शुक्रवार, २७ एप्रिल, २०१८

रंग आयुष्याचे

रंग कसे ना आपल्यासाठी
आपल्या मर्जीने वागतात
किमान काही काळतरी ते
आपला तोरा राखतात।
आपलं चित्र आपल्याला
हवं तसं खुलवता येतं
कारण कुठे कसा रंग द्यायचा
ते आपलं मन ठरवतं।
आयुष्याचं चित्र मात्र
आपल्या नसतं हातात
जो येईल तो रंग
द्यावा लागतो क्षणार्धात ।
मावळतीचे रंग कधी
कधी उगवतीची लाली
आयुष्याच्या चित्रामध्ये
कधी उमटे पानोपानी।
काही अवचित रंग असतात
ईश्वराहाती दडलेले
त्या त्या वेळी ते ते खुलती
ज्यासाठी असते मन आतुरले ।
रंगांच्या या शेल्यामधले
काहीच रंग आपल्या नशीबी
खरा चित्रकार तोच ठरतो
ज्याला कळते अचूक रंगसंगती ।
- मोहिनी घारपुरे-देशमुख

बुधवार, २५ एप्रिल, २०१८

डोह

डोळ्यांची भिरभिरणारी पाखरं
जेव्हा एकटक पहायला लागतात
तेव्हा कुठेतरी लागला असतो
जिव्हारी घाव ..
रूतलेला असतो एखादा शब्द
खोल खोल काळजात
आणि मनाच्या डोहात जेव्हा
हिंदकळत राहतो ना तो
तेव्हा फुटतं
काठोकाठ भरलेलं
नेत्रतळं
आणि अशावेळी लागतं
आपलं असं कुणीतरी
तो उसळलेला डोह आवरायला
खरच किती क्षण आयुष्यात
येतात असे हिंदकळलेले
आणि देऊन जातात जवळ पुन्हा
माणूस "आपले" दुरावलेले..।
- मोहिनी घारपुरे - देशमुख

मंगळवार, २४ एप्रिल, २०१८

एक अस्वस्थ प्रवास

गेले दोन -तीन दिवस झपाटल्यागत नशायात्रा हे पुस्तक वाचून काढलं. लेखक तुषार नातू यांच्या या पुस्तकातील काही भाग फेसबुकवर एका पोस्टमध्ये वाचनात आला. सहज म्हणून तुषार यांचा फेसबुकवर शोध घेतला तर तेही फेसबुकवर सक्रीय असल्याचे आढळून आले. मग त्यांच्याकडून पुस्तकाची व्हॉट्सअॅपप्रत मागून घेतली. दररोज थोडे थोडे भाग वाचत गेले आणि एक वेगळेच अनाकलनीय गूढविश्व उघडले गेले. 
नशेच्या यात्रेत माणूस कुठल्या टोकापासून सुरूवात करतो नी कुठवर खोल खोल रूतत जातो आणि पुन्हा सुदैवाने कोणीतरी हात हातात धरून त्याला बाहेर येण्यास मदत करत जातं आणि पुन्हा आयुष्याचा मार्ग सुकर होत जातो हा सारा प्रवास आत्मकथनाच्या रूपाने तुषार नातू यांनी या पुस्तकात अत्यंत प्रामाणिकपणे कथन केला आहे. 
आपली ओळख निर्माण व्हावी असं स्वप्न प्रत्येक तरूणाचं असतं, मग स्वप्न सत्यात आणण्यासाठी कष्ट, योग्य दिशेने कष्ट तर घ्यायलाच हवेत ना .. पण अनेक तरूणांना उमेदीच्या दिवसातच केवळ स्वप्नरंजनाचीच सवय जडते, मग कुसंगत लागते, मग एकदा मजा म्हणून नशा, अमली पदार्थांचा आयुष्यात प्रवेश होतो, मग चोरी, खोटं बोलणं, पैशांची अफरातफर, माजोरडी वृत्ती, कुटुंबीयांशी प्रतारणा या सगळ्या पायऱ्या तो स्वतःच आपोआपच चालतो, त्याला ते आपोआपच जमत जातं. अशातच कधीतरी स्वतःवरचा राग, समाजावरचा राग या भावना वाढीस लागतात.. मग अतिरेकी नशा केली जाते .. मग कडेलोट होतो आणि आयुष्य उद्ध्वस्त होतं.. पण नशेकर व्यक्ती एवढा खोल खोल बुडालेला असतो या गर्तेत की त्याला आपलं तर भान उरतच नाही तसंच आपल्या कुटुंबीयांविषयी मनात आकस, सुधारणेचे पोकळ प्रयत्न आणि पुढेमागे जीवन संपवण्याचा प्रयत्न करून कडेलोट करण्यापर्यंतही यांची मजल जाते. 
एवढ्या टोकापर्यंत जाऊनही पुन्हा त्यातून बाहेर पडणं, पूर्ण बरं होणं हे काहींनाच जमू शकतं आणि त्यांपैकीच एक नाव म्हणजे तुषार नातू असं म्हणायला हरकत नाही. चौदावर्ष झाली असतील त्यांना पूर्ण बरं होऊन .. हो हो बरं होऊन असंच म्हणणं योग्य आहे. कारण व्यसनाधीनता हा एक मनोशारिरीक आजारच आहे. मात्र, आपण अजूनही याकडे त्या माणसाचा दोष म्हणूनच पहातो. वास्तविक एकदा अंमली पदार्थांचं सेवन केलं की आपलं शरीर आणि मन सतत त्याची मागणी करायला लागतं आणि ते मिळेपर्यंत स्वस्थता लाभू देत नाही. यात त्या माणसाचा दोष असा की त्याने पहिलाच घोट किंवा पहिले सेवनच ठामपणे नाकारायला हवे. पण तारूण्याचा जोश, नवं काहीतरी करण्याची धुंदी आणि आपला पोकळ स्वाभिमान (अहंकार) यामुळे अनेक तरूण या सगळ्या वाटा चोखाळत जातात. 
नशायात्रा पुस्तक वाचताना मला सुरूवातीला राग राग आला .. लेखकाचा .. 
नशेच्या पूर्ण आहारी गेलेला लेखक घरी कशी कशी नाटकं करून पैसे उकळायचा, मग एकदा पूर्ण सुधारल्याचा विश्वास देऊन वडिलांकडून कामधंदा सुरू करायचा म्हणून पैसे घेतो आणि आपल्या स्वार्थासाठी सहेतुक पानटपरीचा व्यवसाय सुरू करण्याचा मानभावीपणा करतो, त्या टपरीचीही वाट लावतो, तिला तर नशेची छावणीचं रूप देऊन मोकळा होतो.. मग लक्ष्मीपूजनाच्या भयाण दिवसाची करूण कहाणी वाचताना तर आपल्याला लेखकाच्या आयुष्याची किळस, घृणा वाटायला लागते. मग नशेच्या अंमलाखाली पूर्ण गेलेला लेखक मेंटल हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन बरा होऊन परत येतो काय, पंचवटी हॉटेलमध्ये कॅशियर पदावर नोकरी करू लागतो काय.. कामही उत्तम, प्रामाणिकपणे करतो हे वाचताना आपल्या मनात पुन्हा आशा पल्लवीत होत असतात पण हाय रे अशातच तिथे महिन्यादोन महिन्यातच त्याची त्याच्या एका जुन्या व्यसनी मित्राची गाठ योगायोगाने पडल्याचे आपण वाचतो आणि हा व्यसनी मित्र तिथेच कामाला असल्याने लेखक आपोआपच त्याच्या नादी लागून पुन्हा आपला संयम विसरून नशेच्या गर्तेत खोल खोल बुडतो.. नोकरी सुटते आणि पुन्हा ये रे माझ्या मागल्या सुरू होते.  खरंतर हा प्रसंग वाचेपर्यंत लेखकाची ही "नशायात्रा" एवढी खोल खोल गेलेली असेल असे वाटतही नाही. लेखक जे वागल्याचे लिहीले आहे ते त्याचे तारूण्यसुलभ वर्तन असेल असे वाटून आपण वाचक म्हणून त्यास सहानुभूती देत जातो.. पण हा प्रसंग वाचताना आपल्याला वाचकांना त्याचा राग आल्याशिवाय राहात नाही.. 
मग पुन्हा व्यसन, पुन्हा मेंटल हॉस्पिटल असे करत करत तब्बल चार वेळा मेंटल हॉस्पिटलच्या वाऱ्या लेखकाने केल्या असल्याचे कळते. या दरम्यान त्याला जीव लावणारी भेटलेली एक मुलगी, तिच्या कोवळ्या भावना, तिचा भाबडेपणा सारं सारं वाचताना लेखकाच्या जीवनाविषयी आपले डोळे पाणावल्यावाचून रहात नाही. कित्येकदा ठरवून बरा होण्याचा प्रयत्न करून पुन्हा जुनी संगत भेटते काय नी लेखक पुन्हा व्यसनात बुडतो काय हे वाचताना  "अरे देवा, काय होतं या मुलाचं नशीब " असंही वाचकांना क्षणभर वाटून जातं. या दरम्यान मोठ्या भावाचा आधाराचा हात, वडिलांचं आजारपण, आईचा संयम या सगळ्यांच्या आयुष्याची लेखकाने जी नासाडी केली त्याबद्दल पुन्हा पुन्हा राग तर येतोच पण त्याच्या कुटुंबाच्या सोशीकपणाची परीसीमा केवळ नतमस्तक होण्याजोगी वाटते. 
नंतर तर लेखक चक्क उपचारासाठी जायचं या नावाखाली भावाकडून पुन्हा पैसे घेतो ते मनात व्यसनं पुरवण्याची योजना बनवूनच .. भाऊ त्याला बसमध्ये बसवतो, तिकीट काढायला लावतो आपल्यासमोर, हा देखील भावासमोर तिकीट काढतो आणि भावाची गाडी नजरेआड होताच तेथून कंडक्टरला, आपण नोकरीच्या मुलाखतीसाठी निघालोय पण एक महत्त्वाचं प्रमाणपत्र घरीच विसरलोय त्यामुळे आपलं तिकीट रद्द करावं अशी  चक्क निलाजरेपणाने थाप मारून तिकीट अन्य कोणाला विकून गाडीतून उतरतो, भावाने दिलेल्या पैशातून व्यसनं करत फिरतो आणि नंतर कधीतरी गाडी पकडून मग प्रवासास निघतो हे वाचताना डोक्यात तिडीक गेल्याशिवाय रहात नाही..
एका टप्प्यात तर लेखकाने अशी कबूलीही दिली आहे की तो चक्क घर सोडून थेट मुंबईला गेला. तिथे नशा करत तो जे फिरला त्यात पैसे कमवण्यासाठी हॉटेलच्या थाळ्या धुण्यापासून ते कचरा गोळाकरण्यापर्यंतची कामे केवळ अंमली पदार्थांच्या खरेदीसाठी पैसे हवेत म्हणून त्याने केली.. 
खरंच, ही एवढी दुर्दशा ..? हे एवढे नैतिक अधःपतन ..? हे वाचताना कपाळावर हात मारून घेतल्याशिवाय आपण रहात नाही. 
पण तरीही या जगात देव आहे, आणि जसा देव आहे तसेच प्रत्येक जीवाचे भोगही आहेत.. ज्याच्या वाट्याला जे भोग येतात ते त्याला भोगावेच लागतात हे देखील सत्य येथे गृहीत धरून आपण लेखकाला थोडीशी सहानुभूती देतो आणि पुस्तक पुढे वाचत जातो. अशा टप्प्यावर जेव्हा आपल्याला वाटतं की हा चांगल्या घरचा मुलगा एवढा कसा वहावत गेला, एवढी कशी वाताहत लागली याची .. या टप्प्यावरच त्याच्या जीवनाने त्याला मुक्तांगण नावाच्या संस्थेत पोचवल्याचे वाचनात येते आणि पुन्हा आपली आशा पल्लवीत होते, कर्ताधर्ता तो ईश्वरच आपण सगळे त्याच्या हातच्या कळसूत्री बाहुल्या असेही वाटून जाते..आणि आपण पुढे आणखी काय वाढून ठेवले होते या मुलाच्या नशीबात या विचाराने वाचू लागतो.  
या टप्प्यावर लेखकाच्या आयुष्यात देवासमान डॉ. अनील अवचट आणि डॉ.अनीता अवचट आले म्हणूनच की काय त्याचे आयुष्य पुन्हा मार्गी लागले असेच मी म्हणेन. मुक्तांगणमधील कामाची पद्धती वेगळी आहे हे एव्हाना सर्व महाराष्ट्रीयन लोकांना माहीत आहेच. मात्र, वाचक म्हणून आपल्याला लेखकाविषयी जी उत्सुकता वाटते आणि त्याने मुक्तांगणमध्येही पुन्हा नशा केली नसावी अशा आशेने आपण पुढे वाचत जातो तेव्हा एका टप्प्यावर आपल्याला हळूहळू समाधानाची भावना आपसुकच मनात मिळत जाते. याचं कारण, जर मुक्तांगणमध्येही लेखकाने नशेच्या वाटेवरून माघारी फिरणे साध्य केले नसते तर आज कदाचित त्याचे अस्तित्वही असते की नसते याबद्दल मी साशंक आहे. पण कसं कोण जाणे, मायेची फुंकर मिळाल्याने, लेखकातील सूप्त कलागुणांना वाव मिळाल्याने आणि व्यसनाधीनतेबद्दल शास्त्रीय दृष्टीकोन मिळाल्यानेच लेखक स्वतःला थांबवू शकला असे ठामपणे मला वाटले. लेखकाची नशायात्रा खऱ्या अर्थाने तेव्हाच थांबली जेव्हा त्याला मुक्तांगणमध्ये चांगली माणसं मिळाली, आणि त्यांनी लेखकाला तू हा बदल स्वतःत करू शकतोस हा विश्वास दिला... 
आता लेखक व्यसनी लोकांच्या पुनर्वसनाचे काम करत आहे. नागपूरमध्ये मैत्री या संस्थेच्या माध्यमातून त्यांचे कार्य सुरू आहे हे समजल्यावर जरासा दिलासा वाचकांना मिळतो. 
पण मला संपूर्ण पुस्तक वाचताना, "..... पण का ?" या प्रश्नाने अहोरात्र छळले आहे. चांगलं घर, चांगले आईवडील, चांगली भावंड सारी सारी सुबत्ता असूनही केवळ स्वतःचा अहंकार एवढा हैदोस घालू शकतो की एखाद्याच्या उमलण्याच्या वयात त्याचं सारं सारं भविष्य करपून टाकू शकतो ? .. हा प्रश्न माझ्यासाठी निरूत्तरीत रहातो. काही काही प्रसंग वाचताना लेखकाचा एवढा राग येतो आणि काही काही प्रसंग वाचताना त्यांच्याविषयी करूणा, दयाच वाटत जाते.. एकेका प्रसंगात तर आपल्या डोळ्यात पाणी आल्यावाचून रहात नाही एवढे भावविवश आपण होत जातो.. 
सतत तीन दिवस मी हे पुस्तक मोबाईलवर वाचून काढत होते.. आता जेव्हा अखेरच्या टप्प्यात पुस्तक आलं तेव्हा पुन्हा एकदा फेसबुकवर लेखकाचे फोटो पाहिले.. खरोखरीच त्यांच्या तारूण्याच्या दिवसातलं त्यांचं उमदं रूप आणि नंतर व्यसनांच्या विळख्यात सापडल्यानंतर झालेली दुरावस्था आणि आता पुन्हा संसार करत असताना जबाबदारीने आपल्या कुटुंबासाठी, आपल्या समाजासाठी उभा राहिलेला एक पुरूष .... हे सगळं एकाच आयुष्यात घडू शकतं का? हा प्रश्न मनात उभा रहातो.. 
एकेकाळी व्यसनांमुळे ज्याने आपली जन्मतःच मिळालेली "तुषार नातू" ही ओळख धुळीस मिळवून टाकली होती तोच हा मुलगा पुन्हा सगळ्या भूतकाळाच्या नांग्या ठेचून आज त्यावर एक चांगली प्रतिमा घेऊन जगण्यासाठी सकारात्मकतेने सज्ज झाला आहे असा विश्वास वाटतो. आणि म्हणूनच ही यशोगाथा, ही विजयगाथा वाचताना शेवटी आपण अभिमानाने विचारल्यावाचून रहात नाही, "excuse me, तुषारच ना तू ?" 
तर मित्रांनो, प्रत्येक व्यसनी माणसाने, प्रत्येक भावनिक माणसाने, आणि प्रत्येक असा माणूस ज्याचा स्वतःवर संयम रहात नाही त्याने हे पुस्तक किमान एकदातरी शिकण्याच्या हेतूने वाचायलाच हवे. भावनेच्या आहारी जाऊन चुका करणं हा मानवी स्वभाव आहे पण चुका अशा कराव्यात ज्यातून आपलं आणि आपल्याबद्दल सद्भावना ठेवणाऱ्या माणसांचं कमीत कमी नुकसान होईल, चुका अशाच कराव्यात जिथून आपल्याला कोणत्याही क्षणी माघारी येण्याचे दरवाजे सापडतील.. नाहीतर माणसाच्या आयुष्यात एकदा निघून गेलेली वेळ आणि एकदा निघून गेलेले वय परत येत नसते हे प्रत्येकाने लक्षात ठेवायलाच हवे. भावनिक असणं चांगली गोष्ट आहे पण भावनांच्या आहारी जाणं, आणि सतत भावनाविवश होणं, आपला संयम ढळणं या बाबी होत असतील तर तुम्हीच स्वतःच स्वतःला हे करण्यापासून परावृत्त केलं पाहिजे.
जाता जाता एकच सांगेन, या जगात मित्र मिळतील , कदाचित तुमच्या नशीबाने चांगलेच मित्र मिळत जातील पण तुम्ही स्वतः स्वतःचे मित्र बनणं सर्वाधिक महत्त्वाचं आहे. कारण तुम्हाला तुमच्यातील शत्रूवर विजय मिळवण्यासाठी तुमच्यातील मित्रच कायम सोबत करणार आहे ....
- मोहिनी घारपुरे - देशमुख 
mohineecasualwriter@gmail.com


शुक्रवार, २० एप्रिल, २०१८

कला

ती पावली
तेव्हा कलाकाराचा जन्म झाला
ती नाचली
तेव्हा नर्तनाचा जन्म झाला
ती रंगली
तेव्हा चित्र जन्माला आले
ती गायली
तेव्हा सूर जन्माला आले
ती खेळली
तेव्हा हाताची बोटं थिरकली
तिचा स्पर्श झाला
तेव्हा 'त्याला' ओळख मिळाली
ती वास्तव्याला आली
तेव्हा तो कलाकार म्हणून नावाजला .. ।

समुद्र

समुद्राच्या लाटा झेलत
चिंब भिजवावे स्वतःला
अन् रहावे तहानलेलेच
पुन्हा कवेत शिरायला ।
तो पसरलेला अस्ताव्यस्त
उघडून आपुले बाहूपाश
तो सांडत जातो निळाई
अन् झुकते अथांग आकाश ।
तो नभीच्या चांदव्याला
जणू घेतो आपुल्या मीठीत
तो असा जिवलग मित्र
होतो पहिल्याच भेटीत ।
मग चांदण्याही आसुसती
त्याच्या राकट स्पर्शासाठी
अन् क्षणात उधळून देती
चांदणचुरा त्याच्यावरती ।
ही भेट एका मर्दाची
की श्रुंगार हा सजणाचा
तो उधळत जातो लाटा
जणू म्हणतो पुन्हा भेटा ..।
- मोहिनी घारपुरे-देशमुख


Image may contain: night, ocean, sky and water

कविता

कविता असते मुक्त आणि असते छंदीष्टही
म्हणूनच ती विहरते लीलया
कवींच्या कल्पनांतही ।
कधी जाते समुद्रात
कधी विहरते रानोमाळ
कधी फिरते गगनात
कधी बरसते पावसात ।
कधी होते व्रुद्धा
कधी होते ललना
कधी रूपे बालिका
कवींच्या शब्दांमधी ।
कवितेचं असच असतं
झरझर बरसणंच तिला जमतं
जोडत एकेक शब्द शब्द
कवितेचं पान बहरतं ।
- मोहिनी घारपुरे-देशमुख

काबिल - चित्रपट रसग्रहण

ह्रत्तिक रोशन आणि यामी गौतम यांचा काबिल हा पिक्चर काल पाहिला. मला एकंदरीतच असे पिक्चर पहाताना भयपटांहूनही जास्त भीती वाटते. चित्रपटाचं कथानक आणि दिग्दर्शकाने ज्याप्रमाणे ते हाताळलं ते चांगलं होतं पण अधिक चांगलं करता आलं असतं असं वाटतं.
रोहन भटनागर (ह्रत्तिक) आणि त्याची बायको (यामी) हे अंध जोडपं. एकमेकांवर निरातिशय प्रेम. पण देखण्या आंधळीवर एका राजकारण्याच्या भावाची नजर पडते. संधीसाधून एके दिवशी तो त्याच्या मित्राबरोबर तिच्या घरात घुसतो आणि तिच्यावर अतिप्रसंग करतो. रोहन नेहमीप्रमाणे घरी परततो आणि बायकोशी सवयीने गप्पा मारायला लागतो त्यावेळी तिच्या तोंडात बोळा कोंबून तिचे हातपाय पलंगाला बांधून रेपिस्ट त्याचा हेतू साध्य करून फरार झालेला असतो. अंध रोहनला ही अवस्था स्पर्शानी, तिच्या तडफडीनी कळते. तो तिला कसंबसं सोडवतो आणि पोलिसांकडे धावतो. पिक्चरमधले पोलीस ते .. नेहमीप्रमाणे हीरोलाच अर्थात रोहनलाच फ्रॉड ठरवतात. दरम्यान 24 तास तिला किडनॅप केलं जातं तेव्हा रोहनची तडफड ह्रत्तिकनी सॉलिड रंगवली आहे. त्यानंतर तिला ते समुद्रात सोडून देतात आणि हिरो तिला कसंबसं वाचवतो. 24 तासांच्या आत डॉक्टरकडे पोचू न शकल्याने डॉक्टरही नो सच एव्हीडन्स असा रिपोर्ट देतो. पोलिसांकडून मदत मिळणार नाही हे लक्षात आल्यानंतर ती दोघं गपगुमान घरी येतात. ती हिंमत न हरता पुन्हा नव्याने आयुष्य सुरू करूया असं त्याला आपलं बळ एकवटून सांगते आणि तुला मान्य नसेल तर मी माझा एनजीओचा जॉब करत जगेन असाही पर्याय देते. त्याक्षणी तो बिचारा काहीच बोलू शकत नाही. विचारमग्न अवस्थेत निघून जातो. जेव्हा घरी परततो तेव्हा नव्याने जगणं सुरू करण्याची आशा मनात घेऊनच येतो .. नेहमीच्या सवयीच्या बिछान्यावर बसून तो तिच्याशी बोलायला लागतो आणि तितक्यात तिच्या पायांचा त्याच्या पाठीला जोरदार धक्का बसून स्पर्श होतो ... त्याच्या काळजात चर्र होतं .. त्याला जाणवतं आणि ते दुर्दैवाने खरच असतं .. तिने आत्महत्या केलेली असते. त्याच्या अपरोक्ष रेपिस्ट पुन्हा घरात घुसतात आणि तिच्यावर दुसऱ्यांदा रेप करतात.. मरता मरता तिने त्याच्यासाठी चिठ्ठी लिहीलेली असते .. तिने लिहीलेलं असतं, एकदा जे झालं ते विसरून मी पुन्हा नव्याने सुरूवात केलीही असती कदाचित पण आता दुसऱ्यांदाही हेच झालंय .. आणि आता हा खेळच समजून त्यांनी हा प्रकार सुरूच ठेवला तर मी काय करू .. त्यापेक्षा जीवन संपवलेलंच बरं या विचाराने मी मरण कवटाळते आहे .. मी दोन घड्याळं ठेवतेय, त्यापैकी एक जाळून टाक आणि एक पुरून टाक .. हा आपल्या मारेकऱ्यांविषयीचा क्ल्यू ती पत्राद्वारे जाता जाता त्याच्यासाठी ठेवून जाते आणि मग त्याआधारे अंध हीरो नंतर अत्यंत हुशारीने सगळ्यांचा सूड उगवतो.
पिक्चर सॉलिड आहे पण अजून चांगला बनवता आला असता असे वाटत रहाते. तरीही एकंदरीतच अशा कथा पाहिल्या की मन विषण्ण व्हायला होते. समाजात असेही सराईत गुन्हेगार आहेत याची जाणीव राहून राहून होते आणि केवळ अंगावर सरसरून काटा येतो.
आज जेव्हा बलात्काराच्या घटना एवढ्या प्रमाणात वाढल्या आहेत अशा वेळी हा देखील एक विचार मनात येतो, की शारीरिक वा मानसिक द्रुष्ट्या अक्षम असलेल्या मुली, बालिका आणि महिलांच्या सुरक्षेचं काय ? जिथे सुदृढ, सशक्त मुलींच्याच सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे, त्यांच्या अब्रूची लक्तरे काढणारे राक्षस एवढे मुजोर झाले आहेत तेव्हा या अशा अक्षम मुलींना तर किती पट अधिक सुरक्षा मिळायला हवी ...
- मोहिनी घारपुरे - देशमुख

आसिफा

देव असतो माणसात
नसतोच तो देवळात
आसिफाच्या घटनेनी
पुन्हा हेच तर सिद्ध केलंय ।
ती इवलाली नाजूक पोर
चारायला गेली घोडे
तिच्या कोवळ्या मनी तेव्हा
नव्हते काही कोडे ।
राक्षसांच्या विळख्यात जेव्हा
गुदमरली गेली आसिफा
कोणीच माणूस नव्हता भवती
हाय रे चिमुकलीच्या कर्मा।
दगडातला देव तिथे
बसला होता मुका होऊन
अशावेळी सज्जन कुणी
गेला तरी असता धावून ।
कदाचित तेव्हा नव्हतच कुणी
म्हणून साधला डाव
देव कुठला दगडाचाच तो
माणसांनीच केला असता बचाव ।
म्हणून जपा माणूसपण आपलं
नराधम, राक्षस होऊ नकाच
जपा आपला एकच मंत्र
समता बंधुता धर्म खराच ।
- मोहिनी घारपुरे-देशमुख

मराठी भाषेचा आग्रह की दुराग्रह ?

काल मी एक मराठी शुद्धलेखनाविषयी पोस्ट टाकली होती. त्यानंतर आज अचानक एक इंग्लिश शब्द जो चुकीचा स्पेल केला होता तो वाचनात आला आणि माझ्या मनात द्वंद्व सुरू झाले. माझ्या मनातील हा विचार इंग्लिश आणि मराठी भाषेचा तुलनात्मक आहे ..
आपण मराठी शुद्धलेखनाच्या बाबतीत आग्रही आहोत.. वेलांटी, उकार,
-हस्व, दीर्घ यात जराशीही चूक आपण खपवून घेत नाही.
पण हल्ली इंग्लिशमध्येही शब्दांची मूळ स्पेलिंग्स बदलून वापरायला सोपी आणि अर्थ पोचेल अशी स्पेलिंग्स करण्याचा एक ट्रेण्ड फोफावत चाललेला दिसतो.. उदाहरणार्थ,
You च्या ऐवजी सर्रास U लिहीणे
There च्या ऐवजी सहज Thr लिहीणे
Could च्या ऐवजी Kud असं झटकन लिहून मोकळं होणे..
असे आणखी अनेक शब्द आहेत.
आपण विशेषतः मोबाईलवर टेक्स्ट मेसेज करताना किंवा सोशल मीडियावर चॅटींग करताना, पोस्ट लिहीताना इंग्लिश भाषेचे असे मोडतोड केलेले पण वापरण्यास सोपे असे शब्द लिहून मोकळे होते..
काही जाहीरातींमध्येही चुकीची स्पेलिंग जाणीवपूर्वक, ग्राहकांचं लक्ष वेधण्यासाठी केल्याचीही अनेक उदाहरणं आहेत..
तर मुद्दा असा आहे की,
इंग्रजी भाषाही मराठीइतकीच समृद्ध आहे.. परंतु असे असतानाही इंग्रजी भाषेतील मोडतोड जगभरात होत असूनही आजवर असे शब्द लिहीण्याने या भाषेचा अपमान झाला, -हास झाला अशी मतं कधीही कानावर पडलेली नाहीत. किंवा कोणीही त्याचा एवढा विचारही केलेला नाही..
मात्र, मराठी भाषेत मात्र हा विषय आपण अत्यंत गंभीरपणे घेतो .. मराठी भाषा नष्ट होईल की काय अशी भीती व्यक्त करतो, व्याख्यानं घेतो, परिसंवाद घेतो, शुद्धलेखनाच्या चुका करणाऱ्यांना सोडत नाही ..
इंग्रजी आणि मराठी या दोन्हीही भाषाच आहेत.. या भाषांना एक इतिहास आहे.. मराठीपेक्षाही जगभरात इंग्रजी भाषेचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो.. असे असताना शुद्धलेखन व व्याकरणाबाबत इंग्रजी भाषेने , इंग्रजी भाषिकांनी कधी फार आग्रह धरल्याचे ऐकीवात नाही .. मराठी भाषिकांनी मात्र या उलट भूमिका घेतलेली आहे ..
हा फरक का असावा .. ?
सहजता आणि प्रवाहीपण याबाबत मराठीपेक्षा इंग्रजी अधिक लवचिक आहे असा याचा अर्थ होऊ शकतो का ..?
की मराठी भाषेच्या समृद्धीविषयी आपण मराठी भाषिक जास्त तत्पर, गंभीर आहोत आणि त्यामुळेच मराठी भाषा टिकून राहील असा आपला विचार आहे ?
जर इंग्रजी भाषा अधिक लवचिक असल्याचे या धोरणात दिसून येत असेल तर मग आपणही मराठीच्या शुद्धलेखन आणि व्याकरणाबद्दल एवढं आग्रही असणं सुसंगत आहे का ?
असे अनेक प्रश्न मनात उपस्थित झाले आहेत ..
- मोहिनी घारपुरे - देशमुख

रात्र


अशा अंधारलेल्या रात्रीची
वाट पहात असतो प्रत्येकजण
तिच्या कुशीत निजतो
विसरूनीया अवघे श्रम ।
ती घेते आपल्याला
हळुवार कवेत जेव्हा
तिच्या मऊमुलायम स्पर्शाने
जीव सुखावतो तेव्हा ।
ती नीरव शांत काळोखी
तरी गाते हळुवार अंगाई
तिच्या मौनातच शब्द सारे
जोवर कानी येई भूपाळी ।
रात्र कशी शांत शांत
नसते तिला कसली भ्रांत
तिचा काळा लांब पदर
त्यावर चांदण्यांची जरतार ।
ती दडवते भूक जेव्हा
आपल्या उदरात
सुखावलेला जीव तेव्हा
नीजतो तिच्या काळोखात ।
- मोहिनी घारपुरे - देशमुख
 
 

शनिवार, १४ एप्रिल, २०१८

महामानवास प्रणाम

महामानवा तूच खरा
देशाचा शिल्पकार
तुझ्याविना कोणी न दिला
राष्ट्राला आकार ।
डावे उजवे खेचती आम्हा
न दाविती योग्य दिशा
तुझी घटना अखेरीस येते
कामी प्रत्येकाच्या।
राजकारण्यांच्या खेळामध्ये
आम्ही जळत आहोत
तुझ्यासम बुद्धीवंताची
वाट बघतो आहोत ।
तुझ्या पाऊलखुणांवर
कोणी चालेल का पुन्हा?
आपुल्या देशाला योग्य दिशा
कोणी दावेल का पुन्हा? ।
हाच प्रश्न आम्हा आता
दिनरात छळतो आहे
महामानवा तुझ्यासम नेत्याची
आम्ही वाट बघतो आहे ।
- मोहिनी घारपुरे -देशमुख

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना प्रणाम 💐

शुक्रवार, १३ एप्रिल, २०१८

कोण कोणास तुमच्याबद्दल काय म्हणाले ?

कोण माझ्याविषयी काय म्हणाले हे मला ऐकवणाऱ्या माणसांना मी फारसं एंटरटेन करू शकत नाही ..!
मला वाटतं, हे असं सांगणारा मनुष्य रिकामाच असला पाहिजे. कारण, या नसत्या उठाठेवी सांगितल्यात कोणी करायला ..?
हा, आता एखादी माझ्या क्षेत्रातली मोठी, महत्त्वाची व्यक्ती माझ्याविषयी माझ्यामागे काही चांगलं वाईट बोलली आणि ते माझ्या कानावर कोणी घातलं तर अशा व्यक्तीचे मी निश्चितच आभार मानेन. कारण, त्याने मला ही माहिती पुरवण्याने माझ्या कामाचे निश्चितच कौतुक अथवा योग्य टीका मला ऐकायला मिळेल आणि त्यामुळे मी माझ्यात सुयोग्य बदल करू शकेन.. तसंच एखादा माझ्याविषयी प्रामाणिक भावना असलेला मनुष्य माझ्या चुका सोदाहरण सांगून, मला समजावत असेल तर नक्कीच मी वेळ काढून ते ऐकेन, वेळ काढून त्याच्या सांगण्यावर विचार करेन, स्वतःत कालपरत्त्वे अपेक्षित बदलही करण्याचा मनापासून प्रयत्न करेन ..
पण उगाच कोणीही उठसूट, त्याला आलेल्या अनुभवांतून काहीबाही बरळला आणि अशा माणसाचं माझ्याविषयीचं बोलणं कुणी आणखी तिसरा मला कोणत्याही हेतूने ऐकवू लागला तर मला त्यात फारसा रस नसतो.. कदाचित मी दरवेळेला अशा माणसाला उडवून लावेनच असं नाही, पण त्याने पुरवलेल्या या माहितीमुळे मला जराही फरक पडणार नाही हे मात्र खरे .. एका कानाने ऐकेन दुसऱ्या कानाने सोडून देईन, किंवा अगदीच वाईट काहीतरी बरळलं असेल तर नक्कीच खडसावेन, किंवा कौतुकाचे दोन शब्द असतील तर छानपैकी ती दाद घेईन .. पण उगाचच काहीतरी सांगायला लागलं ना कोणी, तेही तिसऱ्याच कोणीतरी आपल्या माघारी आपल्याविषयी बोललेलं की मला चालतंच नाही हे मात्र खरे ..
याबाबत एक कथा कुठेतरी वाचनात आली होती. कथा माझ्या शब्दात आणि मला आठवते तशी सांगते.. 
एकदा एका विद्वानाला एक मनुष्य असंच कोण त्या विद्वानाविषयी काय म्हणत होता ते सांगू लागला. तेव्हा त्याने त्या माणसाला पहिल्याच वाक्यावर अडवले. विद्वानाने त्या माणसाला म्हटले, की अरे तू मला अमका माझ्याविषयी काय म्हणाला हे सांगण्याआधी माझ्या काही प्रश्नांची उत्तरे दे .. 
माणूस लगेच तयार झाला. यावर विद्वान व माणसाची जी प्रश्नोत्तरे झाली ती काहीशी अशी -
विद्वान - काय तू मला जे सांगणार आहेस, ते स्वतःच्या कानाने ऐकले आहेस का ?
माणूस - 'नाही'
विद्वान - माझ्याविषयी त्या अमक्या व्यक्तीने जे विधान केले ते सकारात्मक आहे का ?
माणूस - 'नाही '
विद्वान - माझ्याविषयीचे ते विधान नकारात्मक आहे का ?
माणूस- ' होय' 
विद्वान - "अरे मित्रा, हे प्रश्न विचारून मला एवढेच समजले आहे, की जी गोष्ट तू स्वतः ऐकलेली नाही, त्यातूनही ती माझ्याविषयी नकारात्मकच अधिक आहे, ती ऐकून मी काय करू.. ? ते विधान ऐकल्याने मला त्रासच जास्त होणार आहे आणि जरी ते विधान सकारात्मक असते तरीही ते ऐकून मला गर्व होण्याचीच शक्यता जास्त, त्यामुळे तू एवढे कष्ट घेऊन मला जे सांगणार आहेस, ते ऐकून मला काहीही मिळणार नाहीये हे माझ्या या प्रश्नोत्तरातून मला समजले आहे. त्यामुळे तू  माझ्याविषयी ऐकलेल्या गोष्टी तुझ्यापाशीच ठेव.. !"
असे बोलून विद्वान पुढे चालू लागला...

या कथेत त्या विद्वानाचे जे म्हणणे आहे ना, तेच मला योग्य वाटते. कोण माझ्याविषयी कोणाजवळ काय बोलले, ते किती महत्वाचे आहे, ते नेमकं कोण व किती महत्त्वाच्या व्यक्तीचं मत आहे, ते मत ऐकून मला काही फायदा खऱ्या अर्थानी होणार आहे का ? या प्रश्नांची उत्तर जर माझ्या मनाला पटली तरच मी अशी विधानं ऐकून घेते. आणि मग त्याचा मनावर किती परिणाम करून घ्यायचा ते ठरवते. उगाच उठसूट कोणीही केलेल्या टिप्पण्या ऐकण्यात आपला वेळ कशाला दवडा नाही का ?
मला वाटतं, हल्ली आपल्यावर सतत हाच एक ताण जास्त प्रमाणात दिसतो. लोक काय म्हणतील यापेक्षा माझी इमेज, माझ्याविषयीचं समोरच्याचं मत काय याचा अनेक मंडळी अतिविचार करतात. हा विचार तेव्हाच महत्त्वाचा जर, सगळ्यांचंच मत तुमच्याविषयी एकसमान होत असेल तर ...उदाहरणार्थ, तुम्ही उद्धट आहात असं सगळेचजण बोलायला लागले तर तुम्ही स्वतःत बदल करायला हवा हे निश्चित.. पण काही लोक प्रसंगानुरूप त्यांची तुमच्याविषयी मतं बनवत असतात, त्यांना तुम्ही खरे कसे आहात याच्याशी काहीही देणं घेणं नसतं, प्रसंग बदलला, तुमचं वागणं वेगळं दिसलं की यांचं तुमच्याविषयीचं मत बदलतं. मग अशा लोकांच्या मतांना किती किंमत द्यायची हे आपणच ठरवायला हवं..
अन्यथा, चार फुटकळ लोकांची फुटकळ मतं ऐकून आपण सतत स्वतःला क्रिटीसाईजच करत राहू आणि जे आपल्या मानसिक आरोग्यासाठी घातकच आहे. 
याउपर, कोणाचं मत तुम्हाला सांगण्याचे कष्ट जर मधलाच कोणी घेऊ लागला तर मला तर त्यांना स्पष्टच सांगावसं वाटतं, "तुमची नकारात्मक मतं तुमच्याजवळ ठेवा, कारण त्याने माझ्या सकारात्मक कामात तुम्ही खीळ घालता आहात .. "
एवढं साधं सहज मला वागता येऊ शकतं.. पण जेव्हा मी असं स्पष्ट बोलते , तेव्हा तर आणखीनच राग येतो समोरच्याला .. अशा वेळी मी तितकच सहज स्वतःला समजावते, की आला राग एखाद्याला तर येऊ देत कारण मी नंतर संधी मिळताच तो राग काढू शकते आणि संधी नाही मिळाली तरीही असली उठाठेव करणाऱ्या माणसाला वेळीच थांबवलेलं मला जास्त योग्य वाटतं. 
कारण, कोण माझ्याविषयी कोणास काय म्हणाले हे ऐकत बसण्यापेक्षा मला माझं काम जास्त महत्त्वाचं वाटतं... 
मी जे लिहीते, मी जे वाचते त्यावर लक्ष केंद्रीत करणं हे कोणाच्या माझ्याविषयी हवेत मारलेल्या फुंकरींपेक्षा अधिक महत्त्वाचं नाही का ?
सो, तुम्हीही जर कोणाच्या असल्या बोलण्याने वारंवार दुखावले जात असाल तर बेटर स्टॉप दॅट पर्सन राईट अवे ...  अशा माणसांना एंटरटेनच करू नका .. आपलं जगणं, आपलं व्यक्त होणं अशा बुडबुड्यांमुळे जर खराब होत असेल तर ते बुडबुडे वेळीच फोडलेले बरे (म्हणजे शब्दशः नाही बरं का, तर अशा माणसांपासून लांब राहिलेलेच बरे ..) ... !
- मोहिनी घारपुरे - देशमुख 
bla bla bla bla bla
bla bla bla bla bla bla

मंगळवार, १० एप्रिल, २०१८

देवाचा स्पर्श

आज मंदिरातले दिवे 
अजून मिणमिणत आहेत
जणू कुणाच्या ह्रदयीचे गूज
देवच ऐकत आहे ।

कुणी बिचारा उपाशी असेल निजला
कुणी बिचारा राबराब राबून असेल थकला
त्या सगळ्यांच्या डोक्यावर आज
मायेचा हात फिरवत
खुद्द देवच बसला असेल का ?
त्या स्पर्शाच्या ऊबदार गोधडीतच 
आज प्रत्येकजण निजला असेल का? - मोहिनी घारपुरे - देशमुख 



शनिवार, ७ एप्रिल, २०१८

मी - एक "कॅज्युअल रायटर"

जवळपास गेली आठ- दहा वर्ष झाली, मी सातत्याने लिहीत आहे. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, लोकमत, दिव्य मराठी, तरूण भारत या आघाडीच्या दैनिकांसाठी मी लिहीलंय, तसंच मनोविश्व, तनिष्का या मासिकांसाठी, ऊर्जा , लोकमत ऑनलाईन या वेबसाईटसाठी, दिवाळी अंकासाठी, पुरवण्यांसाठी मी लिहीलंय.. अनेक जाहीरातींचं भाषांतर केलंय, रेडीओसाठी कार्यक्रमाचं लेखन केलंय, शिवाय कथा लिहीतेय, कविता लिहीतेय आणि आता ब्लॉगवरही लिखाण करतेय.. पं. हरिप्रसाद चौरसिया, बेगम परवीन सुल्ताना, कांचन गडकरी, झीनत अमान, डॉ. गिरीश ओक, विष्णू मनोहर यांच्यासह विविध क्षेत्रातील अनेक नामांकित लोकांच्या मुलाखती घेऊन मी त्या शब्दबद्ध केलेल्या आहेत, अनेक पुरवण्यांकरीता मिळालेल्या कोणत्याही ललित विषयावर अवघ्या काही मिनीटात मी लेख लिहून दिलेले आहेत. गेल्या वर्षीपासून मी फॅशन विषयावर लोकमत ऑनलाईनसाठी अभ्यासपूर्ण सदर चालवले आहे, तरूण भारत नागपूरसाठी वर्षभर क्रीडवर (न्यूज एजन्सीजकडून आलेल्या बातम्यांवरून आपल्या दैनिकाच्या पॉलिसीनुसार बातम्या लिहीणे), दोन तीन महिन्यासाठी पुरवणी संपादिका या पदापर्यंतही मी काम केलं आहे. हे काम करताना, महिलांसाठीची आकांक्षा पुरवणी आणि तरूणांसाठीची फुलऑन पुरवणी पूर्णतः नव्याने प्लॅन करून नव्या नव्या संकल्पना तिथे राबवल्या, तर रविवार विशेष आसमंत ही आठ पानी पुरवणी अत्यंत जबाबदारीने संपादीत करून तिचा दर्जा वाढवण्यात भर घातली आहे.  आणि तरीही मी एक "कॅज्युअल रायटर" आहे. 
माझा न्यूज सेन्स चांगला आहे, मला बातमी कळते आणि मी झपाटल्यासारखं काम करते, एकेकाळी तर खूप खूप काम केलं आहे. आपल्याकडलं बीट कमी महत्त्वाचं की जास्त महत्त्वाचं वगैरे विचार न करता जो विषय मिळेल त्यावर रिपोर्टींग करायचं, ठिकठिकाणी जायचं, महत्त्वाच्या लोकांना - सामान्य माणसांना भेटायचं आणि बातमी आणायचीच अशा वृत्तीने प्रामाणिकपणे मी काम केलं आहे. 
असं असलं तरीही, माझ्या मते, माझं लिखाण ललित अंगाने जास्त बहरतं, तसंच काही हलक्याफुलक्या परंतु तितक्याच महत्त्वाच्या विषयांवर मी झट की पट लिहून देते. माझ्याकडे नातेसंबंध, पर्यावरण, तरूण, महिला, सोशल मीडिया, इंटरनेट, फॅशन, नवीन ट्रेण्ड्स यापैकी कोणत्याही विषयावरील लेख मागा, कितीही तातडीने त्या विषयावर मी लिहून देऊ शकते.  कोणत्याही दैनिकातून मला फोन येतो, मॅडम ( किंवा, मोहिनी ) , अमक्या एका विषयावर लेख पाहिजे आहे, अगदी आजच पाहिजे, किंवा जास्तीत जास्त उद्या सकाळपर्यंत हवाय, द्याल ( किंवा देशील ) का .. ? मग मी क्षणभर माझ्यासमोरील त्या दिवसाच्या पूर्वनियोजित कामांचा विचार करते आणि दिवसभराच्या कामातून लेख लिहिण्यासाठी वेळ कसा मॅनेज करता येईल याचं मनातल्या मनात पटापट नियोजन करते आणि पुढच्या काही मिनीटातच मी समोरच्याला होकार देऊन मोकळी झालेली असते. मग काम करता करता त्या विषयाचं चिंतन बॅक ऑफ द माईंड सुरू होतं. आणि जसा वेळ मिळेल तसं लॅपटॉपसमोर बसून मी मनातला विचार सलग लिहून मोकळी होते. या संपूर्ण प्रोसेसला मला फार वेळ लागत नाही, कारण माझा टायपिंगचा स्पीडही अत्यंत उत्तम आहे. टायपिंगचा स्पीड कसा आणि कधी वाढला याची एक अत्यंत सुंदर आठवण आहे.

त्याचं झालं असं की, मी दिव्य मराठीत नोकरी पत्करली आणि पहिल्याच दिवशी आम्हाला मराठी टायपिंग ऑफीसमध्ये शिकवले जात होते. तोवर मी गुगलच्या मेलबॉक्समध्ये मराठी शब्द इंग्लिश कीबोर्डवर उमटवून मग योग्य तो शब्द उमटवण्याचं कसब आत्मसात केलं होतं त्यामुळे मला मराठी टायपिंगची फार गरजच नव्हती. त्यामुळे मी कधी त्या भानगडीत पडलेच नव्हते. तर दिव्य मराठीत मला पहिल्या दिवशी स्वतःच्या मेंदूला तोवर जी मराठी टायपिंगची सवय लावली होती ती पुसून नव्याने, वेगळ्या की वर वेगळं अक्षर ही सवय लावणं अत्यंत कठीण जात होतं... मी लॅपटॉपच्या कीजशी झटापट करत होते, इतक्यात आमचे सिनीयर रिपोर्टर मला सगळ्यांसमोर चिडवत म्हणाले, काय तू एवढी बीएससी, पीजीडीबीएम, एम-ए एमसीजे  झालेली मुलगी, आणि एवढी सोपी गोष्ट येत नाहीये तुला... झालं, मी ते बोलणं फारच मनावर घेतलं. दुसऱ्या दिवशी पुन्हा जेव्हा टायपिंगला बसले तेव्हा अवघ्या पंधरा मिनीटात मला तो नवा मराठी कीबोर्ड लीलया वापरता यायला लागला होता... मग त्या कालच्या सिनीयरनी माझे लॅपटॉपवर चाललेले हात पाहून लगेचच पुन्हा सगळ्यांच्या देखत माझं कौतुक केलं तेव्हा मला अत्यानंद झाला. मग प्रत्यक्ष माझा रिपोर्टींगचा जॉब जेव्हा सुरू झाला तेव्हा कंपनीने आम्हा सर्व रिपोर्टर्सना मिनी लॅपटॉप दिलेले होते, माझा लॅपटॉप आणि सायबर शॉट कॅमेरा घेऊन मी कॉलेजेसमध्ये फिरायचे, सांस्कृतिक कार्यक्रमांना जायचे आणि फील्डवरून लॅपटॉपवरून बातमी तयार करून पाठवून द्यायचे, कार्यक्रमांचे फोटो  काढायचे आणि दिव्य मराठीचं सिटीचं पान 2, आणि पान 6  निम्म्याहून अधिक बातम्यांनी भरून टाकायचे. 
"कँपस राऊंड अप" हे माझ्या सिटीच्या पानातल्या कॉलमचं नाव होतं आणि काही विशेष उपक्रम कॉलेजेमध्ये झाले असतील तर अशा वेळी दैनंदिन रिपोर्टींगबरोबरच "कँपस हॅपनिंग्स" नावानी मी रिपोर्टींगचं सदर चालवायचे. फील्डवर तासन्तास फिरून रिपोर्टींग करायचे, तरूणांच्या महोत्सवांचे फोटोजही अनेक वेळा स्वतःच क्लिक करायचे. फॅशन शो असो वा युथ फेस्टिव्हल अनेकवेळा मी काढलेल्या फोटोजच कौतुक आमच्या ऑफीसमधल्या माझ्या सिनीयर्सनी आणि खुद्द छायाचित्रकारांनीही केलं आहे. तसंच मी लिहीलेल्या विशेष बातम्या दिव्य मराठीच्या जॅकेटला तब्बल पाच वेळा लागल्या आहेत आणि त्या वेगवेगळ्या भाषांमध्ये भाषांतरीत होऊन दैनिक भास्करच्या निरनिराळ्या आवृत्त्यांमध्येही छापल्या गेल्या आहेत.. 
करिअरच्या सुरूवातीच्या दिवसांत स्वतःशी प्रामाणिक राहून जे जे काम केलं त्याचा मला माझ्या करिअरमध्ये प्रचंड फायदा झाला आहे आणि तेव्हा वाढलेला माझा  टायपिंगचा स्पीड आजही कायम आहे, कारण मी सातत्याने गेली आठ - दहा वर्ष लिहीत आहे.
आज हे सांगण्याचं कारण असं की, हल्ली, अनेकजण अशा हलक्या फुलक्या विषयांवर सातत्याने लिखाण करताना दिसतात. दैनिकांच्या मुख्य पानांवर या माझ्यासारख्या लेखकांना क्वचितच स्थान मिळतं पण उरलेली जी पानं असतात ती अशाच लेखकांच्या लेखांनी, बातम्यांनी भरून गेलेली असतात. पण राजकारण, न्यायालयं, मनपा, जिल्हा परिषद या महत्त्वाच्या बीट्सच्या खालोखाल नातेसंबंध, फॅशन, महिला, तरूण वगैरे विषयांची क्रमवारी लागते.. आणि मग असे विषय लिहीणाऱ्या लेखकांना तुलनेने दुय्यम स्थान आपोआपच मिळते.
पण, मंडळी, मी कोणत्याही विषयावर प्रामाणिकपणे आणि सातत्याने लिखाण करतेय हेच माझ्यासाठी आणि माझ्यासारख्या अनेक लेखकांसाठी महत्त्वाचं असतं. वर्तमानपत्राच्या दृष्टीने महत्त्वाचे बीट्स आणि ते सांभाळणारे लोक महत्त्वाचे असतात पण वाचकांच्या दृष्टीने सर्वच विषय महत्त्वाचे असतात. त्यामुळे दैनिकाला कोणत्याही एकाच विषयावर फोकस करून चालत नाही तर दैनिकांना सर्व विषय आणि ते लिहीणारे सर्व प्रकारचे लेखक हवे असतात. त्यामुळे तसं पाहिलं तर दुय्यम असं काहीच नसतं..
माझ्या मते तर, सतत मनात येणारे विचार, आजवर आलेले बरे वाईट अनुभव, स्वतःची झालेली जडणघडण, आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन आणि आपल्या लेखनामुळे लोकांपर्यंत आपला विचार नेणे जास्त महत्त्वाचे.. मग दैनिकात असो वा नसो, दैनिकात आपला लेख छापून येवो न येवो, त्याने फार फरक पडत नाही. आज आपण जे लिहू ते कधी ना कधी प्रकाशझोतात येईल आणि लोकांपर्यंत आपण पोहोचू या विश्वासाने मी लिहीत जाते, लिहीत जाते.. अगदी व्हॉट्सअॅपवरून माझी कविता शेअर करतानाही मी स्वतःच्या भावनांशी तितकीच प्रामाणिक असते आणि फेसबुकवर एखाद्या विषयावर लहानशी पोस्ट लिहीतानाही मी स्वतःशी तितकीच प्रामाणिक असते. एखादी कथा लिहीताना म्हणा किंवा एखादा गंभीर लेख लिहीतानाही मी माझ्याशी प्रामाणिक असते. त्याशिवाय मला लिहीताच येत नाही हे विशेष. अमका विषय किती महत्त्वाचा व त्यानुसार आपले शब्दलालित्य वापरण्याचे चातुर्य मला आजवर जमलेले नाही, कारण मनातल्या भावना, आणि एखाद्या विषयावर आपले विचार खरेखुरे, प्रामाणिकपणे मांडणे हे मी बिनचूक करत असते, लिहीत असते, लिहीत असते ... बसं ... 
म्हणूनच, मी कदाचित कोणाला "कॅज्युअल रायटर" वाटत असेन तर ठीक आहे, मी तर अभिमानाने सांगते, की मी एक "कॅज्युअल रायटर" आहे ...!

- मोहिनी घारपुरे - देशमुख



चिऊताई - (मी लिहीलेलं पहिलं बडबडगीत)

चिऊताईच्या गळ्यात मोत्याचा हार
इवल्याशा मुलीला आवडला फार

चिऊताई रोज गाते गाणे
चिमुकलीचे पोट भरते त्याने

चिऊताईच्या मनात मोठासा बंगला
काडीकाडी जमवताना जीव तिचा रंगला

चिऊताई चिऊताई कष्टाळू फार
चिमुकली सोसते इवलासा भार
- मोहिनी घारपुरे- देशमुख

ओघ

काही काही गोष्टी जशा
ठरवून करतो ना आपण
तशाच काही काही गोष्टी असतात
ओघवतेपणी करायच्या
स्वतःच, स्वतःला वाटलं म्हणून
आणि केवळ आपल्या समाधानासाठी।
तेव्हा नसतं बघायचं जगाकडे
कारण त्याचे डोळे असतात
नेहेमीच वटारलेले, रोखलेले नी
शोधत असतात आपल्यातल्या
भाबड्या, हळुवार जागा
बोटं दाखवण्यासाठी , नावं ठेवण्यासाठी ।
अहो, चटकन कोणाच्या डोळ्यात
जेव्हा पाणी दाटते ना
तेव्हा वाट नसते पहायची
झटकन आपणच व्हायचे असते पुढे
अन् रडणाऱ्याचे अश्रू
टिपायचे असतात आपल्या हाती ।
जेव्हा गंधित होते बकुळ
तेव्हा भरभरून घ्यायचे असतात श्वास
नी सुगंधित होऊ द्यायची असतात
एकेक गात्र, आपलीच, आपल्यासाठीच ।
पण हे सगळं करताना
लपवून घ्यायचं स्वतःला
जगाच्या रोखलेल्या नजरेपासून
नी वटारलेल्या डोळ्यांपासून
कारण ते केव्हा दंश करेल
याचा काही नेम नाही ।।
- मोहिनी घारपुरे -देशमुख



शुक्रवार, ६ एप्रिल, २०१८

दुनियादारी

आज पुन्हा प्रत्यय आला
कुणी नसे रे जगी कुणाचा
पैसा प्रसिद्धी सबकुछ झूटा
कर्ता करविता तोच खरा ।
कोण कुणाची शिकार करतो
कोण तयास भरीस घालतो
मित्रत्त्वाचे खोटे बुरखे
जो तो इथे जगी पांघरतो ।
अखेर येते जेव्हा वेळ
जो तो काढे तत्काल पळ
देई झटकून नातीगोती
असाच चाले सारा खेळ ।
सलमान असो वा असो कुणी
दोषी असता होई शिक्षा
मात्र न उरती मित्र तया
जे करीत होते त्यासह मजा।
अशीच आहे दुनिया सारी
जर तुम्ही न ओळखाल खरे चेहरे
संकटकाळी जे न उरती
ते कसे हो मित्र खरे ?
ते फक्त तोंडपुजे अन्
तयांस हवी केवळ मौजमजा
दूरच रहावे अशांपासून
अन्यथा मिळते आपल्यालाच सजा ।।
- मोहिनी घारपुरे -देशमुख

गुरुवार, ५ एप्रिल, २०१८

टीव्ही झाला मित्र

मी तरूण भारत या विदर्भातील नामांकित वर्तमानपत्रात कार्यरत असताना मला एकदा एका आजींचा फोन आला होता. त्यांना माझी त्या दिवशीची कव्हरस्टोरी वाचून माझ्याशी खूप बोलायचं होतं. सैराटमधल्या आर्चीचं शिक्षण थांबल्याच्या काही बातम्या आल्यानंतर मी तो लेख लिहीला होता. आर्ची लहान असल्याने लोकांनीही थोडं थांबावं आणि तिच्या कौतुकासाठी रांगा लावण्यापेक्षा तिला शाळेची वाट मोकळी करून द्या असा त्या लेखाचा आशय होता. त्या संध्याकाळी या आजींचा फोन आला, माझ्या लेखाचं कौतुक केलं त्यांनी आणि मग जरासं स्वतःविषयीही बोलल्या. आजी एकट्याच रहात होत्या.. मिस्टर वारल्यानंतर त्यांनी स्वेच्छेने मुलांकडे जायला नकार दिला आणि आपल्या आहे त्या घरातच त्या एकट्या रहाणे पसंत करत होत्या. घरात टीव्ही हा एकमेव सोबतीला... दिवसभर तसं कोणी येणारं जाणारं नाही, पण आपला दिनक्रम तर आपल्याला पाळावाच लागतो.. मग काय मी आपली टीव्ही लावून ठेवते दिवसभर.. आणि मला असंही टीव्ही पहायला खूप आवडतो अगदी आधीपासूनच..
आजी सांगत होत्या आणि मी ऐकतानाच भूतकाळात रमत होते.. एक काळ होता जेव्हा टीव्ही हवा नको , टीव्ही नकोच, लहान मुलांनी तर पाहूच नये, म्हाताऱ्यांनाही टीव्ही कशाला हवा असल्या चर्चांचे फड रंगायचे.. कुठे तो काळ आणि कुठे हा आजचा काळ .. टीव्ही आहे तसाच आहे, आहे तिथेच आहे, प्रत्येकाच्या घरातलं आपलं स्थान टिकवून आहे... पण आपण मात्र टीव्हीचं आपल्या मनातलं स्थान बोलबोलता किती पक्क करत गेलो नै .. आज आपलं असं कोणी मागे उरलं नसताना टीव्हीचीच एखाद्या आजीला सोबत वाटत असेल तर टीव्हीला नावं ठेवण्याची पूर्वीचीच चूक तुम्ही तरी कराल का ?
- मोहिनी घारपुरे - देशमुख

सुचली तर कविता    
नाहीतर फक्त शब्द ।
झालीच तर मैत्री
नाहीतर फक्त गर्दी ।
जमलच तर प्रेम
नाहीतर फक्त गेम ।
पटलीच तर ओळख
नाहीतर फक्त आठवण।
सापडलाच तर विश्वास
नाहीतर फक्त आधार।
व्यक्त झालंच तर फक्त मन
नाहीतर फक्त तन ।
उरलेच तर स्मरण
नाहीतर कोण आपण ?
- मोहिनी घारपुरे - देशमुख




बुधवार, ४ एप्रिल, २०१८

भूतकाळ

कशी कोण जाणे
उलगडत गेली पानं
नी आठवत गेला भूतकाळ
सुरस, सुंदर, रम्य ।
पण आठवत नाहीत तरीही
काळाचे नेमके संदर्भ
नेमके कधी कोठे कोण
आपल्याला कसे भेटत गेले ।
गेलेले दिवस परत ना येणार
निसटलेले हात पुन्हा ना मिळणार
हे जाणतो म्हणूनच
शोधत रहातो काळाच्या खाणाखुणा
भूतकाळाच्या निसटत्या पडद्याआड ।
पण तोही चुकार बदमाश
दाखवतो केवळ काहीच चित्र
ज्या चित्रांचे रंग असतात
गडदपणे काळजावर उमटलेले ।
- मोहिनी घारपुरे - देशमुख

जळगाव आकाशवाणीच्या माझ्या रम्य आठवणी

रूढ अर्थाने प्रत्येकाच्याच आयुष्यातला सर्वात आनंदाचा काळ जरी बालपण असला तरीही माझ्या मते मात्र खरा आनंदाचा काळ तोच, ज्या काळात नशीबाचा वरदहस्त आणि तुमचे कष्ट एकत्रितपणे तुम्हाला भरभरून देतात आणि तुम्हीही कोणत्याही विवंचनांशिवाय आपल्या झोळीत परमेश्वराकडून मिळालेल हे अपार सुख अगदी क्षणक्षण आणि कणकण जगता. प्रत्येकाच्याच आयुष्यात असा एक काळ नक्कीच येतो, मग तो जीवनचक्राच्या कोणत्याही टप्प्यावर येऊ शकतो आणि जीवनात किमान एकदातरी आणि कमाल कितीही वेळा येऊ शकतो असं मला वाटतं.
तर, माझ्याही आयुष्यात हा असा काळ आला होता जेव्हा माझे शालेय जीवन सुरू झाले. लहानपणापासूनच मी तशी हुशार, धिटुकली आणि मल्टीटॅलेंटेड. तसंच समजूतदारपणा, चांगला स्वभाव, नेतृत्वगुण, मोठ्यांचा आदर आदी गुण असलेली आणि भरपूर मित्रमैत्रिणी असलेली मुलगी. त्यामुळे शाळेतल्या विविध उपक्रमात नेहेमी पुढे असायची. दरवर्षी माझे वर्गमित्र मला वर्गप्रमुख म्हणून हमखास निवडून देत. शिवाय माझं वक्तृत्व चांगलं होतं, आवाज गोड आणि वाचनाची (मोठ्याने वाचनाची) आवड तसेच वाचन चांगले त्यामुळे वर्गात धडे वाचायला बरेचदा मला संधी मिळे. मला आजही चांगलं आठवतं,  एकदा धडा वाचायला सांगितल्यावर मी तो वाचिक अभिनयासकट इतका सुंदर वाचला होता की त्यानंतर आमच्या सरांनी माझं प्रचंड कौतुक केलं होतं. माझ्या बाजूला बसणाऱ्या मैत्रिणींनी तर अंगावर शहारे आल्याची कबूलीही दिली होती.
तर असे माझे कौतुकाचे, आनंदाचे, अभिमानाचे शालेय दिवस सुरू असतानाच सहावीच्या वर्गात असताना एक खूपच छान संधी मला मिळाली. आमच्या शाळेच्या तत्कालिन पर्यवेक्षिका मा. रोहिणी बलंग बाईंनी मला बोलावलं. मी त्यांच्या समोर हजर झाले तर तिथे आणखी एक बाई बसल्या होत्या. गोऱ्या, सुंदर आणि अत्यंत टापटीप आणि काहीशा कडक व्यक्तिमत्त्वाच्या या बाई काही कार्यक्रमासाठी चांगला अभिनय करणाऱ्या, चुणचुणीत मुलामुलींच्या शोधात होत्या. या बाईंच नाव होतं मीनल सौदागर. बलंग बाईंनी माझी त्यांच्याशी ओळख करून दिली आणि मला त्यांच्यासमोर काही उतारे वाचून दाखवायला सांगितले. माझ्यासाठी वाचन काही अवघड गोष्ट नव्हतीच त्यामुळे मी लगेचच तो उतारा वाचला.. आणि सौदागर बाईंनी मला क्षणार्धात सिलेक्ट केलं. नेमकं आपल्या आयुष्यात काय चाललय हे कळायचं वगैरे ते माझं वयच नव्हतं. ते वय होतं जगावर विश्वास ठेवण्याचं, शिकण्याचं आणि मोठ्या माणसांकडून चांगल्या कामाचं कौतुक करून घेण्याचं, त्यांचे भरभरून आशीर्वाद मिळवण्याचं...
सौदागर बाईंनी अगदी सहाव्या वर्गात असलेल्या मला सिलेक्ट केलं आणि खूप मोठा विश्वास ठेवला तसंच माझ्या मनातही आत्मविश्वासाची ज्योत पेटवली. सौदागर बाईंनी जळगाव आकाशवाणीसाठी आरोग्यविषयक एका दीर्घ मालिकेचं लेखन केलं होतं. या मालिकेत दोन शालेय विद्यार्थ्यांची  (एक मुलगा आणि एक मुलगी)  पात्र कायम होती आणि काही पात्र त्या त्या भागापुरती होती. या दोन कायमस्वरूपी पात्रांमधल्या मीनलच्या पात्राकरीता बाईंनी मला निवडलं होतं.
मग काय दर महिना दोन महिन्यानी जळगावला आमचं रेकॉर्डींग असायचं आणि दर आठवड्याला त्याची पूर्वतयारी सौदागर बाई त्यांच्या घरी करून घ्यायच्या. शाळेनंतर उरलेल्या वेळेत आम्ही बाईंकडे जमायचो.. बाई स्क्रिप्ट हातात द्यायच्या... त्यावरचं बाईंच हस्ताक्षर आजही माझ्या डोळ्यांसमोर तसंच आहे. बाई आम्हाला स्पष्ट उच्चार आणि वाक्यांचा टोन कसा असावा हे नीट समजावून सांगत. तसंच वाक्य कुठे तोडायचं, कुठे थांबायचं, श्वासाचा आवाज कसा नियंत्रित करायचा हे सगळं छान समजावून सांगायच्या. मग आम्ही ते आत्मसात करायचो आणि रेकॉर्डींगला जायचो.
जळगाव आकाशवाणीच्या स्टुडीयोत प्रत्यक्ष रेकॉर्डींगच्या वेळी त्यामुळे फारशा चुका व्हायच्या नाहीत. वेळ वाचायचा आणि पुन्हा नाशिकला परतायचो. मला वाटतं, किमान दोन वर्षतरी ही मालिका सुरू होती.. आरोग्याचं गाव असं काहीसं या मालिकेचं नाव होतं.
माझा वाचिक अभिनय तर बाईंना खूपच आवडायचा. त्यामुळे माझं भरभरून कौतुकही शाळेत आणि सर्वत्र होत होतं. अशातच एकदा आमची ही मालिका ज्येष्ठ लेखक तथा नाटककार वसंत कानेटकरांनी ऐकली आणि त्यांनी बाईंना पत्राद्वारे मालिका उत्तम सुरू असल्याचं कळवलं. एवढच नव्हे तर नाशिक आकाशवाणीवर तुमच्या मालिकेतील प्रमुख दोन पात्र साकारणाऱ्या मोहिनी व आशुतोषने माझी मुलाखत घ्यावी असंही त्यांनी म्हटलं होतं... हे पत्र म्हणजे आमचे पाय जमिनीवर न ठेवणारा क्षण.. मग काय बाईंनाही कोण आनंद, बलंग बाईंनीही आमचं खूप कौतुक केलं आणि मला एवढ्या लहानपणी एवढा मोठा क्षण जगता आला.. खरंतर त्या लहान वयात कानेटकर कोण हे देखील माहीत नव्हतं त्यामुळे बाईंनी त्यांच्याहीबद्दल आम्हाला सांगितलं, मुलाखतीचे प्रश्न काढून दिले आणि आमची तयारीही करून घेतली होती..
माझ्या आयुष्यातलं सर्वात मोठं म्हणता येईल  एवढं बाळबोध आणि तरीही तितकच पवित्र असं यश म्हणजे हा क्षण होता. याचाच अर्थ, केवळ चांगलं काम केल्यानेच पुढच्या यशाचे मार्ग आपोआप उघडे होत जातात असाच लावता येऊ शकतो आणि आजही, अगदी प्रत्येकाच्याच बाबतीत ते खरं आहे.  माणसं जेव्हा प्रामाणिकपणे मेहनत घेतात, झोकून देऊन आणि निरपेक्ष बुद्धीने काम करतात तेव्हा यश मिळतेच यात शंका नाही. पण हा सगळा पाया ज्ञान आणि साधनेच्याच बळावर उभा राहू शकतो हे देखील खरे. हे लिहीण्याचं कारण एवढंच की हल्ली प्रचंड वाढत्या स्पर्धेत प्रत्येकालाच चमकून दाखवायचं आहे आणि त्यासाठी तो काहीही करण्याची तयारी दाखवतो, पण या काहीहीचा अर्थ इतरांशी कपट करून, खोटेपणा करून पुढे जाणे असा नाही हे त्याला समजत नाही.. मग त्याची पावलं चुकतात.. आणि त्याचं यश त्याला जसं मिळतं तसं क्षणार्धात विरूनही जातं. याचं कारण एकच, माणसाने ज्ञान वाढवण्यासाठी अभ्यास करायला हवा, साधना करायला हवी ..पण तरीही जगरहाटी काही निराळीच आहे, केवळ ज्ञानसाधना पुढे जाण्यासाठी पुरेशी नसते तर माणसाला स्वतःला आपले पांडीत्यही दाखवावे लागते, मग या विसंगत चक्रात पुढे जाणं सगळ्यांनाच शक्य होत नाही तेव्हा ते वेगवेगळे मार्ग अवलंबतात आणि पुढे जाण्याचा आभास यशस्वीरित्या निर्माण करतात हे माझे निरीक्षण आहे.
जळगाव आकाशवाणीच्या या दिवसांनी मला खऱ्या अर्थाने समृद्ध केलं. नंतर केव्हाही जळगावला जाणं झालं आणि रस्त्यातून जाताना आकाशवाणी केंद्र दिसलं तरीही जुने दिवस आठवल्यावाचून रहायचे नाहीत.
हे दिवस अत्यंत मजेचे, आनंदाचे आणि सुखाचे होते. नवीन शिकण्याचे आणि करून बघण्याचे होते. या दिवसांच्या आठवणी म्हणूनच आजही माझ्या मनात अगदी मोगऱ्याच्या सुगंधाप्रमाणे दरवळत आहेत ..
- मोहिनी घारपुरे - देशमुख

मंगळवार, ३ एप्रिल, २०१८

माझे आकाशवाणीचे दिवस

मी काही वर्षांपूर्वी नाशिक आकाशवाणीच्या युववाणी कार्यक्रमाकरीता खेळ बुद्धीचा हा एक कार्यक्रम तयार केला होता. हा कार्यक्रम तरूणांसाठी प्रश्नमंजुषेचा होता. एकूण तेरा भागांचा हा कार्यक्रम मला सुचला व मी लगेच माळोदेंची भेट घेतली. त्यांनीही लगेच मला दाद दिली व मी कामाला लागले. मी तेव्हा दिव्य मराठीमध्ये नोकरीही करत होते. त्यामुळे साडेदहाचं पंचिंग असायचं. तत्पूर्वी सकाळी आठ वाजताच मी आकाशवाणीत जायचे. तिथे आम्ही रेकॉर्डींग करायचो आणि मग धावतपळत मी ऑफीस गाठायचे.
माझ्याकडे तेव्हा दिव्य मराठीने तरूण व महिला हे बीट सुपूर्द केले होते. त्यामुळे मी ठिकठिकाणची कॉलेजेस हिंडायचे. रोज किमान चार ते पाच कॉलेजेसमध्ये जाऊन तिथल्या वेगवेगळ्या प्राध्यापक, कर्मचाऱ्यांशी वगैरे भेटीगाठी घेऊन बातम्या शोधायचे. त्यातच मी वेगवेगळ्या कॉलेजमधील ग्रुप्स हेरून त्यांना माझ्या या आकाशवाणीच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी विचारत असे. मग त्यापैकी इच्छुक मुलांना रेकॉर्डींगसाठी बोलवत असे.
मी प्रश्नमंजूषेचे स्वरूप काहीसे असे ठेवले होते... एकूण तीन फेऱ्या. पहिल्या फेरीमध्ये प्रत्येक गटाला सामान्य ज्ञानावर आधारीत दोन दोन प्रश्न विचारले जात. दुसरा म्यूझिक राऊंड. यामध्ये एखाद्या ऑडीओ क्लिपवर आधारित प्रश्न विचारला जाई. त्यात कधी एखादं गाणं, कधी एखाद्या सेलिब्रिटीचा आवाज ऐकवला जाई व त्याअनुषंगाने प्रश्न विचारले जात. तिसरा राऊंड रॅपिड फायरचा होता. यामध्ये प्रत्येक गटाला पाच पाच प्रश्न विचारले जात व त्याची त्या त्या गटाने लगोलग उत्तरे देणं अपेक्षित असे. एकूण गुणसंख्या मोजल्यानंतर दर भागाचे विजेते घोषित केले जात.
प्रत्यक्ष सहभागी मुलांपेक्षा दरवेळेला आमच्या टीमचीही तितकीच कसोटी लागत असे. प्रश्न शोधण्याकरिता, शोधलेल्या प्रश्नांतील सत्यता, योग्यता व दर्जा पडताळून पहाण्यासाठी नाशिक आकाशवाणीचे सध्याचे प्रमुख व तत्कालिन युवा व विज्ञान विभाग प्रमुख शैलेश माळोदे सरांचे अत्यंत मोलाचे मार्गदर्शन मला मिळाले. त्याचबरोबर या कार्यक्रमाचे काम एकटीने करणे तर केवळ अशक्यच होते, त्यामुळे मी एक टीम तयार केली होती. स्पर्धकांच्या एन्डला जेवढी मजा येत असे त्याच्या कैकपट अधिक मजा आमच्या टीमने केली यात शंका नाही.
कार्यक्रमाची संकल्पना, त्यात लागणारे सहभागी स्पर्धक या सगळ्याची अरेंजमेंट मी करायचे. कार्यक्रमाकरिता तज्ज्ञ मंडळामध्ये सध्याचे नाशिक आकाशवाणीचे मुख्य शैलेश माळोदे सर नेहमी हसतमुखाने, तत्परतेने मार्गदर्शन करायचे. माझ्याबरोबर सहनिवेदक म्हणून लौकीक प्रभुणे, चंद्रमणी पटाईत काम पहात आणि सुनेत्रा महाजनही सहनिवेदन व कार्यक्रमाच्या संकलनाची जबाबदारी सांभाळत असे.
कार्यक्रमाच्या रेकॉर्डींगच्या वेळेला तर इतकी धम्माल चालत असे. कधी कोणी मोठ्याने डायलॉग बोले तर कधी शब्दच न सुचल्याने अडखळायला होई. कधी बोलता बोलता कोणाची बोबडी वळत असे आणि एकच हशा पिकत असे. विशेषतः जे स्पर्धक होते त्यांना आकाशवाणीची तशी काहीच सवय नसे हे ओघाने आलंच त्यामुळे ते एकूणच वातावरणाला थोडेसे गांगरलेले असत. काही काही धिटुकले मात्र मस्त मौके पे चौका मारून घेत.
रेकॉर्डींग झालं की आमची टीम सगळे मिळून मस्तपैकी चहा प्यायला जवळच्या टपरीवर जात असू. रेकॉर्डींग आटपलं की प्रत्येकालाच आपल्या दिवसभरच्या कामाला लागायचं असल्याने खूपच धावपळ होत असे पण तरीही आम्ही सगळे आपापला वेळ आणि जबाबदारी छान मॅनेज करत असू. दोन अडीच महिने हा कार्यक्रम आकाशवाणीवर चालला. आठवड्यातून एकदा तो प्रसारित व्हायचा. अवघ्या वीस मिनीटाच्या आकाशवाणीच्या कार्यक्रमासाठी आठव़डा आठवडा मी तयारी करायचे. मुलं निवडणं, त्यांच्याशी संपर्कात राहून प्रत्यक्ष रेकॉर्डींगच्या दिवशी त्यांची उपस्थिती असावी यासाठी फॉलोअप घेणं, प्रश्न काढणं, प्रश्न रिपीट होऊ नयेत याची काळजी घेणं, कार्यक्रमाचं लेखन, प्रश्नांबाबत माळोदे सरांबरोबर सल्लामसलत करून मग योग्य प्रश्न व त्याचे चार पर्याय निवडणं, बाकी सहकाऱ्यांशी कोऑर्डीनेट करत रहाणं ही आणि अशी सगळी लहानमोठी कामं मी अत्यंत आनंदाने व जबाबदारीने पाहिली.
आकाशवाणीसाठी एवढी मोठी जबाबदारी पेलण्याची माझी ती पहिलीच वेळ होती. शिवाय संकल्पना सुचून नंतर ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आकाशवाणीनेही मला खूप सहकार्य केलेच तसेच मला एवढी मोठी संधी दिली होती. आणि मला ही संधी दवडायची नव्हती तर त्यातून शिकत पुढे जायचं होतं. आणि मी हे करू शकले याचं कारण लौकीक, सुनेत्रा, चंद्रमणी आणि प्रत्यक्ष माळोदे सर यांचे मिळालेले सहकार्य..
तर असे माझे आकाशवाणीचे दिवस.
खरंतर माझ्या शालेय जीवनापासूनच आकाशवाणीशी माझा थेट संपर्क आला आहे. कसा, कुठे, कोणामुळे असे बरेच प्रश्न तुमच्या मनात उपस्थित झाले असतील ना .. मी ही नक्कीच या सगळ्याबद्दल लिहीणार आहे .. पुढच्या लेखात ..
- मोहिनी घारपुरे - देशमुख

Translate

Featured Post

अमलताश