काही भेट देतो .. निमकीला सांगून जातो, की मिठ्ठूला मी जी कविता करण्यासाठी वही दिलीये त्यात पत्ता दिलाय माझा नवा .. तुला वाटेल तेव्हा, गरज लागेल तेव्हा मला या पत्त्यावर संपर्क कर .. आणि तो निघतो .. पुढच्या मुक्कामाला निघून जातो ..
इकडे जुगनीच्या परिवाराला गेरूच्या निमित्ताने लागलेला आशेचा अंकूर त्या क्षणी मरून गेलेला असतो आणि होतंही तसंच ..
जुगनी म्हणजे अम्मा पूर्वी एका नौटंकीत नाचत असते . अशात तिचं नौटकीतला सारंगीवाला किशनलाल याच्यावर प्रेम जडतं आणि ते लग्न करतात. जुगनीला घर संसार मुलं हवी असतात आणि किशनलाल तिला ते सगळं देतोही पण तो स्वतः एक अय्याश माणूस असल्याने केव्हाच कुटूंबाला, घरादाराला तिलांजली देऊन नाटकाच्या दुनियेत बुडून जातो. जुगूनी म्हातारी होत जाते आणि तिघी मुली वयात येत जातात तेव्हा अधूनमधून किशनलालची पावलं घराकडे घुटमळत जातात, आता त्याला मुलींना नौटंकीत नाचवायचं असतं ना .. एकदिवशी लहानग्या मिठ्ठूला तोच तर उचलून नेतो .. तिच्यावर अत्याचार करतो आणि परत आणून सोडतो .. याच धक्क्याने खरंतर तिची वाचा जाते, कायमची ..
मग एकदा गेरूच्या तिथल्या वास्तव्याच्या काळात रात्री धारदार सुरा घेऊन हा म्हाताऱ्या किशनलाल जुगनी आहे का अशी विचारणा करत घरात घुसण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा गेरू त्याला अडवतो, इथे कोणी जुगूनी बिगनी रहात नाही चल निघ असं म्हणून हाकलून देतो .. कारण गेरूला स्वतःलाच जुगनीची म्हणजे अम्माची ही पार्श्वभूमी माहीत नसते.
मग एकदा कधीतरी गावात नौटंकीवाले येतात तेव्हा अम्मा पिसाटल्यासारखी धावत घरी येते .. तिघी मुलींना खोलीत डांबते आणि स्वतः पहारा देत रात्रभर बाहेर बसून रहाते .. तेव्हा गेरूलाल तिला याबद्दल विचारतो आणि तिची ही कहाणी ऐकून सुन्न होतो..
अशा या एकाकी पडलेल्या कुटुंबाचा आधार झालेला गेरू सोडून गेल्यावर काय होणार ना .. जे व्हायचं तेच होतं..
तीन वर्षांनंतर गेरू जेव्हा नौटंकी पहायला जातो तेव्हा समोर नाचणारी मुलगी म्हणजे अम्माची चिंकी आहे हे पाहतो आणि त्याची पायाखालची जमीन हादरते.. तो ताबडतोब तिची भेट घेतो. तिला खडसावतो, अम्मानी नौटंकीत यायचं नाही बजावलं होतं ना तरीही तू का आलीस ... आणि ती आता एक अवखळ मुलगी राहिलेली नसते.. तिने विचारपूर्वक हा निर्णय घेतलेला असतो .. कारण तिला जगायचं असतं.. मनासारखं .. ती म्हणते, आईनी आम्हाला जगूच दिलं नाही, ना ती स्वतः जगली, ना आम्हाला जगू दिलं.. जेव्हापासून समजायला लागलं तेव्हापासून लोकांची खोटी सहानुभूतीच तर मिळतेय फक्त .. आम्ही सगळ्याजणी एकमेकींसाठी कुर्बानीच तर देत बसलो जन्मभर .. जगलो कोणीच नाही .. मला मरायचं नव्हतं निमकीसारखं म्हणून मी तिथून पळून आले.. आणि तू, तू तरी काय केलंस आमच्यासाठी .. मी धीटाईने तुला तेव्हा म्हटलं होतं निमकीशी लग्न कर पण तू तूही खोटी सहानुभूती दाखवून निघून गेलास आमच्या आयुष्यातून .. तेवढ्यात तिचा बाप किशनलालला तिथे पाहून गेरूला फार राग येतो, वाईट वाटतं पण त्याच्या हातात काहीच उरलेलं नसतं. किशनलाल विचारतो, तूच होतास ना त्या रात्री .. आता जुगुनीला भेटशील का पुन्हा .. भेटलास तर सांग, आयुष्यात सुखी तीही नाही झाली, मीही नाही झालो .. पण काय करणार आयुष्य ज्या वाटेनं नेतं त्या वाटेनंच पुढे जगत जावं लागतं ..
आता गेरूच्या डोळ्यासमोर सगळा भूतकाळ झरझर निघून जातो. तो तत्क्षणी जुगूनीच्या गावाला जातो. तिच्या घरी जातो आणि बघतो तर काय त्या पडक्या घरात एकाकी उरलेली निमकी .. ती त्याला बघताच तिचा बांध फुटतो .. ती ढसाढसा रडते .. गेरूलाल तुला मी आज जाऊ देणार नाही असं हक्कानी सांगते आणि सतत तिचे डोळे भरून येतात.
तीन वर्षात तिची रयाच गेलेली असते .. कारण घडलंही तसंच असतं सगळं.. ती सांगते, तुझ्या जाण्यानंतर चार पाच महिन्यातच मिठ्ठू वेडी झाली.. त्या वेडातच उंच कड्यावरून कोसळून मरण पावली. कळलंच नाही ..हे सगळं कसं झालं .. तिच्या जाण्यानंतर अम्मानही अंथरूण धरलं .. बघता बघता कधीतरी तिचीही प्राणज्योत विझली .. चिंकीही घरातून पळून गेली ..जाता जाता चिठ्ठी लिहून गेली, मी तुम्हा तिघींसारखी वेडी होऊन मरू इच्छीत नाही .. माझा शोध घेऊ नका .. मी शेवटपर्यंत अम्माला सांगूच शकले नाही की चिंकी निघून गेली..
आता गेरूला भरून येतं.. तो म्हणतो, निमकी त्या दिवशी तू म्हणाली होतीस मी या सगळ्यांना सोडून येऊ शकत नाही आणि बघता बघता सगळ्याजणी तुला सोडून गेल्या.. आता तू एकटीच उरलीस .. आता तू माझ्याबरोबर चल ..
तरीही, तिला भाबडी आशा वाटते, की मी येते पण चिंकी परत आली तर .. तेव्हा गेरू सांगतो, मी तिला भेटलोय आणि ती जिथेकुठे आहे तिथे आनंदात आहे .. ती आता कधीच परत येणार नाही ..
आणि अखेरीस गेरूलाल आणि निमकी त्यांच्या जीवनाच्या पुढल्या वळणावर निघतात ..
चित्रपट संपतो .. आणि आपण नमकीन चित्रपटाने पाणावलेल्या आपल्या डोळ्यातून गालावर ओघळलेल्या खाऱ्या पाण्याची चव जीभेवर चाखूनच निघतो..
आयुष्याचं गणित गुलझार नावाच्या या माणसाला जे कळलंय ना ते केवळ आहाहा ..
इतकी साधी सुंदर कथा, किती साधी सुंदर मांडणी .. आणि तरीही किती आशयपूर्ण ..
या चित्रपटातलं सर्वात सुंदर गाणं म्हणजे .. फिरसे आईयो बदरा बिदेसी तेरे पंखोंपे मोती जडूंगी .. पहाडी धुक्यातून शबानाच्या मिठास अभिनयाचा आस्वाद घेत आपण गाणं पहात रमतो आणि अशा पहाडातून आशाताईंचा एक निर्व्याज स्वच्छ सूर त्या पहाडीतून घुमत घोंगावर आपल्या कानातून मनात पोचतो तेव्हा अत्यानंदाची लकेर शरीरातून घुमत जाते.
तसंच दुसरं गाणं राहपे रेहते है, यादोंपे बसर करते है, खुश रहो एहेदे वतन हम तो सफर करते है ऐकताना आपल्याही जीवनातील अशी अवघड एकाकी वळणं क्षणभर आपल्या डोळ्यासमोर तरळून जातात.
आंकी चली बाकी चली गाणं होईपर्यंतही आपल्याला कळत नाही की ती मिठ्ठू मुकी आहे .. आणि नंतर ज्या क्षणी कळतं तेव्हा आपल्याला चित्रपट मागे फिरून पहावासा वाटतो .. पुन्हा एकदा .. आणि वाटतं, अरे खरंच आपल्याला कसं लक्षात आलं नाही एवढा वेळ की ती मिठ्ठू (शबाना आझमी) मुकी आहे म्हणून ..
संजीव कुमारनं रंगवलेला गेरूलाल, किरण वैरालेनी रंगवलेली रंगवलेली चिंकी आणि वहीदा रेहमान यांनी रंगवलेली जुगनी तर अप्रतिमच .. अगदी तस्सच शबाना आणि शर्मिला यांचेही अभिनय तोडीसतोड ..
आपल्याला आयुष्यात भेटलेली ही सगळी पात्र आणि हा चित्रपट या सगळ्या बारकाव्यांमुळे आपल्या लक्षात राहून जातो तो कायमचाच ..
आणि गुलझार साहेब ..
त्यांच्या लेखणीला, प्रतिभेला आपण प्रेक्षक शतशः प्रणाम करून निघतो पुन्हा .. आपल्या नमकीन आयुष्याची कथा आपली आपण पुढे लिहायला .. पूर्ण करायला ..


- मोहिनी घारपुरे देशमुख



 

(Photo credit - youtube)

शुक्रवार, ४ जानेवारी, २०१९

घर


एक सुंदरसं घर आपलं स्वतःचंही असावं असं स्वप्न घेऊन प्रत्येक माणूस जगतो. घर विकत घेण्याचं स्वप्नं लग्नानंतर तरी अनेकांचं पूर्ण होतं. पण खरं सांगू, घर म्हणजे नुसत्या भिंती आणि मालकी हक्काची आपली खाजगी जागा नव्हे, तर त्यातील माणसांचं एकमेकांवर असलेलं प्रेम आणि बिकट प्रसंगात एकमेकांना दिली जाणारी घट्टमुट्ट साथ यावरच खरं घर उभं रहात असतं.
1978 साली रेखा, विनोद मेहरा यांच्या जोडीने अजरामर केलेला घर हा हिंदी चित्रपट सुपरहिट ठरला तो अनेक कारणांनी ...
मुळात त्या काळात अशी कथा चित्रपटाच्या माध्यमातून मांडणं हेच फार प्रबोधनात्मक होतं.. पण तरीही मूळ आशयाला धक्का न देता आणि चित्रपट प्रेक्षकांना प्रबोधनात्मक वगैरे न वाटता, विचार करण्यास प्रवृत्त करेल अशा पद्धतीने दिग्दर्शक माणिक चॅटर्जी यांनी मांडला आहे.
भौतिक सुखं माणसाला नेहमीच हवीहवीशी वाटतात, त्यातलं महत्त्वाचं सुख म्हणजे हक्काचा निवारा .. हा निवारा मिळेपर्यंत आयुष्यही आपल्या गतीनी सुरू असतं. आणि मग, या वेगात, आयुष्याच्या वळणावर सगळेच सुखद प्रसंग येतील हे माणूस गृहीत धरूनच पुढे पुढे जातो.. पण कधीतरी, एखाद्याच्या नशिबी काही निराळंच लिहून ठेवलेलं असतं.
अशीच कथा आरती (रेखा) आणि विकास चंदरा (विनोद मेहरा) या नवविवाहित जोडप्याची ..
दोघंही सुशिक्षित, चांगल्या घरातले..
विकासचं वडिलांशी पटत नसतं, अशातच आरतीच्या तो प्रेमात पडतो.. वडिलांना हा विवाह मान्य नसतो म्हणून विकास घर सोडून जातो. आरतीशी नोंदणी पद्धतीने विवाह करतो.. या साऱ्यात त्याचे ऑफीसचे सहकारी, बॉस त्याच्या पाठीशी असतात.
स्वाभिमानी विकासकडे लग्नानंतर रहायला घर नसतं तेव्हा थोडे दिवस त्याची सोय त्याच्या ऑफीसचे बॉस स्वतः परगावी जाणार असल्याने त्यांच्या बंगल्यावर करतात. मग ते परत आल्यावर विकास आरतीला भाड्याचं घर मिळेपर्यंत काही दिवस माहेरी सोडतो आणि स्वतः एका होस्टेलवर रहातो. पण नवविवाहित असल्याने एकमेकांची ओढ वाटणं तर स्वाभाविकच.. एकदा तो न रहावून आरतीचं मन वळवून तिला एका हॉटेलच्या रूमवर नेतो. नवरा बायको असूनही केवळ स्वतःचं घर नाही म्हणून औट घटकेच्या या रूममध्ये जायला आरती, तिच्या मनाविरूद्ध तयार होते.. पण हाय रे .. या हॉटेलमध्ये पोलिसांची धाड पडते आणि दोघांना पोलिस पकडून नेतात. आम्ही नवराबायको आहोत हे सांगूनही पोलिस विश्वास ठेवत नाहीत तेव्हा विकास आपल्या बॉसना बोलावतो आणि शेवटी दोघांची सुटका होते.
कदाचित पुढे घडणाऱ्या घटनेची चाहूलच या प्रसंगातून दिग्दर्शकाने दिली असावी..
कारण, या घटनेनंतर काहीच दिवसात त्यांना एक भाड्याचं घर मिळतं. नव्यानवलाईचे दिवस आयुष्यात आनंद पसरत असतात. अशातच एकदा विकास आरतीबरोबर लेट नाईट मूव्हीला जाण्याचा प्लॅन ठरवतो. तो ऑफीसमधून परस्पर थिएटरमध्ये येईल आणि आरती टॅक्सीने तिथे नियत वेळेत पोहोचेल असं ठरतं. दोघंही पोहोचतात, पिक्चर संपेस्तोर फार उशीर झालेला असतो .. घरी परतण्यासाठी दोघंही टॅक्सी शोधत असतात पण मिळत नसते. आणि अशातच तो भयंकर प्रसंग घडतो..
एका टॅक्सीतून चार गुंड, दारूडे तिथूनच जात असतात, त्यांची नजर या दोघांवर पडते आणि हाय रे ..पुढे गेलेली टॅक्सी पुन्हा मागे वळते आणि आरतीवर चौघेजण पाशवी बलात्कार करतात.. विकासवर हल्ला करतात आणि तो बेशुद्ध होतो ..
जे व्हायचं ते घडतं आणि भयंकर वळणावर आयुष्य येऊन थांबतं. आता दवाखान्यात आरतीवर उपचार सुरू होतात.. विकासलाही वैद्यकीय मदत मिळते आणि तो लवकर भानावर येतो. आरती शुद्धीवर येते खरी पण तिची जगण्याची इच्छाच मरून गेलेली असते. ती दोनदा आत्महत्येचा प्रयत्न करते पण कोणी ना कोणी तिला वेळीच थांबवतं. इकडे विकास अस्वस्थ असतो.. लोकांच्या नजरा त्याला घायाळ करत असतात, लोकांचे वाईटसाईट शब्दबाण तो रोजच झेलत असतो .. एव्हाना एवढ्या मोठ्या घटनेची न्यूज झालेली असते .. पोलीस, कोर्ट, न्यूजपेपर आणि लोक या सगळ्यांशी विकास एकटा झुंजत असतो. मधल्या काळात तर बिचारा चक्क दारूचे गुत्ते शोधत ते चौघं गुंड कुठे सापडले तर चांगला धडा शिकवू अशा हेतूने शहरभर वेड्यासारखा फिरतो आणि शेवटी एका ठिकाणी, आपण अशा दुष्ट शक्तींशी दोन हात करण्यास असमर्थ आहोत हे एका घटनेनंतर स्वीकारून काहीसा अपयशी मनोवस्थेत घरी परततो.. आणि इकडे आरती, ती आपल्या मनाशी, तिच्या घायाळ शरीराशी लढाई लढत असते.
विकासला ती हवी असते .. पण तिची स्वप्रतिमा डागाळलेली असते. अशा मनोवस्थेत ती घरी येते .. तो तिची वाट पहात असतो.. किंबहुना तो तिला दवाखान्यातून घरी आणण्यासाठी जाणार असतो पण डॉक्टर तिला अँब्युलन्सनी घरी पाठवून देतात. ती दारात उभी पाहून तो खूश होतो .. तुम आ गयी हो तो घर लग रहा है असं तो म्हणतो .. नंतर अनेक दिवस तो तिला अधिक प्रेम देण्याचा प्रयत्न करतो. पण इथे ती चुकते.. तिला त्याच्या प्रेमात आता सहानुभूती दिसते .. आणि एका क्षणी ती त्याला म्हणते, मला सहानुभूती नकोय .. तुझं प्रेम खोटं आहे .. तो सांगायचा प्रयत्न करतो, अगं जे काही झालं ते फार वाईट झालं पण ती घटना घडून गेली, आता पुढे जायला हवं .. आपण दोघांनी .. तुझ्याइतकंच मीही या घटनेत पोळलो आहे गं .. पण तिला त्याचं दुःख समजण्यापेक्षा त्या क्षणी स्वतःचाच विचार योग्य वाटतो..
ती निघून जाते .. जाता जाता आठवणीने तिच्याजवळची घराची चावी घरात ठेऊन देते .. तो आता ठाम होतो .. जा तुला कुठे जायचं तिथे .. मी अडवणार नाही तुला ..असं म्हणून हा व्याकूळ क्षण सावरत तिथेच बसलेला असतो .. त्याची इच्छा नसते तिला जाऊ द्यावं पण आता तिचं तिला उमगेल अशी त्याची अपेक्षा असते .. तो म्हणून थांबतो, वाट पहातो .. पण ती जाते .. ती घरातून तिचं सामान घेऊन निघून जाते ..
ती गेल्यावर हा सैरभैर होतो ..अवघ्या काही क्षणात तिला परत आणण्यासाठी धावत सुटतो .. ती दिसत नाही .. पण त्याला अंदाज असतो .. तो रेल्वेस्टेशन गाठतो.. रेल्वे नुकतीच फलाटावरून निघालेली असते .. तो धावतो, रेल्वेचा पाठलाग करतो पण .. गाडी सुटते .. निघून जाते ..आता त्याच्या डोळ्यात पाणी तरळते .. तो वळतो.. गर्दीकडे बघतो आणि एका कोपऱ्यात आरती दिसते .. नजरानजर होते आणि दोघंही एकमेकांकडे धावतात ..
पिक्चर संपतो ..
आणि जाता जाता आपल्या मनात अनेक भावनांची गर्दी लोटते. घर म्हणजे काय हो.. तर जिथे नवरा बायकोच्या नात्यात एवढी खोली आहे, एवढं प्रेम आहे आणि नात्याची वीण एवढी भक्कम आहे की एकमेकांवर काहीही प्रसंग गुदरला तरीही साथ सुटत नाही ते घर ..
आणि नवरा बायकोचं नातं ..? आणि त्याहीपेक्षा नवरा ? तो तर किती समंजस, किती प्रेमळ आणि किती मोठ्या मनाचा..
केवळ शरीर म्हणजे स्त्री नाही हे ज्याला समजतं, ज्याला बायको म्हणजे उपभोगाची वस्तू वाटत नाही तर सहचरिणी वाटते, ज्याला तिचं मन हवंय असा असतो खरा नवरा.. जो तिची साथ सोडत नाही .. कदापि ..
अशा सर्व कंगोऱ्यांनी विनोद मेहरांनी रंगवलेला विकास हा इतका चपखल ठरलाय की तो आपल्याला आवडल्यावाचून रहात नाही. रेखाजींचा अभिनय, साधेपणा आणि सौंदर्य हे सगळं या चित्रपटातही उजवच आहे.
चित्रपटातली मधाळ गाणी तर अजरामर आहेतच.. आजकल पाव जमीं पर नही पडते मेरे, आप की आखोंमे कुछ, तेरे बिना जिया जाएना ही सगळी गाणी चित्रपट गुंफत जातात.
मला सगळ्यात सरप्राईजिंग वाटलेलं एक गाण म्हणजे, फिर वही रात है .. कारण आजवर हे गाण इतक्या वेगळ्या मूडच वाटत होतं पण प्रत्यक्षात, आरती दवाखान्यातून जेव्हा घरी येते तेव्हा रात्री विकास हे गाणं म्हणतो असं चित्रपटात दाखवलंय .. फिर वही रात है, फिर वही रात है ख्वाबकी, रातभर ख्वाबमें देखा करेंगे तुम्हे ..
हे गाणं अशा संदर्भाने असेल असा विचारही मी यापूर्वी केला नव्हता त्यामुळे हे गाणं लागलं तेव्हा मी चमकले.. तो विकास खरंच किती किती गोड म्हणायचा ना ..
तर असा हा चित्रपट .. एक वेगळीच कथा सशक्तपणे मांडणारा आणि आपल्याकडील अनेक नवऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारा ..
तुम्हीही वेळ काढून कधीतरी नक्की पहा ..


- मोहिनी घारपुरे-देशमुख


#मला_भावलेला_चित्रपट









(Photo credit - youtube)

Translate

Featured Post

अमलताश