शनिवार, २२ डिसेंबर, २०१८

गृहप्रवेश



शांत, संथ गतीने सुरू असलेली एक कथा शेवटाकडे जाता जाता किती वळणदार आणि गतीमान होत जाते याचे उदाहरण म्हणजे गृहप्रवेश हा हिंदी चित्रपट .. 1979 साली आलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शक बासू भट्टाचार्य 
तर कथेची मुख्य पात्र रंगवणारे तीनच कलाकार.. संजीव कुमार, सारीका आणि शर्मीला टागोर..
 तसं पाहिलं तर कथा अगदी नेहमीचीच .. नवरा बायकोच्या सुखी संसारात आलेल्या तिसऱ्या व्यक्तिमुळे नात्यात येणारा तणाव .. पण तरीही या साध्याशा कथेलाच नवा आयाम देण्यात दिग्दर्शकाला यश आलं याचं कारण कथेचा संपूर्णतः निराळा दृष्टीकोण आणि निराळी सहज मांडणी.. 

लग्नानंतर बाई, गृहिणी झाली की ती तिच्यातील सौंदर्य विसरून जाते. सुंदरतेपेक्षा जबाबदारीच्या ओझ्याने अगदी निस्तेज होऊन जाते.. नवराही हळूहळू तसाच होत जातो... अशातच जर आर्थिक परिस्थितीही फार चांगली नसेल तर आणखीनच ओढाताण.. मग संसारगाडाच सर्वात जास्त महत्त्वाचा होतो आणि त्यापुढे आपल्या अस्तित्वाची, स्वप्नांची, स्वतःविषयीच्या कल्पनांची केव्हा माती होत जाते हे आपलं आपल्यालाही कळत नाही. रोज चाकोरीबद्ध आयुष्य जगता जगता नात्यातला रसदारपणा हरवत जातो. अशातच नवऱ्याच्या जीवनात एखादी नवयुवती  यावी आणि नवऱ्याने तिच्याकडे आकृष्ट व्हावे किंवा बायकोच्या आयुष्यात एखादा उमदा तरूण यावा आणि तिला त्याची भूल पडावी हे सहज शक्य आहे, पण तरीही अशा अवघड वाटांवरूनच नातं पुढच्या वळणावर न्यायचं असतं, स्वतःला सावरायचं तसंच पाय घसरलेल्या जोडीदाराली सावरायचं काम दोघांपैकी एकाने करायलाच हवं असतं नाहीतर घर कसं टिकणार, नाही का ..

अशीच काहीशी कथा होते अमर (संजीव कुमार) आणि मानसी (शर्मिला टागोर) यांच्या संसाराचीही..तो अगदी साधा नोकरदार मनुष्य आणि ती त्याची साधीशी बायको. लग्नानंतर ती दोघं भाड्याच्या घरात आपला संसार थाटतात. सुरूवातीपासूनच लहानसहान गोष्टींसाठी तिला तडजोड करावी लागत असते पण तिची तक्रार नसते. फक्त एकच स्वप्न असतं, स्वतःचं घर घ्यायचं... लग्नाला सात आठ वर्ष होतात तेव्हा तिची ही आंतरिक इच्छा फारच तीव्र व्हायला लागते.. तिला तिचं स्वतःचं घर हवं असतं. आणि तो ..तोपर्यंत तो त्याच्या चाकोरीत पूर्णतः अडकून गेलेला असतो. ती घराच्या चाकोरीत आणि तो त्याच्या चाकोरीत .. एव्हाना मुलगाही मोठा झालेला असतो.. शाळेत जात असतो .. वरवर पाहिलं तर सगळंच सुरळीत चालू असतं. अशातच त्याच्या ऑफीसमध्ये सपना (सारिका) टायपिस्ट म्हणून रूजू होते. ती फारच बोल्ड .. शिवाय स्वकेंद्री .. सतत लोकांनी आपल्याबद्दल बोलावं, आपलं तारूण्य न्याहाळावं, यासाठी मनोमनी धडपडणारी .. अर्थात ऐन वयात आलेल्या कोणाही मुलीला असंच वाटत असतं नाही का .. ते नैसर्गिकच .. त्यात चूक ते काय ..
पण त्यामुळे ऑफीसच्या कामकाजात अडथळा निर्माण होत असल्याचे वरीष्ठांच्या लक्षात येताच ते तिची रवानगी या बोअरींगशा अमरच्या केबिनमध्ये करतात. आणि अर्थातच सपना तिच्या तारूण्यसुलभ हलचालींनी त्याचं लक्ष वेधून घेत जाते.. सुरूवातीला भाव न देणारा तो हलकेच तिच्या प्रेमात पडत जातो. 
इकडे मानसी, घर शोधत असते .. तिला तिचं घर हवं असतं..आणि नवरा अमर दुसऱं घर करण्याच्या नादी लागलेला असतो.. 
शेवटी एकदा सपना त्याला लग्नाबद्दल विचारते आणि लवकर काय ते सांग असं ठणकावते.. तोही विचारात पडतो. बायकोला कसं सांगायचं .या विचाराने आलेली अस्वस्थता आणि नेमका तो रविवारचा दिवस .. रेडीओवर गाणं सुरू, बात निकलेगी तो फिर दूरतलक जाएगी .. आता सगळ्या कथानकाचा प्राण या दृष्यांपाशी एकवटतो .. संजीव कुमारची अस्वस्थता .. नवरा घरी असल्याने सुट्टीच्या दिवशीची नेहमीची कामं करत करत शर्मिलाचं घरातलं वावरणं .. तो तिला सांगायचा प्रयत्न करतो पण .. वेळ .. वेळच चुकत असते सारखी .. हा सगळा अभिनय  निव्वळ अप्रतिम .. होता होता रात्र होते .. आणि शेवटी बिछान्यात तो तिला म्हणतो, मै ... मै तुमसे प्यार नहीं करता .... 
या वाक्याने तिची रिएक्शन काय येईल असं आपल्याला वाटतं .. पण ती .. ती निव्वळ प्रश्नार्थक नजरेनी बघते .. विचारते .. जाणून घेते .. आणि एवढे दिवस हे सगळं सुरू होतं आणि आपल्याला कळलंही नाही याचं तिला आश्चर्य वाटतं .. 
आता तिला आलेली अस्वस्थता .. 
एकाच बिछान्यावर दोघेही असून आता त्यांच्यातलं नातंच गोठून गेलेलं असतं ..
रात्र सरते .. दिवस उजाडतो
ती मोठ्या हुशारीनं की हिंमतीनं त्याला म्हणते, आज तिला भेटायला आण घरी .. मला एकदा पाहू तर दे ती कोण आहे .. मी एवढी वर्ष आईसारखी तुझी काळजी घेतली आता किमान तू जिच्याशी लग्न करणार तिला मला या अधिकारानी भेटू तर दे .. ती विनवते .. तो नकार देतो .. ती म्हणते, सपना ने तुम्हे सिर्फ ऑफीसमें देखा है .. घर में नहीं .. तू घरात जसा असतोस ते तिने पाहिलं तर कदाचित तिला तू आवडणारही नाहीस .. म्हणजे मग तिला आणि तुला दोघांनाही तुमच्या भावना खऱ्या आहेत की नाहीत हे तपासायला मिळेल .. तो म्हणतो, बघेन .. तिला विचारून .. आली तर घेऊन येईन घरी ..
तो कामावर जातो आणि मुलगाही शाळेत जातो..
ही घरी एकटी .. 
काहीतरी विचारचक्र सुरू होतात .. आणि हळूहळू ठाम होत जाते.. 
घराच्या भिंती केव्हापासून घासून ठेवलेल्या असतात पण रंग द्यायला वेळच झालेला नसतो ... एका माणसाला बोलावते, आणखी चार माणसं घेऊन ये आणि चार वाजेच्या आत घराला रंग करून दे असं सांगते.. जसं काही तिला खात्री असते, सपना येणार .. नक्की येणार .. 
इकडे घराला रंगकाम सुरू होतं आणि तिकडे ही स्वतः चक्क ब्यूटीपार्लरमध्ये जाते.. स्वतः सुंदर दिसावी यासाठी काय काय करून घेते .. आणि मुलगा घरी येईपर्यंत घरी येते .. आता या क्षणी घराला रंग चढलेला असतो, तिला स्वतःला रंग चढलेला असतो .. ती आणि तिचं घर निव्वळ अप्रतिम दिसत असतात .. 
मुलगा येतो तर चक्रावून जातो .. घर पाहून .. आणि आईला पाहून म्हणतो, तुम बोहोत बुरी हो माँ .. तुम रोज ऐसी सुंदर क्यों नहीं रहती ..ती फक्त हसते ..
संध्याकाळी नवरा येतो आणि त्याची प्रेयसीही आलेली असते .. 
नवरा क्षणभर अवाक् होतो .. हे आपलंच घर आहे ना .. ही आपलीच बायको आहे ना .. असा प्रश्न त्याच्या चेहऱ्यावर उभा रहातो .. क्षणभर .. आणि तो ते अवघडलेपण घेऊन आता वावरतो .. 
सपना तशीही बोल्डच .. 
एकंदरीतच शेवटचा प्रसंग ज्या पद्धतीने तिघांनीही वठवला आहे .. तो अफाटच म्हणायला हवा ..
एक गाठ बसणार असते आणि तितक्यात नेमका धागा हातात येतो आणि आपण क्षणार्धात सारा गुंता सोडवून टाकतो असा हा शेवटचा प्रसंग ..
काही वेळ त्याच्या घरात घालवल्यावर ती निघते .. त्याची बायको त्याला म्हणते, तिला एकटं जाऊ देऊ नकोस .. तू तिला सोडायला जा .. ती नको म्हणते पण मानसी आग्रह करते .. ती दोघं निघतात .. तो तिला सोडायला जातो .. थोड्याशा अंतरावर जाईपर्यंत त्याचं अवघडलेपण, अस्वस्थता आणि गोंधळ सारं सारं आणखी तीव्र होत जातं .. एका सिग्नलपाशी ती पोहोचतात .. सिग्नल लाल होतो .. ती पुढे निघून जाते आणि तो मागेच थांबतो ..
सर्वात शेवटच्या या सीनसाठी दिग्दर्शकाला पैकीच्या पैकी मार्क प्रेक्षक देऊन मोकळा होतो आणि विचारचक्र सुरू होऊन आपल्या मनाची पावलं पुन्हा आपल्या घरापाशी आपल्याला घेऊन येतात.

इतकं साधं कथानक पण संवाद आणि एकेका दृश्याच्या मांडणीतून चित्रपट एवढा मोठा अर्थ मांडून जातो की आपल्यासारखी संवेदनशील मंडळी आतून हलल्यावाचून रहात नाहीत. 
मला हा चित्रपट यातल्या गतीसाठी आवडला.. यातल्या दृश्यांसाठी, दिग्दर्शकांच्या मास्टरस्ट्रोक्ससाठी आवडला. शिवाय, बोलीये सुरीली बोलीया हे गाणं आणि लोगोंके घर में रहता हू हे गाणं .. बात निकलेगी ही जगजीतजींची गझल ... ही सगळी गाणी चित्रपटात इतकी सुंदर वाटतात की प्रेक्षक त्या चित्रपटात या गाण्यांमुळे सहजच अधिक गुंतत जातो ..

असे साधे सहज आणि आशयघन चित्रपट असंही मला नेहेमीच फार आवडतात. 
गृहप्रवेशही त्यातलाच एक चित्रपट ..

- मोहिनी घारपुरे - देशमुख 



तो राजहंस एक ...

गोरी गोरी पान फुलासारखी छान आणि एका तळ्यात होती बदके पिले सुरेख यासारखी एक से एक अजरामर गाणी संगीतबद्ध करणाऱ्या श्रीनिवास खळे काकांच्या स्मृतिदिनानिमित्त (2 सप्टेंबर 2018) ..


असंच एकदा काही दिवसांपूर्वी मी खळे काकांवर झी मराठीने केलेल्या नक्षत्रांचे देणे या कार्यक्रमाच्या पुनःप्रत्ययाचा आनंद यूट्यूबद्वारे घेत होते. माझ्या मनात चलबिचल झाल्यावाचून राहीले नाही.
म्हणतात ना, मोठं होण्यासाठी संघर्ष कुणालाही चुकलेला नाही, आणि ध्येयाच्या उंचीवर पोचण्याकरिता अनेक मानअपमान, हालअपेष्टांचा सामना करावा लागतोच.. याची तंतोतंत प्रचिती खळे काकांची जीवनी ऐकताना येते.
अत्यंत हळव्या मनाचे, संवेदनशील, कृतज्ञ आणि निगर्वी असे खळे काका आजन्म संगीत कलेत रमले. आपला मुलगा छंद म्हणून गाणं जपतोय हे एकवेळ ठीक पण मुलाला नाटक्या करायचं नाही यावर त्यांचे वडील आग्रही होते..एकदा तर खुद्द बालगंधर्वांनी, हा मुलगा मला द्या.. हा पुढे मोठा गायक होईल असे उद्गार काढले पण तरीही खळे काकांच्या वडीलांनी त्यांस चक्क नकार दिला.
पुढे खळे काकांनी एका बँकेत नोकरी केली पण अवघ्या काही तासात सोडली. मग रेल्वे स्टेशन मास्तर म्हणून अजमेरला नोकरी लागली पण काकांच्या मनातल्या गायकाला, संगीत सुरांच्या सान्निध्यातून जगरहाटीत अडकवणे कदाचित खुद्द देवालाही मंजूर नसावे.. म्हणूनच की काय, शांताराम रांगणेकर यांच्यासारखे बालमित्र खळेकाकांच्या मदतीला धावून आले आणि खळे काका त्याच्यासह, त्याच्या शब्दावर आणि आपल्या गुणवत्तेवर विश्वास ठेऊन मुंबईला पळून आले.. शांताराम यांनी आपल्या घरी त्यांची सोय केली. रांगणेकरांचं घर अवघं दोन खोल्यांचं आणि त्यात रहाणारे एक दोघे नव्हे तर तब्बल 17 कुटुंबीय.. अशातही या मोठ्या मनाच्या, दिलदार मित्राने खळे काकांना आपल्या घरात प्रेमभरे आश्रय दिला. व्हरांड्यात झोपायची सोय केली.. संगीताचंच जगणं असणाऱ्या खळे काकांनी तशा अवस्थेतही आनंदाने निभावलं. व्हरांड्यात झोपलं की रात्रीच्या वेळी उंदीर, घुशी अंगावर येत.. पाऊस वारा झोडपून काढत असे पण खळे काकांनी कधीही तक्रार केली नाही आणि आपल्या ध्येयापासून विचलीत झाले नाहीत.
मुंबईत डीपी कोरगांवकर यांचेकडे संगीत सहाय्यक म्हणून काम मिळालं त्यातूनच शिकणं सुरू झालं. तिथेच पहिली स्वतंत्र रचना करण्याची संधी मिळाली.. ते गाणं गुजराथी होतं आणि तलत मेहमूद यांनी ते गायलं. म्हणतात ना, एका कामातून दुसरं काम मिळतं .. एका कामातून पुढील संधी आपोआप मिळत जाते. अगदी याच न्यायाने, नंतर एकदा एक गृहस्थ खळे काकांना भेटायला आले. आपण स्वतः लक्ष्मीपूजन नावाचा चित्रपट काढणार असून त्याची कथा, पटकथा, संवाद, गाणी गदीमा करणारेत आणि आपण त्यातील गाण्यांना संगीतबद्ध कराल का असा प्रस्ताव घेऊन आले. अर्थातच, खळेंनी अत्यानंदाने लगेचच रूकार भरला. पण आठच दिवसात ते गृहस्थ पुन्हा येऊन म्हणाले, खळे आपल्या नावाला गदीमांनी नकार दिलाय पण तरीही मी त्यांना तुम्हीच ही गाणी करणार असे ठामपणे सांगितले आहे. मग राम गबालेंना घेऊन ते गृहस्थ खळे काकांकडे गेले, सगळी गाणी एक से एक झाली पण दुर्दैवाने चित्रपट प्रदर्शित झालाच नाही.
सुरूवातीला गदीमांनी नाकारलेलं असलं तरीही खळे काकांच्या या सर्व गाण्यांना त्यांनी भरभरून दाद दिली. गदीमांनीच या सर्व गीतांची तू स्वतंत्र रेकॉर्ड का करत नाहीस असं सुचवलं आणि एचएमव्हीकडे पाठवलं. ही सर्व गाणी पुढे भावगीते म्हणून आशाबाईंच्या आवाजात पाच सहा वर्षांनी रेकॉर्डच्या स्वरूपात बाजारात आली आणि गोरी गोरी पान, आणि एका तळ्यात होती या दोन गाण्यांनी रसिकांच्या मनावर मोहिनी घातली .. ती अगदी आजही तश्शीच आहे. हेच काकांचं श्रेय ..
खळे काकांनी आजवर एक से एक गाणी केलेली आहेत..
- सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
- निळा सावळा नाथ
- कळीदार कपूरी पान
- कुणी कुणाचे नाही
- वेगवेगळी फुले उमलली
ही यादी प्रचंड मोठी आहे.
पंडीत भीमसेन जोशी म्हणतात, एखादं गाणं वाईट झालं तर खळे बोलत नाहीत, पण त्यांचा चेहरा बोलून जातो आणि तेच गाणं नंतर चांगलं झालं की खळे भरभरून दाद दिल्याशिवाय रहात नाहीत.
तर राम गबाले सांगतात, खळे काका इतके हळवे आहेत की आपण त्यांना भेटलो तर सर्वप्रथम त्यांच्या डोळ्यात पाणी तरळते ..
असे आपले खळे काका ..
खळे काकांच्या गाण्यात रंगून जात नाही असा माणूस विरळाच. खळे काका, बाबुजी आणि गदीमा या त्रयींनी आपल्यासारख्या गानरसिकांपुढे जी सांगितिक मेजवानी वाढून ठेवली आहे त्याच्या रसास्वादात पुढील कित्येक पिढ्या न्हाऊन निघतील यात शंका नाही..

त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन ..

- मोहिनी घारपुरे -देशमुख

शुक्रवार, २१ डिसेंबर, २०१८

ताईसाठी थोडसं ..


मोठी बहीण असली की आपसुकच आपल्या वाट्याला मायेची काकणभर जास्तच ऊब येते. म्हणजे आईच्या मायेनं, आईनंतर आपलं कोणी करत असेल तर ती म्हणजे ताई..
ती जीव लावते पण तिचा धाकही असतो. ती भांडते, अधिकार गाजवते, पण तरीही त्यामागचं प्रेम लपत नाही. ती आपल्यापेक्षा वयानी फार मोठी नसते पण तरीही आईच्या सावलीसारखी ती आपली काळजी घेत रहाते. लहानपणी एकत्र खेळताना आपण धडपडलो तर तिचा इवलासा जीव घाबरतो खरा पण आपल्याला ती ते कळू देत नाही. तिच्या वयानुरूप आणि समजेनुसार प्रथमोपचार करून मोकळी होते.. आपल्याला साधी सर्दी झाली तरीही सतत उगी उगी करेल, खोकला झाला तर पाठीवरून हात फिरवेल आणि ताप आला तर सतत थोड्या थोड्या वेळाने आपल्या जवळ येऊन कपाळावर हात ठेऊन चेक करत राहील ..
ताई मोठी होते, सासरी जाते पण तिचं आपल्याप्रती जराही दुर्लक्ष होत नाही. ती सासर आणि माहेरची माणसं सहजी धरून ठेवते, आता तिची माया या सगळ्या माणसांनाही मिळत असतात, पण ती आपल्याला विसरत नाही .. अशावेळी खरंच तिचं कौतुक वाटतं.
नंतर आपण मोठे होता होता आपापल्या विश्वात रमून जातो.. मैत्रिणी वगैरे तर मागच्याच कुठल्यातरी वळणावर सुटून गेलेल्या असतात .. मग उरतो आपण एकटे .. पण तरीही ही मोठी बहीण, ताई , आपली हक्काची मैत्रीण बनून आपल्या आयुष्यात जणू जीनीसारखी इन्व्हीझीबल मोडमध्ये वावरत असते. आपल्याला हवं तेव्हा आपण एकमेकींशी बोलू शकतो हेच या नात्याचं सर्वात मोठं सुख..
अगदी छोटी मोठी आठवण, आयुष्यातली सुखदुःख आपण हक्काच्या मैत्रिणी एकमेकींसह वाटून घेत जातो .. आणि पुन्हा आपल्याला आयुष्यात रममाण होऊन जातो ..
या नात्यातले असंख्य पदर असेच तरल, सुखद आणि संस्मरणीय ..
ताई असली तरीही तिची किंमत कळत नाही असेही अनेक भाऊबहीण ( महाभागच म्हणायला हवं खरं तर यांना) आहेत , त्यांना पाहून वाईट वाटतं..
म्हणून तुमच्याकडे एखादी अशी काळजीवाहू, प्रेमळ, गुणी आणि सतत ताईगिरी करणारी ताई असेल तर तिला जपा, तिला जीव लावा, आणि कधीही अंतर देऊ नका हेच सांगेन ..
- मोहिनी

पक्षीमित्र गाडगीळ नाना



खरंतर तुमची लेखनिक म्हणून आयुष्यात पहिली कमाई मिळाली . भविष्यात मीही कधी लिहीती होईन असं वाटलं नव्हतं तेव्हा पण आज लेखनाच्या क्षेत्रात नाव कमवत असताना ते जुने दिवस आठवल्याशिवाय रहात नाहीत .तुमच्याकडे मी यायचे उन्हाळी सुट्टीत तेव्हा कदाचित मी सातवी आठवीत असेन. माझं अक्षर छान, शुद्धलेखन देखील बऱ्यापैकी चांगलं होतं पण तरीही तुमच्याकडून डिक्टेशन घेत लिहीताना चुका व्हायच्याच. फक्त तासभराच्या लिखाणाचे कागद नंतर तुम्ही तपासून ठेवत. मी दुसऱ्या दिवशी आले की त्या चुका पाही .. काका तुम्ही आणि कधीमधी काकूंनीही लाल पेनाने चूक दुरुस्त करून दाखवलेली असे .. हळूहळू माझ्या लिखाणात प्रगती होत गेली त्याचा पाया म्हणजे तुमच्याकडले हे दिवस म्हणायला हवेत .
नंतर काही वर्षांनी तुम्ही इंटरनेट घेतलंत, तेव्हा मी कॉलेजला होते आणि सुट्टीत तुमच्याकडे पुन्हा लेखनिक म्हणून येत होते. मीही नुकतीच इंटरनेट शिकले होते .. मग तुम्ही अगदी सहजपणे मला इंटरनेट च्या शंका विचारायचात , तेव्हा मला फार विशेष वाटे. काका, तुम्ही सर्वार्थाने माझ्यापेक्षा फार फार मोठे पण त्या वयातही तुमची नवी गोष्ट शिकण्याची धडपड, उत्सुकता आणि माझ्यासारख्या लहान व्यक्तीकडूनही नवीन गोष्ट शिकण्याची सहजता हे सगळे तुमचे व्यक्तिमत्त्व विशेष !
लेखनाचा तास झाला की काकूंनी टेबलावर तुमच्यासाठी तांब्याभर ताक अनेकदा ठेवलेलं असे. चाट मसाला किंवा काळं मीठ घातलेलं हे ताक आणि सोबत सीझनल फ्रुट्स म्हणजे पेरू किंवा आंब्याच्या फोडी कित्तीदा तर मीही तुमच्या बरोबर खाल्ल्याचे आठवते.
सगळ्यात टेस्टी आणि पहिल्यांदाच चाखलेला पदार्थ म्हणजे काकूंच्या हातचं, चित्रान्नं ! हा प्रकार मला जामच आवडला होता तेव्हा .. त्याची चव आजही जीभेवर आहे.
काका, अशा अनेक आठवणी आहेत तुमच्या बरोबर माझ्या ..
खरंतर बरेचदा मनात हे सगळं लिहावं असं वाटलं होतं पण निमित्त सापडत नव्हतं. आज फेसबुकच्या या व्हिडीओमुळे सगळ्या आठवणी जाग्या झाल्या आणि मी भराभर लिहून मोकळी झाले.
काका, तुमचं वय, तुम्ही जपलेले छंद आणि तुमचं काम हे फार मोठं आहे .. तो प्रेरणेचा झरा अनेकांना मार्गदर्शक ठरत राहील यात शंका नाही .. !
सविनय नमस्कार
कळावे,
आपली (बाल)मैत्रीण / नात
मोहिनी

स्वामी - #मला_भावलेला_चित्रपट


किती छोटीशी कथा, किती मोठासा आशय .. किती भावपूर्ण आणि किती मोहकतेने मांडलेलं कथानक ..
सावत्र विधूर मुलगा, त्याच्याशी होणारा दुजाभाव, त्याची दुसरी बायको (कथेची नायिका) तिच्या पूर्वायुष्यात अल्लड आणि दुसऱ्याच कुठल्यातरी मुलाच्या प्रेमात पडलेली .. परिस्थितीमुळे लग्न नायकाशी होतं आणि मिळालेला स्वामी खऱ्या अर्थानी तिचा जीवनसोबती ठरतो. किती साधा नायक गिरीश कर्नाड यांनी उभा केलाय.. साधेसहज संवाद पण किती अर्थपूर्ण आशय मांडत जातात.
हा चित्रपट एक नवा विचार घेऊन आला. चित्रपटाची नायिका, मिनी (शबाना आझमी) चित्रपटाच्या शेवटी जे म्हणते ते खरंच प्रत्येक माणसाने शिकायला हवं असंच आहे, दया, क्षमा आणि शांती हे शब्द पुस्तकातच वाचले आहेत पण परस्पर व्यवहारात या शब्दांचं किती अनन्यसाधारण महत्त्व आहे हे या शब्दांचा प्रत्यक्ष वापर केल्यानंतरच तुम्ही जाणू शकता .. हा तो विचार ..
शिक्षणाने माणूस समृद्ध होतो पण व्यवहारात शिक्षणाबरोबरच मोठं मन आणि चांगल्या भावना यांची गरज असते. बरेचदा शिकलेली माणसं आपल्या ज्ञानाच्या अहंकारात हे विसरून जातात. आपणच मोठे हा भ्रम होतो आणि त्या भरात कधीच पाय जमिनीवरून घसरून जातात. माणूस म्हणून आपण किती थिटे आहोत हे अशा वेळी एखादा साधासा माणूसही आपल्यासमोर त्याच्या कृतीतून दर्शवून देतो.
चित्रपटाचं मूळ कथानक भारतीय संस्कृतीचं रूप दर्शवणारं .. भारतातील विवाहसंस्थेनुसार स्त्रीसाठी तिच्या नवऱ्याचं घरच तिचं घर.. आणि जिला नवऱ्याचा भक्कम आधार तिला कोणा दुसऱ्याचं मिंधेपण घ्यायची वेळ येत नाही. पण म्हणूनच हा नवरा मुळात कसा असावा हे स्वामी चित्रपटातला नायक आपल्याला दाखवून जातो.
सच्चे मनसे माफी माँगने के बाद गुन्हा, गुन्हा नहीं रेह जाता
एवढा मोठा व्यापक विचार करणारा माणूस जेव्हा नवरा म्हणून मिळतो तेव्हा त्याच्या सहवासात थोडेच दिवस राहिलेली कथेची नायिकाही माणूस म्हणून चार पायऱ्या आपोआपच वर चढते.
चित्रपटाच्या शेवटी तिचा प्रियकर तिच्या घरी येतो, तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो आणि घरच्यांसमोर हे सगळं उघड होतं.. नवऱ्याच्या कानावर गोष्ट जाते पण तरीही तो हलत नाही, स्थिरबुद्धी ठेवतो.. सासू वाट्टेल ते बोलत असते तेव्हा शेवटी नायिकेकडूनही रागाच्या भरात सासूला बोललं जातं, तेव्हा शांतपणे तो म्हणतो, तुला जायचं असेल तर जा पण तुला आईची माफी मागूनच जावं लागेल.. त्याची आई खरंतर सावत्र, शिवाय ही जाणार असेल तर दागिने ठेऊन जा म्हणून त्याच्यामागे तगादा लावते... नायिकेच्या कानावर ते शब्द पडतात, तिरीमिरीत ती सगळे दागिने घरात फेकते, नवरा घरातून शांतपणे निघून जातो.. ती तरातरा बॅग भरते आणि चक्क प्रियकराबरोबर निघून जाते, माफी वगैरेचा तर प्रश्नच उरत नाही .. रेल्वेस्टेशनवर रेल्वेची वाट पहात असताना ती शांत बसते आणि तिला आपली चूक लक्षात येते .. पतीचे शब्द आठवतात, जराजरासी बात पर इतना गुस्सा नही होते, माफ करनेके बाद गुन्हा गुन्हा नहीं रेह जाता, जिसे अपना सबकुछ दे दिया हो उसे कुछ और देकर ही तो खुश किया जा सकता है ... त्याची एकेक वाक्य आठवतात आणि तिला मनोमनी जाणवत रहातं, खरंच आपला पती किती श्रेष्ठ दर्जाचा माणूस आहे .. आता रेल्वेची घंटा झालेली असते, प्रियकर तिला म्हणतो, आता तुला एकच मार्ग आहे, तू थोडे दिवस आईकडे रहा आणि मग मी तुला घ्यायला येईन, मग माझ्या घरी जाऊया .. ती अचानक म्हणते, मला वाटतंय मी माझं घर सोडून तुझ्याबरोबर यायला निघाले ती चूक केलीये .. प्रियकर म्हणतो, पण मला नाही वाटत तुझा नवरा तुला आता परत त्या घरात घेईल ..
आता रेल्वे येते, प्रियकर सामान चढवण्यामागे लागतो .. ही विषण्ण बसलेली पण इतक्यात कथेचा नायक, हिचा पती साक्षात समोर उभा रहातो .. ती बघतच रहाते.. तो तिला म्हणतो, चल .. घरी चल, एका बाईला तिच्या पतीच्या घराशिवाय अन्य जागा नाहीये ..
आता ती निःशब्द होते .. आणि पुढचच वाक्य तो म्हणतो, मी आईला तुझ्या या प्रियकराबद्दल समज दिली आहे .. मलाही तर सगळं आधीच माहीत होतं .. तुझ्या मामांनी मला सगळं सांगितलं होतं
आणि त्याच्या या उद्गारांनी तिचा बांध फुटतो .. खरंच सगळं माहीत असूनही त्याची पुसटशीही जाणीव या माणसाने आपल्याला होऊ दिली नाही .. किती उदात्त, किती श्रेष्ठ .. खऱ्या अर्थानी नरोत्तम असा हा आपला स्वामी ..
आणि क्षणार्धात ती त्याचा हात धरून पुन्हा त्याच्या मागे परत आपल्या घराच्या रस्त्याने निघते ..
चित्रपट संपतो आणि जाता जाता आपल्या मनाची कवाडं उघडून जातो.
भारतात अलिकडे बायकांनी कसं वागावं, कसं बोलावं याविषयी सतत चर्चा झडत असताना, पुरूषांनी कसं असावं आणि स्त्रीची कशी साथ द्यावी हे खरंतर हा चित्रपट सांगून जातो असं मला वाटलं.
ज्या नवऱ्यासाठी बायका त्यांच घरदार, शहर, देश, बालपण, मायबाप, सखेसोबती, खरंतर आपला सारा भूतकाळच सोडून येतात त्या नवऱ्याने स्वतः माणूस म्हणून स्वतःला किती अर्थपूर्ण घडवलं पाहिजे याचं उत्तम उदाहरण म्हणजे स्वामी चित्रपटातील गिरीश कर्नाड यांनी रेखाटलेला नायक ..
हा चित्रपट स्त्रीने कसं असावं यासाठी पाहूच नये तर पुरूषाने कसं असावं हे समजून घेण्यासाठी पहावा असं मी जाता जाता नक्की सांगेन..!

 - मोहिनी घारपुरे - देशमुख

मंगळवार, ११ डिसेंबर, २०१८

रूई का बोझ


हा एक अत्यंत सुंदर चित्रपट आज योगायोगाने आणि यूट्यूबकृपेने पहायला मिळाला आणि मन भावविभोर झाले. असं म्हणतात, म्हातारपण हे दुसरं बालपण असतं, पण हे दुसरं बालपण तितक्याच कौतुकाने साजरं मात्र होत नाही. कारण म्हाताऱ्या माणसांचा अनेक घरांमध्ये रागराग केला जातो. त्यांच्या सवयी, त्यांचा स्वभाव, त्यांच्या वस्तू, रहाणीमान, त्यांच्यावर होणारा खर्च अगदी कोणतंही निमित्त या कटकटीसाठी पुरतं. अनेक कृतघ्न मुलं तर आपल्या आईवडीलांना अशा उतारवयात मारझोड करतात, अक्षरशः हाकलून देतात .. अशा घटना ऐकून आपल्यासारख्या संवेदनशील लोकांचा बांध फुटल्यावाचून रहात नाही.
तर, असंच काहीसं कथानक घेऊन रूई का बोझ हा चित्रपट समोर आला. पंकज कपूर, रिमा लागू आणि रघुवीर यादव या जातीवंत अभिनेत्यांनी या चित्रपटाचं अक्षरशः सोनं केलं आहे. 1997 साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट चंद्र किशोर जैसवाल यांच्या गवाह गैरहाजिर या कादंबरीवर आधारित आहे. सुभाष अग्रवाल यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
चित्रपटाची कथा अगदी प्रेडीक्टेबल आहे पण तरीही ती ज्या सुंदर पद्धतीने अभिनीत करून मांडली गेली आहे त्यामुळे चित्रपटाचा दर्जाची उंची फार फार वाढते.
एका खेड्यातलं किसन सहानी (पंकज कपूर) या ज्येष्ठाचं कुटुंब. त्याची तीन मुलं आणि तीन सुना .. दरदिवसाआड काही ना काही कारणावरून घरात होणारे तिन्ही सुनांचे वाद पहाता एके दिवशी तो तिघाही मुलांना समोरासमोर बसवतो आणि वाटणी करून टाकतो. आपण कोणाबरोबर रहायचं हा निर्णय मुलांवर सोपवून देतो. मुलही एकमताने वडीलांनी लहान मुलाबरोबर राहावं कारण त्याला अजून वडीलांची गरज आहे असा निर्णय देतात. लहान मुलगा (रघुवीर यादव) आणि वडील दोघंही खूश होतात.. ही धाकटी सून (रीमा लागू) देखील खूशच असते.. सगळं कसं छान वाटतं.. पण प्रत्यक्षात सगळी घडी बिघडतेच..
काही चूक वडीलांची आणि काही चूक मुलगा, सून आणि नातवंडांची ..
सून काहीशी रागीट, स्वार्थी आणि लोभी तर मुलगा भोळा आणि थोडाफार सुनेच्या आहारी गेलेला..
नातवंड प्रेमळ पण काहीशी उद्धट आणि आगाऊ ..
आणि म्हातारा आडमुठा .. शिवाय चार पावसाळे जास्तच पाहिलेला असल्याने सगळ्यांचे बरेवाईट हेतू मनात ओळखून अधिकच डिवचलेला, आणि उतारवयाने शरीराने हळूहळू साथ सोडल्याने काहीसा अगतिक झालेला..
आता ही अशी परिस्थिती म्हणजे घरात सतत काय काय नाट्य घडत असणार हे तुमच्याही लक्षात आलंच असेल.. हेच नाट्य पंकज कपूर आणि रीमा यांनी एवढं जबरदस्त दाखवलं आहे की लहानसहान प्रसंगही आपल्याला चटका लावून जातात.
एकीकडे आदर दाखवत दुसरीकडे लोभी वृत्तीने वागणारी सून रीमाजींनी अप्रतिम वठवली आहे. दिवसभर घरात सासरे आणि सून व नातवंड .. मग लहानसहान कामं, जसं भाजी आणून देणं, हरवलेल्या बकरीला शोधून आणणं, घरातल्या वरच्या कामांची अपेक्षा सासऱ्याकडून .. सासराही चांगलाच खमका आणि काहीसा लहरी... सूनेनी भेंड्या सांगितल्या तर यांनी लक्षात न राहिल्याने वांगी आणणं, हरवलेली बकरी शोधायला गेला आणि भलतीच कोणाची बकरी पकडून आणली, दारावर पकोडेवाले आला तर लगेच गरमगरम पकोडे घेऊन खाणं असे अनेक प्रसंग मुख्य कथानकाला पूरक ठरतात..
पंकज कपूरनी तर हा अभिनय इतका अप्रतिम वठवला आहे की म्हाताऱ्या माणसांची व्यथा, त्यांना येणाऱ्या लहानसहान अडचणी आणि त्यांना जाणवणारा कुटुंबीयांचा स्वार्थ हे सारं प्रेक्षकांना जाणवल्यावाचून रहात नाही.
एकदा तर किसनजींना अंथरूणातच लघुशंका होते, बिचारे अपरात्री उठून ती चादर धुऊन वाळत टाकतात, तोच सुनेचं लक्ष जातं.. ती ही गोष्ट वेगळ्या पद्धतीने मुलाला सांगते .. आणि त्याला वडीलांविषयी तिटकारा वाटून जातो. आणखी एका दृश्यात, किसनजींना घरात बनलेली मक्के दी रोटी जेवायला हवी असते म्हणून ते मागतात .. तर सून कसली जहांबाज .. चक्क त्यांना मक्के दी रोटी खायला नाही म्हणते, सासराही हट्टी .. सूनही हट्टी .. ती नातवंडाकरवी सासऱ्याला दहीभाताचं ताट पाठवून देते. सासऱ्याचा विरस होतो, तो ते ताट खोलीत तसंच ठेवतो आणि झोपून जातो .. तर त्या वासाने रात्री मांजर तिथे घुटमळायला लागते.. त्यामुळे वैतागलेला सासरा पुन्हा उठून ते ताट स्वयंपाकखेलीत नेऊन ठेवतो.. सकाळी सून उठते आणि तिला ते झाकलेलं अन्न दिसतं.. तिला राग येतो.. एकीकडे बडबडत, की आता जर हे न जेवल्याने मेले तर मलाच हा दोष लागणार, लोक मलाच नावं ठेवणार .. असं म्हणत कामाला लागते.. तिकडे सासरा नेहमीची वेळ होऊन गेली तरी झोपलेला .. नातू जातो, आजोबा उठा म्हणून हाका मारतो पण काहीच हालचाल होत नाही. नातू धावत जाऊन आईला आणि भावंडांना सांगतो की आजोबा देवाघरी गेले.. सूनेच्या डोळ्याच टचकन पाणी येते ती धावत जाते..नातवंड धावतात आणि आजोबांना हलवतात .. सेकंदभर काहीच हालचाल होत नाही, आपल्याला वाटतं, गेले वाटतं किसनजी .. पण, तितक्यात डोळे चोळत किसनजी उठतात आणि इकडे सूनेच्या मनातला त्यांच्याबद्दलचा राग पुन्हा मनातून उफाळून येतो.
एकेक सीन अत्यंत बोलका, अत्यंत स्पष्ट..
त्यांचे एक मित्र नेहेमी त्यांना येऊन सुनेशी मुलाशी जुळवून घे आणि गोडीत रहा असा सल्ला देतात, याचे ग्रह काढून टाकण्याचा प्रयत्न करतात पण म्हणतात ना, जावे त्याच्या वंशा .. अगदी तशीच या म्हाताऱ्याची कथा असते.
चित्रपटात नातवंडही ज्या पद्धतीने वागतात, आणि हा खट म्हाताराही ज्या पद्धतीने वागतो ती दृश्य फार बोलकी आहेत.
शेवटी, एकदा सून मुलाला लक्षात आणून देते, की सासऱ्यांच्या खोलीत फार दुर्गंधी येते कारण ते तिथेच कोपऱ्यात जमीनीवर बहुधा लघुशंकेला बसतात.. आपण त्यांना मागच्या अडगळीच्या खोलीत आता ठेऊया असं सुनेचं मुलाचं ठरतं.. पण म्हाताऱ्याला ते मान्य कसं होणार, तो नकारच देतो .. हे ऐकून मुलगा चिडतो आणि म्हाताऱ्या बापाशी भांडतो.. गाव गोळा होतं.. वडील मुलावर हात उचलतात आणि आता या मोठ्या झालेल्या मुलालाही तितकाच राग येतो, मुलगा रागाच्या भरात वडीलांना धक्का देतो .. म्हातारा कोलमडून खाली पडतो.. गावकरी शेपूट घालून पळतात.. सून नातवंड घरातच लपून रहातात, मुलगा रागात निघून जातो .. पडलेल्या म्हाताऱ्याला उचलायलाही कोणी येत नाही.. शेवटी थोड्यावेळाने हतबल म्हाताऱ्याला शुद्ध येते.. एकटाच उठतो आणि गुमान मुलगा म्हणत होता त्या अडगळीच्या खोलीत जातो ..
दुसऱ्याच दिवशी ठरवतो, आता येथे रहायचं नाही. बैलगाडीवाल्याला निरोप धाडतो आणि गावापासून काही अंतरावर असलेल्या देवस्थळी जायला निघतो.. कायमचं.. आता मुलाला सुनेला आपली चूक लक्षात आलेली असते खरी पण वडीलांचा स्वभाव माहीत असतो.. म्हणून त्यांना ते थांबवत नाहीत .. दोन दिवसांनी जाऊन त्यांना घेऊन येऊ असं ठरवतात. सूनही कबूल होते, की आपण स्वार्थीपणे वागलो, आपण लोभी झालो होतो .. आता सासरे रहाणार नाहीत तर आपल्या घराची मूळंच (घर की नीव) हरवली असं तिला वाटायला लागतं..
इकडे सासरा निघतो, मजल दरमजल करत बरच अंतर बैलगाडीवाला जातो .. तेव्हा सासऱा एकटा मागे बसलेला, विचारचक्र सुरू होतं .. मित्रांची बोलणी, समजावणं आठवायला लागलेलं असतं .. काही झालं तरी आपण एकटे आता त्या अज्ञात ठिकाणी काय करायचं , त्यापेक्षा कसे का असेना आपले नातू, सुना आपल्याबरोबर तर होते असं वाटायला लागतं.. एकदा हळूच तो गाडीवाल्याला चल परत जाऊ असं म्हणतोही.. पण ते गाडीवाल्याला ऐकू जात नाही.. आता काही अतंरावरच देवस्थान आलेलं असतं पण मधे नदी लागते.. गाडीवाला म्हणतो, थांबा मी नदीतून रस्ता नेमका कुठून आहे ते पाहून येतो .. रस्ता सापडतो आणि इकडे, सासऱ्यालाही मनातला आवाज स्पष्ट ऐकू येतो.. परत फिरावं हाच रस्ता त्याला योग्य वाटतो आणि तत्क्षणी गाडीवाल्याला तो हुकूम सोडतो .. म्हणतो, अरे .. ही नदी ओलांडून वगैरे कशाला जायचं त्या देवस्थळी.. त्यापेक्षा चल, पुन्हा घरी जाऊया .. आपल्या माणसांजवळ राहीन मी .. आणि गाडी परत फिरते... घराच्या दिशेने..
चित्रपट संपतो .. आणि आपल्याला हायसं वाटतं..
यानिमित्तानी, घराघरातल्या ज्येष्ठांचे प्रश्न इतके थेट मांडले आहेत. शिवाय एक इतकी सुंदर कलाकृती आपण पहातो की मनोरंजनाबरोबरच बरंच काही आपल्याला गवसतं.
म्हातारपण सगळ्यांनाच येतं हे प्रत्येकानेच लक्षात ठेवायला हवं.. त्यामुळे आपल्या घरातल्या ज्येष्ठांना मान आणि प्रेम द्या, त्यांच्या लहानसहान इच्छा वेळीच पूर्ण करा, त्यातच आपला आनंद आहे हे इथे शेवटाकडे जाताना आपल्याला उमगल्या वाचून रहात नाही.
शेवटी, म्हातारा बाप म्हणजे कापसाच्या ओझ्याप्रमाणेच .. सुरूवातीला जड वाटत नाही पण नंतर म्हाताऱ्या बापाचा स्वभाव ओल्या कापसाप्रमाणेच आडमुठा होत जातो आणि मग त्याला सांभाळणं मुलासाठी दिवसेंदिवस जड होत जातं.. म्हणूनच कोणीही मुलगा म्हाताऱ्या माणसाला सांभाळायला पुढे येत नाही... हरकोई बस फेक देना चाहता है .. अशी वास्तव स्थिती चित्रपटाच्या नावातूनच मांडली आहे ती आजघडीला खरी ठरते आहे हे दुर्दैवच ..


- मोहिनी घारपुरे-देशमुख


#मला_भावलेला_सिनेमा









गुरुवार, १२ जुलै, २०१८

"कत्ल"

संजीव कुमार, सारिका, शत्रुघ्न सिन्हा, रंजीता आणि मार्क झुबर अशी कलाकारांची फौज घेऊन 1986 साली कत्ल नावाचा एक क्राईम थ्रिलर हिंदी चित्रपटसृष्टीत आला.

कथानक नेहेमीचेच .. म्हणजे प्रेम, फसवणूक आणि गुन्हा .. पण ट्विस्ट होता, तो नायकाच्या पात्रात .. कारण नायक संजीव कुमार, नायिका सारिकाशी लग्न करतात आणि लग्नानंतर एका अपघातात त्यांचे डोळे जातात. ठार आंधळे झालेला नायक नायिकेला वाचवताना डोळे गमावतो.. त्याने तिचे जीवन तारलेले असते . नाहीतर फिल्म जगतात बडी स्टार होण्यापायी स्वतःच्या आयुष्याच्या तोल हरवून बसलेल्या नायिकेला रंजीत (मार्क झुबर) ने केव्हाच नादी लावलेले असते.. पण याची कल्पनाही भोळया नायकाला नसते. एक्टींग शिकवता शिकवता नायक नायिकेच्या प्रेमात पडतो, लग्न करतो, आणि पुढे अपघातात अंध होतो... 

खरी स्टोरी सुरू होते ती इथून पुढे ..

नायक अंध झालेला त्यामुळे मुळातच छछोर असलेली नायिका रंजितच्या शब्दांना आणि अय्याशीला भूलून पुन्हा त्याच्या नादी लागते.. नवऱ्याला आपण थिएटर करणार नाही अशी भूलथाप देऊन त्याच्याच तोंडून आपण थिएटर पुन्हा करावं असं वदवून घेते आणि त्यानिमित्ताने दररोज त्याला फसवून त्याच्याच सख्ख्या मित्राकडे, रंजितकडे जाऊ लागते ..

अंध नायकाला हे घरात बसून एरवी कळणेच अशक्य ..

पण इथे एन्ट्री होते ती आणखी एका पात्राची .. ते पात्र म्हणजे, रंजीता
ही केअरटेकर या नात्याने संजीव कुमारच्या घरात येते.. येते काय, खरंतर खुद्द नायिकाच तिला नायकाच्या सुश्रुषेसाठी आणते आणि पुढचं नाट्य घडतं .. अंध नायक हळूहळू रंजीताच्या सहकार्याने घराबाहेर पडू लागतो, त्याचा आत्मविश्वास वाढतो, अनेक गोष्टी तो आपल्या अन्य सेन्सेसद्वारे जाणवून घेत जातो..
इथून सगळा चित्रपट खरोखरच पहाण्यासारखा आहे ..

एकेक सीन एवढा सुंदर झाला आहे की आपल्या अंगावर रोमांच उठल्याशिवाय रहात नाही.
मला या चित्रपटाची कथा सांगण्याऐवजी, त्यातले मस्ट वॉच सीन्स तुमच्यासोबत शेअर करायचे आहेत ..

1. अंध नायक हळूहळू शिकत, ज्या हुशारीने रस्ते, वेळा, विशिष्ट ठिकाणं लक्षात ठेवतो तो सीन

2. रंजितच्या फ्लॅटवर अनाहुतपणे दाखल झालेला नायक टेबलाखाली त्याची काठी पडते तेव्हा झुकतो आणि तितक्यात त्याची पत्नी आणि मित्र हॉलमध्ये दाखल होतात.. त्यावेळी आपल्या छातीत धडधडल्याखेरीज रहात नाही.

3. नंतर नायकाने पत्नीच्या खुनाचा रचलेला कट

4. हा खून प्रत्यक्षात येताना पहाणे तर फारच रोमांचक

5 खून झाल्यानंतर अंध नायक पाचव्या मजल्यावरील फ्लॅटच्या मागच्या बाजूचे दार उघडतो आणि तिथल्या गोल जिन्यावरून एकेक पाऊल टाकत खाली उतरत जातो .. अशातच त्याचा एकमेव सहारा असलेली त्याच्या हातातली छत्री त्याच्या हातून गळून पडते आणि आपल्या काळजात धस्स होतं .. तरीही नायक न डगमगता हा भयंकर जिना केवळ इच्छाशक्तीवर यशस्वीरित्या उतरून जातो ते पहून आपला जीव भांड्यात पडतो ..


हे पाचही प्रसंग इतके भयंकर रोमांचक आहे की एखाद्या भित्र्या माणसाने घरात एकटं बिकटं असताना हा चित्रपट पहाण्याचा वेडेपणा अजिबात करू नये एवढचं मी सांगेन ..

बाकी क्राईम थ्रिलर या कॅटेगरीत या सिनेमाने जी उंची गाठली आहे ती फारच थक्क करणारी आहे..
गुन्ह्याचा शोध घेण्याचा प्रवासही खरंतर अधिक रंजक करता आला असता पण कदाचित तत्कालिन सिनेमाच्या मर्यादाही असाव्यात..

हा सिनेमा आजच्या काळात रिमेक झाला तर नक्की फार फार मजा येईल पहायला असं मला वाटतं ..
संजीव कुमारचे फॅन असाल तर तुम्ही हा चित्रपट पाहिलाच असेल आणि नसेल पाहिला तर या काही सीन्ससाठी हा चित्रपट एकदा तरी पहाच ..

- मोहिनी घारपुरे देशमुख 

बुधवार, १६ मे, २०१८

"संधीप्रकाशात"ली प्रेयसी

"संधीप्रकाशात अजून जो सोने, तो माझी लोचने मिटो यावी .."
डॉ. सलील कुलकर्णींच्या आवाजात हे गाणं पहिल्यांदा ऐकलं आणि ऐकतच राहिले. एकदा, दोनदा, तीनदा .. आणि या गाण्याचा आपल्या मनातला अर्थ उलगडेपर्यंत ऐकत राहिले..
बा.भ. बोरकरांनी लिहिलेली ही कविता.. या कवितेचा अर्थ फार फार सुंदर आहे... त्यामुळेच एकेक कडवं ऐकताना आपल्याला हरवून जायला होतं. हे हरवणं म्हणजे हळव्या मनातल्या कोपऱ्यात लपवून ठेवलेली स्वप्नकल्पना कवितेच्या शब्दाशब्दासह जगत जाणं .. कवितेचे ते क्षण प्रेमाची जी अनुभूती देतात ती ज्याने त्याने आपापल्या स्वप्नरंजनात एकदातरी घ्यायला हवी. आपण ही कविता ऐकत जातो आणि आपली तहान वाढतच जाते.. आपण एकेका श्वासागणिक एकेक शब्दाचा स्पर्श स्वतःला करत जातो आणि अधिकाधिक अतृप्त होत जातो..
मरणाच्या उंबरठ्यावर टेकलेला तो कवी म्हणजे आपला प्रियकर, त्याची ती पवित्र प्रेयसी म्हणजे आपण .. अवतीभवती पसरलेला सोनेरी संधीप्रकाश.. एरवी तो कितीही सुंदर भासत असला तरीही या क्षणी त्या सोनेरी प्रकाशात जणू आपण न्हाऊन निघालोय आणि आपलं पावित्र्य उजळून गेलं आहे असं वाटायला लागतं..

मीच ती पवित्र प्रेयसी .. संधीप्रकाशात न्हाऊन निघालेली.. आणि माझ्या मांडीवर माझ्या प्रियकराचे, जो मरणासन्न असला तरीही माझ्या प्रेमासाठी, माझ्या पावित्र्यासाठी आसुसलेला आहे, अशा त्या एकनिष्ठ प्रियकराची एकेक इच्छा मी ऐकत जाते आणि पूर्ण करण्यासाठी तळमळत रहाते. कारण त्याचे आपल्या मांडीवर असलेले डोके खाली जमिनीवर ठेऊन देणे आता माझ्यासाठी केवळ अशक्य .. त्याच्या शेवटच्या घटीका त्याच्या शब्दरूपी कल्पनांतूनच आता मी पूर्ण करणार..
माझा प्रियकर मला सांगतोय,


आयुष्याची आता झाली उजवण
येतो तो तो क्षण अमृताचा.
जे जे भेटे ते ते दर्पणीचे बिंब:
तुझे प्रतिबिंब लाडेगोडे.
सुखोत्सवे असा जीव अनावर:
पिंजऱ्याचे दार उघडावे.
संधिप्रकाशात अजून जो सोने
तो माझी लोचने मिटो यावी.
असावीस पास, जसा स्वप्नभास,
जीवि कासावीस झाल्याविना.
तेव्हा सखे आण तुळशीचे पान,
तुझ्या घरी वाण नाही त्याची.
तूच ओढलेले त्यासवे दे पाणी,
थोर ना त्याहुनी तीर्थ दुजे.
वाळल्या ओठां दे निरोपाचे फूल;
भुलीतली भूल शेवटली ..


असा हा माझा भाबडा, एकनिष्ठ प्रियकर .. त्याचं हे रूप पाहताना माझे नयनाश्रू संततधार वाहताएत.. तो जे कवितेतून सांगतोय ते ते स्वप्न आम्ही एकत्र जगत जातोय, कारण हे शेवटचे क्षण तेव्हाच अमृताचे होणार आहेत. त्याच्या डोळ्यासमोर आयुष्यभर त्याने वेगवेगळ्या रूपात पाहिलेली मी, माझी निरनिराळी छबीच तो याक्षणीही आठवतोय, जणू दर्पणात माझी निरनिराळी प्रतिमा त्याक्षणी तो पहातोय असा त्याला भास होतोय.. इतकी मी त्याची आहे, इतकी मी त्याच्या मनात खोलवर रूजलेली आहे. केवळ माझ्या प्रतिमांची उजळणी करताना त्याला होणारा आनंद म्हणजे जणू आमच्यासाठी सुखोत्सवच आहे आणि या सुखोत्सवाच्या आनंदातच त्याला मरण हवंय .. म्हणूनच तो म्हणतोय," सुखोत्सवे असा जीव अनावर, पिंजऱ्याचे दार उघडावे.."
या संधीप्रकाशात चाललेला हा सुखोत्सव, हेच जणू माझ्यासाठी सोनेरी क्षण आहेत, हे सोन्याचे क्षण अनुभवता अनुभवताच माझी लोचने मिटून जावी अशी इच्छा जेव्हा तो बोलतोय तेव्हा मी व्याकूळ झालेय, अधीर झालेय ..
मला व्याकूळलेलं पाहून तो मला सांगतोय, अशा या माझ्या शेवटच्या क्षणी तू माझ्याजवळ स्वप्नभासाप्रमाणे असावीस आणि तसं झालं तरच मी कासावीस न होता सुखोत्सवात माझा प्राण सोडेन. आणि सखे, जेव्हा मी असा प्राण सोडेन तेव्हा तू माझ्या विझल्या देहावर तुळशीचं पान ठेव, तुझ्या घरी या तुळशीच्या पानांची वाण नाही .. असं तो मला सांगतोय तेव्हा मला जाणवतंय की मी त्याच्यासाठी इतकी पवित्र आहे की तो जणू माझ्या स्पर्शालाच तुळशीच्या पानाची उपमा देतोय. माझा स्पर्शच त्याला तुळशीप्रमाणे वाटतोय आणि माझ्या स्पर्शाने पवित्र झालेल्या पाण्याचे दोन थेंब त्याला मिळाले तरीही तेच त्याला तीर्थ वाटणार आहेत.. त्याच्या सुकल्या ओठांवर मी चुंबनरूपी फूल ठेवावे असे तो मला व्याकूळ होत सांगतोय .. आजन्म या माझ्या ओठांनी त्याला जी भूल पडली आहे, तीच भूल त्याला या शेवटच्या क्षणीही हवी आहे ..
माझ्या सहवासाच्या पावित्र्यात आयुष्य जगलेला माझा प्रियकर मरणाच्या शेवटच्या क्षणीही मला मागतोय, त्याच्या मृत्यूनंतरही त्याला माझं पवित्र प्रेम हवंय .. आणि मी ते देणार .. साऱ्या दुनियेची तमा न बाळगता, मी त्याची एकूणएक इच्छा पूर्ण करणार .. कारण या निष्पाप प्रियकराने माझ्यावर जे निर्व्याज प्रेम केले आहे ते माझ्यावर दुसऱ्या कुणीही केलेले नाही.. त्याच्या प्रेमामुळे, त्याच्या चिंब चिंब भावनावेगाने मी जगत गेले एकेक क्षण आणि माझ्यातली मी, पवित्र मी, आपोआपच उजळत गेले आहे..
त्याने मला प्रेम दिले, नी त्याच्यामुळे मला अर्थ मिळाला .. नाहीतर माझे जगणे केवळ निरर्थकच उरले असते..
तो सगळ्या इच्छा सांगता सांगता केव्हाच निघून गेलाय .. मला सोडून .. आणि मी तरीही त्याचा मुका देह मांडीवर घेऊन या संधीप्रकाशात बसून आहे .. कारण त्याला माझा पवित्र स्पर्श हवाय, मरणाच्या पश्चातही हवाय.. आता मी त्याच्या सुकलेल्या ओठांवर माझे ओठ टेकवल्यावाचून राहू शकणार नाही .. त्याची ती अंतिम इच्छा पूर्ण केल्याशिवाय मी त्याचा देह खाली ठेऊच शकत नाही .. माझ्या ओंजळीत त्याचा निष्प्राण निस्तेज चेहरा आता मी घेतलाय.. देहातून निघून गेलेल्या माझ्या प्रियकराला छातीशी घट्ट घट्ट कवटाळत मी त्याला निरोप देणार आहे.. कायमचाच .. पण, हे चार क्षण माझ्यासाठी फार फार अवघड होऊन बसले आहेत.. माझा कंठ दाटून आलाय, माझे नयनाश्रू कोरडे होत चालले आहेत.. पण माझ्यासमोर असलेल्या या माझ्या प्रियकराला तिथे तसं सोडून मी जाऊच शकत नाहीये.. 

ना मी त्याला पुढल्या प्रवासाला जाऊ देऊ शकणार आहे .. कारण अत्ता, जाता जाता त्याने सांगितलेल्या एकेक इच्छा मी पूर्ण केल्या आहेत खऱ्या पण मग मी कशी हे मान्य करू, की ज्याच्या इच्छा आपण पूर्ण केल्या आहेत त्याचं अस्तित्वच आता उरलेलं नाही .. सांगा ना ..? मी काय करू सांगा ना ?
त्याचे शब्द माझ्या कानात गुंजताएत ..


संधिप्रकाशात अजून जो सोने
तो माझी लोचने मिटो यावी.
असावीस पास, जसा स्वप्नभास,
जीवि कासावीस झाल्याविना.
तेव्हा सखे आण तुळशीचे पान,
तुझ्या घरी वाण नाही त्याची.
तूच ओढलेले त्यासवे दे पाणी,
थोर ना त्याहुनी तीर्थ दुजे.
वाळल्या ओठां दे निरोपाचे फूल;
भुलीतली भूल शेवटली ..


मी कशी त्याच्या देहाला अग्नी देऊ ..?

ज्याने माझा स्पर्श आजन्म पवित्र मानला, त्याला मी माझ्याच हाताने कशी दूर लोटू ..? सांगा ना .. कुणीतरी सांगा ना .. !
आणि आता याक्षणी तो चुकार, लबाड सोनेरी संधीप्रकाशही कुठे निघून गेलाय आणि ही काळरात्र आम्हाला गिळून टाकायला आलीये .. तिलाही कुणीतरी आवरा ना .. आवरा ना .. !


- मोहिनी घारपुरे-देशमुख



मंगळवार, ८ मे, २०१८

रोज एक कविता (उपक्रम समाप्ती)

रोज एक कविता करायची असं ठरवलं आणि गेले दोन महिने दररोज थोडावेळ तरी नियमीतपणे काव्यप्रदेशात रमत गेले. आपल्या आत खोल खोल दडलेलं नेमकं काय असं आहे ज्याने आपोआपच आपल्याला आत्मविश्वास मिळतो याचं उत्तर शोधण्याचाच जणू माझ्यासाठी हा प्रवास होता. माझ्यासाठी माझ्यापुरतं हे उत्तर मला मिळालं .. प्रतिभेच्या रूपात.. कदाचित तुमच्या आत जे दडलंय ते याहून काहीतरी निराळं असेल ..
सोशल मीडियावर काहीही पोस्ट केलं की लगेच उत्तर, प्रतिक्रीया मिळते हीच या माध्यमाची ताकद आहे. त्यामुळेच मी रोज फेसबुकवर एक कविता लिहीत गेले आणि तुमच्या बऱ्या वाईट प्रतिक्रीयांचा आनंद घेत गेले.
मोहिनी, अगं तू कविता कशी काय करायला लागलीस एकदम?
हा प्रश्न मला अनेकांनी विचारला. तर त्याचं खरं उत्तर हेच आहे की मला कविता सुचत होत्याच पण एकंदरीतच आपल्याकडे अत्यंत प्रतिभावंत कवी आणि दर्जेदार कविता सोडल्यास अन्य कवी आणि कविता यांच्याबाबत जो हेटाळणीचा सूर लावला जातो त्यामुळे मी कदाचित कविता करण्याला फार महत्त्व देत नव्हते आणि स्वतःतील ही प्रतिभा स्वतःच झाकोळून टाकत होते.
कविता चांगलीच असावी हा अट्टाहास ठेवूनच कविता करत गेले पण नेहेमीच तो यशस्वी झालाच असे नाही. फेसबुकवर पोस्ट केलेली कविता मी नंतर माझ्या काही आप्तेष्टांना व्हॉट्सअॅपवर शेअर करत होते. त्यासाठी मी 110 कॉंटॅक्ट्स आणि 8 ग्रुप्सवर ब्रॉडकास्टलिस्टच्या माध्यमातून रोज माझी कविता पाठवत गेले. रोजच्या कवितेला लगेचच ही मंडळी रिप्लाय देऊन त्यांचे मत कळवत होती.
एका ग्रुपवर तर फक्त माझ्याच कवितांच्या पोस्टची गर्दी झाली तेव्हा एका सदस्याने ग्रुपचे नाव बदलून चक्क "मोहिनी काव्यसंग्रह" असा नाव बदलण्याचा आतातायीपणा केला तेव्हा मला फार बेचैन व्हायला झाले. एकाने मला हलवायाची उपमा दिली.रोज बुंदी पाडल्याप्रमाणे कविता करतेस त्याने कवितेची किंमत कमी होते असा सूज्ञ सल्लाही दिला. याउलट अनेकांना माझं कौतुकही वाटलं. खूप मित्रमैत्रिणींनी, नातेवाईकांनी आणि जवळच्या मंडळींनी मला फोन करून माझं कौतुक केलं.. छान कविता करतेस अशी दिलखुलास प्रतिक्रीया दिली.. अनेक ग्रुप्सवरही मला माझ्या कवितांबद्दल अनेकांनी प्रेम दिलं, कौतुकभरल्या लेखी प्रतिक्रीयाही दिल्या. हा सगळा माझ्यासाठी विलक्षण कैफ चढवणारा अनुभव ठरला. फेसबुकवर कविमन, रसिकमंच (मूलतः रूद्रम् फॅन्स) आणि अक्षर मैफल या ग्रुप्सवर मी माझी कविता पोस्ट करत होते, या सर्व ग्रुप्सच्या सदस्यांनीही मला खूप प्रोत्साहन दिले, आवडलेल्या कवितांना भरभरून दाद दिली. या सर्व अनुभवाने मी समृद्ध झाले. मला माझ्यातली नवी मी गवसले आणि पुन्हा एकदा जगायला मजा आली.
कविता करणं सोपं काम नाही. र ला र आणि ट ला ट जुळला म्हणजे कविता होत नसतात. कमीत कमी शब्दात एक पूर्ण अर्थ मांडणं आणि शब्दांच्या लयबद्धतेचे भान ठेवत समोरच्याच्या काळजाला भि़डणं म्हणजे कविता..
ती ठरवून करता येते पण तिची भट्टी दरवेळी जुळेलच असं मात्र नाही, किंबहुना ती अपेक्षाच ठेऊ नये. मी रोज कविता करत असताना माझी प्रत्येक कविता प्रत्येकालाच आवडावी आणि प्रत्येकानेच दाद द्यावी असली भ्रामक कल्पना आधी मी दूर ठेवली होती कारण मी फक्त काव्यनिर्मितीतला आनंद घेत होते आणि मनातल्या विचारांना, प्रतिभेला वाट मोकळी करून देत होते. त्यामुळे कोणाच्या टीकेने फारवेळ खेद वगैरे करत बसले नाही. शिवाय मला वाटतं, जसं चित्र काढायला येण्यासाठी सुरूवातीला वेडी वाकडी वळणं, रेषा हातातून कागदावर उमटाव्या लागतात तसंच कविता उत्तमोत्तम जमण्यासाठी मुळात कविता करत जायला हवं. तेच महत्त्वाचं... आपला शब्द तोलून मापून डौलाने मांडण्यासाठी मुळात त्यादृष्टीने प्रतिभेला साकडं घालायला लागतं. लिहीत रहायला लागतं. मी हेच करत होते.
आज या काव्यप्रवासाचे दोन महिने पूर्ण झालेत. आता मात्र मी कविता करत रहाणार हे नक्की. फक्त दोन महिने रोज कविता केलेल्या इथे शेअर करत होते त्याऐवजी सुचतील तेव्हा कविता लिहीन आणि त्यातली बेस्ट कविता तुमच्यापुढे फेसबुकच्या माध्यमातून ठेवत जाईन..
यापुढेही तुमचे प्रेम असेच मिळत राहील असा विश्वास वाटतो...
#रोजएककविता #उपक्रमपूर्ती

- मोहिनी घारपुरे-देशमुख

शुक्रवार, २७ एप्रिल, २०१८

रंग आयुष्याचे

रंग कसे ना आपल्यासाठी
आपल्या मर्जीने वागतात
किमान काही काळतरी ते
आपला तोरा राखतात।
आपलं चित्र आपल्याला
हवं तसं खुलवता येतं
कारण कुठे कसा रंग द्यायचा
ते आपलं मन ठरवतं।
आयुष्याचं चित्र मात्र
आपल्या नसतं हातात
जो येईल तो रंग
द्यावा लागतो क्षणार्धात ।
मावळतीचे रंग कधी
कधी उगवतीची लाली
आयुष्याच्या चित्रामध्ये
कधी उमटे पानोपानी।
काही अवचित रंग असतात
ईश्वराहाती दडलेले
त्या त्या वेळी ते ते खुलती
ज्यासाठी असते मन आतुरले ।
रंगांच्या या शेल्यामधले
काहीच रंग आपल्या नशीबी
खरा चित्रकार तोच ठरतो
ज्याला कळते अचूक रंगसंगती ।
- मोहिनी घारपुरे-देशमुख

बुधवार, २५ एप्रिल, २०१८

डोह

डोळ्यांची भिरभिरणारी पाखरं
जेव्हा एकटक पहायला लागतात
तेव्हा कुठेतरी लागला असतो
जिव्हारी घाव ..
रूतलेला असतो एखादा शब्द
खोल खोल काळजात
आणि मनाच्या डोहात जेव्हा
हिंदकळत राहतो ना तो
तेव्हा फुटतं
काठोकाठ भरलेलं
नेत्रतळं
आणि अशावेळी लागतं
आपलं असं कुणीतरी
तो उसळलेला डोह आवरायला
खरच किती क्षण आयुष्यात
येतात असे हिंदकळलेले
आणि देऊन जातात जवळ पुन्हा
माणूस "आपले" दुरावलेले..।
- मोहिनी घारपुरे - देशमुख

मंगळवार, २४ एप्रिल, २०१८

एक अस्वस्थ प्रवास

गेले दोन -तीन दिवस झपाटल्यागत नशायात्रा हे पुस्तक वाचून काढलं. लेखक तुषार नातू यांच्या या पुस्तकातील काही भाग फेसबुकवर एका पोस्टमध्ये वाचनात आला. सहज म्हणून तुषार यांचा फेसबुकवर शोध घेतला तर तेही फेसबुकवर सक्रीय असल्याचे आढळून आले. मग त्यांच्याकडून पुस्तकाची व्हॉट्सअॅपप्रत मागून घेतली. दररोज थोडे थोडे भाग वाचत गेले आणि एक वेगळेच अनाकलनीय गूढविश्व उघडले गेले. 
नशेच्या यात्रेत माणूस कुठल्या टोकापासून सुरूवात करतो नी कुठवर खोल खोल रूतत जातो आणि पुन्हा सुदैवाने कोणीतरी हात हातात धरून त्याला बाहेर येण्यास मदत करत जातं आणि पुन्हा आयुष्याचा मार्ग सुकर होत जातो हा सारा प्रवास आत्मकथनाच्या रूपाने तुषार नातू यांनी या पुस्तकात अत्यंत प्रामाणिकपणे कथन केला आहे. 
आपली ओळख निर्माण व्हावी असं स्वप्न प्रत्येक तरूणाचं असतं, मग स्वप्न सत्यात आणण्यासाठी कष्ट, योग्य दिशेने कष्ट तर घ्यायलाच हवेत ना .. पण अनेक तरूणांना उमेदीच्या दिवसातच केवळ स्वप्नरंजनाचीच सवय जडते, मग कुसंगत लागते, मग एकदा मजा म्हणून नशा, अमली पदार्थांचा आयुष्यात प्रवेश होतो, मग चोरी, खोटं बोलणं, पैशांची अफरातफर, माजोरडी वृत्ती, कुटुंबीयांशी प्रतारणा या सगळ्या पायऱ्या तो स्वतःच आपोआपच चालतो, त्याला ते आपोआपच जमत जातं. अशातच कधीतरी स्वतःवरचा राग, समाजावरचा राग या भावना वाढीस लागतात.. मग अतिरेकी नशा केली जाते .. मग कडेलोट होतो आणि आयुष्य उद्ध्वस्त होतं.. पण नशेकर व्यक्ती एवढा खोल खोल बुडालेला असतो या गर्तेत की त्याला आपलं तर भान उरतच नाही तसंच आपल्या कुटुंबीयांविषयी मनात आकस, सुधारणेचे पोकळ प्रयत्न आणि पुढेमागे जीवन संपवण्याचा प्रयत्न करून कडेलोट करण्यापर्यंतही यांची मजल जाते. 
एवढ्या टोकापर्यंत जाऊनही पुन्हा त्यातून बाहेर पडणं, पूर्ण बरं होणं हे काहींनाच जमू शकतं आणि त्यांपैकीच एक नाव म्हणजे तुषार नातू असं म्हणायला हरकत नाही. चौदावर्ष झाली असतील त्यांना पूर्ण बरं होऊन .. हो हो बरं होऊन असंच म्हणणं योग्य आहे. कारण व्यसनाधीनता हा एक मनोशारिरीक आजारच आहे. मात्र, आपण अजूनही याकडे त्या माणसाचा दोष म्हणूनच पहातो. वास्तविक एकदा अंमली पदार्थांचं सेवन केलं की आपलं शरीर आणि मन सतत त्याची मागणी करायला लागतं आणि ते मिळेपर्यंत स्वस्थता लाभू देत नाही. यात त्या माणसाचा दोष असा की त्याने पहिलाच घोट किंवा पहिले सेवनच ठामपणे नाकारायला हवे. पण तारूण्याचा जोश, नवं काहीतरी करण्याची धुंदी आणि आपला पोकळ स्वाभिमान (अहंकार) यामुळे अनेक तरूण या सगळ्या वाटा चोखाळत जातात. 
नशायात्रा पुस्तक वाचताना मला सुरूवातीला राग राग आला .. लेखकाचा .. 
नशेच्या पूर्ण आहारी गेलेला लेखक घरी कशी कशी नाटकं करून पैसे उकळायचा, मग एकदा पूर्ण सुधारल्याचा विश्वास देऊन वडिलांकडून कामधंदा सुरू करायचा म्हणून पैसे घेतो आणि आपल्या स्वार्थासाठी सहेतुक पानटपरीचा व्यवसाय सुरू करण्याचा मानभावीपणा करतो, त्या टपरीचीही वाट लावतो, तिला तर नशेची छावणीचं रूप देऊन मोकळा होतो.. मग लक्ष्मीपूजनाच्या भयाण दिवसाची करूण कहाणी वाचताना तर आपल्याला लेखकाच्या आयुष्याची किळस, घृणा वाटायला लागते. मग नशेच्या अंमलाखाली पूर्ण गेलेला लेखक मेंटल हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन बरा होऊन परत येतो काय, पंचवटी हॉटेलमध्ये कॅशियर पदावर नोकरी करू लागतो काय.. कामही उत्तम, प्रामाणिकपणे करतो हे वाचताना आपल्या मनात पुन्हा आशा पल्लवीत होत असतात पण हाय रे अशातच तिथे महिन्यादोन महिन्यातच त्याची त्याच्या एका जुन्या व्यसनी मित्राची गाठ योगायोगाने पडल्याचे आपण वाचतो आणि हा व्यसनी मित्र तिथेच कामाला असल्याने लेखक आपोआपच त्याच्या नादी लागून पुन्हा आपला संयम विसरून नशेच्या गर्तेत खोल खोल बुडतो.. नोकरी सुटते आणि पुन्हा ये रे माझ्या मागल्या सुरू होते.  खरंतर हा प्रसंग वाचेपर्यंत लेखकाची ही "नशायात्रा" एवढी खोल खोल गेलेली असेल असे वाटतही नाही. लेखक जे वागल्याचे लिहीले आहे ते त्याचे तारूण्यसुलभ वर्तन असेल असे वाटून आपण वाचक म्हणून त्यास सहानुभूती देत जातो.. पण हा प्रसंग वाचताना आपल्याला वाचकांना त्याचा राग आल्याशिवाय राहात नाही.. 
मग पुन्हा व्यसन, पुन्हा मेंटल हॉस्पिटल असे करत करत तब्बल चार वेळा मेंटल हॉस्पिटलच्या वाऱ्या लेखकाने केल्या असल्याचे कळते. या दरम्यान त्याला जीव लावणारी भेटलेली एक मुलगी, तिच्या कोवळ्या भावना, तिचा भाबडेपणा सारं सारं वाचताना लेखकाच्या जीवनाविषयी आपले डोळे पाणावल्यावाचून रहात नाही. कित्येकदा ठरवून बरा होण्याचा प्रयत्न करून पुन्हा जुनी संगत भेटते काय नी लेखक पुन्हा व्यसनात बुडतो काय हे वाचताना  "अरे देवा, काय होतं या मुलाचं नशीब " असंही वाचकांना क्षणभर वाटून जातं. या दरम्यान मोठ्या भावाचा आधाराचा हात, वडिलांचं आजारपण, आईचा संयम या सगळ्यांच्या आयुष्याची लेखकाने जी नासाडी केली त्याबद्दल पुन्हा पुन्हा राग तर येतोच पण त्याच्या कुटुंबाच्या सोशीकपणाची परीसीमा केवळ नतमस्तक होण्याजोगी वाटते. 
नंतर तर लेखक चक्क उपचारासाठी जायचं या नावाखाली भावाकडून पुन्हा पैसे घेतो ते मनात व्यसनं पुरवण्याची योजना बनवूनच .. भाऊ त्याला बसमध्ये बसवतो, तिकीट काढायला लावतो आपल्यासमोर, हा देखील भावासमोर तिकीट काढतो आणि भावाची गाडी नजरेआड होताच तेथून कंडक्टरला, आपण नोकरीच्या मुलाखतीसाठी निघालोय पण एक महत्त्वाचं प्रमाणपत्र घरीच विसरलोय त्यामुळे आपलं तिकीट रद्द करावं अशी  चक्क निलाजरेपणाने थाप मारून तिकीट अन्य कोणाला विकून गाडीतून उतरतो, भावाने दिलेल्या पैशातून व्यसनं करत फिरतो आणि नंतर कधीतरी गाडी पकडून मग प्रवासास निघतो हे वाचताना डोक्यात तिडीक गेल्याशिवाय रहात नाही..
एका टप्प्यात तर लेखकाने अशी कबूलीही दिली आहे की तो चक्क घर सोडून थेट मुंबईला गेला. तिथे नशा करत तो जे फिरला त्यात पैसे कमवण्यासाठी हॉटेलच्या थाळ्या धुण्यापासून ते कचरा गोळाकरण्यापर्यंतची कामे केवळ अंमली पदार्थांच्या खरेदीसाठी पैसे हवेत म्हणून त्याने केली.. 
खरंच, ही एवढी दुर्दशा ..? हे एवढे नैतिक अधःपतन ..? हे वाचताना कपाळावर हात मारून घेतल्याशिवाय आपण रहात नाही. 
पण तरीही या जगात देव आहे, आणि जसा देव आहे तसेच प्रत्येक जीवाचे भोगही आहेत.. ज्याच्या वाट्याला जे भोग येतात ते त्याला भोगावेच लागतात हे देखील सत्य येथे गृहीत धरून आपण लेखकाला थोडीशी सहानुभूती देतो आणि पुस्तक पुढे वाचत जातो. अशा टप्प्यावर जेव्हा आपल्याला वाटतं की हा चांगल्या घरचा मुलगा एवढा कसा वहावत गेला, एवढी कशी वाताहत लागली याची .. या टप्प्यावरच त्याच्या जीवनाने त्याला मुक्तांगण नावाच्या संस्थेत पोचवल्याचे वाचनात येते आणि पुन्हा आपली आशा पल्लवीत होते, कर्ताधर्ता तो ईश्वरच आपण सगळे त्याच्या हातच्या कळसूत्री बाहुल्या असेही वाटून जाते..आणि आपण पुढे आणखी काय वाढून ठेवले होते या मुलाच्या नशीबात या विचाराने वाचू लागतो.  
या टप्प्यावर लेखकाच्या आयुष्यात देवासमान डॉ. अनील अवचट आणि डॉ.अनीता अवचट आले म्हणूनच की काय त्याचे आयुष्य पुन्हा मार्गी लागले असेच मी म्हणेन. मुक्तांगणमधील कामाची पद्धती वेगळी आहे हे एव्हाना सर्व महाराष्ट्रीयन लोकांना माहीत आहेच. मात्र, वाचक म्हणून आपल्याला लेखकाविषयी जी उत्सुकता वाटते आणि त्याने मुक्तांगणमध्येही पुन्हा नशा केली नसावी अशा आशेने आपण पुढे वाचत जातो तेव्हा एका टप्प्यावर आपल्याला हळूहळू समाधानाची भावना आपसुकच मनात मिळत जाते. याचं कारण, जर मुक्तांगणमध्येही लेखकाने नशेच्या वाटेवरून माघारी फिरणे साध्य केले नसते तर आज कदाचित त्याचे अस्तित्वही असते की नसते याबद्दल मी साशंक आहे. पण कसं कोण जाणे, मायेची फुंकर मिळाल्याने, लेखकातील सूप्त कलागुणांना वाव मिळाल्याने आणि व्यसनाधीनतेबद्दल शास्त्रीय दृष्टीकोन मिळाल्यानेच लेखक स्वतःला थांबवू शकला असे ठामपणे मला वाटले. लेखकाची नशायात्रा खऱ्या अर्थाने तेव्हाच थांबली जेव्हा त्याला मुक्तांगणमध्ये चांगली माणसं मिळाली, आणि त्यांनी लेखकाला तू हा बदल स्वतःत करू शकतोस हा विश्वास दिला... 
आता लेखक व्यसनी लोकांच्या पुनर्वसनाचे काम करत आहे. नागपूरमध्ये मैत्री या संस्थेच्या माध्यमातून त्यांचे कार्य सुरू आहे हे समजल्यावर जरासा दिलासा वाचकांना मिळतो. 
पण मला संपूर्ण पुस्तक वाचताना, "..... पण का ?" या प्रश्नाने अहोरात्र छळले आहे. चांगलं घर, चांगले आईवडील, चांगली भावंड सारी सारी सुबत्ता असूनही केवळ स्वतःचा अहंकार एवढा हैदोस घालू शकतो की एखाद्याच्या उमलण्याच्या वयात त्याचं सारं सारं भविष्य करपून टाकू शकतो ? .. हा प्रश्न माझ्यासाठी निरूत्तरीत रहातो. काही काही प्रसंग वाचताना लेखकाचा एवढा राग येतो आणि काही काही प्रसंग वाचताना त्यांच्याविषयी करूणा, दयाच वाटत जाते.. एकेका प्रसंगात तर आपल्या डोळ्यात पाणी आल्यावाचून रहात नाही एवढे भावविवश आपण होत जातो.. 
सतत तीन दिवस मी हे पुस्तक मोबाईलवर वाचून काढत होते.. आता जेव्हा अखेरच्या टप्प्यात पुस्तक आलं तेव्हा पुन्हा एकदा फेसबुकवर लेखकाचे फोटो पाहिले.. खरोखरीच त्यांच्या तारूण्याच्या दिवसातलं त्यांचं उमदं रूप आणि नंतर व्यसनांच्या विळख्यात सापडल्यानंतर झालेली दुरावस्था आणि आता पुन्हा संसार करत असताना जबाबदारीने आपल्या कुटुंबासाठी, आपल्या समाजासाठी उभा राहिलेला एक पुरूष .... हे सगळं एकाच आयुष्यात घडू शकतं का? हा प्रश्न मनात उभा रहातो.. 
एकेकाळी व्यसनांमुळे ज्याने आपली जन्मतःच मिळालेली "तुषार नातू" ही ओळख धुळीस मिळवून टाकली होती तोच हा मुलगा पुन्हा सगळ्या भूतकाळाच्या नांग्या ठेचून आज त्यावर एक चांगली प्रतिमा घेऊन जगण्यासाठी सकारात्मकतेने सज्ज झाला आहे असा विश्वास वाटतो. आणि म्हणूनच ही यशोगाथा, ही विजयगाथा वाचताना शेवटी आपण अभिमानाने विचारल्यावाचून रहात नाही, "excuse me, तुषारच ना तू ?" 
तर मित्रांनो, प्रत्येक व्यसनी माणसाने, प्रत्येक भावनिक माणसाने, आणि प्रत्येक असा माणूस ज्याचा स्वतःवर संयम रहात नाही त्याने हे पुस्तक किमान एकदातरी शिकण्याच्या हेतूने वाचायलाच हवे. भावनेच्या आहारी जाऊन चुका करणं हा मानवी स्वभाव आहे पण चुका अशा कराव्यात ज्यातून आपलं आणि आपल्याबद्दल सद्भावना ठेवणाऱ्या माणसांचं कमीत कमी नुकसान होईल, चुका अशाच कराव्यात जिथून आपल्याला कोणत्याही क्षणी माघारी येण्याचे दरवाजे सापडतील.. नाहीतर माणसाच्या आयुष्यात एकदा निघून गेलेली वेळ आणि एकदा निघून गेलेले वय परत येत नसते हे प्रत्येकाने लक्षात ठेवायलाच हवे. भावनिक असणं चांगली गोष्ट आहे पण भावनांच्या आहारी जाणं, आणि सतत भावनाविवश होणं, आपला संयम ढळणं या बाबी होत असतील तर तुम्हीच स्वतःच स्वतःला हे करण्यापासून परावृत्त केलं पाहिजे.
जाता जाता एकच सांगेन, या जगात मित्र मिळतील , कदाचित तुमच्या नशीबाने चांगलेच मित्र मिळत जातील पण तुम्ही स्वतः स्वतःचे मित्र बनणं सर्वाधिक महत्त्वाचं आहे. कारण तुम्हाला तुमच्यातील शत्रूवर विजय मिळवण्यासाठी तुमच्यातील मित्रच कायम सोबत करणार आहे ....
- मोहिनी घारपुरे - देशमुख 
mohineecasualwriter@gmail.com


शुक्रवार, २० एप्रिल, २०१८

कला

ती पावली
तेव्हा कलाकाराचा जन्म झाला
ती नाचली
तेव्हा नर्तनाचा जन्म झाला
ती रंगली
तेव्हा चित्र जन्माला आले
ती गायली
तेव्हा सूर जन्माला आले
ती खेळली
तेव्हा हाताची बोटं थिरकली
तिचा स्पर्श झाला
तेव्हा 'त्याला' ओळख मिळाली
ती वास्तव्याला आली
तेव्हा तो कलाकार म्हणून नावाजला .. ।

समुद्र

समुद्राच्या लाटा झेलत
चिंब भिजवावे स्वतःला
अन् रहावे तहानलेलेच
पुन्हा कवेत शिरायला ।
तो पसरलेला अस्ताव्यस्त
उघडून आपुले बाहूपाश
तो सांडत जातो निळाई
अन् झुकते अथांग आकाश ।
तो नभीच्या चांदव्याला
जणू घेतो आपुल्या मीठीत
तो असा जिवलग मित्र
होतो पहिल्याच भेटीत ।
मग चांदण्याही आसुसती
त्याच्या राकट स्पर्शासाठी
अन् क्षणात उधळून देती
चांदणचुरा त्याच्यावरती ।
ही भेट एका मर्दाची
की श्रुंगार हा सजणाचा
तो उधळत जातो लाटा
जणू म्हणतो पुन्हा भेटा ..।
- मोहिनी घारपुरे-देशमुख


Image may contain: night, ocean, sky and water

कविता

कविता असते मुक्त आणि असते छंदीष्टही
म्हणूनच ती विहरते लीलया
कवींच्या कल्पनांतही ।
कधी जाते समुद्रात
कधी विहरते रानोमाळ
कधी फिरते गगनात
कधी बरसते पावसात ।
कधी होते व्रुद्धा
कधी होते ललना
कधी रूपे बालिका
कवींच्या शब्दांमधी ।
कवितेचं असच असतं
झरझर बरसणंच तिला जमतं
जोडत एकेक शब्द शब्द
कवितेचं पान बहरतं ।
- मोहिनी घारपुरे-देशमुख

काबिल - चित्रपट रसग्रहण

ह्रत्तिक रोशन आणि यामी गौतम यांचा काबिल हा पिक्चर काल पाहिला. मला एकंदरीतच असे पिक्चर पहाताना भयपटांहूनही जास्त भीती वाटते. चित्रपटाचं कथानक आणि दिग्दर्शकाने ज्याप्रमाणे ते हाताळलं ते चांगलं होतं पण अधिक चांगलं करता आलं असतं असं वाटतं.
रोहन भटनागर (ह्रत्तिक) आणि त्याची बायको (यामी) हे अंध जोडपं. एकमेकांवर निरातिशय प्रेम. पण देखण्या आंधळीवर एका राजकारण्याच्या भावाची नजर पडते. संधीसाधून एके दिवशी तो त्याच्या मित्राबरोबर तिच्या घरात घुसतो आणि तिच्यावर अतिप्रसंग करतो. रोहन नेहमीप्रमाणे घरी परततो आणि बायकोशी सवयीने गप्पा मारायला लागतो त्यावेळी तिच्या तोंडात बोळा कोंबून तिचे हातपाय पलंगाला बांधून रेपिस्ट त्याचा हेतू साध्य करून फरार झालेला असतो. अंध रोहनला ही अवस्था स्पर्शानी, तिच्या तडफडीनी कळते. तो तिला कसंबसं सोडवतो आणि पोलिसांकडे धावतो. पिक्चरमधले पोलीस ते .. नेहमीप्रमाणे हीरोलाच अर्थात रोहनलाच फ्रॉड ठरवतात. दरम्यान 24 तास तिला किडनॅप केलं जातं तेव्हा रोहनची तडफड ह्रत्तिकनी सॉलिड रंगवली आहे. त्यानंतर तिला ते समुद्रात सोडून देतात आणि हिरो तिला कसंबसं वाचवतो. 24 तासांच्या आत डॉक्टरकडे पोचू न शकल्याने डॉक्टरही नो सच एव्हीडन्स असा रिपोर्ट देतो. पोलिसांकडून मदत मिळणार नाही हे लक्षात आल्यानंतर ती दोघं गपगुमान घरी येतात. ती हिंमत न हरता पुन्हा नव्याने आयुष्य सुरू करूया असं त्याला आपलं बळ एकवटून सांगते आणि तुला मान्य नसेल तर मी माझा एनजीओचा जॉब करत जगेन असाही पर्याय देते. त्याक्षणी तो बिचारा काहीच बोलू शकत नाही. विचारमग्न अवस्थेत निघून जातो. जेव्हा घरी परततो तेव्हा नव्याने जगणं सुरू करण्याची आशा मनात घेऊनच येतो .. नेहमीच्या सवयीच्या बिछान्यावर बसून तो तिच्याशी बोलायला लागतो आणि तितक्यात तिच्या पायांचा त्याच्या पाठीला जोरदार धक्का बसून स्पर्श होतो ... त्याच्या काळजात चर्र होतं .. त्याला जाणवतं आणि ते दुर्दैवाने खरच असतं .. तिने आत्महत्या केलेली असते. त्याच्या अपरोक्ष रेपिस्ट पुन्हा घरात घुसतात आणि तिच्यावर दुसऱ्यांदा रेप करतात.. मरता मरता तिने त्याच्यासाठी चिठ्ठी लिहीलेली असते .. तिने लिहीलेलं असतं, एकदा जे झालं ते विसरून मी पुन्हा नव्याने सुरूवात केलीही असती कदाचित पण आता दुसऱ्यांदाही हेच झालंय .. आणि आता हा खेळच समजून त्यांनी हा प्रकार सुरूच ठेवला तर मी काय करू .. त्यापेक्षा जीवन संपवलेलंच बरं या विचाराने मी मरण कवटाळते आहे .. मी दोन घड्याळं ठेवतेय, त्यापैकी एक जाळून टाक आणि एक पुरून टाक .. हा आपल्या मारेकऱ्यांविषयीचा क्ल्यू ती पत्राद्वारे जाता जाता त्याच्यासाठी ठेवून जाते आणि मग त्याआधारे अंध हीरो नंतर अत्यंत हुशारीने सगळ्यांचा सूड उगवतो.
पिक्चर सॉलिड आहे पण अजून चांगला बनवता आला असता असे वाटत रहाते. तरीही एकंदरीतच अशा कथा पाहिल्या की मन विषण्ण व्हायला होते. समाजात असेही सराईत गुन्हेगार आहेत याची जाणीव राहून राहून होते आणि केवळ अंगावर सरसरून काटा येतो.
आज जेव्हा बलात्काराच्या घटना एवढ्या प्रमाणात वाढल्या आहेत अशा वेळी हा देखील एक विचार मनात येतो, की शारीरिक वा मानसिक द्रुष्ट्या अक्षम असलेल्या मुली, बालिका आणि महिलांच्या सुरक्षेचं काय ? जिथे सुदृढ, सशक्त मुलींच्याच सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे, त्यांच्या अब्रूची लक्तरे काढणारे राक्षस एवढे मुजोर झाले आहेत तेव्हा या अशा अक्षम मुलींना तर किती पट अधिक सुरक्षा मिळायला हवी ...
- मोहिनी घारपुरे - देशमुख

आसिफा

देव असतो माणसात
नसतोच तो देवळात
आसिफाच्या घटनेनी
पुन्हा हेच तर सिद्ध केलंय ।
ती इवलाली नाजूक पोर
चारायला गेली घोडे
तिच्या कोवळ्या मनी तेव्हा
नव्हते काही कोडे ।
राक्षसांच्या विळख्यात जेव्हा
गुदमरली गेली आसिफा
कोणीच माणूस नव्हता भवती
हाय रे चिमुकलीच्या कर्मा।
दगडातला देव तिथे
बसला होता मुका होऊन
अशावेळी सज्जन कुणी
गेला तरी असता धावून ।
कदाचित तेव्हा नव्हतच कुणी
म्हणून साधला डाव
देव कुठला दगडाचाच तो
माणसांनीच केला असता बचाव ।
म्हणून जपा माणूसपण आपलं
नराधम, राक्षस होऊ नकाच
जपा आपला एकच मंत्र
समता बंधुता धर्म खराच ।
- मोहिनी घारपुरे-देशमुख

मराठी भाषेचा आग्रह की दुराग्रह ?

काल मी एक मराठी शुद्धलेखनाविषयी पोस्ट टाकली होती. त्यानंतर आज अचानक एक इंग्लिश शब्द जो चुकीचा स्पेल केला होता तो वाचनात आला आणि माझ्या मनात द्वंद्व सुरू झाले. माझ्या मनातील हा विचार इंग्लिश आणि मराठी भाषेचा तुलनात्मक आहे ..
आपण मराठी शुद्धलेखनाच्या बाबतीत आग्रही आहोत.. वेलांटी, उकार,
-हस्व, दीर्घ यात जराशीही चूक आपण खपवून घेत नाही.
पण हल्ली इंग्लिशमध्येही शब्दांची मूळ स्पेलिंग्स बदलून वापरायला सोपी आणि अर्थ पोचेल अशी स्पेलिंग्स करण्याचा एक ट्रेण्ड फोफावत चाललेला दिसतो.. उदाहरणार्थ,
You च्या ऐवजी सर्रास U लिहीणे
There च्या ऐवजी सहज Thr लिहीणे
Could च्या ऐवजी Kud असं झटकन लिहून मोकळं होणे..
असे आणखी अनेक शब्द आहेत.
आपण विशेषतः मोबाईलवर टेक्स्ट मेसेज करताना किंवा सोशल मीडियावर चॅटींग करताना, पोस्ट लिहीताना इंग्लिश भाषेचे असे मोडतोड केलेले पण वापरण्यास सोपे असे शब्द लिहून मोकळे होते..
काही जाहीरातींमध्येही चुकीची स्पेलिंग जाणीवपूर्वक, ग्राहकांचं लक्ष वेधण्यासाठी केल्याचीही अनेक उदाहरणं आहेत..
तर मुद्दा असा आहे की,
इंग्रजी भाषाही मराठीइतकीच समृद्ध आहे.. परंतु असे असतानाही इंग्रजी भाषेतील मोडतोड जगभरात होत असूनही आजवर असे शब्द लिहीण्याने या भाषेचा अपमान झाला, -हास झाला अशी मतं कधीही कानावर पडलेली नाहीत. किंवा कोणीही त्याचा एवढा विचारही केलेला नाही..
मात्र, मराठी भाषेत मात्र हा विषय आपण अत्यंत गंभीरपणे घेतो .. मराठी भाषा नष्ट होईल की काय अशी भीती व्यक्त करतो, व्याख्यानं घेतो, परिसंवाद घेतो, शुद्धलेखनाच्या चुका करणाऱ्यांना सोडत नाही ..
इंग्रजी आणि मराठी या दोन्हीही भाषाच आहेत.. या भाषांना एक इतिहास आहे.. मराठीपेक्षाही जगभरात इंग्रजी भाषेचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो.. असे असताना शुद्धलेखन व व्याकरणाबाबत इंग्रजी भाषेने , इंग्रजी भाषिकांनी कधी फार आग्रह धरल्याचे ऐकीवात नाही .. मराठी भाषिकांनी मात्र या उलट भूमिका घेतलेली आहे ..
हा फरक का असावा .. ?
सहजता आणि प्रवाहीपण याबाबत मराठीपेक्षा इंग्रजी अधिक लवचिक आहे असा याचा अर्थ होऊ शकतो का ..?
की मराठी भाषेच्या समृद्धीविषयी आपण मराठी भाषिक जास्त तत्पर, गंभीर आहोत आणि त्यामुळेच मराठी भाषा टिकून राहील असा आपला विचार आहे ?
जर इंग्रजी भाषा अधिक लवचिक असल्याचे या धोरणात दिसून येत असेल तर मग आपणही मराठीच्या शुद्धलेखन आणि व्याकरणाबद्दल एवढं आग्रही असणं सुसंगत आहे का ?
असे अनेक प्रश्न मनात उपस्थित झाले आहेत ..
- मोहिनी घारपुरे - देशमुख

रात्र


अशा अंधारलेल्या रात्रीची
वाट पहात असतो प्रत्येकजण
तिच्या कुशीत निजतो
विसरूनीया अवघे श्रम ।
ती घेते आपल्याला
हळुवार कवेत जेव्हा
तिच्या मऊमुलायम स्पर्शाने
जीव सुखावतो तेव्हा ।
ती नीरव शांत काळोखी
तरी गाते हळुवार अंगाई
तिच्या मौनातच शब्द सारे
जोवर कानी येई भूपाळी ।
रात्र कशी शांत शांत
नसते तिला कसली भ्रांत
तिचा काळा लांब पदर
त्यावर चांदण्यांची जरतार ।
ती दडवते भूक जेव्हा
आपल्या उदरात
सुखावलेला जीव तेव्हा
नीजतो तिच्या काळोखात ।
- मोहिनी घारपुरे - देशमुख
 
 

शनिवार, १४ एप्रिल, २०१८

महामानवास प्रणाम

महामानवा तूच खरा
देशाचा शिल्पकार
तुझ्याविना कोणी न दिला
राष्ट्राला आकार ।
डावे उजवे खेचती आम्हा
न दाविती योग्य दिशा
तुझी घटना अखेरीस येते
कामी प्रत्येकाच्या।
राजकारण्यांच्या खेळामध्ये
आम्ही जळत आहोत
तुझ्यासम बुद्धीवंताची
वाट बघतो आहोत ।
तुझ्या पाऊलखुणांवर
कोणी चालेल का पुन्हा?
आपुल्या देशाला योग्य दिशा
कोणी दावेल का पुन्हा? ।
हाच प्रश्न आम्हा आता
दिनरात छळतो आहे
महामानवा तुझ्यासम नेत्याची
आम्ही वाट बघतो आहे ।
- मोहिनी घारपुरे -देशमुख

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना प्रणाम 💐

शुक्रवार, १३ एप्रिल, २०१८

कोण कोणास तुमच्याबद्दल काय म्हणाले ?

कोण माझ्याविषयी काय म्हणाले हे मला ऐकवणाऱ्या माणसांना मी फारसं एंटरटेन करू शकत नाही ..!
मला वाटतं, हे असं सांगणारा मनुष्य रिकामाच असला पाहिजे. कारण, या नसत्या उठाठेवी सांगितल्यात कोणी करायला ..?
हा, आता एखादी माझ्या क्षेत्रातली मोठी, महत्त्वाची व्यक्ती माझ्याविषयी माझ्यामागे काही चांगलं वाईट बोलली आणि ते माझ्या कानावर कोणी घातलं तर अशा व्यक्तीचे मी निश्चितच आभार मानेन. कारण, त्याने मला ही माहिती पुरवण्याने माझ्या कामाचे निश्चितच कौतुक अथवा योग्य टीका मला ऐकायला मिळेल आणि त्यामुळे मी माझ्यात सुयोग्य बदल करू शकेन.. तसंच एखादा माझ्याविषयी प्रामाणिक भावना असलेला मनुष्य माझ्या चुका सोदाहरण सांगून, मला समजावत असेल तर नक्कीच मी वेळ काढून ते ऐकेन, वेळ काढून त्याच्या सांगण्यावर विचार करेन, स्वतःत कालपरत्त्वे अपेक्षित बदलही करण्याचा मनापासून प्रयत्न करेन ..
पण उगाच कोणीही उठसूट, त्याला आलेल्या अनुभवांतून काहीबाही बरळला आणि अशा माणसाचं माझ्याविषयीचं बोलणं कुणी आणखी तिसरा मला कोणत्याही हेतूने ऐकवू लागला तर मला त्यात फारसा रस नसतो.. कदाचित मी दरवेळेला अशा माणसाला उडवून लावेनच असं नाही, पण त्याने पुरवलेल्या या माहितीमुळे मला जराही फरक पडणार नाही हे मात्र खरे .. एका कानाने ऐकेन दुसऱ्या कानाने सोडून देईन, किंवा अगदीच वाईट काहीतरी बरळलं असेल तर नक्कीच खडसावेन, किंवा कौतुकाचे दोन शब्द असतील तर छानपैकी ती दाद घेईन .. पण उगाचच काहीतरी सांगायला लागलं ना कोणी, तेही तिसऱ्याच कोणीतरी आपल्या माघारी आपल्याविषयी बोललेलं की मला चालतंच नाही हे मात्र खरे ..
याबाबत एक कथा कुठेतरी वाचनात आली होती. कथा माझ्या शब्दात आणि मला आठवते तशी सांगते.. 
एकदा एका विद्वानाला एक मनुष्य असंच कोण त्या विद्वानाविषयी काय म्हणत होता ते सांगू लागला. तेव्हा त्याने त्या माणसाला पहिल्याच वाक्यावर अडवले. विद्वानाने त्या माणसाला म्हटले, की अरे तू मला अमका माझ्याविषयी काय म्हणाला हे सांगण्याआधी माझ्या काही प्रश्नांची उत्तरे दे .. 
माणूस लगेच तयार झाला. यावर विद्वान व माणसाची जी प्रश्नोत्तरे झाली ती काहीशी अशी -
विद्वान - काय तू मला जे सांगणार आहेस, ते स्वतःच्या कानाने ऐकले आहेस का ?
माणूस - 'नाही'
विद्वान - माझ्याविषयी त्या अमक्या व्यक्तीने जे विधान केले ते सकारात्मक आहे का ?
माणूस - 'नाही '
विद्वान - माझ्याविषयीचे ते विधान नकारात्मक आहे का ?
माणूस- ' होय' 
विद्वान - "अरे मित्रा, हे प्रश्न विचारून मला एवढेच समजले आहे, की जी गोष्ट तू स्वतः ऐकलेली नाही, त्यातूनही ती माझ्याविषयी नकारात्मकच अधिक आहे, ती ऐकून मी काय करू.. ? ते विधान ऐकल्याने मला त्रासच जास्त होणार आहे आणि जरी ते विधान सकारात्मक असते तरीही ते ऐकून मला गर्व होण्याचीच शक्यता जास्त, त्यामुळे तू एवढे कष्ट घेऊन मला जे सांगणार आहेस, ते ऐकून मला काहीही मिळणार नाहीये हे माझ्या या प्रश्नोत्तरातून मला समजले आहे. त्यामुळे तू  माझ्याविषयी ऐकलेल्या गोष्टी तुझ्यापाशीच ठेव.. !"
असे बोलून विद्वान पुढे चालू लागला...

या कथेत त्या विद्वानाचे जे म्हणणे आहे ना, तेच मला योग्य वाटते. कोण माझ्याविषयी कोणाजवळ काय बोलले, ते किती महत्वाचे आहे, ते नेमकं कोण व किती महत्त्वाच्या व्यक्तीचं मत आहे, ते मत ऐकून मला काही फायदा खऱ्या अर्थानी होणार आहे का ? या प्रश्नांची उत्तर जर माझ्या मनाला पटली तरच मी अशी विधानं ऐकून घेते. आणि मग त्याचा मनावर किती परिणाम करून घ्यायचा ते ठरवते. उगाच उठसूट कोणीही केलेल्या टिप्पण्या ऐकण्यात आपला वेळ कशाला दवडा नाही का ?
मला वाटतं, हल्ली आपल्यावर सतत हाच एक ताण जास्त प्रमाणात दिसतो. लोक काय म्हणतील यापेक्षा माझी इमेज, माझ्याविषयीचं समोरच्याचं मत काय याचा अनेक मंडळी अतिविचार करतात. हा विचार तेव्हाच महत्त्वाचा जर, सगळ्यांचंच मत तुमच्याविषयी एकसमान होत असेल तर ...उदाहरणार्थ, तुम्ही उद्धट आहात असं सगळेचजण बोलायला लागले तर तुम्ही स्वतःत बदल करायला हवा हे निश्चित.. पण काही लोक प्रसंगानुरूप त्यांची तुमच्याविषयी मतं बनवत असतात, त्यांना तुम्ही खरे कसे आहात याच्याशी काहीही देणं घेणं नसतं, प्रसंग बदलला, तुमचं वागणं वेगळं दिसलं की यांचं तुमच्याविषयीचं मत बदलतं. मग अशा लोकांच्या मतांना किती किंमत द्यायची हे आपणच ठरवायला हवं..
अन्यथा, चार फुटकळ लोकांची फुटकळ मतं ऐकून आपण सतत स्वतःला क्रिटीसाईजच करत राहू आणि जे आपल्या मानसिक आरोग्यासाठी घातकच आहे. 
याउपर, कोणाचं मत तुम्हाला सांगण्याचे कष्ट जर मधलाच कोणी घेऊ लागला तर मला तर त्यांना स्पष्टच सांगावसं वाटतं, "तुमची नकारात्मक मतं तुमच्याजवळ ठेवा, कारण त्याने माझ्या सकारात्मक कामात तुम्ही खीळ घालता आहात .. "
एवढं साधं सहज मला वागता येऊ शकतं.. पण जेव्हा मी असं स्पष्ट बोलते , तेव्हा तर आणखीनच राग येतो समोरच्याला .. अशा वेळी मी तितकच सहज स्वतःला समजावते, की आला राग एखाद्याला तर येऊ देत कारण मी नंतर संधी मिळताच तो राग काढू शकते आणि संधी नाही मिळाली तरीही असली उठाठेव करणाऱ्या माणसाला वेळीच थांबवलेलं मला जास्त योग्य वाटतं. 
कारण, कोण माझ्याविषयी कोणास काय म्हणाले हे ऐकत बसण्यापेक्षा मला माझं काम जास्त महत्त्वाचं वाटतं... 
मी जे लिहीते, मी जे वाचते त्यावर लक्ष केंद्रीत करणं हे कोणाच्या माझ्याविषयी हवेत मारलेल्या फुंकरींपेक्षा अधिक महत्त्वाचं नाही का ?
सो, तुम्हीही जर कोणाच्या असल्या बोलण्याने वारंवार दुखावले जात असाल तर बेटर स्टॉप दॅट पर्सन राईट अवे ...  अशा माणसांना एंटरटेनच करू नका .. आपलं जगणं, आपलं व्यक्त होणं अशा बुडबुड्यांमुळे जर खराब होत असेल तर ते बुडबुडे वेळीच फोडलेले बरे (म्हणजे शब्दशः नाही बरं का, तर अशा माणसांपासून लांब राहिलेलेच बरे ..) ... !
- मोहिनी घारपुरे - देशमुख 
bla bla bla bla bla
bla bla bla bla bla bla

मंगळवार, १० एप्रिल, २०१८

देवाचा स्पर्श

आज मंदिरातले दिवे 
अजून मिणमिणत आहेत
जणू कुणाच्या ह्रदयीचे गूज
देवच ऐकत आहे ।

कुणी बिचारा उपाशी असेल निजला
कुणी बिचारा राबराब राबून असेल थकला
त्या सगळ्यांच्या डोक्यावर आज
मायेचा हात फिरवत
खुद्द देवच बसला असेल का ?
त्या स्पर्शाच्या ऊबदार गोधडीतच 
आज प्रत्येकजण निजला असेल का? - मोहिनी घारपुरे - देशमुख 



शनिवार, ७ एप्रिल, २०१८

मी - एक "कॅज्युअल रायटर"

जवळपास गेली आठ- दहा वर्ष झाली, मी सातत्याने लिहीत आहे. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, लोकमत, दिव्य मराठी, तरूण भारत या आघाडीच्या दैनिकांसाठी मी लिहीलंय, तसंच मनोविश्व, तनिष्का या मासिकांसाठी, ऊर्जा , लोकमत ऑनलाईन या वेबसाईटसाठी, दिवाळी अंकासाठी, पुरवण्यांसाठी मी लिहीलंय.. अनेक जाहीरातींचं भाषांतर केलंय, रेडीओसाठी कार्यक्रमाचं लेखन केलंय, शिवाय कथा लिहीतेय, कविता लिहीतेय आणि आता ब्लॉगवरही लिखाण करतेय.. पं. हरिप्रसाद चौरसिया, बेगम परवीन सुल्ताना, कांचन गडकरी, झीनत अमान, डॉ. गिरीश ओक, विष्णू मनोहर यांच्यासह विविध क्षेत्रातील अनेक नामांकित लोकांच्या मुलाखती घेऊन मी त्या शब्दबद्ध केलेल्या आहेत, अनेक पुरवण्यांकरीता मिळालेल्या कोणत्याही ललित विषयावर अवघ्या काही मिनीटात मी लेख लिहून दिलेले आहेत. गेल्या वर्षीपासून मी फॅशन विषयावर लोकमत ऑनलाईनसाठी अभ्यासपूर्ण सदर चालवले आहे, तरूण भारत नागपूरसाठी वर्षभर क्रीडवर (न्यूज एजन्सीजकडून आलेल्या बातम्यांवरून आपल्या दैनिकाच्या पॉलिसीनुसार बातम्या लिहीणे), दोन तीन महिन्यासाठी पुरवणी संपादिका या पदापर्यंतही मी काम केलं आहे. हे काम करताना, महिलांसाठीची आकांक्षा पुरवणी आणि तरूणांसाठीची फुलऑन पुरवणी पूर्णतः नव्याने प्लॅन करून नव्या नव्या संकल्पना तिथे राबवल्या, तर रविवार विशेष आसमंत ही आठ पानी पुरवणी अत्यंत जबाबदारीने संपादीत करून तिचा दर्जा वाढवण्यात भर घातली आहे.  आणि तरीही मी एक "कॅज्युअल रायटर" आहे. 
माझा न्यूज सेन्स चांगला आहे, मला बातमी कळते आणि मी झपाटल्यासारखं काम करते, एकेकाळी तर खूप खूप काम केलं आहे. आपल्याकडलं बीट कमी महत्त्वाचं की जास्त महत्त्वाचं वगैरे विचार न करता जो विषय मिळेल त्यावर रिपोर्टींग करायचं, ठिकठिकाणी जायचं, महत्त्वाच्या लोकांना - सामान्य माणसांना भेटायचं आणि बातमी आणायचीच अशा वृत्तीने प्रामाणिकपणे मी काम केलं आहे. 
असं असलं तरीही, माझ्या मते, माझं लिखाण ललित अंगाने जास्त बहरतं, तसंच काही हलक्याफुलक्या परंतु तितक्याच महत्त्वाच्या विषयांवर मी झट की पट लिहून देते. माझ्याकडे नातेसंबंध, पर्यावरण, तरूण, महिला, सोशल मीडिया, इंटरनेट, फॅशन, नवीन ट्रेण्ड्स यापैकी कोणत्याही विषयावरील लेख मागा, कितीही तातडीने त्या विषयावर मी लिहून देऊ शकते.  कोणत्याही दैनिकातून मला फोन येतो, मॅडम ( किंवा, मोहिनी ) , अमक्या एका विषयावर लेख पाहिजे आहे, अगदी आजच पाहिजे, किंवा जास्तीत जास्त उद्या सकाळपर्यंत हवाय, द्याल ( किंवा देशील ) का .. ? मग मी क्षणभर माझ्यासमोरील त्या दिवसाच्या पूर्वनियोजित कामांचा विचार करते आणि दिवसभराच्या कामातून लेख लिहिण्यासाठी वेळ कसा मॅनेज करता येईल याचं मनातल्या मनात पटापट नियोजन करते आणि पुढच्या काही मिनीटातच मी समोरच्याला होकार देऊन मोकळी झालेली असते. मग काम करता करता त्या विषयाचं चिंतन बॅक ऑफ द माईंड सुरू होतं. आणि जसा वेळ मिळेल तसं लॅपटॉपसमोर बसून मी मनातला विचार सलग लिहून मोकळी होते. या संपूर्ण प्रोसेसला मला फार वेळ लागत नाही, कारण माझा टायपिंगचा स्पीडही अत्यंत उत्तम आहे. टायपिंगचा स्पीड कसा आणि कधी वाढला याची एक अत्यंत सुंदर आठवण आहे.

त्याचं झालं असं की, मी दिव्य मराठीत नोकरी पत्करली आणि पहिल्याच दिवशी आम्हाला मराठी टायपिंग ऑफीसमध्ये शिकवले जात होते. तोवर मी गुगलच्या मेलबॉक्समध्ये मराठी शब्द इंग्लिश कीबोर्डवर उमटवून मग योग्य तो शब्द उमटवण्याचं कसब आत्मसात केलं होतं त्यामुळे मला मराठी टायपिंगची फार गरजच नव्हती. त्यामुळे मी कधी त्या भानगडीत पडलेच नव्हते. तर दिव्य मराठीत मला पहिल्या दिवशी स्वतःच्या मेंदूला तोवर जी मराठी टायपिंगची सवय लावली होती ती पुसून नव्याने, वेगळ्या की वर वेगळं अक्षर ही सवय लावणं अत्यंत कठीण जात होतं... मी लॅपटॉपच्या कीजशी झटापट करत होते, इतक्यात आमचे सिनीयर रिपोर्टर मला सगळ्यांसमोर चिडवत म्हणाले, काय तू एवढी बीएससी, पीजीडीबीएम, एम-ए एमसीजे  झालेली मुलगी, आणि एवढी सोपी गोष्ट येत नाहीये तुला... झालं, मी ते बोलणं फारच मनावर घेतलं. दुसऱ्या दिवशी पुन्हा जेव्हा टायपिंगला बसले तेव्हा अवघ्या पंधरा मिनीटात मला तो नवा मराठी कीबोर्ड लीलया वापरता यायला लागला होता... मग त्या कालच्या सिनीयरनी माझे लॅपटॉपवर चाललेले हात पाहून लगेचच पुन्हा सगळ्यांच्या देखत माझं कौतुक केलं तेव्हा मला अत्यानंद झाला. मग प्रत्यक्ष माझा रिपोर्टींगचा जॉब जेव्हा सुरू झाला तेव्हा कंपनीने आम्हा सर्व रिपोर्टर्सना मिनी लॅपटॉप दिलेले होते, माझा लॅपटॉप आणि सायबर शॉट कॅमेरा घेऊन मी कॉलेजेसमध्ये फिरायचे, सांस्कृतिक कार्यक्रमांना जायचे आणि फील्डवरून लॅपटॉपवरून बातमी तयार करून पाठवून द्यायचे, कार्यक्रमांचे फोटो  काढायचे आणि दिव्य मराठीचं सिटीचं पान 2, आणि पान 6  निम्म्याहून अधिक बातम्यांनी भरून टाकायचे. 
"कँपस राऊंड अप" हे माझ्या सिटीच्या पानातल्या कॉलमचं नाव होतं आणि काही विशेष उपक्रम कॉलेजेमध्ये झाले असतील तर अशा वेळी दैनंदिन रिपोर्टींगबरोबरच "कँपस हॅपनिंग्स" नावानी मी रिपोर्टींगचं सदर चालवायचे. फील्डवर तासन्तास फिरून रिपोर्टींग करायचे, तरूणांच्या महोत्सवांचे फोटोजही अनेक वेळा स्वतःच क्लिक करायचे. फॅशन शो असो वा युथ फेस्टिव्हल अनेकवेळा मी काढलेल्या फोटोजच कौतुक आमच्या ऑफीसमधल्या माझ्या सिनीयर्सनी आणि खुद्द छायाचित्रकारांनीही केलं आहे. तसंच मी लिहीलेल्या विशेष बातम्या दिव्य मराठीच्या जॅकेटला तब्बल पाच वेळा लागल्या आहेत आणि त्या वेगवेगळ्या भाषांमध्ये भाषांतरीत होऊन दैनिक भास्करच्या निरनिराळ्या आवृत्त्यांमध्येही छापल्या गेल्या आहेत.. 
करिअरच्या सुरूवातीच्या दिवसांत स्वतःशी प्रामाणिक राहून जे जे काम केलं त्याचा मला माझ्या करिअरमध्ये प्रचंड फायदा झाला आहे आणि तेव्हा वाढलेला माझा  टायपिंगचा स्पीड आजही कायम आहे, कारण मी सातत्याने गेली आठ - दहा वर्ष लिहीत आहे.
आज हे सांगण्याचं कारण असं की, हल्ली, अनेकजण अशा हलक्या फुलक्या विषयांवर सातत्याने लिखाण करताना दिसतात. दैनिकांच्या मुख्य पानांवर या माझ्यासारख्या लेखकांना क्वचितच स्थान मिळतं पण उरलेली जी पानं असतात ती अशाच लेखकांच्या लेखांनी, बातम्यांनी भरून गेलेली असतात. पण राजकारण, न्यायालयं, मनपा, जिल्हा परिषद या महत्त्वाच्या बीट्सच्या खालोखाल नातेसंबंध, फॅशन, महिला, तरूण वगैरे विषयांची क्रमवारी लागते.. आणि मग असे विषय लिहीणाऱ्या लेखकांना तुलनेने दुय्यम स्थान आपोआपच मिळते.
पण, मंडळी, मी कोणत्याही विषयावर प्रामाणिकपणे आणि सातत्याने लिखाण करतेय हेच माझ्यासाठी आणि माझ्यासारख्या अनेक लेखकांसाठी महत्त्वाचं असतं. वर्तमानपत्राच्या दृष्टीने महत्त्वाचे बीट्स आणि ते सांभाळणारे लोक महत्त्वाचे असतात पण वाचकांच्या दृष्टीने सर्वच विषय महत्त्वाचे असतात. त्यामुळे दैनिकाला कोणत्याही एकाच विषयावर फोकस करून चालत नाही तर दैनिकांना सर्व विषय आणि ते लिहीणारे सर्व प्रकारचे लेखक हवे असतात. त्यामुळे तसं पाहिलं तर दुय्यम असं काहीच नसतं..
माझ्या मते तर, सतत मनात येणारे विचार, आजवर आलेले बरे वाईट अनुभव, स्वतःची झालेली जडणघडण, आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन आणि आपल्या लेखनामुळे लोकांपर्यंत आपला विचार नेणे जास्त महत्त्वाचे.. मग दैनिकात असो वा नसो, दैनिकात आपला लेख छापून येवो न येवो, त्याने फार फरक पडत नाही. आज आपण जे लिहू ते कधी ना कधी प्रकाशझोतात येईल आणि लोकांपर्यंत आपण पोहोचू या विश्वासाने मी लिहीत जाते, लिहीत जाते.. अगदी व्हॉट्सअॅपवरून माझी कविता शेअर करतानाही मी स्वतःच्या भावनांशी तितकीच प्रामाणिक असते आणि फेसबुकवर एखाद्या विषयावर लहानशी पोस्ट लिहीतानाही मी स्वतःशी तितकीच प्रामाणिक असते. एखादी कथा लिहीताना म्हणा किंवा एखादा गंभीर लेख लिहीतानाही मी माझ्याशी प्रामाणिक असते. त्याशिवाय मला लिहीताच येत नाही हे विशेष. अमका विषय किती महत्त्वाचा व त्यानुसार आपले शब्दलालित्य वापरण्याचे चातुर्य मला आजवर जमलेले नाही, कारण मनातल्या भावना, आणि एखाद्या विषयावर आपले विचार खरेखुरे, प्रामाणिकपणे मांडणे हे मी बिनचूक करत असते, लिहीत असते, लिहीत असते ... बसं ... 
म्हणूनच, मी कदाचित कोणाला "कॅज्युअल रायटर" वाटत असेन तर ठीक आहे, मी तर अभिमानाने सांगते, की मी एक "कॅज्युअल रायटर" आहे ...!

- मोहिनी घारपुरे - देशमुख



चिऊताई - (मी लिहीलेलं पहिलं बडबडगीत)

चिऊताईच्या गळ्यात मोत्याचा हार
इवल्याशा मुलीला आवडला फार

चिऊताई रोज गाते गाणे
चिमुकलीचे पोट भरते त्याने

चिऊताईच्या मनात मोठासा बंगला
काडीकाडी जमवताना जीव तिचा रंगला

चिऊताई चिऊताई कष्टाळू फार
चिमुकली सोसते इवलासा भार
- मोहिनी घारपुरे- देशमुख

ओघ

काही काही गोष्टी जशा
ठरवून करतो ना आपण
तशाच काही काही गोष्टी असतात
ओघवतेपणी करायच्या
स्वतःच, स्वतःला वाटलं म्हणून
आणि केवळ आपल्या समाधानासाठी।
तेव्हा नसतं बघायचं जगाकडे
कारण त्याचे डोळे असतात
नेहेमीच वटारलेले, रोखलेले नी
शोधत असतात आपल्यातल्या
भाबड्या, हळुवार जागा
बोटं दाखवण्यासाठी , नावं ठेवण्यासाठी ।
अहो, चटकन कोणाच्या डोळ्यात
जेव्हा पाणी दाटते ना
तेव्हा वाट नसते पहायची
झटकन आपणच व्हायचे असते पुढे
अन् रडणाऱ्याचे अश्रू
टिपायचे असतात आपल्या हाती ।
जेव्हा गंधित होते बकुळ
तेव्हा भरभरून घ्यायचे असतात श्वास
नी सुगंधित होऊ द्यायची असतात
एकेक गात्र, आपलीच, आपल्यासाठीच ।
पण हे सगळं करताना
लपवून घ्यायचं स्वतःला
जगाच्या रोखलेल्या नजरेपासून
नी वटारलेल्या डोळ्यांपासून
कारण ते केव्हा दंश करेल
याचा काही नेम नाही ।।
- मोहिनी घारपुरे -देशमुख



Translate

Featured Post

अमलताश