मंगळवार, २४ एप्रिल, २०१८

एक अस्वस्थ प्रवास

गेले दोन -तीन दिवस झपाटल्यागत नशायात्रा हे पुस्तक वाचून काढलं. लेखक तुषार नातू यांच्या या पुस्तकातील काही भाग फेसबुकवर एका पोस्टमध्ये वाचनात आला. सहज म्हणून तुषार यांचा फेसबुकवर शोध घेतला तर तेही फेसबुकवर सक्रीय असल्याचे आढळून आले. मग त्यांच्याकडून पुस्तकाची व्हॉट्सअॅपप्रत मागून घेतली. दररोज थोडे थोडे भाग वाचत गेले आणि एक वेगळेच अनाकलनीय गूढविश्व उघडले गेले. 
नशेच्या यात्रेत माणूस कुठल्या टोकापासून सुरूवात करतो नी कुठवर खोल खोल रूतत जातो आणि पुन्हा सुदैवाने कोणीतरी हात हातात धरून त्याला बाहेर येण्यास मदत करत जातं आणि पुन्हा आयुष्याचा मार्ग सुकर होत जातो हा सारा प्रवास आत्मकथनाच्या रूपाने तुषार नातू यांनी या पुस्तकात अत्यंत प्रामाणिकपणे कथन केला आहे. 
आपली ओळख निर्माण व्हावी असं स्वप्न प्रत्येक तरूणाचं असतं, मग स्वप्न सत्यात आणण्यासाठी कष्ट, योग्य दिशेने कष्ट तर घ्यायलाच हवेत ना .. पण अनेक तरूणांना उमेदीच्या दिवसातच केवळ स्वप्नरंजनाचीच सवय जडते, मग कुसंगत लागते, मग एकदा मजा म्हणून नशा, अमली पदार्थांचा आयुष्यात प्रवेश होतो, मग चोरी, खोटं बोलणं, पैशांची अफरातफर, माजोरडी वृत्ती, कुटुंबीयांशी प्रतारणा या सगळ्या पायऱ्या तो स्वतःच आपोआपच चालतो, त्याला ते आपोआपच जमत जातं. अशातच कधीतरी स्वतःवरचा राग, समाजावरचा राग या भावना वाढीस लागतात.. मग अतिरेकी नशा केली जाते .. मग कडेलोट होतो आणि आयुष्य उद्ध्वस्त होतं.. पण नशेकर व्यक्ती एवढा खोल खोल बुडालेला असतो या गर्तेत की त्याला आपलं तर भान उरतच नाही तसंच आपल्या कुटुंबीयांविषयी मनात आकस, सुधारणेचे पोकळ प्रयत्न आणि पुढेमागे जीवन संपवण्याचा प्रयत्न करून कडेलोट करण्यापर्यंतही यांची मजल जाते. 
एवढ्या टोकापर्यंत जाऊनही पुन्हा त्यातून बाहेर पडणं, पूर्ण बरं होणं हे काहींनाच जमू शकतं आणि त्यांपैकीच एक नाव म्हणजे तुषार नातू असं म्हणायला हरकत नाही. चौदावर्ष झाली असतील त्यांना पूर्ण बरं होऊन .. हो हो बरं होऊन असंच म्हणणं योग्य आहे. कारण व्यसनाधीनता हा एक मनोशारिरीक आजारच आहे. मात्र, आपण अजूनही याकडे त्या माणसाचा दोष म्हणूनच पहातो. वास्तविक एकदा अंमली पदार्थांचं सेवन केलं की आपलं शरीर आणि मन सतत त्याची मागणी करायला लागतं आणि ते मिळेपर्यंत स्वस्थता लाभू देत नाही. यात त्या माणसाचा दोष असा की त्याने पहिलाच घोट किंवा पहिले सेवनच ठामपणे नाकारायला हवे. पण तारूण्याचा जोश, नवं काहीतरी करण्याची धुंदी आणि आपला पोकळ स्वाभिमान (अहंकार) यामुळे अनेक तरूण या सगळ्या वाटा चोखाळत जातात. 
नशायात्रा पुस्तक वाचताना मला सुरूवातीला राग राग आला .. लेखकाचा .. 
नशेच्या पूर्ण आहारी गेलेला लेखक घरी कशी कशी नाटकं करून पैसे उकळायचा, मग एकदा पूर्ण सुधारल्याचा विश्वास देऊन वडिलांकडून कामधंदा सुरू करायचा म्हणून पैसे घेतो आणि आपल्या स्वार्थासाठी सहेतुक पानटपरीचा व्यवसाय सुरू करण्याचा मानभावीपणा करतो, त्या टपरीचीही वाट लावतो, तिला तर नशेची छावणीचं रूप देऊन मोकळा होतो.. मग लक्ष्मीपूजनाच्या भयाण दिवसाची करूण कहाणी वाचताना तर आपल्याला लेखकाच्या आयुष्याची किळस, घृणा वाटायला लागते. मग नशेच्या अंमलाखाली पूर्ण गेलेला लेखक मेंटल हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन बरा होऊन परत येतो काय, पंचवटी हॉटेलमध्ये कॅशियर पदावर नोकरी करू लागतो काय.. कामही उत्तम, प्रामाणिकपणे करतो हे वाचताना आपल्या मनात पुन्हा आशा पल्लवीत होत असतात पण हाय रे अशातच तिथे महिन्यादोन महिन्यातच त्याची त्याच्या एका जुन्या व्यसनी मित्राची गाठ योगायोगाने पडल्याचे आपण वाचतो आणि हा व्यसनी मित्र तिथेच कामाला असल्याने लेखक आपोआपच त्याच्या नादी लागून पुन्हा आपला संयम विसरून नशेच्या गर्तेत खोल खोल बुडतो.. नोकरी सुटते आणि पुन्हा ये रे माझ्या मागल्या सुरू होते.  खरंतर हा प्रसंग वाचेपर्यंत लेखकाची ही "नशायात्रा" एवढी खोल खोल गेलेली असेल असे वाटतही नाही. लेखक जे वागल्याचे लिहीले आहे ते त्याचे तारूण्यसुलभ वर्तन असेल असे वाटून आपण वाचक म्हणून त्यास सहानुभूती देत जातो.. पण हा प्रसंग वाचताना आपल्याला वाचकांना त्याचा राग आल्याशिवाय राहात नाही.. 
मग पुन्हा व्यसन, पुन्हा मेंटल हॉस्पिटल असे करत करत तब्बल चार वेळा मेंटल हॉस्पिटलच्या वाऱ्या लेखकाने केल्या असल्याचे कळते. या दरम्यान त्याला जीव लावणारी भेटलेली एक मुलगी, तिच्या कोवळ्या भावना, तिचा भाबडेपणा सारं सारं वाचताना लेखकाच्या जीवनाविषयी आपले डोळे पाणावल्यावाचून रहात नाही. कित्येकदा ठरवून बरा होण्याचा प्रयत्न करून पुन्हा जुनी संगत भेटते काय नी लेखक पुन्हा व्यसनात बुडतो काय हे वाचताना  "अरे देवा, काय होतं या मुलाचं नशीब " असंही वाचकांना क्षणभर वाटून जातं. या दरम्यान मोठ्या भावाचा आधाराचा हात, वडिलांचं आजारपण, आईचा संयम या सगळ्यांच्या आयुष्याची लेखकाने जी नासाडी केली त्याबद्दल पुन्हा पुन्हा राग तर येतोच पण त्याच्या कुटुंबाच्या सोशीकपणाची परीसीमा केवळ नतमस्तक होण्याजोगी वाटते. 
नंतर तर लेखक चक्क उपचारासाठी जायचं या नावाखाली भावाकडून पुन्हा पैसे घेतो ते मनात व्यसनं पुरवण्याची योजना बनवूनच .. भाऊ त्याला बसमध्ये बसवतो, तिकीट काढायला लावतो आपल्यासमोर, हा देखील भावासमोर तिकीट काढतो आणि भावाची गाडी नजरेआड होताच तेथून कंडक्टरला, आपण नोकरीच्या मुलाखतीसाठी निघालोय पण एक महत्त्वाचं प्रमाणपत्र घरीच विसरलोय त्यामुळे आपलं तिकीट रद्द करावं अशी  चक्क निलाजरेपणाने थाप मारून तिकीट अन्य कोणाला विकून गाडीतून उतरतो, भावाने दिलेल्या पैशातून व्यसनं करत फिरतो आणि नंतर कधीतरी गाडी पकडून मग प्रवासास निघतो हे वाचताना डोक्यात तिडीक गेल्याशिवाय रहात नाही..
एका टप्प्यात तर लेखकाने अशी कबूलीही दिली आहे की तो चक्क घर सोडून थेट मुंबईला गेला. तिथे नशा करत तो जे फिरला त्यात पैसे कमवण्यासाठी हॉटेलच्या थाळ्या धुण्यापासून ते कचरा गोळाकरण्यापर्यंतची कामे केवळ अंमली पदार्थांच्या खरेदीसाठी पैसे हवेत म्हणून त्याने केली.. 
खरंच, ही एवढी दुर्दशा ..? हे एवढे नैतिक अधःपतन ..? हे वाचताना कपाळावर हात मारून घेतल्याशिवाय आपण रहात नाही. 
पण तरीही या जगात देव आहे, आणि जसा देव आहे तसेच प्रत्येक जीवाचे भोगही आहेत.. ज्याच्या वाट्याला जे भोग येतात ते त्याला भोगावेच लागतात हे देखील सत्य येथे गृहीत धरून आपण लेखकाला थोडीशी सहानुभूती देतो आणि पुस्तक पुढे वाचत जातो. अशा टप्प्यावर जेव्हा आपल्याला वाटतं की हा चांगल्या घरचा मुलगा एवढा कसा वहावत गेला, एवढी कशी वाताहत लागली याची .. या टप्प्यावरच त्याच्या जीवनाने त्याला मुक्तांगण नावाच्या संस्थेत पोचवल्याचे वाचनात येते आणि पुन्हा आपली आशा पल्लवीत होते, कर्ताधर्ता तो ईश्वरच आपण सगळे त्याच्या हातच्या कळसूत्री बाहुल्या असेही वाटून जाते..आणि आपण पुढे आणखी काय वाढून ठेवले होते या मुलाच्या नशीबात या विचाराने वाचू लागतो.  
या टप्प्यावर लेखकाच्या आयुष्यात देवासमान डॉ. अनील अवचट आणि डॉ.अनीता अवचट आले म्हणूनच की काय त्याचे आयुष्य पुन्हा मार्गी लागले असेच मी म्हणेन. मुक्तांगणमधील कामाची पद्धती वेगळी आहे हे एव्हाना सर्व महाराष्ट्रीयन लोकांना माहीत आहेच. मात्र, वाचक म्हणून आपल्याला लेखकाविषयी जी उत्सुकता वाटते आणि त्याने मुक्तांगणमध्येही पुन्हा नशा केली नसावी अशा आशेने आपण पुढे वाचत जातो तेव्हा एका टप्प्यावर आपल्याला हळूहळू समाधानाची भावना आपसुकच मनात मिळत जाते. याचं कारण, जर मुक्तांगणमध्येही लेखकाने नशेच्या वाटेवरून माघारी फिरणे साध्य केले नसते तर आज कदाचित त्याचे अस्तित्वही असते की नसते याबद्दल मी साशंक आहे. पण कसं कोण जाणे, मायेची फुंकर मिळाल्याने, लेखकातील सूप्त कलागुणांना वाव मिळाल्याने आणि व्यसनाधीनतेबद्दल शास्त्रीय दृष्टीकोन मिळाल्यानेच लेखक स्वतःला थांबवू शकला असे ठामपणे मला वाटले. लेखकाची नशायात्रा खऱ्या अर्थाने तेव्हाच थांबली जेव्हा त्याला मुक्तांगणमध्ये चांगली माणसं मिळाली, आणि त्यांनी लेखकाला तू हा बदल स्वतःत करू शकतोस हा विश्वास दिला... 
आता लेखक व्यसनी लोकांच्या पुनर्वसनाचे काम करत आहे. नागपूरमध्ये मैत्री या संस्थेच्या माध्यमातून त्यांचे कार्य सुरू आहे हे समजल्यावर जरासा दिलासा वाचकांना मिळतो. 
पण मला संपूर्ण पुस्तक वाचताना, "..... पण का ?" या प्रश्नाने अहोरात्र छळले आहे. चांगलं घर, चांगले आईवडील, चांगली भावंड सारी सारी सुबत्ता असूनही केवळ स्वतःचा अहंकार एवढा हैदोस घालू शकतो की एखाद्याच्या उमलण्याच्या वयात त्याचं सारं सारं भविष्य करपून टाकू शकतो ? .. हा प्रश्न माझ्यासाठी निरूत्तरीत रहातो. काही काही प्रसंग वाचताना लेखकाचा एवढा राग येतो आणि काही काही प्रसंग वाचताना त्यांच्याविषयी करूणा, दयाच वाटत जाते.. एकेका प्रसंगात तर आपल्या डोळ्यात पाणी आल्यावाचून रहात नाही एवढे भावविवश आपण होत जातो.. 
सतत तीन दिवस मी हे पुस्तक मोबाईलवर वाचून काढत होते.. आता जेव्हा अखेरच्या टप्प्यात पुस्तक आलं तेव्हा पुन्हा एकदा फेसबुकवर लेखकाचे फोटो पाहिले.. खरोखरीच त्यांच्या तारूण्याच्या दिवसातलं त्यांचं उमदं रूप आणि नंतर व्यसनांच्या विळख्यात सापडल्यानंतर झालेली दुरावस्था आणि आता पुन्हा संसार करत असताना जबाबदारीने आपल्या कुटुंबासाठी, आपल्या समाजासाठी उभा राहिलेला एक पुरूष .... हे सगळं एकाच आयुष्यात घडू शकतं का? हा प्रश्न मनात उभा रहातो.. 
एकेकाळी व्यसनांमुळे ज्याने आपली जन्मतःच मिळालेली "तुषार नातू" ही ओळख धुळीस मिळवून टाकली होती तोच हा मुलगा पुन्हा सगळ्या भूतकाळाच्या नांग्या ठेचून आज त्यावर एक चांगली प्रतिमा घेऊन जगण्यासाठी सकारात्मकतेने सज्ज झाला आहे असा विश्वास वाटतो. आणि म्हणूनच ही यशोगाथा, ही विजयगाथा वाचताना शेवटी आपण अभिमानाने विचारल्यावाचून रहात नाही, "excuse me, तुषारच ना तू ?" 
तर मित्रांनो, प्रत्येक व्यसनी माणसाने, प्रत्येक भावनिक माणसाने, आणि प्रत्येक असा माणूस ज्याचा स्वतःवर संयम रहात नाही त्याने हे पुस्तक किमान एकदातरी शिकण्याच्या हेतूने वाचायलाच हवे. भावनेच्या आहारी जाऊन चुका करणं हा मानवी स्वभाव आहे पण चुका अशा कराव्यात ज्यातून आपलं आणि आपल्याबद्दल सद्भावना ठेवणाऱ्या माणसांचं कमीत कमी नुकसान होईल, चुका अशाच कराव्यात जिथून आपल्याला कोणत्याही क्षणी माघारी येण्याचे दरवाजे सापडतील.. नाहीतर माणसाच्या आयुष्यात एकदा निघून गेलेली वेळ आणि एकदा निघून गेलेले वय परत येत नसते हे प्रत्येकाने लक्षात ठेवायलाच हवे. भावनिक असणं चांगली गोष्ट आहे पण भावनांच्या आहारी जाणं, आणि सतत भावनाविवश होणं, आपला संयम ढळणं या बाबी होत असतील तर तुम्हीच स्वतःच स्वतःला हे करण्यापासून परावृत्त केलं पाहिजे.
जाता जाता एकच सांगेन, या जगात मित्र मिळतील , कदाचित तुमच्या नशीबाने चांगलेच मित्र मिळत जातील पण तुम्ही स्वतः स्वतःचे मित्र बनणं सर्वाधिक महत्त्वाचं आहे. कारण तुम्हाला तुमच्यातील शत्रूवर विजय मिळवण्यासाठी तुमच्यातील मित्रच कायम सोबत करणार आहे ....
- मोहिनी घारपुरे - देशमुख 
mohineecasualwriter@gmail.com


६ टिप्पण्या:

  1. छानच लिहिली आहे प्रतिक्रिया , व्यसनाधीनता हा एक मनोशारीरिक आजार आहे ,मित्रांचा आग्रह ,मॊज मजा ,तणावमुक्ती, श्रमपरिहार ,अन इतर अनेक कारणांनी दारु व अन्य मादक पदार्थ जीवनात येतात अन मग हळूहळू आपल्या नकळत ते आपल्याला गुलाम करतात .मग सरु होते कधीही न भागणारी नशेची तहान ,त्यातून सुटका करण्याची इच्छा असली तरी मन इतके कमकुवत झालेले असते की तो सुटकेचा मार्ग दुर्धर होतो , मी जे भोगले ते वाचून इतरांनी सावध व्हावे या हेतुनेच सारे सविस्तर मांडले आहे मी पुस्तकात

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. खरंय तुषारजी .. तुमचं पुस्तक वाचताना फार अस्वस्थ व्हायला होतं.
      तुमचं आयुष्य फारच अवघड वाटांनी गेलं एवढंच मी म्हणेन पण तरीही तुम्ही शेवट गोड केलात याचं कौतुक आहे ..

      हटवा
  2. नक्कीच वाचण्या योग्य
    कुठे मिळेल पुस्तक

    उत्तर द्याहटवा
  3. नक्कीच वाचण्या योग्य
    कुठे मिळेल पुस्तक

    उत्तर द्याहटवा

Translate

Featured Post

अमलताश