शुक्रवार, २५ डिसेंबर, २०२०

केक .. केक .. केक ..!

बेसिक स्पॉन्ज केक
बेसिक चॉकलेट केक
केक बनवायला मला फार्फार ... हो फार फारच आवडतं.. आणि केक खायलाही.. प्रचंड आवडतं. तो दिल चाहता है मधला फेमस डायलॉग आहे नं.. 'केक खाने के लिए हम कही भी जा सकते है ...' अगदी तस्संच काहीसं.. !

गेल्या काही वर्षात साधा स्पॉन्ज केक बनवण्यात मी तरबेज झालेली आहे. त्यामुळे मनात येईल तेव्हा निरनिराळ्या आकारांचे आणि चवींचे केक बनवण्याचा जणू एक नवा छंद मी जोपासला आहे.

'तुझा केक हमखास कसा चांगला होतो?' असा प्रश्न अलिकडे मला बऱ्याच जणांनी विचारला आहे आणि अनेकांनी माझी केकची रेसिपीही मला विचारली आहे. मी जो केक बनवते त्यात वेगळं, विशेष असं काहीच नाही. पण ही सुयोग्य कृती शिकण्यासाठी मी दीर्घकाळ बरेच प्रयत्न केलेले आहेत. अनेकदा माझे केक सपशेल फसलेले आहेत पण तरीही मी स्वतःला कोणतीही दूषणं न देता, वारंवार केक बनवण्याचा घाट घालत गेले आणि चुकत चुकत शिकत गेले आहे. केकवरचं आयसिंग शिकायचं म्हणून केवळ एका बेकरीत केक बनवण्यासाठीचा एक दिवसाचा वर्कशॉप बरीच यातायात करत अटेंड केलेला आहे.. त्याबद्दल पुन्हा कधीतरी .. तर असा हा माझा केकचा छंद !
केक बनवण्याचा छंद जोपासणारे माझ्यासारखे अनेक तरूण तरूणी माझ्या माहितीत आहे. त्या सगळ्यांनीच आपली स्वतःची अशी केकची खास रेसिपी स्वतःपुरती हातची राखून ठेवलेली असते. प्रत्येकाचं केकचं गुपीत त्याच्यापाशी पण माझ्याकडचं गुपीत आज ख्रिसमसच्या सुमुहूर्तावर मीच खास तुम्हा वाचकांसाठी फोडतेय .. माझ्याकडून माझ्या वाचकांना ही एक सुंदरशी भेटच जणू ..

तुम्ही माझी ही रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंटबॉक्समध्ये नक्की कळवा.

साधासोपा बेसिक स्पॉन्ज केक (अंडेविरहीत) -

साहित्य -

दूध (सायीसह) - एक ते दीड कप

दही - पाव ते अर्धा कप

पिठीसाखर वापरत असाल तर दीड ते दोन वाटी

जाडीसाखर वापरत असाल तर एक वाटी

मैदा ( किंवा कणीकही वापरू शकता ) - दीड ते दोन वाटी

तेल ( किंवा तूप किंवा बटर किंवा मार्जरिनही वापरू शकता ) - पाव ते अर्धा कप

बेकींग पावडर बेकींग सोडा - पाव ते अर्धा चमचा प्रत्येकी 

व्हॅनिला इसेंस - चार थेंब किंवा वेलची पावडर अर्धा चमचा

चिमटीभर मीठ (चवीसाठी)

कृती -

1. दूध, दही आणि साखर छान एका बाऊलमध्ये एकत्र करून एका चमच्याने किंवा बीटरने किंवा hand blender / whisker ने एकजीव करून घ्या आणि झाकून बाजूला ठेऊन द्या. जर वेलची पावडर वापरणार असाल तर याच वेळी ती या मिश्रणात घालावी.

2. आता दुसरीकडे मैदा, बेकींग पावडर व बेकींग सोडा एकत्र चाळून घ्या. जर चॉकलेट फ्लेवरचा बेस हवा असेल तर कोको पावडरही याच वेळी चाळून घ्या.

3. आता झाकून ठेवलेला बाऊल उघडा आणि त्यात चाळलेले सर्व कोरडे साहित्य घटक घाला, दोनचार थेंब व्हॅनिला इसेन्स घाला आणि छान एकत्र करा.

4. केकचं मिश्रण तयार .. आता यात पाव ते अर्धा कप तेल घाला .. यामुळे केकला छान ग्लेझ येते आणि केक आतून कोरडा होत नाही.

5. केकचं मिश्रण फार घट्ट वाटत असेल तर आपल्या अंदाजाने थोडंस दूध घालून सैल करायला हरकत नाही.

6.  केकच्या टीनला तेल किंवा साजूक तुपाचा हात लावून सगळीकडून कोटींग करून घ्या व वरून मैदा भुरभुरवा. खरंतर मैदा नाही भुरभुरवला तरीही चालतो .. कारण तेलातुपाच्या कोटींगमुळे केक भांड्याला चिटकत नाही हा माझा आजवरचा अनुभव आहे.

7. केकचं मिश्रण केकच्या भांड्यात ओता. भांडं दोनचारदा टॅप करा आणि मायक्रोवेव्ह असेल तर कन्व्हेक्शन मोडमध्ये 180 डीग्री सेल्सिअसवर वीस ते पंचवीस मिनीटं केक बेक करा.

8. मायक्रोवेव्ह नसेल तर हा टीन चक्क गॅसवर एका मोठ्या कढईत स्टँन्डवर ठेवा व कढईवर झाकण ठेऊन मंद आचेवर हा केक पंचवीस ते तीस मिनीटं बेक करायला ठेवा.

9. केक बेक होत आला की एखादी सुरी किंवा टूथपिक केकच्या मधोमध खालपर्यंत टोचून केक आतूनही छान बेक झालाय की नाही हे चेक करा. केक जर छान बेक झाला असेल तर सुरी वा टूथपिकला तो अजिबात चिकटत नाही.

अर्ध्या तासातच घरात मस्त दरवळ पसरेल आणि छानसा केक खायला तय्यार होईल..

माझी रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंटबॉक्समध्ये तुमचे अनुभव नक्की कळवा.

(एक खास गुपीत सांगते हं .. बरेचदा दुधाच्या पातेल्यात साधारण एखाद दीड वाटी दूध शिल्लक राहिलेलं दिसलं की मी झटपट त्याच पातेल्यात केक बनवायला घेते.. अगदी अर्ध्या तासात केक तयार होतो आणि दूधाच्या पातेल्याला चिकटलेली सगळी साय सत्कारणी लागते.. शिवाय येताजाता तोंडात टाकायला एक छानसा पदार्थही होतो. जर मैद्याऐवजी कणिक वापरलीत तर फारच छान. तुमच्या आवडीनुसार खाण्याचे रंगही वापरू शकता. )







....................................................

ख्रिसमस स्पेशल सोपा प्लम केक

मी विचार करत होते की आपल्याकडे ना रम, ना ऑरेंज ज्यूस ना काही .. मग आपण ख्रिसमस स्पेशल प्लम केक बनवायचाच नाही का .. तर माझ्या मनानी उत्तर दिलं .. की अगं आपण घरगुती पातळीवर जो पदार्थ बनवतो ना तो तर फक्त आपणच आपले खाणार असतो. मग एखाद्या घटकासाठी आपण आपला आनंद का मारायचा .. आणि मग मी ठरवलं, की जे नाही त्याचा विचार न करता जे आहे किंवा जे सहज उपलब्ध होईल असं सामान वापरून केक बनवायला काय हरकत आहे नै ..
आणि मग .. तयार केला, चमचमता चॉकलेट प्लम केक (विदाऊट एग्स आणि विदाऊट सोक्ड ड्रायफ्रूट्स) तर आज माझ्या वाचकांसाठी ही रेसिपीही येथे देत आहे.. कदाचित तुम्हाला करून पहावीशी वाटली तर जरूर करा .. अर्ध्या तासात केक तयार होतो.

साहित्य -

1. बेसिक केकसाठी लागणारे सर्व घटक
2. ड्रायफ्रूट्स, कोको पावडर आणि गार्निशिंगसाठी लागणारे साहित्य तुमच्या आवडीचे.
3. दोनचार लवंगा कुटून केलेली लवंग पावडर, दालचिनीचा लहान तुकडा कुटून केलेली दालचिनी पावडर, अर्धा चमचा सुंठ पावडर


कृती -

1. आता कोको पावडरचा वापर करून वर दिलेल्या कृतीप्रमाणे बेसिक बॅटर बनवून घ्या.
2. त्यात वरील सर्व साहित्य मिक्स करा आणि मिश्रण एकजीव करून केक बेक करा.
3. छान बेक झालेल्या केकला गार्नीश करा आणि मस्त आस्वाद घ्या. 







- मोहिनी घारपुरे - देशमुख

#mykitchenkey

मंगळवार, १५ डिसेंबर, २०२०

#Myकिचनkey


माझ्या कुकींगचं तंत्रच वेगळं 

पदार्थांच्या व्यापापेक्षा,

समजून उमजून करते मी पदार्थ .. !

अमुक एका पदार्थासाठी लागणारं

एखादं साहित्य नसले तर ... 'अडायचं नाय'

जे असेल साहित्य त्यात आपण .. 'लढायचं हाय' 

चव, रंग, रूप उन्नीस बीस झालं तरी कधीमधी मला चालतं

अहो .. हॉटेलात का खात आहोत आपण ..? हे तर साधं ताजं घरचं बनलेलं अन्नं .. !

आपले कष्ट अन् आपली 'डोक्यॅलिटी' आपल्या किचनात न्हायतर कुठे वापरायची ..?

कधी कधी 'भाकरी' थापायला गेलात तर प्रत्यक्षात पोळीही होऊ शकते हे लक्षात घ्यायचं

आणि झालंच खरं असं तर त्यातही सुख मानायचं

समोर आलेल्या अन्नाला कशाला नावं ठेवायची ..?

घ्या देवाचं नाव म्हणत आनंदे चव चाखायची ..

आपल्या श्रमाची आपणच ठेवायची किंमत

हीच तर असते स्वयंपाकाची गंमत 

वेगळ्या प्रकारे केले तर वेगळे पदार्थही तयार होतात

कधीकधी एकाच पदार्थातून चार नवे प्रकारही आपल्यालाच सुचतात.. 

करून तर पाहू म्हणत म्हणत शेकडो पदार्थ अस्सेच तर मी केले 

झाले जे छान त्यांचे 'फोटोसोहळे' साजरे केले ..

सोशल मीडियावर केला आपल्याच रेसिपीजचा बोलबाला

असं करत करतच तर छान सोपे चवीष्ट पदार्थ बनविण्याचा हुरूप मला आला

कोणी असो नसो खायला .. रोज एक नवा पदार्थ बनवत गेले

यानिमित्ताने आयुष्याची मी दिवसागणिक चव वाढवत गेले

त्याच सगळ्या रेसिपीज आता देणार आहे मी माझ्या ब्लॉगवरही ..

'#Myकिचनkey' ने शोधा या माझ्या रेसिपीज

नक्की वाचा, करून पहा .. नि कळवा तुमच्या प्रतिक्रिया

माझी स्टाईल कुकींगची आवडेलच तुम्हाला .. कारण हीच तर मोहिनीची दुनिया

- मोहिनी घारपुरे - देशमुख



शनिवार, ५ डिसेंबर, २०२०

शुभेच्छापत्र (ग्रीटींग कार्ड्स)


दुकानात किंवा कोणत्याही गिफ्ट शॉपीमध्ये खच्चून भरलेल्या एका विभागात निरनिराळे ग्रीटींग कार्ड्स बघताना मला फार मजा यायची. साधा कागदाचा तुकडाच म्हणा तो, पण तरीही, त्यावर लिखीत स्वरूपात किंवा कार्टून स्वरूपात इतक्या कल्पकतेने शुभेच्छा संदेश लिहीलेले असत. शिवाय त्या शुभेच्छा पत्रांचा गुळगुळीत आकर्षक कागद, उत्कृष्ट छपाई, त्यावर केलेलं सुंदर डिझाईन .. अगदी त्यांची गुळगुळीत आणि पेस्टल कलरची आकर्षक लहानमोठी पाकीटंदेखील मला फार फार भुरळ पाडत असत. पण ही शुभेच्छाकार्ड नेहमीच वेगवेगळ्या किंमतीची आणि बरेचदा असं व्हायचं की आपल्या पसंतीस जे कार्ड उतरेल त्याची किंमत नेहमीच आपल्या बजेटच्या बाहेर .. हो म्हणजे शाळा कॉलेजच्या दिवसात खिशात पैसे ते कुठून असणार नै एवढे .. पण तरीही कोणाचाही वाढदिवस असो किंवा अन्य कोणतंही ऑकेजन असो, कॉलेजरोडच्या आर्चीस गॅलरी नि तत्सम अनेक गिफ्ट शॉपींचे उंबरठे मी आनंदाने झिजवायचे कारण तिथली ही आकर्षक ग्रीटींग कार्ड्स पहात रहाणं मला नेहमीच आनंदाचं असायचं.

ते दिवस मनात खोलवर दबून गेलेले .. पण तेव्हापासूनच ही ग्रीटींग कार्ड्स बनवायची मनाला फार फार उत्सुकता होती. पण त्यासाठी लागणारा वेळ आणि निवांतपणा या दोन गोष्टी सापडणं कठीण .. यंदा कोरोनाची अवकृपा आणि सगळेच जण लॉकडाऊन .. मग अशातच ही ग्रीटींग कार्ड बनवून पहायची मनातली बऱ्याच वर्षांची सूप्त इच्छा एक दिवशी डोकं उफाळून वर आली नि मी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर माझ्या मुलीला साथीला घेऊन ही ग्रीटींग कार्ड्स बनवण्यासाठी वेळ काढला. 



लॉकडाऊनमध्ये जिथे जुजबी सामान उपलब्ध होत होते तिथे आम्हाला केवळ एका छोट्याशा दुकानात हे कार्डशीट्स मिळाले. पण तरीही मी खचले नाही. घरात मजजवळ असलेली रंगपेटी सोबत घेतली नि रोज एक ते दीड तास खर्चून आठ पंधरा दिवसात लहान आकाराची दहाबारा ग्रीटींग कार्ड्स बनवली. मी ग्रीटींग कार्ड्स तयार करत असताना माझ्या मुलीलाही एक एक कागद देऊन तिलाही शिकवत गेले. थ्रेड पेंटींग, कोलाज काम, कार्टून्स, मॅजिक पेंटींग असे काही प्रकार तिला यानिमित्ताने मी आवर्जून शिकवले आणि तयार झाली आमची सुंदर सुबक ग्रीटींग कार्ड्स .. 

आता हा एवढा घाट घातला तर याला जरा मोठ्या लेव्हलवर न्यावं असं वाटलं पण ते कसं घडावं .. म्हणून सोशल मीडियावर निहीमोही ग्रीटींगकार्ड्स कंपनी या नावाने (अद्याप आमची कंपनी वगैरे नाहीये पण भविष्यात होऊ शकते हा आशावाद बाळगून हे नाव दिलं) प्रमोशन केलं. मला आशा होती की थोड्याफार ऑर्डर्सही मिळू शकतील तर आणखी जोमाने काम करू .. पण ऑर्डर्स काही आल्याच नाहीत. मग आता या बनवलेल्या ग्रीटींग कार्ड्सचं काय करायचं हा विचार मनात सुरू असतानाच आणखी एक भन्नाट आयडीया मला सुचली. नॅशनल कॅन्सर इन्स्टीट्यूटमध्ये आमच्या अहोंमुळे वैयक्तिकरित्या जाऊन आम्हाला तेथील काही स्टाफ मेंबर्सना ही आमची कार्ड्स देता आली. या कोरोनाच्या काळात हॉस्पिटल स्टाफ समाजाची मनोभावे काळजी घेऊन खऱ्या अर्थाने कोरोना योद्धा म्हणून लढत आहेत त्यांच्याप्रती ऋण व्यक्त करण्याची आणि माझ्या मुलीत ही भावना, ही समज ऋजवण्याची ही एक उत्तम संधी असल्याचं माझ्या लक्षात आलं आणि मी तातडीने ही कल्पना अंमलात आणली. अर्थात, हे सगळं शक्य झालं ते माझ्या पतींनी व मुलीने मला योग्य साथ दिल्यानेच .. त्यामुळेच माझ्यापेक्षाही निहीराचेही विशेषत्त्वाने हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी कौतुक केले.. आणि आमची दिवाळी अत्यंत वेगळ्या पद्धतीने .. गोडवा देतघेत साजरी झाली.



- मोहिनी घारपुरे - देशमुख


( आपल्यालाही जर आमच्याकडून अशी सुबक, सुंदर हँडमेड शुभेच्छापत्र हवी असतील तर मला जरूर संपर्क करा. कमेंटबॉक्समध्ये आपली रिक्वायरमेंट कळवा .. आम्ही आपल्या ऑर्डरनुसार ग्रीटींग कार्ड्स बनवून देऊ. प्रति ग्रीटींग कार्ड रूपये 20 पासून सुरू )
( If any one of you need such beautiful handmade greeting cards for any occasion, feel free to contact me .. " Nihi_Mohi Greeting cards company" is ready to serve you.
20/- per greeting card (Bulk orders accepted) )




रविवार, २२ नोव्हेंबर, २०२०

'ये है बड़े काम का निंबू .. !!'

 स्पार्कल शाळेची भन्नाट आयडीया,

 लिंबांच्या सहाय्याने शिकवला अभ्यास




नाशिकमधल्या 'स्पार्कल शाळेत' कृतिशील शिक्षण पद्धती राबवली जाते तसंच, छोट्या छोट्या उपक्रमांमधून सर्वच विषयांशी मुलांची ओळख करून दिली जाते. कोव्हीडच्या या भयंकर अवघड काळात, जिथे सर्वच शाळा ऑनलाईन पद्धतीने सुरू आहेत, तिथे दरवेळी मुलांना घरात बसल्याबसल्या पुस्तकाखेरीज अन्य कोणत्या मार्गाने विविध विषय शिकवता येतील याचा विचार स्पार्कलचे शिक्षक सतत करत असतात आणि अशा विचारांती नेहमीच या शाळेतील शिक्षकांना विद्यार्थ्यांना घरबसल्या उपलब्ध साधनांमधून काय काय उपक्रम पालकांच्या मदतीने सहजी करता येतील याच्या एक से एक आयडीया सुचत असतात. 
अशीच एक भन्नाट आयडीया नुकतीच या शाळेतील शिक्षिका, माधुरी भालेराव यांनी आपल्या ज्युनियर केजीतील विद्यार्थ्यांना करायला दिली होती. घरोघरी सहज उपलब्ध असलेल्या लिंबांचा वापर करून विद्यार्थ्यांना लिंबू सरबत करून प्यायला तर सांगितलेच पण कसे .. ? तर आधी त्या सरबताची क्रीया विषद करून, लिंब मोजून आणि त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गणित, भाषा व विज्ञान या सर्व विषयांचा अभ्यासही शिकवला. अर्थात यासाठी पालकांची मदत घ्यावी लागलीच पण शाळेचे पालकही मोठे उत्साही .. ! ते या छानशा सोप्या उपक्रमात आपल्या मुलांबरोबर उत्साहाने सहभागी झाले. 
सुरूवातीला वर्गशिक्षिकेने विद्यार्थ्यांना लिंबातून मिळणाऱ्या 'व्हिटॅमिन सी'चे फायदे सविस्तर शिकवले, त्यानंतर लिंबं मोजायला सांगितली जेणेकरून मुलांचे अंकज्ञान वाढीस लागेल. मग विद्यार्थ्यांना लिंबाची चव घ्यायला सांगितली आणि त्याचबरोबर लिंबू सरबताची पाककृती वर्णन करायला सांगितली. हे करताना आपोआपच मुलांचे भाषाज्ञान वाढले .. विविध शब्द, क्रियापदं, विशेषणं यांचे ज्ञान विद्यार्थ्यांना मिळाले तसेच ही शाळा द्विभाषिक असल्याने मुलांना एकाच वेळी दोन भाषांतील निरनिराळे शब्द शिकता आले. उदाहरणार्थ, Drink म्हणजे पिणे, Make म्हणजे बनवणे, Cut म्हणजे कापणे अशा प्रकारे शिकवल्याने मुलांची शब्दसंपत्तीही वाढली. 
खरंतर, अशा उपक्रमांपेक्षा मुलांना प्रत्यक्ष शाळेत शिक्षकांच्या सहवासात जे शिकवले जाते त्याचीच ओढ आता अधिक वाटू लागली आहे.. शाळेची इमारत, तिथलं वातावरण, शाळेतील मित्रमैत्रिणींबरोबर हे असे उपक्रम करताना मिळणारा आनंद या साऱ्यासाऱ्याची आस या चिमुकल्या मुलामुलींना लागली नाही तरच नवल .. पण हा कोरोना आला नि चालत्या गाड्याला खीळ घालून गेला.. !
असो, तर हे ही दिवस जातील आणि घरोघरी अडकलेली चिमुकली मुलं पुन्हा लवकरच शाळेत जातील. आपल्या शिक्षकांना भेटतील, मित्रांबरोबर दंगा करतील आणि मुख्य म्हणजे खूप खूप छान अभ्यास करतील असा दिवस लवकर येवो हीच आता देवाकडे प्रार्थना ... 

- मोहिनी घारपुरे - देशमुख 
 





मंगळवार, २० ऑक्टोबर, २०२०

आभास

ती उठली. तो अजूनही अंथरूणातच होता. शांत झोपलेला. तिने एकवार त्याच्याकडे पाहिलं. तिला आठवलं, रात्री तो तिला हळूच स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होता. हलकेच तिच्या छातीवर तो हात फिरवणार इतक्यात तिने त्याचा हात दूर सारला होता. पुन्हा काहीवेळानं तो तिच्या जवळ सरकायला लागला तेव्हा पुन्हा तिनं झटकन त्याला अडवलं होतं.
आताशा, दोघांच्या रात्री विझल्या होत्या कारण तीच आता विझली होती. खरंच, कसं ना, जेव्हा स्पर्शातला रोमांच कळू लागतो त्या वयात आपण स्वतःला अडवत रहातो. आणि नंतर ती उत्सुकता कमीकमी होत जाते ..
अलिकडे तिचंही हेच झालं होतं. कारण हल्ली तो पूर्वीसारखा राहिलाच नव्हता. दारूच्या विळख्यात अडकलेल्या त्याला फक्त त्याच्या जाणीवा आणि त्याच्या वासना कळायच्या. चांगला सुशिक्षित असूनही, बायकोच्या कामवासनेविषयी त्याला काहीच देणंघेणं नव्हतं.
एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये झपाट्याने प्रगती करत त्याने भरपूर ऐशोआराम, सुखं कमावली नि दारूही सोबत आलीच. आणि इकडे ही त्याच्यासाठी झुरत राहिली.. आपलाच नवरा आणि आपल्यासाठीच त्याला वेळ नाही या गोष्टीनं खंतावून जाई. पण त्याची त्याला फिकीर नव्हती. तिची शरीरसुखाची गरज त्याच्यादृष्टीने बिनमहत्त्वाची होती.
लग्नानंतरच्या सुरूवातीच्या दिवसातही तिला जेव्हा इच्छा होई तेव्हा हा सतत बिझी .. आज काय नाईट शिफ्ट .. उद्या काय अमक्या उद्योगपतीची हॉटेलमध्ये खासगी पार्टी म्हणून सगळी व्यवस्था चोख लागणार .. अशी एक ना अनेक कारण .. काहीतरी मोठं, स्टेटस को फंक्शन रोजचंच आणि मग याला जातीने हजर रहाणं आलंच ! म्हणूनच याला मिळेल त्या आणि तेवढ्याशा वेळात हा तिच्याबरोबर सगळं घाईघाईने उरकून घेई आणि पुन्हा कामावर हजर होई.
अशातच एकदा तिचं कोडं सुटल्यागत झालं. त्याची वाट पहाता पहाता एकदा तिनं स्वतःच स्वतःला सुखी केलं.. आणि मग हे कायम घडू लागलं.. कारण असंही तो घरी येईपर्यंत तिच्या सगळ्या इच्छा मरून गेलेल्या असत. किंबहुना, तो जर नशेतच घरी आला तर हिचा संताप संताप होई, पण सांगायचं कोणाला आणि कशाला .. म्हणून ती सगळं सहन करत राहिली.
तोडण्यापेक्षा जोडणं महत्त्वाचं अशा संस्कारी घरातून आलेली ती, लग्न मोडताना लाख वेळा विचार करणारंच .. नाही का ? शिवाय घरातल्यांना सांगून मार्ग निघेलच याची खात्री नाही पण बदनामी तर होईलच हे तिला पक्क ठाऊक होतं.
तसं पाहिलं तर लौकीकार्थानं त्यांचं सगळं छानच सुरू होतं. फक्त अलिकडे त्याची तब्ब्येत खराब झालीये एवढच सगळ्यांना दिसे. हा असा सगळा चांगला माणूस आयुष्याच्या एका टप्प्यावर एवढं मातेरं करून ठेवेल यावर कोण विश्वास ठेवणार ? आणि मुळात तिलासुद्धा त्याचे तसे धिंडवडे काढायचे नव्हतेच .. कारण, कसा का असेना .. तो तिचा नवरा होता .. इथे पुन्हा तिच्यावर केलेले संस्कारच डोकं उफाळून वर येत आणि ती अगतिक होऊन जाई.
मुळात या लग्नातून आताशा तिच्या वाट्याला तिच्या हक्काचं शरीरसुख काही येत नव्हतं. ती घुसमटून जात होती आणि वाट शोधत होती. तिला हाक मारायची होती, आपल्या जवळच्या कुणाला .. तिला हा कोंडमारा सांगायचा होता.. पण एकदिवशी तिचीच तिला आत्मतृप्तीची वाट सापडली आणि सुखाचं दार उघडलं गेलं. त्यामुळेच मग, आता कशाला कोणासमोर रडायचं नि आपलं गाऱ्हाणं सांगायचं .. लोक काय रडून ऐकतील नि हसून सांगतील. त्यापेक्षा नकोच ते .. आपण आपल्या वाटेनं जाऊ .. जात राहू .. हेच तिनं एका निसटत्या क्षणी मनात पक्क करून टाकलं.
पहिल्या एकदोन आत्मतृप्तीच्या क्षणानंतर तिनं स्वतःला थांबवलं खरं पण तिला काय माहीत .. की ही वाटही निसरडीच होती .. आणि हल्ली, हल्ली तर तिला झपाटल्यागत झालं होतं. कारण, त्याच्या बेताल वागण्याने तिच्या हातून निसटून गेलेल्या अनेक अतृप्त रात्री ! आणि आता जणू या साऱ्या रात्रींचं कर्ज तिच्या डोक्यावर असल्यागत, अलिकडे सतत तिची अर्धवट शमलेली भूक उफाळून वर येई ... मग कसंही करून ती आतल्याआत हे वादळ शमवण्याचा प्रयत्न करीत राही. मग तिचंच तिला आश्चर्य वाटे. आपल्यातून वर डोकावणारी ती खरी की तिला विझवण्याचा खटाटोप करणारी मी खरी या अशा अनेक भासआभासांच्या गुंत्यात ती अडकत चालली होती. सतत डोक्यात अशीच द्वंद्व सुरू त्यामुळेच खरंखोटं कळेनासंच झालं होतं हल्ली तिला.
तो आपल्या बाजूला आहे आणि आपल्याला स्पर्श करू इच्छित आहे ही जाणीव झाली की तिचा गोंधळ उडायला लागे. हा खरंच आहे ना शेजारी .. की हे सगळं आपल्या कल्पनेतच घडतंय, आजवर त्याच्या अनुपस्थितीत आपण घडवत होतो तसं.. ? खरंच त्याला हवंय का आपलं मीलन .. ? की फक्त त्याला हवेत ते आपल्या देहाला चिकटलेले आपले अवयव ? की त्याला काही क्षण जी मजा येते .. तेवढीच हवीये फक्त.. ?
हल्ली, ती अशा आभासातच हरवत चालली होती आणि तो व्यसनात आकंठ बुडालेला..
दोघंही आपापल्या आभासी लाटांवर झुलत होते. आयुष्याची नौका आता कोणत्याही क्षणी पूर्ण बुडणार होती .. पण त्याची चिंता करायला मुळात वास्तवात यायला हवं ना .. तेच तर जमत नव्हतं.
ना तिला, ना त्याला ..
आणि हे सगळं कशामुळे ?
तर दारूच्या विळख्यात अडकलेल्या त्याने तिच्या भावनांचा, वासनेचा आणि त्यांच्या वैवाहिक जीवनाचा जो काही कोंडमारा करून ठेवला होता, केवळ त्यामुळेच !
तिला कालची रात्र आठवली ! तिला जाणवलं, आपली उमेदीची वर्ष सगळी निघून गेलीत.. आता वासनेचा तो थरारच संपत चाललाय आणि आता हवे आहोत आपण त्याला..? आता स्पर्शातून फक्त वेदनाच होतात जेव्हा आपल्या मनाला, अशा टप्प्यावर ..?
तिच्या मनात चीड, घृणा, तिरस्कार आणि संताप सारं काही उफाळून आलं आणि पुन्हा काही क्षणातच तिला बेचैनी आली.
अंथरूणावर त्याचं शरीर निजलं होतं.. आता सतत त्याच्या अंगाला येणार उग्र दर्प तिला किळसवाणा वाटू लागला होता .. या दारूपायी त्यानं स्वतःच्या सुंदर शरीराचं जे काही मातेरं केलं होतं ते तिला बघवत नव्हतं. त्याचं घटलेलं वजन, खप्पड झालेले गाल, डोळ्याभोवती आलेली काळी वर्तुळ, बलहीन शरीर आणि विझलेली गात्र .. त्याचं ते ओंगळवाणं रूप पाहून तिला शिसारी आली.. या अशा माणसाने आपल्याला स्पर्श करावा .. ई .. तिला स्वतःचंच शरीर नकोस वाटलं क्षणभर ..
तिला आठवलं, तिच्या लहानपणी दारूडा माणूस नुसता शेजारून जरी गेला तरी आई हात धरत असे तिचा चटकन् आणि आता आपलाच नवरा दारूडा होऊन आपल्या बिछान्यात झोपतोय .. कारण त्याचं प्रसन्न व्यक्तिमत्त्व पाहून आपण त्याला निवडलं म्हणून ..?
पण मग याला उपाय काय .. सोडून द्यायचं त्याला ? पण असं केलं तर आपण आपल्याच नजरेतून उतरू हे तिला माहित होतं.
आणि म्हणूनच आताशा ती आभासच खरा मानत होती.. तो आता माघारी येणार नव्हता हे तिला ठाऊक होतं. तो असूनही नसल्यासारखाच, त्यामुळेच तीही तिच्या वेळेला तिच्यासाठी कधीच अव्हेलेबल नसलेल्या नवऱ्याला, तो सोबत आहेच हे मानून स्वतःला तृप्त करत निघाली होती .. तिच्या रस्त्यानी .. कारण शेवटी, हे आयुष्य जितकं त्याचं होतं, तितकंच तिचंही होतंच ना ..आणि तिला जगायचं होतं.. घुसमटायचं नव्हतं .. कधीच .. म्हणूनच ती जगायला लागली होती... आणि आयुष्य ? ते आपल्या निश्चित गतीने पुढे सरकत होतं. पुढे सरकत रहाणार होतं..
अहोरात्र ..

- मोहिनी घारपुरे - देशमुख

सोमवार, १९ ऑक्टोबर, २०२०

कथा

हिरवा चाफा 
मोहिनी घारपुरे - देशमुख 

लपवलेल्या हिरव्या चाफ्याचा गंध खोलीभर दरवळला होता. ती खोलीत शिरली आणि तिनं तो गंध श्वासात भरून घेतला. हा दरवळ नेमका कुठून येतोय हे तिला आता शोधायचं होतं. त्या दोघांचा तो आवडीचा आणि नेहमीचाच खेळ..हिरव्या चाफ्याचं एखादं फुल त्यानं संध्याकाळी फिरून परतताना खिशात आणायचं नि कोणाच्याही नकळत बेडरूममध्ये लपवून ठेवायचं.
घरात नकळतपणे हा चाफा शिरला की त्याच्या सुगंधाने ती फुलून जायची. घरातल्या इतर मंडळींना चाफ्याचं तेवढंस वेड नव्हतं त्यामुळे त्यांना या दरवळीने अस्वस्थ व्हायचं नाही. ते फक्त तिलाच व्हायचं आणि तिचं असं अस्वस्थ होणं त्याला फारच गोड, मादक वाटायचं. म्हणून हा सारा खट्याळपणा तोही आवर्जून करायचा. लग्नाला सात आठ वर्ष झाली असली तरीही..!
हिरवा चाफ्याचा सुगंध गोड आणि मादक..अगदी तिच्यासारखा..
" ए मला ना या चाफ्याने नुसतं वेडं व्हायला होतं...असं वाटतं, आपल्या प्रत्येक तशा क्षणांपूर्वी खोलीभर चाफ्याची फुलं अंथरलेली असावीत...हिरव्या चाफ्याची फुलं आणि आपल्या निर्मळ, निर्वस्त्र देहाला या फुलांनी स्पर्श करावा. या फुलांचा गंध आपल्या शरीरावर अलगद भरून रहावा. आपल्या त्या धुंद क्षणांना या अलवार गंधानी सुंगंधित करावं आणि तो दरवळ घेऊनच नंतर कितीतरी वेळ आपल्या शरीरांनी या जगात वावरावं. मग तू कितीही दूर गेलास तरीही नंतर तुझा हा गंध आठवून मी स्वतःला तुझ्यात मिसळून घेईन. एकेका फुलाने तू माझा देह सजवत जा आणि मी तुझा..अशा क्षणांना खोलीत ते गाणं, जयतीर्थ मेऊंडींच्या आवाजातलं, 'तुझा गंध येता मनी छंद वाजे मला वेधणारा पुन्हा पुन्हा ...' , तेही सुरू असावं म्यूझिक सिस्टीमवर .. काय रोमँटीक वाटेल नै ..?"
लग्नानंतर एकमेकांच्या मिठीत निवांत पहुडलेले असताना तिनं एकदा त्याला मोठ्या अधीरतेने तिची फँटसी सांगितली होती. तिची फँटसी ऐकल्यावर त्यालाही खुदकन् हसू आलं होतं त्या क्षणी. किती गोड, किती साधं आणि किती सुंदर बोलली होती ती! या अलवार क्षणांना बंद कुपीतल्या अत्तरासारखं चिरकाल दरवळत ठेवण्यासाठी इतका विचार? आणि तोही हिच्यासारख्या एका साध्या गोड मुलीने केलेला असावा...त्याला आश्चर्य वाटलं आणि कौतुकही वाटलं तिचं.
"पण हिरवा चाफाच का? कोणतंही फुल चालेल की..त्यात काय .. !"
त्यानं तिला घट्ट मिठीत ओढत विचारलं. तिचे टप्पोरे बोलके डोळे आणि रसरसलेले ओठ पाहून तो पुन्हा धुंद झाला आणि त्यानं तिच्यावर स्वतःला स्वार केलं. तिही त्याच्या अशा उन्मादक स्पर्शाने रसरसून बहरली. हे क्षण आता दीर्घ झाले होते. शरीराच्या धुंदीला चाफ्याच्या गंधाची आठवण येऊन दोघांच्याही संवेदना फुलून आल्या होत्या. खोलीत चाफा कुठेच नव्हता पण चाफ्याचा दरवळ त्याक्षणी त्या दोघांनाही अनुभवला होता. तो तिच्या फँटसीत तनामनाने फुलून आला होता. ती रात्र सुकुमार झाली होती..आणि चांदण्यांच्या मंतरलेल्या पांघरूणाखाली ते दोघं एकमेकांच्या कुशीत निवांतपणे झोपली होती.
रात्र सरली आणि दुसऱ्याच दिवशी त्याला संध्याकाळी घरी परतताना हिरव्या चाफ्याने खुणावलं. त्यानं गाडी झट्दिशी थांबवली. काल रात्रीच्या आठवणीनं तो तहानला झाला. तो सरसावला आणि त्यानं भराभर हिरव्या चाफ्याची दोन टप्पोरी फुलं तोडली आणि खिशात ठेऊन थेट घर गाठलं.
तिनं दार उघडलं आणि त्या मदमस्त सुगंधानी ती क्षणभर गोंधळली ..
" चाफा .. ? हिरवा चाफा आणलाएस का तू ..? खरंच ..?" आश्चर्याने त्याच्याकडे बघता बघताच तिच्या चेहऱ्यावर गोड हसू पसरलं. तिच्या डोळ्यात कालची रात्र तरळली. तिचे गाल लाजेनं लाल लाल झाले..आणि तो खुदकन् हसत बेडरूममध्ये जाऊन झट्दिशी ते फूल लपवून आला..
ती खोलीत शिरली.. आणि वेड्यासारखं ते फूल शोधू लागली.
"आहा..सापडलं ..!" असं म्हणून ती वळते तोच त्यानं तिला बिछान्यावर लोटली आणि दोघांच्या मर्जीने हा चाफ्याचा क्षण पुन्हा साजरा झाला.
या गोडगोड दिवसापासूनच तर हा लपवाछपवीचा खेळ त्या दोघात सुरू झाला होता. नवथर प्रणयाचा उन्माद आणि त्यातलं ते अवर्णनीय सुख आज लग्नाला एवढी वर्ष झाली तरीही त्या दोघांनी टिकवून ठेवलं होतं.
खोलीभर चाफ्याचा दरवळ हा असा रेंगाळत राहिला होता .. आजतागायत.. !

copyright @ mohinee_gharpure

(नुक्कड साहित्य संमेलनाच्या फेसबुक पेजवर दिनांक 14 जून 2019 रोजी प्रकाशित)

गुरुवार, १ ऑक्टोबर, २०२०

'स्पार्कल' शाळा - उपक्रमशील शाळा

'सृजनत्व' अन् 'कल्पकतेचा' रंगतो इथे सोहळा

नाशिकमधील 'म्हसरूळ' भागात नव्यानेच सुरू झालेल्या 'स्पार्कल प्रायमरी अँड प्री-प्रायमरी' शाळेचे वैशिष्ट्य म्हणजे ही द्विभाषिक शाळा आहेच मात्र या शाळेत उपक्रमशीलतेला अतिशय महत्त्व दिले जाते. शिक्षण देणे हे एखादे कार्य उरकण्याप्रमाणे न करता विद्यार्थ्यांना कृतिशील, उपक्रमशील पद्धतीने शिक्षण देण्यावर या शाळेतील शिक्षकांचा भर असतो. यापूर्वीच्या अनेक उपक्रमांचा दाखला त्याकरीता येथे आवर्जून देता येईल.. जसं, भाज्यांची ओळख हा विषय जेव्हा शाळेने घेतला तेव्हा नुसती भाज्यांची चित्र दाखवून नावं सांगणं एवढ्यावर हा विषय संपवला नाही तर मुलांना भाज्यांचं महत्त्व कळावं यासाठी पालकांना मुलांच्या डब्यातून भाज्यांचे निरनिराळे पदार्थ द्यायला सांगितले, शाळेने मुलांना चक्क शेतात तर फिरवून आणलंच तसंच बाजारातही भाजी दाखवायला नेलं. भाजीचं शेतात उत्पादन कसं होतं इथपासून ते बाजारात भाजी कशी विकली जाते, विक्रीची परिमाणं, वजन कसं करतात, भाजी विकत आणण्याकरीता पैसे कसे आणि किती मोजावे लागतात या साऱ्यासाऱ्याची तोंडओळख विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात करून दिली होती. इतकंच नव्हे तर विद्यार्थ्यांसाठी भाज्यांची एक नाटुकलीही शाळेने बसवली होती.. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर एक विषय घेतला की त्याचा पाठपुरावा करायचा आणि त्या विषयाशी गुंफत इतर विषय विद्यार्थ्यांना शिकवायचे आणि ते देखील वर्गात बसून नव्हे तर प्रत्यक्ष कृती करायला उद्युक्त करून हेच तर स्पार्कल शाळेचं वैशिष्ट्य .. !
लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून विद्यार्थी जरी घरी असले तरी शाळेने विद्यार्थ्यांनी घरातही टीव्ही व मोबाईलपासून जास्तीत जास्त वेळ लांब रहावे याकरिताही शाळेने सतत विद्यार्थ्यांना निरनिराळ्या उपक्रमांमध्ये व्यस्त ठेवलेले आहे. जसं, शेंगदाण्यांचा एक निराळाच उपक्रम या विद्यार्थ्यांना घरातच राहून शिक्षकांनी करायला सांगितला होता आणि ज्याबद्दल मी गेल्यावेळी लिहीलंही होतं ते वाचकांना आठवत असेलच.. !
कोरोनाच्या वाढत्या कहरामुळे शाळा सुरू होण्याची चिन्ह काही दिसेनात, अशावेळी शिक्षकांनाही आता विद्यार्थ्यांना सतत काय उपक्रम द्यावेत हे आव्हानच झालेले आहे. मात्र, असे असले तरीही, हे आव्हानही स्पार्कलच्या शिक्षकांनी लीलया पेललेले आहे. नुकतंच या शाळेतील शिक्षिका मृणाल जोशी यांनी आपल्या सिनीयर केजीच्या विद्यार्थ्यांना गणित विषयातील एकक - दशक ही संकल्पना शिकवण्यासाठी एक छान कल्पक उपक्रम घेतला आणि तो देखील विद्यार्थी घरी असतानाच .. त्या उपक्रमाविषयी खुद्द मृणाल ताईंनीच त्यांचा अनुभव लिहून पाठवला आहे, त्यांच्याच शब्दात तो इथे देते आहे -
" उपक्रमशील शिक्षण पद्धती असं म्हटलं की पालकांना हमखास प्रश्न पडतो, "म्हणजे नेमकं कसं शिकवतात तुमच्या शाळेत ?" तर याचंच एक उदाहरण मी आज तुम्हाला सांगणार आहे.
सध्या लॉकडाऊनमुळे आपण सगळेच घरात बसलोय. त्यामुळे मुलांना शिकवायचं कसं आणि उपक्रम कसे व कोणते द्यायचे हा मोठा प्रश्न पालकांना जसा पडला आहे तसाच आम्हा शिक्षकांनाही पडला आहेच. पालकांचा विचार केला तर सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे मुलांचा वेळ कुठे सत्कारणी लावायचा ? नाहीतर उरलेल्या वेळेत ते फक्त मोबाईल किंवा टीव्ही बघत बसतात ! पण आपण घरातल्या घरातही नानाविध कल्पक उपक्रम मुलांना करायला देऊ शकतो. विशेषतः असे उपक्रम ज्यातून विद्यार्थ्यांचं अध्ययन सोपं जाईल.
मला सिनियर केजीच्या वर्गात 'एकक आणि दशक' ही संकल्पना शिकवायची होती. मग त्यासाठी मला एक छान कल्पना सुचली. अनायसे पावसाळा आहे. बाहेर झाडं छान बहरली आहेत आणि अनेक फुलझाडांवर भरपूर फुलं बहरलेली दिसू लागली आहेत. मग प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या वा तिच्या घराजवळील फुलझाडांची फुलं गोळा करून आणायला सांगितली आणि मग एकक आणि दशक ही संकल्पना लक्षात यावी म्हणून मी दहा फुलांचा हार करायला सांगितलं. दहा फुलांना एकत्र केलं म्हणजे एक दशकाचा हार तयार झाला आणि वर जितकी फुलं राहिली ते झाले एकक ही संकल्पना विद्यार्थ्यांना छान लक्षात आली. प्रत्येक विद्यार्थ्याने दशकाचा हार तयार केला आणि तो करताना पालकांनी विद्यार्थ्यांना फुलं मोजायला शिकवलं. यामुळे मोजणी (काऊंटींग) अन् एकक- दशक विभागणी शिकवणं सोपं झालं आणि मुलांच्या ते कायमस्वरूपी लक्षात राहीलं. माझ्या वर्गातला एक उत्साही विद्यार्थी त्रिशील, त्याने तर स्वतः दोऱ्यात सुई ओवली आणि मला दाखवलं.. 'किती छान, किती एकाग्रतेने त्याने ती सुई धाग्यात ओवली..!' ते बघताना मला खूप आनंद झाला तसंच लॉकडाऊनपूर्वी शाळेत केलेल्या अनेक उपक्रमांचीही फार तीव्रतेने आठवण झाली.निसर्ग नावाच्या विद्यार्थ्याने तर घराजवळ खूप फुलं नाही मिळाली तर चक्क एका फुलाच्या दहा पाकळ्या करून त्याचा हार ओवला.
एकूणच काय आपण छोट्या छोट्या वस्तू वापरून नवीन सृजनशील उपक्रम मुलांना देऊ शकतो आणि अध्ययन व अध्यापन सुखकर करु शकतो."
तर अशी ही उपक्रमशील शाळा... स्पार्कल शाळेचे वैशिष्ट्य म्हणजे या शाळेत विद्यार्थ्यांना मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेत प्रत्येक विषय शिकवला जातो. सध्या लॉकडाऊन सुरू असलं तरीही शिक्षिका एवढ्या उत्साहाने, तळमळीने विद्यार्थ्यांना शिकवत आहेत आणि भविष्यातही त्यांची शिकवण्याची आस्था अशीच कायम राहील यात मला शंका नाही.

- मोहिनी घारपुरे - देशमुख



 

शनिवार, २६ सप्टेंबर, २०२०

शराबी (1964)

चाँद की चाल भी खफासी हुई .. 
रात की आँख भी शराबी है 
सारी कुदरत नशेमें है जब चूर .. 
अरे मैने पी ली तो क्या खराबी है ...
सावन के महीने में ... 
एक आग सी सीने में .. 
लगती है तो पी लेता हूँ .. 
दो चार घडी जी लेता हूँ ...
असं गुणगुणत एक उमदा तरूण दारूच्या बाटलीशी (जणू) बोलत बोलत दारूचा आनंद घेत उशीरा रात्री रस्त्यातून चाललेला असतो.. कोण असतो तो तरूण .. ? ज्याला घरादाराची शुद्ध नसते .. आपल्या माणसांची चिंता नसते आणि स्वतःची तर त्याहूनच नसते... इतक्यात त्याची आई त्याला शोधत शोधत तिथे येते आणि आपल्या उमद्या पोराला असं रात्रीबेरात्री दारूच्या नशेत रस्त्यावर झिंगत .. नाचत गात असताना पहाते तेव्हा तिच्या काळजातून एक आर्त कळ उमटते. काय करावं या पोराचं ..? या विचारानी क्षणभर बेचैन, व्याकूळ झालेली ती आई पुढल्याच क्षणी आपल्या मुलाजवळ जाते आणि त्याला खडे बोल सुनावायला लागते. अचानक आईला समोर पाहून तो तरूण अर्थातच घाबरून खोटं बोलायला लागतो आणि सांगायला लागतो .. 'माँ .. मैने शराब नहीं पी है .. मैने शराब नहीं पी है ...' पण ते सगळं ऐकायची मनःस्थिती तिची नसतेच कारण इकडे घरी तिचे पती आणि त्या तरूणाचे वडील मृत्यूशय्येला टेकलेले असतात. ती माऊली आपल्या भानावर नसलेल्या पोराला हाताशी धरून घरी आणते आणि 'वडीलांकडे बघ रे पोरा' अशी अजीजीनं विनंती करायला लागते .. पण नशेत आकंठ बुडालेल्या त्याला ते सगळं उमजेपर्यंत इकडे वडीलांनी प्राण सोडलेले असतात. त्यांचा मृत्यू झालाय हे कळताच माऊलीचा आक्रोश अन् कानावर पडलेलं आपल्या लहान बहीणीचं रडं ऐकल्यावर तो तरूण खडबडून भानावर येतो पण वेळ निघून गेलेली असते.. दुसऱ्या दिवशी त्याच्यावरच्या रागापोटी आई आपल्या लहान मुलीला घेऊन घर सोडून निघून जाण्याच्या बेतात असते तेव्हा भानावर आलेला तो तरूण आईला कशीबशी गळ घालतो आणि अखेर आज या क्षणापासून आपण दारू कायमची सोडल्याचं वचन देतो तेव्हा कुठे आईचं मन पाघळतं.. आणि तिचे पाय उंबऱ्याआड थबकतात. या तरूणाचं नाव असतं 'केशव'.  
1964 साली आलेल्या 'शराबी' या चित्रपटातलं पहिलंच गाणं ऐकलं आणि या चित्रपटाबद्दल मनात कमालीची उत्सुकता निर्माण झाली. व्यसनी माणसाचं आयुष्य कोणत्या क्षणी भरकटेल आणि रंगात आलेला जीवनाचा डाव तो कधी उधळून देईल याची काहीच शाश्वती नसते हेच वास्तव या चित्रपटातून दिग्दर्शक राज रिषी यांनी मांडलं आहे.. आणि अर्थातच चित्रपटातील प्रमुख भूमिकेतील कलाकार देव आनंद (केशव), ललीता पवार (केशवची आई), मधुबाला (कमला) या तिघा कसलेल्या कलाकारांनी हे कथानक आपल्या सुंदर अभिनयाने आपल्यापर्यंत अत्यंत संवेदनशीलरित्या पोचवलं आहे. मदनमोहन यांचं कमालीचं मधुर, मोहक संगीत आणि त्यात गुंफलेली एक से एक गाणी चित्रपटाचं कथानक सहजगत्या आणि एका सुंदर लयीत आपल्यापुढे उलगडत जातात. 'सावन के महीनेमें एक आग जो सीनेमें लगती है तो पी लेता हूँ', 'तुम हो हसीं कहाँ के .. हम चाँद आँसमाँके', 'मुझे ले चलो .. आज फिर उस गली में', 'कभी ना कभी कहीं ना कहीं कोई ना कोई तो आएगा ..' अशी एक से एक गाणी मनाचा ठाव घेतात.   
ही कथा आहे 'केशव' नावाच्या तरूणाची..
केशवचे वडील मरतात तेव्हा तो आईला आपण पुन्हा कधीही दारूला हातही लावणार नाही असं वचन देतो आणि त्यानुरूप तो स्वतःत बदलही करतो. त्याच्यात झालेला बदल पाहून कमला, जी केशवची प्रेयसी असते, तिचे वडील त्या दोघांचं लग्न लावून देण्याचं ठरवतात.. इतकंच नव्हे तर केशवला आपल्या कोळशाच्या खाणीत जबाबदारीचं कामही देतात. केशवचं सगळं लवकरच सुरळीत होणार असतं..त्याने आता दारूपासून कायमचं दूर रहाण्याचा निग्रहच केलेला असतो ना .. अनेक मित्र नानाप्रकारे त्याला रस्त्यात भेटल्यावर दारू पिण्यासाठी उद्युक्त करत असतात पण केशव त्यांना बधत नसतो. लग्नाची तारीख ठरलेली असते.. सगळं कसं आनंदात सुरू असतं. पण, हाय रे कर्मा, लग्नाच्या तारखेआधी केशवच्या जीवनात एक स्वाभाविक घटना घडते पण त्याचे पडसाद इतके खोलवर उमटतात आणि सगळ्यांचंच जीवन उध्वस्त होतं.
दारू पिणाऱ्या व्यक्तीनं दारू सोडायची ठरवली आणि समोर सतत दारूचा संदर्भ या ना त्या कारणाने येत राहीला तर दारू पिणाऱ्या माणसाचा मनोनिग्रह कमीच पडतो हे आपण जाणतोच. व्यसन हा एकप्रकारचा मनोशारिरीक आजारच आहे असे अभ्यासकांनी सिद्धही केलेले आहे. त्यामुळेच, केशवचा दारू सोडण्याचा पक्का निग्रह आणि त्या निग्रहाला या ना त्या कारणाने लागलेला सुरूंग याची कथा शराबी या चित्रपटातून ज्या विलक्षण पद्धतीने मांडलेली आहे त्याचं कौतुक करावं तेवढं थोडं .. !
दारू सोडण्याचा निग्रह केला तरीही शरीराला दारू न मिळाल्याने व्यसनी माणसाला शारीरिक त्रास प्रचंड होत असतो.. एकदाची दारू मिळाली की मगच त्याचं मन आणि शरीर शांत होतं. अगदी हीच अवस्था केशवचीही व्हायला लागते. त्याला पोटात प्रचंड वेदना व्हायला लागतात पण तेव्हा आई बहीण, त्याची काळजी करणारी माणसं त्याच्याजवळ असतात त्यामुळे त्या अवस्थेतून तो बाहेर पडू शकतो. आपल्या या त्रासावरचं औषध घेण्यासाठी एका हकीमाकडे तो जातो तेव्हा हकीमाकडे औषध तर असतं पण औषध देण्यासाठी बाटली नसते.. केशवनेही बाटली आणलेली नसते त्यामुळे हकीम त्याला औषध देण्यासाठी नेमकी दारूचीच रिकामी बाटली निवडतो. त्या बाटलीचा स्पर्शही खरंतर केशवला नको असतो पण त्याचा नाईलाज होतो. औषध आणि इस्त्रीचे कपडे घेऊन घरी परतत असताना कमला रस्त्यातून चाललेली दिसते आणि केशवला तिची थट्टा करायची लहर येते.. आपल्याजवळ दारूची बाटली आहेच म्हणून तो आपण दारू प्यायलो असल्याची नक्कल करतो .. मग एक रोमँटीक गाणं होतं आणि नेमकं घरी परतण्याची वेळ तर दोन दारूडे त्या आडवाटेला येऊन पिण्याचा कार्यक्रम करत असतात आणि त्यांनी केशवची औषध भरलेली दारूची बाटली पळवलेली असल्याचं केशवच्या लक्षात येतं. तो त्यांच्याशी भांडून बाटली तर घेऊन निघतो आणि इथेच सगळा घात होतो कारण, ती बाटली त्याची औषधाची नसते तर ती दारूची बाटली असते. 
घरी पोचून रात्रीच्या वेळी झोपायला खोलीत गेल्यावर केशवला टर्की लागते आणि खूप त्रास व्हायला लागतो. कपाटातून औषधाची बाटली उघडून थोडंसं औषध तरी प्यावं या विचाराने तो बाटलीतलं पेय ग्लासात ओततो आणि क्षणात त्याच्या पायाखालची जमीन निसटते.. कारण, ऐन टर्की लागलेली असताना समोर आलेलं हे पेय हे औषध नसून चक्क दारू आहे हे त्याला दिसतं.. आता खरी कसोटी असते.. आता ते पेय प्यायचं की नाही हे केवळ केशवच्या हातात असतं आणि नेमक्या याच चुकार क्षणी त्याचा आत्मसंयम ढळतो. केशव ग्लासात ओतलेली दोन चार घोट दारू एका अत्यंत मोहाच्या क्षणाला बळी पडून पितो आणि त्या दोन घोटातच पुढच्या जीवनाचा बळी जातो...कारण, त्याच्या खोलीतून येणारे आवाज, ग्लास फुटल्याचा वगैरे आवाज ऐकून म्हातारी आई त्याच्या खोलीत येते आणि समोरचं चित्र पाहून संतापते.. तो सांगण्याचा प्रयत्न करतो काय झालं .. किती त्रास होतोय आपल्याला ... तो प्रामाणिकपणे सांगत असतो पण एकदा का नाव कानफाट्या पडलं की अशा माणसावर सख्खी आईसुद्धा विश्वास ठेवत नाही.. केशवच्या बाबतीतही हेच होतं. खुद्द त्याची आई आज त्याच्यावर विश्वास ठेवत नाही, त्याला घराबाहेर काढते .. विषण्ण मनोवस्थेत घराबाहेर पडलेल्या केशवला दारूडा मित्र भेटतो आणि केशव नको नको म्हणत असतानाही त्याच्या तोंडात दोस्तीखातर दारूची बाटली अक्षरशः जबरस्तीने देतोच.. टर्की सुरू असताना दारूची बाटली तोंडात येणं म्हणजे तर केवळ विषच .. केशवची इच्छा नसतानाही आणखी चार घोट पोटात जातात तशी त्याला चढते.. आता तो पूर्वीसारखा पुन्हा गाणं म्हणत रस्त्यातून फिरायला लागतो आणि त्या भरातच कमलाच्या घरासमोरून जात असताना कमला त्याला पहाते.. ती अडवते, त्याला जाब विचारते पण तोवर कमलाचे वडील येतात नि केशवची अवस्था पाहून कमलाबरोबरचं लग्न मोडतात. केशव माफी मागत असतो, सांगायचा प्रामाणिक प्रयत्न करत असतो पण कोणीच त्याचं आज ऐकत नाही.. एका क्षणात लग्न, नोकरी, घर आणि जीवनाचं फुलवलेलं सुंदर स्वप्नं पार विझून जातं.
आता केशव मनानी पुन्हा पूर्ण खचतो... जगण्याबद्दलची निराशा त्याला आता आणखी आणखी व्यसनांकडे खेचत सुटते .. आता तो पूर्णपणे रिलॅप्स होतो आणि पुन्हा एकदा सगळा वेळ मद्यालयात घालवायला लागतो.
केशवचं पुढे काहीच बरं होत नाही आणि कमलाचंही पुढे फार काहीच बरं होत नाही. कमलाचे वडील मरण पावतात तशी कमला केशवच्या घरी, दुसऱ्या गावात निघून येते कारण तिचं स्वतःचं असं वडीलांशिवाय कोणीच नसतं. कमला आपल्याकडे आलेली पाहून केशवच्या आईला वाटतं, आता केशवचं आणि कमलाचं लग्न लावून द्यावं.. ती केशवला त्याबाबत विचारते पण कमलाबद्दल आता केशवच्या मनात कमालीचा आकस असतो.. जी मुलगी माझी एक छोटीशी चूक समजून घेऊ शकली नाही ती मुलगी माझी साथ काय देणार असं म्हणत तो आता कमलाशी लग्नाला नकारच देतो.. आणि असंही आता तो पूर्वीसारखा केशव राहीलेला नसतोच .. तो आता अट्टल दारूड्या केशव झालेला असतो. 
अशा दारूड्या केशवला पुन्हा एकदा मद्यालयात कोणातरी इसमामुळे एका नव्या कोळशाच्या खाणीतच नोकरी मिळते. पुन्हा नोकरी .. पुन्हा नवी उमेद .. केशव पुन्हा निग्रह करतो की आता ही मिळालेली नोकरी नीट करायची, टिकवायची.. पण नियतीला कदाचित हे देखील मान्य नसतं. नेमकी याच खाणीत केशवची आई एवढे दिवस काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत असते. केशवचा कामाचा पहिला दिवस आणि पहिल्याच दिवशी त्याच्या आईला त्याला अपघातातून वाचवण्याची वेळ येते. समोर बेशुद्धावस्थेत पडलेली स्त्री आणि दुसरीकडून जोरात रूळावरून येणारी कोळशाने भरलेली गाडी .. केशव क्षणार्धात आपल्या जीवाचीही पर्वा न करता त्या वृद्धेला रूळावरून वाचवतो आणि तिचा चेहरा पहातो, तेव्हा त्याला धक्का बसतो .. कारण, ती त्याचीच आई असते... त्याला वाटतं, जीव वाचवला म्हणून तरी त्याची आई पुन्हा त्याला प्रेमभराने जवळ करेल .. त्याच्या चुका विसरून जाईल नि त्याला क्षणात माफ करेल पण तसं होत नाही. त्याची आई त्याला बधणार नसते .. कदाचित तिचा आता केशववरचा विश्वास कायमस्वरूपी उडालेला असतो म्हणूनच ती तशाही परिस्थितीत त्याला समोर पाहून झिडकारतेच.. इकडे कमलाच्या मनात केशवने नोकरी धरल्यापासून पुन्हा नवं आयुष्य सुरू करण्याची आशा पल्लवीत झालेली असते.. पण आता केशव पूर्ण बदललेला असतो याची कल्पना त्या भाबडीला नसते.
व्यसनांची अंतिम पायरी .. म्हणजे पूर्णतः संयम ढासळणे .. आणि केशव आता या पायरीवर पोचलेला असतो. खाणीत काम करतानाही भवती जे मजूर त्यांपैकी बरेच जण मद्यप्राशनाला सरावलेले ..त्यामुळेच पुन्हा एकदा केशवच्या अंतउर्मी जाग्या होतात. केशवला मिळालेल्या पगाराचं तो काय करेल हे आई चांगलीच जाणून असते त्यामुळे ती त्याचा पगार त्याच्याकडून अधिकाराने काढून घेते.. केशवला त्याच्याच पगारातला छदामही आई देत नाही आणि त्यामुळेच केशव आता आणखीनच हतबल होतो. आता काय करावं या विचारातच अखेरीस केशव घरातल्या देवापासची चांदीची पूजेची भांडी आईच्या नकळत (आणि कदाचित स्वतःच्या अंतर्मनाच्याही आवाजाच्या नकळतच) चोरतो आणि थेट मद्यालयात ती विकून दारू विकत घेतो.. आईच्या हे लक्षात येताच ती अखेर मद्यालयात जाऊन केशवला जाब विचारते पण तो तिला उडवाउडवीची उत्तरं देतो. आई चिडते .. देवाची भांडी विकून घेतलेली दारूची बाटली केशवच्या हातून हिसकावून घेते आणि फोडून टाकते.. तर आज केशवच्या व्यसनाची परिसीमा होते.. तो रागाच्या भरात आईचाच गळा दाबतो ..पुढच्याच क्षणी त्याला त्याची चूक लक्षात येते आणि तो मागे हटतो. तिथून निघतो नि कामाच्या जागी पोचतो. तिथल्या एका अधिकाऱ्याजवळ त्याच्या हातातली बाटली पाहून दोन घोट दारूची याचना करतो.. पण अधिकारी त्याला नकार देतो.. आज केशववर एक महत्त्वाची जबाबदारी दिलेली असते. घड्याळात ठीक दुपारचा एक वाजला की खाणीत सुरूंग लावायचा असतो आणि या कामी काहीही चूक झाली तर हजारो मजूरांचा जीव जाऊ शकतो याची कल्पनाही तो केशवला देतो. केशव कामाच्या दिशेनी निघालेला पाहून अधिकारी आपली हातातली बाटली अन्य कोणी बघेल या भीतीने तिथेच खाली फेकून देतो आणि केशवची नजर दूरूनही त्या बाटलीला हेरते.. कारण, आज त्याला प्रचंड टर्की लागलेली असतेच. कधी एकदा दारूचा थेंबही मिळेल अशी अवस्था झालेली असते. कोणालाही लक्षात येण्याआधी केशव बाटलीच्या दिशेने धावतो आणि सगळ्यांच्या नकळत एक कोपरा पकडून दारू ढोसून मन शांत करतो.. इतक्यात एक मजूर केशवजवळ येऊन आनंदाने सांगतो, आज आमचा खूप आनंदाचा दिवस आहे, आज तीन महिन्यांचा पगार आणि बोनसही मिळणार आहे.. पण केशवचं डोकं आज जागेवर नसतं. तो दारू ढोसत बसलेला असतो ना.. जेव्हा बाटली संपते तेव्हा झिंगलेल्या अवस्थेतच तो हातातला कंदील नाचवत घड्याळ पहायला जातो .. घड्याळात बारा वाजून पाच मिनीटं झालेली असतात पण नशेची अंमल असल्याने केशवला तेव्हाच एक वाजल्याचं दिसतं आणि तो खाणीत सुरूंग पेटवून देतो.. क्षणार्धात हाहाःकार माजतो. खाणीत स्फोट होतात आणि हजारो मजूरांचं जीवन धोक्यात येतं. कुणी अपंग होतं.. कोणाचे मृत्यू होतात.. गदारोळ माजतो. या अपघातात त्याची आई जबर जखमी झाल्याचं केशवला जेव्हा याची देही याची डोळा दिसतं तेव्हा त्याचे डोळे खाडकन् उघडतात पण पोलीस त्याला पकडून नेतात. केशवच्या विनंतीवरून शेवटी त्याला दवाखान्यात त्याच्या आईला भेटायला नेलं जातं. तोवर केशवचं ह्रदयपरिवर्तन झालेलं असतं पण वेळ निघून गेलेली असते... कारण या अपघातात केशवच्या आईचे दोन्ही पाय गेलेले असतात... अखेरीस केशवचे डोळे उघडतात, त्याला त्याच्या वागण्याची फार मोठी किंमत चुकवावी लागते.. कधीही भरून न येण्यासारखी. केशवच्या पश्चात्तापाला अखेरीस त्याची आई समजून घेते आणि एवढा प्रसंग होऊनही त्याला ती पुन्हा माफ करते आणि कमला केशव पुन्हा एकत्र येतात.. आणि अर्थातच केशवला पुढे त्याच्या गुन्ह्याची कायदेशीर शिक्षाही भोगावी लागतेच..
तर असा हा शराबी चित्रपट 
आज देवआनंद यांचा वाढदिवस.. देवआनंद यांच्या अभिनयाची परिसीमा या चित्रपटात जाणकार प्रेक्षकाला आकळेल. एक साधा सहज स्वप्नील वागणारा तरूण, ते एक अट्टल दारूडा, वाताहत लागलेला तरूण हा भूमिकेचा प्रवास देवानंद यांनी अप्रतिम रंगवला आहे. विशेष म्हणजे देवआनंद स्वतः अजिबात मद्यपान करत नसत असं माझ्या वाचनात आलं आहे.. त्यामुळे तर त्यांनी वठवलेला केशू .. केशव म्हणजे त्यांच्यातील कसलेल्या अभिनयाचा अप्रतिम आविष्कारच म्हणायला लागेल.
त्याकाळी हा चित्रपट गाजला नसेल तरच नवल कारण, मुळात हा विषय चित्रपटाच्या माध्यमातून एवढा सशक्तपणे मांडणं हे देखील काम दिग्दर्शक राजरिषी यांनी चोख केलं आहे. चित्रपटातील अनेक दृश्य काळजाचा ठाव घेणारी आहेत. पहिल्यांदा टर्की लागते तेव्हा केशवच्या समोर असलेला मद्याचा पेला आणि त्याच्या मनातलं द्वंद्व आणि ते दृश्य कंटीन्यू होतं तेव्हा समोरच्या भिंतीवर केशवची आणि त्या ग्लासची दाखवलेली गडद होत गेलेली सावली, आणखी एक दृश्य, जेव्हा केशवची बहीण घरात कमला आणि आईकडे आपल्या भावाने पुन्हा नोकरी सुरू केली असून तो बघा कसा पुन्हा छान माणूस होईल आता हे कौतुकाने सांगत असते आणि इकडे केशवची चाहूल लागताच .. 'भैय्या' करून त्याच्याकडे  पायऱ्या उतरून झेपावते पण केशव परततानाच नशा करून आलेला असल्याने तिला तो झेलू शकत नाही आणि मुन्नी खाली पडते .. ते दृश्य पहाताना गलबलून येतं.. अशी अनेक दृश्य इतकी बोलकी आहेत की अशा अनेक शराबी माणसांचं आयुष्य कसं असेल याची कल्पना आपण करू शकतो. सगळ्यात शेवटी खाणीत केशवच्या चुकीने जे सुरूंग लावून स्फोट होतात तो संपूर्ण प्रसंग पहाताना हादरायला होतं.. एरवी जे लोक दारूचं समर्थन करत असतात, त्यांनी अशा अपवादात्मक परिस्थितीचा विचार कधीच केला नसेल हे मी खात्रीशीर सांगू शकते. हा विचार या चित्रपटाने मांडून, दारूचं समर्थन करणाऱ्यांच्या डोळ्यात चांगलंच झणझणीत अंजन घातलं आहे यात दुमत नाही.

- मोहिनी घारपुरे - देशमुख 


सोमवार, १४ सप्टेंबर, २०२०

वावटळ

काही दिवसांपूर्वी मी एका जुन्या कृष्णधवल चित्रपटातील एक छायाचित्र माझ्या फेसबुकभिंतीवर (वॉलवर) जोडले (पोस्ट केले) होते आणि हा चित्रपट कोणता ते ओळखा असं विचारलं होतं. नंतर बरेच दिवसात त्या चित्रपटाविषयी लिहिण्याचे मनात असूनही निवांत वेळ आणि त्या चित्रपटाबद्दल मनातील विचारांची सुस्पष्टता झालेली नसल्याने त्याबद्दल लिहीणे पुढे ढकलत गेले. मात्र, आज तो योग जुळून आल्याकारणाने या चित्रपटाबद्दलची माझी अनुभूती शब्दांकीत करण्याचा प्रयत्न करते आहे.. आणि अर्थातच माझे लिखाण आवडल्यास यासंदर्भात तुमच्याही प्रतिक्रिया, संबंधित चित्रपटाबद्दलची अधिक योग्य ती माहिती सांगून तुम्हीही प्रतिक्रिया चौकटीत (कमेंट बॉक्समध्ये) व्यक्त होऊ शकताच ..
तर.. या चित्रपटाचं नाव होतं .... वावटळ
1965 साली आलेला हा मराठी कृष्णधवल चित्रपट. या चित्रपटाचे दिग्दर्शक शांताराम आठवले आणि ही कथा, पटकथा आहे शंकर पाटील यांची .. चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसतात ते कृष्णकांत दळवी, सुलोचना, इंदिरा चिटणीस, आशा पोतदार आणि मराठीतील अन्य बरेच दिग्गज कलाकार ..
अगदी जुन्या काळचा मराठी माणूस .. त्याचं जगणं, शेतीशी जोडलेली त्याची नाळ आणि तसंच नात्यांमधले विविध पदर, रागलोभ प्रेम आणि सरतेशेवटी कितीही वावगं कुणी वागलं तरी ते आपलंच माणूस असं म्हणून एकमेकांनी एकमेकांना सांभाळून घेत आयुष्य जगण्याची सुंदर कला ... हे सारं सारं अनुभवायचं असेल तर हा एक साधासोपा आणि तरीही मनाला भावेल असा चित्रपट नक्की पहायला हवा.
संभा आणि त्याची आई हे दोघंच .. वडीलांच्या पश्चात संभावर आईची आणि शेतीची जबाबदारी येते ती तो उत्तमच पार पाडत असतो. गडी देखणा अन् रांगडा त्यामुळे अशा उमद्या मुलाच्या प्रेमात गावातली एक सुंदर देखणी मुलगी पडतेच. संभालाही ती आवडते. संभा आईचा लाडका, आईचं मुलावर निरातिशय प्रेम .. पण तरीही लग्नाच्या वेळी मात्र तो आईच्या मनाविरूद्ध जाऊन स्वतःला आवडलेल्या मुलीशी लग्न करतो आणि मग कथेला कलाटणी मिळते. अर्थातच लग्नानंतर सासू सुनेच्या काहीबाही कारणानं कुरबुरी सुरू होतात. जसजसे दिवस सरतात तसतशी हे सगळं निवळायच्या ऐवजी वाढतच जातं. संभाला इकडे आड तिकडे विहीर अशी गत होते. शेवटी एक मोठ्ठ भांडण होतं तशी सासू रागानं आपल्या भावाकडे निघून जाते .. इकडे सुनेलाही राग अनावर होतो .. ती पोटुशी असते तरीही तशीच उठते नि माहेरी निघून जाते. आता काय करावं .. हा प्रश्न कसा सोडवावा ते संभाला कळत नाही .. आणि मग पुढे एक अशी वावटळ येते नि सारं काही भांडण त्यात विरून जाऊन शेवट गोड होतो .. ही वावटळ काय अन् कशी हे जास्त सांगण्यापेक्षा चित्रपट पाहिलेला उत्तम असं मी म्हणेन..
आजकाल सासू सुनेचं नातं हा माध्यमांमध्ये तसं पाहिलं तर अगदी चावून चोथा झालेला विषय ! पण 1965 साली जेव्हा हा चित्रपट आला असेल तेव्हा मात्र हा विषय अगदी नावीन्यपूर्णच असेल यात शंका नाही. त्यामुळे या चित्रपटातून हा विषय पहाणं आपल्यापैकी काहीजणांना कंटाळवाणं झालं तरीही तो बघताना या भूमिकेतून पाहिल्यास त्यातली गोडी समजेल.
मला या चित्रपटातल्या अनेक गोष्टी आवडल्या .. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे या चित्रपटातली गोड लडीवाळ अशी ग्रामीण भाषा .. ही भाषा ऐकणं .. संभाच्या आईने भर शेतात दूरवर काम करत असलेल्या संभाला मारलेली विशिष्ट पद्धतीची हाक .. कानाला गोड वाटते. तसंच या चित्रपटातील प्रमुख भूमिकेत असलेले कृष्णकांत दळवी.. स्वतः उमदे, रांगडे आणि देखणे .. ते या संभाच्या भूमिकेत अतिशय चपखल दिसले आहेत. त्यांची प्रेयसी म्हणून ज्या अभिनेत्रीने काम केलंय, ती पुढे अनेक मराठी हिंदी चित्रपटात झळकली. आशा पोतदार असं या अभिनेत्रीचं नाव. त्या देखील अतिशय सुंदर दिसल्या आहेत.
जुन्या मराठी चित्रपटांची गोडी म्हणजे त्यांचं साधेपण .. छान साधंसोपं कथानक आणि ते कथानक रंगवणारे सगळे एकसेएक जातिवंत कलाकार ..
बाकी चित्रपटातील गाणी, संगीत वगैरे श्रवणीय आहेच कारण तिथेही पुन्हा अनेक दिग्गज गायक, संगीतकार यांची मांदीयाळीच आहे. चित्रपटाला संगीत दिलय राम कदम यांनी तर पार्श्वगायक आहेत सुमन कल्याणपूर, सुधीर फडके, बालकराम, शाहीर साबळे आणि पार्टी ..
तर असा हा एक साधा पण अवीट गोडी मनाला देणारा चित्रपट ..
लॉकडाऊनच्या काळात हे असे सुंदर चित्रपट पहाण्याचा एक नवा वसा मी घेतलाय आणि हातातून या चित्रपटांबद्दलच लिखाणंही होतंय ही निव्वळ सरस्वतीची आणि गणपतीबाप्पाची कृपाच ..!!
- मोहिनी घारपुरे - देशमुख






(छायाचित्र गुगल साभार)

शुक्रवार, २१ ऑगस्ट, २०२०

सैगल्स फॅन क्लब आणि मी ..

रिपोर्टींगच्या निमित्ताने मी आजवर इतकी फिरले आहे आणि या फिरस्तीदरम्यान अनेक संस्था, अनेक व्यक्ती यांच्या कामकाजाशी माझा नेहमीच जवळून संबंध आलेला आहे. तर ... अशीच एक सुंदर संध्याकाळ .. 
एका क्लासमधल्या बेंचवर अनेक ज्येष्ठ नागरिक, जोडपी एकत्र बसली आहेत. कोणीच फारसं कोणाशी बोलत नाहीये पण तरीही मनातून सारीजण अत्यंत आनंदात आहेत.. समोर पांढऱ्या पडद्यावर अक्षरं उमटली की लगेचच उपस्थितांपैकी कोणाच्याही तोंडून उत्स्फूर्त दाद येते .. वाहवा ... वाहवा .. आणि मग कानावर एक शांत, सुरेल गाणं यायला लागतं... सगळेजण चहाचे घोट घेत घेत निवांत बसून गाणी ऐकत रहातात ... 
साधारणतः आठ - दहा वर्षांपूर्वी रिपोर्टींगच्या निमित्ताने अनुभवलेला हा सगळा माहौल माझ्या आजही चांगलाच स्मरणात आहे. हा माहौल असणारं हे ठिकाण होतं .. 
' सैगल फॅन्स क्लबचं .. ' !
(हा फोटो मी स्वतः रिपोर्टींगला गेले होते तेव्हा काढलेला आहे, म्हणजे तब्बल आठ दहा वर्षांपूर्वीचा आहे बरं का )
या क्लबविषयी लिहावं असं बरेच दिवसांपासून मनात होतं. म्हणूनच मग, या क्लबचे संस्थापक नाशिकचे श्रीकृष्ण साठे काका यांचा नंबर शोधून त्यांना संपर्क केला आणि विशेष म्हणजे काकांनीही मला झटकन ओळखलं. मग माझ्या विनंतीवरून त्यांनी मला या उपक्रमाची माहिती कळवली आणि ती देखील इतकी सविस्तर आणि वाचनीय .. की आज मला काही लिहीण्याची संधीच ठेवली नाही काकांनी .. (☺😉😂)
तर, आज या ब्लॉगमध्ये वाचा साठे काकांच्या या उपक्रमाविषयी खुद्द त्यांच्याच शब्दात ... 
मनःपूर्वक धन्यवाद श्रीकृष्ण साठे काका !

- मोहिनी घारपुरे - देशमुख 
..................................
 पूर्वपीठिका:- 
मी अगदी ८-१० वर्षाचा असल्या पासून माझा परिचय रेडीओ सिलोनशी झाल्याचे मला आठवते.(माझे चुलते संगीताचे शौकिन होते व रोज रेडिओ सिलोन ऐकत असत.) रोज सिनेमातील गाण्यांचे सूर (तेंव्हाची नवी, आताची खूप जुनी ) कानांवर पडत आणि रोज सकाळी ७.५७ वाजतां न चुकता लावलं जाणारं ते सैगलचं गाणं (त्याचं गाणं सकाळी ७.५७ वाजतां लावण्याचा उपक्रम आजतागायत चालू आहे व मी ७.३० ते ८.०० वाजता रेडिओ सिलोनवर ऐकायला मिळणारा "पुराने फिल्मोंके गीतोंका कार्यक्रम" अजूनही न चुकता ऐकतो ) या सगळ्यांशी खूप लहानपणीच मैत्री जुळली ती आजतागायत! तेंव्हांची गाणी किती मधूर असत हे आजच्या पिढीतील कुणालाही आई-वडील, आजी-आजोबा किंवा घरातील इतर वयस्कर मंडळींकडून ऐकायला मिळेल! त्या काळात आम्ही भावंडे व आमचा मित्र परिवार यांच्यासाठी आणखी एक आकर्षणाचा विषय होता तो म्हणजे "बिनाका गीतमाला"! आधीच त्या काळची गाणी म्हणजे एकदा ऐकली की, कानात घर करून बसणारीच! त्यात रेडिओ सिलोनवरच दर बुधवारी रात्री आठ वाजता ती अमीन सयानी अतिशय आकर्षकपणे सादर करत असत! त्या कार्यक्रमाच्या अधिक तपशीलात न शिरता एवढेच म्हणेन की त्यामुळे त्या काळच्या गाण्यांचे वेड लागले ते कायमचेच!
जसजसे वय वाढत गेले तसतसे शिक्षण, अभ्यास, इयत्ता वाढत गेल्या. शिक्षणही १९६४ साली पूर्ण झाले व लगेच नोकरी ! या सगळ्यामुळे माझ्या जुन्या गाण्यांचे वेड या छंदावर मर्यादा आल्या. पण १९६५ साली एक घटना घडली. मला नोकरी मिळाली पण पोस्टींग मुंबईत झाले. मी एकटाच मुंबईत दादरला एका लाॅजमध्ये राहू लागलो. सकाळी १०पर्यंत व संध्याकाळी ६ नंतर भरपूर वेळ असे. पहिली गोष्ट काय केली असेल तर मर्फीचा ट्रान्झिस्टर खरेदी केला व रोज सकाळी ७.३० वाजता तोच म्हणजे "पुराने फिल्मोंके गीतोंका कार्यक्रम" ऐकू लागलो आणि माझी माझ्या छंदाशी, मर्यादित स्वरूपात कां होईना, जणू पुनर्भेटच झाली! त्यानतर त्या छंदाची आणि माझी कधीच ताटातूट झाली नाही.
दिवस, महिने आणि वर्षे कशी गेली ते कळलेही नाही. मी बॅंकेच्या नोकरीत ५-६ गावे फिरून आलो आणि १९९९ साली बॅंकेच्या सेवेतून मुदत पूर्व निवृत्ती घेतली आणि त्यानंतर २००२ च्या सुमारास एक योगायोग घडून आला. आमच्याच बॅंकेच्या (Bank of India)सेवेत असलेले एक हिंदी अधिकारी (राष्ट्रभाषा हिंदीचा कामकाजात जास्तीत जास्त वापर व्हावा म्हणून बॅंकेने Hindi Officer ही पोस्ट निर्माण केली होती व हिंदी अधिकारी नेमले होते) श्री. विजय अहलुवालिया जे मुळचे मुंबईचे पण अखेरच्या नाशिक इथल्या पोस्टींगनंतर नाशिक येथेच मुदत पूर्व निवृृत्त झाले. त्यांनी पण माझ्यासारखीच ऐच्छिक सेवानिवृत्ती घेतली. त्यांनापण जुन्या हिंदी गाण्यांची आवड होती हे मला आमच्याच बॅंकेतील श्री. प्रमोद पांडे यांच्याकडून कळले. आमच्या दोघातील हा समान दुवा लक्षात घेऊन त्यांनीच एक दिवशी आम्हा दोघांची ओळख करून दिली..... आणि तेंव्हाच केव्हां तरी "सैगल फॅन्स् क्लब" च्या स्थापनेची बीजे रोवली गेली.
(पूर्वपीठिका समाप्त).

सैगल फॅन्स् क्लबची स्थापना!
२००२ साली माझी व श्री. विजय अहलुवालिया यांची ओळख झाली व आमच्या दोघांच्यात असलेल्या समान दुव्याने-जुन्या हिंदी सिनेमातील गाण्यांची आवड- आम्हा दोघांना आणखी जवळ आणले. अधून-मधून आम्ही भेटत असू व आमच्या आवडीविषयी बोलत असू. जुन्या हिंदी चित्रपट संगीताच्या बाबतीत एकत्र येऊन काही तरी केलं पाहिजे असं आम्हाला वाटे. विचार विनिमय करता करता आमच्या एक बाब लक्षात आली की, नाशकात सांस्कृतिक कार्य करणाऱ्या संस्था त्या काळात अभावानेच होत्या व विशेषत: जुन्या हिंदी चित्रपट संगीत शौकीनांना एका ठिकाणी भेटण्यासाठी एखादा प्लॅटफाॅर्मच नव्हता. आपणा सगळ्यांनाच माहीत आहे की, जुन्या हिंदी चित्रपटातील गाणी कानावर पडली की, कान टवकारणारे आज लाखोंनी कदाचित नसतील पण हजारोच्या आकड्यात नक्कीच आहेत व अपवादाने का होईना पण नवी पिढी पण त्यात सहभागी आहे. म्हणजे नाशकात तेव्हा शौकीन भरपूर पण त्यांना एकत्र आणणारी संस्था किंवा एकत्र येण्यासाठी एखादे ठिकाणंच उपलब्ध नव्हते अशी काहीशी परिस्थिती होती. हे लक्षात घेऊन आम्ही २००३ साली प्रथम "सिनेसंगीत प्रेमी" नावाचा एक ग्रुप स्थापन केला व एकत्र येण्यास सुरूवात केली.
कार्यक्रमाला १०-१२ रसिकच उपस्थित असत. कार्यक्रमांची वारंवारिता (Frequency) काही निश्र्चित नव्हती. एकमेकांच्या सोयीने आळीपाळीने एकमेकांकडे कार्यक्रमाचे आयोजन केले जाई. अर्थातच जुन्या गाण्यांच्या रेकाॅर्डस् रेकाॅर्ड प्लेअरवर किंवा सीडीज् सीडी प्लेअरवर ऐकत असू. असा हा उपक्रम जवळ-जवळ दीड वर्ष चालू होता. २००४ साल उजाडले व सैगल फॅन्स क्लबच्या स्थापनेसाठी काही पूरक घटना घडू लागल्या. त्याचं असं झालं की, २००४ हे साल सैगलचं जन्मशताब्दी वर्ष होतं व ठिकठिकाणचे रसिक ते धुमधडाक्यात साजरं करणार होते. आमच्याच बॅंकेत मुंबईला कार्यरत असणारे कै. विनायक जोशी (होय, दुर्दैवाने या वर्षीच ४-५ महिन्यांपूर्वी त्यांचे सेवानिवृृृत्तीच्या उंबरठ्यावर असतांना अकाली निधन झाले.) जे एक चांगल्यापैकी भावगीत गायक होते आणि सैगलचे चाहते होते, त्यांनी सैगलला श्रद्धांजली म्हणून साधारण २०-२२ गाण्यांचे "बाबुल मोरा" कार्यक्रमाचे आयोजन केले व मुंबईत ते सादरही करू लागले. सैगलची गाणी ते स्वत: गात. २००४-२००५ सालात नाशिकला त्यांच्या त्या कार्यक्रमाचे तीन वेळा आयोजन करण्यात आले. नाशिकच्या " रसिक " संस्थेचे श्री. शरद पटवा ह्यांनी त्या कार्यक्रमांचे आयोजन केले होते. अर्थात माझाही त्यात सहभाग होताच. त्यापैकी तिसरा व शेवटचा कार्यक्रम २० फेब्रुवारी, २००५ ला होता. नाशिकमधलं वातावरण तेव्हा सैगलच्या आवाजातल्या जादूनं भारलेलं होतं. मी तर १९६५ पासूनच सैगलच्या आवाजातील जादूनं भ्रमचित्त (Mesmerise) झालो होतो. मी व श्री. अहलुवालिया यांनी विचार केला. आम्हाला असं वाटलं की, जन्मशताब्दी वर्षात आपण एक म्युझिक क्लब स्थापन केला व त्याचं नामकरण "सैगल फॅन्स क्लब" असं केलं तर त्या महान गायकाला ती उचित श्रद्धांजली ठरेल. मग ठरलं व त्याच कार्यक्रमात प्रस्तावित क्लबच्या स्थापनेसाठी तारीख जाहीर करण्यात आली- २७ फेब्रुवारी, २००५. "रसिक" संस्थेचे श्री. शरद पटवा यांनी ती घोषणा केली.
ठरल्याप्रमाणे २७ फेब्रुवारीला पहिली बैठक झाली. मीच तो प्रस्ताव मांडला. उपस्थित सुमारे २०-२५ रसिकांनी प्रस्ताव उचलून धरला आणि "सैगल फॅन्स क्लब"ची रीतसर स्थापना झाली. वर उल्लेखिलेल्या "सिने-संगीत प्रेमी क्लब" चे वेगळे आस्तित्व राहिले नाही व तोच पुढे "सैगल फॅन्स क्लब "झाला. बैठकीत असेही ठरले की सदर उपक्रमासाठी वर्गणी नसेल व प्रवेश विनामूल्य असेल. त्यावेळी डोक्यात कार्यक्रमाची निश्चित अशी रूपरेखा नव्हती. महिन्यातून एकदा एकत्र येणे व सैगल संगीत ऐकणे एवढाच विचार मांडण्यात आला.
क्लबचे कार्यक्रम आळीपाळीने एकमेकांच्या घरीच सुरू झाले. सर्वांच्या सोयीने तारखा ठरवल्या जात. "सिने-संगीत प्रेमी" प्रमाणेच कार्यक्रमांची सुरूवातीला निश्चित अशी वारंवारिता (Frequency) नव्हती. पण कार्यक्रमात फक्त सैगलचीच गाणी ऐकली जात नसत तर इतरही जुनी गाणी ऐकली जात. सुमारे तीन वर्ष उपक्रमाची वाटचाल अशीच चालू होती. उपस्थिती दिवसेंदिवस वाढत चालली होती. मात्र त्यामुळे कार्यक्रमाचे आयोजन एखाद्याच्या घरी करणे अडचणीचे ठरू लागले आणि अशातच, साधारण २००८ साली, क्लबच्या वाटचालीला एक निर्णायक वळण मिळाले. मी, अहलुवालिया आणि इतर काहीजण क्लबच्या संस्थापक समितीचे सदस्य होतो. त्यांच्यापैकीच एक संतोष पाटील ! (क्लबच्या वाटचालीतील त्याच्या महत्वाच्या भूमिकेचा पुढे उल्लेख येईलच!) त्याच्या ओळखीने नाशिक मधील " मोराणकर कोचिंग क्लासेस" चे श्री. प्रभाकर मोराणकर यांनी आमच्या कार्यक्रमांसाठी त्यांच्या क्लासेसचा सुसज्ज हाॅल, प्रोजेक्टर, छोटासा स्क्रिन, माइक, कॅमेरा इत्यादी यंत्रणेसह दर रविवारी विनामूल्य देऊ केला. ज्या वेळी क्लबला वाढत्या उपस्थितीमुळे एखाद्याच्या घरी कार्यक्रम करणे अडचणीचे ठरू लागले होते तेव्हा हा मोठाच दिलासा होता. मार्च २००८ पासून कार्यक्रम श्री. मोराणकर यांच्या हाॅलमध्ये होऊ लागले ते आजतागायत! म्हणूनच क्लबच्या वाटचालीत मोराणकर पती-पत्नींचे अतिशय महत्वाचे योगदान आहे याचा मी कृतज्ञापूर्वक उल्लेख करतो.
जेव्हापासून श्री. मोराणकर यांच्या जागेत कार्यक्रम होऊ लागले तेव्हापासून श्री. अहलुवालिया यांनी कार्यक्रमाच्या स्वरूपात दूरगामी बदल केले जे पुढील काळासाठी क्लबला उपकारकच ठरले. त्यांनी कार्यक्रमांना एक दिशा दिली. १२ ऑडीओ व १८ व्हिडीओ अशा गाण्यांचे कार्यक्रम तयार करून ते महिन्यातून एका रविवारी सादर करू लागले. प्रत्येक कार्यक्रमात पहिलं गाणं सैगलचंच असेल असंही ठरलं कारण हिंदी चित्रपट संगीताच्या इतिहासात त्याचं असलेलं अनन्य साधारण स्थान! इतर गाणी मात्र जुन्या हिंदी चित्रपटातील अन्य गायक-गायिकांची असत. कार्यक्रमांचं हे असं स्वरूप सर्वांनाच आवडू लागलं. आता तो एक पॅटर्नच झाला आहे व आजही तोच रूढ आहे. त्यांनी गाणी सादर करण्यापूर्वी सिनेमा, संगीतकार, गीतकार, गायक/गायिका यांची नावे सांगणे ही पद्धत रूढ केली. त्यांनी क्लबच्या कार्यक्रमांची कक्षा पण वाढवली म्हणजे असं की, महिन्याच्या पहिल्या रविवारी जुना सिनेमा व तिस-या रविवारी वर उल्लेख केलेला गाण्यांचा कार्यक्रम असे महिन्यातून दोन-दोन कार्यक्रम होऊ लागले. जसजसे एका मागोमाग एक कार्यक्रम होऊ लागले, तस-तसे गाण्याचे वैशिष्ट्य, गाणं आवडण्याचे कारण, गाण्याशी निगडीत काही आठवणी असतील तर त्या सांगणे, व संबंधित कलाकारांशी संबंधित काही माहिती सांगणे अशा गोष्टींचा समावेश निवेदनात होऊ लागला व कार्यक्रमातील रंजकता वाढू लागली. उपस्थिती वाढू लागली. ४० ते ६० उपस्थिती असा भरघोस प्रतिसाद कार्यक्रमांना मिळू लागला जो क्लब साठी एक सुखद अनुभव होता. क्लबची वाटचाल जोमाने सूरू झाली व चालू राहिली.
सुरूवातीची काही वर्षे श्री.अहलुवालियाच कार्यक्रम सादर करीत. साधारण २०१०-२०१२ सालापासून उपस्थित इतर काही इच्छुकांनाही कार्यक्रम सादर करण्याची संधी देण्यात आली. कामकाजात आपणहून सहभाग घेणारे येतील आणि जातील पण क्लब निरंतर चालूच राहिला पाहिजे ही त्या मागची भावना! इतरांना संधी दिल्यामुळे उपस्थितांना वेगळेपणाचा अनुभव मिळू लागला आणि संधी मिळालेल्या रसिकात क्लबच्या कामकाजात आपलाही काही सहभाग आहे अशी समाधानाची व आपलेपणाची भावना निर्माण झाली.
याच काळात वर्षातून एकदा-कोजागिरी पौर्णिमेच्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन सुरू झाले. हा कार्यक्रम सशुल्क असतो कारण आटीव दूध व भोजनाची व्यवस्था असते. उपस्थितांपैकी ज्यांनी नाव नोंदणी केली असेल त्यांना त्यांच्या पसंतीचं एक गाणं निवेदनासहित सादर करण्याची संधी देण्यात येते. यामुळे सुद्धा हा क्लब आपलाही आहे असे उपस्थितांना वाटण्यास मदत होते. क्लबच्या वतीने काही निवडक व्हिडीओ गाणी सादर केली जातात.
२००५ ते २०२० अशी ही क्लबची वाटचाल चालूच आहे. २०१४ सालापासून श्री. अहलुवालिया यांनी व २०१६ सालापासून मी क्लबच्या कामकाजातील प्रत्यक्ष सहभाग थांबवला. परंतु दरम्यान कार्यक्रम सादर करण्यासाठी नवीन-नवीन इच्छुक तयार झाले आहेत, होत आहेत. क्लबच्या वाटचालीत सुरूवाती पासूनच, विशेषत: २००८ सालापासून, श्री. संतोष पाटील यांचे योगदान अतिशय महत्वाचे आहे. कार्यक्रम कोणीही सादर करो, निवडलेल्या गाण्यांची यादी त्यांना दिली जाते आणि मग श्री. पाटील सर्व कार्यक्रम काॅम्प्युटरवर तयार करतात. जो गाणी निवडतो तो कार्यक्रम सादर करतो, निवेदन करतो पण काॅम्प्युटरवर Audio गाणी ऐकवणारे किंवा व्हिडीओ गाणी पडद्यावर दाखवणारे असतात ते श्री. संतोष पाटील! कार्यक्रम तयार करण्याचे सर्व तांत्रिक काम तेच पाहातात.त्यांनी जणू क्लबच्या कामकाजासाठी, कार्यक्रमांसाठी जणू स्वत:ला वाहूनच घेतले आहे.
अलिकडच्या काळात मात्र क्लबला जरा उतरती कळा लागल्यासारखी वाटते. पण कार्यक्रम अजिबात होत नाहीत असही नाही. या वर्षी २७ फेब्रुवारीला क्लबने आपल्या वाटचालीची १५वर्षे पूर्ण केली. त्या निमित्त १ मार्चला एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. योगायोग असा की, तो क्लबचा १७५ वा कार्यक्रम होता.
क्लबच्या वाटचालीत देबनाथ पती-पत्नी यांचे सुद्धा अतिशय महत्वाचे योगदान आहे. वर म्हटल्याप्रमाणे श्री. संतोष पाटील यांनी क्लबसाठी आपल्याला वाहून घेतले आहेच पण क्लब आपले जे काही आस्तित्व आज टिकवून आहे त्याचे श्रेय नि:संशयपणे देबनाथ पती-पत्नींकडे जाते. मोठ्या जिद्दीने त्यांनी क्लबचे आस्तित्व टिकवून ठेवले आहे. त्यांनी क्लबच्या कामासाठी श्री. संतोष पाटील यांना काॅम्प्युटरसहित आपल्या घरातला हाॅल दिमतीला दिला आहे. हे तिघे व कुलकर्णी पती-पत्नी यांनी नेटाने क्लबची वाटचाल चालू ठेवली आहे.
नाशिक मधील संगीत शौकिनांचा भरभरून मिळणारा प्रतिसाद याचाही उल्लेख केलाच पाहिजे. त्याशिवाय क्लबच्या वाटचालीला पूर्णता येणार नाही. इतर अनेकांचाहि या क्लबच्या वाटचालीत वाटा आहेच. त्या सर्वांचे आभार मानलेच पाहिजेत.
तर असा हा आमचा क्लब! अनेकांनी हातभार लावलेला. माझ्यासाठी सेवानिवृत्ती नंतरच्या आयुष्यात अतीव समाधानाचे क्षण देणारा! जुन्या हिंदी चित्रपट संगीताचा माझा छंद पूर्णत्वाला नेणारा!

(समाप्त)

बुधवार, ५ ऑगस्ट, २०२०

दिल बेचारा ..















'एक अत्यंत दुर्दैवी चित्रपट ..!' असं या चित्रपटाबद्दल नेहेमीच मनात येत राहील याचं कारण तुम्ही सारे जाणताच...!!
' माझे मरण पाहिले मी याचि देही याची डोळा '
या पंक्ती कधीतरी कुठेतरी वाचल्या होत्या... आणि या चित्रपटाची आणि त्यातील हिरो, सुशांतसिंग राजपूतच्या खऱ्या जीवनाची कथा जेव्हा साधर्म्य साधणारी असल्याचं पाहिलं तेव्हा थरकाप झाला. या माणसाने स्वतःच स्वतःच मरण जणू चित्रपटात आधी कितीवेळा जगलं आणि जीवनानेही त्याला तितक्याच लवकर मरण देऊन मोकळं केलं. 
एखाद्याच्या मरणानंतर पुन्हा त्याच्या मरणाची कथा .. चित्रपटातही आणि प्रत्यक्षातही.. इतकी चर्चिली गेली की हा माणूस जाता जाता बस्स लाखो काळजांची तार छेडून गेला. आज हा ब्लॉग लिहीणं महाकठीण वाटतंय, कारण, चित्रपटाची कथा लिहू की सुशांतची कथा लिहू हेच कोडं उलगडत नाहीये. एरवी चित्रपटांविषयी लिहीताना मी वाचकांना तो संपूर्ण चित्रपट डोळ्यासमोर घडावा अशा पद्धतीने लेखन करत असते .. पण दिल बेचाराविषयी लिहीताना मात्र सुशांतविषयीच अधिकाधिक लिहावं असं मनाला वाटतंय. कारण, तो तसं पाहिलं तर आपला कोणीच नव्हता, पण तरीही तो आपला हिरो होता. छोट्या गावाहून मोठ्या शहरात येत स्वतःची छाप सोडत त्याने बॉलीवूड गाजवलं होतं..त्याची मेहनत, त्याचा संघर्ष, त्याचा प्रवास आणि त्याचं घवघवीत यश .. सारं काही आपल्याला दिसत होतं आणि आपण त्याचे मूक साक्षीदार होतो.. पण या मुलानं कसल्यातरी प्रचंड मानसिक तणावाखाली स्वतःशी झगडताना आत्महत्या केली यावर अजूनही विश्वास बसत नाही. देखणा, उमदा, हसरा आणि निरागस असा सुशांतसिंग अजूनही मोहवतोय.. अजूनही खुणावतोय..
त्याला शेवटचं डोळे भरून पहावं म्हणून त्याचा 'दिल बेचारा' पाहिला. शिवाय, तो चित्रपट प्रेक्षकांसाठी इंटरनेटवर फ्री उपलब्ध करून देण्याचा  शहाणपणा त्याच्या मित्रांनी केला त्यामुळे तो लगेच पहाणंही सहज शक्य झालं.. म्हणून हा चित्रपट पाहिला आणि पुन्हा एकदा अक्षरशः काळीज हललं.. त्याच्यासाठी जणू आतडं पिळवटून आलं.. डोळे भरून आले .. कंठ दाटून आला.. !!
त्याने रंगवलेला 'मॅनी' .. केवळ अप्रतिम.. !
त्याचं नृत्य, त्याचा रोमान्स, त्याचं कमावलेलं शरीर .. केवळ डोळे भरून पहात रहावं असं.. कोणत्याही मुलीनं त्याच्या क्षणात प्रेमात पडावं असा 'सुशांतसिंग'..
त्याची या चित्रपटातली हिरॉईन, बाकीचे कलाकार.. सगळं ओकेच.. छानच.. पण हा मॅनी .. हा आपल्याला रडवून गेला यार .. !
तो जेव्हा त्यालाही कॅन्सर असून त्यात त्याने पाय गमावल्याचं सांगतो तो सीन.. चटकन मनाला लागतो.. आणि चित्रपटात पुन्हा मॅनी त्याच्या नेत्रहीन मित्रासाठी त्याचा चित्रपट पूर्ण करतो ती सगळी दृश्य .. त्याचा अपमान करणारा अभिमन्यू वीर (सैफ अली खान) जो त्या किझ्झीचा (संजना) आवडत्या गाण्याचा संगीतकार, गीतकार असतो तो भेटतो तो सीन ... हे सगळं मॅनीसारखंच सुशांतच्या खऱ्या आयुष्याशी इतकं रिलेट व्हावं आणि तेही इतक्या झटपट .. हे  किती दुर्दैवी म्हणायचं ..
मी चित्रपटाचं कथानक पुन्हा सांगणार नाहीये कारण, त्याबद्दल एव्हाना अनेक जणांनी लिहीलंय. पण तरीही मी त्या प्रसंगांबद्दल लिहीतेय, जे प्रेक्षक म्हणून आपल्या काळजाला चिरत जातात. 
संपूर्ण चित्रपटातले दोन तीन प्रसंग .. एक जेव्हा मॅनी थिएटरमध्ये एकटाच पिक्चर पहात असतो आणि एकाएकी त्याला त्रास व्हायला लागतो. तो  किझ्झीला कसाबसा फोन करून बोलावतो आणि ती त्याच्यासाठी धावत येते. अंधाऱ्या थिएटरमध्ये पाठमोऱ्या मॅनीला ती क्षणात ओळखून त्याच्यापाशी पोचते तो मॅनीला पोटातून, छातीतून रक्तस्त्राव सुरू झालेला असतो, तो वेदनांनी तळमळत असतो... हा सीन पहाणं असह्य होऊन जातं. 'किती बटबटीत केलाय हा सीन दिग्दर्शकानं !' असं मलातरी क्षणभर वाटून गेलं. तसाच तो दुसरा चर्चमधला सीन .. आपण आता थोड्याच दिवसात मरणार हे कळल्यानंतर मॅनी आपल्याच फ्युनरलची भाषणं देण्याची तयारी आपल्या गर्लफ्रेंडकडून आणि मित्राकडून करून घेतो .. आणि तेही हसत हसत..
हे पहाताना फार फार वाईट वाटलं.. डोळे भरून आले. 
किझ्झीचा, तिच्या फेव्हरेट म्यूझिशिअनला भेटण्यासाठी प्रवासाला जाण्याचा हट्ट पूर्ण करावा म्हणून शेवटी मॅनी मधे पडतो आणि तिच्या आईवडीलांना पटवतो.. तेव्हा भर पावसात झोक्यावर बसून तिच्या वडीलांना आपल्या आयुष्याची थिअरी ऐकवणारा मॅनी सुशांतनं असा काही रंगवलाय .. की जणू हे सगळं मॅनी नव्हे तर सुशांतच बोलतोय.. स्वतःविषयीच सांगतोय आपल्या प्रेक्षकांना .. असं वाटून जातं.. 
मॅनी तिच्या वडीलांना सांगतो, "अंकल मै बहुत बडे बडे सपने देखता हूँ, लेकीन उसको पूरा करने का मन नहीं करता .. किझ्झीका तो बस एक छोटासा सपना है उसे पूरा करने का बहोत मन कर रहा है .. आय नो इट्स सिली (silly) .. इस हालत में पॅरीस जाना.. इट्स अ बीट सिली ( silly ) .. पर किसीका सपना पूरा हो ना उस सिली (silly) की बात ही कुछ और है ... "
सुशांतनीही स्वतःच्या स्वप्नांची शिडी अशीच चढली होती.. एका लहानशा गावातून स्वबळावर मुंबईत येत बॉलीवूडचा हिरो बनणं अजिबातच सोपं नाहीये.. पण त्याने आपली स्वप्न पूर्ण केली होती. जिथे तुमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसांना पृथ्वीवर जमीन घेणंही कठीण तिथं या हिंमती तरूणाने स्वतःच्या बुद्धीमत्तेच्या, कष्टाच्या जोरावर थेट चंद्रावरही  जमीन घेतली होती.. घरातल्या मोठ्या टेलिस्कोपमधून तो अंतराळाकडे नजर लावून अभ्यास करत त्यात रमत असायचा.. आणि मग .. जेव्हा पृथ्वीवरल्या त्याच्या क्षेत्रातल्या सुमार बुद्धीच्या लोकांकडून त्याचा जाहीर अपमान झाला त्यानंतर त्याचा सेल्फ एस्टीम हलला असावा .. हे जग त्याच्यासारख्या ' शुद्ध देसी रोमान्स' करणाऱ्या मुलाच्या स्वप्नांचा असा गळा दाबून टाकणारं आहे हे कदाचित त्याच्या लक्षात आलं असावं .. म्हणूनच की काय त्याच्यासारखा हसरा, कष्टाळू आणि लोकांची दाद मिळवणारा हिरो शेवटी हरल्यासारखा दिसायला लागला असावा.. कुटुंब, पैसा, प्रेयसी .. सगळं काही असूनही माणूस स्वतःच्या मनानी थकला, हरला की मग त्याला हे जगणंच मुळी शिक्षा वाटायला लागते. त्यात पुन्हा यशस्वी आणि नशीबवान माणूस असला की त्याला छळणारे, त्याचे अहीत चिंतणारे लोक आपसूकच निर्माण होतात. मग निरनिराळ्या प्रकारे या स्टारचं मानसिक, आर्थिक शोषण होत जातं. बरेचदा हे सगळं सहेतूक करणारेच स्टारला येऊन चिकटतात, स्वार्थासाठी.. स्वतःच्या तुंबड्या भरण्यासाठी .. 
 ' स्वार्थाच्या बाजारात किती पामरे फिरतात ...'
'असतील शीते तर जमतील भुते '
म्हणतात ना, अगदी तसंच... !
सुशांतच्या मृत्यूचं गूढ अजूनही उलगडत नाही.. हे सुद्धा दुर्दैवीच...!
आज सतत त्याच्या मृत्यूविषयी उलटसुलट चर्चा, त्या चर्चांमध्ये फसलेली त्याची गर्लफ्रेंड, तिच्याविषयी 'विषकन्या' वगैरे बोललं जाणं, आणि येत्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर त्याच्या मृत्यूचं होत असलेलं राजकारण .... हे सगळं पहाताना, सामान्य प्रेक्षक आणि सुशांतची फॅन म्हणून मनात येतं... बाबा रे ..त्यापेक्षा एक चिठ्ठी लिहून गेला असतास तर किती सोपं झालं असतं नै सगळं ..? किमान चिठ्ठीत तरी लिहायचं होतंस की तुला नेमकी कोणाची, कशाची भीती वाटतेय, कोण तुला त्रास देतंय ..वगैरे वगैरे आणि जाता जाता, दोन दोन ओळी आपल्या वडीलांसाठी, आपल्या बहिणींसाठी आणि आपल्या चाहत्यांसाठी लिहायच्या असत्या .. म्हणजे सोपं झालं असतं रे सगळ्यांसाठीच... !
पण छे .. इन्सान चाहता कुछ और है .. होता कुछ और है .. 
पवित्र रिश्तामधला मानव म्हणून जेव्हा तू टीव्हीच्या पडद्यावर झळकला होतास ना सुशांत अरे तत्क्षणी मोस्ट एलिजीबल बॅचलर म्हणून लाखो तरूणींना तू मोहून घेतलं होतंस .. तुला माहीती होतं ना तू कोण आहेस आणि लोक तुझ्यावर किती प्रेम करतात .. की तुला हे देखील माहिती नव्हतं .. कोणास ठाऊक .. 
'आपुल्या हाती नसते काही हे समजावे ..' हेच खरं..!
आता एकच आशा आहे, तुझ्या ज्या चार पाच डायऱ्या पोलीसांना तुझ्या खोलीतून मिळाल्या आहेत, त्यात तरी काहीतरी तू लिहीलेलं असावंस म्हणजे आम्हाला तुझ्या या कृत्याचं कारण कळेल आणि तुझ्या मृत्यूला जबाबदार असलेल्या व्यक्तींना कडक शिक्षा होईल.. असं जर खरंच झालं नं तरच आमच्या मनाला समाधान लाभेल...
 तोवर मात्र तू तुझ्यासारखाच आमचाही दिल बेचारा करून गेला आहेस इतकंच जाता जाता म्हणेन...
जिथे कुठे आहेस तिथून जर हा ब्लॉग वाचता येत असेल तर नक्की वाच .. मग तुला कळेल की आम्ही सगळे तुझ्यावर किती प्रेम करायचो.. कदाचित या आमच्या प्रेमापोटी तुला परत येणं शक्य असेल तर ये .. वुई ऑल मिस यू सुशांतसिंग राजपूत ..
अ ग्रेट सॅल्यूट टू यू अँड युअर एफर्ट्स ..
अँड चीअर्स टू युअर सक्सेस इन फिल्म इंडस्ट्री .. 

थांबते .. !!

- मोहिनी घारपुरे - देशमुख  
copyright@mohineegharpure

p.c.google


गुरुवार, २३ जुलै, २०२०

सुशीला

'स्त्री जन्मा ही तुझी कहाणी ..' असा उद्गार सहज तोंडातून निघेल,अशी एक व्याकूळ करून टाकणारी कथा असलेला चित्रपट ... सुशीला .. !!
'शब्दरूप शक्ती दे भावरूप भक्ती दे' इथपासून सुरू झालेली सुशीलाची कथा अखेरीस 'जीवन इसका नाम है प्यारे .. तुझे है आगे चलना रे' हा संदेश देऊन जाते आणि आपण प्रेक्षक अक्षरशः मनातून हालतो.


जीवनाचे रंग कुणाला कळले आहेत .. ? इतके अशाश्वत असलेले हे जीवन ..! कधी क्षणात आनंद देते तर कधी पुढल्याच क्षणी माणसावर दुःखाचे पहाड कोसळवून सगळा तमाशा आनंदाने पहात रहाते. एका क्षणी देवत्व जिथे गवसतं तिथेच पुढल्या क्षणी या जीवनाचं एक नरभक्षक रूप माणसाला हादरवून सोडतं... पण तरीही माणूस जगण्याची जिद्द सोडत नाही हेच माणसाचं श्रेष्ठत्व .. एकवेळ सुख नाही मिळालं तरी चालेल .. पण आपण जगण्याच्या संघर्षात कमी पडणार नाही यासाठी माणूस आला दिवस काढत जातो.. कधी सुख, कधी दुःख .. कधी पोटभर अन्न .. कधी कणभर अन्नालाही पारखा होतो पण एक ना एक दिवस आपला येईल ही आशा मनात सतत बाळगत जीवनाचं चाक पळवत रहातो.
अशीच एक असते सुशीला .. 
एका गावातल्या शाळेत शिक्षिकेच्या नोकरीवर रूजू झालेली .. विद्यादानाचं श्रेष्ठ कार्य हाती घेऊन उज्ज्वल भविष्य, स्वतःचं आणि आपल्या विद्यार्थ्यांचंही घडवायला निघालेली .. पण तिचं नशीब काहीतरी वेगळाच खेळ तिच्याशी खेळतं.
वर्गातल्या एका मुलाला नटनट्यांचे फोटो पहाताना सुशीला (रंजना) पहाते आणि चांगलीच समज देऊन त्याला वर्गाबाहेर काढते. काहीशी करारी, तडफदार आणि देखणी सुशीला .. तिच्या बोलण्यात चांगलीच जरब. मुलगा वर्गातून निघून घरी जातो नि लगेचच मोठ्या भावाला (अविनाश मसुरेकर) घेऊन शाळेत येतो. हा मोठा भाऊ पेशाने वकील.. तो सुशीलाला जाब विचारतो तशी सुशीला त्याचीही चांगलीच कानउघडणी करते. वकीलसाहेब आपल्या भावाची चूक कळल्यावर तिथून निघून जातात खरे पण झाल्या प्रकाराने काहीसे दुखावलेलेच असतात... तरीही त्यांच्या मनात तिच्याबद्दल आकस वगैरे खरंतर राहिलेला नसतो, ना त्यांच्या मनात तिच्यासारख्या देखण्या स्त्रीबद्दल काही निराळे विचार असतात. पण नंतर त्यांच्यात आणि सुशीलामध्ये योगायोगानेच ज्या काही विचित्र घटना घडतात, त्या घटनांचा एकच थेट अर्थ जो एरवीही कोण्याही स्त्रीने लावला असता तोच सुशीलाही लावते.. तिला वाटायला लागतं, हे वकीलसाहेब आता या ना त्या कारणाने आपल्याला त्रास द्यायला लागले आहेत .. आपल्या मागे लागले आहेत.. आणि या समजामुळेच खरंतर, आधीच प्रचंड करारी, धीट नि तडफदार, सडेतोड स्वभावाची असलेली सुशीला प्रत्येकवेळी वकीलसाहेबांचा अपमान करत सुटते.. दोन चार प्रसंगानंतर शेवटी वकीलसाहेबांचा आत्मसन्मान दुखावला जातोच पण ते इतके चिडतात की रागाच्या भरात सुशीलाच्या घराचं दार तोडून तिच्यावर अतिप्रसंग करतात. सुशीलाचं आयुष्य एका क्षणात उद्ध्वस्त होतं ते कायमचंच .. 
सुशीलाच्या आयुष्याची वाताहत होते.. 
एका गावातून दुसऱ्या गावी भणंग भिकाऱ्यासारखी फिरण्याची वेळ तिच्यावर येते..एका चांगल्या सन्मानानं जगणाऱ्या सुशीलासारख्या एका शिक्षकी पेशा असलेल्या स्त्रीचं जीणंही शेवटी तिच्या अब्रुपाशीच ठेचकाळतं.. अरेरे ..
दुसऱ्या गावी विषण्ण मनोवस्थेत पोहोचत नाही तोच तिला कुणीतरी अनोळखी स्त्री मदत करण्याच्या बहाण्याने थेट धंद्याला लावायला निघते तो बिचारी सुशीला तिथून पळ काढते. तिचा पाठलाग करत ती कुंटणखाना चालवणारी माणसं निघतात .. तर सुशीला एका रस्त्यालगतच्या खोपटात शिरते आणि तिथे तिला भेटतो एक भणंग माणूस, ज्याचा एक हात तुटलेला आणि जो त्या खोपटात हातबट्टीच्या दारूचा व्यवसाय करत जीवन जगत असतो. काळोख्या रात्रीला आपल्या दारात आलेल्या बेसहारा बाईला संरक्षण देण्याइतका पुरूषार्थ या अपंग, भणंग माणसात ठासून भरलेला असतो आणि म्हणूनच तो त्या माणसांशी अक्षरशः जीवावर उदार होत हातापायी करून अखेरीस सुशीलाला वाचवतो.
आता खोपटात ती दोघंच उरतात .. दारूचा ग्लास तिच्या हाती देणारा तो (अशोक सराफ) क्षणात तिच्याशी भावाचं नातं जोडतो आणि त्याची कर्मकहाणी ऐकवतो.. आणि सुशीलाची कहाणी ऐकताना त्याचे डोळे भरून येतात. आता सुशीला त्याच खोपटात आपल्या मानलेल्या भावाबरोबर राहू लागते.. अशातच एके दिवशी सुशीलाला कळतं, की तिच्यावर झालेल्या अतिप्रसंगामुळे निसर्गानं आपला धर्म चोख बजावला आहे, ती आई होणार आहे .. हे कळताच तिच्या पायाखालची जमीन सरकते पण तरीही हा मानलेला भाऊ तिला आधार द्यायला भक्कम असतो. बाळाचा जन्म होतो आणि अगदी नेमकी त्याच दिवसांत पोलीसांची धाड या खोपटावर पडते. भाऊ ओल्या बाळंतिणीला विनवतो आणि घाईघाई सांगतो, की काहीही झालं तरी बाळाच्या रडण्याचा आवाज येऊ देऊ नकोस .. आणि स्वतः पोलीसांपासून लपण्यासाठी थोडावेळ घरातून निघून जातो. इकडे पोलीस येण्याची चाहूल लागते तशी सुशील बाळाच्या तोंडावर घट्ट हात ठेवते.. पोलीस खोपटाची झडती घेतात आणि आल्यापावली निघून जातात पण तेवढ्या वेळात इकडे बाळाची प्राणज्योत खुद्द आईच्याच हातानी मालवली जाते.. या बाळाच्या रूपानी कदाचित सुशीलाच्या जीवनाला नवी दिशा मिळणार असते .. पण हाय रे कर्मा .. पुन्हा एकदा सुख सुशीलाला हुलकावणी देऊन जातं.. 

कुण्या गावाचं आलं पाखरू गाण्यात रंजनाजींची एक भावपूर्ण अदा

अखेरीस नशीबापुढे हात टेकून पुन्हा जगण्याचं चाक फिरवण्यासाठी सज्ज झालेल्या सुशीलावर आता जगण्यासाठी अक्षरशः ब्लॅकने तिकीटविक्रीचा धंदा करायची वेळ येते.. पाकीटमारी, उचलेगिरी करणंही त्याला जोडून येतंच.. ती अक्षरशः रस्त्याच्या कडेला संसार मांडते.  
अशातच, एका संध्याकाळी त्याच थिएटरमध्ये चित्रपट पहायला ते वकीलसाहेब ( ज्यांनी सुशीलावर ही वेळ आणली ) त्यांच्या पत्नीला घेऊन येतात आणि बाहेर सुशीलाला या भणंग अवस्थेत हे असलं काम करताना पाहून अक्षरशः त्यांच्या पायाखालची जमीन सरकते. आपल्या भूतकाळातील चूक एक जीवन उद्ध्वस्त करून जाईल याची सुतराम कल्पनाही त्यांना त्यांच्या तारूण्याच्या भरात आलेली नसते .. आणि म्हणूनच त्यांना सुशीलाचा विचारही तोवर कधी आलेला नसतो. आज जेव्हा स्वतःचा भूतकाळ असा क्रूरपणे वाकुल्या दाखवत त्यांच्यासमोर त्यांना दिसतो तेव्हा त्यांना जाणवतं की त्यांनी रागाच्या भरात किती मोठा अपराध केला आहे ते.. मग काय, त्या क्षणापासून वकीलसाहेबांचं चित्त थाऱ्यावर रहात नाही. आपल्या चुकीचं प्रायश्चित्तं घ्यायला हवं हे जितक्या तीव्रतेनं त्यांचं मन त्यांना सांगायला लागतं, तितकंच, सुशीलाची अशी अवस्था कशी झाली हे देखील आता त्यांना जाणून घेण्यासाठी चुटपूट लागून रहाते. मग ते वेळीअवेळी तिचा पाठलाग करत, तिचा शोध घेत रहातात.. आणि अर्थातच ती त्यांना टाळत रहाते. पाकीटमारी, ब्लॅकचा धंदा सोडून आपल्या भावासह दुसऱ्या गावी जाते. तिथं एका तमाशाच्या कंपनी लावणीनृत्य शिकते आणि फडावर नाचायला लागते.. पण वकीलसाहेब तिथवरही तिचा पाठलाग करत येतात.. कारण त्यांचं मन त्यांना दिवसरात्र खात असतं. 
अखेरीस एक दिवस, ते तिला गाठतात नि आपल्याला प्रायश्चित्त म्हणून तुझ्याशी लग्न करायचंय, तुझं जीवन मार्गावर आणायचंय असं तिच्यापुढे कबूल करतात. तिची मनधरणी करून तिला घरी आणतात.. पण दारात त्यांची पत्नी (उषा नाईक) तिला अडवते.. आणि जे सहाजिकच असतं. खरंतर, त्याचदरम्यान सुशीलावर पाकीटमारीबद्दल कोर्टात केस सुरू असते पण ती एकाही तारखेला कोर्टात हजर राहीली नसल्याने नेमकं त्याचवेळी वकीलसाहेबांना तिच्यावतीने कोर्टात हजर रहायला लागणार असतं. ते आपल्या पत्नीला लग्नात दिलेल्या वचनाची आठवण करून तिला सुशीलाला घरात थांबू देण्याची गळ घालतात आणि स्वतः कोर्टात निघून जातात. इकडे सुशीलाच्या मानलेल्या भैय्याने या वकीलाबद्दल जेव्हापासून कळलेलं असतं, तेव्हापासून सूडाच्या भावनेपोटी, वकीलाच्या पत्नीचीही सुशीलासारखी, आपल्या बहीणीसारखी अवस्था एक ना एक दिवस करू अशी शप्पथ घेतलेली असते.. आणि आता ती शप्पथ जणू पूर्ण करण्याची ही आयती संधी आहे असं वाटून तो सुशीलाचा माग काढत वकीलसाहेबांच्या घरी जातो. घरात वकीलसाहेब नाहीत हे पाहून तो आता इरेला पेटतो आणि त्यांच्या बायकोवर अतिप्रसंग करून आपल्या बहीणीचा सूड घ्यायला सरसावतो. सुशीला त्याला हात जोडून विनवत असते नि थांबवत असते पण तो .. तो आता मागे हटणं शक्यच नसतं.. अखेर जवळच पडलेल्या फळांच्या टोपलीतला धारदार सुरा दिसताच, सुशीला त्या क्षणी त्या पतिव्रतेला वाचवण्यासाठी आपल्या मानलेल्या भावावर सुऱ्याने वार करते नि तो जागीच कोसळतो... 
हाय रे .. ज्या माणसाने सुशीलाला संकटातून वाचवले .. आज त्याच माणसाचा खून करण्याची वेळ तिच्यावर आली ... किती ते दुर्दैव ..!!
अर्थातच पुढे या खुनामुळे कोर्टात खटला चालतो. सरकारी वकील निरनिराळ्या प्रकारे कोर्टापुढे, सुशीला ही किती चवचाल आणि बनेल बाई आहे हे सिद्ध करत जातात आणि सुशीलाची बाजू घेऊन तिची कर्मकहाणी, तिच्यावर ही वेळ ज्यांच्यामुळे आली ते वकीलसाहेब कोर्टाला कथन करतात.. आपल्या पापाची कबूली देतात.
कोर्टाचा निकाल येतो.. सुशीलाला फाशीऐवजी जन्मठेपेची शिक्षा मिळते आणि जाताजाता ती पुन्हा आपल्या गळ्यात वकीलसाहेबांनी घातलेलं मंगळसुत्र त्यांच्या पत्नीच्या गळ्यात बांधून निघून जाते... 
पुढे तिच्या चांगल्या वागणुकीमुळे तिची शिक्षा कमी होते पण एक उद्ध्वस्त जीवन पुन्हा फुलणार का ..? बहरणार का ..? ही सगळी प्रश्नचिन्ह मागे ठेऊन .. ' जीवन इसका नाम है प्यारे .. तुझे है आगे चलना रे ' हा संदेश देत चित्रपट संपतो.
सुशीलाची कहाणी पाहिल्यानंतर अक्षरशः कापरं भरतं.. मन विषण्णं होतं. एकीकडे वाटतं, कदाचित हेच तिचं नशीब असावं, तर दुसरीकडे वाटतं, कदाचित तिच्या स्वभावामुळे तर तिच्यावर ही वेळ आली असावी का .. 
तिला माणसं ओळखता आली नाहीत हे तर सुरूवातीच्या काही प्रसंगातूनच कळतं .. पण खरंच, ज्या माणसाने तिच्यावर अतिप्रसंग केला, तो तर मुळात सज्जन होता नं.. मग त्यानेही एवढ्या टोकाचा राग आणि तोही अशा पद्धतीने का म्हणून प्रदर्शित करावा.. ? म्हणजे कितीही पदव्या घेतल्या तरीही सभ्यता, स्त्रीयांचा सन्मान हे पुन्हा वेगळं शिकवायलाच लागतं का ? आणि त्याहीपेक्षा, 'पौरूषार्थ' म्हणजे काय हे जर एखाद्या मुलाला त्याच्या उमलत्या वयातच कुणी नीट समजावून सांगितलं नसेल तर तो अशाप्रकारे वर्तन करून कोणत्याही स्त्रीचं आयुष्य क्षणात उद्ध्वस्त करूनच स्वतःचं पौरूषत्व, स्वतःचा अहंकार कुरवाळत, त्याचा अभिमान बाळगत राहील असं जाणवलं. आज समाजात ज्या अशा घटना घडतात, त्यामागे महत्त्वाचं कारणंच हे आहे, की अनेक घरांमध्ये कुणी मुलांना उमलत्या वयात 'पौरूषार्थाचा' नेमका आणि योग्य अर्थ समजावून देणारंच नाही, त्यांच्या दुर्दैवानेच कदाचित ..!! 
असो, तर असा हा सुशीला चित्रपट.. 1978 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते अनंत माने तर जगदीश खेबुडकर यांची गीते आणि राम कदम यांचं संगीत .. ज्येष्ठ नृत्यांगना लीला गांधी या पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत .. 
चित्रपट कित्तीतरी वेळा पाहिला आणि कित्तीतरी वेळा लेख लिहायला घेतला पण ही ह्रदयद्रावक कथा शब्दात उतरवताना मन कितीतरी वेळा थरथरलं... हात अडखळले .. आणि डोळ्यात पाणी दाटलं.. 
एका सुंदर स्त्रीची ही करूण कहाणी.. तिच्या या प्रवासात तिला ज्यांनी साथ दिली त्या भैय्याइतकंच आणखी एक पात्र फार भाव खाऊन जातं, ते म्हणजे मजनूचं पात्र आणि ते साकारणारे कलाकार म्हणजे ज्येष्ठ अभिनेते सुहास भालेकर .. 
हा मजनू म्हणजे सुशीलाचा आशीकच .. पण त्या सुशीलाचा जी आता ब्लॅकनं तिकीटं विकायला लागलेली असते.. थिएटरच्या बाहेरच या मजनूचा टीस्टॉल असतो. चहा विकता विकता तो सुशीलावर भाळतो.. पण त्याचं तिच्याप्रती वाटलेलं प्रेम किती खरं असतं हे चित्रपटाच्या शेवटच्या प्रसंगात आपल्याला कळतं. जेव्हा सुशीलाला शिक्षा ठोठावली जाते तेव्हा पोलीस तिला घेऊन जायला लागतात, तो कोर्टाच्या दारापाशी हा मजनू , नेहमीप्रमाणे त्याही दिवशी सुशीलासाठी कपभर चहा घेऊन , आपल्या डोळ्यातलं पाणी लपवत उभा असतो... सुशीला त्याला तिथे तसा पहाते आणि तिला गदगदून येतं.. अखेरीस .. ज्याचा त्याचा मार्ग ठरलेला असतो आणि जो तो माणूस, मग तो आपल्याला कितीही प्यारा असो वा नसो .. तो त्याच्या मार्गाने पुढे जाणार असतो हेच खरं.. 
रंजनाजी, अशोक सराफजी आणि अन्य सगळेच कसलेले कलाकार .. या सगळ्यांनी मिळून एक अत्यंत उच्च दर्जाची शोकांतिका सुशीला या चित्रपटाच्या निमित्ताने आपल्यापुढे मांडली आहे.. हा चित्रपट आता तसा कालौघात मागे पडला असणं स्वाभाविक .. पण तरीही यातून दिला गेलेला खरा संदेश पुढे पोहोचणं हे महत्त्वाचं .. सहज म्हणून या चित्रपटाखाली यूट्यूबवर आलेल्या प्रतिक्रिया वाचल्या तर त्या वाचताना मी स्वतःही क्षणभर संदीग्ध झाले होते... कारण, अनेकांनी सुशीलाच कशी वाईट ..तिला कशी माणसं ओळखता आली नाहीत वगैरे वगैरे टिप्पणी केल्याचं वाचलं .. म्हणजे काळ बदलला तरीही नव्या पिढीतली माणसंही अजून स्त्रीयांनाच बोल लावायला टपलेली .. पण कुणीही चित्रपटातील वकीलसाहेब ज्याने रागाच्या भरात एक भडक कृती केली .. ज्याने सुशीलाचे शीलहरण केवळ, स्वतःच्या अहंकारापोटी केले त्याला दूषण देताना दिसले नाहीत... हाच तो आपला समाज, हेच ते आजही जुनंच, कीडलेलं आणि विषमतापूर्ण समाजमन .. जे कितीही आधुनिक म्हणून मिरवलं तरीही मनातून कायम स्त्रीयांना दुय्यमच समजणार आणि जमेल तेव्हा, जिथे जमेल तिथे स्त्रियांना भेदभावाने वागवणार .. !!
असो, तर असा हा रंजनाजींनी आपल्या अत्युच्च अभिनयाने आणि अत्यंत ताकदीने साकार केलेला चित्रपट.. 
आज त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बरेच दिवसापासून मनात असलेले या चित्रपटाविषयीचे माझे रसग्रहण, आणि ते लिहीताना अडखळलेले माझे हात, आज जणू झपाटल्यागत लिहीते झाले..

माझ्याकडून रंजनाजींना हीच श्रद्धांजली ...


- मोहिनी घारपुरे - देशमुख
 
(सर्व फोटो गुगल साभार)



Translate

Featured Post

अमलताश