बुधवार, १ डिसेंबर, २०२१

फरसाण मिनीसमोसा

 समोसा आवडत नाही असा माणूस दुर्मिळच.

समोशाची भाजी आणि समोशाची पारी या दोन्हीही गोष्टी इतक्या चविष्ट की समोसे खाणारी मंडळी त्यावर अक्षरशः तुटून पडतात. 

तिकडे नाशिकला समोशांबरोबर चिंचेची गोड चटणी किंवा पुदीन्याची हिरवी चटणी मिळते, आणि इकडे विदर्भात तर समोसे चक्क कढीबरोबर आणि चनारश्शाबरोबर खाल्ले जातात. पहिल्यांदा जेव्हा मला हे कळलं तेव्हा खाद्यिकधक्का ( मानसिक पातळीवर विचित्र पदार्थ ऐकल्यावर बसलेला धक्का म्हणून खाद्यिकधक्का ) बसला होता. कढीबरोबर समोसे ऐकल्यावरच मला कसंतरी झालं होतं.. पण प्रत्यक्षात खाताना फारसं विचित्र वाटलं नाही ते एक बरं झालं, त्यामुळे विदर्भवासी मित्रमैत्रिणी मला मिळाली.. अन्यथा ती मंडळीही जीवनात कधी आलीच नसती. 

तर समोसे म्हणजे बटाट्याची भाजी आणि खुसखुशीत पारी एवढंच काय ते समीकरण, पण त्यावर जेव्हा कांदा, कोथिंबिर, हिरवी आणि चिंचेची चटणी आणि दही घालून तो समोर येतो, वर भुरभुरवलेली बारीक शेव तेव्हा लक्षात येतं की दहीसमोसा, किंवा समोसाचाट हा एक अफलातून प्रकार आहे. त्यात कहर म्हणजे जेव्हा त्यावर विदर्भातला थोडासा चनारस्सा गरमागरम घातला की मग तर त्याची चव आहाहाच लागते. 

या समोशांनी अक्षरशः मनं जिंकली आहेत आपली.. म्हणूनच घरी समोसे करण्याचा खटाटोप करता करता मी तेही बऱ्यापैकी उत्तम बनवू लागले याचं मला कोण कौतुक.

पण एवढ्याशावर थांबेल ती मी कुठली... मला व्हेरीएशन करायला आवडतात, नावीन्यपूर्ण कृती करून पहायला फारच आवडतात मग भले त्या पहिल्या फटक्यात नाही जमल्या तरीही आवडतात. तसंच या समोशांनी जेव्हा मन भरलं तेव्हा मी समोशांच्या अन्य प्रकारांकडे वळले.. त्यातले दोन मला आवडलेले प्रकार म्हणजे, 

फरसाण समोसा आणि

खव्याचा समोसा 

तर आज या दोन्हीही पाककृती खास माझ्या ब्लॉगच्या वाचकांसाठी येथे देत आहे करून पहा आणि नक्की मला कळवा. - 

1. फरसाण समोसा 

चटपटीत असा मिनी समोसा.. हा स्टोअर करूनही ठेऊ शकतो. 

कृती - 

गरम तेलाचं मोहन घालून मैदा भिजवा, चवीला मीठ आणि ओवा हातावर कुस्करून घाला आणि मग हा गोळा तेल चोपडून थोडावेळासाठी बाजूला ठेऊन द्या. 

सारण (स्टफींग) - 

घरात जर हलदीरामची आलू भुजीया असेल तर ती घ्या वाटीभर. ती नसेल तर जेही फरसाण असेल ते घ्या. आता ते मिक्सरमधून बारीक करून घ्या. त्यात चिंच गुळ किंवा आमचूर पावडर, धणेजिरे पावडर, तिखट चवीनुसार घाला आणि साखर घाला.. आंबट गोड आणि चटपटी चव आली पाहिजे सारणाला त्यानुसार घाला. 

आता आधी पुरीसारखी लाटी करून ती छान गोल पुरीच्या आकारात पातळ लाटून घ्या. मग सुरीने मधोमध कापून दोन भाग करा. आता एक भाग उचलून त्याला कोनच्या आकारात मुडपून घ्या. मुडपताना कडेला थोडंस पाणी लावा म्हणजे पारी नीट चिकटेल. आता त्यात सारण भरा. खालून समोशाच्या फोल्डप्रमाणे आडवा फोल्ड करून समोसे तयार करा. आणि मग हे समोसे मध्यम आचेवर (हाय टू मीडियम) तळा. गरमागरम फरसाण समोसे चवीला तर छानच लागतात. खुसखुशीतही असतात आणि टिकाऊपण असतात, त्यामुळे बरणीत भरून ठेवा आणि पुरवून पुरवून खा. 

2. खवा समोसा 

आता याच पद्धतीने खवा समोसा किंवा ड्रायफ्रुट समोसाही बनवता येतो. त्यासाठी खव्यात साखर व वेलची मिसळून आणि आवडीनुसार ड्रायफ्रुट्स घालून सारण बनवून घ्या आणि समोशाच्या पारीत ते सारण भरून गोड गोड खवा समोसे तयार करा. हे समोसेही साधारण एक दोन दिवस टिकतात. तसेच चवीलाही मस्त लागतात. 

(सोबत मी नुकत्याच केलेल्या या दोन्ही सामोशांचे फोटो जोडत आहे..) 

#MyKitchenKey







बुचाचं झाड ..

 बुचाचं झाड ..
घराच्या रस्त्यावर होतं .. 
ती फुलं तुडवत जाताना अगदी वाईट वाटायचं.. पण रस्त्याच्या कडेकडेने वाट काढत येणंच तेव्हा योग्य होतं. मग त्यातल्या त्यात चार पाच टप्पोरी फुलं वेचून आणायची नि घरी आल्यावर आईला द्यायची.
सुंदर दिवस होते ते..
आता आपण तसे नाही.. आता आपण तिथे रहात नाही.. त्या रस्त्यावर गेलं की ते झाडं मात्र तिथेच उभं दिसतं.. तसंच बहरलेलं .. तसंच डोलत दिसतं.. मग मनाला जरासं बरं वाटतं..
आता शहर वेगळं.. रस्ते वेगळे.. ओळखीच्या खाणाखुणाही नव्याने निर्माण झालेल्या.. त्यांना भूतकाळाचा गंध नाही, आपल्या माणसांचा त्यात स्पर्श नाही.. आपण एकाकी असल्याच्या जाणीवा इथल्या खाणाखुणा देत रहातात. ओळखीच्या खुणेपाशी भेटायला बोलवावं असे मित्रमैत्रिणी इथे नाहीत.. इथे कुणीच आपली ओळख सांगत नाही.
इथल्या रस्त्यांवरच्या खाणाखुणा आता कुठे अंगवळणी पडायला लागल्या.. सुरुवातीला तर केवळ घराची वाट चुकू नये याकरिता त्यांची ओळख ठेवायचे मी .. तितकीच त्यांची ओळख.. नि तितकीच त्यांची सोबत ..
आपण रस्ता चुकलो .. हरवलो .. तर इथे परक्या शहरात कोण येईल आपल्याला शोधत ओळखीच्या खुणांनी .. कोणीच नाही.. तरीही आपल्याला घर आहे म्हणून जबाबदारीचं भान आहे.. रस्ता चुकायची आपल्याला मुभा नाही, म्हणून घरी न चुकता परतायचं.
रस्ते .. हे रस्तेही मोठे आठवणीत रहातात..
मला तर अगदी तेही दिवस आठवतात, जेव्हा आईनं एकटीला घराबाहेर जाऊ द्यायला सुरुवात केली होती.. तेव्हाही असंच वाटायचं मला, की समजा घराबाहेर गेलो आणि घराचा रस्ताच सापडला नाही आपल्याला तर ..
आता मात्र असंच वाटतं की रस्ता तर सापडेल पण वाट पहाणारं कुणीच घरी नसेल ..
तरीही पावलं, नव्या नव्या ओळखीच्या खाणाखुणा शोधत रहातात नि पुढे पुढे जात रहातात.. जीवनाची वाट तुडवत रहातात.. कधी सोबत घेऊन कोणाची तर कधी एकट्यानेच समर्थपणे पुढे पुढे जात रहातात.
आणि .. या सगळ्या रस्त्यात नव्या नव्या ओळखीच्या खुणा तयार करत जातात, सोबत घेऊन त्यांना आपली पावलं चालत रहातात..
शेवटाकडे येताना आपली पावलं .. आपली ओळख निर्माण करत जातात. तेव्हा ओळखीच्या खाणाखुणांनाही आपला अभिमान वाटत रहातो .. आपल्याशी त्यांची फार जुनी ओळख असल्याचा ..

- मोहिनी घारपुरे-देशमुख




शनिवार, २७ नोव्हेंबर, २०२१

'या जीवनाचं काय करायचं ?' या प्रश्नाच्या उत्तरासाठी वाचा हे पुस्तक .. (#Saturday_bookclub)

या जीवनाचा अर्थ काय, या जीवनाचं नेमकं काय करायचं, आपल्याला या जीवनात काय करायचंय हा प्रश्न अनेकदा जवळपास प्रत्येक व्यक्तीला पडतो याच प्रश्नाचं उत्तर दिलंय, लेखक व्हिक्टर फ्रँकल यांनी आपल्या मॅन्स सर्च फॉर मीनींग (Man's search for meaning) या पुस्तकात..

लेखक व्हिक्टर फ्रॅंकल यांना दुसऱ्या विश्वयुद्धाच्या वेळी हिटलरने छळछावणीत टाकले. अत्यंत बिकट परिस्थितीतील या दिवसांमध्ये लेखक व्हिक्टर तेथे कुटुंबापासून दूर एकाकीच होते.या दिवसात खरंतर लेखक आपल्या भवताली असलेल्या अन्य कैद्यांच्या जीवनापासून खूप काही शिकले, तसंच जीवनाचा काय अर्थ आहे या एका प्रश्नाचं उत्तर त्यांनी शोधायला सुरुवात केली ती तिथूनच..

अनेकांना वाटत असेल की जीवनाचं काय करायचं वगैरे प्रश्नांची उत्तर शोधून काय फायदा .. कशाला एवढे मोठे विचार करायचे मात्र याचसाठी 'Giveup-itis' नावाची संकल्पना लेखकाने पुस्तकात स्पष्ट केलेली आहे.

'Giveup-itis' -

हिटलरच्या छळछावणीत असताना इतर कैद्यांकडे पाहूनच त्यापैकी कोणता कैदी आता लवकरच मरणार आहे हे इतर कैद्यांना मनोमनीच कळू लागत असे. याचं कारण, ज्या कैद्याचं मरण जवळ आलेलं असे तो आपोआपच इतरांपेक्षा आजारी, हतबल, अधिक चिंताक्रांत आणि उदास असा दिसू लागत असे, इतकंच नव्हे तर त्याच्या तोंडी भाषाही हतबलतेची, नैराश्यपूर्ण अशी यायला लागत असे. अशा कैद्यांसाठी स्वतःच्या जीवनाचा अर्थ शोधणं हे एक असाध्य कोडंच होतं जणू ! आणि हीच गोष्ट लेखकाच्या लक्षात आली. एकदा का तुम्हाला तुमचं जीवन जगण्याचं कारण समजलं तर तुम्ही हजारो संकटही छातीवर झेलायला सज्ज असता, पण जर तुमच्याकडे या why चं उत्तर नसेल तर मग तुम्हाला how हा प्रश्नच पडत नाही. आणि म्हणून तुमचं जीवन निरर्थक होत जातं आणि सरतेशेवटी अशा निरर्थक जीवनामुळेच तुमचं मन निराश होत जातं.

लेखकाने सर्वात महत्त्वाची गोष्ट या पुस्तकात सांगितली आहे ती अशी, की या जीवनाला स्वतः काहीच अर्थ नसतो, तर तो अर्थ देण्याचं कामंच तुम्हाला करायचं असतं.. जीवनाचा अर्थ काय आहे हे आपल्याला स्वतःलाच ठरवायचं असतं.

व्हिक्टर फ्रँकल सांगतात, आपण कोणत्याही सिच्युएशनमध्ये असलो तरीही आपण एकच गोष्ट कायम नियंत्रणात ठेऊ शकतो ती म्हणजे आपला एटीट्यूड.. अनेक लोक खरंतर खूप चांगलं जीवन जगत असतात पण ते नेहमीच उदास, दुःखी असतात आणि दुसरीकडे लेखकासारखे सकारात्मक लोक .. जे छळछावणीत असूनही सुखी रहाण्याचा सकारात्मक रहाण्याचा प्रयत्न करत असतात.

मग आता प्रश्न एकच उरतो तो म्हणजे आयुष्याला अर्थ देण्याचं काम कसं करायचं..हा अर्थ कसा द्यायचा आणि मुळात तो आपापला अर्थ कसा शोधायचा ?

हा अर्थ शोधण्यासाठी या तीन गोष्टी लेखक सांगतात -

1. काम

तुमच्याकडे जेव्हा तुमचं काम असेल तेव्हा त्या कामातून तुम्ही तुमच्या आयुष्याला अर्थ देऊ शकता. जेव्हा तुमच्याकडे तुमचं काम असतं तेव्हा तुमचं जीवन तुम्हाला अर्थपूर्ण वाटतं आणि तुम्ही आपोआपच अधिक उत्साहाने जीवन जगायला लागता.

2. प्रेम -

स्वार्थी प्रेम तर सगळीकडेच असतं. पण जर तुम्हाला तुमच्या जीवनाचा अर्थ मिळवायचा असेल तर तुम्ही दुसऱ्याला प्रेम द्यायला लागा. देण्यातलं प्रेम जेव्हा अनुभवाल तेव्हा तुम्हाला तुमचं जीवन अर्थपूर्ण वाटायला लागतं.

3. भोग (त्रास, छळ) -

लेखक सांगतात, ज्या क्षणी तुम्ही तुमच्या जीवनातील त्रासाला अर्थ देता त्या क्षणापासून तुमच्या जीवनाला अर्थ प्राप्त होतो. तुमच्या जीवनात तुम्ही जे भोग भोगले ते इतरांना सांगून त्यांना त्यातून संदेश दिला की तुमच्या जीवनाचा अर्थ तुम्हाला सापडतो.

एकूणातच हे पुस्तक आपल्याला सांगते की -

- जीवनाला स्वतःहून अर्थ नसतो

- हा अर्थ देण्याचं काम, आणि मुळात हा अर्थ आधी शोधण्याचं काम आपल्याला करायचं असतं.

- आणि जीवनाला अर्थ देण्याचं काम करण्यासाठी कार्य, प्रेम, आणि भोग हे तीन मार्ग आहेत. यातून तुम्हाला तुमच्या जीवनाचा अर्थ सापडेल.

धन्यवाद
- मोहिनी घारपुरे -देशमुख

टीम नेटभेट

नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स

शनिवार, १३ नोव्हेंबर, २०२१

मुगाचे आप्पे पाककृती

हा एक इतका सोपा पदार्थ आहे की अक्षरशः पाच दहा मिनीटात तयार होतो. शिवाय थंडीच्या दिवसात एवढा पौष्टिक पदार्थ गरमागरम खायला मजा येते. मी माझी रेसिपी देतेय खाली पण यातही अनेक अँडीशन्सला भरपूर स्कोप आहे .. त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीनुसार, चवीनुसार भरपूर इनग्रेडीयंट्स, भाज्या वगैरे यात अँड करू शकता !

पाककृती -

१. आख्खे मूग चार पाच तास भिजवा आणि वेळ असल्यास मोडही आणून मग वापरलेत तरीही छानच.

२. आता हे चांगले भिजलेले किंवा मोड आलेले मूग मिक्सरमध्ये घाला.

३। आता चवीनुसार त्यात मीठ, हळद, मिरची, लसूण, आलं आणि कोथिंबीर घाला

४. हे सगळं मिक्सरमधून फिरवून घ्या.. थोडंस पाणी घालून हे मिश्रण साधारण डोसाबँटर प्रमाणे जरासं सरसरीत करा.

५. आप्पेपात्रात थोडं तेल लावून मग हे बँटर घाला

६. मंद आचेवर दोन्ही बाजूने आप्पे खमंग भाजा

७. सॉस किंवा चटणीबरोबर गरमागरम खा

८. सोडा घालण्याची गरज पडत नाही.


- मोहिनी घारपुरे-देशमुख

तुम्ही माझ्या नावासह ही रेसिपी शेअर करू शकता !

मंगळवार, ९ नोव्हेंबर, २०२१

मेटाव्हर्स काय आहे ? (#Techie_Tuesday)

अलीकडेच एका सकाळी अचानक फेसबुकने घोषणा करून त्यांचं रिब्रँडींग केलं.. मार्क झुकेरबर्गने खुद्द जाहीर केलं की यापुढे फेसबुक मेटाव्हर्स नावाने ओळखलं जाईल. मग हे मेटाव्हर्स म्हणजे नक्की काय आहे.. फेसबुक आणि मेटाव्हर्समध्ये नेमका काय फरक आहे आणि काय वेगळेपण आहे..? चला जाणून घेऊया.

मेटाव्हर्स हे इंटरनेटचं भविष्य आहे. तुम्ही आठवून पहा, जेव्हा इंटरनेट आलं तेव्हा आपल्याला अविश्वसनीय वाटतील अशा अनेक गोष्टी आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनून गेल्या. विशेषतः आपलं सोशल लाईफ वेगळं झालं, तसंच व्यक्तीगत आयुष्यातही आपण सतत इंटरनेटच्या माध्यमातून एकमेकांशी कनेक्ट राहू लागलो. सुरूवातीला व्हिडीओ कॉल, चॅटींग, ऑडीओ मेसेजिंग या सगळ्याचं जितकं अप्रूप वाटायचं तितकं नंतर ते सगळं आपल्या जीवनाचा भाग बनलं, आणि आता या सगळ्याच तंत्रज्ञानाची पुढची पायरी म्हणजे मेटाव्हर्स असेल.

- हे मेटाव्हर्स कायम सुरू असेल, लाईव्ह असेल, यात कधीच पॉझ असणार नाही, तसंच कधीही ते रिसेट होणार नाही.

- डिजीटल करन्सी असेल

- आभासी दुनिया आणि वास्तव दुनिया दोन्हीकडे मेटाव्हर्स असेल असं सध्या समजतंय

- पॅरलल व्हर्चुअल वर्ल्ड असंही आपण त्याला म्हणू शकतो.

- व्हर्च्युअल रिएलिटीमध्ये तुमचे अवतार प्रत्यक्ष जगल्यासारखे जगतील. तुम्हाला हवं तसे ते दिसतील, तुम्हाला हवं तिथे फिरू शकता. जगाच्या कोपऱ्यात, केव्हाही, कुठेही व्हर्चुअल रिएलिटीमध्ये तुम्ही जाऊ शकता.

================

मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !

असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.

================

- अनेक गेमिंग कंपन्यांनी आजवर अशाप्रकारे व्हर्च्युअल रिएलिटी यापूर्वी वापरली आहे, वापरते आहे. फोर्टनाईट गेम नावाच्या कंपनीने या तंत्रज्ञानाचा आधीच बऱ्यापैकी वापर केलेला आहे.

- या मेटाव्हर्समध्ये व्हर्च्युअल करन्सी वापरली जाईल.

- इंटरऑपरेटीबिलीटी हे आणखी एक वैशिष्ट्य असेल, अर्थात तुम्हाला या जगात वावरताना सतत लॉगिन लॉगआऊट करण्याची गरज असणार नाही.

- हजारो किमी दूर असलेल्या लोकांना मेटाव्हर्समुळे एकत्र आल्याच्या आभासात वावरता येईल. यामुळे तुमचा ऑनलाईन टाईम जास्त मीनींगफुल होईल असा फेसबुकचा विश्वास आहे.

मात्र, हे सगळे असले तरीही, आजवर अनेकांनी या व्हर्चुअल पॅरेलल वर्ल्डबद्दल खूप निगेटीव्ह अंदाज बांधले आहेत. डिस्टोपिया म्हणजे ज्याचा शेवट वाईट असतो, असं या जगाबद्दल बोललं जातं, म्हणूनच फेसबुक आता पूर्ण काळजी घेऊन या जगात प्रवेश करत आहे. फेसबुकला माहित आहे की जेव्हा असं एक संपूर्ण आभासी जग उभं राहील, तेव्हा तिथे ज्याप्रमाणे सकारात्मक गोष्टी, घटना घडतील, त्याचप्रमाणे गुन्हेगारी आणि असंख्य नकारात्मक घटनाही घडू शकतात, त्यामुळेच फेसबुक आता याबाबत प्रचंड संशोधन करून काम करते आहे. त्यासाठी फेसबुक अनेक सिव्हील सोसायटी ग्रुप्सची मदतही त्यासाठी घेत आहे.

प्रचंड पैसा, वेळ, बुद्धिमत्ता खर्च करून उभं रहाणारं हे व्हर्च्युअल आभासी जग नेमकं कसं असेल याबाबत आता जनमानसात उत्सुकता लागून राहिलेली आहे हेच खरं..

धन्यवाद

- Mohinee Gharpure-Deshmukh

Social Media Marketer,
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com

सोमवार, २५ ऑक्टोबर, २०२१

चिरस्मरण ..

 आज चंदा काकाचा वाढदिवस. 

काका आज आपल्यात नाही .. पण त्याच्या स्मृती कायम माझ्याजवळ रहातील यात शंका नाही. त्याला जाऊनही आता बरीच वर्ष झाली, पण काकाचा हसतमुख देखणा चेहरा अजूनही डोळ्यासमोर तसाच्या तसा उभा रहातो. 

मी काकाविषयी का लिहीतेय .. कारण, त्याचं जीवन, आणि त्याचा संघर्ष मी डोळ्यांनी पाहिलाय. जीवनभरासाठी आलेल्या अपंगत्वामुळे तो खचला नाही, जीवनाशी झगडत राहिला.. माणसांशी नाही ! माणसांना आपलंसं केलं त्याने हसत हसत आणि जीवनाने घेतलेल्या एका अवघड वळणावरूनही तो पुढे चालत राहिला.. अथकपणे..

वाचताना अडखळला असाल ना तुम्ही ? अपंगत्व या शब्दापाशी.. ? साहजिकच आहे ते.. 

काकाची कहाणी कधी ना कधी मी लिहीणार होतेच.. लोकांपुढे मांडणार होतेच.. पण म्हणतात ना सगळ्याची वेळ ठरलेली असते.. जागा ठरलेली असते, तसंच असावं कदाचित.. काकाच्या संघर्षाची कथा आपल्यापुढे मांडण्यासाठी माझ्या ब्लॉगचीच जागा पूर्वनियोजीत असावी..

वयाच्या 18 व्या वर्षापर्यंत काका एकदम नॉर्मल होता. पुण्यात नोकरीला लागला होता, सायकलींग करायचा, दररोज छान व्यायाम करायचा. माझे वडील श्री.महेश घारपुरे हे घरातले तीन नंबरचे भाऊ आणि काकाचा नंबर चौथा.. म्हणजे धाकटा आणि सगळ्यांचा लाडका. त्यातून तो दिसायला छान. वागायला बोलायला तर ही सगळीच भावंड छानच .. चंदा काकाचा स्वभाव खेळकर, बोलका .. त्यामुळे त्याचं सगळ्यांशीच जमायचं. अशातच अठराव्या वर्षानंतर एकाएकी काकाची पायातली शक्ती कमी व्हायला लागली. त्यामुळे चालताना पाय वाकडा पडायला लागला.. आधी सगळ्यांना वाटलं की याची काहीतरी मस्तीच सुरू आहे म्हणून सगळ्यांनी गंमतीत घेतलं आणि मग वयोमानापरत्त्वे जसं त्याच्या चालण्यात फरक जाणवू लागला त्यानंतर वैद्यकीय तपासण्या केल्या आणि त्यात काकाला मस्क्यूलर डिस्ट्रॉफी नावाचा आजार झाल्याचं स्पष्ट झालं. या आजारावर अजूनही इलाज नाहीये. हा आजार तसा दुर्मिळच म्हणायचा. या आजारात स्नायूंमधली शक्ती हळूहळू क्षीण होत जाते. एकेक अवयव हळूहळू काम करेनासा होत जातो.. आणि जीवन जसं जसं पुढे सरकतं तसं तसं ते आणखीन आणखीन कठीण होत जातं, कारण, स्नायूंची शक्ती कमी कमी होत जाते..

तरीही काकानी आपलं जीवन फुलवलं. आर्टीलरी सेंटर, नाशिकमध्ये नोकरी केली. लग्न झालं.. संसार थाटला. स्नेहल काकूच्या रूपाने काळजी घेणारी सहचारिणी मिळाली आणि गौरवच्या रूपाने संसारवेलीवर फूल उमललं. दिवस पुढे पुढे सरकत होते.. आणि आजार बळावत चालला होता. आम्ही मुलं उन्हाळी सुट्टीत काकाकडे रहायला जात असू. तो बसल्या बसल्या आमच्याशी कॅरम आणि पत्ते खेळत असे.. दारावर कुल्फीवाला, बुढ्ढी के बालवाला आला की घेऊन देत असे. सिडकोतल्या घराच्या बाहेर असलेल्या ओट्यावर काकाला जरा आधार घेऊन येत बसता येत असे त्यामुळे काका तिथे बसून आम्हा मुलांचे खेळ बघी. नंतर नंतर कमरेतली शक्ती कमी झाली, हातातली शक्ती कमी झाली. त्यानंतर काकूला त्याला उठवावं, बसवावं लागे.. इतर विधींसाठीही काकूला त्याला मदत करावी लागत असे.. पण तरीही दिवस आनंदात पुढे चालले होते. जीवन फुलत होते.. एकीकडे जीवनाने एक गालबोट लावलं होतं पण तरीही जीवनाचे अनेक अन्य रंग त्याच्यासाठी उमलले होते. गौरव लहानाचा मोठा होत होता.

माझ्या वडीलांचा काकाला एकाच शहरात असल्याने आधार होता. रामाच्या नवरात्रात काका आमच्याकडे येई तेव्हा त्याला रिक्षातून उतरवून आमच्या घरी पायऱ्या चढवून आणण्याचं काम बाबा करत.. बाबांना दम्याचा त्रास, परंतु तरीही या भावंडांची इच्छाशक्ती दांडगी.. त्यामुळे एकमेकांसाठी हे भक्कम. पुढे बाबांनी आमच्या एका दारासमोर उतारच करून घेतला, ज्यावरून व्हीलचेअरवरून काकाला आत आणता येणे जरा सहज झाले.. पण खरंतर, शरीराची हालचाल फारशी नसल्याने नंतर नंतर काकाचं वजन वाढत होतं, त्यामुळे त्याच्यासाठी काहीही करणं म्हणजे दुसऱ्या माणसाच्या शक्तीची परीक्षाच असायची. सहचारिणी या नात्याने ही परीक्षा काकूने जन्मभर दिली असं म्हणायला हवं..

नंतर काकाने नवं घर घेतलं.. स्वतःच्या हिंमतीने.. तिथे स्वतःला हव्या तशा सोयी करून घेता आल्या. एक सायकल रिक्षा डिझाईन करून घेतली नि त्या रिक्षाचा एक चालक ठेवला. रोज काकाला या रिक्षात व्हिलचेअरसकट चढवण्याचं काम त्या माणसाला दिलं. मग व्हीलचेअर चढवली की सायकलरिक्षा चालवत तो माणूस काकाला ऑफीसपर्यंत नेऊन सोडे आणि पुन्हा संध्याकाळी घरी आणून सोडत असे. आम्ही मुली काकाला ऑफीसमध्ये जाऊन भेटत असू. काकाचं काम कम्प्यूटरवर असल्याने बैठं काम होतं. 

सगळं सुरळीत चालू असतानाच एकाएकी संकटाची आणखी एक मालिकाच जणू काकाच्या कुटुंबावर कोसळली. काका सायकल रिक्षाने ऑफीसला जात असताना रिक्षाचालकाचा तोल जाऊन दोघेही सायकलसकट कोसळले .. अपघात झाला आणि या अपघातात काकाच्या मांडीचं हाड मोडलं. तातडीने दवाखान्यात नेलं परंतु, काकाच्या मांडीला फ्रॅक्चर करता येणंही शक्य नव्हतं. त्या अपघाताने काकाला एका जागी खिळवून ठेवलं ते कायमचंच.. 

पूर्वी त्याच्या हालचाली मर्यादीत स्वरूपात का होईना सुरू होत्या पण नंतर काकाला या अपघाताने पायावर उभंही रहाता येणं अशक्य झालं. जीवनाची बिकट वाट पुढे आणखीनच बिकट झाली.. 

अंथरूणात बसून पुढची अनेक वर्ष त्याने काढली पण कधीही तो चिडलेला, वैतागलेला किंवा परिस्थितीवर रागावलेला असा मला दिसला नाही. केव्हाही त्याच्या घरी जावं .. चंदा काका .. चंदूडी अशी गोड गोड हाक मारावी की काका लगेच हसतमुखाने .. चला आली का मोना असं म्हणून स्वागत करायचा. निहीरा झाली तेव्हा मी आवर्जून काकाचा आणि काकूचा हा फोटो टिपून ठेवला होता जो आता या ब्लॉगसोबत जोडते आहे. या फोटोवरून काकाच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख तर होईलचं तसंच त्याची शारिरीक अवस्थाही तुम्हाला दिसेल. 

अखेरीस काकाची तब्ब्येत आणखीन खालावत गेली.. एक दोन वेळा पॅरेलिसीसचे झटके येऊन गेले, नंतर हार्टअटॅकही येऊन गेला .. पण देवकृपेने तो या सगळ्यातूनही बरा होऊन घरी परतला. डॉक्टर दरवेळी कल्पना देत की शरीराचे आतील अवयव, त्यांचेही स्नायू हळूहळू बलहीन होत जातील आणि प्रत्यक्षात ते तसं घडताना आम्ही सारी कुटुंबीय बघतच होतो. या आजारावर काहीही इलाज नसल्याने आमच्या सर्वांजवळ केवळ देवाकडे प्रार्थना करण्यावाचून काहीच नव्हतं.. तसंच सणावाराला किंवा एरवीही जेव्हा भेटावसं वाटेल तेव्हा माझे आईबाबा आणि आम्ही आवर्जून काकाकडे जात असू.. 

असं जीवन फुललं, बहरलं आणि नंतर क्षणात आमच्या हातून तो केव्हा निसटून गेला कायमचा ते कोणालाही कळलं नाही.. एके दिवशी ईश्वराचं बोलावणं आलं तेव्हाही तो घरात एकटा असतानाच.. 

या सगळ्यात खरी परीक्षा दिली ती माझ्या काकूने.. तिचा संघर्ष आज एवढी वर्ष आम्ही डोळ्याने पहात आहोत. ती एकट्याने झगडते आहे.. परिस्थितीशी दोन हात निर्धाराने करते आहे.. आम्ही सगळेच तिच्या सोबत आहोतच कायमच राहू यात शंका नाही.. पण प्रत्यक्ष ज्याच्यावर वेळ आलेली असते ती व्यक्ती खरी त्या जीवनाची योद्धा असते, आपण केवळ तिचे सहाय्यक .. 

आजही काकाच्या पश्चात माझी काकू लोकरीच्या वस्तू, क्रोशाच्या वस्तू ऑर्डरनुसार बनवून देण्याचं काम करते, कधी कुणाला ऑर्डरनुसार विविध टेस्टी खाद्यपदार्थ बनवून देते. आज काका काकूचा मुलगा, गौरव हाताशी आलेला असल्याने तो देखील स्वतः मोठ्या अपघातातून सुखरूप बचावून, प्राणावर आलं बोटावर निभावलं या म्हणीची प्रचिती घेऊन आयुष्याशी लढतो आहे.. 

कधीकधी दुसऱ्याचं दुःख केवळ पहाण्यावाचून आपण काहीच करू शकत नाही. नियतीचे क्रूर खेळ माणसाला सहजी कळत नाहीत हेच खरं.. पण तरीही आईबाबांनी काकाकाकूची साथ कधीही सोडली नाही आणि आज हा ब्लॉग लिहून, काकाची कहाणी आपल्यापुढे मांडून मीही बाबांचा आणि आईचा वसा पुढे चालवत आहे.. कारण, माझ्याकडे काकापर्यंत पोहोचण्यासाठी या शब्दफुलांच्या ओंजळीचीच श्रद्धांजली ही सर्वात अनमोल भेट असेल याची मला खात्री आहे..

चंदा काका ... तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा .. तू नसलास तरीही तुझ्या स्मृती कायम आमच्या जवळ आहेत.. 

तुझीच 

मोना



गुरुवार, ३० सप्टेंबर, २०२१

वृत्त:- धरित्री
भृंगावर्तनी समवृत्त
अक्षरे १३,मात्रा २१,प्लुत १२
u _ u _ | u _ u _ | u _ u _ | S _
लगालगा | लगालगा | लगालगा | S गा

अरे जरा करा मजा अशा क्षणां S ना
उदास का बसा उगा अशा क्षणां S ना
उद्या कसा असेल ना कुणा कळा S वे
असेल जे क्षणी तया सुखे जगा S वे ।।

कशास दुःख, काळजी कशास चिं S ता ?
सुखात छान डोलती लता बघा S ना !
तुम्ही असे सुखात गीत गात जा S वे
क्षणोक्षणी पुन्हा पुन्हा सुखे हसा S वे ।।

पुन्हा पुन्हा नवा रवी प्रकाशतो S हा
नवा शशी नभात रोज हासतो S हा
तुझीच साथ त्यास रोज लाभली S की
तुझेच जीवना पुन्हा सुखे फुला S वे

- मोहिनी घारपुरे - देशमुख






असं कुणीतरी प्रेमात पडतं
जसं कॉफीवरचं ते फ्रेशक्रीमचं फूल
फुंकरताना मन हलतं...

असं कुणीतरी प्रेमात पडतं
जसं गुलाबाच्या उमलत्या नाजूक कळीला
खुडताना बोटात रूततं...

असं कुणीतरी प्रेमात पडतं
जसं रिकामी पत्रपेटी
पहाताना मन व्याकूळ होतं ..

असं कुणीतरी प्रेमात पडतं
जसं अर्थाला अनेक अर्थ शोधताना
काहीतरी थेट कळतं ..

असं कुणीतरी प्रेमात पडतं
जसं आकाशातून झरणाऱ्या धारांना
हलकेच कुणी झेलतं...

- मोहिनी घारपुरे - देशमुख

मंगळवार, २१ सप्टेंबर, २०२१

भंगारातून सुरू केला फर्निचरचा व्यवसाय.. अन् आता कमावतो कोट्यवधी

प्रवास एका जिद्दी तरूणाचा, प्रवास एका भन्नाट कल्पनेचा !

नुकताच गणेशोत्सव झाला. अनेक ठिकाणी पर्यावरणपूरक आरास किंवा घरातील टाकाऊ वस्तूंपासून छान काहीतरी वस्तू बनवण्यात आल्या असतील. सणावाराला किंवा फार फार तर छंद म्हणून आपण आपल्या घरातील अशा टाकाऊ वस्तूंपासून काहीतरी टिकाऊ, सुंदर वस्तू बनवतो आणि तेवढ्यावरच आपला प्रवास थांबतो, पण जर तुम्हाला कोणी सांगितलं की अक्षरशः या भंगारमधील वस्तुंचाच वापर करून एका जिद्दी तरूणाने आपला स्टार्टअप बिझनेस सुरू केला आणि आता या स्टार्टअपची चक्क कोट्यवधींची उलाढाल सुरू झाली आहे तर तुमचा विश्वास बसणार नाही.. पण मित्रांनो हे खरंय..

अहमदनगरमधील प्रमोद सुसरे असं या तरूणाचं नाव. आपलं इंजिनियरींगचं शिक्षण पूर्ण करण्यासाठीही त्याला पार्टटाईम जॉब करायला लागला, कारण संपूर्ण कुटुंब केवळ शेतीवरच अवलंबून होतं. शिक्षण पूर्ण करताच त्याला नोकरीही मिळाली. जॉब तर सुरू झाला पण पगार फारसा नव्हता. तुटपुंज्या पगारात भागणं कठीणच होत होतं.. म्हणूनच त्याने मग एक भन्नाट डोकॅलिटी केली.
2017 मध्ये त्याला त्याच्या कंपनीतर्फे चीनला जाण्याची संधी मिळाली. तिथे त्याने पाहिले की काही कामगार जुने टायर आणि जुन्या मोडक्या भंगारसामानापासून फर्निचर बनवत होते आणि ते विकून त्यातून पैसे कमवत होते. प्रमोदला ही आयडीया जामच आवडली, म्हणून तो काही दिवस तिथेच थांबला व त्याने या व्यवसायाची व कामाची पूर्ण माहिती मिळवली. तेव्हा त्याला कळलं की भारतातही अशा प्रकारचे व्यवसाय सुरू आहेत पण त्यांची उलाढाल, उत्पन्न तितके नाही आणि मग प्रमोदने ठरवलं की आपण हाच व्यवसाय उत्तम प्रकारे करून दाखवू..

अशी झाली सुरुवात -
2018 मध्ये प्रमोदने सर्वप्रथम जुन्या टायरपासून काही फर्निचर मॉडेल्स तयार केले, ते दिसायला तर सुंदरच होते पण त्यांचं बजेट मात्र जरा जास्त होतं. शिवाय, ते फर्निचर पाहून त्याला दाद तर मिळायची, पण हे कसलं काम आता तू करणार भंगार वस्तू गोळा करून .. असं म्हणून त्याचे मित्र, नातेवाईक त्याची चेष्टा करायला लागले. तरीही प्रमोद मागे हटला नाही कारण त्याचा निर्धार पक्का होताच आणि त्याच्या मनात आता पुढे जाण्याचा मार्गही स्पष्ट होता. एका मित्राकडून 50 हजार रूपये कर्जाऊ घेऊन प्रमोद कामाला लागला. त्याने आपलं एक वर्कशॉप सुरू केलं. नोकरी करता करता हे कामही सुरू झालं. जॉबनंतर जो रिकामा वेळ मिळू लागला त्यात त्याने भंगारातून फर्निचर बनवायला सुरुवात केली. सुरुवातीला त्याला फारसा चांगला प्रतिसाद मिळाला नाही पण 2019 साली त्याला एका म्यूझिक कॅफेसाठी फर्निचर तयार करण्याची पहिली मोठी ऑर्डर मिळाली. पुण्यातील या कॅफेसाठी त्याने टाकाऊतून इतकं भारी आणि मुख्य म्हणजे इकोफ्रेंडली फर्निचर बसवलं की मालक एकदम खूश झाले.. आणि मग या फर्निचरची हमखास येणाऱ्या जाणाऱ्या ग्राहकांकडून चौकशी केली जाऊ लागली. नुसती चौकशी होऊन हा प्रतिसाद थांबला नाही, तर प्रमोदला आता देशविदेशातून या फर्निचरच्या ऑर्डर्सही मिळू लागल्या.

सोशल मीडियाचा उत्तम वापर -
आता एवढा प्रतिसाद यायला लागल्यानंतर प्रमोद यांनी सोशल मीडियावर पी2एस फर्निचर नावानी आपलं पेज सुरू केलं. यावर रेग्युलरली आपल्या फर्निचरचे व नवनव्या कामांचे, प्रोजेक्टचे फोटो अपलोड करण्यास सुरुवात केली आणि बघता बघता जगभरातून त्याला ऑर्डर्स मिळू लागल्या.

दक्षिण आफ्रीकेतून आली पहिली ऑर्डर-
लॉकडाऊनमध्ये फारसा प्रतिसाद मिळत नव्हता तेव्हा अर्थातच कामावर परिणाम व्हायला लागला.. पण म्हणतात ना, देव पाठीशी असतो.. त्याप्रमाणेच यावर्षी मात्र मार्च महिन्यात प्रमोदला दक्षिण आफ्रीकेतून पहिली ऑर्डर मिळाली. तोवर त्याला हैदराबाद, हुबळी, बँगलोर, चेन्नई, गुजरात, ओरिसा येथूनही ऑर्डर्स मिळालेल्या आहेत. द.आफ्रीकेतून 2 लाख 30 हजाराची पहिली ऑर्डर मिळाली.

तर मित्रांनो,
नवीन कल्पना राबवताना सुरुवातीला अडचणी येतातच, मात्र, जर तुमच्या कल्पना या सत्याला धरून असतील तर मग कोणीही कितीही नाव ठेऊ देत, तुम्ही तुमच्या कल्पनांचा माग घेत पुढे जायला घाबरू नका हेच प्रमोदच्या उदाहरणावरून आपण शिकायला हवं.

जिद्द, मेहनत याबरोबरच आपल्या कल्पनांना वास्तवात आणण्याची धमकही आपल्यात असायलाच हवी आणि त्यासाठी पूर्ण प्रामाणिकपणे मेहनत करण्याची आपली तयारी हवी..

धन्यवाद
- Mohinee Gharpure
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com
(सर्व छायाचित्रे गुगलवरून साभार)

1

गुरुवार, २ सप्टेंबर, २०२१

डिजिटल मार्केटींगमधील या चुका तुम्ही टाळायलाच हव्यात ..

अनेक व्यावसायिक आणि त्याचबरोबर अनेकजण आपल्या वैयक्तिक वापरासाठीही हल्ली डिजिटल मार्केटींग करत असतात. डिजिटल मार्केटींगची कल्पना वरवर पहाता फार सोपी वाटते परंतु ती प्रत्यक्षात उतरवताना अनेक उत्तमोत्तम व्यावसायिकही शेकडो चुका करतात. बरेचदा, या माध्यमांचा नीट अभ्यास आणि मार्केटींगच्या बाबत आवश्यक ते संशोधन न केल्यामुळे ही गोची होते.. म्हणूनच हे टाळण्यासाठी व स्वतःचे वा आपल्या व्यवसायाचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी डिजिटल मार्केटींग करताना या चुका टाळायलाच हव्यात -

1. लाईक्स आणि शेअर्सचा फार जास्त विचार करू नका -

हे कितीही खरं असलं की सोशल मीडियावर तुम्ही लोकांचं लक्ष वेधत आहात हे ओळखण्याची सर्वात पहिली आणि प्रभावी खूण म्हणजे तुमच्या कंटेंटला मिळणाऱ्या लाईक्सची आणि शेअर्सची संख्या. ती जितकी जास्त अधिक तितकं तुमचं कंटेंट ( आणि पर्यायाने तुम्हीही ) अधिक आवडतंय हे समीकरण. मात्र, असे अनेक अभ्यासांती लक्षात आलेले आहे, की बरेचदा लाईक्स आणि शेअर्सची संख्या कमी आली तरीही तुमचं कंटेंट लोक वाचत असतात, त्याची दखल ते मनोमनी घेत असतात.

2. व्यावसायिक मदतीशिवाय तयार केलेली तुमच्या व्यवसायाची वेबसाईट -

बरेच ग्राहक एखादी वेबसाईट ही प्रोफेशनल आहे की अमॅच्युअर दिसतेय हे क्षणार्धात ओळखतात. ज्याचा विपरीत परिणाम तुमच्या व्यवसायाच्या प्रतिमेवर होऊ शकतो हे लक्षात घ्या. त्यामुळे तुमच्या व्यवसायाची माहिती प्रभावीपणे लोकांपर्यंत व तुमच्या ग्राहकांपर्यंत पोचावी असं तुम्हाला वाटत असेल तर एखाद्या उत्तम वेबडेव्हलपरकडूनच तुमच्या व्यवसायाची वेबसाईट तयार करून घ्या.

3. तुमच्या मार्केटींग कँपेन्सच्या निकालांवर लक्ष ठेवा -

अनेकजणं डिजिटल मार्केटींग तर मोठ्या झोकात करतात पण त्यानंतर त्याचे परिणाम काय झालेत, त्याचा इफेक्ट काय व कसा आणि कोणाकोणावर झालाय हे सगळं तपासायचं त्यांच्याकडून राहूनच जातं. हे अत्यंत गंभीर असू शकतं. याचं कारण, तुम्ही ज्यासाठी एवढा खर्च करून असं डिजिटल मार्केटींगचं कँपेन केलंत तोच उद्देश तुम्ही विसरून गेलात.. आणि व्यावसायिकांसाठी अशी पैशांची उधळपट्टी बरी नाही.

4. सोशल मीडियावर फक्त ब्रॉडकास्ट करण्यासाठी नव्हे तर लोकांना एंगेज ठेवण्यासाठी कंटेंट बनवायला हवं.

सोशल मीडिया हे केवळ एकतर्फी संवादाचे साधन नाही, तर इथे मास कम्युनिकेशन अर्थात जनसंवाद केला जातो. त्यामुळे तुम्ही केवळ तुमचा कंटेंट क्रिएट करून तो येथे व्हायरल करून त्यापासून अलिप्त राहणं हे योग्य नाही तर त्यापेक्षा तुम्ही तुमचा कंटेंट क्रिएट करून त्यावर आलेल्या लोकांच्या कमेंट्स वाचणं, त्यांना योग्य तिथे रिप्लाय करणं हे फार महत्त्वाचं आहे. सोशल मीडिया मार्केटींग करणाऱ्या प्रत्येकाने हा भाग सवयीचा केला पाहिजे. किमान लोकांच्या प्रतिसादावर लाईक्स तरी दिले पाहिजेत.

5. अति प्रमोशन करणे टाळा -

डिजीटल माध्यमं आपल्या अगदी हातातच असल्याने बरेचदा आपल्याला आपल्या व्यवसायाच्या किंवा आपल्या कामाच्या जाहीराती सतत करण्याचा फार अनावर मोह होतो. पण इथेच तर चुकतं. कारण कोणत्याही गोष्टीचं अति प्रमोशन केलं तर ग्राहकांचा त्यातला रस कमी होत जातो. तसंच, सतत एखाद्या वस्तूबद्दल वा एखाद्या सेवेबद्दल जर लोकांना थेट सांगत राहिलं तर कदाचित त्याचा रिव्हर्स इफेक्ट म्हणजे, त्या वस्तूविषयी वा सेवेविषयी ग्राहकांच्या मनातलं कुतूहल कमी होत जातं.

कंटेंट मार्केटींगची खासियतच ही असते की तुम्ही तुमची सेवा वा उत्पादन याविषयी थेट माहिती न देताही तुमचा ब्रँड प्रमोट करून तुमच्याकडे ग्राहकवर्गाला आकर्षित करू शकता. कंटेंट मार्केटींग करताना तुम्ही ग्राहकोपयोगी माहिती, टिप्स आणि ट्रिक्स, महत्त्वाच्या बाबी, सावधानी याविषयी तुमच्या लेखांमधून वेळोवेळी बोललं पाहिजे. अशा लेखांमधून ग्राहकांना, जे इथे तुमचे वाचक असतात, त्यांना काहीतरी उपयुक्त असं दरवेळी मिळालं पाहिजे. तरच, ग्राहक तुमच्या ब्रँडकडे आकर्षित होईल व तुमची सेवा घेईल.

6. सतत खरेदी करण्याचे आवाहन करण्याची गरज नाही -

एरवी इतर माध्यमातून होणाऱ्या जाहिरातींमध्ये एखाद्या उत्पादनाविषयी वा सेवेविषयी ग्राहकांना सतत ते खरेदी करण्याचे आवाहन निरनिराळ्या पद्धतीने केलेले असते. मात्र, डिजीटल मार्केटींगमध्ये असं थेट आवाहन सतत करण्याची गरज नसते. बरेचदा, डिजीटल मार्केटींग करताना,“buy now” चं बटन क्रिएट केलेलं असतं. पण, असं करण्याऐवजी जर तुम्ही तुमच्या कंटेंटमध्ये बॅकलिंक दिलीत (म्हणजे तुमच्या सेवा वा वस्तू पुरवणाऱ्या थेट वेबसाईटची लिंक त्या त्या संबंधित आर्टीकलमध्ये पेस्ट करणे) तर त्याचा रिझल्ट अतिशय उत्तम मिळू शकतो.. मात्र, जर तुम्ही बॅकलिंकशिवायच सतत कंटेंट मार्केटींग करत राहिलात तर मात्र तुमचं संपूर्ण डिजीटल मार्केटींग पॉईंटलेस ठरू शकतं हे लक्षात ठेवलं पाहिजे. कारण, शेवटी कोणत्याही प्रकारच्या मार्केटींगचा हेतू हा ग्राहकांनी तुमचं उत्पादन वा सेवा खरेदी करण्यासाठीच केलेलं असतं आणि त्यासाठी ग्राहकांना तुमच्या मार्केटींगमुळे तुमचे उत्पादन वा सेवा खरेदी करण्याची कृती करावीशी वाटली आणि त्यांनी तसं केलं तरच तुमचं मार्केटींग यशस्वी झालं असं म्हणू शकतो.

7. लोकांना सतत तुमच्या ब्रँडसह एंगेज ठेवता आलं पाहिजे -

जेव्हाही कोणताही लेख तुम्ही सोशल मीडियावर प्रसिद्ध करता त्यानंतर तुम्हाला तुमच्या वाचकांना त्या लेखासह कनेक्ट करता आलं पाहिजे. जेणेकरून, हेच वाचक तुमच्या ब्रँडसह सतत एंगेज रहातील.
तुमच्या लेखाला प्रतिक्रिया मागवून किंवा जनमत चाचणी वगैरे दर थोड्या थोड्या अवधीनंतर सुरू ठेऊन तुम्ही वाचकांना तुमच्याशी जोडून ठेऊ शकता.. किंबहुना तसं करायलाच हवं. तसंच, लोकांच्या प्रतिक्रियांना उत्तरं देणं, प्रतिसाद देणं हे देखील फार महत्त्वाचं आहे. एखादी चर्चा घडवून आणणं, ग्राहकांना जोडण्यासाठी निरनिराळे उपक्रम सोशल मीडियावर सतत करत रहाणं हे देखील फार गरजेचं आहे, यामुळे लोकांच्या मनात तुमच्या ब्रँडविषयी एक विश्वासार्हता निर्माण होते.

8. फक्त लेखांद्वारेच डिजिटल मार्केटींग पुरेसं नाही -

अनेक जण केवळ लेख लिहून किंवा अन्य लिखीत माध्यमातूनच आपल्या उत्पादनाची वा सेवेची जाहिरात डिजीटल माध्यमावर करत असतात. मात्र, इथे या माध्यमावर केवळ तितकंस पुरत नाही. त्यामुळेच लेखांबरोबरच अन्य अनेक प्रकारांना तुम्ही तुमचं मार्केटींग केलं पाहिजे, त्याचा तुम्हाला निश्चित फायदा होईल.
यासाठी तुमच्या ब्रँडविषयी माहिती देणारे, तुमच्या उत्पादनांविषयी वा सेवांविषयी माहिती देणारे, रंजक असे व्हिडीओज तयार करून ते सोशल मीडियावर प्रसिद्ध करायला हवेत. त्याचबरोबर तुम्ही स्लाईड प्रेझेंटेशनचाही वापर करू शकता आणि हल्ली प्रचलित होत असलेला प्रकार म्हणजे पॉडकास्ट .. तुम्ही पॉडकास्टद्वारेही मार्केटींग करू शकता.
डिजीटल मार्केटींग करताना सर्वात महत्त्वाची लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे, सतत एकाच पद्धतीने मार्केटींग करणे टाळायला पाहिजे. या इंटरॅक्टीव्ह माध्यमाचा योग्य वापर करून ग्राहकांना सतत निरनिराळ्या प्रकारे तुमच्या ब्रँडकडे आकर्षित केलं पाहिजे. आऊट ऑफ बॉक्स विचार करता आला पाहिजे.
आणि या सगळ्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे, ज्यावेळी एखादी काँसेप्ट इथे फेल जाईल, त्यानंतर लगेचच नवी काँसेप्ट घेऊन त्या पद्धतीने मार्केटींग करत आपल्याशी ग्राहकांना सतत जोडून ठेवता आलं पाहिजे. अकारण लाखो रूपये खर्च करून डिजीटल मार्केटींग करणं, ज्याचा प्रत्यक्षात काहीच उपयोग होताना दिसत नसेल तर ते करणं थांबवलंच पाहिजे.
हेन्री फोर्ड म्हणतो नं, 'जर तुम्ही नेहमी तेच केलंत जे तुम्ही आजवर करत आलेला असाल, तर तुम्हाला नेहमी तेच आणि तेवढच मिळेल जे तुम्हाला आजवर मिळत आलेलं आहे ' !

धन्यवाद

- मोहिनी घारपुरे - देशमुख 

नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com














शनिवार, १४ ऑगस्ट, २०२१

इकीगाई

इकीगाई - जपानमधील माणसांच्या दीर्घ व आनंदी जीवनाचं रहस्य सांगणारं पुस्तक (#Saturday_bookclub)

जपानमधील लोकांचा असा ठाम विश्वास आहे की प्रत्येकाकडे 'इकीगाई' आहे. 'इकीगाई' शब्दाचा अर्थ काय असा प्रश्न सहजच तुमच्या मनात आला असेल. 'इकीगाई' हा एक जॅपनीझ शब्द आहे आणि याचा अर्थ आहे, 'तुमच्या जीवनाचं, तुमच्या आनंदाचं कारण' किंवा 'तुमच्या असण्याचं कारण' किंवा, 'तुमच्या आनंदी जीवनाचं कारण' .. इकीगाई शब्दाची आणखी एक व्याख्या करता येते ती म्हणजे the happiness of always being busy or engage अर्थात, इकी म्हणजे (लाईफ) जीवन आणि गाई म्हणजे रिझल्ट .. अर्थात आनंदी जीवनाचा परिणाम किंवा जीवनाचं कारण ..
190 पानांच्या या पुस्तकात जीवन आनंदाने जगण्याच्या कलेबद्दल सांगितलं आहे. असं म्हणतात, की जपानी माणसं दीर्घायुषी असतात तसंच त्यांचं जीवन हे अधिक अर्थपूर्ण अशा पद्धतीने ते जगतात. हे सगळं या जॅपनीझ माणसांना कसं जमतं याचंच रहस्य या पुस्तकात लेखक हेक्टर गार्शिया आणि फ्रान्सेस्क मिरेल्स यांनी सांगितले आहे. चला तर मग जाणून घेऊया या पुस्तकात नेमकं त्यांनी काय सांगितलंय -
1. रोज सकाळी बिछान्यातून उठण्याचं तुमचं कारण शोधा -
तुमच्यामध्ये काही ना काही युनिक टॅलेंट देवानं दिलेलं आहे. त्यासाठी तुम्ही खरंतर जगत आहात पण ते कारण जोवर नेमकं तुम्हाला सापडत नाही तोवर तुमचं जीवन हे तितकं फुलणार नाही, त्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनाचं मूळ उद्दीष्ट काय ते आधी शोधा... थोडक्यात दररोज बिछान्यातून उठून जीवनाला थेट भिडण्यासाठी तुमचं स्वतःचं असं काय कारण आहे ते शोधा.
2. व्यवस्थित जेवा -
अनेक लोक हे एकतर कमी जेवतात किंवा अति खातात. या दोन्हीही सवयी फार घातक आहेत. साधारण 80 टक्के पोट भरलेलं असावं अर्थात, आपण भरपेट जेऊन सुस्तही होऊ इतकंही अन्न खाऊ नये आणि आपण अर्धपोटी उपाशीही राहू नये. नेहमी पोटात थोडीशी जागा ठेवावी. असं करण्यामागची शास्त्रीय कारणंही अनेक आहेत तुम्ही हवंतर त्याचा आढावाही पुस्तकात घेऊ शकता.
3. इतरांशी घट्ट नातं जपा -
तुमच्या जीवनात समस्या असो वा नसो, तुमचे जे इतरांशी बंध आहेत ते नेहमी चांगले आणि घट्ट असू देत. लक्षात घ्या, तुमच्या जवळची माणसं तुमच्यावरचा ताण कमी करण्यासाठी नेहमी मदत करतात. एखाद्या जवळच्या मित्रमैत्रिणीशी मन मोकळं केल्याने, किंवा तुमच्या कुटुंबातील सदस्यांशी मन मोकळं केल्याने तुमचा ताण हलका होऊ शकतो. म्हणून नेहमी, इतरांशी चांगले नाते जोपासा.
4. नेहमी सक्रीय रहा -
दररोज काम करा..दररोज सक्रीय रहा.
समजा तुम्ही तुमची कार खूप दिवस वापरलीच नाहीत, ती नुसती एका जागी उभी करून ठेवलीत तर थोड्याच दिवसात ती गंजून जाईल, शिवाय ती वेळेवर उपयोगीही पडणार नाही. हीच बाब आपल्या शरीरालाही लागू आहे. म्हणून शरीराचे चलनवलन होईल अशा क्रीया करा. दररोज थोडा व्यायाम करा. लिफ्टऐवजी जिन्याने चढउतार करा, दररोज पायी फिरायला जा... लक्षात ठेवा, तुम्हाला कोणत्याही स्पर्धेत चॅम्पियन बनायचे नाहीये.. त्यामुळे शरीराला झेपेल इतका पण नेमाने दररोज थोडा थोडा व्यायाम करा.
हे सगळे महत्त्वाचे मुद्दे या पुस्तकात सविस्तर सांगितलेले आहेत. जर तुम्हाला एक छान उत्साही आनंदी आणि कार्यक्षम व्यक्ती म्हणून जगायचं असेल तर हे पुस्तक तुमच्यासाठी आहे.
लक्षात घ्या,
आपण जे सातत्याने करतो तेच खरे आपण असतो.
एखाद्या कृतीने यशस्वी होता येत नाही तर सातत्याने व सवयीने चांगलं जीवन जगण्याचा ध्यास तुम्हाला यशापर्यंत आपोआप नेतो.

- Mohinee Gharpure Deshmukh
learn.netbhet.com





0

गुरुवार, ५ ऑगस्ट, २०२१

ओंजळभर कविता आता पुस्तकरूपात ...

मित्रांनो,

आपलं पहिलं पुस्तक वाजतगाजत छापून यावं ही प्रत्येक तोडकंमोडकं किंवा फार फार छान लिहीणाऱ्या लेखकाची तीव्र इच्छा असते. किंबहुना, आपलं किमान एक तरी पुस्तक प्रसिद्ध व्हावं हे प्रत्येक लेखकाचं स्वप्न असतं.. माझंही होतंच.. पण बरीच धडपड करूनही प्रकाशकांचं आणि माझं काही समीकरण जुळेना, शिवाय मला स्वतःलाच कोणतंही नवं काम असो करून पहाण्यात फार फार धमाल येते. चुकलं तरी चालेल, पण करून तर पाहूया या स्कूल ऑफ थॉटमधून माझी जडणघडण झालेली आहे. फार तर काय होईल .. नकार मिळेल.. फार तर काय होईल.. नाही होणार मनासारखं .. त्याहूनही काय वाईट होईल .. काहीच नाही.. मग करून पाहूया.. एखादी गोष्ट करण्यातच, करून पहाण्यातंच खरं जीवन आहे असं मला वाटतं. शिवाय, दरवेळी अपयश येतं, किंवा नकारच मिळतो असंही अज्जिबात नाही, किंबहुना अशा या धडपडीचं, धडाडीचं आणि उद्यमशीलतेचं जाणकार लोकांकडून नेहमी कौतुकच होतं हा माझा स्वानुभव आहे. त्यामुळे.. जेव्हा या नोशन प्रेसबद्दल माहिती मिळाली तेव्हा माझं स्वप्न असलेलं माझ्या मनातलं माझं पुस्तक .. माझ्या कल्पनेतलं माझं पहिलंवहिलं पुस्तक मी स्वतःच एकटीने अथक परिश्रम करून पूर्ण केलं आहे. हे पुस्तक आता नोशन प्रेसच्या वेबसाईटवर आणि अमेझॉनवर रिड ओन्ली व्हर्जनमध्ये उपलब्ध झाले असून विक्रीसाठीही उपलब्ध आहे. तरीही, माझ्या तोडक्यामोडक्या कवितांवर.. किंवा माझ्यातल्या धडपडणाऱ्या, उत्साही मुलीबद्दल जर तुम्हाला प्रेम वाटत असेल आणि माझं पुस्तक खरेदी करावसं वाटत असेल तर जरूर या दोन्हीपैकी एखाद्या साईटवरून ते आजच ऑर्डर करा. ऑर्डर करण्यापूर्वी मला इनबॉक्स करा.. कदाचित मी तुम्हाला काही डिस्काऊंटही ऑफर करू शकेन ..
पुस्तकाची किंमत फार जास्त आहे असं वाटत असलेल्यांनी एवढंच लक्षात घ्या की हा सगळा खटाटोप मी एकटीने केला आहे.. मी यात कोणाचीही मदत घेतलेली नाही.. त्यामुळे जर तुम्हाला किंमत जास्त वाटत असेल तर मात्र ही पोस्ट तुमच्यासाठी नाही असं समजून स्वतःला वगळून घ्या.. तुम्ही माझं पुस्तक विकत घेतलं नाहीत तर तो तुमचा ग्राहक आणि वाचक म्हणून चॉईस असू शकतो हे मी समजू शकते त्यामुळे त्यावरून तुमच्याविषयी माझ्या मनात अकारण अढी वगैरे कदापि रहाणार नाही.
धन्यवाद
- मोहिनी

If you want to purchase my book please click on this link - 

https://notionpress.com/read/onjalbhar-kavita

( use this coupon to avail 15% discount - MYFRIEND )

(limited period offer)

शनिवार, १७ जुलै, २०२१

बाई, बूब्स आणि ब्रा

गेले तीन चार दिवस सोशल मीडियावर या एकाच विषयावर बरीवाईट योग्य अयोग्य चर्चा रंगली आहे. मराठीतील आजची आघाडीची अभिनेत्री हेमांगी कवी हिच्या एका व्हिडीओनंतर तिच्यावर जे असभ्य भाषेत ट्रोलिंग झालं त्यानंतर तिनं लिहीलेली बाई, बूब्स आणि ब्रा ही पोस्ट तुफान व्हायरल झाली. 

हा ' न बोलण्याचा विषय ' खरंतर .. 

पण एकंदरीतच बाईच्या स्तनांविषयी नेहमीच फार बोललं जातं. या स्तनांबद्दल पुरूषांना आकर्षण आणि बायकांना त्यांच्या या सौंदर्यस्थळाचा काहीसा सार्थ अहंकार .. म्हणून (ब्रा घाला किंवा नका घालू ) .. स्तनांविषयी बोललं जातंच. 

ज्या स्तनांतून बाल्यावस्थेत चुटूचुटू दूध प्यायलं त्या स्तनांविषयी वासनांध होऊन बरळत रहाणे आणि संधी मिळताच कोणत्याही स्त्रीच्या स्तनांना दाबण्याचा विकृत आनंद घेतल्यावाचून पुरूषांना रहावत नाही हेच खरं. हल्ली तर आभासी दुनियेत हे असं अश्लील कंटेंट एका क्लिकवर उपलब्ध आहे. त्यामुळेच बाईचा व्हिडीओ आला रे आला की आधी त्या व्हिडीओतील 'बाई'च न्याहाळली जाते ही विकृती बळावत चालली आहे.. आणि हेमांगी कवीचंही हेच झालं. असो, हे सगळे मुद्दे सध्यापुरते बाजूला ठेऊ .. 

तर मुळात बायकांनी घरात ब्रा घालावी की नाही हा सर्वस्वी त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे हे खरोखरच मान्यच आहे.. पण जरा गडबड वाटते ती या विधानात की घरातील पुरूषांसमोर स्त्रियांनी तसं वावरावं की नाही यात..

खरी मेख इथे आहे, ब्रा लेस तर बायका एकांतात राहूच शकतात पण पुरूषांसमोर वावरताना त्यांच्या इच्छेविरूद्ध त्यांना ब्रा घालून स्तनांना आवळून ठेवावं लागतं, तेही पुरूषाची वासना चळू नये या एकमेव उद्देषाने, हा स्त्रियांवर जुलूम आहे असं हेमांगीचं म्हणणं आहे. 

आणि असं जर तिच्यासारख्या अनेक महिलांना वाटत असेल तर या निमित्ताने आता आपण त्याला पर्यायही शोधायलाच हवा. जर घरात फिट्ट ब्रा घालायची नसेल तर त्याऐवजी असं काहीतरी बायकांसाठी वस्त्र तयार करायला हवं, ज्यात तिच्या स्तनांना नीट आधारही मिळेल आणि तिचा हा प्रायव्हेट पार्ट नीट झाकलाही जाईल. शिवाय सतत घट्ट आवळून बसणाऱ्या ब्रा च्या स्ट्रीप्सने तिचा श्वास गुदमरणारही नाही. 

यासाठी अनेकजणी सांगतील की मग स्पोर्ट्स ब्रा वापरा नि अजून काय काय वापरा .. पण ते सगळं इतकं महाग असतं, शिवाय ते सर्वसमावेशक अद्याप झालेलं नाही याचं कारण तेही फार फिट्ट असतं. 

मी हे सगळं का लिहीतेय .. कारण, गेले दोन चार दिवस या चर्चा आणि त्यावर आलेल्या कमेंट्स वाचताना या विषयाची गुंतागुंत स्पष्टपणे लक्षात आली म्हणून..

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, एरवी पुरूषांनी त्यांचा प्रायव्हेट अवयव असा दाखवला, किंवा नकळतपणे तो वस्त्राआडूनही दिसला तर मग आपण बायका त्यांना विकृत किंवा किळसवाणे म्हणून सहज संबोधतो. म्हणजेच काय, आपले प्रायव्हेट पार्ट दुसऱ्याला दिसणं हे दुसऱ्यासाठीही  किळसवाणंच असतं. काहीच महाभाग, विकृत माणसांना हा आनंद हवा असतो. पण सभ्यतेने वागणाऱ्या स्त्रिया वा पुरूषांना अगदी रस्त्यावरून चालणारे 'नागा साधू' जरी दिसले तरीही त्यांचीही क्षणभर किळस येते. लहान मुलंमुली अशा नागा साधूंना पाहून घाबरतात हा अनुभव बहुतांश सगळ्यांनी घेतला असावा. 

काल एक खूप वेगळीच प्रतिक्रिया वाचनात आली माझ्या तेव्हा या विषयाची दुसरी बाजूही खरंच विचार करण्याजोगी आहे असं मला तीव्रतेने वाटलं. ती प्रतिक्रिया होती एका पुरूषाची.. ते कदाचित ग्रामीण भागातले असावेत आणि त्यांनी नीट त्यांच्या ग्रामीण भाषेत या विषयावर लिहीलं होतं, 'की हे बघा, जर घरात वयात येणाऱ्या मुलांपासून ते पुरूषांपर्यंत कोणाचंही अचानक लिंग ताठरलं तर त्यालासुद्धा घरातले इतर पुरूष नीट समजावतात, शिकवतात, नि अशी अवस्था होऊ नये म्हणून त्याला काळजी कशी घ्यायची हे सुद्धा शिकवलं जातं. समजा, भावंड घरात असतील तर भावालासुद्धा बहिणीसमोर कसं वागायचं हे नीट सांगितलं जातंच ना.. जसं मुलींनाही त्यांचे अवयव नीट झाकले जावेत व त्यासाठी ब्रा वापरायला हवी हे शिकवलं जातंच. आता समजा, तुमच्यापुढे एखाद्या पुरूषाचं लिंग उद्दीपीत झालं तर .. तुम्ही त्यालाच नावं ठेवाल नं .. आणि तो जर म्हटला की मला नाही आवडत अंडरपँट घालायला ..मग तो तसा फिरणार तर हे चालेल का तुम्हाला .. नाही ना..?'

ही प्रतिक्रिया वाचून क्षणभर मी खरंच विचारात पडले. कारण, त्या प्रतिक्रियेतील मुद्दे खरोखरच बरोबर होते. तुम्ही घरात एकांतात कसेही रहा पण दुसऱ्या व्यक्तीपुढे जाताना तुम्ही हे सामाजिक संकेत पाळणं हे जास्त संयुक्तिक आहे असं मला वाटतं. ब्रा चा त्रास होत असेल तर किमान कपडे तरी असावेत की आतले अवयव विचित्रपणे दुसऱ्यांना दिसणार नाही.. आणि अशीच काळजी पुरूषांनीही घ्यावी.

आता आणखी एक फार महत्त्वाचा मुद्दा जो मला वाटतो, की एवढी काळजी घेऊनही समजा एखाद्या स्त्रीचे स्तन वा स्तनाग्र चुकून दृष्टीस पडले तर तिला हिणवण्याचा, त्यावरून घाणेरड्या अश्लील प्रतिक्रिया देण्याचा हक्क तुम्हा पुरूषांनाही कोणी दिलेला नाही. एखाद्या स्त्रीला अशा  पद्धतीने बघणंच मुळात चुकीचं आहे. त्यातून या अशा प्रतिक्रिया देणारे बहुतांश लोक लग्न झालेले थोराड माणसं आहेत.. त्यामुळे त्यांना तर एवढाल्या वयाला या विषयावर बोलावसं वाटावं आणि त्यात चवीनं आस्वाद घेत आपल्या कमेंट पोस्ट कराव्या असं वाटणं यातच सगळी समाजाची विकृती स्पष्टपणे दिसते. अनेक बायकांनीही फार भयंकर भाषेत प्रतिक्रिया दिल्या आहेत, त्यांनाही खरंच एवढच सांगावसं वाटतं, की या अशा वादात पडून पुरूषांच्या बाजूने विचार करताना, पुरूषांच्या या समाजात स्वतःला तुम्ही चांगल्या बायका म्हणून प्रोजेक्ट करालही यशस्वीपणे, पण तुमच्यात हेमांगीइतका प्रामाणिकपणा नाही. उलट तुम्ही लबाड आहात, पुरूषांच्या या राज्यात राणी बनून कसं रहायचं, कसं स्वतःला चांगलं दाखवायचं, त्यांच्या फेव्हरेट कसं व्हायचं या सगळ्यातच तुमचं आयुष्य जाणार त्यापलिकडे तुम्ही स्वतः व्यक्ती म्हणून कधीच स्वतंत्रपणे विचार करू शकणार नाही आणि हेच तुमचं अपयश आहे बरं का बायकांनो.. त्यामुळे एखाद्या बाईची अशी विकृत थट्टा करण्याचा हक्क तुम्हालाही कोणी दिलेला नाही. 

जाता जाता मला दोन सिनेमांचा उल्लेख इथे करायचा आहे. एक म्हणजे, 'राम तेरी गंगा मैली' आणि दुसरा 'सत्यम् शिवम् सुंदरम्' ..

राम तेरी गंगा मैली चित्रपटात मंदाकिनी बाळाला दूध पाजते तो सीन आठवा.. तेव्हा तिचा एक उघडा स्तन पहाण्यासाठी हा चित्रपट किती वेळा कित्तीतरी लोकांनी पाहिला होता.. आणि सत्यम् शिवम् सुंदरम् चित्रपटात केवळ स्वच्छशुभ्र धूत आणि ओलेत्या वस्त्रासह नाचणारी ती झीनत पहाण्यासाठी त्या गाण्याची पारायणं करणारी शेकडो मंडळी याच समाजाचा भाग आहेत. टारझन चित्रपटातली स्तन दाखवणारी किमी काटकर पाहून टारझनसह चळणारी अनेक मंडळी आजही इथे आहेत.. त्यामुळे स्तनांचं मीडियामधलं राजकारण काही नवं नाही. त्यामुळे सोशल मीडियावरही आता हे असंच विकृत राजकारण सुरू झालेलं आहेच. पोर्न इंडस्ट्री तर सगळंच विकू पहातेय. असं सगळं वातावरण असताना प्रत्येक व्हिडीओतून प्रकटणाऱ्या प्रत्येक नव्या बाईच्या शरीराची मापं काढणाऱ्या आणि त्यांचं असं हसं करणाऱ्या विकृत जनतेपासून आपल्यासारख्या चांगल्या, सुशिक्षित आणि सभ्य जनतेनं तरी चार हात लांबच रहावं हेच खरं..

- मोहिनी घारपुरे - देशमुख  


 ही आई आहे ..फक्त  मादी नाही.. 
She is not only a women but a MOTHER
RESPECT EVERY WOMEN



शनिवार, २६ जून, २०२१

"Fingertip"

आजच झी5 अॅपवरची फिंगरटिप नावाची एक वेबसिरीज पहाण्यात आली. मूलतः तमीळ भाषेतील ही वेबसिरीज हिंदी भाषेत डबींग केलेली असल्याने समजायला सोपी गेली. सोशल मीडियाची दुसरी भयंकर बाजू पाच निरनिराळ्या छोट्या छोट्या कथानकांमधून आपल्यासमोर या वेबसिरीजच्या माध्यमातून दाखवली आहे.
मुळातच साऊथकडच्या फिल्म्समध्ये जो एक नीट आणि थेट पद्धतीने विचार मांडण्याची शैली आढळून येते तशीत ती या वेबसिरीजमध्येही स्पष्ट दिसते. दिग्दर्शकाला जे मांडायचंय ते थेट आपल्यापर्यंत पोहोचतं.
ग्रीड ( लोभ, हव्यास ), Rage ( रेज म्हणजे संताप, चीड ), बीट्रेयल ( विश्वासघात ), लस्ट ( वासना ), Vengeance ( सूड ) या पाच शीर्षकांतर्गत समोर येणाऱ्या पाच कथा .. अक्षरशः आपल्या डोळ्यात सोशल मीडिया या माध्यमाबद्दल झणझणीत अंजन घालतात.
सोशल मीडियाबद्दल एकदा का आपण कम्फर्टेबल झालो की मग यातली दुसरी काळी बाजू आपल्या लक्षातही रहात नाही. हे माध्यम हाताळण्यापूर्वी आपण ज्या गोष्टींबद्दल सतर्क असतो, काळजी घेण्यासाठी सज्ज असतो, ते सारंच आपण या भुलभुलैय्यात प्रत्यक्ष अडकल्यावर विसरून जातो. धडाधड अनोळखी लोकांशी मैत्री करत सुटणे, डेटींग साईट्सवर वावरणे, आपली माहिती हळूहळू करत बिनधास्तपणे शेअर करत जाणे, वारंवार लाईक्स मिळवण्यासाठी निरनिराळ्या शक्कल लढवत फोटोज, पोस्ट्स शेअर करत जाणे, लाईक्सचे नवेनवे आव्हानात्मक टार्गेट्स स्वतःला देत पोस्ट्स करत रहाणे या सगळ्याची परिणिती स्वतःचं मनःस्वास्थ्य हरवण्यात तर होतेच होते पण कधीकधी या माध्यमातून होणाऱ्या भयंकर गुन्हेगारीलाही काही दुर्दैवी जणांना सामोरं जावं लागतं अशी अवस्था होते. या साऱ्याच मोहपाशाच्या विळख्यातून एकेक प्रकारचे सायबर गुन्हे कसे आणि कोणकोणत्या मानसिक अवस्थांमध्ये घडतात, घडवले जातात या साऱ्याविषयी या वेबसिरीजमधल्या कथा बोलतात. काही कथा जरा अतिरंजीत असतीलही पण त्यातून मिळणारा संदेश हा महत्त्वाचा असं मला वैयक्तिकरित्या ही सिरीज पहाताना वाटलं.. आणि म्हणूनच आपल्यापर्यंतही हे पोहोचवावं म्हणून तातडीने हा लेखनप्रपंच ..
ग्रीड नावाच्या कथेची नायिका रेखा दिवसागणिक सोशल मीडियाच्या इतकी आहारी जाते की या माध्यमावर हिट होण्यासाठी अक्षरशः कर्जबाजारी होते. आपल्या पतीच्या सांगण्याकडे, समजावण्याकडे वारंवार दुर्लक्ष करत लाईक्स आणि फॉलोअर्स मिळवण्याच्या हव्यासात स्वतःचं वैवाहिक जीवन उद्ध्वस्त करून बसते. ती इतक्या थराला पोचते की सोशल मीडियासाठी काही लाख रूपये खर्चून फोटोशूट करण्याचा नाद तिला लागतो. नंतर जेव्हा पैसे नसतात तेव्हा ती फोटोग्राफरला गळ घालते आणि उधारीवर दुसरं फोटोशूट करते. अखेर घराचे हफ्ते भरण्यासाठी नवऱ्यावर एकट्यावर वेळ येते तेव्हा त्याला हे सगळं समजतं नि तो अक्षरशः अशा बेजबाबदार, मूर्ख बायकोला हाकलून लावतो. तरीही हिचे डोळे उघडत नाहीत.. आणि आपल्या हव्यासापोटी ती तिच्यावर लट्टू असणाऱ्या बॉसचा आधार घेत आपलं सोशल मीडिया लाईफ सुरूच ठेवते आणि त्यासाठी वाट्टेल ती तडजोड करतानाही तिला काहीच वाटेनासं होतं.
रेज या दुसऱ्या कथेत एक वयस्कर, जबाबदार गृहस्थ .. थोडासा आग्रही आणि आपल्या संस्कृतीबद्दल जरा जास्त संवेदनशील .. एकदा रस्त्यात एक टपोरी पोरगा बेफामपणे बाईक चालवत असताना एका वयस्कर माणसाला धडकतो आणि वर चार लोकात त्या गृहस्थांना वाट्टेल ते बोलायला लागतो. हे पाहून कथेचे नायक असलेले वयस्कर गृहस्थ पुढे सरसावतात आणि त्याला माफी मागायला लावतात, त्याला चांगलंच सुनावतात आणि संतापाच्या भरात त्या पोराला कानशिलात भडकवतात. आता हा तरूण टपोरी पोरगा सूडाच्या भावनेने पेटतो. या गृहस्थाच्या दैनंदिनीवर लक्ष ठेवतो आणि त्यांचे फोटो काढतो. मग एकदा हे काका एका लहान शाळकरी पोरीशी प्रेमाने दोन शब्द बोलत असतानाचा फोटोही तो पोरगा लपूनछपून काढतो आणि मग काकांच्या नावाने त्या फोटोसह एक संदेश टाईप करून सोशल मीडियावर व्हायरल करून टाकतो.. केवळ सूडापोटी.. त्याने लिहीलेलं असतं, हा माणूस लहान मुलांना पळवतो .. याला नुकतंच पोलीसांनी पकडलंय .. अशा अर्थाचा तो संदेश असतो. हा मेसेज तो पोरगा तुफान व्हायरल करतो आणि अर्थातच याची परिणिती त्या भल्या माणसाची बेअब्रू होण्यातच होते. मग पोलीस कंम्प्लेंट वगैरे होते, पोलीस त्यांना सांगतात सध्या घराबाहेर पडू नका.. थोडेदिवस कुटुंबीयांच्याही पाठींब्यामुळे व विश्वासामुळे काका घराबाहेर पडत नाहीत आणि मनानीही सावरतात. मग काही दिवसांनी मित्रपरिवार व कुटुंबीयांसमवेत सगळे देवदर्शनाला जातात.. तेव्हा एका मित्राच्या नातवाला थोडावेळ त्या गृहस्थांबरोबर बाहेर उभं करून सारीजण मंदिरात पांगतात. हा छोटा आजोबांजवळ जाण्याचा हट्ट करू लागतो पण एवढ्या गर्दीत त्याला एकटं सोडणं केवळ अशक्य म्हणून हे सद्गृहस्थ त्याला समजावू लागतात आणि त्याचा हात सोडत नाहीत. इतक्यात एका फुलवाल्याला तो मेसेजमधला माणूस हाच हे लक्षात येतं आणि पुढच्या काही मिनीटातच त्या सद्गृहस्थांना अक्षरशः लाथाबुक्क्यांनी तुडवलं जातं. मंदिरातली काही माणसं त्यांना बच्चाचोर समजून मारझोड करायला लागतात.. अखेर त्यांचे मित्र व परिवार येऊन त्यांना वाचवतात पण तोवर फार उशीर झालेला असतो.. या धक्क्याने ते पार कोलमडतात, शरीराने अपंगत्व तर येतंच पण मनानेही ते कायमचे खचून जातात..
विश्वासघात नावाच्या कथेत तर एका ऑनलाईन भेटलेल्या प्रियकरासाठी दोन चांगल्या मैत्रिणींमध्ये कसा दुरावा निर्माण होतो आणि त्याची परिणिती म्हणजे एक मैत्रीण दुसऱ्या मैत्रिणीचं अकाऊंट हॅक करून त्यावरून देशद्रोही पोस्ट्स शेअर करते आणि अखेरीस कोणतीही शहानिशा न करता पोलीसही त्या मुलीला पकडून नेतात.. एक रात्र तुरूंगात काढून आल्यावर त्या मुलीचं आणि तिच्या कुटुंबीयांचं आयुष्य उद्ध्वस्त होतं.. आणि इकडे जिनी हे प्रताप केलेले असतात तिचं मन तिला खायला लागतं.. आणि ज्याच्यामुळे हे सगळं ती आपल्या मैत्रिणीबरोबर करते तो तर किती खोटारडा आणि विश्वासघातकी निघतो हे नंतर उघड होतं तेव्हा हिच्या पायाखालची जमीन सरकते.. पण तोवर दुसऱ्या मैत्रिणीचं आयुष्य बर्बाद झालेलं असतं. 
बाकीच्या गोष्टीही अशाच .. मन सुन्न करणाऱ्या.. सोशल मीडियाचं एक वेगळंच वास्तव दाखवणाऱ्या आहेत. त्याबद्दल लिहीत नाही.. पण गोष्टींच्या शीर्षकावरूनच कथा लक्षात यावी.
हल्ली आपल्याला या नव्या माध्यमांनी खरोखरीच मोहपाशात गुंडाळून ठेवलंय. सुदैवाने काही जण ज्यांचे पाय जमिनीवर आणि डोकं जागेवर आहेत अशीही बरीच मंडळी या माध्यमांवर सजगपणे वावरत असतात पण बरीच मंडळी या माध्यमात इतकी गुंततात की त्यापलीकडच्या वास्तव जगाचं त्यांना भानच उरत नाही. अनोळखी लोकांवर विश्वास ठेवायचा नाही हे कितीही खरं असलं तरीही याच जगातले अनेक अनोळखी लोक विश्वासार्हही आहेत हे सोशल मीडियानेच काही प्रमाणात सिद्धही केलं आहे. जग मुठीत आणून ठेवलंय.. पण तरीही आपल्याला या जगातील ही काळी बाजूही ध्यानात ठेऊन इथे वावरायला हवं, सतर्क आणि सावध रहायला हवं हेच खरं..
- मोहिनी घारपुरे - देशमुख

गुरुवार, १७ जून, २०२१

" MOHINEE WRITES for YOU "

DEAR FRIENDS,

I have been observing that many small businesses often need a detail and sincere Review of their products. So, if you want Me to write about your product on my blog please do contact me TODAY without spending time..! I will give you the best review about your PRODUCT/ BOOK / FILM / MUSIC ALBUM or anything which can be reviewed !!!

GRAB THIS OPPORTUNITY ASAP AND DO CONTACT ME BY REPLYING ON THE COMMENT SECTION. YOU CAN SHARE YOUR CONTACT INFORMATION IF YOU WOULD LIKE TOO .. 

OR

YOU CAN E-MAIL ME 

-MOHINEE GHARPURE - DESHMUKH 

(mohineeg@gmail.com)

( Kindly note For Product review blogposts, charges apply)


   

गुरुवार, ३ जून, २०२१

कढीपत्त्याची चटणी



साहित्य - कढीपत्त्याची वाळलेली पानं, तीळ, खोबरं, भाजलेले शेंगदाणे, कलौंजी, मीठ, तिखट, जीरे, (आवडत असल्यास) लसूण व साखर

कृती -

१. कढीपत्त्याची वाळलेली पानं आधी मिक्सरमधून फिरवून त्याची पूड करून घ्या.

२. आता त्यात (मूठभर) भाजलेले तीळ + शेंगदाणे ( अर्धी वाटी ) + खोबरा कीस ( वाटीभर) आणि कलौंजी ( एक ते दोन टेबल स्पून ) घाला. ( या सर्व जिन्नसाचे प्रमाण कढीपत्त्याच्या पूडीच्या तुलनेत व आपल्या आवडीनुसार कमीजास्त करू शकता )

३. हे सर्व मिश्रण पुन्हा मिक्सरमधून फिरवावं व त्याचवेळी त्यामध्ये योग्य प्रमाणात तिखट, मीठ, साखर चवीनुसार आणि आवडत असल्यास लसूण पाकळ्या चार ते पाच घालाव्या ( मी लसूण घातलेले नाही )

४. आता हे सर्व जिन्नस घालून पुन्हा एकदा मिक्सरमधून फिरवले की चटणी तयार.

५. शेवटची पण अत्यंत महत्वाची स्टेप म्हणजे ही चटणी एखाद्या पँनमध्ये मंद आचेवर थोडीशी परतून घ्यावी.. साधारण अंदाजे खमंग वास सुटेपर्यंत परतावी व ताबडतोब एका ताटात काढून घ्यावी व थंड झाल्यानंतर डब्यात भरून ठेवावी. यामुळे कढीपत्त्याच्या पानांचा कच्चेपणा जातो तसेच चटणी खमंग चव येते. मात्र फार वेळ व फार मोठ्या आचेवर भाजू नये नाहीतर सगळी चटणी भराभर करपून जाण्याची दाट शक्यता असते.

६. थंड झालेली चटणी पुन्हा डब्यात भरताना त्यात थोडे तीळ, खोबराकीस, कलौंजी, जीरं (थोडंस भाजलेलं) आणि पिठीसाखर किंवा साखरही घालू शकता, यामुळे चटणीचा स्वाद आणखी वाढतो.

७. तीळ, खोबरं कीस आधी भाजून घेऊन मग कढीपत्त्यासह मिक्सरमधून फिरवला तरीही चालतो.

८. कढीपत्ता जर ताजा ताजा असेल तर तो तसाच एकदोन दिवस उन्हात वाळवून मग पूड करावी किंवा ताजीताजी पानं तेलावर परतून कुरकुरीत करून घेता येतात. मला तेल अव्हॉइड करायचं होतं शक्यतो म्हणून मी पानं तशीच ठेऊन नैसर्गिकरित्या वाळू दिली व मग चटणी केली.

ही चटणी नक्की करून पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवा.
- मोहिनी घारपुरे - देशमुख

#mykitchenkey

शुक्रवार, २८ मे, २०२१

बॅरिस्टर ..


मराठी रंगभूमीनं आपल्याला जे काही दिलंय त्याचं ऋण शब्दात फेडणं निव्वळ अशक्य.. एकेक अफलातून विषय आणि त्यावर आधारित नाटकं. कधी जीवनाच्या निरनिराळ्या पैलूंवर प्रकाश टाकणारी, कधी समाजातील चुकीच्या रूढीपरंपरा, विषमता, भेदाभेद यावर घणाघाती टीका करणारी, कधी जीवनमूल्यांना प्रकाशझोतात आणणारी तर कधी हलकीफुलकी विनोदी .. औटघटकेची करमणूक देऊन आपल्याला आपल्या दैनंदिन समस्यांपासून चार घटका मुक्त करणारी .. 
मराठी माणसानं मराठी नाटकांवर इतकं भरभरून प्रेम केलं आहे याचं कारणही हेच आहे की या रंगभूमीला मराठी माणसांचं जीवन, त्याची मूल्य, त्याचं जगणं, त्याचे दोष आणि गुणही, त्याची सुखदुःख आणि स्वप्न हे सारं सारं कळलं आहे. ही रंगभूमी आपल्या या लेकरांना म्हणूनच आपलं मन जाणणारी माय न वाटली तरच नवलं.. 
या रंगभूमीवर वावरणारे एक से एक कलाकार, नटश्रेष्ठ आणि मराठी माणसाचं मन.. त्यांचं जगणं ज्यांनी आपल्या लेखणीतून मोठ्या कुशलतेने कागदांवर उतरवलं ते लेखक .. त्यांच्या लेखणीला तर त्रिवार सलाम.. मग या लेखणीने साकारलेली नाटकं प्रत्यक्षात जेव्हा ताकदवान अभिनेते, अभिनेत्री मिळून पडद्यावर साकारतात तेव्हा त्या नाटकाचं सोनं झाल्याशिवाय रहात नाही..आणि अर्थातच ते सोनं व्हावं यासाठी अहोरात्र झटणारे समस्त लहानमोठे पडद्यामागचे कलाकार.. त्यांच्या कष्टाचे आणि त्यांच्या प्रतिभेचे ऋणही फेडणे अशक्य.. 
असंच एक या रंगभूमीवर तुफान गाजलेलं नाटक .... 'बॅरिस्टर' 
जयवंत दळवी लिखीत हे नाटक त्यांच्याच 'अंधाराच्या पारंब्या' या कादंबरीवर आधारित आहे. हे नाटक ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले पूर्वी साकारयचे. त्यानंतर हे नाटक माझे अत्यंत आवडते असे ज्येष्ठ अभिनेते सचिन खेडेकर यांनी साकारले. 
सचिन खेडेकर या अत्यंत श्रेष्ठ कलाकाराविषयी लिहीताना लेखणीचे शब्द अपुरे पडावेत.. पण तरीही मी तो प्रयत्न करणार आहे. एरवीही एखाद्या साध्याशा चार ओळींच्या कवितेला सचिनजींचा परीसस्पर्श होतो आणि ती कविता उजळून निघते मग या नाटकातील बॅरिस्टरची मध्यवर्ती भूमिका तर किती उजळून निघाली असेल याचा वाचकांना सहज अंदाज बांधता यावा.. हे संपूर्ण नाटक आपल्या अभिनयाच्या ताकदीवर एका उंचीवर नेऊन ठेवण्याचं श्रेय या नाटकातील अन्य कलाकारांनाही तितकंच जातं खरं, पण तरीही मध्यवर्ती पात्राच्या एकूण एक छटा ज्या ताकदीने सचिनजींनी साकारल्या आहेत त्याला मात्र तोड नाही. 
ही कथा साधारण 1920 सालातली असावी.. तो काळ जेव्हा हिंदू धर्मात विधवा विवाहाला मान्यता नव्हती. विधवेचा जन्मतःच मिळालेला सुंदर दिसण्याचा अधिकारही सक्तीने काढून घेण्यात येई, तिचे केशवपन करणे, तिच्या साजशृंगारावर बंधनं घालणे, आलवणात लपवलेला तिचा देह की ज्याचे कोणतेही लाड तिने नवऱ्याच्या मृत्यूपश्चात करायचे नाही, चवीढवी मारायच्या.. स्वखुशीने तसंच देहाच्या नैसर्गिक वासनांनाही मारून टाकायचं.. कधी मनाविरूद्ध सक्तीने तर कधी आपलंच नशीब म्हणत गप्प बसायचं. एकीकडे स्त्रियांची ही कथा तर पुरूषांनाही धर्म पालनाची सक्ती. मोठाल्या पिळदार मिशा ठेवायच्या, डोक्यावर शेंडी, गळ्यात जानवं, धोतरपगडी हाच एकमेव पोषाख. असं सगळं समाजातलं चित्र. 
अशा सामाजिक परिस्थितीत त्या काळी विलायतेहून शिकून आलेले बॅरिस्टर .. ( राऊ .. अर्थात सचिन खेडेकर ), त्यांचा एक छान चौसोपी वाडा, वाड्याबाहेर बॅरिस्टरांनी मुद्दाम आवर्जून फुलवलेली बाग, बॅरिस्टरांनी जग पाहिलंय म्हणून ते सुधारणावादी झालेले.. जीवनाकडे सुंदरतेने बघण्याची त्यांची दृष्टी विकसीत झालेली, इथल्या रूढी परंपरा आणि स्त्रियांना मिळणारी काहीशी अमानवीय वागणूक या सगळ्या सगळ्याप्रती त्यांच्या मनात काहीसा संताप, तिडीक .. याला कारणं तसं म्हटली तर अनेक.. पण महत्त्वाचं कारण म्हणजे, अगदी लहान वयातच त्यांची विधवा झालेली मावशी ( इला भाटे ) .. या मावशीवर जेव्हा आभाळ कोसळतं तेव्हा राऊ लहान असतो. पण तरीही नवऱ्याच्या मृत्यूपश्चात होणारा आपल्या मावशीचा छळ त्याला तेव्हाही पहावत नाहीच म्हणून तो तिच्या सासऱ्याशी अगदी मारामारी करून मावशीला आपल्या घरी घेऊन येतो. त्याची खूप इच्छा असते की मावशीनं असं आलवणात (लाल रंगाचं अंगवस्र) वावरू नये, तिनं केशवपन करू नये.. त्यापेक्षा तिनं तिचं जीवन पुढे फुलवावं, तो तिचा.. नव्हे तमाम विधवा महिलांचा हक्कच आहे, कारण नवरा मेला यात त्यांचा काय दोष .. पण छे.. मावशीला हे सगळं पटलं तरीही धर्माविरूद्ध उभं राहून पुढे जाण्याची तिची काय बिशाद .. म्हणून ती बिचारी विधवेचा धर्म स्वीकारूनच राऊकडे रहात असते. राऊचे वडील .. आप्पा .. तेही कोर्टातील मातब्बर असामी.. पण अचानक एके दिवशी त्यांना कसलंतरी वेड लागतं, तेच आणि तसंच वेड राऊच्या मोठ्या भावाला म्हणजे नानासाहेबांनाही कालपरत्वे लागतं. सतत वाड्यातल्या एका खुर्चीवर ही दोन वेडी माणसं समोरासमोर बसलेली पाहून राऊच्या उमलत्या मनाला भय न वाटलं तरच नवल.. तीच भीती वारंवार त्यांना छळत असते. एकीकडे प्रवाहाविरूद्ध वागण्याचं, जमल्यास प्रवाहाला आपल्या दिशेने नेण्यासाठी मनाची धडपड आणि त्यात ही अगतिक भीती की न जाणो .. भविष्यात आपल्यालाही आपल्या वडिलांसारखं, भावासारखं वेड लागेल की काय .. याचा कळत नकळत फार खोल परिणाम बॅरिस्टरांवर होत असतोच.. पण हे सगळं मनातलं वादळ खरं तेव्हा बाहेर पडायला लागतं, जेव्हा त्यांचे भाडेकरू असलेले भाऊराव ( अनिकेत विश्वासराव ) आपल्या नव्या नवरीला, मनोरमा ऊर्फ राधाक्काला ( सुजाता जोशी ) घेऊन वाड्यावरच्या आपल्या खोलीत बिऱ्हाड थाटतात. 
जातीवंत सुंदर असलेली, विनम्रतेने, मर्यादेने वागणारी राधाक्का बॅरिस्टरांच्या एकदम डोळ्यात भरते. याचं कारणही कुठेतरी त्यांच्या भूतकाळात दडलेलं असतं. विलायतेला जिम नॉर्टन नावाच्या त्यांच्या मित्राच्या बहीणीबरोबर, ग्लोरियाबरोबर एक अलवार नातं बॅरिस्टरांचं जुळतंही पण त्यांचं खरं प्रेम मात्र इथे, मायदेशी असलेल्या देवयानी गोरेवर असतं.. तिच्याशी त्यांना लग्न करायचं असतं म्हणून ते ग्लोरियाचं प्रेम स्वीकारत नाहीत आणि पुढे भविष्यात मात्र देवयानीशीही त्यांचं लग्न होऊ शकत नाही कारण बॅरिस्टरांच्या घराण्यात असलेलं वेड ..
अशा एकट्याने वाढलेल्या या बॅरिस्टरांना काय तो आधार फक्त मावशीचा. घरात दिवसभर नानासाहेबांचं ते एकासुरात सतत, दत्त दत्त .. दत्ताची गाय.. गायीचं दूध .. दूधाची साय ... ही टकळी दर थोड्या थोड्या वेळाने सुरू.. अशा घरात बॅरिस्टरला मुलगी तरी कोण देणार..?
खरंतर विलायतेहून आल्याने बॅरिस्टरांचे शौकही फारच उच्च दर्जाचे.. उच्च दर्जाची अत्तरं, सुकामेवा, बागेतली सुगंधी फुलं .. या साऱ्या साऱ्याबरोबरच त्यांचा रूबाब, एटीकेट्स मॅनिरिझम यांनीही त्यांचं स्वतःचं व्यक्तिमत्त्व नि विचार छान बहरलेले.. पण तरीही नशीब मात्र काहीस जणू त्यांच्यावर रूसलेलं.. 
म्हणूनच आपल्यासमोर दिसणारी राधाक्का त्यांना आकृष्ट करत असते पण तरीही त्यांनी स्वतःची मर्यादा कधीही ओलांडलेली नसते. भाऊरावांची ते निरलसपणे.. एखाद्या मित्राने करावी तशी थट्टा करत असतात, राधाक्कांना रोज आनंदाने बागेतली सुवासिक फुलं देत असतात पण त्या सगळ्यात कधीही वासनेचा स्पर्शही नसतो. 
अशातच एकदा बॅरिस्टरांना विलायतेहून पत्र येतं आणि त्यात ग्लोरियाला वेड लागल्याचं कळवलेलं असतं. या पत्राने बॅरिस्टर सैरभैर होतात.. त्यांचा मानसिक तोलच ढळतो, अगदी बिथरल्यासारखी त्यांची अवस्था होते .. मग भाऊरावांशी मोठ्यामोठ्याने आक्रंदत ते आपलं मन मोकळं करत जातात आणि अखेरीस धाय मोकलून रडतात. जीवनाचं हे विद्रुप रूप बॅरिस्टरांसारख्या हळव्या मनाच्या माणसाला पचवणं निव्वळ अशक्य.. पण त्यापुढे ते असहाय्य होत असतात वारंवार आणि त्यानंच त्यांचं मन त्यांना खात असतं. अखेर त्यांच्या मनातलं मळभ थोड्या वेळानं दूर होतं.. नि दिवस पुढे जात रहातात. 
सारं कसं छान सुरू असतं.. राधाक्का भाऊरावांच्या संसारात छोटा गोड बाळ जन्माला येतो तशी वाड्यावर बॅरिस्टरांच्या आणि मावशीबाईंच्याही जीवनात एक नवी दरवळ पसरते. छोट्या बाळाचं अगदी मायेने करण्यासाठी जणू बॅरिस्टर, मावशीबाई आणि राधाक्काची चुरसच चाललेली असते.. पण वरवर दिसणाऱ्या या निखळ प्रेमामागे प्रत्येकच पात्राची राहिलेली अपूरी इच्छा त्या बाळाच्या माध्यमातून पुरी होत असल्याचं प्रसंगानुरूप कळतं तेव्हा आपल्या मनात कालवाकालव होते. एकदा राधाक्काची नजर चुकवून मावशीबाई बाळाला आपल्या पदराखाली धरतात नि ममतेचा पाझर फुटतो का हे देखील तपासून पहातात. नंतर खुसुखुसु हसत जेव्हा ते राधाक्काला ही गोष्ट सांगतात तेव्हा राधाक्काला क्षणभर कसनुसंच होतं.. पण एक स्त्री म्हणून ती मावशीबाईंना शब्दानेही दुखावत नाही उलट मनावर दगड ठेऊन समजूनच घेते.
अशातच एके दिवशी वाड्यातून नानासाहेब कुठेतरी निघून जातात नि घराच्या सुखाला सुरूंग लागतो. बॅरिस्टर नि मावशी हादरतात. आपल्या मोठ्या भावासाठी बॅरिस्टरचं मन तळमळतं. त्यांचा शोध घेणं सुरू होतं. त्यावेळी पावसाळ्याचे दिवस असतात. बॅरिस्टरांचे मित्र भाऊसाहेब देखील नानासाहेबांच्या शोधासाठी तब्बल आठवडाभर पावसापाण्यात कुठे कुठे फिरत रहातात आणि अखेरीस तेच आजारी पडतात. अक्षरशः तडकाफडकी पुढल्या अवघ्या दोनच दिवसात भाऊसाहेबांचा मृत्यू होतो. साऱ्या घरादारावर अवकळा पसरते. आता राधाक्का आणि बाळाचं कसं होणार या काळजीने मावशीबाई नि बॅरिस्टर फार फार अस्वस्थ होतात.. पण तरीही ते तिची साथ देणार असतात.. आणि अशातच भाऊरावांचे वडील तात्याराव पोरगा आजारी आहे कळताच गिधाडासारखे राधाक्कावर नजर ठेऊन वाड्यावर आलेले असतात. 
तात्याराव तसा काही फार बरा माणूस मुळातच नसतो. बाई बाटली यांना सोकावलेला तात्याराव .. त्याच्या याच अवगुणांमुळे भाऊराव त्याच्यापासून दूर इथे वाड्यावर स्वतंत्र बिऱ्हाड थाटून रहात असतात. राधाक्कालाही आईवडील नसतात त्यामुळे आज जेव्हा अशी वेळ येते तेव्हा तिच्या पाठीशी मावशीबाई आणि बॅरिस्टरांशिवाय कोणीच नसतं. तात्याराव फारच बनेल आणि रंगेल माणूस.. बॅरिस्टरांची आणि मावशीबाईशी आल्या दिवशीच भांडण काढतो नि आपल्या मार्गातील अडथळा मोठ्या शिताफीनी बाजूला करतो. 
दुसऱ्या दिवशी वाड्यातील शांतू न्हाव्याला गुपचुप खोलीवर बोलावतो नि राधाक्काचं केशवपन करून टाकतो. बॅरिस्टरांना हे मुळीच खपत नाही.. राधाक्काचा आक्रोश ऐकून बॅरिस्टर व्याकूळ होतात .. कारण असंही या सगळ्या हिंसक, अमानुष प्रथांवर त्यांचा राग असतोच पण तरीही त्या क्षणी ते असहाय्य झालेले असतात. आता पुढल्या दोन दिवसातच तात्याराव राधाक्का आणि बाळाला घेऊन जाणार आणि पुढे राधाक्काचं कसं मातेरं करणार याची चाहूल मावशीबाई, बॅरिस्टर आणि खुद्द राधाक्काला लागलेली असतेच... 
दुसऱ्याच दिवशी उत्तररात्रीला राधाक्का स्नानासाठी विहीरीवर जाते तेव्हा अर्धवट झोपेतून उठून तिचा सासरा तिच्यापाठी जाऊन उभा रहातो. "तू आंघोळ कर .. पण मी तुला बघनार .. मी तुझ्यावर नजर ठेवनार .. तू कुठं पळून गेलीस म्हंजे .." असलं काहीतरी अर्धवट झोपेत मद्यधुंद अवस्थेत तो बरळतच राधाक्कावर हात टाकतो आणि राधाक्का त्याच्या डोक्यात कळशीच घालते नि त्याला ठार करते. बॅरिस्टर आणि राधाक्कानी मिळून हा कट रचून आलेल्या परिस्थितीतून मार्ग काढलेला असतो. राधाक्का आणि बाळाला आता वाड्यावरून कोणीही हलवू शकणार नसतं, तसंच लोकांची तोंडही आपसूकच बंद रहाणार हे आता उघड असतं.
पुढे तीन चार महिने होतात.. एकाकी असहाय राधाक्काला आता केवळ बॅरिस्टरांचा आणि मावशीबाईंचाच आधार असतो.. तसंच मावशीबाईलाही आपल्या या वाड्याची आणि बॅरिस्टरची काळजी वाटत असतेच .. तितकंच स्वतःचं असं अर्धवट राहिलेलं आयुष्य .. त्यालाही राधाक्का सून म्हणून आली तर अर्थ येईल असं वाटून ती एके दिवशी राधाक्काला बॅरिस्टरशी लग्न करायचा सल्ला देते. बॅरिस्टरनी विचारलंच तर नाही म्हणू नकोस पोरी .. असं ती सांगायला आणि त्याच दिवशी सकाळी बॅरिस्टरनं राधाक्काला मागणी घालायला अगदी बोलाफुलाची गाठ पडते.. 
बॅरिस्टरांना असं भुंड डोकं केलेली विधवा, असं विद्रूप झालेली स्त्री अजिबात आवडत नाही हे जाणून राधाक्का केस वाढवायला लागलेली असते, हातात बांगड्या घालायला लागलेली असतेच.. आणि अशातच आता मावशीबाईंचाही आपल्याला विरोध नाही हे लक्षात येऊन ती बॅरिस्टरांना लग्नासाठी रूकार भरायला विषय काढते..पण हाय रे .. नियतीचा खेळ काही निराळाच असतो असं म्हणतात ना.. 
आजही तेच होतं.. राधाक्काशी लग्न करायचं, बाळाचं बाप व्हायचं, पुढे राधाक्काला घेऊन परदेशात जायचं, ग्लोरियाच्या समाधीवर फुलं अर्पण करायची हे सारं सारं स्वप्न जेव्हा सत्यात उतरवण्याची वेळ येते तेव्हा हळव्या मनाच्या बॅरिस्टरांना ते झेपतच नाही.. त्यांना आजवर जी भीती असते तीच खरी ठरते... नानासाहेबांची खुर्ची जणू बॅरिस्टरांना खुणावत असतेच आणि नेमक्या याच क्षणांनी दगा देत बॅरिस्टरलाही अखेर वेड लागतं.. 
प्रभु मजवरी कोपला ... या आर्त सुरांनी नाटकाची सांगता होते आणि आपल्या मनात मात्र एक व्याकूळ सूर दाटून रहातो..
माणसाची स्वप्न, माणसाचं मन नि नियतीचे क्रूर गुंतागुंतीचे खेळ या साऱ्यासाऱ्यापाशी आपलं भावविश्व ठेचकाळत रहातं. 

- मोहिनी घारपुरे - देशमुख


Translate

Featured Post

अमलताश